कथा * डॉ. सुधीर शर्मा

कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर वंदना त्या शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास पाळणाघरात गेली तेव्हा तिला समजले की, तिचा ५ वर्षांचा मुलगा राहुलला खूप ताप आला होता.

तिच्या फ्लॅटवर जाण्याऐवजी तिने त्याला थेट बालरोगतज्ञ डॉ. नमन यांच्या दवाखान्यात नेले. तिथली गर्दी पाहून ती तणावात आली. ८ वाजण्यापूर्वी घरी पोहोचता येणार नाही, हे ती समजून चुकली. कोरोनानंतर आता पुन्हा डॉक्टरांकडे गर्दी वाढू लागली होती.

काही वेळानंतर अस्वस्थ झालेला राहुल तिच्या कुशीत तिला मिठी मारून झोपी गेला. तिला वाटले की, आपल्या आईला फोन करून बोलावून घ्यावे, पण तिने तसे केले नाही. आई सतत तिला बडबडत असल्याने ती स्वत:चा त्रास वाढवून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

सात वाजण्याच्या सुमारास वंदनाची मोठी बहीण विनिताचा फोन आला. राहुल आजारी असल्याचे ऐकून ती काळजीत पडली. ती म्हणाली, ‘‘वंदना, जेवणाची काळजी करू नकोस. मी तुमच्या दोघांसाठी जेवण आणून देईन.’’

विनिताच्या बोलण्यामुळे वंदनाला हायसे वाटले.

डॉ. नमन यांनी मौसमी तापाचे निदान करत सल्ला दिला की, ‘‘ताप लवकर उतरण्यासाठी राहुलला पूर्ण विश्रांती द्या आणि प्रेमाने त्याला हलका आहार द्या. गरज पडल्यास मला फोन करा आणि हो, सावधगिरी म्हणून कोविड चाचणी करून घ्या म्हणजे संशयाला जागा राहाणार नाही.’’

केमिस्टच्या दुकानातून औषधे घेऊन फ्लॅटवर पोहोचेपर्यंत ८ वाजले होते. तिने सर्वात आधी राहुलला औषध दिले. त्यानंतर त्याला पलंगावर झोपवून ती स्वत:साठी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. डोके प्रचंड दुखत असल्यामुळे तिला चहासोबत डोकेदुखीची गोळी घ्यायची होती.

तिने चहा बनवला, पण तो तिला नीट पिता आला नाही. राहुलने उलटी केली होती. तिने त्याचे कपडे बदलून लादी साफ करेपर्यंत चहा पूर्ण थंड झाला होता.

आपण अचानक रडू असे तिला वाटले, पण डोळयांतून अश्रू ओघळू लागण्यापूर्वीच विनिता पती सौरभसह तेथे आली.

‘‘तू आता राहुलच्या शेजारी जाऊन बस. मी जेवण गरम करून आणते,’’ असे म्हणत विनिता आत गेली.

त्यानंतर १० मिनिटांनी वंदनाची आई कांता या मुलगा विकास आणि सून अंजलीसह तेथे आल्या.

कांता यांनी लगेचच राहुलला आपल्या मांडीवर घेत मिठी मारली. आजीला पाहून त्याला आनंद झाला.

‘‘रात्री तू माझ्यासोबतच राहा. मी तुझ्याच हातून जेवेन. तू मला एक छानशी गोष्ट सांग.’’

रस्सेदार भाजीसोबत एक चपाती खाऊन झाल्यावर राहुल आजीच्या शेजारी झोपला. वंदना आपल्या भाऊ, वहिनी, बहीण आणि भाओजींसोबत बाहेरच्या खोलीत येऊन बसली. नेहमीप्रमाणेच विकास आणि विनिताने वंदनाच्या सासर सोडून फ्लॅटमध्ये एकटे राहण्याचा निर्णयाबद्दल चर्चा केली आणि अवघ्या         १० मिनिटांत ते यावरून एकमेकांशी वाद घालू लागले. या वादात सौरभ आपल्या  पत्नीची आणि अंजली तिच्या पतीची साथ देत होते.

डोकेदुखीने त्रस्त झालेल्या वंदनाला वाटत होते की, चौघांनीही गप्प बसावे, पण ते सर्व तिच्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना गप्प करण्याचे धाडस ती करू शकली नाही.

‘‘वंदना, कोणताही वाद वाढवणे चांगले नसते. तू तुझे घर सोडून राहुलसोबत या फ्लॅटमध्ये राहतेस त्याला जवळपास २ महिने झालेत. अरुण तुला घरी परत बोलावून थकला आहे. आता तू समजूतदारपणा दाखव आणि घरी परत जा.

विकासने वंदनाला दिलेला हा सल्ला ऐकून विनिता रागावली, ‘‘दादा, चुकीचे सल्ले देऊन तिचे आयुष्य पणाला लावू नकोस,’’ विनिताने उलट उत्तर दिले.

‘‘सासरच्या नरकात परत जाण्यासाठी वंदनाने वेगळे राहण्याचे पाऊल उचलले नव्हते. रात्रंदिवस तिला टोचून बोलले जायचे… नेहमी अपमान केला जायचा. असे मन मारून जगण्यात ७ वर्षे वाया घालवणे हा खूप मोठा कालावधी आहे. अरुणला पत्नी आणि मुलासोबत राहायचे असेल तर त्याला आता वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागेल. वंदना कोणत्याही किंमतीत परत जाण्याचा मूर्खपणा करणार नाही.

‘‘तू आगीत तेल ओतून तिचे डोके खराब केले नसतेस तर आज ती तिच्या नवऱ्यापासून अशी दूर राहिली नसती,’’ विकासच्या कडवट स्वरात कमालीचा राग होता.

दादा, विनितावर चुकीचा आरोप करू नका,  ‘‘सौरभने लगेच पत्नीची बाजू घेतली,’’ आम्ही दोघेही वंदनाला साथ देतोय. वेगळया फ्लॅटमध्ये राहणे हा तिचा स्वत:चा निर्णय आहे आणि तुम्ही बघाच, तिला जे हवेय ते ती लवकरच मिळवून दाखवेल.’’

‘‘अरुण दबावाखाली येऊन आपले घर सोडायला तयार होईल, असे तुला वाटतेय का?’’

‘‘नक्कीच. पत्नी आणि मुलापासून दूर राहणे सोपे नसते.’’

‘‘भाओजी, मला तुमचे म्हणणे पटत नाही,’’ अंजलीने तिचे मत व्यक्त केले.

‘‘अरुण भाओजींचे त्यांच्या कुटुंबाशी खूप घट्ट नाते आहे. त्यांच्या धाकटया बहिणीचे अजून लग्न झालेले नाही. तिचे लग्न होत नाही, तोपर्यंत ते विभक्त होण्याचा प्रश्नच येत नाही.

घरापासून दूर राहून ते स्वत:च्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत का? वंदनाला सुखी ठेवण्याची त्यांची पहिली आणि मुख्य जबाबदारी नाही का?

विनिताच्या या प्रश्नावर उत्तर नसल्याने विकास आणि अंजलीला गप्प बसावे लागले.

अरुण आणि वंदनाच्या बिघडलेल्या नात्याबद्दल चौघांमध्ये चर्चा होत राहिली. वंदनाने कशीबशी एक चपाती खाल्ली. डोके प्रचंड दुखत असतानाही नाईलाजाने ती त्या चौघांसोबत बसून राहिली. अधूनमधून तिचे मन भूतकाळातल्या आठवणींमध्ये डोकावत होते. त्या चौघांमध्ये सुरू असलेल्या वादात तिला फारसा रस नव्हता, कारण तिने त्यांचे वाद यापूर्वी अनेकदा ऐकले होते.

चार तास उलटूनही कुणीच गप्प बसायला तयार नव्हते तेव्हा कंटाळून वंदना खालच्या आवाजात नम्रपणे म्हणाली, ‘‘सासर सोडून वेगळे राहण्याचा माझा निर्णय योग्य होता की अयोग्य, या विषयावर आता चर्चा करून काय उपयोग? कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. भविष्यात माझ्या या पावलामुळे जे काही होईल त्यासाठी मी स्वत:ला जबाबदार समजेन, इतर कोणालाही नाही.’’

‘‘तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत,’’ विनिताने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी उभी राहिली.

‘‘अरुणला राहुलच्या आजारपणाबद्दल कळव,’’ असा सल्ला देऊन विकास निघायला उठला.

‘‘सकाळी आईला इथे पाठव. माझ्या कार्यालयात सध्या प्रचंड काम सुरू आहे. उद्या शनिवार असूनही मला जावे लागेल,’’ वंदनाचे हे बोलणे ऐकून विकासच्या कपाळावर आठया पडल्या.

‘‘उद्या अंजलीच्या आईवडिलांकडे आम्हाला जेवायला जायचे आहे. आईही आमच्यासोबत येणार आहे,’’ विकासने सांगितले.

‘‘तू राहूलला माझ्याकडे सोड,’’ विनिताने समस्येवर उपाय सांगितला.

‘‘नाही, ते योग्य होणार नाही. त्याला कोविड झाला असेल तर अमित आणि सुमितलाही ताप येईल. आईने अंजलीच्या घरी जाणे रद्द करून इथेच राहायला हवे,’’ सौरभ इतक्या कडक, कोरडया स्वरात बोलला की विनिता तिच्या पतीच्या बोलण्याचा विरोध करूच शकली नाही.

‘‘मी आज रात्रीही राहिले असते, पण मी माझी औषधे आणली नाहीत, शिवाय मला परक्या ठिकाणी नीट झोप येत नाही. राहुलचा ताप आता कमी झाला आहे. मला वाटते, तो सकाळीही झोपून राहील. मी सकाळी लवकर येईन,’’ कांता त्यांच्या सुनेसोबत घरी जायला निघाल्या. त्यानंतर वंदनाने आईला एकदाही थांबायला सांगितले नाही.

सर्व निघून गेल्यावर ती राहुलजवळ जाऊन त्याचा हात पकडून बसली. मुलाच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत असताना अचानक तिच्या संयमाचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली.

कितीतरी वेळ ओघळणाऱ्या अश्रूंमुळे तिला आतून हलके वाटू लागले. खूप थकल्यासारखे आणि सुस्त वाटू लागल्याने ती राहुलच्या शेजारी पडली आणि त्यानंतर तिला कधी झोप लागली हे तिचे तिलाही समजले नाही.

सकाळी तिच्या मोबाईलवर राहुलला कोविड नसल्याचा अहवाल आल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. ७ वाजण्याच्या सुमारास ती उठली तेव्हा तिला खूप बरे वाटत होते. त्यातच राहुलचा ताप कमी झालेला पाहून तिला अधिकच प्रसन्न वाटले.

वंदना नेहमी ८ वाजता कार्यालयात जायला निघायची, पण तिची आई या वेळेपर्यंत तिच्या घरी पोहोचली नव्हती. तिला २-३ वेळा फोन केल्यानंतर ती नऊच्या सुमारास विकाससोबत आली.

उशिरा आल्यामुळे वंदना तिच्या भावाशी आणि आईशी भांडली. नाराज होऊन आई निमूटपणे गप्प बसली, पण विकासने तिची खरडपट्टी काढली. ‘‘आज सुट्टीच्या दिवशी तू तासाभर कामाला उशिराने गेलीस तर तुझ्या कामावर एखादे मोठे संकट येणार नाही. नोकरदार महिलांचे डोके नेहमीच फिरलेले असते. तुम्ही काम करता म्हणजे सर्वांवर खूप मोठे उपकार करता, असा विचार तुम्ही का करता? आता प्रत्येक माणूस तुमच्या मागेपुढे तुमची सेवा करत फिरणार का?’’

विकासचे असे उत्तर ऐकून वंदनालाही राग आला आणि त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला.

वंदना तासभर उशिराने कार्यालयात पोहोचली तेव्हा तिला तिच्या साहेबांची बोलणी ऐकून घ्यावी लागली. बहुतेक जण घरून काम करत होते, पण काही महत्त्वाच्या कामासाठी तिला स्वत: कार्यालयात हजर राहावेच लागत असे. त्यामुळे कामाचा ताण वाढत असल्यामुळे तिला तिच्या समस्यांबद्दल कधी फारसा विचार करायला वेळ मिळाला नव्हता, पण मन सतत उदास असायचे.

दिवसभरात फक्त दोनदा आईशी बोलून तिला राहुलच्या तब्येतीबद्दल विचारता आले. औषधांमुळे त्याचा ताप फारसा वाढला नव्हता. राहुल दोन्ही वेळेला झोपला असल्याने ती त्याच्याशी बोलू शकली नाही.

दुपारच्या जेवणाच्या वेळी तिला अरुणचा फोन आला. ती वेगळी राहायला लागल्यापासून त्यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोघांनीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद केले होते.

राहुल आजारी पडल्याचे ऐकून अरुण काळजीत होता.

‘‘त्याची काळजी करू नका. मी त्याची जितकी काळजी घेते त्यापेक्षाही माझी आई त्याची चांगली काळजी घेतेय,’’ वंदनाने रुक्षपणे उत्तर दिले आणि राहुलच्या आजाराचा विषय क्षणार्धात संपवला.

इच्छा असूनही ती कामावरून लवकर निघू शकत नव्हती. संध्याकाळी ६ वाजता ती घरी पोहोचली तेव्हा अरुण राहुलसोबत खेळताना पाहून तिला धक्का बसला.

अरुणने या फ्लॅटमध्ये कधीही पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली होती, कारण तिच्या इथे येऊन वेगळे राहण्याच्या निर्णयाचा त्याला खूप राग आला होता.

वडिलांना पाहताच राहुलने त्यांना मिठी मारली. त्यानंतर अतिशय आनंदाने त्यांनी आणलेली रिमोट कंट्रोल गाडी तो आईला दाखवू लागला.

कांता यांनी ३ कप चहा आणला. सर्वजण आपापसात बोलण्याऐवजी राहुलशी बोलत होते. तिघांचेही केंद्रबिंदू असल्याने राहुल खूप आनंदी होता.

चहा पिऊन वंदना कपडे बदलण्यासाठी आत गेली. अंघोळ करून ताजेतवाने होऊन ती आली तेव्हा अरुण परत जायला निघाला होता.

‘‘बाबा, तुम्ही जाऊ नका,’’ राहुल वडिलांच्या गळयात हात घालून रडू लागला.

‘‘मी पुन्हा येईन, माझ्या बाळा. तू वेळेवर औषध घे. आई आणि आजीला त्रास देऊ नकोस. तू बरा झालास तर उद्या तुला बाहेर फिरायला घेऊन जाईन,’’

अरुणने राहुलच्या कपाळाचे चुंबन घेत त्याला प्रेमाने समजावले.

‘‘तुम्ही थोडया वेळाने जा. मी आत स्वयंपाकघरात जाऊन येते,’’ वंदनाने ठामपणे सांगितल्यामुळे अरुण काहीच बोलू शकला नाही आणि शांतपणे सोफ्यावर जाऊन बसला.

कांता त्यांच्या घरून जेवण बनवून आणायला तयार होत्या, पण वंदनाने त्यांना नकार दिला. मुलीचे वागणे त्यांच्या आकलनापलीकडचे होते. वंदनाचा शांत, गंभीर चेहरा तिच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागू देत नव्हता.

आज अरुणचा मूड चांगला दिसतोय. तू प्रेमाने आणि शांतपणे त्याला वेगळया घरात राहण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केलास तर तो नक्कीच ऐकेल,’’ असा सल्ला देऊन सातच्या सुमारास कांता त्यांच्या घरी गेल्या.

राहुल आणि अरुण एकमेकांशी खेळण्यात मग्न होते. वंदना स्वयंपाकघरात होती. तिने भाजी, रायता आणि चपात्या बनवून जेवण टेबलावर ठेवले.

त्या दिवशी ती अरुणशी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने बोलत होती. एकही तक्रार तिच्या ओठावर आली नाही.

अरुणही काही वेळाने मोकळेपणाने बोलू लागला. त्याने त्याची धाकटी बहीण अंजूच्या लग्नाबद्दल कुठे बोलणी सुरू आहेत त्याबद्दल सांगितले. दोघांनी आपापल्या कार्यालयाशी संबंधित माहिती एकमेकांना दिली. मित्र आणि नातेवाइकांबद्दल बोलणे झाले. एकंदरीत बऱ्याच दिवसांनी त्यांच्यात कोणताही वाद न होता दोन तास निघून गेले. जेवण झाल्यावर वंदना भांडी गोळा करून स्वयंपाकघरात गेली.

राहुल आणि अरुण पुन्हा गाडी घेऊन खेळू लागले. दोघे एकमेकांमध्ये इतके रमले होते की, दीड तास वंदना तेथे नव्हती, हेही त्यांना समजले नाही.

अरुणने मोठयाने हाक मारल्यानंतर वंदना बाहेर आली.

‘‘आता मी निघतो. ९ वाजलेत,’’   राहुलला मांडीवरून उतरवून अरुण उठून उभा राहिला.

वंदना काहीही उत्तर न देता आत गेलेली पाहून अरुणच्या डोळयात आश्चर्य आणि संभ्रमाचे मिश्र भाव उमटले.

चाकांची मोठी बॅग घेऊन वंदना लगेच परतली तेव्हा अरुणला धक्काच बसला.

‘‘चला,’’ वंदनाने बॅग मुख्य दरवाजाकडे ढकलली.

‘‘तुम्ही येताय का सोबत?’’

‘‘हो.’’

वंदनाचे उत्तर ऐकून राहुलने आनंदाने टाळया वाजवल्या आणि वडिलांना मिठी मारली.

‘‘असे अचानक येताय… मला खूप आश्चर्य वाटले आणि खूप आनंदही झाला,’’ अरुणने राहुलच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले.

अरुणचा हात हातात घेत वंदना भावूक स्वरात म्हणाली, ‘‘आपले घर सोडून गेल्यानंतर आता पुन्हा घरी परत जाताना तुम्ही दोघेच नाही तर आपण तिघेही खूश आहोत.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...