अतिप्रेम ठरेल डोकेदुखी

* निधी गोयल

पती-पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि समर्पण या भावनांनी जोडलेले असते. जसजसा एकमेकांना वेळ दिला जातो तसे नाते अधिक घट्ट होत जाते. गोड नात्यात काही कारणास्तव आंबटपणा कालवल्यास त्याचे विष बनते. त्याचप्रमाणे अतिप्रेम दोघांसाठी हानिकारक ठरू शकते.

खरंतर, पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा तोदेखील तुमच्याकडून बेशुमार प्रेमाचे अपेक्षा करतो. पण प्रेमाची समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा तुमचा पार्टनर तुमचे म्हणणे समजून घेऊ शकत नाही. अशावेळी तुमचं नातं संपुष्टात येण्याची शक्यता असते. अशा स्थितीत दोघेही एकमेकांप्रती चुकीच्या भावना मनात बाळगू लागतात. एकास वाटते की माझ्या प्रेमाला काही किंमतच देत नाही तर दुसरा विचार करतो की, माझा पार्टनर माझे सर्व स्वातंत्र्यच हिरावून घेत आहे. मग अशी वेळ येते की त्यांना एकमेकांपासून दूर व्हावे लागते. अशीच वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून या सूचनांवर लक्ष द्या :

प्रत्येकक्षणी नजर ठेवू नका : बऱ्याचदा आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळी त्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी असा विचार करत असतो. पण समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवले जाते. अतिप्रेमामुळे पार्टनर वैतागून जातात. कारण तुम्ही प्रत्येकवेळी त्यांच्यावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर, झोपण्यावर, उठण्यावर, येण्याजाण्यावर नजर ठेवता. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांचे स्वातंत्र हिरावले जात असल्याची भीती निर्माण होते. ते स्वत:ला एका बंधनात बांधल्याचा अनुभव घेत असतात.

नात्याला स्पेस देणे : नाते कोणते का असेना, त्या नात्यात स्पेस असणे गरजेचे असते. नाहीतर त्या नात्याचे आयुष्य मर्यादित राहाते. नात्यात स्पेस न दिल्यामुळे प्रेम कमी होते आणि भांडण-तंट्यांमध्ये वाढ होते. यामुळे नात्यात जवळीकतेऐवजी दरी निर्माण होते.

प्रत्येकवेळी पार्टनरच्या सोबत राहणं : आपल्या पार्टनरवर अमाप प्रेम करणारे, त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळस असेही होऊ शकते की पार्टनरची त्याच्या मित्रमंडळींसह नातेवाईकांसह वेळ घालवण्याची इच्छा असू शकते. अशावेळी त्याच्यासाठी तुमचे प्रेम शिक्षा ठरू शकते.

अपेक्षांना सीमा असावी : बऱ्याचदा तुम्ही पार्टनरकडून खूपच अपेक्षा करू लागता. जर त्याचे माझ्यावर प्रेम असेल, त्याने माझ्या अपेक्षांवर खरे उतरलेच पाहिजे. अशा भावनांनी प्रेमाची परीक्षा घेणे, जेवढे तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तेवढेच प्रेम त्यानेही तुमच्यावर करावे. अशा अपेक्षांमुळे तुमच्या पार्टनरला बंधनात अडकल्यासारखे वाटते. मग अशावेळी ते या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.

संशय घेऊ नका : तुमचा पार्टनर प्रत्येक छोटीछोटी गोष्ट तुम्हाला विचारून करेलच असे काही नाही. पण तरीही तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवू लागता की त्याने प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच करावी. तसेच तुम्ही प्रत्येकवेळी त्याला फोन कुठे आहे? काय करत आहे? असे विचारून प्रश्नांचा भडीमार करता आणि मनात संशयाची सुई निर्माण करता. त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची बातमी ठेवता इत्यादी सर्व गोष्टींमुळे तुमचा पार्टनर हैराण होऊन जातो.

जवळीकतेला मर्यादा हवी : नात्यात मर्यादेपेक्षा अधिक जवळीकता निर्माण झाल्यावर, एकमेकांमध्ये तक्रारी होण्याच्या संभावना बळावतात. कारण काही वेळेस आपल्या माणसावर हक्क दर्शविणे हे आदेशासमान भासू शकते. म्हणूनच आपल्या पार्टनरवर अतिप्रेम करू नका. तर त्याला प्रेम द्या. म्हणजे मग त्याला स्वत:चे स्वत:लाच जाणवेल की तुमची आणि तुमच्या प्रेमाची किंमत काय आहे ते?

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रेम तुम्हा दोघांसाठी डोकेदुखी ठरू नये तर यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या :

* तुमचे तुमच्या पार्टनरवर प्रचंड प्रेम आहे म्हणून ते त्याच्यावर लादू नका आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर मुळीच करू नका.

* जेवढे प्रेम आणि काळजी तुम्ही तुमच्या पार्टनरची करता, तेवढेच प्रेम आणि काळजी त्यानेही करावी. अशी अपेक्षा मनाशी बाळगत असाल, तर प्रेम आणि काळजी कोणतीही अपेक्षा न ठेवता करणे कधीही चांगलेच ठरेल.

* प्रत्येकवेळी आपल्या पार्टनरच्या जोडीला राहू नका. तुमच्या प्रेमाची सीमा राखा.

* जर तुमच्या पार्टनरकडून तुमच्यावर दबाव टाकला जात असेल तर, त्याच्यापासून वेगळे होणे हा अंतिम पर्याय नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या पार्टनरला थोडा वेळ द्या. कोणत्याही दबावामुळे तुमचे नाते दीर्घकाळ टिकणे कठीण होईल.

* तुमच्याएवढे प्रेम तुमचा पार्टनर तुमच्यावर करू शकत नसेल किंवा तुमच्या मनाप्रमाणे प्रतिक्रिया देऊ शकत नसेल तर तुम्ही मनाशी धीर धरा आणि पार्टनरशी यासंबंधी संवाद साधा.

* दिवसागणिक नात्यात बदल येत राहतात. काळानुरूप अनेक गोष्टी बदलतच जातात. पण प्रेमासाठीच्या अपेक्षा तशाच जिंवत राहतात. अशावेळी तुम्ही नात्याला सावरत, त्या बदलांवर तुमच्या पार्टनरशी संवाद साधत राहणे.

* नेहमीच होणाऱ्या तंट्याने आणि रोखठोकीने नाते दीर्घकाळ टिकत नाही. प्रत्येक क्षणी पार्टनरवर लक्ष ठेवणे म्हणजे प्रेम नव्हे तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या प्रति असलेला अविश्वास दिसून येतो.

कसे असावे नाते सासूसुनेचे

* मोनिका अग्रवाल

मुलांना मोठं होत असताना पाहून त्यांचे आईवडिल त्यांच्या लग्नाची स्वप्नं पाहू लागतात. मग कोणाच्या तरी मुलीला आपल्या घराण्याची शोभा बनवून आपल्या कुटुंबात घेऊन येतात. याचप्रमाणे मुलीला मोठी होताना पाहून तिच्या केवळ विवाहाच्या कल्पनेनं आईवडिल भावुक होतात. इतकेच नाही, स्वत: मुलगीसुद्धा तिच्या लग्नाच्या कल्पनेने, वेगवेगळ्या भावतरंगामध्ये गुंतलेली असते. ती फक्त पत्नीच नव्हे तर तरी सून, वहिनी, काकू, ताई, जाऊ अशी अनेक नाती निभावत असते.

लग्नाच्या काही काळानंतर न जाणे काय बदल घडतात, पण सासरच्यांना सुनेत दोषच दोष दिसून येतात. दुसरीकडे मुलगीही सासरच्या माणसांविषयी स्वत:चे विचार व वागणूक बदलते. काही कुटुंबांमध्ये तर ३६चा आकडाच निर्माण होतो. मुलीच्या सासरचे तर कुटुंबांतील प्रत्येक समस्येचे मूळ सुनेला आणि तिच्या कुटुंबाला समजू लागतात.

एकमेकांना समजून घ्या

एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. जेव्हा आपण एखाद्याची मुलगी आपल्या कुटुंबात घेऊन येतो, तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या (जिथे ती लहानाची मोठी झाली) घरापेक्षा एकदम वेगळे वातावरण मिळते. मग ते राहण्यावागण्याबाबतीत असो किंवा खाण्यापिण्याच्या किंवा स्वभावाच्या बाबतीत. सर्वच दृष्टीने खूप बदल झालेला असतो.

याशिवाय पतिपत्नीचे आपापसातील संबंध समजून घ्यायलाही तिला थोडा अवधी लागतो. अशावेळी कुटुंबातील लोकांनी अपेक्षा थोड्या कमी ठेऊन सुनेला आपले मानून समजुतीने घ्यावे तर बहुधा समस्या निर्माण होणार नाहीत.

सुन घरी येण्याआधी सासू खूप अपेक्षा बाळगते जसे की सुन येईल आणि कामाचा ताण कमी होईल. ती सर्वांची सेवा करेल वगैरे.

सुनेचे घरातील कामात परिपूर्ण नसणे किंवा कमी काम करणे हा खूप मोठा दोष समजला जातो. प्रत्येक सासू हे विसरून जाते की सुरूवातीला सासरी आल्यावर जसा तिला पतिचा सहवास आवडत असे तसाच सुनेलाही हवाहवासा वाटणार.

मान देऊन मान मिळवा.

सासूसुनेचे संबंध मधुर बनून राहावेत यासाठी सासूच्या वागण्यात उदारता, धैर्य आणि त्यागाचे भाव असणे आवश्यक आहे. आपल्या प्रियजनांना सोडून आलेल्या सुनेसोबत मायेची वर्तणूकच तिला नव्या परिवारासोबत जोडू शकेल, तिला आपलेपणा वाटू शकेल आणि तिच्या मनात सन्मान आणि सहकार्याची भावना निर्माण करू शकेल. सुनेला फक्त काम करणारी मशीन न समजता कुटुंबाचे सदस्य मानले जावे.

सुनेच्या विचारांना व भावनांना महत्त्व दिले जावे. कुटुंबातील प्रत्येक निर्णयात तिचेही मत विचारात घ्यावे, जेणेकरून कुटुंबात सुखशांती व समृद्धी टिकून राहिल.

सासूने घरातील सर्व कामे सुनेला न सोपवता स्वत:सुद्धा काही काम केले तर सासूचे आरोग्य सुदृढ राहीलच, कुटुंबातील वातावरणही चांगले राहील.

तसेच लग्नानंतर मुलीचीही काही कर्तव्य आहेत, जी तिने पार पाडली पाहिजेत. मुलीला हे कळत नाही की कुठल्याही सदस्याकडून समजावले जाणे ही ढवळाढवळ नाही. घरातील थोडेसे कामसुद्धा तिला ओझे वाटू लागते. तिला असे वाटते की पतिवर तिचाच हक्क आहे. त्याने जर इतर कोणाला वेळ दिला तर तिला ती स्वत:ची उपेक्षा वाटते. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर सासरी अधिकार काय हे तर तिला माहित असते, पण कर्तव्यपालन करणे तिला ओझ्यागत भासते.

सासरीसुद्धा मुलीसारखे अधिकार मिळावेत असे वाटणे गैर नाही, पण कोणी काही हटकले की ती हे विसरून जाते की माहेरीसुद्धा असेच होते. हे खरं आहे की सासरी कुणाशीही (तिच्या मुलांशिवाय) तिचे रक्ताचे नाते नाही पण माणुसकी आणि प्रेमाचे नाते तर आहेच.

तिनेही हे सत्य मनापासून स्विकारायला हवे की थोड्या मेहनतीने सर्वांचे मन जिंकून ती सर्वांना आपलेसे बनवू शकते. नोकरदार मुलींना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ अधिक व्यतित करायला वेळ मिळत नाही. पण वेळ काढला जाऊ शकतो आणि कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनण्यासाठी काही कर्तव्य तिचीही असतात. कुटुंबीयांना आदर आणि प्रेम देऊन ती आपल्या पतीचे मन जिंकू शकते.

विवादापासून दूर राहा

खरंतर वर्चस्वाची लढाईच सासूसुनेमध्ये तेढ निर्माण करते. कुठल्याही संयुक्त कुटुंबात सासू आणि सुन बहुतांशी वेळ एकमेकींसोबत घालवतात. त्यांच्यावरच कामाची जबाबदारी असते. अशात घरात अशांततेचे मुख्य कारणही सासू आणि सुनेचे कटु संबंध हेच असते.

आज टीव्हीवर अनेक मालिका सासूसुनेच्या नात्यावरच आधारित असतात. दोघांपैकी कोणीतरी एक चाल खेळत असते. कधी नात्यांना उपहासात्मक विडंबन पद्धतीने सादर केले जाते. निरनिराळ्या सर्वेक्षण व शोधांमधून हे समोर आले आहे की संयुक्त कुटुंबामध्ये तणावाचे कारण ६० टक्के सासूसुनेतील नाते हेच असते.

ज्या घरांमध्ये मोठ्या चवीने या मालिका पाहिल्या जातात तिथेच वादविवाद जास्त होतात. ते तासन्तास त्यावर चर्चासुद्धा करतात की सासू किती चुकीचे वागत आहे. किंवा त्या कुटुंबातील सुन कशी चलाख आहे. तेव्हाच या सासूसुनेच्या मनातही हेच ठसते की मालिकेतील पात्रांप्रमाणेच वागायला पाहिजे आणि टीव्हीवर पाहिलेले सर्व आयुष्यातही उतरू लागते व स्वत:वर तशी वेळ आल्यास आपणही तसेच वागतो.

आपण सर्वच कुठल्या न कुठल्या चित्रपट किंवा मालिकेतील पात्रांशी स्वत:ला जोडून पाहतो व तसे बनण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कशी सासू बनायला आवडेल? ‘कुछ रंग प्यार के’ सिरीअल मधल्या ईश्वरीदेवीसारखी की ‘बालिका वधू’मधल्या दादीसारखी?

सुनेचे कुठले पात्र तुम्हाला सूट करते? तुम्ही सासूसुनेच्या कुठल्याही पात्राप्रमाणे वागा, पण एक प्रश्न स्वत:ला नक्की विचारा की घरातल्या कुठल्याही सदस्याला त्रास देऊन तुम्ही खूश राहू शकता का? कुटुंबातील सदस्यांचा आत्मसन्मान दुखावून तुम्ही स्वस्थ बसू शकता का? कुटुंब एका माळेसारखे आहे आणि यातील सदस्य मोती आहेत. मग ही नाती तोडून तुम्ही खुश राहू शकाल का?

सुनांनी शक्यतो कधी ज्येष्ठांशी वाद घालू नये. विवादस्पद परिस्थिती उद्भवू देऊ नये. आपले म्हणणे शांतपणे त्यांच्यासमोर मांडा. मुलाने समंजस्यपणे ही स्थिती हातळावी. एक गुणी मुलगा, पती आणि जावयाच्या रूपात हा समजूतदारपणा असावा.

मुंबई येथे राहणाऱ्या वाणीचे म्हणणे आहे, ‘‘मी तमिळ कुटुंबातील आहे आणि माझे लग्न एका पंजाबी कुटुंबात झाले. मला सासूची खूप भीती होती. माझ्या मैत्रिणींनी आणि नातेवाईंकांनी मला सासूविषयी खूपच घाबरवून सोडले होते. आमचं लग्न वेगळ्या धर्मात झाले होते. राहणेखाणे, वागणेबोलणे सर्व वेगळे होते. पण मी जितके घाबरत होते त्याच्या उलटच झाले.’’

‘‘माझ्या सासूने मला प्रेमाने सर्व करायला शिकवले. हिंदी बोलायला शिकवले. त्या मला सासू कमी आणि मैत्रीण जास्त वाटल्या.’’

दिल्लीची मधू सांगते, ‘‘मी अवघी १६ वर्षांची असताना आनंदाने माझ्या सासरी गेले. माझ्या मनात कुठलाही पूर्वग्रह आणि भीती नव्हती. मी ठरवले होते की कोणालाही उलट उत्तर देणार नाही. मग माझ्यावर कोणी का नाराज होईल?

‘‘सासूबाई तसे तर खूप प्रेमाने बोलत. मनातल्या मनात का कोणास ठाऊक मुलगा बदलेल अशी भीती त्यांना वाटत असे. त्यामुळे त्या माझ्या कामात काही ना काही चुक काढत असत. मी कुठलाही वादविवाद करत नसे, तरी गोष्टी हळूहळू चिघळू लागल्या.

‘‘सासूबाई आता बाहेरच्या लोकांसमोरही माझा पाणउतारा करू लागल्या. त्या प्रत्येक वेळेस माझ्याबद्दल वाईट बोलत असत. माझीही सहनशक्ती संपत होती. मी त्यांना उलट ऐकवायला लागले होते. यामुळे घरातील वातावरण बिघडू लागले होते. पती सतत तणावग्रस्त राहू लागले. ते ना आईला समजावून सांगू शकत होते ना मला.

‘‘यादरम्यान त्या आजारी पडल्या, पण जेव्हा मी त्यांची खूप सेवा केली तेव्हा त्यांचे मनपरिवर्तन झाले. माझ्या सेवेमुळे त्या माझ्यावर प्रेम करू लागल्या. त्यांचे मन परिवर्तन माझ्या सेवेमुळे झाले की माझ्या समजूतदारपणामुळे हे माहीत नाही, पण महत्त्वाचे हे आहे की आज घरातील वातावरण एकदम शांत आहे.’’

या दोन्ही प्रकरणांपेक्षा वेगळे प्रकरण आहे मोहिनीचे. ती सांगते, ‘‘माझे लग्न झाले आणि समस्यांचे सत्रच सुरू झाले. पूर्ण घरात सासूचे आणि नणंदेचे वर्चस्व होते. नुसते म्हणण्यापुरतेच नणंद विवाहित होती, पण प्रत्येकवेळी मला त्रास देत असे. मी सासूसासरे आणि नणंद या त्रिकोणात अडकून गेले होते.

‘‘पती नेहमी शांत असत. त्या दोघांच्या कुटिलपणामुळे आमच्यावर वेगळे होण्याची वेळ आली होती. पण अचानक परिस्थिती अशी बदलली की पतीच्याही लक्षात आले की कमतरता कुठे आहे.

‘‘नणंद आपल्या निढीवलेल्या वर्तनामुळे माहेरीच आहे. सासूबाईंनाही आता माझं महत्त्व पटलं आहे. मुलगी आणि सून यामध्ये एक पुसटशी रेषा असते. गरज असते ती फक्त रेषा पुसून टाकण्याची. मागे वळून पाहताना खूप दु:ख होते कारण महत्त्वाचा सोनेरी काळ लोटला होता. पण तरी समाधानाची बाब ही की उशिरा का होईना त्यांना त्यांची चूक समजली आहे.’’

परकी नाही स्वत:ची मुलगी समजावे

काही घरात सासूसुनेचे नाते माय लेकींसारखे असते तर काही घरात परिस्थिती खूपच वाईट असते. कमतरता ना सासूमध्ये असते ना सुनेत, कमतरता तर त्यांच्या समंजसपणात आणि त्यांच्या प्रेमात असते.

प्रश्न हा आहे की शेवटी सासूसुनेला परके का समजते? घरातली गोष्ट आहे असे असेल तर आपल्याला हेच ऐकायला आवडेल की घर तिचे आहे, पण घरांसोबत जबाबदाऱ्याही येतात.

दुसरीकडे काही सुना अशा असतात की त्यांना फक्त त्यांच्या नवऱ्याची आणि मुलांचीच जबाबदारी घ्यायची असते, सासूसासऱ्यांची नाही. याला घर सांभाळणे म्हणता येणार नाही.

वस्तूत: घर सर्व कुटुंबाचे असते. प्रत्येक सदस्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला हव्यात. घर फक्त सासूचे आहे म्हणणे किंवा मुलगा आणि त्याच्या पत्नीचे आहे असे म्हणणे चुक ठरेल. कारण घरात इतर लोकसुद्धा राहतात. कोणा एका व्यक्तीमुळे घर बनत नाही. घर पूर्ण कुटुंबामुळेच बनते.

लहान लहान बाबी लक्षात ठेवल्या तर कुटुंबाचे वातावरण सहज, सुखद आणि शांततापूर्ण राहू शकेल.

नवे नातेबंध, वर्क वाइफ, वर्क हझबंड

* वीणा सुखीजा

तुम्हाला त्याच्या मित्रांची नावं माहीत आहेत. तुम्हाला त्याच्या आवडत्या चित्रपटांची नावं ठाऊक आहेत. तुम्हाला त्याच्या जीवनात घडलेल्या अनेक विशिष्ट घटनांची माहिती आहे. तुम्ही त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता. कधीकधी तो तुम्हाला रागावतो. तरीदेखील तुम्ही त्याची कुणाकडेही तक्रार करत नाही, अगदी तुम्हाला याचं वाईटही वाटत नाही. तुम्हाला त्याच्या बोलण्याची लकब ठाऊक आहे. त्याच्या मनात काय सुरू असतं, याचाही तुम्हाला अंदाज असतो.

प्रश्न – अखेरीस तुमचा तो कोण आहे?

तुम्ही तिच्याकडून अपेक्षा बाळगता की तिने तुमच्या पसंतीचा पेहराव करावा. जेव्हा तुम्ही दोघे लंच करायला बसता तेव्हा तिने वाढावं अशी तुमची इच्छा असते. तुम्ही काही बोलत असाल, मग भले ते रागाने असेल तरी तिने ते निमूटपणे ऐकून घ्यावं, त्यावेळी उलट उत्तर देऊ नये, नंतर भले ती ओरडली तरी चालेल असं वाटतं.

तुम्ही तिला आपल्या भविष्यातील योजना सांगता, प्रवासादरम्यान घडलेल्या मजेदार गोष्टी सांगता. तुम्ही तिच्यासोबत बसून काम करण्याच्या उत्तम रणनीतीवर विचार करता.

प्रश्न – अखेरीस ती तुमची कोण आहे?

होय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पती आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पत्नी. परंतु थांबा, हे सामान्य जीवनातील पतिपत्नी नाहीत. हे वर्क हझबंड आणि वर्क वाइफ आहेत. वर्क हझबंड म्हणजे कार्यस्थळी वा कार्यालयातील पती. अशाचप्रकारे वर्क वाइफचाही अर्थ आहे. कार्यस्थळ वा कार्यालयातील पत्नी. ऐकायला हे भले थोडं विचित्र वाटत असेल वा संकोच वाटेल, परंतु वास्तव हेच आहे. कामाची नवी संस्कृती भरभराटीला येण्यासोबतच जगभरात अशा पतिपत्नींची संख्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांच्या जवळपास ४० टक्के आहे.

१९५०च्या दशकात अमेरिकेत अशा नात्यांसाठी मोठ्या शिताफीने एका शब्दाचा वापर केला जात असे – वर्क स्पाउज. हे वर्क वाइफ, वर्क हझबंड हे शब्द वास्तविक त्याचीच विस्तारीत रूपं आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की कार्यक्षेत्र जगतातील हे काही नवं नातं नाही. नवीन आहे ते इतकंच की या नात्याला जगाच्या बहुतेक देशांमध्ये स्पष्टरीत्या स्वीकारालं जाऊ लागलं आहे.

त्यामुळे आपण या नात्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याची काही गरज नाही. वर्षांनुवर्षांपासून जगात अशाप्रकारच्या संबंधांचं अस्तित्त्व आहे आणि का असू नये? हे खूप स्वाभाविक आहे की जेव्हा आपण दिवसातील बहुतेक कालावधी सोबत व्यतित करतो तेव्हा तिथे भावनिक नातं का विकसित होणार नाही?

ऑस्कर वाइल्डने म्हटलं होतं, ‘‘स्त्री आणि पुरुषात सर्व प्रकारची नाती असू शकतात, परंतु केवळ मैत्री असू शकत नाही. मित्र असूनही त्यांच्यात स्त्री आणि पुरुषाचं नातं विकसित होतं.’’

मनोविश्लेषकही सांगतात की जेव्हा दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकमेकांसोबत आकर्षण अनुभवतात, तेव्हा त्यांचं हे आकर्षण त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वभावधर्मानुसार आकार घेऊ लागतं म्हणजे पुरुष हा पुरुष होतो आणि स्त्री, स्त्री होते.

पूर्वीसुद्धा होते असे नातेबंध

असे नातेबंध नेहमीच अस्तित्वात होते आणि जोपर्यंत स्त्री आणि पुरुष सोबत असतील तोपर्यंत ते कायम राहातील. असे नातेबंध पूर्वीसुद्धा होते, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी होतं, याचं कारण होतं त्या काळात स्त्रियांचं घरातून बाहेर पडणं कठीण होतं. कार्यालयात साधारणपणे पुरुषच असायचे. परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या जमान्यात स्त्री आणि पुरुष दोघेही घराबाहेर पडून सोबत काम करत आहेत. दोघेही घराऐवजी कार्यालयात अधिक वेळ व्यतित करतात. कामाची संस्कृतीसुद्धा काहीशी अशीच विकसित झाली आहे की सर्व कामं सोबत एकत्रित करावी लागतात. त्यामुळे एकाच कार्यालयात काम करत २ भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये व्यवसायासोबत भावनिक जवळीक वाढणंसुद्धा खूप स्वाभाविक आहे.

एक काळ होता, जेव्हा कार्यालयाचा अर्थ होता केवळ ८ तास. परंतु आज कार्यालयासाठी ८ तास पुरेसे नाहीत. आजच्या घडीला व्हाइट कॉलर नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालयाचा अर्थ आहे एक निश्चित टार्गेट पूर्ण करणं, ज्यामध्ये दररोजचे १२ ताससुद्धा लागू शकतात आणि कधीकधी सलग २४ ते ३६ तासही सोबत काम करावं लागू शकतं.

असं यासाठी आहे; कारण अर्थव्यवस्था बदलली आहे, जग मर्यादित झालं आहे आणि वास्तविकतेहून गोष्टी अधिक आभासपूर्ण झाल्या आहेत. निश्चितच दीर्घ काळ कार्यालयात सोबत राहाणाऱ्या दोन व्यक्ती आपली सुखदु:खंही एकमेकांना सांगतात; कारण जेव्हा दोन व्यक्ती सोबत राहून काम करतात, तेव्हा ते आपसांत हसतात, सोबत जेवतात, एकमेकांच्या कुटुंबाविषयी ते बोलतात, ऐकतात, बॉसला एकमताने दूषणं देतात आणि ताजंतवानं राहाण्यासाठी परस्परांना चुटकुलेही ऐकवतात. हे सर्व एका छोट्याशा केबिनमध्ये घडत असतं, जिथे २ सहकारी अगदी बाजूबाजूला बसत असतात.

अशा परिस्थितीत ते एकमेकांना कळतनकळत प्रत्येक गोष्ट शेअर करतात. सहकाऱ्याला कोणतं संगीत आवडतं हे तुम्हालाही माहीत असतं आणि त्यालाही. त्याला चॉकलेट आवडतं की आइस्क्रीम ही गोष्ट दोन्ही सहकाऱ्यांना चांगलीच ठाऊक असते. निश्चितच आकर्षणाचे बंध या सर्व धाग्यांमुळे जुळतात.

काम करताना बराच काळ सोबत व्यतित होतो, तेव्हा आपण एकमेकांच्या केवळ क्षमताच नव्हे, तर मानसिक जडणघडण आणि भावनिक बाजूही व्यवस्थित समजून घेतो. परिणामी दोन भिन्नलिंगी व्यक्ती परस्परांच्या पूरक बनतात. त्यांचं एकमेकांसोबत भांडण होत नाही. दोघे एकत्रित काम करतात तेव्हा कामही जास्त होतं आणि थकवाही जाणवत नाही. दोघे सोबत एकत्रित खूश राहातात म्हणजे असे सहकारी पतिपत्नींप्रमाणे काम करू लागतात. त्यामुळे अशा लोकांना समाजशास्त्रामध्ये परिभाषित करण्यासाठी वर्क हझबंड आणि वर्क वाइफ श्रेणीमध्ये ठेवलं जातं.

प्रमाण वाढत आहे

पूर्वी याला सैद्धांतिक स्वरूपात मानलं आणि समजून घेतलं जात होतं. परंतु संपूर्ण जगात प्रसिद्ध करिअर वेबसाइट वॉल्ट डॉट कॉमने एक सर्वेक्षण केलं आणि आढळलं की २०१० मध्ये असे वर्क हझबंड आणि वर्क वाइफ जवळपास ३० टक्के होते, जे २०१४मध्ये वाढून ४४ टक्के झाले आहेत.

या अभ्यासात सहभागी लेखकांनी एक अतिशय परिचित उदाहरण देऊन जगाला समजावण्याचा प्रयत्न केला की वर्क वाइफ आणि वर्क हझबंड कसे असतात? उदाहरण हे आहे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश व त्यांच्या परदेश मंत्री व राष्ट्रीय सल्लागार असलेल्या कोंडालिझा राइस यांच्यात जी कामासंदर्भातील केमिस्ट्री होती, ती वर्क हझबंड वा वर्क वाइफच्या पठडीतील केमिस्ट्री होती.

कितपत नैतिक आहे हे नातं?

प्रश्न हा आहे की हे नातं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? हे नातं विश्वासार्ह आहे का? वॉल्ट डॉटकॉमचा सर्वेक्षण निष्कर्ष या गोष्टी समोर आणतं की लोक हे एक महत्त्वपूर्ण आणि मजबूत नातं असल्याचं मानतात. या सर्वेक्षणादरम्यान आवडत्या सहकाऱ्यासोबत जे नातं बनतं ते अधिक विश्वासार्ह आणि अधिक मजबूत असतं. लोक ही नाती आनंदाने निभावतात. जवळपास तसंच जसं एखादं विवाहित जोडपं आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करतात. या नात्याला पश्चिमेकडे समाजशास्त्रज्ञांनी व्यवहारिकतेच्या अनेक कसोट्यांमध्ये ठेवून दाखवलं आहे आणि त्यांना आढळून आलं की हे नातं केवळ खासच नव्हे, तर अतिशय सामंजस्याने परिपूर्णसुद्धा असतं.

या नात्यात रोमान्य नसतो फक्त जोडप्याचं एकमेकांसोबत भावनिक बंध असतात आणि एकमेकांच्या समस्या आणि वास्तव यांची योग्य जाण ठेवून ते हे नातं निभावत असतात. वास्तविक बहुतेक अशी जोडपी जी अशा नातेबंधांच्या आवाक्यात येतात, ते शारीरिकसंबंधात खोल उतरत नाहीत. परंतु थोडीबहुत जवळीक सर्वांची असतेच, मात्र समाजशास्त्रज्ञांना आपल्या व्यापक विश्लेषणामध्ये हे आढळून आलं की ज्या जोडप्यांमध्ये शारीरिकसंबंधसुद्धा असतात, तेसुद्धा एकमेकांच्या वास्तविक परिस्थितीचा सन्मान करतात आणि गरज भासल्यास कोणताही राग-द्वेष, बाचाबाची न करता अतिशय सहजतेने एकमेकांपासून अंतर राखतात.

प्रोफेसर मॅक्सब्राइट ज्यांनी या सर्वेक्षणाचं सविस्तर विश्लेषण केलं, त्यांच्यानुसार खूप कमी लोकांमध्ये या कामकाजी नातेबंधांसह रोमान्सचं नातं असतं.

अखेरीस या नात्याचा फायदा काय हा प्रश्न आहे? या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मानले आणि सर्वेक्षणादरम्यान लोकांनी केलेल्या मुलाखतीतून मिळालेल्या निष्कर्षावर विश्वास ठेवला तर जेव्हा २ सहकाऱ्यांमध्ये वर्क वाइफ वा वर्क हझबंडचं नातं बनतं, तेव्हा ते दोन्ही कर्मचारी आपल्या कामाप्रति जास्त प्रामाणिक होतात आणि त्यामुळे कामही अधिक प्रमाणात होतं. हेच कारण आहे की जगातील सर्व मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्क वाइफ, वर्क हझबंडचं नातं निर्माण व्हावं असं वाटत असतं.

आज जगातील सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या प्रकारचं आरामदेय कार्य वातावरण प्रदान करतात आणि कार्यालयात ज्याप्रकारे स्त्रिया आणि पुरुषांना जवळपास समान प्रमाणात ठेवतात, त्यामागे एक विचार हासुद्धा असतो की सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली जोडी निश्चित करून काम करावं.

मानसतज्ज्ञांच्या मते जेव्हा पुरुष आणि स्त्रिया सोबत बसून काम करतात, तेव्हा त्यांच्यात काही कारण नसताना, १० टक्के आनंदी भावना असते अर्थात जेव्हा एकटा पुरुष वा एकटी स्त्री काम करतात, तेव्हा ते कामाने लवकर कंटाळतात. त्यांचं कार्य उत्पादनही कमी असतं आणि काम करण्याचा उत्साह वा रोमांचही जाणवत नाही.

परंतु जेव्हा महिला आणि पुरुष मिळून सोबत काम करतात, तेव्हा त्यांना एक प्रकारच्या आंतरिक आनंदाची अनुभूती होते, भले या आनंदाला काही अर्थ नसेल. वास्तविक २ भिन्न लिंगी व्यक्ती एकत्रित वेळ व्यतित करताना एकमेकांना अनोखी उर्जा प्रदान करत असतात.

कामाची गुणवत्ता वाढते

सर्व सर्वेक्षणं आणि संशोधनांमध्ये हेसुद्धा आढळून आलं आहे की जेव्हा स्त्रिया आणि पुरुष एकत्रित काम करतात, तेव्हा ते नेहमीच्या तुलनेत अधिक काम करतात, शिवाय उत्तम प्रतिचं कामही करतात. सोबतच नवनवीन कल्पनाही विकसित करतात. बहुराष्ट्रीय कंपन्या याच रणनीतीअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना आपसांत मिळूनमिसळून राहाण्यायोग्य वातावरण तयार करण्यासाठी बहुतेकदा पार्ट्या आयोजित करतात. कर्मचाऱ्यांसाठी आल्हाददायक वातावरण तयार करतात जेणेकरून सगळे एकमेकांच्या कमतरता आणि कौशल्य ओळखू शकतील, शिवाय कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीनुरूप अनुकूल साथी निवडण्यास अडचण होणार नाही.

वर्क हझबंड आणि वर्क वाइफचा ट्रेण्ड वेगाने फोफावत आहे. वास्तविक भारतासारख्या समाजव्यवस्थेतच नव्हे, अमेरिका आणि युरोपसारख्या समाजातही या शब्दांचा वापर करायला कर्मचारी संकोचतात. विवाहित वा अविवाहित दोन्ही प्रकारचे कर्मचारी आपल्या कुटुंबामध्ये आणि मित्रांमध्ये या शब्दाचा वापर चुकूनही करत नाहीत. इतकंच नव्हे तर, आपसांतही ते कधी या शब्दाचा वापर करत नाही वा एकमेकांना दर्शवत नाहीत की हो, असं आहे. परंतु ते एकमेकांशी याच भावनेने जोडलेले असतात, ही गोष्ट दोघांनाही ठाऊक असते.

लग्नापूर्वी या गोष्टी जरूर करा

* किरण बाला

कोणत्याही मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठा आनंदी क्षण म्हणजे तिचं लग्न…लग्नामुळे तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. जर एखाद्या मुलाशी लग्न करण्यापूर्वी सर्व बाबींचा गंभीरपणे आणि शांतपणे विचार केला नाही तर लग्नानंतर मात्र पश्तात्ताप करण्याची वेळ येते. अशात एक तर तिला आयुष्यभर कुढतकुढत जगावं लागतं किंवा मग तिच्यावर घटस्फोटाची तरी वेळ येते. या दोन्ही परिस्थिती तिच्या बाजूने नसतात. अशात जर कोणत्याही नात्याला होकार देण्यापूर्वी स्वत: मुलीनेच काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तिला लग्नानंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही आणि तिचं आयुष्यही आनंदी व सुखी ठरेल.

काही विशेष मुद्दयांवर लग्नापूर्वी चर्चा करून घेणं तुमच्या हिताचंच ठरेल. कारण दाम्पत्याचा पाया हा याच मुद्दयांवर टिकून असतो आणि वादविवाद व घटस्फोटदेखील याच गोष्टींवरून होतात.

* लग्न हे लहान मुलांचा किंवा बाहुल्यांचा खेळ नव्हे. म्हणून लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची भेट घेणं फार जरुरी आहे, जेणेकरून दोघांनाही एकमेकांचे विचार कळतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की समोरच्या माणसामध्ये ती वैशिष्ट्य किंवा गुण नाहीत जे तुम्हाला हवे आहेत, तर नंतर पस्तावण्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी लग्न न करणंच चांगलं ठरेल. कारण लग्नापूर्वीच जर तुम्ही वेगळे झालात तर निदान तुमच्यावर घटस्फोटित असण्याचा ठपका तरी लागणार नाही.

* लग्नापूर्वी तुम्ही मुलाकडून त्याच्या भविष्याच्या योजनांबद्दलही जाणून घ्या. तसंच त्याला हेदेखील सांगा की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे. जर समोरची व्यक्ती तुम्हाला हवी तशी असेल, तरच लग्न करा.

* बऱ्याचदा असं दिसून येतं की मुलगी आणि तिचे कुटुंबीय कोणीच तिच्या करिअर प्लॅनिंगबद्दल सांगत नाहीत, की ती लग्नानंतर नोकरी करणार की नाही. तिला जर आपलं करिअर सोडायचं नसेल किंवा नोकरी करायची असेल, तर ही गोष्ट तिने मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगायला पाहिजे. म्हणजे लग्नानंतर ते तिला नोकरी करण्यास अडवणार नाहीत. त्याचबरोबर जर ती वर्तमानकाळात नोकरी करत असेल आणि लग्नानंतर तिला नोकरी करायची नसेल, तरीदेखील तिने तिची इच्छा लग्नाआधीच व्यक्त करावी. नाहीतर लग्नानंतर ते नोकरी करण्यासाठी जोरही देऊ शकतात. नोकरी करणं किंवा न करणं याबाबत लग्नानंतर कसला वाद होऊ नये, म्हणून आपल्या करिअरचं प्लॅनिंग आधीच सांगणं फार गरजेचं आहे.

* तुम्ही जर कोणा नोकरदार मुलाशी लग्न करत असाल तर हे जाणून घ्या की त्याची नोकरी तर बदलणार नाही. जर बदली होत असेल तर त्याचं क्षेत्र कुठे आहे. नाहीतर तुम्ही हा विचार करून लग्नासाठी हो म्हणाल की त्याची बदली चंदीगड, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणार आहे. पण जर लग्नानंतर त्याची बदली एखाद्या लहानशा शहरात झाली, जिथे तुम्हाला जायचं नसेल, तर मग अशा परिस्थितीत तुमच्यात नक्कीच वाद होतील. त्यामुळे लग्नापूर्वीच तुम्ही हा विचार करून घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थैर्य हवंय की संपूर्ण भारतभर पतींच्या बदलींबरोबर भटकणं हवंय. तुम्ही जर नोकरी करत असाल तर हे जरुरी नाही की जिथे तुमच्या पतींची बदली होईल, तिथेच तुमचीही होईल. अनेक वेळा हे शक्य नसतं. अशावेळी एक तर तुम्हाला नोकरी सोडावी लागते किंवा आपल्या पतींपासून वेगळं तरी राहावं लागतं.

* तुम्हाला जर एकत्र कुटुंबात लग्न करायची इच्छा नसेल तर असं नातं आधीच नाकारणं बरं. तुम्ही जर त्यांना होकार देऊन लग्न केलं आणि नंतर पतींवर आईवडिलांपासून वेगळं होण्यासाठी जोर दिला तर ही गोष्ट मात्र अयोग्य ठरेल. त्याने कुटुंबात क्लेश निर्माण होईल आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं. तुम्हाला जर कोणाचं बंधन नको असेल तर मग अशाच मुलाबरोबर लग्न करा जो लग्नाच्या आधीपासूनच आईवडिलांपासून वेगळा राहात असेल आणि लग्नानंतरही त्याची वेगळंच राहाण्याची इच्छा असेल.

* ज्या कुटुंबात तुम्ही लग्न करत आहात तिथलं वातावरण, रीतीभाती, संस्कार, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी तुम्ही आधीपासूनच जाणून घ्या. शिवाय हेदेखील पाहा की तुम्ही अशा वातावरणात जुळवून घेऊ शकता की नाही. जर तुम्हाला तिथे जमणार नसेल तर तिथे लग्न करू नका. पण तरीदेखील तुम्ही जर तिथे लग्न केलं तर तुम्हाला तिथे ताळमेळ बसवावा लागेल. म्हणजे स्वत:ला त्यांच्यानुसार तुम्हाला घडवावं लागले. नाहीतर तुमचं कायमस्वरुपी माहेरी येणं ठरलंच समजा.

* लग्नापूर्वी मुलाबरोबर होणाऱ्या भेटीगाठींमध्ये त्याच्या आवडीनिवडी आणि सवयींबद्दलही जाणून घ्या. कदाचित त्याची एखादी आवड किंवा सवय तुम्हाला आवडत नसेल, ज्यामुळे लग्नानंतर तुमच्यात भांडण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोहोचू शकतं. तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल तर त्याला हे विचारून घ्या की तो आणि त्याचे कुटुंबीय शाकाहारी आहेत की नाही? लग्नानंतर जर तुम्हाला कळलं की तो मांसाहारी आहे तर तुमच्यावरही मांसाहारी बनवण्यासाठी जोर दिला जाईल आणि कदाचित तुम्ही ते करू शकणार नाही. त्याचबरोबर जर त्याला मद्यपान करण्याचं व्यसन असेल आणि तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही अशा माणसासोबत जवळिकी कशी वाढवणार? स्पष्टच आहे की त्याची ही सवय तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करेल आणि शेवटी तुम्हाला पश्चात्तापच करावा लागेल.

* लग्नाआधी जर तुमचा कुणी प्रियकर असेल किंवा कोणाबरोबर तुमचे संबंध राहिले असतील, तर ही गोष्ट आधीच सांगणं फायदेशीर ठरेल. शिवाय ती गोष्टही जरा थोडक्यात सांगितली गेली पाहिजे, जेणेकरून ते प्रकरण जास्त गंभीर नव्हतं, असं वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं जर कोणावर प्रेम असेल तर ही गोष्ट तुमच्या सर्कलमध्ये कित्येक जणांना माहीतच असेल. म्हणून त्याबद्दल जराशी माहिती देणं भविष्यासाठी योग्य ठरेल. कारण जर लग्नानंतर त्याला याबाबत बाहेरून कळलं तर तो तुमच्याकडे संशयाने बघेल आणि त्याला तुम्ही चारित्र्यहीन असल्याचं वाटेल. अविश्वासावरही दाम्पत्य जीवनाचा पाया जास्त दिवस टिकत नाही. पण हो, जर सगळं काही माहीत असूनही तो लग्नासाठी होकार देत असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे.

* तुम्हाला जर दोन-चार भेटीनंतरही हे कळत नसेल की तो तुमच्यासाठी फिट आहे की नाही, तर तुम्ही कोणा काउन्सलरचाही सल्ला घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल.

कसे बनाल उत्तम जीवनसाथी

* मोनिका अग्रवाल

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पतीपत्नीमधील प्रेम हरवणे स्वाभाविक आहे. पती-पत्नी दोघेही आपापले काम व जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतात की आयुष्य एका मशीनसारखे होऊन जाते. आश्चर्याची स्थिती तर तेव्हा होते, जेव्हा लग्नाच्या काही महिन्यानंतरच दोघे एकमेकांना समजू शकत नाहीत व अंतर वाढत जाते.

देवने जेव्हा आपला नवीन जॉब सुरू केला, तेव्हा बरेच महिने प्रचंड मेहनत केली. रात्रंदिवस फक्त आपल्या जॉबमध्येच बिझी असायचा. रात्री उशिरा घरी येऊ शकायचा. अशात त्याला आपली पत्नी सिमरनची साथ मिळाली नसती, तर कदाचित उद्दिष्ट गाठणे सोपे झाले नसते. सिमरनने केवळ पत्नीच नव्हे, तर एक मैत्रीण बनून त्याच्या प्रत्येक पावलावर व प्रत्येक निर्णयात त्याची सोबत केली.

सपोर्टिव्हही असावे : साधारणपणे बायका विचार करतात की नवऱ्याला बायकोचे रूप, शृंगार, वस्त्रे, प्रेम व गोड शब्द आवडतात, परंतु त्यांना फक्त याच गोष्टी आवडतात का? निर्विवादपणे, एक पती आपल्या पत्नीच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच साजशृंगार व शालीनतेचादेखील चाहता असावा, परंतु सोबतच तो पत्नीचा साधेपणा, अनुकूलता, गहिरे प्रेम व साथ निभावण्याचे गुणही पसंत करतो. तो इच्छितो की त्याची जीवनाची सोबतीण फक्त नावाचीच सोबतीण नसावी, तर समजूतदार, भावना समजणारी, त्याच्या सुख-दु:खात साथ देणारी, सपोर्टिव्हसुद्धा असावी.

खोटेपणा नव्हे गहनता असावी : पती-पत्नीचे नाते तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा दोघांमध्ये आपलेपणा असतो, खोटेपणा नव्हे. पतिला हे जाणवले पाहिजे की त्याची पत्नी जीवनाच्या प्रत्येक अडचणीत त्याची सोबत करेल. पत्नीची प्रेमपूर्ण साथ, त्याच्या गरजांना समजण्याची शक्ती व विश्वासच पतिचा आधार असतो, ज्याच्या बळावर तो जगातील साऱ्या अडचणींचा सामना आरामात करू शकतो.

आपसातील समजूतदारपणा : या नात्यात आपसातील समजूतदारपणा व विश्वास खूप गरजेचा आहे. एका पत्नीचीही हीच इच्छा असते की पतिने तिच्या भावना समजून घ्याव्यात व असा आधार बना, ज्याच्यासोबत ती जगातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकेल. परंतु हे एकतर्फी नसावं, समजूतदारपणा फक्त पत्नीच दाखवेल, तर ताळमेळ बिघडेल. त्यामुळे एकमेकांसोबत पावलाशी पाऊल मिळवून चालावे व जीवनातील सगळया अडचणींचा भार उतरवून फेकावा.

गरजा समजून घ्या : पुष्कळ पती-पत्नी वर्षानुवर्षे एकमेकांच्या गरजा व भावना ओळखू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या दरम्यानचे अंतर वाढू लागते. एकाच छताखाली राहूनदेखील ते एकमेकांसाठी अनोळखी होऊन राहतात. मानसिकरित्या त्रस्त राहतात.

जर तुम्ही पतिचा जीवनसाठी बनू इच्छिता, तर पतिची आवड-निवड लक्षात ठेवा. यात तुम्ही फक्त आहार वा पेहरावापुरत्या मर्यादित नाही ना मी ज्या आवडीनिवडीबद्दल बोलतेय, ती आहे पॅशन व विचार यांची. पॅशन पूर्ण करण्यात त्यांचा सहकारी बना, जसे की जर ते लेखक आहेत, तर त्यांच्या लेखणीला काही नवे लिहिण्याची शक्ती तुमच्याकडून मिळायला हवी.

जर त्यांना क्रिकेट खेळ आवडतो तर तुम्हीही त्यात रस घ्या व जेव्हा ते दौऱ्यावर असतील, तेव्हा वेळोवेळी त्यांना स्कोर अपडेट करा. विश्वास ठेवा, यामुळे तुमच्या दोघांमध्ये विश्वास वाढेल व जीवन सुखी होईल. त्यांच्या श्रीमंत असण्याचे दरवेळी प्रदर्शन करू नका वा कमी पगार असेल तर अगदी असंतोष वा चेष्टाही करू नका.

रिकामेपण भरून काढा : सांगण्याचा अर्थ असा, की आपल्या पतिच्या जीवनाचे रिकामंपण भरून काढा. तुमचं खरं प्रेम व सोबत त्यांच्या जीवनातील प्रत्येक कमतरता पूर्ण करेल. यातच जीवनाचा आनंद आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर चांगलेवाईट दिवस येत जात राहतात. एकमेकांवरील विश्वास कठीण परिस्थितीतदेखील हरू देणार नाही.

अनौपचारिक असावा आनंद : जीवनसाथी सोबत दु:ख वाटून घेतल्याने जितकं हलकं वाटतं, त्यापेक्षा कितीतरी आनंद त्याच्यासोबत आपलं हास्य वाटून घेतल्यानं मिळतं. जर तुमच्याकडे एक उत्तम लाइफपार्टनरची सोबत आहे, तर मग जीवनातील प्रत्येक लहानातील लहान आनंदातही तुम्ही खूपच अनौपचारिकपणे उत्साहाने हसाल.

एकमेकांकडून शिकू शकता : जर तुमच्या जीवनात एक चांगली महिला पत्नीच्या रुपात येते, तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे, कारण तुम्ही तिच्याकडून पुष्कळ काही शिकू शकता. तुम्ही दोघे एकमेकांशी मोकळे राहाल. यामुळे तुमच्या दोघांमध्ये चांगले कम्युनिकेशन राहू शकेल ज्यायोगे तुम्ही दोघे एकमेकांकडून पुष्कळ काही शिकू व समजू शकता.

दोन शरीरे एक मन : पतिपत्नीला उगाच दोन शरीरे एक मन म्हटले जात नाही. एक खरी व प्रेमळ महिला जेव्हा एखाद्या पुरुषाच्या जीवनात येते, तेव्हा ती नेहमी हेच इच्छिते की तिचा जीवनसाथीची कायम प्रगती व्हावी. तुमच्या जीवनसाथीमध्येदेखील असेच गुण असतील, तर स्पष्टच आहे की तुम्हा दोघांच्या जीवनाचे उद्दिष्ट वेगवेगळे नसूव एकच असेल.

दोन मिनिट नुडल्सवाले प्रेम तर बाह्यप्रदर्शनासाठी चालू शकते, परंतू जीवन त्याच व्यक्तिसोबत आनंदाने व्यतीत होते, ज्यात हे सारे गुण आहेत. असे गुण फक्त मुलांसाठीच नव्हेत, तर मुलींसाठीही गरजेचे आहेत. नात्याची दोन्ही चाके बरोबर असतील तरच नात्याची गाडी दूरवर चालेल.

काय करणार जर घटस्फोटाची वेळ आली तर

– सुमन बाजपेयी

आपल्या वैवाहिक जीवनात असंतुष्ट असल्याने घटस्फोट घेणे नि:संशय. त्यावेळी एखाद्या बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतरचे आयुष्य सहजसोपे होईल किंवा जीवनात परत आनंद निर्माण होईल, असा विचार करणे एक चूकच आहे. म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेण्याआधी त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्ही घटस्फोट घेण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की आहे की तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी कुरबुर आहे अथवा लहानसहान समस्या एवढया मोठया झाल्या आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे की आता एकत्र राहणे अशक्य आहे. या गोष्टी विचारांमधील संघर्ष निर्माण होण्यापासून तर विवाहबाह्य संबंधांपर्यंत निगडीत असतात नाहीतर मुलांचे संगोपन वा आर्थिक प्रश्नांमधून उत्पन्न झालेल्या असू शकतात. म्हणजे ही लहानलहान भांडणं काळानुसार ना केवळ जोडप्यांमधील दुरावा वाढवतात तर त्यांना वेगळे होण्यास विवश करतात.

जुळवून न घेणे किंवा मानसिक स्तरावर अवलंबून असल्याने वेगळे होणे नि:संशय एक सोपा मार्ग वाटतो, पण त्यासाठी ज्या कायदेशीर, सामाजिक आणि भावनात्मक त्रासाचा सामना करावा लागतो, तो काही कमी यातना देणारा नसतो. जर एखादे जोडपे लग्नाला यातना समजत असेल, तर त्यातुन सुटका मिळवण्यासाठीसुद्धा कमी यातना सहन कराव्या लागत नाही.

मूल्यांकन करा

घटस्फोट घेण्याआधी असा विचार करा की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रास देत आहेत. शक्य आहे की त्या आपण सुधरवू शकू. मग हे ठरवा की वास्तवात तुम्ही त्यात बदल घडवून आणू इच्छिता का? आपल्या विवाहसोबत तुम्हाला याचेही मूल्यांकन करावे लागेल की हा विवाह तुम्हाला वाचवायचा आहे का? घटस्फोटाकडे वाटचाल करताना स्वत:ला अवश्य विचारा की जी असमाधानाची भावना तुमच्यात रुजते आहे ती थोडया काळासाठी आहे, जी काळानुसार दूर होणार आहे का? घटस्फोट दिल्यावर तुम्ही परत नवे संबंध निर्माण करणार आहात का? तुमच्या मुलांवर याचा काय परिणाम होईल आणि ते या निर्णयात तुम्हाला पाठिंबा देतील का?

अनेक लोक यासाठी वेगळे होतात की, कारण ते खूपच लवकर लग्नाच्या बंधनात बांधले गेलेले असतात, आणि नंतर त्यांना अशी जाणीव होते की ते एकमेकांसाठी बनलेले नसतात. अनेक दशक ते एकत्र राहतात आणि मुलं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना असे वाटे की आता सोबत राहण्यात कोणतीच विवशता नाही व ते वेगळे होतात.

सर्वात महत्वाचे कारण जोडीदाराने विश्वासघात करणे हे असते. अनेक जोडप्याना असे वाटते की आता त्यांच्यात प्रेम राहिले नाही. पैसा आणि विचारामध्ये मतभेद असल्यामुळे ते नेहमी भांडत असतात. काही जोडप्याना वाटते की त्यांना आयुष्याकडून आणखी वेगळे काही हवे आहे, आता ते या नात्याशी तडजोड करू शकत नाही.

सिनिअर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. भावना बर्मी यांच्या मते, ‘‘घटस्फोटाच्या वाढत्या दराची काही प्रमुख कारणं आहेत. व्यावसायिक पातळीवर स्त्री आणि पुरुष दोघांच्या सतत वाढत्या महत्वकांक्षा, ज्यामुळे त्याच्या प्राथमिकता परिवारपासून दूर जात करिअरवर क्रेंद्रित होतात. आपापसात बोलायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. ते काम आणि कुटुंब या ताळमेळ साधू शकत नाहीत. दोघांची अर्थिक निर्भरता एकमेकांवर कमी असते. सहनशक्ती कमी असणे महानगरांमध्ये वाढत्या घटस्फोटाचे एक मोठे कारण आहे. घटस्फोट घेताना तुम्हाला हे माहीत असायला हवे की तुमचे आयुष्य आपापसात बांधले गेले आहे आणि हे तुटणे दोघानाही एका विस्कळीत मार्गावर आणू शकते. समाजापासूनसुद्धा तुटण्याची शक्यता यामुळे वाढते.

तुम्ही हा बदल स्वीकारायला तयार आहात का?

तुमचे घटस्फोट घेण्याचे कारण, एकत्र घालवलेला वेळ, तुमची संपत्ती, मुलं या सगळया गोष्टी तुमच्या निर्णयासाठी महत्वाच्या असतात. पण सर्वात महत्वाचे हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्ही हे कशा प्रकारे हाताळणार आहात. या कारणास्तव आयुष्यात होणाऱ्या बदलांचा सामना करायला तुम्ही तयार आहात का? घटस्फोट जीवनातील अत्यंत महत्वचं वळण असते, ज्याचा नंतर येणारा बदल सुखद वा दु:खद काहीही असू शकतो. म्हणून विचार करून हा निर्णय घ्यायला हवा. शक्य आहे की मॅरेज कौन्सिलरला भेटल्यावर तुम्ही तुमचा हा विचार मनातून काढून टाकाल.

घटस्फोटाचा अर्थ आहे बदल आणि हे समजून घ्या की कोणत्याही परिस्थितीत बदलाचा सामना करणे सोपे नसते. अनेकदा मन वळून मागे पाहते, कारण नव्या प्रकारे आयुष्याची सुरवात करताना जेव्हा अडचणी येतात, तेव्हा मन पूर्वायुष्य आठवून अपराधी भावनेने दाटून येते. तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे की तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता आणि तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता.

यादी बनवा

घटस्फोट घेण्याच्या कारणांची एक यादी बनवा. आपल्या संबंधातील चांगल्या वाईट दोन्ही बाजू लिहा. आपल्या जोडीदाराला खलनायकाच्या भूमिकेत ठेवू नका, कारण कमतरता तर तुमच्यातही असतील. घटस्फोट घेतल्यावर यशस्वी आणि सुंदर आयुष्य जगण्याची मी सकारत्मक मानसिकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हे गृहीत धरून चला की दोघांच्या चुकींमुळे आज वेगळे व्हायची वेळ आली आहे. म्हणून आपला राग आणि यातना रचनात्मक पद्धतीने हाताळा.

घटस्फोटानंतर तुम्हाला एका सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता भासेल, ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून तुम्ही रडू शकाल. आपले मित्र आणि नातेवाईकांचा आधार घेण्यात संकोचू नका. जर आवश्यकता असेल तर थेरपिस्टकडे जा आणि आपल्या समस्या मोकळया करा. जेणेकरून तुमच्यावर कोणताही ताण रहाणार नाही.

मानसिकता व्यवहारी ठेवा

घटस्फोटानंतर आर्थिक समस्या सर्वात मोठी असते. जर तुम्ही कमावत्या असाल तरीसुद्धा ही अडचण असतेच. अभ्यासानंतर ही गोष्ट समोर आली आहे की ज्या स्त्रिया घटस्फोटीत असतात, त्यांच्या जीवनशैलीत ३० टक्के घट होते आणि पुरुषांच्या १० टक्के. मग स्त्री या वेगळे होण्यास कितीही तयार का असेना, ती आर्थिक पातळीवर स्वत:ला अक्षम मानू लागते.

योग्य हेच असते की आपल्या भावना नियंत्रणात ठेवून घटस्फोट घेण्याऐवजी व्यवहारीक मानसिकता ठेवून योग्य पावलं उचला. यामुळे फायदा जास्त आणि कमी हानी होते यावर लक्ष ठेवा. जर तुम्ही स्वावलंबी नसाल तर जाहीर आहे की नंतर तुम्हाला कोणावरतरी अवलंबून राहावे लागेल आणि अशाप्रकारे तुमच्या अभीमानाला ठेच लागेल.

घटस्फोटानंतर मुलांवर खोलवर परिणाम होतो, कारण त्यांच्यासाठी आईवडील दोघेही महत्वाचे असतात. वेगळे होणे त्याच्या मनाला जखम करते आणि कधीकधी तर ते वाईट मार्गाला लागतात. एकटी व्यक्ती आपल्याच समस्यांमध्ये गुंतला असल्याने त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाही.

स्वत:ला काही प्रश्न विचारा

* आपल्या जोडीदाराप्रती अजूनही तुमच्या मनात भावना आहेत का? जर असे असेल तर एकदा आपल्या नात्याला वाचवायचा अवश्य प्रयत्न करा.

* तुम्ही यासाठी एकत्र राहत आहात का, की समाजाचे प्रेशर आहे नाहीतर नेहमी भांडतच राहिलो असतो?

* तुम्हाला खरेच घटस्फोट हवा आहे का की केवळ ही धमकी आहे? केवळ राग प्रदर्शित करण्याकरिता वा अशाप्रकारे आपल्या जोडीदाराला इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचलता आहात. अशाप्रकारे संबंध बिघडतीलच.

* तुम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक स्तरावर यासाठी तयार आहात का? तुम्ही यांच्या नकारात्मक परिणामांबाबत विचार केला आहे का? घटस्फोट तुमच्या साधनांमध्ये कमी आणू शकतो, ज्यामुळे तुमचे अनेक स्वप्न तुटू शकतात.

* तुमच्याजवळ एखादी सपोर्ट सिस्टीम आहे का? तुम्ही तुमच्या मुलांना समजावू शकाल का? आणि त्यामुळे होणारा त्रास दूर करण्यात सक्षम आहात का?

* तुम्ही तुमचे करिअर आणि आपले खाजगी आयुष्य यांचा समतोल राखू शकाल का?

घटस्फोट घेतल्यावर तुम्हाला नवे अनुभव, नवी नाती व नव्या घटना नव्या प्रकारे हाताळण्यासाठी तयार रहावे लागेल. आपले जीवन परत निर्माण करावे लागेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की दुसरे लग्न केल्यास तुमच्या सगळया समस्या सुटतील, तर या भ्रमातून बाहेर या, कारण दुसरे लग्न यशस्वी होईल याची खात्री देता येणार नाही. नक्की नाही की या वेळी योग्य जोडीदार मिळेलच.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें