व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

* सोमा घोष

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक – ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

टीझरमध्ये ढवळे आणि माने जोडप्यांच्या नात्याचा प्रवास रेखाटला आहे. सई – समीरमधील गोड संवाद आणि प्रेमळ नाते दिसत आहे तर दुसरीकडे प्रसाद – ईशा यांच्यातील गंमतीशीर नोकझोक दिसत आहे. हलक्याफुलक्या, गंमतीशीर प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक देखील यात पाहायला मिळतेय. संवादांची सहजता, पात्रांची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांच्या मनात या फॅमकॉम चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली असून टिझरच्या शेवटी प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांच्या नजरेने मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्नही निर्माण केला आहे. त्यामुळे आता हा ‘गुलकंद’ किती मुरलेला आहे, हे १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात कळेल.

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ” ‘गुलकंद’ हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधातील गोडव्याचा एक अनोखा मनोरंजक प्रवास आहे. तुमच्या आमच्या घरातील ही गोष्ट असून यात दिसणारे हटके कपल्स आपल्याला अनेकदा आपल्या आजुबाजुला दिसतात आणि म्हणूनच ‘गुलकंद’शी प्रेक्षक सहज समरस होतील. बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत असा एक फॅमकॉम चित्रपट येत आहे. प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारताना समीर चौघुलेला पाहिले आहे. मात्र, पहिल्यांदाच ‘गुलकंद’ मध्ये समीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या टिझरमध्ये दाखवलेली ढवळे आणि माने कुटुंबातील जिव्हाळा रसिकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, याचा विश्वास आहे. हा चित्रपट प्रत्येकाला हसवतानाच त्यांच्या आयुष्यातील प्रेमाची गोड आठवण करून देईल.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्मितीवर भर दिला आहे. गुलकंदाचे किमान १० आरोग्यदायी फायदे असतात, पण हा चित्रपट ११ व्या आणि सर्वात महत्वाच्या फायद्याबद्दल आहे तो म्हणजे आनंद! गुलकंदाप्रमाणेच गोड, सुगंधित व आरोग्यदायी असलेला हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनेचा गोडवा मांडतो. हा चित्रपट जितका गोड आणि भावनिक आहे तितकाच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ही आहे. सर्व तगड्या कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली आहे. टिझरमध्ये दाखवलेल्या दोन कपल्सच्या वेगळ्या नात्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल. काही खट्याळ प्रसंगासोबतच प्रेमाची नाजूक झलकही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. विनोदाने भरलेला हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने नक्कीच एकत्रित पाहावा.”

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम!

* नम्रता पवार

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने चित्रपटप्रेमींना एक खास भेट दिली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली असून एव्हरेस्ट एंटरटेनमेंटकडून सर्व चित्रपटप्रेमींसाठी व्हॅलेंटाईनची ही खास भेट ठरली आहे. ‘ मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘ ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाब्रिया यांच्यासह घेऊन येत आहेत.

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल? असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे. प्रेम आणि नशीबाची ही जादुई सफर पाहाणं नक्कीच मनोरंजक ठरेल. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनेत्री ऋचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात दिसेल. प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळेल.

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणणं आमच्यासाठी खूप खास आहे. प्रेमाचा रंग आणखी गडद करणारी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना प्रेमाचा एक नवा अनुभव देईल. या चित्रपटात प्रेमाची जादू आणि तंत्रज्ञानाचा मिलाप असल्याने प्रेक्षकांना प्रेमाचा हा प्रवास नक्कीच आवडेल.”

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ प्रेमकथा सर्वांच्याच आठवणीतल्या असतात. त्या काळाच्या पलीकडे ही टिकतात. मी याआधी ही काही प्रेमकथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही माझी सातवी प्रेमकथा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली अतिशय आधुनिक प्रेमकथा आजच्या पिढीला नक्कीच आवडेल. व्हॅलेंटाईन डेच्या वातावरणात ‘प्रेमाची गोष्ट २’ ची अनोखी पहिली झलक म्हणजे आमच्याकडून प्रेक्षकांना एक विशेष रोमँटिक भेट आहे. ललित, ऋचा आणि रिधिमा यांचा अभिनय आणि अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटाला खास रंगत आणेल. चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये प्रेम आणि नशीबाच्या खेळाची झलक पाहून प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत.” एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या जून २०२५ मध्ये अनुभवायला मिळेल.

 

 

उत्सव कुटुंबासोबत साजरे करायला आवडतात – शिवानी सोनार

– सोमा घोष

विनम्र, हसतमुख, सुंदर अभिनेत्री शिवानी सोनार हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे, तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर स्वत:ची छाप पाडली आहे. तिने मराठी लघुपट, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज इत्यादींमध्ये काम केले आहे. ‘राजा रानीची गं जोडी’ ही तिची मालिका खूपच गाजली, ज्यामुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘सिंधुताई माझी माई’ इत्यादी मालिकाही चांगल्याच चर्चेत राहिल्या. कामादरम्यान शिवानीची ओळख अभिनेता अंबर गणपुलेशी झाली. दोघेही लग्न करणार आहेत. अंबरचा शांत आणि काळजी घेणारा स्वभाव तिला प्रचंड आवडला आणि त्यामुळेच तिने लग्नाला होकार दिला. सध्या शिवानी सोनी टीव्ही मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतील मुख्य भूमिका साकारत आहे, तिच्याशी मारलेल्या गप्पांमधील हा काही खास भाग…

तू भेटशी नव्यानेया मालिकेत काम करण्याचे काही खास कारण आहे का?

या मालिकेची कथा खूप वेगळी आणि अनोखी आहे, त्यात माझ्या दोन भूमिका आहेत, एक गौरी आणि दुसरी तन्वी. गौरी ही आधुनिक विचारांची मुलगी आहे, जी शिक्षणासोबतच नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडते. तिची अनेक स्वप्नं आहेत, ती पूर्ण करण्यासाठी ती कठोर परिश्रम करते आणि कधीही हार मानत नाही. तन्वी हा तिचा भूतकाळ आहे, जी खूप शांत होती. ही दोन्ही पात्रं साकारताना मला एक वेगळंच आव्हान वाटतं आणि त्यामुळेच अभिनय करताना खूप छान वाटते.

मालिकेतील कोणते पात्र तुझ्या वास्तविक जीवनाशी मिळतेजुळते आहे?

गौरी हे पात्र मला माझ्यासारखे वाटते. तन्वीसारखी मी अजिबातच नाही, माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि माझ्यावर कधीही कोणत्याही प्रकारची बंधने लादली नाहीत, पण घराची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मी पुण्याची आहे, शाळेत असताना मला सर्जनशील गोष्टी करायला आवडायच्या. तेव्हापासूनच मी नृत्य आणि नाटकांमध्ये भाग घेत असे. चांगली गोष्ट म्हणजे मला पुण्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच मी वयाच्या १६ व्या वर्षी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये मला माझी पहिली मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मिळाली. त्यात मी छोटी भूमिका साकारली, पण सर्वांनी माझे कौतुक केले, त्यानंतर मला मोठी कामं मिळू लागली.

तुला कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळाला?

घरच्यांनी मला सुरुवातीपासून साथ दिली आहे. माझे वडील निशिकांत सोनार पोलिसात आहेत आणि माझी आई नेहा सोनार ब्युटीशियन आहे, मला एक लहान भाऊ देखील आहे. लहानपणापासून सर्वांनी मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली. मी लहानपणी अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टींमध्ये भाग घेत असे, तेव्हाही ते मला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहन देत.

इंडस्ट्रीत येण्यासाठी तुला कसा आणि किती संघर्ष करावा लागला?

माझ्या सुरुवातीच्या दोन्ही मालिकांचे चित्रिकरण मुंबई किंवा पुण्यात नव्हे तर सांगलीत झाले. तिथे गेल्यावर जुळवून घेणं माझ्यासाठी खूप अवघड जात होतं, कारण मी ४ ते ५ महिन्यांनी घरी जायचे, त्यामुळे घरचं जेवण मिळत नव्हतं, याशिवाय मला मराठी भाषेतील वेगळा प्रकार शिकावा लागला, जे खूप अवघड काम होते. मला चांगले काम खूप लवकर मिळाले, पण काम मिळण्यापेक्षा ते मिळाल्यानंतर जास्त संघर्ष करावा लागला. उदाहरणार्थ, ‘सिंधुताई माझी माई’ या मलिकेदरम्यान मला दिवसभर चप्पल न घालता राहावे लागले, कारण सिंधुताई चप्पल घालायच्या नाहीत. त्यामुळे मी देखील ६ महिने चप्पल घातली नाही, तिथेच जेवावे लागायचे, ज्यात फार काही आवडीचे नसायचे. याशिवाय मी त्वचेची काळजी किंवा स्वत:च्या फिटनेसकडेही लक्ष देऊ शकत नव्हते.

तुला ऑडिशनमध्ये नकाराचा सामना करावा लागला का?

मला बऱ्याचदा नकाराचा सामना करावा लागला, अनेकदा लोक म्हणाले की, मी छान दिसत नाही, माझ्यामध्ये नायिकेची वैशिष्ट्ये नाहीत, जेव्हा की मी सुंदर आहे. याशिवाय आजकाल मला हे देखील ऐकायला मिळते की, सोशल मीडियावर तुमचे फॅन फॉलोअर्स कमी आहेत. गुणवत्ता असूनही आजकाल फॉलोअर्स कमी झाल्यास काम मिळत नाही. प्रोडक्शन हाऊस ऑडिशन मेसेजमध्ये फॅन फॉलोअर्सची संख्यादेखील लिहितात.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची किती इच्छा आहे?

हिंदी टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मी ऑडिशनही देत आहे. काही चांगलं कामं मिळालं तर ते मी नक्कीच करेन.

तू इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्यं कितपत सहजतेने करू शकतेस?

मी अजून अशी अंतर्गत दृश्यं केलेली नाहीत आणि मी किती सहजतेने ती करू शकेन, हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे. अशी दृश्यं करणं गरजेचं असेल तर ती करताना माझ्या काही मर्यादा नक्कीच कायम असतील.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मला फॅशन आवडते आणि या इंडस्ट्रीत फॅशनेबल राहाणे गरजेचे आहे. मी कोणत्याही ब्रँड किंवा डिझायनरला फॉलो करत नाही. जे काही सुंदर आणि आरामदायक कपडे असतील ते मी खरेदी करते.

मी खुप मोठी खवय्यी आहे. माझा भाऊ हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे, त्यामुळे वेळ मिळताच आम्ही दोघेही एखाद्या तरी उपाहारगृहात जातो आणि तिथले वेगळे पदार्थ खाऊन बघतो.

तूला स्वत:ला प्रेजेंटेबल ठेवणे किती गरजेचे आहे?

आजकाल गृहिणी असो की नोकरदार महिला, प्रत्येकीने प्रेजेंटेबल असायलाच हवे. सोशल मीडियामुळे हा बदल आला आहे आणि आज प्रत्येकजण तो फॉलो करत आहे. मला हे योग्य वाटते.

तू सण-उत्सव कसे साजरे करतेस?

मला सण-उत्सव कुटुंबासोबत साजरे करायला आवडतात आणि मला अशा प्रकारे मिळून साजरे करणे जास्त गरजेचे वाटते. या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटणे, घर सजवणे, छान पदार्थ बनवणे इत्यादी सर्व मला खूप आवडते.

तू तरुण कलाकारांना काही संदेश देऊ इच्छितेस का?

आज बहुतांश तरुणांमध्ये धीर किंवा संयमाचा अभाव आहे. त्यामुळे ते खूप लवकर हार मानतात, साहजिकच त्यांना नैराश्य येते. त्यांचा स्वत:वरचा विश्वास उडतो आणि ते नको त्या गोष्टीच्या आहारी जातात, जे चुकीचे आहे. तुम्ही जे काही कराल ते मेहनतपूर्वक आणि मन लावून करा.

आवडता रंग – गडद निळा.

आवड पोशाख – भारतीय.

आवडता परफ्यूम – जाराचा बॉडी मिस्ट.

आवडते पुस्तक – मुरलीधर खैरनार यांचे ‘शोध’ हे पुस्तक.

आवडते ठिकाण – गोवा.

वेळ मिळाल्यास – वेगवेगळ्या उपाहारगृहांमध्ये जाऊन तिथले वेगवेगळे पदार्थ खाणे.

सामाजिक कार्य – गरजूंची सेवा.

‘१९ व्या वर्षी स्लिप डिस्क, वजन वाढलं आणि मग ३० किलो वजन कमी केलं!’ : श्रेया चौधरी

* सोमा घोष

आज सगळे श्रेया चौधरीवर फिदा आहेत! बंदिश बँडिट्स या सर्वांनी कौतुक केलेल्या वेब सीरिजमधील तिच्या अप्रतिम अभिनयापासून ते तिच्या आकर्षक रूपड्यापर्यंत, श्रेया रोजच चर्चेत आहे. पण श्रेयाचा फिटनेसचा प्रवास फारसा सोपा नव्हता. १९ व्या वर्षी स्लिप डिस्क झालं, वजन ३० किलोपर्यंत वाढलं, पण नंतर त्यावर मात करून तिने तिचे स्वप्न गाठले.

आठवडाभरापूर्वी, श्रेयाने तिच्या लहानपणीच्या आदर्श ऋतिक रोशनला तिच्या फिटनेससाठी प्रेरणा दिल्याबद्दल श्रेय दिलं होतं. आता, एका हृदयस्पर्शी पोस्टमध्ये, तिने तिच्या फिटनेसची गाडी रुळावरून का उतरली होती याचे खरे कारण उघड केले आहे.

“मी जेव्हा सोशल मीडियावर माझ्या फिटनेसच्या संघर्षाबद्दल सांगितलं, तेव्हा लोकांकडून इतका स्नेह आणि पाठिंबा मिळेल असं वाटलं नव्हतं. मला सशक्त वाटलं, म्हणून मी माझं मन मोकळं केलं. लोकांची सकारात्मक प्रतिक्रिया मला अजूनही काहीतरी शेअर करायला प्रेरणा देते. मी हे सगळं उघड केलंय, कारण लोकांनी स्वतःवर आणि त्यांच्या मानसिक सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर ते कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात.”

श्रेया पुढे म्हणाली, “१९ व्या वर्षी माझ्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. मी मानसिकदृष्ट्या खूपच खालावले होते. या सगळ्यात माझं वजन खूप वाढलं. यामुळे माझ्या आरोग्यावरही परिणाम झाला. कोणतीही शारीरिक हालचाल बंद झाली आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यात स्लिप डिस्क झाल्याने सगळं आणखी कठीण झालं. पण मी माझ्या स्वप्नांसाठी खूप महत्त्वाकांक्षी होते, त्यामुळे हा एक मोठा धक्का होता. मी स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचं मला जाणवलं.”

“एका रात्री मी स्वतःला सांगितलं की आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी मला स्वतःला निरोगी ठेवायचं होतं. त्यानंतर मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं, ३० किलो वजन कमी केलं, आणि स्लिप डिस्कची समस्या कधीच परत आली नाही.”

श्रेया पुढे म्हणाली, “आज मी माझ्या फिटनेसच्या उत्तम अवस्थेत आहे. फिट राहूनच मी अभिनेत्री होऊ शकले. मला वाटतं की जीवनातल्या अडथळ्यांकडे नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी, त्यांना सकारात्मकतेने बघायला हवं. शेवटी, जीवन ही एक भेट आहे आणि आपण ती संपूर्णपणे जगायला हवी.”

हास्याची नवी लहर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’चा टीझर प्रदर्शित

* नम्रता पवार

काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या शो विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.

‘ऑलमोस्ट कॉमेडी’मध्ये, लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक, प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे, आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. आपल्या दिलखेच अंदाजात सूत्रसंचलन करून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या शोची रंगत वाढवणार!

पाच लेखकांचे पाच एपिसोड्स रसिकवर्गाला पाहायला मिळणार असून येत्या २४ जानेवारीला ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा पहिला एपिसोड एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी नवीन एपिसोड प्रदर्शित होईल. या पाच एपिसोड्स व्यतिरिक्त एक एपिसोड नक्कीचं खास ठरेल, कारण प्रियदर्शनी इंदलकर सुत्रसंचलनाबरोबर लेखकांना रोस्ट देखील करणार आहे. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रोस्टिंगचे अनकट सीन पाहायला मिळणार आहेत. आता आठवड्याचा प्रत्येक शुक्रवार हा प्रेक्षकांसाठी हास्याचा खास दिवस ठरेल यात शंकाच नाही.

एव्हरेस्ट एंटरटेमेंटचे संस्थापक संजय छाब्रिया म्हणतात , ” ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा मराठी मनोरंजनक्षेत्रातील प्रतिभावान लेखकांचा स्टेजवरील लाईव्ह परफॉर्मन्सचा नवीन प्रयोग आहे. जो प्रेक्षकांना खळखळून हसवेल. तसेच त्यांच्या विनोदी अंदाजातील वैविध्यही यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. एव्हरेस्ट हास्य मराठी हा प्लॅटफॉर्म आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, ज्यातून आम्ही नव्या कलाकारांना आणि त्यांच्या कलेला रसिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. या शोमध्ये फक्त कॉमेडीच नाही तर रोस्टिंगसारखे अनोखे फॉरमॅट देखील आहेत. यापुढे ही असेच अनेक नवनवीन एपिसोड्स तुम्हाला पाहायला मिळतील. आम्हाला खात्री आहे, की ऑलमोस्ट कॉमेडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि रसिकवर्ग हा शो एन्जॉय करतील.”

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली,”  मला जेव्हा अमोलचा फोन आला की, आम्ही एक शो करतोय आणि तुला या शोचे होस्टिंग करत या लेखकांना रोस्ट करायचे आहे. मी खूप आश्चर्यचकित झाले, इतके मोठे, अनुभवी कलाकार असूनही त्यांनी मला फोन केला. मी याला एक चांगली संधीच म्हणेन. कारण या आधी मी कधी अशा प्रकारचे काम केले नाही. स्टँडअप हा प्रकार मला ट्राय करायचा होता आणि या शोच्या निमित्ताने मला याचा अनुभव घेता आला. सगळ्यांनी मला या प्रवासात खूप सांभाळून घेतले. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि संजय छाब्रिया यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ही संधी दिली. आता हा आमचा प्रवास अजून लांबपर्यंत चालणार असून अजून जास्त लोकांपर्यंत हे आम्ही पोहोचवणार आहोत.”

 

 

लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित!

* नम्रता पवार

‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ज्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीझरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ‘यल्लो यल्लो’ गाण्यावर दाभाडे कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल मीडियावर, लग्नात प्रचंड गाजत आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘फसक्लास दाभाडे’ मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. रुखवत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक प्रसंग या गाण्यात उत्कृष्टपणे मांडला असून प्रत्येकाच्या मनातील भावना आणि लग्नातील हास्यविनोद दिसत आहे. विशेष म्हणजे यात मिताली मयेकर दिसत असून या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. यात नेमकं त्यांचा नातं काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे.

निर्माते भूषण कुमार म्हणतात,” ‘दिस सरले’ हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. लग्नातील भावनिक क्षण आणि हास्यविनोदाची गुंफण या गाण्यात उत्तमरित्या मांडली गेली असून हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील खास आठवणींशी नक्कीचं जोडेल, याची आम्हाला खात्री आहे.’’

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “लग्नातील रुखवतापासून पाठवणीपर्यंतचा प्रत्येक क्षण ‘दिस सरले’ या गाण्यात प्रभावीपणे मांडला गेला आहे. लग्नासारख्या उत्सवातील आनंद आणि भावनांचा हा अनोखा संगम रसिकांच्या हृदयाला नक्कीच भिडेल”.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, लग्न हे दोन जीवांच्या एकत्र येण्याचा सोहळा असतो जो एक अत्यंत भावनिक अनुभव असतो, प्रत्येक कुटुंबासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो. या गाण्याच्या निमित्ताने प्रत्येक लग्नासाठी एक वैश्विक भावना तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. मला खात्री आहे लग्नं झालेल्या आणि होऊ घातलेल्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं वाटणार आहे.’’

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

 

 

“कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम हा खूप मोठा आशीर्वाद आहे!”

* सोमा घोष

अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना यांचे म्हणणे आहे की, एका कलाकाराला मिळणारे जगभराचे प्रेम आणि सन्मान ही त्याच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. 2024 मध्ये, आयुष्मानचे गाणे 184 देशांतील लोकांनी ऐकले, आणि ही कामगिरी त्यांना अधिक प्रेरणा आणि कृतज्ञतेची जाणीव करून देते.

“कलाकार हा कदाचित जगभरात सर्वाधिक प्रेम मिळवणारा व्यक्ती असतो, कारण त्याला सीमा, भाषा पार करून जगभरातून स्नेह मिळतो. कला लोकांना जोडते, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून बाहेर काढते आणि त्यांना आनंदाने भरलेल्या जगात घेऊन जाते. मी अभिनेता असूनही, पूर्ण वेळ संगीतकार नसतानाही, माझ्या गाण्यांना 184 देशांमध्ये पोहोचताना पाहणे खूपच नम्र करणारे आहे. हे मला माझ्या चित्रपटांच्या वेळेत अधिक संगीत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देते. मी आभारी आहे की मी क्रिएटिव आर्ट्सचा भाग आहे आणि दररोज लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतोय,” आयुष्मान म्हणाला.

अलीकडेच, अयुष्मानने अमेरिकेत आपला म्युझिक टूर केला, ज्यामध्ये शिकागो, सॅन जोस, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि डलासमध्ये हाऊसफुल शो झाले. आयुष्मान प्रेक्षकांशी आणि चाहत्यांशी जोडण्याचा आनंद घेतो, आणि त्याचे संगीत त्याला अत्यंत खास आणि जवळच्या पद्धतीने जोडण्याची संधी देते.

“मी एक अभिनेता, कवी आणि गायक/संगीतकार म्हणून माझ्या स्वप्नांना जगत आहे. माझी गाणी ऐकणाऱ्या आणि माझ्या कन्सर्टला येणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तुमचे पाठबळ माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि हे मला अधिक करण्यासाठी प्रेरित करते. मला आशा आहे की तुम्ही माझे संगीत ऐकत राहाल, माझे चित्रपट पाहत राहाल आणि नेहमीच आनंद मिळवत राहाल!” आयुष्मान पुढे म्हणाला.

अभिनयाच्या जगात, अयुष्मान दिवाळी 2025 मध्ये मॅडॉक फिल्म्सच्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या थामा या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय, ते धर्मा-सिख्या प्रोडक्शनच्या एका अनोख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल, ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

 

अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या ‘जर्नी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

* नम्रता पवार

एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ या चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सचिन जीवनराव दाभाडे यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. ‘सचिन दाभाडे फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, आणि निखिल राठोड हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Link :

https://youtu.be/O0Rq1Atd_Ns

 

चित्रपटाची कथा स्वतः सचिन दाभाडे यांनी लिहिली असून, संवाद आणि पटकथेचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड आणि अनिकेत अरविंद बुटाला आहेत.

ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा अचानक बेपत्ता होतो, ज्यामुळे त्याचे पालक चिंतेत पडतात आणि त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करतात. हा मुलगा कुठे आहे? त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? आणि त्याचा प्रवास काय वळण घेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना २९ नोव्हेंबरला चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मिळणार आहेत.

दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, ‘’जर्नी हा सिनेमा हा खरा आजच्या जनरेशनचा फॅमिली सिनेमा आहे, प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असताना नात्यात जो दुरावा वाढत जात आहे, तो या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सिनेमात घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे प्रत्येकास नकळत झालेल्या चुकांची जाणीव होते. निमित्त १४ वर्षाचं लेकरू जेव्हा हरवतं तेव्हा घरातील प्रत्येकाची काय व्यथा होते त्याला शोधण्यासाठी काय पराकाष्ठा करावी लागते आणि मग विचार येतो की, आपण कुठे कमी पडलो का? या सिनेमात प्रत्येक कलाकाराची मुख्य भूमिका आहे, अर्थात प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी बनलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

 

 

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित

* नम्रता पवार

संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ चित्रपटातील ‘राजं संभाजी’ या गाण्याच्या नृत्याने झाला. मावळ्यांच्या या उत्स्फूर्त सादरीकरणाने एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. हा भव्य चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करणारा आहे. हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राचा महासिनेमा आहे.

Link :

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांना भव्यदिव्य स्वरूपात मांडण्यात आले आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण नेतृत्वाने हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले, तसेच धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्यगाथा या चित्रपटात अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, मल्हार मोहिते-पाटील, संजय खापरे, पल्लवी वैद्य, कमलेश सावंत, विनीत शर्मा, प्रदीप रावत, प्रदीप कब्रा, राज जुत्शी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. ट्रेलर पाहाता या सर्व कलाकारांनी भूमिकांना सर्वोत्तम न्याय दिला आहे.

चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथ मोहिते-पाटील म्हणतात, ”छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास म्हणजे धैर्य, त्याग आणि निष्ठेचा एक महान अध्याय आहे. या ट्रेलरच्या माध्यमातून आम्ही त्यांची कहाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांचे कार्य आणि त्याग आजही तितकेच प्रेरणादायी आहे, आणि मला खात्री आहे की, हा चित्रपट प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून देईल.”

चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार विजयराव शेलार म्हणतात, “संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी पराक्रमाची गाथा. ट्रेलरमध्ये आम्ही त्यांच्या संघर्षाच्या आणि वीरतेच्या काही महत्त्वाच्या क्षणांना उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेता येईल. मला विश्वास आहे की, हा ट्रेलर प्रेक्षकांना महाराजांच्या अद्वितीय धैर्याची झलक दाखवेल.” संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते-पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा, सौजन्य सूर्यकांत निकम आणि केतनराजे निलेशराव भोसले यांनी केली आहे. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 

दिवाळी सर्वांसोबत साजरी करायला आवडते – ईशा संजय

* सोमा घोष

यंदाची दिवाळी मराठी अभिनेत्री ईशा संजयने दिवाळीपूर्वीच काही अशा प्रकारे साजरी केली…

दिवाळी हा प्रत्येकासाठीच आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत दिवे लावणे, चांगले कपडे घालणे, आवडीचे पदार्थ बनवणे आणि सणाचा आनंद घेणे, हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते. यात काही कलाकार असेही आहेत ज्यांना केवळ त्यांच्या कुटुंबासोबतच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या माणसांसोबतही दिवाळी साजरी करायला आवडते, कारण इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना आनंदित करतो. चला तर जाणून घेऊया, झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत राजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय यावेळी दिवाळी कशा प्रकारे साजरी करणार आहे, जी तिने चित्रिकरणावेळी सर्व टीमसोबत साजरी केली. सोबत काम करणाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा होता.

सुंदर अनुभव

 आपला अनुभव सांगताना ईशा म्हणते की, मी यावेळी सेटवर दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी केली. चित्रिकरणावेळी दिवाळी साजरी करण्याचा एक फायदा म्हणजे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करता येते. ती ‘ प्री दिवाळी’ म्हणजेच दिवाळीपूर्वीची दिवाळी असते. खरं तर, सेटवर रोज एकत्र काम करत असल्यामुळे, संपूर्ण टीम एक कुटुंब बनून जाते, कारण इथे त्यांच्यासोबत खूप वेळ घालवावा लागतो, त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणे, हा एक वेगळाच अनुभव होता. यावेळी मी माझ्या टीमच्या भावेश दादाला भेट म्हणून चॉकलेट दिले, कारण तो सेटवरील प्रॉपर्टीची खूप काळजी घेतो, तसेच, कधीही कोणतेही काम करण्यास नकार देत नाही, तो अतिशय नम्र आहे. मी फटाके फोडत नसले तरी यावेळी मी सेटवर फुलबाजी पेटवली होती.

 भेटीगाठींचा उत्सव

 आनंदाचा हा सण ईशा तिच्या कुटुंबासह आणि आजूबाजूच्या सर्वांसोबत साजरा करते. माझ्या घरी दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, असे ती सांगते. मी वर्षभर या सणाची वाट पाहात असते. मला त्या दिवशी सर्वांना भेटायला आवडते.

 सजावटीत कमतरता नसते

 दिवाळीतील घराच्या सजावटीबद्दल ईशा सांगते की, माझी आई खूप चांगली रांगोळी काढते, कधी फुलांनी तर कधी विविध रंगांनी ती वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढते, जी तिच्या मनावर अवलंबून असते. दरवर्षीची तिची संकल्पना वेगळी असते. मी देखील तिच्यासोबत रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते, पण मला ती तितकीशी चांगली जमत नाही. म्हणूनच मी लाइटिंगकडे जास्त लक्ष देते, ज्यामध्ये लांबलचक स्ट्रिंग लाइट्स असतात, ज्या सतत चमकत राहातात. त्या मी बाल्कनीत लावते, याशिवाय मी मेणबत्त्या, दिवे, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांनी घर सजवते, ते दिसायला खूप छान दिसते.

 स्वादिष्ट फराळ बनवला जातो

 मला फराळ खूप आवडतो, विशेषत: दिवाळीत, माझी आई सर्व प्रकारचा स्वादिष्ट फराळ घरीच बनवते, त्यात बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, चकली, करंजी इ. सर्व असते. मला आठवते की, लहानपणापासून मी कधीच माझ्या आईला बाहेरून फराळ विकत आणताना पाहिले नाही, कारण तिला विकतचा फराळ आवडत नाही. अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या बहिणीलाही ती फराळ पाठवून देते.

माझ्यासाठीही ती फराळ राखून ठेवते. त्यासाठीच आई दिवाळीत दोनदा फराळ बनवते, ज्यासाठी मी तिला मदत करते. आईची तयारी सुमारे १५ दिवस आधीच सुरू होते. मला आईने बनवलेले फराळाचे सगळेच पदार्थ आवडत असले तरी तिच्या हातची चकली खूप जास्त आवडते. दिवाळीनंतरही मी सकाळी चहासोबत चकली खाते.

 सुट्टी मिळते

 दिवाळी आवडण्याचे विशेष कारण म्हणजे: ईशाला दिवाळीत सगळ्यांना भेटता येते, कारण दिवाळी व्यतिरिक्त तिला कामातून वेळ मिळत नाही. यंदा दिवाळीच्या दिवशी पूर्णपणे मोकळे असणे आणि कुटुंब तसेच मित्र – मैत्रिणींना भेटणे तिच्यासाठी खूप खास ठरणार आहे, कारण याआधी सर्वांपासून इतक्या दूर ती कधीच राहिली नव्हती. त्यामुळेच तिला दिवाळीत घरी जाण्याची खूपच उत्सुकता आहे. शिवाय ती खूप बोलकी असल्यामुळे सगळ्यांशी खूप गप्पा मारते.

 सुपर पॉवर मिळाल्यास

 सुपर पॉवर म्हणजेच महासत्ता मिळाल्यास, ईशा तिच्या टीममध्ये काम करणाऱ्या सर्व लाइट दादा, स्पॉट दादा इत्यादींना दिवाळीला किमान ५ दिवसांची सुट्टी देऊ इच्छिते, जेणेकरून ते जिथे राहतात तिथे घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासह दिवाळीचा आनंद चंगल्या प्रकारे घेऊ शकतील.

 सरतेशेवटी, दिवाळीनिमित्त ईशा सर्वांना सांगू इच्छिते की, यावेळी तुम्ही सर्वांनी तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्र – मैत्रिणींना भेटून तुमचा आनंद साजरा करा. इन्स्टाग्राम आणि फेसबूकचा आधार घेऊ नका, फटाके फोडू नका, रंगीबेरंगी दिव्यांनी घर सजवा, जेणेकरून प्रदूषण कमी होईल.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें