अक्कल दाढ

 * लीना खत्री

मी लहानपणापासून हे ऐकून कंटाळले होते की, मला जराही अक्कल नाही. एके दिवशी जेव्हा मी हे ऐकून चिडून रडू लागले तेव्हा माझ्या आत्येने मला प्रेमाने समजावले की, ‘‘बाळा, अजून तू लहान आहेस, पण जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुला अक्कल दाढ येईल आणि तेव्हा कोणीही असे म्हणणार नाही की, तुला अक्कल नाही.’’

आत्येचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलले आणि मी रडणे बंद करून खेळायला गेले. माझी अशी पक्की खात्री झाली होती की, कधीतरी मलाही नक्कीच अक्कल येईल. हळूहळू मी मोठी होऊ लागले आणि याची वाट पाहू लागले की, आता लवकरच मलाही अक्कल देणारी दाढ येईल. या दरम्यान माझे लग्न झाले.

आता सासरीही मला हेच टोमणे ऐकायला मिळू लागले की, तुला तर जराही अक्कल नाही. आईने तुला काहीच शिकवले नाही. हे सर्व टोमणे सहन करत वेळ पुढे निघून चालली होती, पण अक्कल दाढ काही केल्या यायला तयार नव्हती. आता जेव्हा मी वयाची चाळीशी ओलांडली तेव्हा मला अक्कल दाढ येईल, ही आशाच सोडून दिली. एके दिवशी अचानक माझी चावून खायची दाढ प्रचंड दुखू लागली. वेदना असह्य झाल्यामुळे गालावर हात ठेवून मी ओरडत घरात फिरू लागले.

माझी दाढ दुखतेय हे ज्या कोणाला समजले त्या प्रत्येकाने मला हेच सांगितले की, ‘‘अगं, तुला अक्कल दाढ येत असेल. म्हणूच तुला इतकं दुखतंय.’’

मला अत्यानंद झाला. वाटले, उशिराने का होईना, पण आता मला अक्कल येईल. मात्र जेव्हा प्रचंड वेदनेने मी कळवळू लागले तेव्हा वाटले की, यापेक्षा मला अक्कल नव्हती तेच बरे होते. दातांच्या डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की, तुमची कोपऱ्यातली दाढ कीड लागून सडली आहे. ती काढून टाकावी लागेल.

तेव्हा मी कुतूहलाने विचारले, ‘‘ही माझी अक्कल दाढ होती का?’’

माझ्या या प्रश्नावर दातांचे डॉक्टर हसत म्हणाले, ‘‘होय, ही तुमची अक्कल दाढच होती.’’

आता सांगा? मी तरी काय बोलणार होते? एक तर आधीच उशिरा आली आणि कधी सडून गेली ते मला समजलेदेखील नाही. असह्य वेदना सहन करण्यापेक्षा ती काढून टाकणेच मला जास्त योग्य वाटले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी ३ दिवसांनंतर दाढ काढायला गेले. तिथे दातदुखीमुळे त्रासलेली आणखीही काही माणसे बसली होती. त्यांच्यामध्ये एक छोटीशी ५ वर्षांची मुलगीही होती. तिच्या समोरच्या दुधाच्या दाताला कीड लागली होती. तो दात काढायला ती आली होती. मी तिला तिचे नाव विचारले, मात्र तिने उत्तर दिले नाही. ती रागाने गाल फुगवून बसली होती.

तिच्या आईने सांगितले की, ३ दिवसांपासून ती दातदुखीमुळे त्रासून गेली आहे. सुरुवातीला दात काढून घ्यायला तयार नव्हती, पण आता सहन होत नसल्यामुळे दात काढायला तयार झाली आहे.

माझा नंबर त्या मुलीच्या नंतर होता. तिला डॉक्टरांनी बोलावले आणि गाल सुन्न होण्यासाठी इंजेक्शन दिले. त्यामुळे तिचा गाल सुजला. आता माझा नंबर आला. तशी तर मी दिसायला सुदृढ आहे, पण माझे मन भित्र्या सशासारखे आहे. काय करणार? इंजेक्शन घ्यावेच लागले. त्यांनतर १० मिनिटांनी डॉक्टर माझी दाढ काढणार होते. मी गाल पकडून तिथेच सोफ्यावर बसले.

घाबरून बसलेल्या मला १० मिनिटांनी आत बोलावण्यात आले आणि माझी अक्कल देणारी दाढ काढून टाकण्यात आली. दाढ काढताना मला विशेष दुखले नाही, पण त्यानंतर त्या जागेवर डॉक्टरांनी औषधाचा कापूस लावला आणि त्या औषधाच्या घाणेरडया वासाने मला तिथेच उलटी झाली. तेव्हा नर्सने माझ्याकडे खाऊ की गिळू, अशाच काहीशा नजरेने बघितले. ते पाहून मी चटकन गाल पकडून बाहेर आले. माझा छोटा मुलगा माझ्यासोबत होता. एक तासभर कापूस काढायचा नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याने मला डॉक्टरांचा निरोप दिला. तो एक तास कसाबसा गेला आणि मला आइस्क्रीम खायला मिळाले.

सुजलेले तोंड घेऊन आईस्क्रीम खाताना मी विचित्र दिसत होते. माझे वेडेवाकडे होणारे तोंड पाहून मुलांना हसू येत होते. मला दाढदुखीमुळे आणि ती काढताना जो त्रास झाला तो झाला, पण हे माझ्यासोबत चुकीचे घडले होते की, ज्या अक्कलदाढेची मी कित्येक वर्षे वाट पाहिली ती अशा प्रकारे आली आणि निघूनही गेली. शेवटी मी मात्र तशीच राहिले. हो, आधी होते तशीच…बेअक्कल.

सौभाग्यवतीचा अविश्वास प्रस्ताव

* सुशील यादव

‘‘अहो, काय झालेय? तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात,’’ एका वाक्यात सौभाग्यवतीने प्रस्ताव मांडला.

सरकार कोसळणार, अशी अपेक्षा आम्ही करू लागलो.

‘‘वेडे, अगं ४० वर्षांनंतर तुला असे वाटलेच कसे?’’

‘‘मी विकासाची कितीतरी कामं केली. तू मात्र सर्व चुलीत टाकलीस ना?’’

‘‘काय कमी आहे तुझ्या सरकारात?’’

‘‘त्यानंतर आम्ही आमच्या सरकारची म्हणजे आमची बाजू मांडू. मग समजून जा की, धावणाऱ्या गाडीचे चाक अचानक थांबेल.’’

आम्ही असा सूचक इशारा देऊनही ती अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करते. यावेळीही तिने तसेच केले असते, पण आम्ही जरा भावनांमध्ये वाहून थोडे जास्तच बोललो होतो. त्यामुळे या प्रकरणात आम्ही दाम्पत्य जीवनातील शांतता भंग केली होती.

आम्हाला माहीत होते की, आमचे हृदय पाझरले तर सौभाग्यवतीचा राग पेटून उठेल.

तिला शांत करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘सेवानिवृत्तीपूर्वी आम्ही कमवायचो. बैलासारखे कामावरून थेट घरी यायचो. येताना आमच्यासोबत कितीतरी समस्या कामावरून घरी येऊन आदळण्याच्या प्रयत्नात असायच्या त्यांना आम्ही कसेबसे रोखून धरायचो. आताही आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही. मग तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात, असे तू कसे म्हणू शकतेस?’’

‘‘चल, निदान आधीचे चांगले गुण तरी सांग. अवगुण नंतर ऐकून ठरवू की, नेमके काय बदलले आहे? आज लग्नाच्या ४० वर्षांनंतर तू विरोधी पक्षासारखे खूप मोठे तोंड उघडलेस.’’

‘‘जेव्हा हनिमूनला गेलो होतो तेव्हा तुम्ही माझ्या मागे-पुढे करून सर्व कामं स्वत:च करत होता. बॅगा घेणे, हॉटेलमध्ये काही मागवण्यापूर्वी माझी आवड विचारणे, शॉपिंग मॉलमधून मी केलेल्या खरेदीचे भरभरून कौतुक करणे, वेणू, तुझी पसंत खूपच सुंदर आहे, असे कौतुकाने बोलणे… मी भारावून जायचे. तुम्ही असेही म्हणायचात की, तुझी निवड उत्तम आहे.’’

‘‘म्हणूनच तर आमची निवड केलीत ना?’’

‘‘सगळे पुरुष लग्न झाल्यावर सुरुवातीला असेच वागतात का?’’

आम्ही म्हटले, ‘‘वेणू, काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते, जेव्हा नवरा नवी गाडी घेतो तेव्हा त्या गाडीत पत्नीला बसवताना स्वत: दरवाजा उघडतो. ते पाहून लोक २ निष्कर्ष काढतात. एकतर गाडी नवीन असेल किंवा बायको नवी नवरी असेल.’’

आमच्या या विनोदाची छाप सौभाग्यवतीवर पडू शकली नाही. तिने लगेचच दुसरा प्रहार केला. ‘‘अहो, लग्नानंतर सुरुवातीला तुमची परिस्थिती आपल्या राज्यासारखी होती. चांगले कपडे घालायची तुम्हाला माहिती नव्हती. साधी खाण्याची चव कळत नव्हती. मी फक्त खाण्याची चव म्हणाले, पिण्याची चव तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुरुवातीपासूनच चाखत होता. मी तुमच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नसते तर भोपळयासारखे फुगला असता.’’

‘‘आम्हाला असे टोमणे मारण्याचा, आमची अवहेलना करण्याचा हा अर्धवार्षिक कार्यक्रम मागील काही दिवसांपासून तिमाहीच्या स्तरावर सेन्सेक्सप्रमाणे घसरत चालला आहे. आम्हाला आमची टीआरपी सुधारण्याचा उपाय तेव्हा सूचतो जेव्हा आम्ही काहीतरी जबरदस्त लिहून ते अंकात छापून आणतो. उत्तरादाखल तेच सौभाग्यवतीला दाखवून आम्ही म्हणतो, ‘‘बघ आम्ही लिहिलेले छापून आलेय.’’ त्यावर ती लगेच आर्थिक बाजूवर बोट ठेवून विचारते, ‘‘हे छापून आलेय त्याला किती पैसे मिळणार?’’

‘‘हे लोक आजकाल काही देत नाहीत. ई मेलवर पाठवले तर नखरे करतात. आम्ही मेलवर पाठवलेले घेत नाही, असे थेट सांगतात. त्यांना लिखाणाची मूळ प्रत हवी असते. ती स्पीड पोस्टने पाठवायची म्हणजे एखाद्या गरीब लेखकाचे काय हाल होत असतील हे त्यालाच माहीत.’’

‘‘मी बघत आलेय, जेव्हा कधी मी रागाला वाट मोकळी करून देते तेव्हा तुम्ही तुमच्या साहित्यिक प्रवासाला निघून जाता किंवा याच साहित्याची ढाल बनवून लढण्यासाठी उभे राहता. साहित्यिक शब्दात बोलायला मलाही येते, पण रांधा-वाढा, उष्टी काढण्याच्या कामात ते शब्द चपतीसारखे गोल होऊन फुगतात. तर… मी सांगत होते.’’

‘‘आजकाल तुम्ही बदलला आहात.’’ ती पुन्हा मूळ मुद्दयावर अली. ‘‘वयाची ६० म्हणजे स्वत:मध्ये बदल करण्याची वेळ. सेवानिवृत्तीनंतरच्या फक्त ६ महिन्यांमध्ये अशी अवस्था. घरात आळशासारखे बसून फुकटची बडबड, आता देवच जाणे पुढे काय होणार, अरे देवा, धाव रे आता…’’

‘‘हे पाहा, दिवसभर घरात कोट-टाय घालून भारतातील कुठलाच पुरुष राहू शकत नाही. देशी लुंगी, बनियान किंवा पायजमा घातला की मस्त वाटते. काही पुरुष तर चट्टेपट्टे आलेल्या रंगीत चड्डया घालूनच घरात फिरतात. तू जर याला बदल म्हणत असशील तर हो, आम्ही बदललोय.’’

सौभाग्यवतीला वायफळ गप्पा ऐकून कानांना त्रास करून घ्यायचा नव्हता. त्यामुळे तिने शेवटचे हत्यार म्हणजे जणू ब्रम्हास्त्र बाहेर काढले. रागाने विचारले, ‘‘आजची तारीख किती?’’

मी अगदी सहजपणे सांगितले, ‘‘६ ऑगस्ट, कालच तर बँकेत जाऊन घर खर्चासाठी लागणारे पैसे काढून तुला दिले होते ना? बुद्धीला चालना देत मी आठवून सांगितले.’’

ती दातओठ चावत रागाने म्हणाली, ‘‘नुसतीच ६ ऑगस्ट… मग काल किती होती?‘‘

मी निरागसपणे म्हटले, ‘‘एक दिवस आधी म्हणजे 5 ऑगस्ट असेल ना…?’’

५ ऑगस्ट आठवतच माझे शब्द अडखळले, ‘‘प्रिये, क्षमा कर, आम्हाला अगदी परवापर्यंत तुझा वाढदिवस व्यवस्थित लक्षात होता. आम्ही आराधना ज्वेलर्सकडे १ तारखेलाच जाऊन तुझ्यासाठी नवीन डिझाईनचा हार बनवायला दिलाय. हा तोच हार आहे जो आम्ही सेवानिवृत्त व्हायच्या आधी तू सतत त्या ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर उभी राहून काचेतून बघायचीस. त्याचवेळी आम्ही स्वत:शीच निर्धार केला होता की, सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या तुझ्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही तुला तोच हार भेट देऊ.’’

सौभाग्यवतीच्या निराश चेहऱ्यावर थोडासा आत्मविश्वास झळकला. ती आमच्या पाया पडण्यासाठी वाकली. आम्ही तिचा हात धरून तिला छानसे आलिंगन दिले. प्रेमाने विचारले, ‘‘दर वाढदिवसाला आमच्या पाया पडतेस, मग काल काय झाले होते…?’’

‘‘जर पाया पडली असतीस तर आमच्या चटकन लक्षात आले असते…’’

‘‘मला हे बघायचे होते की, माझे विसरभोळे राम काय, काय विसरू शकतात…? त्यामुळेच मी मौन बाळगले होते. तुम्हाला आठवण व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले, पण तुम्ही तुमच्याच विश्वात हरवलेले असता.’’

‘‘चला, ज्वेलर्सकडे जाऊया, नाहीतर…’’ मी निघायची तयारी करत म्हटले.

‘‘मुलांनी शुभेच्छा दिल्या?’’

सौभाग्यवतीचा आनंदाने फुललेला चेहरा अचानक कोमेजला. ती निराशपणे म्हणाली,

‘‘आजकाल सर्व स्वत:च्याच जगात मग्न असतात… माहीत नाही, त्यांच्या लक्षात असेल का?’’

आम्ही म्हटले, ‘‘काही हरकत नाही. आमच्याप्रमाणे तीही विसरली असतील….

आज तू तुला जे काही आवडते ते सर्व खरेदी कर… आम्ही सोबत एटीएम कार्ड घेतले आहे…. बाहेरूनच जेवून येऊया.’’

सौभाग्यवती शांतपणे आमच्या सोबत निघाल्या.

आम्हाला असे वाटले की, जणू आम्ही जिंकलो. अविश्वास प्रस्तावाने अखेरचा श्वास घेतला.

मारून टाकले या महागाईने

मिश्किली * दीपा पांडे

‘‘अरे मित्रा, तोंड पाडून का बसला आहेस? जा, मजा कर. तुझी प्रियतमा लवकरच तुझी जीवनसाथी होणार आहे. बघ, किती छान नशीब आहे तुझे,’’ रमेश जेव्हा मूडमध्ये असायचा तेव्हा लखनवी अंदाजात बोलायचा.

विजय उदास होऊन म्हणाला, ‘‘अजून तुझे लग्न ठरलेले नाही. म्हणूनच तू माझे दु:ख समजू शकत नाहीस.’’

‘‘म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला? मला खरेच काही समजले नाही. मी तर असेच ऐकले होते की, प्रेम विवाह फिक्स करताना तोंडचे पाणी पळते. पण तुझा तर महिनाभरानंतर साखरपुडा आणि पुढच्या ६ महिन्यांत लग्न आहे…’’

तेवढयात विजयच्या मोबाईलवर मेसेज आला, ‘‘फ्री आहेस का?’’ विजय आपले बोलणे अर्धवट थांबवत उठून उभा राहिला.

विजय आणि रश्मी कॉलेजपासून एकमेकांना पसंत करीत होते. हे सर्व बीटेकच्या पहिल्या वर्षांपासूनच मित्रमैत्रिणींच्या लक्षात आले होते. त्या दोघांनीही हे लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. विजय ब्राह्मण, तर रश्मी वैश्य कुटुंबातील होती. फेअरवेल पार्टीच्या दिवशी मित्रमैत्रिणींनी गंमत म्हणून त्यांचे खोटे लग्नही लावून दिले होते.

विजयने सर्वात आधी रश्मीची पोस्ट आणि तिच्या पगाराबाबत आपल्या घरच्यांना सांगितले. त्यानंतर तिची जात सांगितली. त्याची ही युक्ती कामाला आली. रश्मीचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता.

विजयचे वडील म्हणाले, ‘‘सध्या जातीपातीहूनही मोठी महागाई झाली आहे. हे चांगले आहे की, रश्मीचा पगार तसा बऱ्यापैकी आहे. बंगळुरुसारख्या महागडया शहरात तुम्हाला चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करता यावा यासाठी दोघांनी मिळून कमाविणे खूपच गरजेचे आहे. पण, तुझा प्रेम विवाह आहे. त्यामुळे आम्ही हुंडा मागू शकत नाही. म्हणूनच आम्ही विचारपूर्वक असा निर्णय घेतला आहे की, तुम्ही दोघांनी स्वत:च्या लग्नाचा खर्च स्वत:च करावा.’’

तिकडे रश्मीच्या आईनेही फोनवरून लगेचच निर्णय देऊन टाकला की, ‘‘जातीपातीबाहेर तुझे लग्न लावून देऊ, पण तुझ्या छोटया बहिणींच्या लग्नात हेच लोक जास्त हुंडा मागतील. म्हणूनच तू तुझ्या लग्नाचा खर्च स्वत: कर… ३-४ वर्षांची सेव्हिंग तुझ्याकडेच आहे. आम्ही तुझ्याकडून कधीच काही घेतले नाही.’’

त्यानंतर फोन ठेवून रश्मीच्या वडिलांना सांगितले की, ‘‘हुंडा द्यायचा असेल तर मग लव मॅरेजचा फायदा काय… मी स्पष्टपणे नकार दिला आहे… आपल्या मर्जीने लग्न करायचे असेल तर स्वत: खर्च कर. सुशिक्षित, कमावत्या मुलीला आपल्या जातीपातीच्या बाहेर देत आहोत… सर्व टोमणे तर आपल्यालाच ऐकावे लागणार. शिवाय आपलीच तिजोरी रिकामी करायची, हे नाही जमणार.’’

दोन्ही कुटुंब लग्नाचा खर्च करायला तयार नव्हते. विजय आणि रश्मी स्वत:च्या कामातून थोडासा वेळ काढून लग्नाच्या खर्चाचे नियोजन करू लागले होते. विजय कॉफीच्या मशीनमधून २ कप कॉफी घेऊन मागे वळला. तिथे रश्मी उभी होती.

‘‘साखरपुडयाचे ठिकाण ठरवलेस का?’’ कॉफीचा कप हातात घेत रश्मीने विचारले.

‘‘लखनऊमधील सर्वच हॉटेल्स खूपच महागडी आहेत. त्यातल्या त्यात ७०० ते १००० रुपयांपर्यंत जेवणाचे ताट असलेली थोडी बरी हॉटेल्स आहेत. पण वरून डीजे आणि सजावटीचा खर्च… म्हणजे आणखी १५ ते २० हजार गृहीत धर,’’ विजयने सांगितले.

‘‘दोन्हीकडचे पाहुणे मिळून शंभर, सव्वाशे होतील,’’ रश्मी विचार करीत म्हणाली.

‘‘आमच्या पाहुण्यांना तर टिळक लावून लग्नाची मिठाईही द्यावी लागेल,’’ असे विजयने सांगताच रश्मीने तोंड वाकडे केले, ते पाहून विजयला हसू आले.

‘‘आपल्या दोघांचे कपडे? तेही खरेदी करावे लागतील,’’ रश्मी म्हणाली.

‘‘काय घालणार? लेहंगा, गाऊन की साडी?’’ विजयने विचारले. ‘‘मलाही त्यानुसारच कपडे शिवावे लागतील.’’

‘‘असे करते की, एखादा इंडो-वेस्टर्न ड्रेस खरेदी करते आणि तू सूट घाल… नंतर इतरांच्या लग्नातही घालता येईल,’’ रश्मीने सांगितले.

विजय चिडला, ‘‘सर्व बचत माझ्या कपडयांमध्येच का? तुझा इंडो-वेस्टर्न ड्रेस कधी कामाला येणार? त्यापेक्षा असे कर, तू साडी नेस. तिचा ट्रेंड वर्षानुवर्षवर्षे असतो.’’

हे ऐकून रश्मीने तिचा कप ट्रेमध्ये ठेवला आणि मागे वळून न बघताच निघून गेली. विजयही आपल्या जागेवर जाऊन बसला.

२ दिवस दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. पुढाकार विजयलाच घ्यावा लागला. शनिवारी सकाळी बराच विचार करून त्याने फोन लावला, ‘‘हॅलो रश्मी, आज शॉपिंगला जाऊया का?’’

‘‘कसली शॉपिंग?’’

‘‘अगं, अजून नाराज आहेस का? मला माफ कर, लग्नात तुला जे हवे ते घाल.’’

‘‘सांगतो तर असे आहेस जसे की, पैशांचा पाऊसच पडणार आहे… मी माझ्या काही मैत्रिणींना विचारले तर, कुणाचा १५ हजारांचा ड्रेस होता तर कोणाचा ५० हजारांचा. ड्रेससोबत इतर खर्च धरला तर साखरपुडयाचाच खर्च ४ लाखांपेक्षा कमी होणार नाही.’’

‘‘खरे आहे… सोनेही प्रती तोळा ४० हजारांच्या आसपास गेले आहे… अंगठीही खूप महाग झाली आहे,’’ विजय हताश होऊन म्हणाला.

‘‘मी स्वप्न पाहिले होते की, साखरपुडयाला मी प्लॅटिनमची हिरेजडित कपल रिंग घईन… एक महागडा इंडो-वेस्टर्न ड्रेस घालेन, पण नशीबच वाईट आहे. मेकअप, फोटोग्राफरचा खर्च विचारलास का?’’

‘‘याचा तर मी विचारच केला नव्हता.’’

‘‘२ दिवसांपासून झोपला होतास का? मी सर्व माहिती काढली आहे. महागडे जाऊ दे पण, स्वस्तात स्वस्त फोटोग्राफरही ५० हजारांपेक्षा कमी घेत नाहीत. मेकअपवाली ब्रायडलसाठी २० हजार आणि साखरपुडयाच्या दिवसासाठी १० हजार मागत आहे.’’

‘‘काय?’’ एखाद्या विंचवाने नांगी मारावी तसे काहीसे ओरडतच विजयने विचारले, ‘‘बरं झालं तू आठवण करून दिलीस. बँडबाजाचाही खर्च करावा लागेल ना?’’

‘‘त्याचीही माहिती घेतली आहे. आतषबाजी आणि घोडा नसेल तर १८ हजार लागतील.’’ रश्मीने सांगितले.

‘‘मग तर तू संपूर्ण बजेट काढले असशील. ग्रेट रश्मी,’’ विजय कौतुकाने म्हणाला.

‘‘हो, आपण आपल्या बजेटनुसार साखरपुडा किंवा लग्न यापैकी काहीतरी एकच धुमधडाक्यात करू शकतो.’’

असे करूया, सध्या साखरपुडा उरकून घेऊ. त्यानंतर सोबतच राहू, म्हणजे जेवण, घरभाडे अशी बरीच बचत होईल. जेव्हा १०-१२ लाख जमतील तेव्हा लग्न करू.’’

‘‘अरे वा, काय प्लॅनिंग आहे,’’ रश्मी उपरोधिकपणे म्हणाली. ‘‘जरा तुझ्या कट्टरपंथी आईवडिलांना याबाबत विचारून मग मला सांग.’’

‘‘तर मग तूच सांग, काय करूया? आपल्या दोघांचे मिळूनही ११ लाखांपेक्षा जास्त पैसे नाही,’’ विजय उदासपणे म्हणाला.

‘‘साखरपुडा नकोच, पुढच्या महिन्यात सरळ लग्न करूया… सोबत राहिलो तर थोडी फार बचत होईल… मी हनिमूनला परदेशात जाण्यासाठी काही पैसे बाजूला काढून ठेवले होते… हनिमून तर दूरची गोष्ट, इथे लग्नाचा खर्च करणेही अवघड जात आहे.’’

‘‘मी तर एका आलिशान गाडीचे स्वप्न पाहिले होते… ठरविले होते की, लग्नानंतर तुला सरप्राईज देईन… बँकेतून थोडे कर्ज घेईन… आता सर्वच स्वप्नांचा चुराडा झाला.’’

‘‘असे कर, तू मला २ वाजता शॉपिंग मॉलमध्ये भेट. काहीतरी प्लॅन करूया,’’ रश्मीने असे सांगताच विजयने होकार दिला.

शॉपिंग मॉलमध्ये त्यांना रमेश भेटला. तिघेही फूड कोर्टमध्ये जाऊन बसले. दोघांना शांतपणे बसलेले पाहून त्यांची मस्करी करीत रमेश म्हणाला, ‘‘अरे मित्रांनो, तुमच्या जीवनात असे काय घडले आहे, म्हणून दु:खात आहात?’’

‘‘अरे, आमचे कुटुंबीय लग्नासाठी तर तयार आहेत, पण खर्च करण्यासाठी तयार नाहीत. आमची इतकीही बचत नाही की, धुमधडाक्यात लग्न करता येईल.’’

विजयचे बोलणे ऐकल्यावर रमेश काहीसा विचार करीत म्हणाला, ‘‘खरेच आहे, कांदे १२० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलो आहे. तरी बरे की, तुमच्या लग्नात नॉनव्हेज नसेल नाहीतर काहीच खरे नव्हते. खर्च वाढला असता… तू तुझ्या घरातून रश्मीच्या घरापर्यंत वरात घेऊन जा… हॉटेलचा विचारच करू नकोस. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न पौर्णिमा किंवा एकादशीला कर.’’

‘‘असे का?’’ दोघांनी एकत्र विचारले.

‘‘अरे, या दिवशी लसूण, कांद्याशिवायचे जेवण बनवता येईल. तुमची ८-१० हजारांची बचत होईल. लोकही खुश होतील की, आमचा उपवास लक्षात घेऊन जेवण बनविले.’’

‘‘ठीक आहे, पण हॉटेल, जेवणाव्यतिरिक्त इतर अनेक खर्च आहेत, त्याचे काय?’’ रश्मीने विचारले.

‘‘लग्नाचे दागिने आणि कपडे भाडयाने घ्या. फक्त मेकअप आणि फोटोग्राफर जर बरा असायला हवा… नंतर फक्त फोटोच तर राहतात.

विजय बराच वेळ विचार करीत असल्याचे पाहून रमेश म्हणाला, ‘‘आता काय झाले? तुझी चिंता तर मिटली ना?’’

‘‘सर्व पैसे लग्नातच खर्च होऊन जातील… आमच्या नवीन संसारासाठीचे सामान कुठून येणार? नवीन घराचे भाडे, करार, असे कितीतरी खर्च कसे करणार?’’ विजयने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘तर मग असे करा, कोर्टात लग्न करा आणि वाचलेल्या पैशांतून नव्या संसाराची सुरुवात करा,’’ रमेशने उपाय सुचवला.

‘‘पण मग माझ्या स्वप्नांचे काय? मेहंदी, साखरपुडा, लग्नातील विधी, मौजमजेचे काय?’’ रश्मीने नाराजीच्या स्वरात विचारले.

विजय त्रासून म्हणाला, ‘‘आता काय करायचे ते तूच सांग? मारून टाकले आपल्याला या महागाईने…?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें