तुझ्या सुखात माझे सुख

कथा * आशा सराफ

आज सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेनं सूर्यही बेजार झाला असावा. म्हणून तो ढगांच्या कुशीत लपत होता. प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा हवासाच वाटतो.

संजनालाही या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं. थोडी फार ती भिजलीही, पण कुठं तरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपानं ओघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. पाच वर्षं झालीत तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दु:खीही. आनंद राकेशबरोबर आहे म्हणून आणि दु:ख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून.

लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबांचं घर सोडतेच. पण तिला तर नातंच तोडावं लागलं होतं. पाच वर्षांत तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलेलं नाही.

लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर राकेश तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्षं झाली, पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर्स सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की दोन तरूण मुलं तिच्या पाठी आहेत. पाठलाग करताहेत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे, पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची. पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन अन् ही दोन उनाड मुलं…तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन् स्कूटी थांबवली.

‘‘काय प्रॉब्लेम आहे मॅडम?’’ एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला.

‘‘जरा बघा बरं, चालताना अडकतेय सारखी…काय झालंय कुणास ठाऊक,’’ प्रश्न विचारणाऱ्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुलंही तिथं जवळच थांबली होती.

‘‘मॅडम, स्कूटीत काही दोष नाही,’’ स्कूटी चेक करून तो तरूण म्हणाला.

‘‘नीट बघा, चाकात काही दोष असेल…’’ ती वेळकाढूपणा करत होती. ती दोन मुलं जाण्याची वाट बघत होती.

तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरूण म्हणाला, ‘‘चाकंही व्यवस्थित आहेत.’’

‘‘तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना? माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर?’’ ती जरा चिडून बोलली. एव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिनं सुटकेचा नि:श्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला.

‘‘किती पैसे द्यायचे?’’

‘‘काहीच नाही…पैसे नाहीच द्यायचे.’’ तो तरूण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला.

‘‘ठिकाय…’’ घाईनं संजनानं स्कूटी सुरू केली. त्या निर्जन स्थळी ती पोहोचली अन् अवचित ती दोन्ही पोरं स्कूटरसमेत तिच्यासमोर आली. घाबरून संजनाच्या घशातून शब्द निघेना…ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता संजनाच्या समोरच स्कूटर थांबवली.

‘‘मॅडम, तुमची पर्स…तुम्ही विसरला होता.’’ अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेनं संजना दचकली तशी ती मुलंही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला.

ती मुलं पळाली अन् भक्कम सोबत आहे म्हटल्यावर संजनाही सावरली. कशीबशी म्हणाली, ‘‘पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना?’’

‘‘होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं म्हणूनच मी इथवर आलो.’’

‘‘धन्यवाद! तुम्ही वाचवलंत मला.’’

‘‘आता गप्पा नंतर. आधी लवकर चला. नाही तर पेपरला उशीर होईल.’’

‘‘तुम्हाला कसं कळलं, माझा पेपर आहे ते?’’

‘‘नंतर सगळं सांगतो. चला लवकर…’’ त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला.

परीक्षा संपेपर्यंत तो तरूण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून संजनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता. पण जे काही होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठं बघायला वेळही नव्हता.

तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फर्मान काढला की यापुढे संजनाचं शिक्षण बंद! आता हिचं लग्न करायचं. संजनानं शेवटचा पेपर दिला, त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोहोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता.

‘‘धन्यवाद!’’ त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली.

‘‘तुम्ही कुणाला धन्यवाद देताय?’’ त्यानं हसून प्रश्न केला.

‘‘तुम्हाला?’’ कपाळावर आठ्या घालत तिनं म्हटलं.

‘‘धन्यवाद असे दिले जात नाहीत. तुम्ही माझं नावंही घेतलं नाहीए.’’ हसत हसत त्यानं म्हटलं.

त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं.

‘‘ओह सॉरी,’’ ओशाळून संजनानं म्हटलं, ‘‘तुमचं नावं काय आहे?’’

‘‘राकेश.’’

‘‘बरं तर, राकेश, आता सांगा धन्यवाद कसे देतात?’’ संजना थोडी सावरून म्हणाली.

‘‘जवळच एक कॅफे आहे. तिथं कॉफी पिऊयात?’’ गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं.

संजना त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिनं लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं. सावळा पण अत्यंत देखणा, रूबाबदार होता तो. स्वत:चं गॅरेज होतं, जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदीच साधारण होतं. घरी फक्त म्हातारी आई होती. संजना श्रीमंत घरातली होती. तिला दोन धाकट्या बहिणीही होत्या.

पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर संजना रोजच दुपारी राकेशच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्नं बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. संजना घाबरली. तिनं घरी राकेशबद्दल सांगितलं.

वडील बिथरलेच. ‘‘ कसा मुलगा निवडला आहेस तू? रंग रूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही, आई लोकांकडे भांडी घासते. घर तर किती दळीद्री…काय बघितलंस तू?’’

‘‘बाबा, तो स्वभावानं खूप चांगला आहे.’’ मान खाली घालून संजनानं सांगितलं.

‘‘स्वभावाचं काय लोणचं घालाचंय? त्याच्या घरात तू एक दिवसही राहू शकणार नाहीस.’’ बाबांचा राग शांत होत नव्हता.

‘‘बाबा, मी राहू शकेन. मी राहीन.’’ हळू आवाजात पण ठामपणे संजना बोलली.

‘‘हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकवूस. जग बघितलंय मी…पैसा नसला की दोन दिवसांत प्रेमाचे बारा वाजतात.’’

‘‘नाही बाबा, असं होणार नाही. मला खात्री आहे.’’ संजनानं नम्रपणेच सांगितलं.

आईनं कसंबसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, ‘‘हे बघ संजना, संसार असा होत नाही. आत्ता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील पण ते इतकं सोपं नसतं. अगं, तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजुक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं तो गरीब आहे, श्रीमंत असता तरी हो म्हटलं असतं. शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण असं उघड्या डोळ्यांनी तुला दु:खाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाकट्या दोघी बहिणींची लग्नं करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील?’’

बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं. पण संजना अन् राकेशचं प्रेम त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कंच होतं. पळून जाऊनच लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान यात संजनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं अन् राकेश ते तिला भरभरून देत होता.

पावसाचे थेंब पडू लागले होते. संजनानं दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या दोन हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते.

‘‘राकेश, कधी आलास?’’ त्याच्याकडे वळून तिनं विचारलं.

तिला बाहूपाशात घेत त्यानं म्हटलं, ‘‘मी तर सकाळपासून इथंच आहे.’’

‘‘चल, खोटं बोलतोस…’’ त्याच्या छातीवर डोकं घुसळत तिनं म्हटलं.

‘‘तुझ्या हृदयाला विचार ना? मी कशाला खोटं बोलू?’’

संजना राकेशचा संसार सुखात चालला होता. राकेश तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती. पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता.

एकदा संजना बँकेतून घरी परतत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली…‘‘अरे ही तर पूनम…तिची धाकटी बहिण.’’

पूनमच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं, ‘‘ताई…’’ तिनं संजनाला मिठीच मारली.

‘‘कशी आहेस पूनम?’’ संजनाला एकदम भरून आलं.

‘‘तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघतेय तुला.’’

‘‘घरी सगळे बरे आहेत ना?’’ थोड्याशा संकोचानंच संजनानं विचारलं.

‘‘थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात.’’ पूनमननं संजनाला ओढतच तिथं नेलं.

कॉफीची ऑर्डर देऊन पूनम बोलू लागली.

‘‘घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचंही लग्न झालं. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते.’’

‘‘कशाला खोटं बोलतेस? आई बाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना?’’ संजनाला एकदम रडू अनावर झालं.

‘‘नाही ताई, तसं नाहीए. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आईबाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीकाय, जे व्हायचं ते होऊन गेलंय, आता त्याचं काय? तू कशी आहेस? भावजी कसे आहेत?’’

राकेशचा विषय निघताच संजना एकदम आनंदली.

‘‘राकेश खूप म्हणजे खूप चांगले आहेत.’’ तिनं अभिमानानं सांगितलं.

‘‘तुझ्यावर प्रेम करतात ना?’’ तिच्याकडे रोखून बघत पूनमनं विचारलं.

‘‘प्रेम? अगं त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरंच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं, म्हणून तर आज बँकेत ऑफिसर म्हणून रूबाबात राहतेय. स्वत:चा छोटासा फ्लट घेतलाय. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखंच वागवलं मला. दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं पूनम? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारलंय अन् जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो…मला असा नवरा मिळाला हे माझं मोठंच भाग्य आहे पूनम.’’

‘‘खरंच ताई? खूप बरं वाटलं ऐकून.’’

‘‘माझ्या आयुष्यात दु:ख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांना दुरावले आहे.’’ क्षणभर संजनाचा चेहरा दु:खानं झाकोळला, पण लगेच स्वत:ला सावरून तिनं म्हटलं, ‘‘ते सोड, तुझं लग्न कुठं झालंय? घरातली मंडळी कशी आहेत?’’

‘‘माझं सासर दिल्लीला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आलेय. छोटी चंदीगडला असते…पूनमनं सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.’’

वाटेत पूनम विचार करत होती की ताई खरोखरंच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही.

पूनमनं वाटेतूनच फोन करून आईबाबांना संजना भेटल्याचं कळवलं.

संजनाला भेळ फार आवडते म्हणून राकेश भेळ घेऊन घरी आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं संजनाकडे बघितलं.

‘‘राकेश, हे माझे आईबाबा आहेत.’’ संजनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

राकेशनं दोघांना वाकून नमस्कार केला.

‘‘खुशाल रहा. सुखी रहा.’’ बाबांनी तोंड भरून आशिर्वाद दिला. ‘‘पूनमनं संजनाबद्दल सांगितलं, आम्हालाही पोरीचं सुखंच हवं होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की संजना सुखी होऊ शकणार नाही. पण आता ती आनंदात आहे तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नकोय आम्हाला.’’ बाबांनी राकेशला मिठीत घेत तोंडभरून आशिर्वाद दिले.

संजनाचे आईबाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळं, मिठाई, फरसाण असं बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले, तेव्हा राकेश त्यांना पोहोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळानं तो परत आला तेव्हा, संजनानं म्हटलं, ‘‘कुठं गेला होतास?’’

‘‘अगं तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आनंद साजरा करायला नको का?’’ तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं.

काळ पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निसटावी तसा भराभर काळ पुढे सरकला.

त्यादिवशी संजनाला ती आई होणार असल्याचं कळलं ती अतीव आनंदानं डॉक्टकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. राकेशसाठी हे सरप्राइज असणार. राकेशला किती आनंद होईल. त्याला तर आनंदानं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्यानं किती किती प्लानिंग करून ठेवलंय. ती घरी पोहोचली, तेव्हा राकेश घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. किती तरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातलं अक्षर राकेशचं होतं. पण राकेश असं करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना.

‘‘प्रिय संजना,

हे पत्र वाचून तुला खूप दु:ख होईल ते मला ठाऊक आहे. खरंतर मी तुला सोडून जाऊच शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाहीए. केव्हा येईन सांगता येत नाही पण येईन हे त्रिवार सत्य! गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वत:ची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे.

तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…

तुझाच राकेश.’’

प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…कुठं गेला तो तिला सोडून? का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता संजना बेशुद्ध पडली.

काही वेळानं आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता राकेश नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? राकेश दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, कुणालाच काही माहीत नव्हतं. नऊ महिने तिला कसेबसे काढले, तिलाच ठाऊक, नऊ महिने उलटले अन् तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. पाच वर्षं ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा राकेश नव्हता. मुलीचं नाव तिनं राशी ठेवलं. राकेशनंच ठरवलं होतं ते नाव.

सहा वर्षं उलटली. राकेश नाही, त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. राकेश येईल अशी आशा होती.

एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. राकेश तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा, तेव्हा असाच सुंदर वास दरवाळयचा. राकेश तिच्यासमोर खरोखरंच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्यानं संजनावर उधळली अन् तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले.

‘‘कोण तू? मी तुला ओळखत नाही.’’

‘‘संजना…’’ चेहऱ्यावरचं तेच लाघवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर.

‘‘मेली संजना…इथं नाही राहत ती…’’

संजनाला भावना आवरत नव्हत्या. राकेशनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिनं प्रतिकार केला अन् मग स्वत:च त्याला मिठी मारली.

‘‘कुठं गेला होतास तू?’’

‘‘दुबईला?’’ तिचे अश्रू पुसून तो म्हणाला.

‘‘दुबईला? कशाला?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.

‘‘पैसे मिळवायला.’’

‘‘न सांगता निघून जाण्याजोगं काय घडलं होतं?’’

‘‘मला तुला सुखात ठेवायचं होतं.’’

‘‘सुखासाठी पैसे लागतात? मी कधी मागितले पैसे? कधी तरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशीच सुखात होते.’’

‘‘नाही संजना, माझ्या लक्षात आलं होतं की आईवडिलांकडे येणंजाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरीबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा, कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस कारण तिथं सगळेच नातलग, परिचित, श्रीमंत असतात. ‘मला वेळ नाही, जमणार नाही, म्हणून तू टाळत असायचीस. हे सगळं मला कळत होतं.’’

‘‘तुला आठवतंय, आईनं दिलेली निळी साडी…’’

‘‘ती ४०,००० ची?’’

‘‘हो. तीच. ती नेसून तू मला विचारलं होतंस, कशी दिसतेय?’’ खरं तर तू कायमच मला सुंदर दिसतेस. पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती…मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली…अशी साडी आहे या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजलं. अन् मी अस्वस्थ झालो. माझ्या संजनाला तिच्या नातलगांमध्ये ताठ मानेनं कसं वावरता येईल याचा विचार करू लागलो?

‘‘एक दिवस एका मित्रानं म्हटलं तो मला दुबईत भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवलाय संजना, आता तू तुझ्या नातालगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठ्ठा बंगला, झगमगीत गॅरेज…सगळं सगळं देईन मी तुला.

‘‘अरे, पण निदान मला सांगून जायचंस?’’

‘‘सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस? तू तर हेच म्हणाली असतील, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नकोय, पण मी तुला गेल्या काही वर्षांत फारच फार दुखवलंय. तू म्हणशील ती, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढंच म्हण…प्लीज…संजना.’’ त्यानं तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते.

तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामिटरवर ठेवलेल्या फोटोफ्रेमकडे गेलं. त्यानं आश्चर्यानं संजनाकडे बघितलं.

‘‘माझी मुलगी आहे.’’ संजनानं हात सोडवून घेत म्हटलं.

‘‘नाही, आपली मुलगी आहे.’’ त्यानं ठासून म्हटलं, ‘‘राशी नाव ठेवलं ना हिचं?’’ त्याच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य होतं.

‘‘तुला इतकी खात्री होती?’’ संजनानंच आता आश्चर्याने विचारले.

‘‘खरं तर माझ्यावर, स्वत:वर माझा जेवढा विश्वास नाहीए, तेवढा तुझ्यावर आहे संजना.’’ त्यानं मिठीत घेतलं.

खरोखर एकमेकांवर असं प्रेम अन् आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला येतो?

चल, आपण कॉफी घेऊयात

कथा * मीना वाखले

वैदेही कमालीची बेचैन झाली होती. अचानक सौरभचा ई मेल वाचून, तोही दहा वर्षांनी प्रथमच आलेला ई मेल बघून ती अंतर्बाह्य ढवळून निघाली होती. तिला न जुमानता तिचं मन सौरभचाच विचार करत होतं… का? का तो तिला अचानक सोडून गेला होता? न कळवता, न सांगता पार नाहीसाच झाला होता. मारे म्हणायचा, ‘‘मी तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणू शकत नाही, पण जीव देईन तुझ्यासाठी…पण नाही, जीव तरी कसा देऊ? माझा जीव तर तुझ्यात वसलाय ना?’’ हसून वैदेही म्हणायची, ‘‘खोटारडा कुठला…अन् भित्रासुद्धा’’ आज इतक्या वर्षांनी हे सगळं आठवल्यावरही वैदेहीच्या चेहऱ्यावर हास्य उमललं होतं. पण दुसऱ्याच क्षणी त्याने केलेल्या विश्वासघाताची आठवण येऊन तिचा चेहरा रागाने लाललाल झाला. पुन्हा प्रश्नांचा तोच गुंता… तो मुळात तिला सोडून गेलाच का? अन् गेलाच होता तर आज ई मेल कशाला केला?

वैदेहीने मेल पुन्हा वाचला. फक्त दोन ओळी लिहिल्या होत्या सौरवने, ‘‘आय एम कमिंग टू सिंगापूर टुमारो, प्लीज कम अॅण्ड सी मी. विल अपडेट यू द टाइम प्लीज गिव्ह मी योअर नंबर. विल कॉल यू.’’

वैदेहीला कळेना, त्याला नंबर द्यावा की न द्यावा? इतक्या वर्षांनंतर त्याला भेटणं योग्य ठरेल की अयोग्य? आज मारे ईमेल करतोए पण दहा वर्षांत भेटायची एकदाही इच्छा झाली नाही? मी जिवंत आहे की मेलेय याची चौकशी करावीशी वाटली नाही? आता परत यायचं काय कारण असेल? प्रश्न अन् प्रश्न…पण उत्तर एकाचंही नाही.

पण शेवटी तिने त्याला आपला नंबर पाठवून दिला? खुर्चीवर बसल्या बसल्या तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली.

दहा वर्षांपूर्वी ‘फोम द शॉपिंग मॉल’च्या समोर ऑर्चर्ड रोडवर वैदेहीला कुणा कारवाल्याने ठोकरलं होतं. तो बेधडक निघून गेला. रस्त्यावर पडलेली वैदेही ‘हेल्प..हेल्प..’ म्हणून ओरडत होती. पण त्या गर्दीतला एकही सिंगापुरी तिच्या मदतीला येत नव्हता. कुणी तरी पोलिसांच्या हेल्पलाइनला फोन केला.

वैदेहीच्या पायाला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहात होतं. वेदनेने ती तळमळत होती. टफिक जाम झाला होता. त्याच जाममध्ये सौरभही अडकलेला. एक भारतीय मुलगी बघून तो मात्र पटकन् गाडीतून उतरला. वैदेहीला उचलून आपल्या ब्रॅण्ड न्यू स्पोर्ट्स कारमध्ये ठेवली अन् तडक हॉस्पिटल गाठलं.

एव्हाना वैदेहीची शुद्ध हरपत आलेली. कुणीतरी उचललंय, त्याच्या अंगात लेमन यलो रंगाचा टीशर्ट आहे एवढंच तिला अंधुकसं कळलं अन् ती बेशुद्ध झाली.

परदेशात तर नियम आणखी वेगवेगळे असतात. पोलिसांनी सौरभला भरपूर पिडलं. एक भारतीय मुलगी या पलीकडे त्याला वैदेहीची काहीही माहिती नव्हती. त्यानेही केवळ भारतीय असण्याचं कर्तव्य पार पाडलं होतं. चारपाच तासांनी जेव्हा वैदेही शुद्धीवर आली तेव्हा तो तिथेच तिच्या बेडजवळ बसलेला तिला दिसला. वैदेहीच्या एका पायाला जखम झाली होती. दुसरा पाय फ्रॅक्चर झाला होता. मोबाइलही तुटला होता. सौरभ ती शुद्धीवर कधी येतेय याचीच वाट बघत होता. तिच्या घरी या अपघाताची बातमी पोहोचवायला हवी होती.

डोळे उघडल्यावर एकूण परिस्थितीचं आकलन व्हायला थोडा वेळ लागला. त्यावेळी तिने त्याच्याकडे नीट बघितलं. दिसायला साधासाच होता. पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. कदाचित त्याचं निर्मळ हृदय अन् माणुसकीची जाण त्यामुळेच त्याने वैदेहीला इस्पितळात आणलं होतं.

ती शुद्धीवर आल्याचं लक्षात येताच तो म्हणाला, ‘‘बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात…मी काळजीत होतो, अजून किती वेळ इथे बसून राहावं लागेल म्हणून…मी सौरभ…’’

वैदेही काहीच बोलली नाही.

त्याने तिच्या घरच्यांपैकी कुणाचा तरी नंबर मागितला. तिने आईचा फोन नंबर दिला. त्याने ताबडतोब त्या नंबरवर वैदेहीच्या अपघाताची व तिला कुठे अॅडमिट केलंय त्या इस्पितळाची सगळी माहिती दिली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. जाताना ‘बाय पण केलं नाही,’ वैदेहीने त्याचं नाव ‘खडूस’ ठेवलं.

वैदेहीचे आईबाबा इस्पितळात आले. वैदेहीने त्यांना सगळी हकिगत सांगितली. तो कोण, कुठला काहीच तिला ठाऊक नव्हतं. त्याने स्वत:चा मोबाइल नंबर तिला दिला नव्हता की तिच्याकडून तिचा नंबर घेतला नव्हता. त्यामुळे आता भेटण्याची शक्यता नव्हतीच.

तीन-चार दिवस इस्पितळामध्ये काढल्यावर तिला घरी पाठवण्यात आलं. अजून पंधरा दिवस बाहेर जाता येणार नव्हतं. तिने मैत्रिणीला (ऑफिसमधून रजा घ्यायची म्हणून) फोन करायचा म्हटलं, तर मोबाइल होता कुठे? तिला आठवलं तो सौरभच्या हातात बघितला होता. तो जाताना तिला द्यायला विसरला की मुद्दामच दिला नाही? झालं…आता सगळे कॉण्टॅक्ट नंबर्स गेले. तिला एकदम आठवलं त्याने स्वत:च्या मोबाइलवरून आईला फोन केला होता. आईच्या मोबाइलमध्ये कॉल्स चेक केले अन् त्याचा नंबर सापडला.

तिने ताबडतोब फोन लावला अन् आपली ओळख देत तिचा मोबाइल परत करण्याची विनंती केली. तो म्हणाला, ‘‘मोबाइल मी परत करणारच आहे पण असा फुकटाफाकटी नाही. मला जेवण पाहिजे. उद्या संध्याकाळी येतो…पत्ता सांगा.’’

बाप रे…घरी येणार? हक्काने जेवायला? काय माणूस आहे? पण मोबाइल तर हवाच होता. मुकाट पत्ता सांगितला.

दुसऱ्यादिवशी दस्तूरखुद्द सौरभ महाशय दारात हजर होते. आल्या आल्या सर्वांना आपली ओळख करून दिली. सर्वांशी ओळख करून घेतली. आल्या आल्या मोकळपणाने वागून घरात असा काही रमला जणू फार पूर्वीपासूनची ओळख असावी. वैदेहीला हे सगळं विचित्रही वाटत होतं आणि आवडतही होतं. आई, बाबा, धाकटी भावंडं सर्वांनाच तो आवडला. मुख्य म्हणजे त्याने वेळेवर केलेल्या मदतीमुळेच वैदेही सुखरूप हाती लागली होती. त्याच्या व्यतिमत्त्वात एक गोडवा होता. त्याचं बोलघेवडेपण हे त्याच्या निर्मळ मनाचं प्रतीक होतं.

सिंगापूरमध्ये तो एकटाच राहात होता. एका कार डिस्ट्रीब्यूशन कंपनीत नोकरी करत होता. त्यामुळेच त्याला रोज नवी कार टेस्ट ड्राइव्हसाठी मिळत होती. ज्या दिवशी त्याने वैदेहीला मदत केली होती त्यावेळीही तो नवीन स्पोर्ट्स कारच्या टेस्ट ड्राइव्हरच होता. त्याचे आईवडील भारतात असतात. हळूहळू तो घरच्यासारखाच झाला. थोडा हट्टी होता, पण भाबडाही होता. हवं तेच करायचा. पण ते करण्यामागची भूमिका खूप छान समजावून सांगत असे. स्वत:च्या नकळत वैदेही त्यात गुंतत चालली. तिला कळलं होत, सौरभच्या मनातही तिच्यासाठी खास स्थान होतं.

सौरभच्या ऑफिसच्या जवळपास ऑर्चर्ड रोडला वैदेहीचंही ऑफिस होतं. पंधरा दिवसांनी वैदेही ऑफिसला जाऊ लागली. तिची नेण्याआणण्याची जबाबदारी सौरभने स्वत:हून स्वीकारली. कारण अजून पायाचं फ्रॅक्चर दुरुस्त झालेलं नव्हतं. आईबाबांना त्याच्या या मदतीचं कौतुक वाटलं, कृतज्ञताही वाटली.

सौरभची ओळख होऊन सहा महिने झाले होते. तिचा बाविसावा वाढदिवस होता. त्याच दिवशी सौरभने तिला प्रपोज केलं होतं. त्याची प्रपोज करण्याची पद्धतही आगळीवेगळी होती. बहुतेक लोक आपल्या प्रेयसीला पुष्पगुच्छ, अंगठी, नेकलेस किंवा घड्याळ अथवा चॉकलेट देत प्रपोज करतात. सौरभने कारचं एक नवीन अगदी सुबक असं मॉडेल तिच्या हातात ठेवत विचारलं होतं, ‘‘पुढल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास तू माझ्याबरोबर करशील?’’ त्यांच्या डोळ्यांतून, त्याच्या देहबोलीतून तिच्याविषयीचं प्रेम तिला दिसत होतं. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले अन् तिच्या डोळ्यांत बघत परत तोच प्रश्न केला. वैदेहीचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. त्या क्षणी तिला काहीच बोलणं सुधरेना. त्याच्यापासून दूर होत तिने म्हटलं, ‘‘मलाही तुला काही सांगायचंय, उद्या तू बरोबर पाच वाजता ‘गार्डन बाय द वे’मध्ये भेट.’’

ती संपूर्ण रात्र वैदेहीला झोप लागली नाही. सौरभ, त्याने प्रपोज करणं, अजून तिला पुढलं शिक्षणही घ्यायचं आहे. नोकरी, करिअर खूप काही करायचंय. अजून वयही फक्त बावीस वर्षांचं आहे. सौरभ अजून तसा लहान म्हणजे पंचवीस वर्षांचाच आहे, पण ती त्याच्या आकंठ प्रेमात आहे. तिला त्याच्याबरोबरच पुढचं सर्व आयुष्य घालवायचं आहे. पण अजून थोडा वेळ हवाय तिला. खरं तर कधीपासून हे सगळं तिला सौरभला सांगायचं होतं. पण तेच नेमकं सांगता आलं नव्हतं.

बरोबर सायंकाळी पाच वाजता ती ‘गार्डन बाय द वे’ला पोहोचली. सौरभ आलेला नव्हता. तिने त्याचा फोन लावला तो स्विच ऑफ आला. ती त्याची वाट बघत तिथेच थांबली. अर्ध्या तासाने फोन केला तरीही ऑफ…वैदेहीला काय करावं कळेना. प्रथम तिला राग आला. सौरभ असा बेजबाबदारपणे कसा वागू शकतो? आठ वाजायला आले अन् फोन लागेना तेव्हा मात्र तिच्या मनात शंकाकुशंकांनी थैमान मांडलं. काय झालं असावं? ती रडकुंडीला आली. फोन लागलाच नाही अन् त्यानंतर कधीच सौरभचा फोन आला नाही.

दोन वर्षं वैदेही त्याच्या फोनची, त्याची वाट बघत होती. शेवटीआईबाबांनी तिच्यासाठी पसंत केलेल्या मुलाशी आदित्यशी ती विवाहबद्ध झाली. त्याची स्वत:ची ऑडिटिंग फर्म होती. आईवडिलांसह तो सिंगापूरमध्येच राहात होता.

लग्नानंतरही सौरभला विसरायला तिला फार वेळ लागला. कधी ना कधी, कशावरून तरी त्याची आठवण यायचीच. आता कुठे जरा ती सावरली होती तोवर तो असा अचानक आलाय…आता काय हवंय त्याला?

विचारांच्या गुंत्यात हरवलेली वैदेही फोनच्या घंटीने दचकून भानावर आली. नंबर माहितीचा नव्हता. हृदय जोरात धडधडू लागलं…सौरभचाच असावा. भावना अनावर झाल्या. फोन उचलून हॅलो म्हटलं, पलीकडे सौरभच होता. त्याने विचारलं, ‘‘इज दॅट वैदेही?’’ त्याच्या आवाजाने ती मोहरली. अंगभर झणझिण्या उठल्या.

स्वत:ला संयमित करून तिने म्हटलं, ‘‘या..दिस इज वैदेही,’’ मुद्दामच न ओळखल्याचं नाटक करत म्हणाली, ‘‘मे आय नो हूज स्पीकिंग?’’

‘‘कमाल करतेस? मला ओळखलं नाहीस, अगं मी सौरभ…’’ तो नेहमीच्याच स्टाइलने बोलला.

‘‘ओह!’’

‘‘उद्या सायंकाळी पाच वाजता ‘मरीना वे सॅण्डस होटेल’च्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये भेटायला येशील, प्लीज?’’

काही क्षण विचार करून वैदेही उत्तरली, ‘‘हो, तुला भेटायचंय मला. उद्या पाच वाजता येते मी.’’ तिने फोन कट केला.

या क्षणी जर संभाषण वाढलं असतं तर तिचा सगळा राग, सगळा संताप सौरभवर कोसळला असता. तिच्या मनात उठलेल्या वादळाची कल्पनाच कुणी करू शकणार नाही. तिच्या मनात सौरभविषयी प्रेम होतं की राग? त्याला भेटायला ती उत्सुक होती की भेट तिला टाळायची होती? कदाचित दोन्ही असेल…तिचं तिलाच काही कळत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी ती बाहेर जाण्यासाठी आवरत असताना आदित्यने, तिच्या नवऱ्याने विचारलं, ‘‘कुठे निघालीस?’’

‘‘सौरभ आलाय सिंगापूरला…त्याची इच्छा आहे मला भेटायची,’’ वैदेहीने सांगितलं.

‘‘जाऊ की नको जाऊ?’’ तिने आदित्यालाच प्रश्न केला.

‘‘जा ना, जाऊन ये. रात्रीचं जेवण आपण घरीच एकत्र घेऊयात,’’ आदित्यने म्हटलं.

आदित्य सौरभविषयी ऐकून होता. वैदेहीला त्याने संकटात केलेली मदत, त्याचा आनंदी स्वभाव, आर्जवी बोलणं, वैदेहीच्या माहेरी तो सर्वांच्या लाडका होता हेही आदित्यला ठाऊक होतं. त्यामुळेच सौरभला भेटणं यात त्याला काहीच वावगं वाटलं नाही.

फिकट जांभळ्या रंगाच्या सलवार सुटमध्ये वैदेही सुरेख दिसत होती. तिचे लांबसडक केस तिने मोकळे सोडले होते. सौरभला आवडणाराच मेकअप तिने केला होता. हे सगळं तिने मुद्दाम केलं नव्हतं, अभावितपणेच घडलं होतं. अन् मग तिला स्वत:चाच राग आला…की ती सगळं सौरभला आवडणारंच करतेय? सौरभ तिच्या आयुष्यात इतका खोलवर रूतला होता हे तिला आता जाणवलं. त्याच्यात असं गुंतून चालणार नाही हे तिला कळत होतं पण वेडं मन तिच्या ताब्यातच नव्हतं.

बरोबर पाच वाजता ती मरीना बाय सॅण्ड्सच्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये पोहोचली. सौरभ तिच्या आधीच येऊन बसला होता. तिला बघताच तो खुर्चीतून उठला अन् त्याने वैदेहीची गळाभेट घेतली. ‘‘सो नाइस टू सी यू आफ्टर अ डिकेड…यू आर लुकिंग गॉर्जियस.’’

वैदेही अजूनही विचारातच होती. पण हसून म्हणाली, ‘‘थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट…आय एम सरप्राइज टू सी यू अॅक्चुअली.’’

सौरभला कळलं तिला काय म्हणायचंय ते. त्याने म्हटलं, ‘‘तू मला क्षमा केली नाहीस…कारण मी त्या दिवशी कबूल करूनही तुला भेटलो नाही. पण नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेतल्यावर तुझा राग अन् गैरसमजही दूर होईल.’’

‘‘दहा वर्षं म्हणजे अगदी लहानसा काळ नाही. काय घडलं होतं तेव्हा?’’

एक दीर्घ श्वास घेत सौरभने सांगायला सुरूवात केली. ‘‘ज्या दिवशी मी तुला भेटायला येणार होतो त्याच दिवशी आमच्या कंपनीच्या बॉसला पोलिसांनी पकडून नेलं. स्मगलिंग करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. टॉप लेव्हल मॅनेजरलाही रिमांडवर ठेवलं होतं. आमचे फोन, आमचे अकाउंट सगळं सगळं सील करून टाकलं होतं. तीन दिवस सतत विचारपूस चालली होती अन् नंतर कित्येक महिने आम्ही तुरुंगात होतो. दोन वर्षं केस चालली. आम्ही खरं तर अगदी निरपराध होतो, पण तुरुंगात खितपत पडावं लागलं. शेवटी एकदाचे आम्ही निरपराध आहोत हे सिद्ध झालं पण आम्हाला इथून लगेच डिपॉर्ट केलं गेलं. ते दिवस कसे काढले, आमचं आम्हाला ठाऊक!

‘‘आजही आठवण आली की घशाला कोरड पडते. जेव्हा मी भारतात, मुंबईला पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मोबाइल नव्हता. कुणाचेही कॉण्टॅक्ट नंबर्स नव्हते. घरी गेलो तेव्हा आई फार सीरियस असल्याचं कळलं. माझा फोन बंद असल्यामुळे घरचे लोक मला कळवूच शकले नव्हते. तिथली परिस्थिती अशी काही विचित्र होती की मी काहीच बोललो नाही. आईने माझ्यासाठी मुलगी बघून ठेवली होती. मरण्यापूर्वी आईला माझं लग्न झालेलं बघायचं होतं. घरीच भटजी बोलावून लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी आई देवाघरी गेली.

‘‘माझी पत्नी फार चांगली निघाली. तिने मला समजून घेतलं. माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे माझं पोलीस रेकॉर्ड खराब झालं होतं. तिच्या वडिलांनी स्वत:चे सोर्सेस वापरून मला पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचं बळ दिलं. खरं सांगतो वैदेही, गेल्या दहा वर्षांत मी सतत तुझी आठवण काढत होतो. पण तुला भेटायला मला जमत नव्हतं. तुझ्या मनातला राग, माझ्याविषयीचा गैरसमज, किल्मिष दूर व्हायला हवं असं फार फार वाटायचं म्हणूनच आज तुझ्याशी सगळं बोललो. तू भेटायला आलीस यात सगळं भरून पावलो. मी तुझा विश्वासघात केला नाही. फक्त दैवाने आपल्याला एकमेकांपासून दूर केलं. एवढंच समजून घे.’’ सौरभने दिलगिरीच्या आवाजात म्हटलं.

वैदेहीने नुसतीच मान डोलावली.

‘‘तू त्या दिवशी मला काय सांगणार होतीस?’’ सौरभने विचारलं…‘‘आज सांगून टाक?’’

‘‘त्या गोष्टीचं आता काहीच महत्त्व नाहीए…चल, आपण कॉफी घेऊयात…’’ मोकळेपणाने हसून वैदेहीने म्हटलं.

सुखाचा सोबती – अंतिम भाग

दीर्घ कथा * सीमा खापरे

पूर्व भाग :

शाळकरी वयातच सुमाची भेट वसंतशी झाली. ती त्याच्या प्रेमात होती. तिला वसंतशी लग्न करायचं होतं. वसंत मात्र सातत्याने तो विषय टाळत होता. शेवटी वसंतच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सुमा व वसंतचं लग्न झालं. सुमाला एक मुलगीही झाली अन् वसंतने आपलं खरं रूप दाखवायला सुरूवात केली. सुमाला जेव्हा समजलं की त्याला आधीच्या लग्नाची बायको व मुलंही आहेत, तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी झाली.

– आता पुढे वाचा…

आकाशपाताळ एक करणं म्हणजे काय याचा प्रत्यय सुमाला वसंतशी लग्न करताना आला होता. लग्न फार म्हणजे फारच साधेपणाने झालं. वसंतकडून कुणी दोघंतिघं अन् हेमाताई, रमण भावोजी अन् विलियम…लग्नसमारंभाचा उत्साह नाही की पाहुण्यांची वर्दळ, चेष्टामस्करी नाही. पण सुमा मात्र खूप आनंदात होती. जे हवं ते मिळवलं होतं तिने. रमण भावोजींनी गावातच तिला एक घर घेऊन दिलं. हेमाताईने घरासाठी लागणारं सगळं सामान आणलं. घर मांडून दिलं. शिवाय बराचसा पैसा तिच्या अकांउटला टाकला होता. वसंत तरीही नाराजच होता. ताई भावोजींसमोर काही बोलला नाही. ते गेल्यावर मात्र त्याने मनातला सगळा राग काढला.

त्याच्या मते तिच्या लोकांचा वसंतवर विश्वास नाही म्हणूनच त्यांनी घर, सामान, वगैरे सर्व सुमाच्या नावे केलं होतं. त्याचं हे रूप बघून ती चकित झाली. हतबद्ध झाली. हेमाताईने त्यांच्या हनीमूनसाठी उटीची तिकिटं अन् हॉटेलचं बुकिंगसुद्धा करून ठेवलं होतं. वसंत संतापून बोलला, ‘‘आता आमचा हनीमूनही तुझ्या बहिणीच्या इच्छेप्रमाणे होणार का?’’

‘‘मग तू ठरव दुसरी कुठली जागा?’’ तिने त्याला प्रेमाने म्हटलं.

‘‘बघूया…’’ वसंतने टाळलंच. हनीमून झाला नाही. लग्नानंतर दोन महिन्यांतच वसंतने धंद्यासाठी हवे आहे म्हणून तिच्या अकाउंटमधून दोन लाख रूपये तिला काढायला लावले. सुमा बघत होती, वसंतला लग्नाविषयी अजिबात आस्था नव्हती. नवी नवरी, तिची नव्हाळी या बाबतीत तो अगदीच रूक्षपणे वावरत होता. बायकोकडे चक्क दुर्लक्षच करत होता. तिला फार एकाकी अन् उदास वाटायचं.

वसंत तोंडाने वाद घालत नव्हता, भांडण करत नव्हता पण त्याचा तो थंडपणा तिला सहन होत नव्हता. ती आतल्या आत मिटून गेली, खंतावत राहिली,

कित्येकदा तो बाहेर जायचा. गेला की अनेक दिवस बाहेरच असायचा. सांगितलेल्या दिवशी कधीच परत येत नसे. ती घाबरून रात्र रात्र जागी राहायची. तो कुठे आहे, काय करतो आहे, तिला काहीच ठाऊक नसायचं. घरात आपण टेलिफोन घेऊयात असं तिने अनेकदा म्हटलं पण ‘‘ठीकाय, बघूयात,’’ म्हणून तो ती गोष्ट टाळायचा.

हेमाताईने तिला दोन मोबाइल फोन घेऊन दिले. एक तिच्यासाठी, दुसरा वसंतसाठी, पण वसंतचा फोन कायम स्विच ऑफ असे नाही तर तो फोन डिस्कनेक्ट करून टाके. हेमाताईशी ती जवळजवळ रोजच बोलायची. पण ‘‘सगळं ठीक आहे,’’ याव्यतिरिक्त काहीही बोलत नसे. काय सांगणार? वसंतच्या कागाळ्या, तक्रारी ती कोणत्या तोंडाने ताईला सांगणार होती?last-part-inside-image

घरात तेल, तांदूळ, डाळ, पीठ, साखर आहे किंवा नाही याच्याशी वसंतला काहीच देणंघेणं नसे. ‘‘घरातलं सामान संपलंय, सामान आणायला हवंय,’’ वगैरे म्हटलं की तो पार गप्प बसायचा किंवा घराबाहेर निघून जायचा. तिला त्याचा हा अलिप्तपणा, कोरडेपणा विलक्षण खटकायचा. शेवटी तीच बँकेतून पैसे काढून आणायची. घरसामान आणायची. घरातल्या इतर काही गरजेच्या गोष्टी आणायची. वसंतबरोबर लग्न करून संसार करण्याची जी स्वप्नं तिने बघितली होती, ती पार धुळीला मिळाली. वसंतच्या प्रेमात ती वेडी झाली होती. आता त्याच्या या कोरड्या वागण्याने एकदम उद्ध्वस्त झाली. पूर्वीचा तो प्रेमळ वसंत कुठे गडप झाला तेच कळत नव्हतं.

रमण भावोजींनी तिला सगळी कॅश रक्कम न देता घर अन् संसाराचं सामान का घेऊन दिलं ते तिला आता लक्षात येत होतं.

लग्नाला आता वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला होता. वसंत गेले वीस दिवस बाहेर होता. घरातली कामं कशीबशी आटोपून ती बाहेरच्या बाल्कनीत येऊन उभी राहिली.

‘‘कशी आहेस, सुमा?’’ तिने आवाजाच्या दिशेने वळून बघितलं. शेजारची निर्मला तिच्या बाल्कनीतून विचारत होती.

‘‘बरी आहे मी,’’ तिने थोडक्यात आटोपायला बघितलं. ‘‘तुम्ही कशा आहात?’’

‘‘एकदम मजेत. वसंत भाऊ परत आले की नाही?’’

सुमा वैतागली. म्हणाली, ‘‘अजून नाही आलेले. दोन एक दिवस लागतील.’’

‘‘अरेच्चा? कालच तर मी त्यांना बिग बाजारमध्ये बघितलं. मी हाकदेखील मारली पण ते बहुधा घाईत होते.’’ निर्मला खोचकपणे म्हणाली.

तिरमिरीसरशी आत येऊन सुमाने वसंतला फोन केला. त्यानं फोन घेतला अन् फोनवरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. तिला एकदम रडायलाच आलं. ती खूप वेळ रडत होती. मग तिने हेमाताईला फोन करून सगळं सांगितलं. इतके दिवस जे तिने लपवून ठेवलं होतं ते सगळं सगळं तिने हेमाताईला सांगितलं. त्याच दिवशी वसंत घरी आला अन् रडतरडत आयुष्य सुरू झालं.

मनाच्या अशा विषण्ण, उदास अवस्थेतच दिवस गेल्याचं सुमाच्या लक्षात आलं. ती आनंदाने मोहरली. तिने खूप आनंदाने ही बातमी वसंतला सांगितली. तर तो संतापून बोलला, ‘‘वेड लागलंय तुला? अगं तुलाच सांभाळताना जीव जातोए माझी, अन् आणखी ही एक जबाबदारी? मला मूल नकोय…अजिबात नकोय.’’

‘‘काय बोलतोस रे?’’ ती खूप दुखावून आश्चर्याने म्हणाली. पुन्हा भांडण…रडणं…ज्या बातमीने घरात आनंद पसरायला हवा त्याने त्या घरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वसंतला मूल नको होतं अन् ती कुठल्याही परिस्थितीत गर्भपाताला तयार नव्हती. एकेक दिवस उगवत होता अन् मावळत होता.

अन् मग वसंतनेही आपला हट्ट सोडला. तो सुमाची काळजी घेऊ लागला. सुमाला आश्चर्य वाटलं हे एकाएकी परिवर्तन कसं? वाळवंटात गुलाब बहरले कसे? कारण त्याच्या निगेटिव्हिटीचीच तिला सवय झाली होती. पण सुखद बदल नेहमीच हवेसे वाटतात. एकूण गरोदरपणाचे नऊ महिने अवघड असूनही चांगले गेले. वसंतने सुमाचेच पैसे वापरून बाळाच्या जन्माआधीच बाळासाठी लागणारं सर्व सामान घरात आणून टाकलं. वसंतचं प्रेम थेंबाथेंबाने पुन्हा तिला मिळत होतं. तेवढ्यावरच ती खूश होती. बाळाच्या येण्याची वाट बघत होती. या बाळामुळेच वसंत बदलला आहे, असं तिला वाटत होतं.

सुमाला मुलगी झाली. वसंतने चांगल्या इस्पितळात बाळंतपणाची व्यवस्था केली होती. बाळाला कुशीत घेताना अत्यानंदाने सुमाला रडू आलं. आई होण्याचा आनंदच अपूर्व होता.

हेमाताई, रमण भावोजींनाही खूप आनंद झाला. बाळासाठी बाळलेणी, सुमा, वसंतसाठी ढीगभर आहेर घेऊन ती दोघं आली होती. थाटात बारसं झालं. वसंतच्या व्यवस्थापनाचं खूप कौतुक झालं. मुलीचं नाव ठेवलं शुभदा, लाडाने तिला शुभी म्हणायचे.

वसंतला पुन्हा धंद्याच्या कामाने शहराबाहेर जायचं होतं. तो शुभीला मांडीवर घेऊन खेळवत होता. सुमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने विचारलं, ‘‘काय विचार करतो आहेस?’’

‘‘सुमा, आपल्या मुलीला मी खूप चांगलं शिक्षण देईन. शहरातल्या सगळ्यात चांगल्या शाळेत तिला घालीन. बघ तू, आपली मुलगी राजकन्येसारखी वाढेल. मला तिच्यासाठी काय काय करायचं आहे. मला हल्ली बाहेर जाण्याचाही कंटाळा येतो. तुम्हां दोघींना सोडून जावंसं वाटत नाही. मी इथेच काम सुरू करीन म्हणतो.’’

सुमाला समजेना. इतका आनंद कुठे ठेवावा. कसा सांभाळावा. तिला फक्त वसंतचं प्रेम अन् त्याने कष्टाने कमवलेला पैसा एवढंच हवं होतं अन् नेमकं तेच तिला मिळत नव्हतं. पण लेकीच्या पायगुणाने वसंत बदलला होता.

इतक्यातच वसंत पुन्हा काळजीत असल्यासारखा वाटत होता. तिने विचारलं तर ‘काही नाही…’ म्हणून टाळायचा. पण एक दिवस मात्र तो हमसाहमशी रडायला लागला. सुमा घाबरली.

‘‘अरे काही तरी बोल ना? काही सांगशील तर ना मला कळेल?’’ तिने म्हटलं.

‘‘माझ्या पार्टनरने मला दगा दिला…फसवलं. मला अंधारात ठेवून त्याने सगळा पैसा आपल्या नावावर करून घेतला. मी पार बुडालो गं…’’ वसंत पुन्हा गदगदून रडू लागला.

तिच्या पायाखालची जमीन हादरली, ‘‘तू…तू… पोलिसात तक्रार दिलीस का?’’ तिने विचारलं.

‘‘ते सगळं केलंय मी…मी त्याला असा सोडणारही नाहीए…मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे. पण त्याला बराच वेळ लागेल. कोर्टात केस करायलाही खूप पैसा लागेल. तोवर आपण जगायचं कसं? नवा काही व्यवसाय सुरू करायला तरी पैसा हवा ना जवळ?’’ तो अगदी बापुडवाणा झाला होता.

‘‘तू शांत हो…आपण बघूया…काहीतरी मार्ग निघेल…’’ तिने म्हटलं. पण ते शब्द अगदी पोकळ होते हे तिलाही कळत होतं.

वसंत खूप धावपळ करत होता. तो सतत काळजीत असायचा. तीही त्यामुळे काळजीत असे. किती तरी दिवसांनी थोडा सुखाचा काळ आयुष्यात आला होता. तोही असा झटक्यात संपला. वसंतला पुन्हा नव्याने धंदा सुरू करायचा होता त्यासाठी त्याला पैसे हवे होते. आता तर सुमाच्या अकाउंटलाही फार पैसे उरले नव्हते. वसंतची चिडचिड सुरू होती. ती त्याला समजावत होती, ‘‘अरे, सगळेच काही लाखो रुपये घालून बिझनेस सुरू करत नाहीत. काही छोटासा धंदा बघ, कमी पैशांतून सुरू करून वाढवता येईल असा व्यवसाय शोध. अन् नाही तर सध्या एखादी नोकरीच बघ. व्यवसायाचं नंतर बघू अन् नाहीतर तुझ्या वडिलांना विचार ना ते आर्थिक मदत करू शकतील का?’’

वसंत एकदम भडकला. ‘‘तुझ्याशी लग्न केलं नसतं तर आईवडील अन् त्यांची प्रॉपटी माझीच होती. पण तुझ्याशी लग्न करून बसलो. आता मी कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे पैसे मागू? अन् पैसे मला एकट्याला थोडीच हवेत? पैसा मिळेल तेव्हाच मुलीला चांगल्या शाळेत घालता येईल ना?’’

‘‘पण मग मी तरी कुठून आणू पैसा? माझे आईवडील तरी कुठे जिवंत आहेत?’’ तीही संतापून बोलली.

‘‘पण आईवडिलांचं घर तर आहे ना? तुझाही वाटा आहेच ना त्यात? तुझ्या बहिणीला सांग, तुझा वाटा तुला देईल ती.’’ वसंतने स्पष्टच सांगितलं.

ऐकून ती अवाक् झाली. पार बधीर झाली. विचार करण्याची शक्तीच नाहीशी झाली तिची. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा ती शून्यावरच येऊन पोहोचली. घरात कायम तणावाचं वातावरण होतं. फक्त आता वसंत घराबाहेर जात नव्हता अन् मुलीला प्रेमाने सांभाळत होता.

एक दिवस तो प्रेमाने तिला म्हणाला, ‘‘हे बघ सुमा, मला समजून घे. अगं, माझ्याकडे पैसे असते तर मी तुझ्याकडे तरी असा दीनवाणा होऊन पैशाची याचना केली असती का? मला पैसा उभा करता आला असता तरी मी तुला एका शब्दाने पैसे मागितले नसते अन् तुझे आईवडील जर त्या घरात असते तरी मी चकार शब्दाने घर विकण्याबद्दल बोललो नसतो. ते घर रिकामं पडून आहे. तू अन् हेमाताईच त्या घराच्या वारसदार आहेत. या क्षणी तुला म्हणजे आपल्याला पैशाची गरज आहे तर ते घर विकून आपण पैसा उभा करू शकतो. मी एक एक पैशाचा हिशेब देईन तुला. अन् जे काही पैसे मी घेतोए ना , ते तुला व्याजासकट परत करीन. मला माझ्या मुलीसाठी माझंही आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. एकदाच फक्त माझ्यावर विश्वास ठेव.’’

आठदहा दिवस ओळीने हेच संवाद तो बोलत होता. शेवटी तिने सगळा धीर गोळा करून कसाबसा हेमाताईकडे विषय काढला. हेमाताई एकदम संतापली.

‘‘अगं, आईबाबांची एकमेव आठवण आहे ती. आपलं माहेर, आपल्या बालपणीच्या अगणित आठवणी रेंगाळताहेत त्या घरात. ते घर विकणार नाही. तुझा तो नालायक वसंत सतत पैसे मागतो अन् तू देतेस, गेल्या दोन अडीच वर्षांत त्याने फक्त मनस्ताप दिलाय तुला. सतत काळजी अन् टेन्शन. सुखाचे दिवस नवऱ्याने द्यायचे असतात बायकोला. हा तर फक्त छळ करतोए तुझा. आधी त्याला मूल नको होतं. आता त्याला मुलीचा पुळका आलाय. तिच्या नावावर पैसे काढायला बघतोए. ते घर घशात घालायचं आहे त्याला. तुला हे सगळं कसं कळत नाहीए? शेवटचा पैसा संपल्यावर भीक मागायची वेळ आली म्हणजे कळणार आहे का? अगं तुला मुलगीच मानतो आम्ही दोघं म्हणून आजवरच्या दिलेल्या पैशांचा कधी हिशोब मागितला नाही अन् मागणारही नाही. त्या घरात तुझा वाटा आहेच पण बाहेरच्या कुणा उपटसुंभाला मी तो मिळू देणार नाही…’’ बोलता बोलता हेमाताई रडायलाच लागली.

तिला त्यावेळी कळलं ती किती खुजी आहे. हेमाताईचं तिच्यावर किती प्रेम आहे. सदैव त्या प्रेमापोटी ती सुमाला सांभाळून घेते. पण वेडी सुमा… तिला ताईच्या प्रेमाची मातब्बरी नाहीए. अजूनही तिचा वसंतच्या प्रेमावर विश्वास आहे. खरंच, प्रेम आंधळं असतं.

तिला रडू अनावर झालं. किती तरी वेळ रमण भावोजी अन् हेमाताई तिची समजूत घालत होती. वसंत लफंगा आहे. तुझ्यासारखी भाबडी अन् बापाचा पैसा असलेली सुंदर पोरगी त्याने प्रेमाचं नाटक करून ताब्यात घेतली आहे. गेल्या अडीच तीन वर्षांत त्याने एक पैदेखील कमवली नाहीए. आतासुद्धा पार्टनरने लुबाडलं ही चक्क थाप आहे. मुलीच्या नावाचा वापर करून त्याला सुमाचा उरलेला पैसाही लुबाडायचा आहे.

तरीही सुमाला वाटत होतं की यावेळी ती पैसे वसंतच्या हातात सोपवणार नाही. पण वसंतने काही तरी करणं गरजेचं होतं. घरखर्च कसा चालणार? बँकेत जेमतेम वर्षभर घरखर्च चालेल एवढाच पैसा होता. काहीही करून एकदा वसंतने व्यवसाय सुरू करावा. पैसा मिळवावा, विस्कटलेली संसाराची घडी नीट बसावी एवढीच तिची माफक अपेक्षा होती. त्यासाठीच तिला पैशांची नितांत गरज होती.

रमण भावोजी अन् हेमाताईला समजत होतं की सुमाचं वय अन् समजूत (म्हणजे अक्कल) वसंतची लबाडी लक्षात येईल एवढी नाहीए. ती भाबडी पोर आपला विस्कटलेला संसार पुन्हा सुरळित व्हावा या आशेने हे सगळं करते आहे. रमण भावोजींनी खरं तर आतापर्यंत हेमाच्या वाटणीच्या पैशांपैकीही कितीतरी रक्कम सुमालाच दिली होती. ते स्वत: चांगलं कमवत होते त्यामुळे हेमाला माहेरच्या पैशांची तशी गरज नव्हती. पण वडिलांचा आशीर्वाद व त्यांच्याकडून वारसा म्हणून मिळणारा पैसा शेवटी दोघी बहिणींचा होता. रमण भावोजींनी शेवटी घर विकलं अन् अर्धा पैसा सुमासाठी वेगळा काढला. त्यातील निम्माच त्यांनी सुमाच्या नावावर केला अन् निम्मा शुभीच्या नावाने फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला. काहीही करून त्या हलकट वसंतच्या हाती सगळा पैसा पडू नये म्हणून ती दोघं जपत होती.

पण वसंतच्या हुशारीमुळे त्यांची खटपट निरर्थक ठरली. काही महिन्यांतच वसंतने सगळा पैसा उडवला अन् पुन्हा तीच रडकथा सुरू झाली. आता तर तो दोन दोन महिने घराबाहेर असायचा.

शेवटी घर अन् मुलीची जबाबदारी अंगावर घेऊन ती पुन्हा एकटी उभी होती. दोघांचं नातं अत्यंत कडवट अन् विखारी होतं. काही तरी चुकतंय हे आता तिला जाणवत होतं. मुलीला शाळेत घालताना तिने फक्त स्वत:चं नाव लावलं होतं. फार फार त्रास तिला सोसावा लागला होता. तिचं सगळं अवसान आता संपलं होतं, अगतिकपणे ती रमण भावोजींना म्हणाली होती, ‘‘मला यातून मुक्त करा. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे.’’

रमणने पोलिसात तक्रार केली. स्वत:चे सोर्सेस वापरून वसंतची माहिती मिळवली होती. खरी परिस्थिती कळली तेव्हा सुमा महिनाभर अंथरुणाला खिळून होती.

वसंतची आधी दोन लग्नं झालेली होती. पहिली बायको वारली…नेमकं काय झालं ते कुणालाच ठाऊक नव्हतं. तिचा खून झाल्याची कुजबुज होती. दुसऱ्या पत्नीला तिच्या दोन मुलांसह वसंतचे आईवडील सांभाळत होते. वसंत अक्षरश: मवाली अन् उनाड होता.

आता वसंतशी असलेल्या नात्याला अर्थच नव्हता. हेमाताईने सुमा व शुभीला आपल्या घरी आणलं. ते घर आवरून, कुलूप घालून बंद केलं. सुमाला सावरायला वेळ लागेल हे त्यांना कळत होतं. शेवटी एकदाचा तिचा घटस्फोट मंजूर झाला. त्या कागदपत्रांवर सही करताना सुमाला वाटत होतं या क्षणी आपलं आयुष्य संपवावं. प्रेमाचा मृत्यू म्हणजे माणसाचाही मृत्यूच ना? ओक्साबोक्शी रडली ती त्या दिवशी.

वर्षंभर हेमा अन् रमणने तिला खूप मायेने, प्रेमाने सांभाळलं. हेमाची इच्छा होती तिने इथेच राहावं पण सुमाला तिथे नको वाटत होतं. आधीच्या कॉलेजच्या गावी जाऊन स्वत:च्या घरी रहावं तेही तिला झेपणारं नव्हतं.

एक दिवस अचानक विलियमने हेमाकडे फोन केला अन् सुमाची विचारपूस केली. सगळी परिस्थिती नीट समजून घेतली. सुमाला इथे नोकरी मिळू शकते. तिने इथे येऊन राहावं, असं सांगितलं.

रमणनेच पुन्हा पुढाकार घेतला. आधीचं लग्नात घेऊन दिलेलं घर विकलं. विलियमच्या शेजारी एक छोटासा फ्लॅट घेऊन दिला. हेमाताईने तिचं घर मांडून दिलं अन् तिचं नवं आयुष्य सुरू झालं.

मेजर आनंदकडे नोकरी करताना तिचं दु:ख, वैफल्य ती विसरली. हळूहळू ती कामं शिकली. स्टोअर सांभाळणं, इन्स्टिट्यूटची कामं, ट्रेड फेयरची व्यवस्था एक ना दोन कामं सतत असायची. तिला मेजर आनंदविषयी अनामिक ओढ वाटत होती.

चंपानेरला त्यांनी एक मोठा मेळा भरवला होता. स्थानिक शेतकरी अन् कलाकारांच्या मालाला सरळ ग्राहक भेटत होता. त्यामुळे हा वर्ग खूष होता. ऑफिस स्टाफचे काही लोक तिथेच रात्रंदिवस राहिले होते. शुभीमुळे ती मात्र सकाळी उठून जाऊन सायंकाळी परत येत होती.

मेळ्याला उत्तम प्रतिसाद होता. सगळं छान सुरळित सुरू असताना एक दिवस अचानकच वादळ व पावसाला सुरुवात झाली. सुमाला शुभीची काळजी वाटली. तिने शुभीला कधीच रात्री एकटं ठेवलं नव्हतं. तिची घालमेल मेजर आनंदच्या लक्षात आली. ते स्वत: गाडी काढून तिला पोहोचवयाला निघाले.

वाटेत गाडी बिघडली. सुमा घाबरली. तिच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. मेजरने खाली उतरून बॉनेट उघडलं पण फॉल्ट लक्षात येईना. ते पुन्हा गाडीत बसले अन् फोन करू लागले. तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेतला. आश्चर्याने ते तिच्याकडे बघू लागले.

‘‘तुम्ही कुणालाही फोन करायचा नाही,’’ ती चिडून ओरडली.

‘‘पण का? मेकॅनिकला फोन करावाच लागेल. गाडी नीट झाली नाही तर आपण जाणार कसे? काय झालंय तुम्हाला?’’ आश्चर्याने त्यांनी विचारलं.

‘‘मी आधी फोन करणार.’’ तिने विलियमला फोन लावला. मेजर गाडीतून उतरून एका झाडाला टेकून उभे राहिले. दोन्ही हात पॅण्टच्या खिशात होते अन् ते सुमाकडे आश्चर्याने बघत होते.

पाऊस पडतोय, रस्त्यावर सामसूम, संध्याकाळ दाटून आलेली. सुमाच्या मनात एक अनामिक भीती अन् तिचं लक्ष मेजरकडे गेलं. ते पावसात भिजत अजूनही झाडाला टेकून उभे होते. सुमाला स्वत:चीच लाज वाटली. इतक्या चांगल्या माणसाविषयी आपण चुकीचा विचार केलाच कसा याचं वैषम्यही वाटलं.

गाडीचं दार उघडून ती बाहेर आली अन् गारठ्याने शहारली.

‘‘सर, आत या,’’ तिने म्हटलं.

‘‘का?’’ त्यांनी हसत विचारलं.

‘‘तुम्हीही भिजलात अन् मीही भिजतेय…या ना,’’ तिन वैतागून म्हटलं.

ते गाडीत येऊन बसले. ‘‘आता माझी भीती नाही ना वाटत?’’ त्यांनी हसून विचारलं अन् फोन लावला. फोन लागला. ते काही बोलले. पलीकडून जे काही सांगितलं गेलं ते ऐकून ते वैतागले. ‘‘ओह, नो,’’ ते म्हणाले.

‘‘काय झालं?’’ सुमाने विचारलं.

‘‘दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. आता सर्व रात्र गाडीतच काढावी लागेल.’’

‘‘बाप रे!’’ तिच्या घशाला कोरड पडली. हातपाय गार झाले होते. आता अशा ओल्या कपड्यात रात्र काढायची?

मेजर आनंदनं कॅम्पमध्ये फोन केला. तिथल्या कार्यकर्त्यांने म्हटलं, ‘‘इथेही खूप पाऊस पडतोए, इथून माणूस पाठवता येणार नाही.’’

‘‘आता काय करायचं?’’ तिने घाबरून विचारलं.

‘‘आता शांत डोक्याने इथेच बसून नामस्मरण करायचं. वाट बघण्याखेरीज काही करता येणार नाही. अरे तुम्ही खूप भिजला आहात. एक काम करा, व्हॅनच्या मागच्या सीटवर बॅगेत काही कपडे आहेत. तुम्ही कपडे बदलून घ्या. माझ्या बॅगेत टॉवेल, थर्मासमध्ये चहा अन् थोडी बिस्किटं आहेत. तुम्ही कपडे बदला मग चहा घ्या. थोडं बरं वाटेल.’’ बॅगेतून धुतलेला टॉवेल तिला देऊन मेजर गाडीतून उतरून झाडाखाली जाऊन उभे राहिले.

मेळ्यातल्या स्टॉलवर विकण्यासाठी तयार केलेले ते कपडे होते. गावातल्या बायका घालतात तसा घाघरा कुरता होता. तिने त्यातला तिच्या मापाचा पोषाख निवडला. गाडीतला दिवा मालवून कपडे बदलले. केस कोरडे केले. ओढणी अंगावर घट्ट लपेटून घेतली. खूप बरं वाटलं. मनोमन तिने मेजरला धन्यवाद दिले.

मेजरना तिने गाडीत बोलावलं. ते स्वत: खूप भिजले होते. पण आर्मीच्या कठोर शिस्तीमुळे त्यांना त्याचा त्रास वाटत नव्हता. त्यांनी तिला चहा दिला. चहा, बिस्किटं घेतल्यावर तिला खूपच छान वाटायला लागलं. मेजरने मागची सीट अॅडजस्ट करून तिच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली. कृतज्ञ नजरेने त्यांच्याकडे बघत तिने प्रश्न केला, ‘‘तुमचं काय?’’

‘‘मी जागा राहीन… मला सवय आहे…तुम्ही शांतपणे झोपा.’’

पाऊस थांबून पडत होता. तिला खरोखर गाढ झोप लागली. सकाळी सहाला मेजरने तिला हलवून उठवलं. रात्रभर त्यांनी केलेल्या फोनमुळे शेवटी एक मेकॅनिक आपल्या सहकाऱ्याबरोबर मोटारसायकलने येऊन धडकला होता.

‘‘चल. तुला आधी घरी सोडतो. आता हा गाडी घेऊन येईल.’’ मेजरने प्रथमच तिला एकेरी हाक मारली होती.

ती घाघरा ओढणी सांभाळून मोटारसायकलवर त्यांच्या मागे बसली.

‘‘सर, आतल्या कच्च्या रस्त्याने जा. मोठ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे टॅफिक जाम आहे,’’ मेकॅनिक म्हणाला. रस्ता खराब होता. ती मेजरना घट्ट धरून बसली होती. या क्षणी तिच्या मनात भीती नव्हती. खूप सुरक्षित वाटत होतं.

बाइक घरासमोर थांबली, ‘‘सर, या ना, चहा घेऊन जा,’’ तिने म्हटलं.

ते फक्त हसले अन् बाइक वळवून निघून गेले. ती वळून घरात आली तेव्हा समोर विलियम उभी होती. तिला अशा पोशाखात बघून ती चकित झाली होती. पण सुमाचं हे रूप तिला आवडलं होतं.

चहा घेताघेता तिने सगळी हकिगत विलियमला सांगितली. तिने कपडे बदलले अन् अंथरुणावर अंग टाकलं. तिला ताप भरून होता.

तिकडे मेजर आनंदही तापाने फणफणले होते. सुमाने यमुनाला फोन करून ती आजारी असल्याचं सांगितलं. यमुनाने खट्याळपणे हसत म्हटलं, ‘‘मेजरही तापाने…तूही तापाने…दोघं एकाच वेळी…त्यातून सारी रात्र एकत्र…काय गं? काय चाललंय?’’

तीही मुक्तपणे हसली. तिला का कोण जाणे पण खूप आनंदी अन् मोकळं मोकळं वाटत होतं. किती तरी वर्षांनी ती अशी मोकळा श्वास घेत होती. तिला वाटलं मेजर आनंदची विचारपूस केली पाहिजे. तिच्यामुळेच ते भिजले होते. तिने त्यांच्यावर संशय घेतला होता. ते तर तिची मदत करत होते. काय गरज होती त्यांना गाडी काढून तिला पोहोचवायची?

तिने फोन केला, ‘‘हॅलो सर, मी सुमा.’’

‘‘बोला, कशा आहात?’’

‘‘मी बरी आहे. तुम्ही कसे आहात?’’

‘‘बराय मी, शुभी कशी आहे? प्रथमच एकटी राहिली ना?’’ तिला नवल वाटलं. तिच्या मुलीचं नाव त्यांना ठाऊक होतं. तिची चौकशी ते करत होते. जन्मदाता बाप तिला विचारत नव्हता. तिला खूप समाधान वाटलं.

तिने हेमाताईला फोन केला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागली. मेजर आनंदविषयी तिच्या मनात आता अपार आदर होता. स्वत:चं दु:ख विसरून इतरांना आनंद देत होते ते. किती माणसं जोडली होती त्यांनी. केवढी मोठी टीम त्यांच्यासाठी राबत होती. पावसाने विस्कळीत झालेला मेळा, त्यातले स्टॉल्स पुन्हा तेवढ्याच उत्साहाने उभारले होते. मेळा यशस्वी झाला होता. सगळेच खूश होते.

सकाळी सुमा झोपून उठली तेव्हा समोर हेमाताईला बधून चकित झाली. ‘‘तू कशी आलीस?’’

‘‘तुला भेटायला आले…तू एक गोष्ट मला सांगितली नाहीस…’’

‘‘काय?’’

‘‘मेजर आनंद…’’

ती गप्प झाली. तिला प्रेमाने जवळ घेत हेमा म्हणाली, ‘‘एक चांगली संधी तुला मिळाली आहे. ती सोडू नकोस.’’ तिच्या समोरच हेमाताईने मेजर आनंदला फोन करून जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं.

मेजर आनंद आले. सहजपणे शुभी अन् हेमाताईला भेटले. त्यांची अदबशीर वागणूक पाहून हेमाताई खूपच प्रभावित झाली. शुभीशीही ते छान बोलले. तिने त्यांना स्वत: काढलेली चित्रं दाखवली.

गप्पा मारत जेवणं झाली. विलियमही जेवायला होती. निरोप घेताना सर्वांच्या समोरच मेजरने तिला विचारलं, ‘‘माझ्याबरोबर माद्ब्राझी जीवनसंगिनी म्हणून राहायला तुला आवडेल?’’

सुमा गप्प होती. तिला शुभीबद्दल काही बोलायचं होतं. मेजरने शुभीला जवळ घेतलं. ‘‘हिला मी माझी मुलगी मानली आहे अन् बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर माझा विश्वास आहे,’’ ते म्हणाले. हेमाताई अन् विलियमने तिच्या वतीने होकार दिला. ताबडतोब हेमाताईने रमणला फोन लावून लगेच यायला सांगितलं.

रमणने आपल्या परीने सगळी विचारपूस केली अन् लग्नाचा दिवसही नक्की केला.

साध्या पद्धतीने, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.

हेमाताईने तिला नववधूसारखी नटवून रात्री मेजरच्या खोलीत पाठवून दिली. किती तरी वर्षांनी आज तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मेजर खोलीत आले. त्यांनी तिचा हात हलकेच हातात घेतला अन् हलकेच तिच्या गालावर चुंबन घेत म्हटलं, ‘‘आयुष्यभर एकमेकांचे उत्तम मित्र म्हणून राहू. सहयोगी अन् जीवनसाथी म्हणून प्रेम करू. मग एक सांग, तुला माझी भीती नाही ना वाटत?’’

ती लाजली अन् तिने त्यांना मिठी मारली. त्यांनीही तिला मिठीत घेतलं. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी तिची अवस्था झाली होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें