मिश्किली * दीपा पांडे

‘‘अरे मित्रा, तोंड पाडून का बसला आहेस? जा, मजा कर. तुझी प्रियतमा लवकरच तुझी जीवनसाथी होणार आहे. बघ, किती छान नशीब आहे तुझे,’’ रमेश जेव्हा मूडमध्ये असायचा तेव्हा लखनवी अंदाजात बोलायचा.

विजय उदास होऊन म्हणाला, ‘‘अजून तुझे लग्न ठरलेले नाही. म्हणूनच तू माझे दु:ख समजू शकत नाहीस.’’

‘‘म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला? मला खरेच काही समजले नाही. मी तर असेच ऐकले होते की, प्रेम विवाह फिक्स करताना तोंडचे पाणी पळते. पण तुझा तर महिनाभरानंतर साखरपुडा आणि पुढच्या ६ महिन्यांत लग्न आहे…’’

तेवढयात विजयच्या मोबाईलवर मेसेज आला, ‘‘फ्री आहेस का?’’ विजय आपले बोलणे अर्धवट थांबवत उठून उभा राहिला.

विजय आणि रश्मी कॉलेजपासून एकमेकांना पसंत करीत होते. हे सर्व बीटेकच्या पहिल्या वर्षांपासूनच मित्रमैत्रिणींच्या लक्षात आले होते. त्या दोघांनीही हे लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. विजय ब्राह्मण, तर रश्मी वैश्य कुटुंबातील होती. फेअरवेल पार्टीच्या दिवशी मित्रमैत्रिणींनी गंमत म्हणून त्यांचे खोटे लग्नही लावून दिले होते.

विजयने सर्वात आधी रश्मीची पोस्ट आणि तिच्या पगाराबाबत आपल्या घरच्यांना सांगितले. त्यानंतर तिची जात सांगितली. त्याची ही युक्ती कामाला आली. रश्मीचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता.

विजयचे वडील म्हणाले, ‘‘सध्या जातीपातीहूनही मोठी महागाई झाली आहे. हे चांगले आहे की, रश्मीचा पगार तसा बऱ्यापैकी आहे. बंगळुरुसारख्या महागडया शहरात तुम्हाला चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करता यावा यासाठी दोघांनी मिळून कमाविणे खूपच गरजेचे आहे. पण, तुझा प्रेम विवाह आहे. त्यामुळे आम्ही हुंडा मागू शकत नाही. म्हणूनच आम्ही विचारपूर्वक असा निर्णय घेतला आहे की, तुम्ही दोघांनी स्वत:च्या लग्नाचा खर्च स्वत:च करावा.’’

तिकडे रश्मीच्या आईनेही फोनवरून लगेचच निर्णय देऊन टाकला की, ‘‘जातीपातीबाहेर तुझे लग्न लावून देऊ, पण तुझ्या छोटया बहिणींच्या लग्नात हेच लोक जास्त हुंडा मागतील. म्हणूनच तू तुझ्या लग्नाचा खर्च स्वत: कर… ३-४ वर्षांची सेव्हिंग तुझ्याकडेच आहे. आम्ही तुझ्याकडून कधीच काही घेतले नाही.’’

त्यानंतर फोन ठेवून रश्मीच्या वडिलांना सांगितले की, ‘‘हुंडा द्यायचा असेल तर मग लव मॅरेजचा फायदा काय… मी स्पष्टपणे नकार दिला आहे… आपल्या मर्जीने लग्न करायचे असेल तर स्वत: खर्च कर. सुशिक्षित, कमावत्या मुलीला आपल्या जातीपातीच्या बाहेर देत आहोत… सर्व टोमणे तर आपल्यालाच ऐकावे लागणार. शिवाय आपलीच तिजोरी रिकामी करायची, हे नाही जमणार.’’

दोन्ही कुटुंब लग्नाचा खर्च करायला तयार नव्हते. विजय आणि रश्मी स्वत:च्या कामातून थोडासा वेळ काढून लग्नाच्या खर्चाचे नियोजन करू लागले होते. विजय कॉफीच्या मशीनमधून २ कप कॉफी घेऊन मागे वळला. तिथे रश्मी उभी होती.

‘‘साखरपुडयाचे ठिकाण ठरवलेस का?’’ कॉफीचा कप हातात घेत रश्मीने विचारले.

‘‘लखनऊमधील सर्वच हॉटेल्स खूपच महागडी आहेत. त्यातल्या त्यात ७०० ते १००० रुपयांपर्यंत जेवणाचे ताट असलेली थोडी बरी हॉटेल्स आहेत. पण वरून डीजे आणि सजावटीचा खर्च… म्हणजे आणखी १५ ते २० हजार गृहीत धर,’’ विजयने सांगितले.

‘‘दोन्हीकडचे पाहुणे मिळून शंभर, सव्वाशे होतील,’’ रश्मी विचार करीत म्हणाली.

‘‘आमच्या पाहुण्यांना तर टिळक लावून लग्नाची मिठाईही द्यावी लागेल,’’ असे विजयने सांगताच रश्मीने तोंड वाकडे केले, ते पाहून विजयला हसू आले.

‘‘आपल्या दोघांचे कपडे? तेही खरेदी करावे लागतील,’’ रश्मी म्हणाली.

‘‘काय घालणार? लेहंगा, गाऊन की साडी?’’ विजयने विचारले. ‘‘मलाही त्यानुसारच कपडे शिवावे लागतील.’’

‘‘असे करते की, एखादा इंडो-वेस्टर्न ड्रेस खरेदी करते आणि तू सूट घाल… नंतर इतरांच्या लग्नातही घालता येईल,’’ रश्मीने सांगितले.

विजय चिडला, ‘‘सर्व बचत माझ्या कपडयांमध्येच का? तुझा इंडो-वेस्टर्न ड्रेस कधी कामाला येणार? त्यापेक्षा असे कर, तू साडी नेस. तिचा ट्रेंड वर्षानुवर्षवर्षे असतो.’’

हे ऐकून रश्मीने तिचा कप ट्रेमध्ये ठेवला आणि मागे वळून न बघताच निघून गेली. विजयही आपल्या जागेवर जाऊन बसला.

२ दिवस दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. पुढाकार विजयलाच घ्यावा लागला. शनिवारी सकाळी बराच विचार करून त्याने फोन लावला, ‘‘हॅलो रश्मी, आज शॉपिंगला जाऊया का?’’

‘‘कसली शॉपिंग?’’

‘‘अगं, अजून नाराज आहेस का? मला माफ कर, लग्नात तुला जे हवे ते घाल.’’

‘‘सांगतो तर असे आहेस जसे की, पैशांचा पाऊसच पडणार आहे… मी माझ्या काही मैत्रिणींना विचारले तर, कुणाचा १५ हजारांचा ड्रेस होता तर कोणाचा ५० हजारांचा. ड्रेससोबत इतर खर्च धरला तर साखरपुडयाचाच खर्च ४ लाखांपेक्षा कमी होणार नाही.’’

‘‘खरे आहे… सोनेही प्रती तोळा ४० हजारांच्या आसपास गेले आहे… अंगठीही खूप महाग झाली आहे,’’ विजय हताश होऊन म्हणाला.

‘‘मी स्वप्न पाहिले होते की, साखरपुडयाला मी प्लॅटिनमची हिरेजडित कपल रिंग घईन… एक महागडा इंडो-वेस्टर्न ड्रेस घालेन, पण नशीबच वाईट आहे. मेकअप, फोटोग्राफरचा खर्च विचारलास का?’’

‘‘याचा तर मी विचारच केला नव्हता.’’

‘‘२ दिवसांपासून झोपला होतास का? मी सर्व माहिती काढली आहे. महागडे जाऊ दे पण, स्वस्तात स्वस्त फोटोग्राफरही ५० हजारांपेक्षा कमी घेत नाहीत. मेकअपवाली ब्रायडलसाठी २० हजार आणि साखरपुडयाच्या दिवसासाठी १० हजार मागत आहे.’’

‘‘काय?’’ एखाद्या विंचवाने नांगी मारावी तसे काहीसे ओरडतच विजयने विचारले, ‘‘बरं झालं तू आठवण करून दिलीस. बँडबाजाचाही खर्च करावा लागेल ना?’’

‘‘त्याचीही माहिती घेतली आहे. आतषबाजी आणि घोडा नसेल तर १८ हजार लागतील.’’ रश्मीने सांगितले.

‘‘मग तर तू संपूर्ण बजेट काढले असशील. ग्रेट रश्मी,’’ विजय कौतुकाने म्हणाला.

‘‘हो, आपण आपल्या बजेटनुसार साखरपुडा किंवा लग्न यापैकी काहीतरी एकच धुमधडाक्यात करू शकतो.’’

असे करूया, सध्या साखरपुडा उरकून घेऊ. त्यानंतर सोबतच राहू, म्हणजे जेवण, घरभाडे अशी बरीच बचत होईल. जेव्हा १०-१२ लाख जमतील तेव्हा लग्न करू.’’

‘‘अरे वा, काय प्लॅनिंग आहे,’’ रश्मी उपरोधिकपणे म्हणाली. ‘‘जरा तुझ्या कट्टरपंथी आईवडिलांना याबाबत विचारून मग मला सांग.’’

‘‘तर मग तूच सांग, काय करूया? आपल्या दोघांचे मिळूनही ११ लाखांपेक्षा जास्त पैसे नाही,’’ विजय उदासपणे म्हणाला.

‘‘साखरपुडा नकोच, पुढच्या महिन्यात सरळ लग्न करूया… सोबत राहिलो तर थोडी फार बचत होईल… मी हनिमूनला परदेशात जाण्यासाठी काही पैसे बाजूला काढून ठेवले होते… हनिमून तर दूरची गोष्ट, इथे लग्नाचा खर्च करणेही अवघड जात आहे.’’

‘‘मी तर एका आलिशान गाडीचे स्वप्न पाहिले होते… ठरविले होते की, लग्नानंतर तुला सरप्राईज देईन… बँकेतून थोडे कर्ज घेईन… आता सर्वच स्वप्नांचा चुराडा झाला.’’

‘‘असे कर, तू मला २ वाजता शॉपिंग मॉलमध्ये भेट. काहीतरी प्लॅन करूया,’’ रश्मीने असे सांगताच विजयने होकार दिला.

शॉपिंग मॉलमध्ये त्यांना रमेश भेटला. तिघेही फूड कोर्टमध्ये जाऊन बसले. दोघांना शांतपणे बसलेले पाहून त्यांची मस्करी करीत रमेश म्हणाला, ‘‘अरे मित्रांनो, तुमच्या जीवनात असे काय घडले आहे, म्हणून दु:खात आहात?’’

‘‘अरे, आमचे कुटुंबीय लग्नासाठी तर तयार आहेत, पण खर्च करण्यासाठी तयार नाहीत. आमची इतकीही बचत नाही की, धुमधडाक्यात लग्न करता येईल.’’

विजयचे बोलणे ऐकल्यावर रमेश काहीसा विचार करीत म्हणाला, ‘‘खरेच आहे, कांदे १२० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलो आहे. तरी बरे की, तुमच्या लग्नात नॉनव्हेज नसेल नाहीतर काहीच खरे नव्हते. खर्च वाढला असता… तू तुझ्या घरातून रश्मीच्या घरापर्यंत वरात घेऊन जा… हॉटेलचा विचारच करू नकोस. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न पौर्णिमा किंवा एकादशीला कर.’’

‘‘असे का?’’ दोघांनी एकत्र विचारले.

‘‘अरे, या दिवशी लसूण, कांद्याशिवायचे जेवण बनवता येईल. तुमची ८-१० हजारांची बचत होईल. लोकही खुश होतील की, आमचा उपवास लक्षात घेऊन जेवण बनविले.’’

‘‘ठीक आहे, पण हॉटेल, जेवणाव्यतिरिक्त इतर अनेक खर्च आहेत, त्याचे काय?’’ रश्मीने विचारले.

‘‘लग्नाचे दागिने आणि कपडे भाडयाने घ्या. फक्त मेकअप आणि फोटोग्राफर जर बरा असायला हवा… नंतर फक्त फोटोच तर राहतात.

विजय बराच वेळ विचार करीत असल्याचे पाहून रमेश म्हणाला, ‘‘आता काय झाले? तुझी चिंता तर मिटली ना?’’

‘‘सर्व पैसे लग्नातच खर्च होऊन जातील… आमच्या नवीन संसारासाठीचे सामान कुठून येणार? नवीन घराचे भाडे, करार, असे कितीतरी खर्च कसे करणार?’’ विजयने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘तर मग असे करा, कोर्टात लग्न करा आणि वाचलेल्या पैशांतून नव्या संसाराची सुरुवात करा,’’ रमेशने उपाय सुचवला.

‘‘पण मग माझ्या स्वप्नांचे काय? मेहंदी, साखरपुडा, लग्नातील विधी, मौजमजेचे काय?’’ रश्मीने नाराजीच्या स्वरात विचारले.

विजय त्रासून म्हणाला, ‘‘आता काय करायचे ते तूच सांग? मारून टाकले आपल्याला या महागाईने…?

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...