कथा * कैहकशां सिद्दीकी

वकील साहेबांचे हसतेखेळते घर होते. त्यांची पत्नी एक साधीभोळी गृहिणी होती. वकील साहेब काहीसे बाहेरख्याली आहेत हे तिला माहिती होते, पण एक दिवस सवत घेऊन येतील असे तिला वाटले नव्हते. त्या दिवशी ती खूप रडली.

वकील साहेबांनी समजावले. ‘‘बेगम, तू तर घरातली राणी आहेस. या बिचारीला एखादी खोली दे. निमूटपणे पडून राहील. तुला घरकामात मदत करेल.’’

ती रडत राहिली. ‘‘मी असताना तुम्ही दुसरे लग्न का केले?’’

वकील साहेब बोलण्यात कोणालाही ऐकणारे नव्हते. समजूत काढत म्हणाले, ‘‘बेगम, माफ कर. चूक झाली. आता तू सांगशील तसेच होईल. फक्त हिला घरात राहू दे.’’

बेगमला वाटत होते, मुलांना घेऊन माहेरी निघून जावे. पुन्हा वकील साहेबांचे तोंड पाहू नये. पण माहेरी जायचे तर कोणाच्या आधारावर? वडील नाहीत. आई आधीच भावंडांवर ओझे बनून राहत आहे. तिने कधी विचारही केला नव्हता की, लग्नाच्या १४ वर्षांनंतर ४०व्या वर्षी वकील साहेब असे गुण उधळतील. एवढया वर्षांचा संसार उद्धवस्त झाला.

वकील साहेबांनी खाली, आपल्या कार्यालयाच्या शेजारच्या खोलीत दुसऱ्या पत्नीचे सामान ठेवले. त्यांनतर वरती आपल्या पहिल्या पत्नीकडे आले, जसे की काही घडलेच नाही. पहिल्या पत्नीचे मन दुखावले गेले. कष्टाने पैसे जमवून घर बांधले होते. संसार दुसरीसोबत वाटून घ्यावा लागेल असा विचारही मोठया बेगमने केला नव्हता.

दिवस सरले. आठवडे निघून गेले. मोठी बेगम बरीच रडारड करून अखेर शांत झाली. सुरुवातीला वकील साहेब एक दिवस वरती आणि एक दिवस खाली जेवत असत. नंतर हळूहळू त्यांचे वर येणे बंद झाले. नवीन पत्नीमध्ये ते एवढे गुंतले की, त्यांचे वकिलीतले लक्षही उडाले. उत्पन्न कमी झाले आणि कुटुंब मात्र वाढू लागले. छोटी बेगम दरवर्षी एका मुलाला जन्म देऊ लागली. परिणामी ते मोठया बेगमला कमी पैसे देऊ लागले.

मोठया बेगमने परिस्थितीला सामोरे जायचे ठरविले होते. शिक्षणाच्या जोरावर ती गल्लीतीलच एका शाळेत शिकवू लागली. मुलांच्या लहानमोठया गरजा पूर्ण करू लागली. संध्याकाळी ती घरी शिकवणी घेत असे. या पैशांतून स्वत:च्या मुलांच्या शिकवणीचा खर्च भागवत असे. आपला मुलगा, मुलीला भरपूर शिकवून स्वत:च्या पायावर उभे करायचे, एवढेच तिचे ध्येय होते. मुलांचे चांगले पालनपोषण व्हावे केवळ म्हणूनच पती आणि सवतीसोबत राहण्याचा निर्णय तिने घेतला होता. मुलांना आई-वडील दोघांचीही गरज असते, याची तिला जाणीव होती.

आता संपूर्ण घरावर छोटया बेगमचे राज्य होते. मोठी बेगम आणि मुले एका खोलीत राहत होती, जिथे कधीतरीच काही विशेष कारणासाठी आणि तेही बोलावल्यानंतरच वकील साहेब येत असत.

अशा प्रकारे दिवस चालले होते. त्यानंतर एके दिवशी आपल्या ५ मुली आणि छोटया बेगमला सोडून वकील साहेबांनी जगाचा निरोप घेतला. छोटया बेगमने कसेबसे मुलींचे लग्न लावून दिले. घरही विकले.

मोठया बेगमची मुलगी सनोबर एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली होती. ती दिसायला सुंदर होती, पण लग्नाचा विषय काढताच रागवायची. तिने आपल्या आईचे दु:ख पाहिले होते, म्हणूनच तिला लग्न करायचे नव्हते. मोठया बेगमने बरीच समजूत काढल्यानंतर ती लग्नाला तयार झाली. साहिल चांगला मुलगा होता. त्यांच्या नात्यातलाच होता.

सनोबर लग्नासाठी तयार झाली, पण आपल्या अटी तिने निकाहनाम्यात ठेवायला सांगितल्या.

साहिल म्हणाला, ‘‘मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत.’’

सनोबरने स्पष्टपणे सांगितले, ‘‘केवळ तोंडी बोलून चालणार नाही. मी असताना तू दुसरे लग्न करणार नाहीस आणि जर आपण वेगळे झालोच तरी मुले माझ्यासोबत राहतील, असे निकाहनाम्यात लिहावे लागेल.’’

सनोबरला साहिल लहानपणापासून ओळखत होता. तिला वाटणारी भीती तो समजू शकत होता. म्हणाला, ‘‘सनोबर, निकाहनाम्यात हे तसेच तू आणखी जे काही म्हणशील ते सर्व लिहूयात. आतातरी माझ्याशी लग्न करशील का?’’

सनोबरने होकार दिला. त्यांचे लग्न झाले. दोघांची चांगली नोकरी, चांगले घर, एक गोंडस मुलगीही होती. एकंदरच सनोबरचा संसार सुखात सुरू होता. लग्नाला १२ वर्षे कधी झाली हे समजलेदेखील नाही.

सनोबरला बढती मिळणार होती. त्यामुळे ती कार्यालयातील कामावर जास्त लक्ष देऊ लागली. कामवाली बाई घर सांभाळत होती. मुलगी मोठी झाली होती. ती स्वत:चे काम स्वत:च करायची. तिचा अभ्यास घेण्याइतकाही वेळ सनोबरकडे नव्हता. म्हणूनच तिला शिकवणीला पाठवित होती. सनोबरचे सर्व लक्ष कार्यालयीन कामावर केंद्रित झाले होते. कामवाली बाई सर्व सांभाळत असल्याने घराबाबत ती निश्चिंत होती.

कार्यालयीन कामानिमित्त सनोबर २ दिवस बाहेर गेली होती. आज रात्री ती घरी परतणार होती. पण तिचे काम सकाळीच पूर्ण झाले. त्यामुळे लगेचच ती विमानाने घरी निघाली. यावेळी मुलगी शाळेत असेल. साहिल कामाला गेला असेल आणि कामवाली बाई तर ५ वाजता येईल, असा विचार करून आपल्याकडील चावीने तिने दरवाजा उघडला. आत लाईट सुरू होती. बेडरूममधून आवाज येत असल्याने ती दबक्या पावलांनी तेथे गेली आणि अवाक झाली. साहिल, कामावली बाई एकत्र…

ती धावतच बाहेर आली. साहिलही तिच्या मागोमाग धावत आला आणि बाई गुपचूप निघून गेली.

साहिल सनोबरची समजूत काढू लागला. ‘‘माझ्या मनात कुठलेच वाईट विचार नव्हते. माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे ती डोके दाबू लागली आणि माझा स्वत:वर ताबा राहिला नाही. तिनेही नकार दिला नाही.’’

साहिल बरेच काही सांगत होता. सनोबर मात्र एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध होती. तो माफी मागत होता.

सनोबर शांतपणे उठली. आपले आणि मुलीचे कपडे बॅगेत भरू लागली. मुलगी आल्यावर तिच्यासोबत आपल्या अम्मीकडे निघून गेली. साहिल तिला थांबवत होता. सतत माफी मागत होता, पण सनोबरला जणू काहीच ऐकू येत नव्हते.

घरी आल्यावर तिने अम्मीला सर्व सांगितले आणि हुंदके देऊन रडू लागली.

‘‘साहिलने मला फसवले. आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही.’’

मोठया बेगमला अश्रू अनावर झाले. काही वर्षांपूर्वी ज्या आगीत तिचा संसार जळाला होता आज त्याच आगीच्या ज्वाळांमध्ये मुलीचा संसारही धगधगत होता. लग्नात अटी ठेवून काय झाले? सर्व पुरुष सारखेच असतात. जेव्हा कोणाला संधी मिळते ती सोडत नाहीत.

मोठया बेगमने मुलीला सावरले. ‘‘मुली, मी तुझे दु:ख समजू शकते. झोप आता.’’ तिचे डोके आपल्या मांडीवर घेऊन मोठी बेगम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली.

दुसऱ्या दिवशी सनोबर कामाला आणि मुलगी शाळेत जाताच साहिल आला. मोठी बेगम एकटी असणार, हे त्याला माहीत होते. मोठया बेगमला सलाम करून तो बसला. खालच्या स्वरात म्हणाला, ‘‘खालाजान, माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला. एका कमजोर क्षणी मी बहकलो. माझी चूक झीली. मी शपथ घेतो की, यापुढे कधीच असे होणार नाही. मला माफ करा. सनोबरलाही मला माफ करायला सांगा.’’ एवढे सर्व त्याने एका दमातच सांगितले होते.

मोठी बेगम गप्प होती. तिला खूप दु:ख झाले होते आणि रागही आला होता. साहिलच्या बोलण्यात आणि डोळयात लाज तसेच पश्चाताप दिसत होता. ती शांतपणे म्हणाली, ‘‘मी काहीच करू शकत नाही. सनोबरला वाटेल तसेच होईल.’’

‘‘खालाजान, माझा संसार उद्धवस्त होईल. माझी मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल? सनोबरशिवाय मी जगू शकत नाही.’’

मोठी बेगम काहीच बोलू शकली नाही.

संध्याकाळी सनोबर कामावरून आली तेव्हा मोठया बेगमने सांगितले की, साहिल आला होता. माफी मागत होता.

सनोबर रागावली. ‘‘तू त्याला घरात का घेतलेस? माझे त्याच्याशी कुठलेच नाते राहिलेले नाही. मी तलाक घेणार आहे.’’

मोठया बेगमला आठवले, जेव्हा वकील साहेब दुसरी बेगम घेऊन आले होते तेव्हा तिलाही माहेरी जायचे होते. पण तिला कोणाचा आधार नव्हता. ती स्वत:च्या पायावरही उभी नव्हती. आज सनोबर स्वत:च्या पायावर उभी आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. पण नंतर विचार आला, त्यांच्या निरागस मुलीचे काय होईल? आई किंवा वडील, यापैकी एकाच्या प्रेमाला ती मुकेल. दोघांनीही दुसरे लग्न केले तर मुलीचे काय? ती मनोमन घाबरली. मुलाला सनोबर आणि साहिलबाबत सांगितले. तो दुसऱ्याच दिवशी आला. बहीण, भावाचे हेच म्हणणे होते की तलाक घ्यायलाच हवा.

साहिल रोज फोन करीत होता. मेसेज पाठवित होता, पण सनोबर उत्तर देत नव्हती.

साहिल मोठया बेगमकडे सतत विनवण्या करीत होता. ‘‘खालाजान तुम्ही सर्व ठीक करू शकता. फक्त एकदा मला माफ करा आणि सनोबरलाही मला माफ करायला सांगा. झालेल्या चुकीची मला खूपच लाज वाटत आहे.’’

एके दिवशी सनोबर कामावरून घरी आपले काही सामान घेण्यासाठी गेली तेव्हा तिने पाहिले की, घर अस्ताव्यस्त झाले होते. स्वयंपाकघरातही बाहेरून आणलेले काही जेवण तसेच पडले होते. तिने अंदाज लावला की, कामवाली बाई येत नसावी. घरात सर्वत्र लिहिले होते, ‘‘मला माफ कर, परत ये सनोबर.’’ सनोबरला असे वाटले की, साहिल ४० वर्षांचा नाही तर एखादा तरुण आहे आणि तिची मनधरणी करीत आहे.

हळूहळू अनेक प्रयत्नांनंतर साहिलने मोठया बेगमचा विश्वास जिंकला की, एका कमजोर क्षणी झालेली ती चूक होती. त्याने आधी कधीच विश्वासघात केलेला नाही. मोठया बेगमने विचार केला की, साहिल सांगतोय ते खरे आहे. त्याच्या हातून चूक झाली आणि त्याला त्याचा पश्चातापही झाला आहे. शिवाय तो माफी मागत आहे. प्रश्न मुलीच्या भविष्याचा आहे. दोघांपैकी एकाचे प्रेम तिला मिळणार नाही. त्यामुळे साहिलला एखादी संधी द्यावी का?

सनोबर तलाकची तयारी करीत आहे, असे मोठ्या बेगमने साहिलला सांगितले. ते ऐकून साहिल धावतच आला. ‘‘खालाजान, जर सनोबरने घटस्फोटासाठी अर्ज केला तर मी मरून जाईन. मला एक संधी द्या,’’ अशी विनवणी करीत लहान मुलांसारखा रडू लागला.

मोठया बेगमला दया आली. ‘‘तू रडू नकोस. मी आज रात्री सनोबरशी बोलते.’’

सनोबर आल्यावर मोठी बेगम म्हणाली, ‘‘मी तुझ्याशी बोलू शकते का?’’

‘‘हो अम्मी,’’ सनोबर म्हणाली.

मोठी बेगम सांगू लागली, ‘‘जेव्हा तुझे अब्बू दुसरी बायको घेऊन आले होते तेव्हा मलाही त्यांना सोडून द्यायचे होते. पण मग तुम्हा मुलांचा विचार आला.’’

‘‘तुझी गोष्ट वेगळी होती. मी स्वत:ला आणि माझ्या मुलीलाही सांभाळू शकते. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायलाच हवी,’’ सनोबरने सांगितले.

‘‘त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्यासोबत त्याच्या मुलीलाही भोगावी लागेल. तिची आई किंवा वडील, तिच्यापासून हिरावले जातील. जर तुम्ही दोघांनी दुसरे लग्न केले तर तिचे काय होईल?’’

‘‘अम्मी, एकच लग्न मला नकोसे झाले आहे, मग दुसरे कशाला करेन? आता राहिली गोष्ट मुलीला वडिलांचे प्रेम मिळणार नाही याची. पण असे वडील असण्यापेक्षा नसलेलेच बरे.’’ सनोबरच्या मनात साचलेला राग ओठांवर आला.

तिचा राग बाहेर पडणे गरजेचे आहे, हे मोठ्या बेगमला माहीत होते. तिने वाद घातला नाही. म्हणाली, ‘‘तू एकटीच मुलीला चांगले सांभाळू शकतेस, असे तुला वाटत असेल तर ठीक आहे. पण मला वाटते की, तू तलाकचा अर्ज ६ महिन्यांनंतर दे. थोडा वेळ दे, मग तू जे सांगशील ते मला मान्य असेल.’’

‘‘नाही अम्मी. मी ६ दिवसही देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा मला आठवते साहिल आणि कामवाली बाई… किळस येते त्याच्या नावाची. असे कसे काय वागला तो?’’

मोठया बेगमने जग पाहिले होते. आपल्या पतीला अनेक मुलींसोबत पाहिले होते. आपल्या अनुभवातून तिने सांगितले, ‘‘ती त्या क्षणी घडलेली चूक होती. त्याचे कोणासोबतही संबंध नाहीत. जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष एकांतात असतात तेव्हा असा एखादा कमजोर क्षण येऊ शकतो.’’

‘‘मीही कामावर एकटीच अनेक तास पुरुषांसोबत काम करते. माझ्यासोबत तर कधीच असे घडले नाही. आत्मसंयम आणि मर्यादा हीच खरी माणूस असल्याची ओळख आहे. अन्यथा पशू आणि माणसात काय फरक आहे?’’

‘‘मी आतापर्यंत तुला काहीच सांगितले नाही, पण आता खूप विचारपूर्वक तुला थोडा वेळ द्यायला सांगत आहे. पुढे जशी तुझी मर्जी.’’

‘‘ठीक आहे. तुला वाटत असेल तर मान्य करते, पण माझा निर्णय बदलणार नाही.’’

सनोबरने असा विचार करून अम्मीचे म्हणणे मान्य केले की, तिलाही काही उरलेली कामे पूर्ण करायला वेळ मिळेल. मालमत्तेची कागदपत्रे स्वत:च्या नावावर करायची होती, वारस बदलायचा होता. कामाचाही ताण होताच. रात्री नेहमीप्रमाणे साहिलने फोन केला आणि सनोबरने तो उचलला.

आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना लपवित साहिल म्हणाला, ‘‘सनोबर मला माफ कर. परत ये.’’

सनोबरने गंभीर स्वरात तटस्थपणे सांगितले, ‘‘मला तुला भेटायचे आहे.’’

साहिल म्हणाला, ‘‘हा, हा… तू म्हणशील तेव्हा.’’

सनोबर म्हणाली, ‘‘उद्या कार्यालयानंतर घरी.’’ एवढेच बोलून तिने फोन ठेवला.

कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सनोबर घरी गेली. साहिल तिची वाट पाहात होता. त्याने घरही थोडेसे नीटनेटके ठेवले होते. साहिलने सनोबरचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा हात झटकून टाकला आणि लांब जाऊन बसली.

‘‘साहिल, मला तमाशा करायचा नाही. शांतपणे सर्व ठरवायचे आहे. आपले संयुक्त खाते बंद करायचे आहे. इन्शुरन्स पॉलिसीतील वारस बदलायचा आहे. या घरासाठी तुळा जो पैसे लागला तो तू घे. मला हे घर माझ्या नावावर करायचे आहे. मला तुझ्याकडून काहीच नको. मी काकाकडे जाऊन खुला (पत्नीकडून निकाह तोडणे) अर्ज देणार आहे.’’

थोडा वेळ साहिल गप्प राहिला. नंतर म्हणाला, ‘‘सनोबर, माझे जे काही आहे ते सर्व तुझे आणि आपल्या मुलीचे आहे. तू सर्व घे, फक्त मला माझी सनोबर दे. मला एकदा माफ कर. माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. तू जर माझ्या जीवनात नसशील तर मी हे जीवनच संपवून टाकेन,’’ सनोबरला माहीत होते की साहिल भावूक आहे, पण इतका जास्त असेल याची तिला कल्पना नव्हती. ती तेथून उठून निघून गेली.

कामाला जायचे, मन लावून काम करायचे, मुलीसोबत खेळायचे यातच तिचा वेळ जाऊ लागला. मोठया बेगमने सांगितल्यामुळे तसेच मुलीच्या हट्टापुढे अखेर सनोबरने आठवडयातून एकदा मुलीला भेटण्याची, तिला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी साहिलला दिली. मुलीला वडिलांच्या कृत्याबाबत कळावे, असे तिला वाटत नव्हते. एवढया लहान वयात तिला वडिलांनी केलेले दुष्कर्म समजले तर ती काय प्रतिक्रिया देईल?

साहिल आठवडयातून एकदा २ तासांसाठी मुलीला फिरायला न्यायचा. तिला भेटवस्तू द्यायचा. सनोबरच्या आवडीची एखादी गोष्ट मुलीसोबत पाठवायचा, पण सनोबर त्याकडे ढुंकूनही बघत नसे.

दरम्यान सनोबरला बढती मिळाली. तिची मुख्यालयात बदली झाली. मनात नसतानाही तिला दिल्लीला जावे लागले. मुलीला अम्मीकडेच ठेवावे लागले. शाळेचे वर्ष संपायला फक्त २ महिने शिल्लक होते. मोठया बेगमने सांगितले, ‘‘काळजी करू नकोस. मी मुलीला सांभाळेन. तू जा, पण दर सुट्टीच्या दिवशी आठवडयातून एकदा तरी ये.’’

मुख्यालयात तिच्या ओळखीचे काही जुने सहकारी होते. सर्वांनी तिचे स्वागत केले. एका प्रोजेक्टसाठी तिला समीरसोबत काम करायचे होते. समीर तिचा पूर्वीचा सहकारी होता. त्याला सनोबर आवडायची.

एकत्र काम करताना समीर आणि सनोबर बराच वेळ एकमेकांसोबत घालवायचे. सनोबरने साहिल आणि तिच्यात जे सुरू होते त्याबद्दल समीरला काहीच सांगितले नव्हते. त्यांना क्लाइंटकडेही जावे लागायचे. दोघे सोबतच जायचे. हॉटेलमध्ये रहायचे आणि काम पूर्ण झाल्यावरच यायचे. तासोनतास एकत्र काम करायचे. आजही सकाळच्या फ्लाइटने दोघे गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी हॉटेलवर गेले. समीर म्हणाला, ‘‘फ्रेश हो, मग खाली जेवायला जाऊया.’’

सनोबर म्हणाली, ‘‘तू जा, मी माझ्या खोलीतच काहीतरी मागवून घेईन.’’

समीर म्हणाला, ‘‘ठीक आहे, माझ्यासाठीही काहीतरी मागव. एकत्रच जेवूया.’’

समीरला सनोबर मनापासून आवडायची. तिच्याबद्दल त्याला आदरही होता. सनोबर मुख्यालयात आल्यानंतर कधीही त्याने तिच्याकडे आपले प्रेम व्यक्त केले नव्हते. आपली पत्नी आणि मुलांसोबत तो सुखी होता.

समीर सनोबरच्या खोलीत आला. जेवण यायला वेळ असल्यामुळे दोघे कामाबाबत चर्चा करू लागले. तितक्यात समीरच्या पत्नीचा फोन आला. दोघांमधील संभाषण ऐकून असे वाटत होते की दोघेही सुखी, समाधानी आहेत.

समीरने साहिलबाबत विचारले. सनोबरने विषय टाळला. तेवढयात जेवण आले. जेवताना दोघेही जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले.

समीरने सनोबरला विचारले, ‘‘साहिलशी लग्न झाले नसते तर तू माझ्याशी लग्न केले असतेस का?’’

सनोबर काही वेळ शांत राहिली, त्यानंतर म्हणाली, ‘‘कदाचित हो.’’

समीरने गमतीने म्हटले, ‘‘अगं आधी सांगितले असतेस तर मी त्याला गोळी घातली असती,’’ विषय तेथेच संपला. जेवण झाल्यावर समीर त्याच्या खोलीत निघून गेला.

सनोबर विचार करू लागली, समीर चांगला मित्र आहे. अचानक तिला साहिलची आठवण झाली. ती खूपच थकली होती. थोडया वेळातच झोपली. दुसऱ्या दिवशीही दोघे कामात प्रचंड व्यस्त होते.

‘‘आजही जेवण खोलीतच मागवूया का?’’ समीरने विचारले. सनोबर म्हणाली, ‘‘हो, ठीक आहे.’’

समीर फ्रेश होऊन सनोबरच्या खोलीत आला. जेवताना गप्पा सुरू झाल्या. अचानक सनोबरला ठसका लागला. समीरने लगेचच तिला पाणी दिले. ते प्यायल्यानंतर तिला बरे वाटले. जेवल्यानंतर समीर सनोबरसाठी चहा घेऊन आला. तो देताना दोघांच्या हातांचा एकमेकांना स्पर्श झाला. दोघेही शांतपणे चहा पिऊ लागले.

खोलीत सर्वत्र शांतता पसरली होती. दोघे जवळच बसले होते. एक विचित्र ओढ सनोबरला जाणवू लागली. जणू समीरच्या छातीवर डोके टेकून तिला रडायचे होते. तिने पाहिले की, समीरची नजरही तिच्यावरच खिळली होती. कदाचित त्यालाही सनोबरला आपल्या मिठीत घ्यावेसे वाटत होते. तितक्यात तिला वाटले हा तोच एकांत कमजोर क्षण तर नाही ना, ज्याचा उल्लेख अम्मीने केला होता. तिने स्वत:ला सावरले. ती उठली. उगाचच इकडे तिकडे काहीतरी ठेवू लागली. समीरला म्हणाली, ‘‘चल, उद्या भेटूया.’’

समीरही उभा राहत म्हणाला, ‘‘हो, उशीर झालाय, शुभ रात्री.’’

दुसऱ्या दिवशी काम संपल्यामुळे दोघे घरी परतले. सनोबर अम्मीकडे गेली. अम्मीने सांगितले की, तिची मुलगी जेवताना हट्ट करते. साहिल मुलीची खूपच काळजी घेतो. आपल्यासोबत घेऊन जातो. सतत फोन करतो. अम्मी साहिलचे कौतुक करीत होती.

सनोबरने साहिलला फोन केला. ‘‘मला आताच्या आता तुला भेटायचे आहे.’’ साहिलला भेटण्यासाठी ती निघाली. साहिल आतुरतेने तिची वाट पाहात होता. घर पाहून वाटत होते की, ते साहिलनेच स्वच्छ केले असावे. तिचे बेडरूमकडे लक्ष गेले. त्यात बदल करण्यात आला होता, असे सनोबरला वाटले. साहिल प्रेमाने म्हणाला, ‘‘आतातरी परत ये. मला माफ कर.’’

एकांत कमजोर क्षण काय असतो, हे आता सनोबरला समजले होते. तिने साहिलला माफ केले. साहिलने सनोबरचा हात धरला. दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...