कथा * ऋचा गुप्ते

शेजारच्या खोलीतून मघापासून बोलण्याचे आवाज ऐकायला येत होते. संभाषण साधच असावं पण दोघंही इतकी हसत होती की सांगता सोय नाही. काय करताहेत दोघं? रमणच्या छातीत शूळ उठला होता. रमणच्या मनात आलं की उठून त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन दार लावून मोठ्या आवाजात संगीत सुरू करावं. नकोच ते हसण्या बोलण्याचे आवाज. तरीही मनात एक किडा वळवळत होता. तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

काजल गात होती :

‘‘काल पाहिले मी स्वप्न गडे

नयनी मोहरली गं आशा

बाळ चिमुकले खुदकन् हसले

काल पाहिले मी स्वप्न गडे.’’ काजल गात होती अन् रोहन शिटीवर तिला साथ देत होता. सोफ्यावर पडल्या पडल्या रमणनं मनातच त्याला शिवी दिली ‘निर्लज्ज कुठला.’ कुणास ठाऊक आता काय सांगतोय काजलला…इतकी का हसतेय ती…आता मात्र रमणचा संयम संपला. संतापून उठला अन् पाय आपटत काजलच्या खोलीत पोहोचला.

‘‘काय चाललंय मघापासून खिदळणं? इतकं काय घडलंय? अरे, मला स्वत:च्या घरातही काही वेळ शांतता लाभू नये का?’’

रोहननं ‘‘सॉरी-सॉरी’’ म्हणत तिथून काढता पाय घेतला. काजल मात्र अजूनही गुणगुणत होती.

‘‘इवली जिवणी, इवले डोळे,

भुरूभुरू उडती केसही कुरळे,

रूणुझुणु रूणुझुणु वाजती वाळे,

रंग सावळा, तो कृष्ण रडे,

काल पाहिले मी स्वप्न गडे…’’

रोहन तिथं नसल्याने आता रमणला तिचं गुणगुणणं आवडू लागलं. त्याने डोळे भरून काजलकडे बघितलं. सातवा महिना लागला होता. किती सुंदर दिसत होती ती. सर्वांगावर तेज आलं होतं. पूर्वीची एकेरी अंगलट आता गोलाईत बदलली होती. मातृत्त्वाच्या तेजानं झळाळत होती काजल.

गरोदरपणी स्त्री सर्वात छान दिसते. मातृत्त्वामुळे आयुष्याला येणाऱ्या परिपूर्णतेचं समाधान तिला वेगळंच सौंदर्य देतं. रमण अगदी भान हरवून काजलकडे बघत होता, तेवढ्यात रोहननं खोलीत प्रवेश केला. त्याच्याकडे बघताच रमणचं मन कडू झालं. तो झटक्यात वळला. रोहननं वहिनीसाठी काही फळं कापून आणली होती. त्यानं ती प्लेट रमणच्या पुढे केली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रमण खोलीतून बाहेर पडला.

रमणनं सरळ कोपऱ्यातली खोली गाठली अन् कर्कश्श आवाज संगीत लावून खोलीचं दार बंद करून घेतलं. पलंगावर पडून डोळे मिटले तरी कानात रोहन आणि काजलचं हसणंच घुमत होतं. पुन्हा:पुन्हा त्या दोघांचं बोलणं त्याला ऐकायला येत होतं. एकूणच त्याच्या देहमनावर काजल आणि रोहननं असा काही कब्जा केला होता की त्याला इतर काही सुचतंच नव्हतं. त्याचं मन अस्वस्थ होतं, बेचैन झाला होता तो.

त्यातच जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्यामुळे तर तो अजूनच वैतागला होता. आपण चक्क नरकात राहतोय असं त्याला वाटायला लागलं. आपण एखाद्या धगधगत्या अग्नीकुंडात उभे आहोत असाही भास झाला. पिता होण्याचं जे सुख त्याला हवं होतं, त्याचा मार्ग असा अग्नीपथाचा असेल असं त्याला वाटलंच नव्हतं.

काही महिन्यांपूर्वी सगळंच किती छान होतं. रमणच्या मनात आलं…पण खरंच छान होतं की त्यावेळीही मनात काही बोच होतीच? आठवणींचे धागे उसवायला लागले.

लग्नाला सात वर्षं उलटली होती. सुरूवातीची वर्षं, करीअर, प्रमोशन्स, घर, घरातल्या इतर जबाबदाऱ्या यातच खर्ची पडली होती. त्यामुळे रमण व काजलनं मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. दोघांची जोडी फारच छान होती. अगदी अनुरूप अशी. दोघांवरही दोन्ही घरातून खूपच दबाव येत होता. आता घरात पाळणा हलायला हवा. दोघांचे आईवडिल, इतर वडिलधारी, नातलग मंडळी एवढंच काय मित्रमंजळीही आता विचारू लागली होती. रमणच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाला त्याचे सासूसासरे आले होते.

समारंभ छान झाला. काजलचे वडील म्हणाले, ‘‘सुरेख समारंभ केलात तुम्ही. एवढ्या वर्षात प्रथमच लग्नाचा वाढदिवस साजरा करताय. खरंच, खूप आनंद वाटला.’’

यावर काजलनं उत्तर दिलं, ‘‘होय बाबा, यावेळी खासच प्रसंग आहे. माझ्या धाकट्या दिराचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालंय. यापुढील शिक्षण तो स्वत:च्या स्कॉलरशिपवर पूर्ण करणार आहे. आमचा रोहन डॉक्टर झाला ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे. जणू आमची तपश्चर्या फळाला आली. तो आनंद साजरा करायला आम्ही हा समारंभ आयोजित केलाय.’’

रमणच्या आईनं काजलच्या आईला म्हटलं, ‘‘ताई, आता तुम्हीच या दोघांना समजवा. घरात नातवंडं बघायला आम्हीही आतुरलो आहोत. आता अधिक उशीर करायला नको.’’

‘‘खरंय तुमचं म्हणणं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वेळच्यावेळी सर्व होणं जरूरी आहे. आमचंही वय होतंय ना आता…’’

आता रमण आणि काजललाही आपल्या बाळाचे वेध लागले होते. पण काही महिन्यातच काजलच्या लक्षात आलं की काही तरी चुकतंय. दोघांनीही आपली पूर्ण तपासणी करून घेतली. इतकी वर्षं मुलाचा विचारच केला नव्हता. आता मूल हवंय अन् होत नाही म्हटल्यावर दोघंही काळजीत पडली. तपासणीत रमणमध्ये दोष आढळला. असा देखणा, निरोगी, हुशार तरूण पण मूल जन्माला घालणं त्याला शक्य नव्हतं.

‘‘रमण हताश झाला. पण काजलनं त्याला धीर दिला. पूर्ण विचारांती स्पर्मबँकेतून स्पर्म घेऊन काजलच्या स्त्री बीजांशी त्यांचा संयोग घडवून काजलच्या गर्भाशयात ते सोडणं आणि मग गर्भाशयात गर्भ वाढवणं असा निर्णय घेतला गेला.

काजलला वाटत होतं की ही बातमी गुप्त ठेवावी. पण रमणचं म्हणण पडलं की आपण ही गोष्ट लपवूया नको.’’

मग सगळ्या कुटुंबीयांसमोर रमणचा हात हातात घेऊन काजलनं त्यांचा प्लॅन सांगितला.

रोहननं म्हटलं, ‘‘छोटी आई, तुम्ही इतर कुठंही जाऊ नका. मी जिथं काम करतो, तिथं या गोष्टीची उत्तम व्यवस्था आहे. मी त्या विभागाच्या मुख्य डॉक्टरांशी बोलतो.’’

दोघांच्या आईवडिलांनी एकमेकांशी चर्चा केली, तेव्हा रमण अन् काजल आपल्या बालकनीत बसून समोर बागेत खेळणाऱ्या मुलांकडे बघत आपलं मूल कसं असेल याचं स्वप्न विणत होते.

काजल सतत रमणबरोबर होती. त्याच्या दोषाबद्दल ती चकार शब्द बोलत नव्हती. उलट जणू तिच्यात दोष आहे असंच वागत होती.

काजलची सासू म्हणजे रमणच्या आईनं म्हटलं, ‘‘असं घडतं का?’’

‘‘अशा पद्धतीनं जन्माला आलेलं मूल निरोगी असतं का?’’ रमणच्या वडिलांनी विचारलं.

काजलच्या आईनं म्हटलं, ‘‘पण मूल कुठल्या वंशाचं, घराण्याचं असेल हे कसं कळावं?’’ काजलच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘जर हाच पर्याय असेल तर आपल्याच कुटुंबातील कुणाचे स्पर्म मिळवता येतील का? निदान कुळ, घराणं याबाबतीत संशय उरणार नाही.’’

बराच वेळ सगळे गप्प होते. शेवटी रमणनंच म्हटलं, ‘‘आम्ही गुपचुप हे करू शकलो असतो, पण तुम्हाला विश्वासात घेतलंय ते तुमच्याकडून आधार मिळेल या आशेवर.’’

‘‘तुम्ही सर्व नि:शंक राहा. ही पद्धत आज सर्वमान्य आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण झाला आहे. मी स्वत: यात जातीनं लक्ष घालतोय ना?’’ रोहननं सर्वांना आश्वस्त केलं.

शेवटी एकदाचं डॉक्टरांनी सांगितलं की काजल गरोदर आहे. काजलनं ऑफिसकडून दिर्घ रजा घेतली. घरात बाळ येणार म्हटल्यावर सगळेच हर्षविभोर झाले होते. प्रत्येकजण नव्या बाळाची आपल्या परीनं कल्पना करत होता. आनंद व्यक्त करत होता. काजलला तर कुठं ठेवू अन् कुठे नको असं तिच्या सासूला अन् आईला वाटत होतं.

सध्या सासूनं काजलचा ताबा घेतला होता. त्यामुळे रमणच्या वाट्याला ती कमी येत होती. रमणलाही खूप आनंद झाला होता. त्यांचं स्टेटस बदलणार होतं. तो बाबा व्हायचा होता. तो बाळाच्या जन्माची वाट बघत होता.

सगळं काही सुरळीत चालू होतं. दर चेकअपनंतर डॉक्टर समाधान व्यक्त करत होते. याच काळात रमणला जाणवलं की रोहनच्या फेऱ्या हल्ली वाढल्या आहेत. त्यातून तो डॉक्टर. आईवडिलांना सतत तब्येतीसाठी त्याचीच गरज पडत होती. पण रोहन आला की काजलची जास्त काळजी घेतो असं रमणला वाटे. हल्ली त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. हे वीर्यदान रोहननंच केलेलं असेल का?

खरंतर असं नसेल. पण रमणला वाटत होतं. त्याच्याकडे पुरावा काहीच नव्हता. पण त्याच्यात असलेल्या दोषामुळेच त्याला असं वाटत होतं.

रोहनला बघितलं की त्याला आपण मूल जन्माला घालायला असमर्थ आहोत ही बोच फराच टोचायची. रोहनचं काजलकडे येणं त्याला मुळीच सहन होत नव्हतं. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की जे त्याला काजलसाठी करावंसं वाटतं, ते त्यानं करण्याआधीच रोहननं करून टाकलेले असतं. रोहनसकट घरातील सर्व मंडळी जेव्हा गप्पा, हास्य विनोद करत असतात, तेव्हा रमण त्यात सामील होत नाही, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. काही न काही कारण सांगून तो तिथून निघून जात असे. हळूहळू स्वत:च्या नकळत रमण मिटत गेला. ज्या उत्साहानं बाळाच्या स्वागतासाठी तो आपल्या पापण्यांच्या पायघड्या घालून बसला होता, तो उत्साह ओसरू लागला. एक विचित्र विरक्ती त्याच्या मनात घर करू लागली होती. रमणला वाटे या घरात त्याच्या संसारात तोच ‘नकोसा’ आहे. काजल त्याला बोलावून घ्यायची. जवळ बैस म्हणायची. पण तो तिच्याजवळ जातच नसे.

रोहन अन् काजल एकमेकांशी बोलायची तेही त्याला आवडत नव्हतं. आता तर त्याच्या मनात यायचं की रोहनच जर या बाळाचा पिता असेल तर मी कशाला मधेमधे लुडबुड करू?

या विचारानं मनात मूळ धरलं अन् मग सगळंच बदललं. आता तर तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसातच घालवू लागला. वरचेवर टूरवर जाऊ लागला. काजलला त्याचं दूरदरू राहणं खटकत होतं. गरोदरपणाचे शेवटचे दिवस तर काजलसाठी फारच अवघड होते. तिला उठताबसताना मदत लागायची. सासू मदत करायची. रोहन मदत करायचा पण रमण जवळ येत नव्हता. नवरा बायकोत एक अदृश्य भिंत उभी होती. खरं तर रमणचं लग्न झालं, तेव्हा रोहन लहानच होता. काजलला तो छोटी आई किंवा वहिनी आई म्हणायचा. काजलही त्याचं खूप कौतुक करायची. त्यानं डॉक्टर व्हावं ही तिचीच इच्छा होती. ‘‘शी! हे काहीच्या काहीच झालंय सगळं. यापेक्षा आम्हाला मूल नसतं झालं तरी चाललं असतं.’’ संतापून तो स्वत:शीच पुटपुटला. नको नको ते विचार त्याची बुद्धी भ्रष्ट करत होते. तो धुमसत होता. काय करावं ते सुचत नव्हतं.

तेवढ्यात रोहनची हाक ऐकू आली, ‘‘दादा, लवकर ये वहिनीआईला त्रास होतोय, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल.’’

‘‘तूच घेऊन जा. मी जाऊन काय करणार? मी काही डॉक्टर नाही, मला आज हैदराबादच्या टूरवर जायचंय…मी निघालो आहे…पंधरा दिवसांनी येईन…’’ रमण अगदी अलिप्तपणे म्हणाला.

काजलचा चेहरा वेदनेनं पिळवटला होता. तरी तिनं स्वत:च्या मनाची समजूत घातली की हा अलिप्तपणा रमणच्या मनातील न्यूनगंडातून आलेला आहे. होणाऱ्या बाळाचा तो जैविक पिता नाही, हे शल्य त्याला बोचतंय. हा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला, तेव्हाच काऊंसिलिंग करणाऱ्या सायकोलॉजिस्ट डॉक्टरनं तिला याबाबतीत सांगून सावध केलं होतं. त्यामुळे तिनं रमणला काहीच म्हटलं नाही.

अकराव्या दिवशी काजल भरल्या ओटीनं परत आली. या अवधीत रमणनं एकदाही, फोनवरसुद्धा तिची चौकशी केली नव्हती. तो पंधराव्या दिवशी परत आला. आईनं म्हटलं, ‘‘तू बाबा झालास…अभिनंदन! काजलला भेट ना, ती वाट बघतेय.’’

तो खोलीत गेला. पाळण्याकडे बघितलंही नाही. काजलला त्याची मन:स्थिती समजत होती. तिनंही त्याच्या वागण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो आपल्या नेहमीच्या त्याच्या कोपऱ्यातल्या खोलीत गेला आणि त्यानं म्युझिक सुरू केलं. त्याचवेळी त्याच्या कानांवर संगीतापेक्षाही मधुर असा सूर आला…अरे? हा तर बाळाच्या रडण्याचाच आवाज…मुलगा आहे की मुलगी? कुणी त्याला सांगत का नाहीए? अन् बाळाला कुणी गप्प का करत नाहीए? त्याला काहीच समजेना…संगीत बंद केलं अन् बाळाच्या रडण्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू आला.

बाळ रडतंय…रमण खोलीत फेऱ्या घालतो आहे. कुणीच नाहीए का बाळापाशी? त्याची आई? आजी? दुसरी आजी? बाळाचा आवाज आता दमल्यासारखा वाटतोय.

तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजू लागला. नंबर नवा वाटला. त्यानं फोन कानाला लावला. ‘‘दादा, मी रोहन बोलतोय, प्लीज सगळं ऐकून घे. फोन बंद करू नकोस. मी ऑस्ट्रेलियात, सिडनीला आलोय. मला इथं एक कोर्स करायचाय. शिवाय जॉबही मिळाला आहे. दादा, तू आणि छोट्या आईनं माझ्यासाठी खूप खूप केलंय. पण दादा, गेले काही महिने छोट्या आईनं खूप मानसिक ताण सोसलाय. तुझा अलिप्तपणा तिला किती छळत होता, त्याची कल्पनाही तुला नाहीए. दादा, तू रागवू नकोस, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण जेव्हा छोट्या आईला तुझी सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हाच तू तिच्यापासून दूर राहिलास,’’ बोलता बोलता रोहन रडायला लागला. रमणच्या मनात आलं किती मोठा झालाय रोहन, केवढी समजूत आहे त्याला. मीच मूर्ख स्वत:च्या कल्पनेतल्या विकृतीत अडकलो.

रमण काही बोलणार, तेवढ्यात रोहन म्हणाला, ‘‘दादा, बाळं रडताहेत का? मला फोनवर त्याच्या रडण्याचा आवाज येतोय…’’

बाळं? म्हणजे जुळी आहेत का? फोन तसाच घेऊन रमण खोलीत धावला. पाळण्यात दोन छोटी छोटी बाळं सर्व शक्ती एकटवून रडत होती.

‘‘रोहन, बाळा, धन्यवाद! फोन करत राहा…अन् लवकर घरी ये…’’ त्यानं फोन बंद केला अन् त्या लहानग्यांना दोन्ही हातांनी उचलून कवटाळून धरलं. त्याच्या मनात आलं, अगदी रोहनच्या स्पर्मपासून जरी ही बाळं झाली असली तरी काय फरक पडतो? आता ही बाळं त्याची आहेत. तो या बाळांचा पिता आहे. मनातून एक समाधान डोकावत होतं…जर रोहन या मुलांचा बाप असता तर तो त्यांना सोडून गेलाच नसता. म्हणजे ही बाळं रोहनची नाहीत. केवळ मोठं समाधान…!

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...