* सुनील शर्मा

एके दिवशी, दहा वर्षीय नीरज अचानक आईला म्हणाला, ‘‘मम्मी, मामाच्या घरी जाऊया.’’

हे ऐकून त्याच्या आईने समजावले की, ‘‘बाळा, सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आहे, म्हणून आपण कुठेही जाऊ शकत नाही.’’

हे ऐकून नीरज निराश झाला आणि पाय आपटत रागाने म्हणाल, ‘‘हे काय आहे… किती दिवस झाले, आपण कुठेच गेलोलो नाही.’’ फक्त घरातच राहायचे. उद्यानात किंवा मित्रांना भेटण्यासाठीही जाता येत नाही. सतत थोडया-थोडया अंतराने सॅनिटायझरने हात धुवावे लागतात आणि जरा जरी घराबाहेर गेल्यास तोंडावर मास्क लावावा लागतो. खेळण्यासाठी फक्त टेरेसवरच जाता येते…

‘‘मी आता कंटाळलो आहे. जेव्हा तुझ्याकडे मोबाइल मागतो, तेव्हा बाबा ओरडतात आणि तू मात्र दिवसभर इअरफोन लावून मोबाइलवर वेब सीरीज पाहत बसतेस.’’

मार्च २०२१ च्या अखेरच्या आठवडयापासून संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाशी झुंज देत आहे. कितीतरी लोक घरात बंद आहेत, विशेषत: मुले घरात कैद झाली आहेत. ती शाळेत जाऊ शकत नाहीत. पार्क सामसूम झाले आहेत.

सुरुवातीला मुलांना असे वाटले होते की, शाळा बंद झाल्या म्हणजे आता दिवसभर मजा करायची. परंतु हळूहळू त्यांना समजले की, हे सुट्टीचे दिवस नाहीत, तर त्यांच्या निरागस बागडण्यावर जणू कर्फ्यू लावण्यात आला आहे.

याचा परिणाम असा झाला की, नीरजसारख्या लहान मुलांच्या मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागले आहेत. ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान करू शकतो.

सध्या तरी ही समस्या प्राथमिक टप्प्यात आहे, म्हणूनच मुले वैतागत असल्यास मोठयांनी रागावू नये. उलट त्यांनी मुलांना या मोकळया वेळेत एखादे चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे.

गॅझेट बनले आधार

केमिकल लोच्याबाबत बोलायचे झाल्यास, लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, तणावामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होतात. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा दिनक्रम बदलला आहे. मोठी माणसे कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडतात, पण मुले मात्र ‘बिग बॉस’ या रिएलिटी शोच्या स्पर्धकांप्रमाणे घरातच बंदिस्त झाली आहेत.

दुसरीकडे मुलांच्या शाळा सध्या बंद असल्या तरी ऑनलाइन अभ्यास मात्र सुरू आहे. त्यामुळे अभ्यासाशिवाय ते मनोरंजनसाठीही मोबाइल, संगणक, लॅपटॉप किंवा टीव्हीचाच आधार घेतात. यामुळे केवळ त्यांच्या डोळयांवरच वाईट परिणाम होत नाही तर मानसिकदृष्टयाही ते थकून जातात.

सध्या आपल्या ही गोष्ट लक्षात आलेली नाही, पण हे कटू सत्य आहे की, टीव्हीवरील कोरोनाशी संबंधित नकारात्मक बातम्या सातत्याने ऐकल्यामुळे मोठया माणसांसोबतच मुलांमध्येही तणाव वाढत आहे.

या तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तर अशा परिस्थितीत मुलांना काहीही करून नकारात्मक वातावरणातून बाहेर काढणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांना घरी किंवा छतावर असे खेळ खेळायला प्रोत्साहित करायला हवे, ज्यामुळे त्यांचा व्यायाम होईल, त्यांना भरपूर घाम येईल. याशिवाय त्यांना चित्रकला, पुस्तके वाचणे किंवा इतर कोणत्यातरी कलेत गुंतवून ठेवा.

यांनी असे केले

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या सोना चौधरी यांना २ मुलगे आहेत. कोरोना काळात ही दोन्ही मुले घरातील कामात आईला मदत करतात. स्वयंपाकघरात काहीतरी नवीन पदार्थ बनवतात. कविता लिहितात.

सोना चौधरी यांच्या २ मुलांपैकी मोठा मुलगा सुजल १५ वर्षांचा असून अकरावीत शिकतो. तर, १२ वर्षांच्या लहान मुलाचे नाव व्योम आहे आणि तो आठवीत शिकतो. दोघांनाही पुस्तक लिहिण्याची आवड आहे आणि त्यांनी प्रत्येकी २ पुस्तके लिहिली आहेत.

सोना चौधरी यांनी सांगितले की, ‘‘मी दोघांकडून घराच्या साफसफाईसारखी कामे करून घेते. मीही त्यांच्या बरोबरीने हे काम करते. त्यांना स्वयंपाकघरात माझ्या सोबत ठेवते, शिवाय मोकळा वेळ मिळताच त्याच्यांबरोबर खेळते.’’

सोना चौधरी यांच्या मते, ‘‘सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या वागणुकीत बदल झाला आहे. म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी मुलांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी मुले शाळेसोबतच आपल्या आजूबाजूच्या परिसराकडूनही खूप काही शिकत असत. घरातील कामातून शिकत असत.

‘‘सध्याच्या कोरोना काळात मुलांना घरातच प्रात्यक्षिक करून शिकण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाइन शिकवणी चांगली आहे, परंतु मुलांना चांगल्या प्रकारे जगायची शिकवण मिळावी यासाठी वडीलधाऱ्यांनी त्यांना स्वत:सोबत ठेवायला हवे. ते जे काही करतात ते मुलांना दाखवायला हवे, शिकवायला हवे. यालाच कौशल्यांचा सराव असे म्हणतात. चीनसारख्या देशात लहान वयातच मुलांकडून कौशल्यांचा सराव करून घेतला जातो.

महिला काँग्रेसशी संबंधित आणि आया नगर प्रभागातील उपाध्यक्षा मधु गुप्ता यांना २ मुले आहेत. १० वर्षांची अग्रिमा आणि ७ वर्षांचा समन्वय. मधु गुप्ता यांनी सांगितले की, ‘‘एकीकडे ऑनलाइन वर्गामुळे त्यांचा स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ वाढत आहे. ती आळसावत असून त्यांची शारीरिक हालचालही कमी होत असल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. पण, दुसरीकडे कोरोना कालावधीत मुले घरीच असल्यामुळे मी या वेळेचा सकारात्मक उपयोग करून घेत आहे. मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते आणि त्यांनी घरातील इतर कामे शिकावीत यासाठी त्यांना मदत करते. जसे की, डायनिंग टेबल मांडणे, खाण्याची भांडी स्वयंपाकघरात ठेवणे, कपाटात स्वत:चे कपडे नीट लावून ठेवणे, खोली स्वच्छ करणे इत्यादी.

‘‘राजकारणात असण्यासोबात मीसुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आहे, म्हणूनच दररोज मला घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत, मुश्किलीने मिळणारा थोडासा वेळही योग्य प्रकारे वापरून त्यावेळेत मुलांना चांगल्या सवयी, घरकाम शिकवून मी माझा दिनक्रमही सहजसोपा करून घेतला आहे.’’

पण प्रत्येक घरात असे घडत नाही. कोरोनामुळे बऱ्याच लोकांचा रोजगार गेला आहे. याचा त्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम होत आहे. मुलेही याला अपवाद नाहीत. परंतु काही खबरदारी घेतल्यास मुलांचा ताण कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त जर तुमचा मुलगा असामान्यपणे वागत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...