कथा * अर्चना पाटील

‘‘सौ मित्र, मजा आहे यार तुझी.’’

‘‘का रे निनाद, काय झालं?’’

‘‘सोन्यासारखी दोन मुले आहेत. स्वत:चं घरसुद्धा घेतलंस, चारचाकी गाडी आहे, कस्तुरीसारखी समजुतदार बायको आहे, अजून काय पाहिजे यार आयुष्यात.’’

गाडी ऑफीसच्याच दिशेने जात होती. सौमित्र ड्रायव्हिंग करत होता. तेवढयात ऑफिसमधीलच दोन मुली बसस्टॉपवर दिसल्या.

‘‘निनाद, सोडायचं का यांना ऑफिसला?’’

सौमित्रने निनादला बोलण्याची वेळच येऊ दिली नाही, मुलींजवळच गाडी नेऊन थांबवली.

‘‘शाल्मली मॅडम, सोडू का ऑफिसला?’’

‘‘हो ,हो सोडा की,’’ मनवा पटकन बोलली आणि दरवाजा उघडून गाडीत बसली. त्यामुळे शाल्मलीही बसली.

‘‘तुम्ही रोजच इथून बसमधे चढता ना.’’

‘‘हो,’’ मनवानेच उत्तर दिलं

‘‘आम्हीही रोज इकडूनच जातो. सोडत जाऊ तुम्हालाही, काय रे निनाद.’’

‘‘हो ना, काय हरकत आहे. संध्याकाळी थांबा. आपण सोबतच येऊ. वीस पंचवीस मिनीटांचा रस्ता आहे.’’

सौमित्रला सावळया रंगाची शाल्मली त्याच्या गाडीत हवी होती. त्याचा उद्देश सफल झाला. सौमित्र दिसायला हँडसम होता. ऑफिसमध्ये त्याची पोस्टिंगही चांगली होती. ऑफिसच्या सर्वच लेडीज त्याच्या मागेपुढे करायच्या. शाल्मलीलाही तो आवडू लागला होता. सतत सगळयांना हसवायचा. पार्टी अरेंज करायचा. नवनवीन कलरचे शर्ट्स आणि जिन्स, एकदमच भारी पर्सनॅलिटी होती त्याची. त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर तर काळा गॉगल शोभून दिसायचा. हळूहळू सौमित्र शाल्मलीशी जवळीक वाढवू लागला.

‘‘खुपच कमी वयात नोकरी करत आहेस तू, सॉरी हं… मी पटकन एकेरीवर येतो. अजून कॉलेज शिकायला हवं होतं.’’

‘‘वडील आजारी असतात माझे, म्हणून शिक्षण सोडलं. घरी पैशांची चणचण असते.’’

‘‘तुला एक सांगु का? तुझा रंग जरी सावळा असला तरी तू माझ्या दृष्टीने खुप सुंदर आहेस. या ऑफिसमध्ये तुझ्याइतकं हुशार कोणीच नाहीए.’’

‘‘धन्यवाद सर.’’

‘‘धन्यवाद काय, चल कॉफी घेऊ बाहेर. थोडं मोकळं बोलता येईल.’’

‘‘नाही नको, हे जरा जास्तच होईल.’’

‘‘काय जास्त होईल? मी सांगतो आहे ना. चल गुपचूप.’’

शाल्मलीही निमुटपणे निघून गेली. ऑफिसमध्ये दोघांची चर्चा चांगलीच रंगली.

‘‘सौमित्र, काय सध्या शाल्मलीच्या मागेमागे फिरतो? ‘दोघंही आज मँचिंग…’ अशीच चर्चा ऑफिसमध्ये सुरू असे. शाल्मलीला सगळे समजत होते पण तिच्यासाठी सौमित्र म्हणजे सुखाची सर. त्यामुळे नाव जरी खराब होत होतं तरी ती बिनधास्त सौमित्रसोबत फिरत असे. शाल्मली आणि सौमित्रच्या संबंधांना आता सहा महिने झाले होते. सौमित्र सतत शाल्मलीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असे. तिच्यासाठी, तिच्या कुटुंबातील लोकांसाठी सतत काहीतरी नवीन वस्तु घेत असे. एक दिवस सौमित्र तिला घेऊन गावाबाहेरच्या हॉटेलवर आला. दुपारचे बारा वाजले होते. शाल्मलीला वाटतं होतं हा नेहमीसारखाच कुठेतरी बाहेर जेवण करायला घेऊन आला. त्यामुळे ती बिनधास्तपणे बोलत होती, हसत होती. सौमित्रने बुक केलेल्या रूममध्ये ते दोघे आले.

‘‘काय गं, काय जेवशील माझी शामू.’’

‘‘काहीही मागवा. नेहमी तुम्हीच ऑर्डर देता ना.’’

‘‘शाल्मली, मला तू खुप आवडतेस. मी सतत तुझं निरीक्षण करत असतो. फक्त एकदा माझ्या मिठीत ये.‘‘

‘‘काहीतरीच काय सौमित्र, आपण केवळ चांगले मित्र आहोत.’’

‘‘काहीतरीच काय, माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर. म्हणुनच तर मी सतत तुझ्यासोबत फिरत असतो. त्यामुळेच मला तुला स्पर्शही करावासा वाटतो.‘‘

‘‘सौमित्र, एक मिनीट, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तुम्ही विवाहीत आहात. माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाहीए.’’

‘‘काहीच नाही म्हणजे, मग का हसतेस, बोलतेस माझ्याशी.’’

‘‘एक स्त्री आणि पुरूषात कधीच निकोप मैत्री होऊ शकत नाही हेच खरं. माझ्या अडचणी तुम्ही समजून घेता. कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आयुष्य एन्जॉय करायला तुम्ही मला शिकवलं. धन्यवाद सर. पण कदाचित त्यामुळे तुम्ही मला वेगळंच समजलात. माझी चुक झाली. येते मी,’’ शाल्मली खोलीतून बाहेर निघायला लागली. तेवढयात सौमित्रने दरवाजा बंद करून तिचा रस्ता अडवला.

‘‘थांब, शाल्मली, कशाला एवढा भाव खातेस? सावळया रंगाची तर आहेस तू. तुझ्यापेक्षा सुंदर मुली मी सहज पटवू शकतो.’’

‘‘सर, माझा तर रंगच काळा आहे. तुमचं तर मन काळं आहे. तुम्ही विवाहीत आहात. तुम्हाला दोन मुलं आहेत. तरीही तुम्ही माझ्यासारख्या अविवाहीत मुलीकडून शरीरसुखाची अपेक्षा करतात? निघते मी. कदाचित मी तुमच्यासोबत सहा महिने ऑफिसच्या बाहेर फिरले नसते, तर आज हा दिवस आला नसता. म्हणून मीच तुमची माफी मागते. सर, तुम्ही मनाने खुप चांगले आहात. कशाला एका क्षणाच्या मोहासाठी स्वत:च्या चारित्र्यावर कलंक लावून घेताय? तुमची बायको कस्तुरी, ती आयुष्यभर तुमच्याशी एकनिष्ठ राहणार आहे. कमीत कमी तिचा तरी विचार करा. माझंही उद्या कोणाशीतरी लग्न होईल. त्यावेळी मी नववधुच असले पाहिजे. जाऊ द्या मला.’’

सौमित्र दरवाजातून बाजुला सरकला. शाल्मलीही रडतरडतच हॉटेलमधून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दोघांची भेट झाली.

‘‘सौमित्र, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही एक वाऱ्याची झुळुक बनुन माझ्या आयुष्यात आलात. खुप खूप प्रेमाचा वर्षाव केलात. पण यापुढे परत कोणत्याच स्त्रिच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करू नका. कारण स्त्रिया खूप भावनिक असतात. एखाद्या पुरूषाकडून जेव्हा त्यांचा अपमान होतो, तेव्हा तो क्षण त्यांना असह्य असतो. मी तुम्हाला आवडते. मलाही तुमचा सहवास आवडतो. पण त्यासाठी आपण नैतिकतेचे नियम तर धुळीला मिळवू शकत नाही ना.’’

‘‘शाल्मली, मी चुकलो. मला माफ कर. मला नव्या नजरेने तुझ्याशी मैत्रीची सुरूवात करायची आहे.’’

‘‘सॉरी सर, आता मला उभ्या आयुष्यात पुन्हा कोणत्याच पुरूषासोबत मैत्री करायची नाहीए. मला माझी चुक सुधारायची आहे. या सहा महिन्यात तुम्ही मला जो मानसिक आधार दिलात, त्याबद्दल मी तुमची आयुष्यभर ऋणी राहिन.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...