कथा * पौर्णिमा अत्रे

‘‘हे स्थळ मला सर्वार्थानं योग्य वाटतंय. एकदा तनूला विचारून घेतो अन् मग फायनल करून टाकू,’’ गिरीशनं आपल्या बायकोला, सुधाला म्हटलं.

‘‘हो, पण तिनं आधी होकार तर द्यायला हवा ना? त्रस्त झालेय या मुलीपायी. इतकी छान छान स्थळं येताहेत पण काही तरी खुसपट काढून नाकारतेय ती सगळ्यांना. त्यातून एकत्र कुटुंब म्हटलं की संतापतेच! आता मात्र मी तिचं अजिबात ऐकून घेणार नाही. आता खरं म्हणजे हे स्थळ तिच्या अपेक्षेनुरूपच आहे, पण एकच डोक्यात घेऊन बसलीय की एकत्र कुटुंबात सून म्हणून जाणार नाही…काही तरी एकेक खुळं या मुलींची!’’ सुधानं म्हटलं.

तुला माहीत आहे ना, हे सगळं त्या तिच्या लाडक्या मैत्रिणीमुळे झालंय. अशी पूर्वी नव्हती आपली तनु, पण हल्ली त्यांच्यावर आई वडिलांपेक्षा मित्र मैत्रिणींचाच प्रभाव जास्त असतो.

नवरा बायको सचिंत चेहऱ्यानं बोलत असतानाच तनु ऑफिसातून घरी परतली. आईवडिलांचे चेहरे बघून तिनं हसून विचारलं, ‘‘आज पुन्हा एखादं स्थळ आलेलं दिसतंय?’’

तिचा हसरा चेहरा अन् विचारण्याची पद्धत यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तिघांनी एकत्र बसून चहा घेतला. मग सुधानं म्हटलं, ‘‘हे स्थळ खरंच छान आहे. इथं लखनौमध्येच मुलाचे आईवडिल त्यांच्या थोरल्या लेकसुनेसह राहताहेत. धाकटा मुंबईला असतो. तो एका औषधांच्या कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर आहे.’’

तनुनं क्षणभर विचार केला. मग हसून म्हणाली, ‘‘म्हणजे, तो तिथं एकटा राहतो?’’

‘‘होय.’’

‘‘तर मग हरकत नाही…फक्त त्याच्या आईवडिलांनी वारंवार मुंबईला येऊन धडकू नये…’’

‘‘कसं गं बोलतेस तनु? अगं त्याचे आईवडिल आहेत. ते काय आपल्या मुलाकडे येऊन राहू शकत नाहीत? अशी, इतकी तुसडी अन् माणूसघाणी कशी गं झालीस तू? हे काय नवीनच फॅड तुझं? आम्हाला आजही वाटतं, घरात कुणी वडिलधारं असावं…पण सगळेच खूष आणि निवर्तले अन् तुला घरात फक्त नवरा हवाय…अगं सासरच्या घरात किती तरी नाती असतात. नातलग असतात…ते ही सगळं महत्त्वाचंच असतं…’’ जरा चिडूनच सुधानं म्हटलं.

‘‘नाही…नाही आई, मला भीती वाटते…रिया सांगत होती.’’

सुधा तडकन् उठून उभी राहिली. संतापून म्हणाली, ‘‘नाव नको घेऊस तिचं, आचरट पोरगी…त्या पोरीमुळे आमची चांगली गुणाची पोर बिघडली आहे. बुद्धीभेद केलाय तिनं तुझा. अगं, आपलं फक्त तीन माणसांचं कुटुंब. तुला तर भरल्या घराची, मोठ्या कुटुंबाची किती हौस होती. पण या रियानं निगेटिव्ह गोष्टी सांगून तुझं डोकं बिघडवलंय.’’

तनुला पण राग आला. ती ही रागाने धुमसत आपल्या खोलीत निघून गेली. गिरीश अन् सुधा प्रश्नार्थक मुद्रेनं एकमेकांकडे बघत होती.

तनूची पक्की मैत्रीण रियाचं लग्न सहा महिन्यांपूर्वी दिल्लीतल्याच एका कुटुंबात झालं होतं. घरी सासूसासरे अन् नवरा अनुज अशी मंडळी होती. एक मोठा दिर वेगळा राहत होता अन् नणंदेचं लग्नही वर्षभरापूर्वीच झालं होतं. चांगलं नामांकित, समृद्ध कुटुंब होतं. रियाही नोकरी करत होती. तनुकडूनच रियाची बातमी सुधाला कळायची. दिवसा दोघी व्हॉटसअॅपवर चॅटिंग करायच्या. सुट्टीच्या दिवशी एकमेकींशी भरपूर गप्पा व्हायच्या. जे काही बोलणं कानांवर पडायचं त्यावरून सुधाला एवढं जाणवलं होतं की रिया सतत सासूसासरे अन् नवऱ्याबद्दल तक्रारी सांगत असते. ती तनुची लाडकी मैत्रीण होती. तिच्याबद्दल काहीही म्हटलेलं तनुला आवडत नसे. पण तनु आईला मात्र सगळं सांगायची. त्यामुळेही सुधाला रियाबद्दल बरंच काही कळत असे.

एकदा तनुनं म्हटलं, ‘‘आज सकाळी रियाला जास्त वेळ झोपायचं होतं, पण नवऱ्यानं तिला रोजच्याप्रमाणे लवकर उठवलं. ती दोघं मॉर्निंगवॉकला एकत्रच जातात ना? पण बिच्चारी रिया, तिला मनाप्रमाणे झोपायलाही मिळत नाही. आज रियाचा मूड त्यामुळेच फारच वाईट आहे.’’

एकदा पुन्हा तनूनं सांगितलं, ‘‘रियाची सासू खूपच हेल्थकाँशस आहे. घरातल्या सर्वांच्या तब्येती त्यांच्यामुळेच चांगल्या आहेत. पण त्यामुळे रियाला रोजच ‘हेल्दी फूड’ खावं लागतं.’’

सुधानं विचारलं, ‘‘स्वयंपाक, ऑफिसचे, शाळेचे डबे सगळं सासूबाईच करतात का?’’

‘‘हो ना, रियाला जॉबवर जावं लागतं. सगळं घर त्याच सांभाळतात. स्वयंपाकाला बाई आहे, पण सासू सगळं स्वत:च्या देखरेखीखाली करवून घेतात.’’

‘‘मग हे तर खूपच छान आहे. आयता डबा मिळतो रियाला. यात तक्रार कशाला करायची? रियानं तर आनंदातच राहायला हवं.’’

‘‘कसली डोंबलाची आनंदात राहणार? तिला ते जेवण मुळीच आवडत नाही. ती तिच्या मैत्रीणीला आपला डबा देते अन् स्वत:साठी हॉटेलमधून लंच मागवते. बिच्चारी रिया…!’’

‘‘बिच्चारी…कशानं झाली? चांगला आयता घरच्या चांगल्या जेवणाचा डबा मिळतोय तर हॉटेलचं महागडं अन्  कुणीतरी केलेलं, कसलंतरी जेवण कशला मागवायचं?’’

तनूला राग आला, ‘‘तुला रियाची बाजू समजून का घेता येत नाही?’’

‘‘काही गरज नाहीए. काहीतरी खुसपटं काढून स्वत:चं अन् तुझं डोकं बिथरवून टाकतेय ती.’’

दोन दिवस तनू गप्प होती. मग पुन्हा तिचं सुरू झालं. ‘‘रियाच्या सासरची सगळीच माणसं दिल्लीला असतात. कुणा ना कुणाकडे सतत काही ना काही होतंच असतं. दीर, नणंदा, आत्या, काका, मावशी, मामा…कोण न् कोण सतत ते तिच्या घरी येतात नाही तर तर हिला तरी त्यांच्या घरी बोलावतात. रिया बिच्चारी कंटाळून जाते.’’

सुधाला कळतंच नव्हतं, रियाला त्रास काय होता. तिची नोकरी तशी आरामाची होती. शनिवार रविवार सुट्टी असायची. घरात अगदी कपाटं आवरून देण्यापासून सगळ्या कामांना गडी मोलकरीण होत्या. जायला यायला शोफर सकट गाड्या होत्या. तरीही तिला सगळ्याचा त्रासच व्हायचा. तनूची विचारसरणी बदलते आहे अन् ती रियाची नकारात्मक वृत्ती स्वीकारते आहे एवढंच सुधाला कळत होतं, खटकत होतं.

काही दिवस मध्ये गेले मग रजतचं स्थळ नक्की केलं गेलं. तनू आणि रजत भेटले. दोघांनी मोकळेपणानं गप्पा मारल्या अन् मग दोघांच्या पसंतीनुसार लग्न ठरलं. साखरपुडा वेगळ्यानं न करता लग्नच करणं जास्त सोयिस्कर होतं. कारण रजत मुंबईला एकटाच राहत होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना लग्नाची घाई होती.

लग्न थाटात पार पडलं. रिया नवऱ्याबरोबर लग्नाला आली होती. परत जाताना म्हणाली, ‘‘तनू तुझी मजाच मजा आहे गं! मुंबईला एकटी राहशील…मी तर भरल्या घरात अशी अडकले आहे ना?’’

सुधाला रियाचा राग आला. पण तो न दाखवता तिनं आहेर देऊन रियाला व अनुजला निरोप दिला. तनूनं लग्न ठरताच मुंबईला बदली व्हावी म्हणून अर्ज केला होता. तो मंजूर झाला आणि तिला मुंबईला बदलीही मिळाली. रजतची सुट्टी होती तेवढे दिवस तनू सासरच्या घरीच होती. थोरला दीर, जाऊ, त्यांची दोन मुलं, सासू सासरे सगळ्यांच्या संगतीत वेळ खूप छान गेला. भटकणं, हास्यविनोद, मनसोक्त खाणंपिणं अन् भरभरून प्रेम आणि कौतुक करणारी सासरची माणसं यांच्यात वेळ कसा गेला कळलंच नाही.

दोघांचीही रजा संपली तशी बॅगा भरल्या गेल्या. दोन्ही घरातली मंडळी निरोप द्यायला एयरपोर्टवर गेली होती. रियाही भेटायला आली होती. तनूला बाजूला घेऊन म्हणाली, ‘‘उगीच सर्वांना मुंबईला या, मुंबईला या म्हणू नकोस. येतील सगळेच्या सगळे अन् तुझ्याकडे मुक्काम ठोकतील.’’ तनूनं फक्त हसून विषय टाळला.

मुंबईला रजतबरोबर तनूचा नवा संसार सूरू झाला. रजतबरोबर ती अगदी मजेत होती. दोघंही सकाळी कामावर जायची ती रात्रीच घरी परतायची. वीकएन्डला थोडा निवांतपणा असायचा.

सकाळी लताबाई यायची अन् स्वयंपाकासकट सर्व आटोपून जायची. तनूही डबे करून घ्यायची. घर नीट आहे ना खात्री करून लॉक करून निघायची. तसं दोघांचं काम असं फारसं नसे. पण दमून आल्यावर नाश्ता रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा यायचा

रजतनं अनेकदा म्हटलं, ‘‘रात्रीच्या स्वयंपाकालाही बाई ठेवून घेऊयात.’’

‘‘पण आपली यायची वेळही रोजची ठरलेली नसते. बाईला किल्ली देऊन ठेवायला मला आवडत नाही.’’

‘‘ठीक आहे. रात्रीचा स्वयंपाक आपण दोघं मिळून करत जाऊ,’’ रजतनं सुचवलं. रियाशी रोजच तनुचं चॅटिंग चालायचं. तनुच्या स्वातंत्र्याचा रियाला हेवा वाटायचा. ती सतत आपल्या एकत्र कुटुंबाला नावं ठेवायची. लग्नाला सहा महिने झाले होते. रजतला ऑफिसकडून एक आठवडा सिंगापूरला ट्रेनिंगसाठी जायला लागणार होतं. त्यानं म्हटलं, ‘‘मी इथं नसताना तू एकटी पडशील, लखनैहून आईबाबांना बोलावून घेऊ का? नाही तरी अजून इथं आलेच नाहीएत ती दोघं.’’

‘‘आत्ता नको, आत्ता रियाला इथं येण्याची फार इच्छा आहे. तिला यावेळी येऊन जाऊ दे. पुढल्या वेळी आईबाबांना बोलावून घेऊ. चालेल?’’ तनूनं म्हटलं. रजतला काहीच हरकत नव्हती.

तनूनं लगेच रियाला फोन केला, ‘‘प्रोग्रॅम नक्की ठरला आहे. आता बदल करू नकोस. कुठलीही सबब सांगू नकोस.’’

‘‘नक्की येतेय…या गर्दीतून बाहेर पडायला आसुरलेले आहे मी. अगदी शांत, निवांत राहायचं आहे मला तुझ्याकडे.’’

ज्यादिवशी सकाळी रजत गेला त्याच दिवशी दुपारपर्यंत रियाही मुंबईत पोहोचली. एकमेकींच्या गळ्यात पडून दोघींनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या गप्पा अखंड सुरू होत्या. रात्री उशीरापर्यंत रिया बोलतच असायची. सासूसासरे, दिर नणंदा सगळ्यांबद्दल सांगायची. एकत्र होणारे सणवार, उत्सव, गेट टूगेदर काय अन् काय. दुसऱ्या दिवशी तनूनं रजा घेतली होती. सकाळपासूनच दोघी भटकायला बाहेर पडल्या. भरपूर फिरल्या. सिनेमा बघितला, शॉपिंग झालं. बाहेरचं खादाडी केली. रात्री उशीरा घरी परतल्या.

‘‘वॉव! असं वाटतंय दुसऱ्या जगात आलेय मी…! किती शांत अन् छान वाटतंय गं तुझ्या घरात. व्वा! खूपच मज्जा आली हं!’’ रिया म्हणाली.

तनू फक्त हसली…‘‘दमलोय आपण, आता झोपूयात. उद्या मला कामावर जायला लागेल. सकाळी लताबाई येईल अन् सगळं काम करून जाईल. तू आरामात ऊठ. लताबाई तुझ्यासाठी ब्रेकफास्ट अन् जेवणही करून ठेवेल.’’

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सर्व आवरून तनु ऑफिसला निघून गेली. बारा वाजता रियाचा फोन आला. ‘‘तनू अगं, काय सांगू, इतकी मज्जा येतेय, इतक्यात झोपून उठलेय. किती शांती आहे गं तुझ्या घरात, कुठला आवाज नाही, कुणी माणूस नाही…वॉव!’’

सुधाला, रिया मुंबईला आठ दिवसांसाठी आली आहे हे तनुकडूनच समजलं होतं, तिनं तनुला म्हटलं, ‘‘बघ, रियाच्या सासरची माणसं किती चांगली आहेत. आठ दिवस सुनेला पाठवून दिलीय मैत्रीणीकडे…रियाला चांगल्या माणसांची किंमत नाहीए.’’

रियानं आरामात उठून आवरलं. ब्रेकफास्ट घेतला. थोडावेळ टीव्ही बघितला. काही वेळ बाल्कनीत बसून रस्त्यावरच्या रहदारीची गंमत बघितली. मग मजेत अंघोळ ओटापून, जेवण करून पुन्हा मस्त ताणून दिली. सायंकाळी तनू घरी आल्यावर दोघींनी चहा घेतला, गप्पा चालूच होत्या. रिया म्हणाली, ‘‘तू सांग ना तुझं काही…मीच एकटी माझं सांगतेय.’’

‘‘माझेयाकडे सांगायला काहीच नाहीए, काय सांगू? आम्ही दोघंच ना इथे. सकाळी जातो ते रात्रीच येतो. आठवडा असा धावपळीत संपतो. त्यातल्या त्यात वीकएन्डला जरा आराम मिळतो. घरी बोलायलाही कुणी तिसरं माणूस नाहीए.’’

‘‘हो गं! पण किती शांतता आहे इथं. तिथं घरातून निघताना सासूबाईंच्या सूचना अन् घरात शिरताच त्यांचं चहा घेतेस ना? तुझ्या आवडीची थालपिठं केली आहेत. असं काही बाही बोलायला लागतात. मला तर दमायला झालंय माणसांच्या गराड्यात. रोजच काही ना काही चालू असतं.’’

तनुला आज प्रथमच रियाचं बोलणं खटकलं. तिला मनांतून एकाएकी फार उदास वाटलं. तिनं रात्रीचा स्वयंपाक केला. रिया बोलतच होती. मधून मधून तिच्या नवऱ्याचा अन् सासू सासऱ्यांचाही फोन येऊन गेला.

दोघी झोपायला बेडरूममध्ये आल्या. दोघींच्या मनात वेगवेगळे विचार होते. रिया मनांत म्हणत होती, ‘‘किती छान आयुष्य आहे तनुचं. घरात फक्त दोघंच. किती शांतता असते घरात. कुठलेच आवाज नाहीत. उगीचच बांलणं, सल्ले, विचारपूस नाहीए, कुठं जाते, काय खाल्लं, कोणी विचारणार नाही. आपल्या मनात येईल ते करावं…इकडे तनुच्या मनांत येत होतं, रिया म्हणते मज्जा आहे तुझी…एकटीच राहतेस…पण मला तर एकट्यानं राहण्यात काय मज्जा आहे तेच कळत नाही. इथं आमच्या दोघांखेरीज कुणी तिसरं माणूस नाही. सकाळी मेड सर्व्हंट येते मशीनप्रमाणे कामं उरकते अन् निघून जाते. आमची काळजी करणारं, प्रेमानं विचारपूस करणारं कुणीही नाही. माहेरी तीनच माणसं…मला तर केवढी हौस होती भरल्या घराची एकत्र कुटुंबाची. तिथं किती तऱ्हेची नाती मिळतात…सून, जाऊ, मामी, काकी, वहिनी…प्रत्येक नात्याची वीण वेगळी, मजा वेगळी. इथं वीकएन्डला एखादा सिनेमा बघतो, घरी आल्यावर दमलेलो असतो. विचारणांरही कुणी नाही. रियाला काय असं एकटं राहण्यात सुख वाटतं कुणास ठाऊक…दीरनणंदेची थट्टा चेष्टा मस्करी नाही. जावेची प्रेमळ कुरकुर नाही, सासूसासऱ्यांची प्रेमळ देखरेख अन् काळजी नाही…हे काय आयुष्य म्हणायचं?’’

दोघी एकमेकींच्या आयुष्याबद्दल विचार करत होत्या. तनुनं ठरवलं, उद्या सकाळी लखनौला फोन करायचा अन् सासरच्या माणसांना इथं यायचा आग्रह करायचा. तिकडची सगळी माणसं इथं यायला हवीत. आयुष्यात प्रत्येक नात्याचा आनंद उपभोगायला हवा ना? सहजच तिचं लक्ष रियाकडे गेलं. रियानंही त्याचवेळी तिच्याकडे बघितलं. दोघीही हसल्या.

रियानं विचारलं, ‘‘कसला विचार करते आहेस?’’

‘‘तुझ्याबद्दल अन् तू कसला विचार करत होती?’’

‘‘तुझ्याबद्दल विचार करत होते?’’

दोघीही हसल्या, तनुच्या हसण्यात सामावलेलं गूढ रियाला कळणारच नव्हतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...