कथा * प्राची भार्गवे

मनीष आपल्या पत्नीसोबत, मुक्तासोबत बाल्कनीत बसून चहा पित होता. दिवसभरात ऑफिसमध्ये घडलेल्या काही घटना तिला ऐकवत होता. मुक्ताही दिवस कसा गेला, काय, काय झालं ते सांगत होती. नुकतंच दोघांचं लग्न झालं होतं. नवा संसार सुरू झाला होता. दोघांनाही त्या नव्याची नवलाई अनुभवताना गंमत वाटत होती.

समोश्याचा घास घेत मनीषनं म्हटलं, ‘‘व्वा! चविष्ट समोसा, तोही तुझ्या हातचा अन् एयर फ्रायमध्ये तयार केलेला…म्हणजे रूचकर पदार्थ अन् तोही अत्यंत हेल्दी…खरोखर तू एक उत्तम पत्नी आहेस.’’

मुक्ता स्वत:ची स्तुती ऐकून लाजली. ती हसून काही बोलणार तेवढ्यात मनीषचा मित्र गोपाळ तिथं आला.

‘‘अरे? गोपाळ? ये ना, ये बैस. मुक्ता, गोपाळलाही चहा आवडतो.’’

मुक्ता तत्परतेनं स्वयंपाकघराकडे वळली.

‘‘अरे? मी येताच वहिनीला का आत पाठवलंस?’’ गंमतीनं मनीषच्या पाठीवर थाप देत गोपाळनं म्हटलं. ‘‘एका परीनं चांगलंच केलंस. मी तुला एक बातमी द्यायला आलो होतो. तुझी प्रिया तिच्या आईकडे परत आलीये. आज मला मार्केटात भेटली. तुझ्याबद्दल विचारत होती. तुझा फोननंबर मागितला. म्हणाली, तिचा मोबाइल चोरीला गेल्यामुळे तिच्याकडे आता कुणाचेच नंबर नाहीएत…’’

गोपाळ पुढेही काहीबाही सांगत होता, पण मनीषला काहीच ऐकू येत नव्हतं. तो भूतकाळात जाऊन पोहोचला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचं सगळं आयुष्य, त्याचं अवघं अस्तित्व याच नावाभोवती फिरत होतं. त्याची प्रिया, त्याचा प्राण, त्याचं पहिलं प्रेम…

कमलाकरनं दिलेल्या पार्टीत त्या दिवशी प्रत्येकाची नजर प्रियावर खिळलेली होती. मनीषचा स्वभाव लाजराबुजरा असल्यामुळे तो फक्त लांबूनच तिच्याकडे बघत होता. पार्टी संपली तेव्हा प्रत्येकानं आपापल्या घरी परतण्याची तयारी सुरू केली. कुणीतरी म्हणालं, ‘‘प्रियाचं घर मनीषच्या वाटेवर आहे.’’ प्रियाला घरी पोहोचवण्याची जबाबदारी ओघानंच मनीषवर आली आणि त्यानं ती आनंदानं स्वीकारली. प्रियाचं सौंदर्य, स्मार्टनेस आणि अवखळपणानं तोही वेडावला होताच. प्रिया कॉलेजात शिकतेय हे त्याला समजलं. कॉलेज संपवून तो प्रशासनिक सेवापरीक्षेच्या तयारीला भिडलाय हे त्यानं प्रियाला सांगितलं.

‘‘म्हणजे तू खूपच हुषार आहेस तर? मला अभ्यासात अडचण आली तर मी तुला विचारू शकते का?’’

‘‘केव्हाही ये.’’ मनीष तात्काळ उत्तरला. आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे, तसं झालं.

मनीष आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिल नोकरीच्या निमित्तानं दुसरीकडे असायचे. आई अगदी साधीशी…प्रिया मनीषच्या खोलीत अभ्यासासाठी बराच वेळ बसते यात तिला काही गैरही वाटलं नाही. प्रियाकडे तर मनीष केव्हाही जाऊ शकत होता. प्रियाची आई घटस्फोटिता होती अन् ती दिवसभर कुठं ना कुठं भटकत असायची.

प्रिया अन् मनीषची मैत्री झपाट्यानं वाढत होती. वयाचाही दोष होताच…लहान अवखळ वय, स्वप्नं बघण्याचं…‘आय लव्ह यू’ हे शब्द न उच्चारताच दोघांनी आपल्या भावना एकमेकांना सांगून टाकल्या. दिवसाचा बराचसा वेळ दोघं एकत्रच असायची अन् उरलेला वेळ व्हॉट्सअॅपवर. प्रिया मनीषच्या प्रत्येक बाबतीत होकारच द्यायची. मनीष तिला सतत भेटवस्तू द्यायचा. कपडे, नेलपॉलिश, लिपस्टिक, परफ्यूम एवढंच काय, तिला ऑनलाइन शॉपिंग करता यावं म्हणून त्यानं तिला क्रेडिट कार्डही दिलं होतं. मनीषच्या संकोची व लाजाळू स्वभावामुळे मनीष तिला स्पर्शही करत नसे. पण त्यानं काहीही केलं असतं तरी तिची हरकत नव्हती. तरीही एका दुपारी प्रियानं मनीषला देह समर्पित केला. त्या प्रसंगानंतर मात्र मनीषला प्रियाखेरीज काहीच सुचेनासं झालं.

‘‘प्रिया, मी तुझ्यावाचून जगूच शकत नाही. तू माझ्या आयुष्यात नव्हतीस तेव्हा माझं आयुष्य किती भकास होतं. तू माझ्या आयुष्यात सप्तरंगांची उधळण केलीस.’’ मनीष म्हणायचा. त्यानं तिच्यावर कविताही केली होती.

माझ्या डोळ्यांनी माझं जगणं अवघड केलं आहे. उघडे असतात तेव्हा केवळ तुलाच शोधतात आणि मिटले की फक्त तुझीच स्वप्नं बघतात.

या प्रेमामुळे मनीषच्या अभ्यासावरही परिणाम झाला होता. तो मन लावून अभ्यास करू शकत नव्हता. फक्त प्रिया आणि प्रियाच! परिणाम व्हायचा तोच झाला. तो यूपीएससीच्या परीक्षेत नापास झाला. एव्हाना मनीषचे वडिल रिटायर झाले होते. त्यांच्या पेन्शनमध्ये घरखर्च भागवावा लागत होता. त्यामुळे आता मनीषचा पॉकेटमनी, क्रेडिट कार्ड वगैरे सर्व बंद झालं होतं.

मनीषचे मित्र त्याला भेटायला, त्याला धीर द्यायला आले होते. त्यांच्याबरोबर प्रियासुद्धा आली होती. पण तिच्या चेहऱ्यावर दु:ख किंवा अपराधीपणाची भावना नव्हती. उलट जेव्हा मनीषच्या एकदोन मित्रांनी थेटपणे म्हटलं की प्रियाच्या संगतीत अधिक वेळ घालवल्यामुळे मनीष नापास झाला, तेव्हा निर्लज्जपणे हसून ती म्हणाली होती की एक तर तो नापास झाला अन् वरून दोष कुणा दुसऱ्याच्याच माथी मारला जातोय? वा रे न्याय? तिच्या सुरात सांत्वन नव्हतं तर उपेक्षा अन् धिक्कार होता.

त्याक्षणी खरं तर मनीषला तिचा खूप राग आला होता, पण प्रियाचा अल्लडपणा मानून त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. अजूनपर्यंत त्यानं तिला लग्नाबद्दल विचारलंही नव्हतं. त्यानं स्वत:च्या मनाची समजूत घातली की जेव्हा लग्न होईल तेव्हा तिला कळेल की एकाची जबाबदारी दुसराही आपलीच जबाबदारी समजतो. त्याला खात्री होती, प्रियाच्या संगतीत तो खूप समाधानी अन् यशस्वी होईल. त्यामुळे त्यानं एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली.

प्रिया एकदम स्तब्ध झाली. मग तिनं अगदी स्पष्टच सांगितलं, ‘‘मनीष, भलतंच काय बोलतो आहेस? मला तू आवडतोस हे जरी खरं असलं तरी लग्न करायची काय गरज आहे? मी तुझाच तर आहे ना?’’ ‘‘पण प्रिया, असं कुठवर चालेल? माझ्या आईवडिलांना लग्न करून घरात सून यायला हवी आहे. तुझ्या आईचाही विचार कर, तिलाही तुझ्या लग्नाची काळजी असेलच ना? मला आत्ताच एक बऱ्यापैकी नोकरीही मिळते आहे. आपण त्यात भागवू शकू.’’ मनीषनं समजावलं.

‘‘बऱ्यापैकी नोकरी? समजून घे मनीष, अरे संसाराला भरपूर पैसा लागतो. पैशाशिवाय जगणार कसं? तू बघ हल्ली तू मला काही गिफ्ट देत नाहीस, हॉटेलात नेत नाहीस, शॉपिंगला नेत नाहीस…मग लग्नाचा विचार कसा करायचा? आणि लग्न म्हणजे घर सांभाळा, स्वयंपाक करा, मुलं जन्माला घाला, त्यांना वाढवा, संसाराची काळजी करत आयुष्य जगा हे सगळं मला मान्य नाही. मला तिटकारा आहे त्याचा. मी स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. माझ्या आईकडे बघ, कशी स्वतंत्र, एकटी अन् मजेत जगते आहे, मलाही तसंच आयुष्य हवंय.’’

प्रियाच्या या उत्तरानं मनीष गप्पच झाला. पण त्या दिवसानंतर मनीषला लक्षात आलं की प्रिया त्याला टाळते आहे. तिची वागणूकही बदलली आहे. किती किती दिवस ती त्याला भेटत नसे. फोनही करत नसे. कधी कुठं अवचित भेट झालीच तर भांडायच्या सुरातच म्हणायची, ‘‘एवढंच ओळखलंस का रे तू मला? मी तुला विसरू शकत नाही मनीष, एक वेळ मी स्वत:ला विसरेन. पण तू तर माझ्या प्रत्येक श्वासात मिसळला आहेस रे…’’

ती मनीषला इमोशनली ब्लॅकमेल करायला बघायची. मनीषला वाटे, तिला विचारावं, इतकं जर प्रेम करतेस माझ्यावर तर ते दिसत का नाही तुझ्या डोळ्यात? जाणवत का नाही तुझ्या वागण्यात? पण तो बोलत नसे. त्याला भीती वाटे की प्रिया जर दुखावली गेली तर कदाचित संगळंच संपेल. तो थांबायला तयार होता. पण प्रियाबरोबर आयुष्य घालवण्याचं त्याचं सोनेरी स्वप्नं त्याला भंगू द्यायचं नव्हतं.

प्रियाला मिळवायचं तर मला आधी स्वत:ला सिद्ध करावं लागेल हे विचारात घेऊन त्यानं पुन्हा प्रशासनिक सेवेच्या परीक्षेची तयारी सुरू केली. जीव तोडून तो अभ्यास करत होता. कधीतरी प्रियाशी थोडंफार फोनवर बोलला की त्याला अभ्यासाला हुरूप यायचा.

एक दिवस प्रियानं सांगितलं की ती तिच्या मामाकडे जात आहे. खरं तर तिला तिथं जायची इच्छा नाहीए, त्याच्याशिवाय तिला तिथं करमायचं नाही. पण हे सगळं ती त्याच्यासाठी करते आहे. त्याच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणूनच ती इथून दूर जाते आहे. ‘‘मनीष, ही आपल्या प्रेमाचीही परीक्षा आहे. आपण त्यात उत्तीर्ण व्हायला हवं.’’ तिनं त्याला बजावलं.

मनीषला हे पचवणं फार जड गेलं. पण इलाज नव्हता.

प्रिया मामाकडे निघून गेल्यावर तर मनीषचा कशातच जीव रमेना. त्याला सतत तिची आठवण यायची. पण काळ सतत पुढे जात असतो. परीक्षा जवळ आली होती. मनीष अभ्यासाला भिडला. पण रोज तो तिच्या पत्राची वाट बघायचा. तीन महिन्यांनी प्रियानं पत्र पाठवलं. पत्रात खूप काही लिहिलं होतं. मनीषशिवाय प्रिया कशी अपूर्ण आहे, तिला किती आठवण येते. रात्री झोपही लागत नाही वगैरे वगैरे…हे सगळं वाचून मनीषचे डोळे भरून आले. त्यानं स्वत:लाच दूषणं   दिली…का म्हणून तो प्रियावर अविश्वास दाखवतो? प्रत्येकाची प्रेम करण्याची, व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. त्यातून प्रिया एक मुलगी आहे. तिला काही मर्यादा पाळावीच लागते. मुलींना व्यक्त होताना संकोच वाटतो, लाजही वाटते आणि काही गोष्टी न बोलताही समजून घ्यायच्या असतातच ना? ती खरोखर प्रेम करते आहे. तिच्यावर अविश्वास नको दाखवायला. प्रियाचे प्रिय पात्र आपण आहोत! याचा त्याला अभिमान वाटला.

यथावकाश परीक्षा आटोपली. रिझल्टही आला. त्याच्या या यशानं आईवडिल आनंदले. त्यांनी घरीच एक छोटीशी पार्टी ठरवली. सगळे मित्र जमले. मनीषला प्रियाची फार आठवण येत होती. ही बातमी त्याला स्वत: प्रियाला सांगायची होती. तिला किती आनंद होईल या कल्पनेनंच तो रोमांचित होत होता.

त्यानं कमलाकरकडे प्रियाचा पत्ता मागितला. कमलाकर जसा मनीषचा मित्र होता, तसाच प्रियाचाही मित्र होता. मनीषनं म्हटलं, ‘‘ही बातमी प्रियालाही सांगायची. खरं तर आम्ही लग्न करणार आहोत. माझ्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून प्रिया इथून निघून गेली. एकमेकांपासून दूर राहून आम्ही खरोखर एक फार मोठी परीक्षा दिली आहे. प्रियानं माझ्या यशासाठी किती मोठा त्याग केला आहे. आता मला चांगली नोकरी लागेल.’’

कमलाकर गंभीरपणे म्हणाला, ‘‘मनीष, तुझ्यासारखा समंजस अन् हुषार मुलगा प्रियासारख्या फुलपाखरी वृत्तीच्या मुलीच्या जाळ्यात कसा अडकला याचं आम्हा सर्वांनाच फार आश्चर्य वाटायचं. उडत्या मैत्रीसाठी प्रिया ठीक आहे रे, पण लग्न? अशक्य! स्वत:च्या पायावर कुऱ्हाड नको मारून घेऊस.’’

नंतर बराच वेळ कमलाकर मनीषशी बोलत होता. त्यानं प्रियाबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून मनीष स्तब्ध झाला.

‘‘प्रियाचे अनेक प्रियकर आहेत. अनेकांशी तिचे जवळीकीचे संबंध आहेत. तिची आईही तशीच आहे.’’

मनीषचा विश्वास बसत नव्हता. त्याची प्रेमनायिका एकाएकी खलनायिका झाली होती. कमलाकर सांगतोय ते खरं आहे का? की प्रियासारखी मुलगी त्याच्याशी लग्न करत नाही म्हणून तो खोटंनाटं सांगतोय? पण कमलाकर असा नाहीए. हा निर्णय मनीषच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा निर्णय होता. तो तडकाफडकी नको घ्यायला.

त्यानं आडून आडून अनेक लोकांकडे प्रियाची चौकशी केली. त्याला धक्काच बसला. किती लोकांना तिच्याबद्दल काय काय माहीत होतं अन् प्रियाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या मनीषला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. प्रियानं अनेक मुलांना गंडवलं होतं. अनेकांचे जीव पोळले होते. प्रियाला श्रीमंती, सुखासीन आयुष्य हवं होतं. त्यासाठी ती नवे नवे लोक हेरत असायची.

आता कदाचित मनीषचं यश, मिळणारी मोठी सरकारी नोकरी यामुळे कदाचित प्रिया लग्नाला हो म्हणेलही…पण आता मनीष सावरला होता. उघड्या डोळ्यांनी माशी पडलेलं दूध तो कसा पिणार? इकडे आईवडिलांनी लग्नाचा धोशा लावलेला.

शेवटी मनीष आईवडिलांबरोबर एक मुलगी बघायला गेला. मुलगी सुंदर होती. शिकलेली, शालीन होती. घरदार आईबाबांनी आधीच पारखून घेतलेलं. मुलगा, मुलगी, दोन्ही कडचे घरचे लोक सर्वांच्या पसंतीनं, सहमतीनं लग्न ठरलं. मनीषनं मुक्ताला भेटायची परवानगी मागितली. त्याला तिच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. मुक्ता खूपच संकोचली होती.

मनीषनं बोलायला सुरूवात केली, ‘‘आपण दोघांनी एकत्र आयुष्य काढण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा मला तुला काही सांगायचं आहे. तू शांतपणे ऐकून घे अन् मगच निर्णय सांग. तुझा निर्णय मला मान्य असेल.’’ मग मनीषनं तिला त्याच्या आयुष्यातलं प्रिया प्रकरण प्रामाणिकपणे सांगून टाकलं.

मुक्ता शांतपणे ऐकत होती. मनीषचं बोलणं ऐकल्यावर काही क्षण ती शांत बसली होती. मग हसून म्हणाली, ‘‘चला, कडू का होईना पण प्रेमाचा एक अनुभव तुम्हाला घेता आला…आता निदान आपण प्रेमच केलं नाही, करू शकलो नाही, ही खंत मनात राहणार नाही. मलाही वाटायचं, आपण लव्ह मॅरेज करावं…पण आमच्याकडे तर मुलींनी मान वर करून बघणंही निषिद्ध आहे…’’

‘‘म्हणून तू उदास आहेस का?’’

मुक्ता बोलली नाही पण तिच्या डोळ्यांनी होकार दिलाच.

‘‘तू मोकळेपणानं बोललीस हे छान झालं. मला आवडलं. आपल्यात आता कोणात्याही प्रकारचा संकोच नसावा.’’

‘‘खरं तर मलाही प्रेमात पडण्याचा, त्या वेडेपणाचा आनंद उपभोगावा असं वाटायचं, कसं वाटतं प्रेम करताना, तो अनुभव घ्यायचा होता. प्रेमात आयुष्य बदलून टाकण्याची शक्ती असते म्हणे…’’ बोलता बोलता मुक्ता थांबली अन् जीभ चावून म्हणाली, ‘‘क्षमा करा हं! वेड्यासारखी काहीबाहीच बोलले मी…’’

पण मनीषला तिचं ते भाबडेपण अन् प्रामाणिकपणा खूपच आवडला. मनीषनं प्रेमात पडण्याचा अनुभव घेतला होता आणि आता तो आईवडिलांनी निवडलेल्या मुलीशी ‘अरेंज मॅरेज’ करत होता. मुक्ताला स्वत:च्या मनानं प्रियकर निवडून प्रेम करण्याची संधीच मिळाली नव्हती.

त्या क्षणापासून मनीषनं मुक्ताच्या आयुष्यात प्रेमाचा रंग भरायला सुरूवात केली. तिला प्रेमविवाहाचा आनंद मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागला. मुक्तालाही मनीषच्या रूपात प्रियकर मिळाला. लग्न होईपर्यंतचा काळ तिनं एका वेगळ्याच धुंदीत काढला. तिलाही वाटायला लागलं की आपलं ‘लव्ह मॅरेज’ आहे.

म्हणतात ना, लग्नाच्या गाठी आधीच बांधलेल्या असतात…नंतर फक्त लग्नं होतात. मनीष अन् मुक्ताची लग्नगाठ आधीच ठरलेली होती. एकमेकांना खरोखरच दोघंही अगदी अनुरूप अन् परस्पर पूरक होती.

ज्यामुळे मनीषचं जग डोलत असे, आंदोलित होत असे. त्याच भूकंपाची बातमी घेऊन गोपाळ आत आला होता. पण मनीष आता अगदी शांत आणि स्थिर होता. त्याचं जग आज आनंद आणि समाधानाच्या हिंदोळ्यावर झुलत होतं अन् त्याची दोरी मुक्ताच्या हातात होती. दोघंही प्रेमाच्या सप्तरंगी उधळणीत न्हाऊन निघाली होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...