कथा * मीरा सिन्हा

गगन यांचा बालपणापासूनचा मित्र. आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडल्यापासून माझा नवरा आशीष पुन्ह:पुन्हा म्हणत होता, ‘‘मला समजंतच नाहीए, संकर्षण किती गगनसारखा दिसतो, बोलतो, वागतोसुद्धा. जणू तो त्याचाच मुलगा असावा…नाक आहे तुझ्यासारखं, पण माझं तर त्याच्यात अगदीच काही जाणवंत नाही.’’

मी म्हटलं, ‘‘नाही कसं? तो तुमच्यासारखाच कुशाग्र बुद्धीचा आहे अन् थोडा संतापीसुद्धा…गगनभाऊ अगदीच शांत वृत्तीचे आहेत.’’

‘‘हो पण, आपला मुलगा म्हटल्यावर तो थोडा तरी माझ्यासारखा दिसायला हवा ना?’’

‘‘तुम्हाला सांगू का? माणसाचं व्यक्तिमत्त्व घडतं ते घरातल्या वातावरणामधून, घरातल्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातून. जन्मल्याबरोबर मी त्याला श्रुतीच्या ओटीत घातला. त्या क्षणापासून तो त्यांच्या घरात, त्यांच्या संगतीत वाढतोय…त्याच्यावर त्याच घरातले, त्याच वातावरणातले संस्कार झालेत. दुसरं म्हणजे अपघातानं तो आपल्या कुटुंबात येऊ घातला होता. पण माझ्या मनांत आलं, श्रुतीला बाळ होऊ शकत नाही, तेव्हा हे बाळ मी माझ्या पोटात वाढवून श्रुतीच्या ओटीत टाकेन. तिलाही आई होण्याचं सुख मिळेल. माझ्या मनांत सतत श्रुती अन् गगन भाऊंचेच विचार असल्यामुळेही कदाचित तो आपल्यापेक्षा वेगळा झाला असेल…’’ मी म्हटलं.

‘‘हो…तेही खरंच, पण सीमा तू खरोखरंच महान आहेस हं! आपलं बाळ असं निर्लेज मनानं दुसऱ्याला देणं सोपं नाही.’’

‘‘खरंच, पण तुम्हाला सांगू का? श्रुती वहिनी अन् गगनभाऊंचं दु:ख मला बघवंत नव्हतं. तुम्ही त्यावेळी इथं नव्हता. पण श्रुतीला झालेलं ते भयंकर बाळ त्याचा मृत्यू…ते सगळं फारच भयंकर होतं. मी ते बघितलंय, अनुभवलंय श्रुतीची परिस्थिती बघून तर जीव इतका कळवळायचा…अन् त्या दोघांनी आपल्यासाठी खूप केलंय…त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो याचं फार समाधान आहे.’’

‘‘हो, हे मात्र खरं, गगन अन् वहिनी कधी परके वाटलेच नाहीत. पण तरीही आपलं बाळ दुसऱ्याला देणं इतकं सोपं नसतं. मला तर वाटत होतं की ते बाळ आपण परत आपल्याकडे आणूयात.’’

‘‘छे: छे:, भलतंच काय बोलता? श्रुती अन् गगनभाऊंचा मनांचा विचार करा. त्यांचं तर सर्व आयुष्य त्या बाळाभोवती फिरतंय. एक क्षण त्याच्या वाचून ती दोघं राहू शकत नाहीत.’’

‘‘होय, तेही खरंच अन् संकर्षणला आपण त्याचे आईबाप आहोत हे कुठं ठाऊक आहे. तो त्यांनाच आपले आईबाबा मानतोय.’’ आशीषनं म्हटलं.

देवाची कृपा म्हणायची की माझ्या नवऱ्याला काही संशय आला नाही. मी तर मनांतून खूपच घाबरले होते की आशीषला कळंतय की काय की संकर्षणचे वडील तो नाही, गगनच आहे म्हणून. आमच्या सतरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मी ही एकमेव गोष्ट नवऱ्यापासून लपवली होती अन् आहे. हे रहस्य लपवून मी इतकी वर्षं आशीषबरोबर संसार करतेय. आम्ही व्यभिचार केला नाही. माझ्यावर बळजबरी झाली नाही…परिस्थितीच अशी होती की मी व गगन एकत्र आलो व संकर्षणचा गर्भ माझ्या पोटात रूजला. मात्र हे रहस्य आम्ही दोघांनी प्राणपणानं जपलं म्हणूनच दोन आनंदी संसार आजही सुखानं आयुष्य जगताहेत.

गगन यांचा लहानपणापासूनचा मित्र. गगन हडकुला, शांत, अभ्यासात बेतासबात तर आशीष अंगपिडानं सुदृढ, थोडा संतापी अन् विलक्षण हुषार. दोघांच्या घरची परिस्थितीही खूपच भिन्न. गगन अगदी गरीब कुटुंबातला तर आशीष उच्च मध्यम वर्गीय. पण इतका फरक असूनही या दोघांची मैत्री कुणीही हेवा करावा अशी होती. गगनला कुणी काही वेडंवाकडं बोलून गेला तर आशीष त्याला असा धडा शिकवायचा की दुसरा कुणी गगनला त्रास देण्याचा विचारही मनांत आणणार नाही. आशीषचं प्रत्येक वाक्य गगनसाठी वेद वाक्य होतं. त्याच्या शब्दाबाहेर तो कधी जात नसे.

कालचक्र फिरत होतं. आशीषची निवड आयएएसाठी झाली. गगननं छोटासा व्यवसाय सुरू केला. त्याला त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी आर्थिक पाठबळ दिलं. आशीष शिकत असतानांच सासूबाईचं निधन झालं होतं. त्यावेळी गगनच्या आईनं आशीषला आईची उणीव भासू दिली नव्हती. माझे सासरे तर म्हणायची त्यांना दोन मुलगे आहेत. आशीष आणि गगन.

सुर्दैवानं दोघांची लग्नंही मागेपुढे झाली अन् मी आणि श्रुती या कुटुंबात दाखल झालो. दुधात साखर विरघळावी तशा आम्ही दोघी या दोन पण एकत्र कुटुंबात रमलो. श्रुतीचं अन् माझं छान पटायचं. आम्हा चौघांची ती निखळ, निर्मळ मैत्री अन् परस्परांवरील विश्वास आणि माया बघून सगळ्यांना नवल वाटायचं.

माझ्या आणि श्रुतीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत खूप फरक होता. तरीही आम्ही चौघं अभिन्न मित्र होतो. आशीषच्या अनेक ठिकाणी बदल्या व्हायच्या. मला त्यांच्यासोबत जावं लागायचं. माझे सासरे त्यांचं गाव, त्यांचं घर सोडून रहायला नाखूष असायचे. थोडे दिवस ते आमच्याकडे येऊन राहत असत. पण एरवी ते घरीच रहायला बघत. अशावेळी श्रुती आणि गगन त्यांची काळजी घेत होते. आम्ही दोघं नाही अशी जाणीवही ते माझ्या सासऱ्यांना होऊ देत नव्हते.

आम्हाला दोन मुलं झाली पण श्रुतीला अजून मूल झालं नव्हतं. तिला दिवस रहायचे पण गर्भपात व्हायचा. डॉक्टरांच्या मते तिचं गर्भाशय गर्भ वाढवून, पोसून पूर्ण वाढीचं मूल जन्माला घालण्याएवढं सक्षम नव्हतं. दर गर्भापातानंतर दोघंही इतके हिरमुसून जात की आम्हालाही वाईट वाटायचं. गर्भपात अन् मानसिक धक्का, डिप्रेशन यामुळे श्रुतीची तर तब्येत खूपच खालावली होती. डॉक्टर म्हणाले, ‘‘स्वत:च्या मुलाचा नाद सोडा, मूल दत्तक घ्या किंवा सरोगेशनचा मार्ग निवडा.’’ पण दोन्ही उपाय दोघा नवरा बायकोला मान्य नव्हते.

गगन म्हणायचा, ‘‘मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय, तर श्रुतीला बाळ का होणार नाही. इथल्या डॉक्टरांना कदाचित तेवढं ज्ञान नसेल. मी देशातल्या सर्वात मोठ्या गायनॅकोलजिस्टला दाखवेन. त्यांच्या उपचारानं श्रुतीला नक्कीच बाळ होईल.’’

खरंच गगननं दिल्लीतल्या नामंकित डॉक्टकडे श्रुतीला दाखवलं. त्यांनी म्हटलं, ‘‘थोडा वेळ लागेल, पण आपण प्रयत्न करू. नेमकं याच वेळी आशीषला डेप्युटेशनवर तीन वर्षांसाठी लंडनला जावं लागलं, सासरे बरेच आजारी होते. मुलांना एकदम शाळेतून काढता येत नव्हतं. त्यामुळे मी घरीच होते. आशीष एकटेच लंडनला गेले. श्रुती मला आग्रह करत होती की ती सासऱ्यांची काळजी घेईल, मीही लंडनला जावं, पण मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न होताच.’’

आशीष लंडनला गेल्यावर काही दिवसांतच सासरे वारले. आशीष जेमतेम अत्यंसंस्कारां पुरता येऊन गेला. त्याचवेळी श्रुतीला पुन्हा दिवस गेले. डॉक्टरांनी खूप जपायला सांगितलं होतं. संपूर्ण बेड रेस्ट घ्यायची होती. गगन, त्याची आई अन् मी सर्वत्तोपरी श्रुतीची काळजी घेत होतो.

गर्भातल्या बाळाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड वगैरे टेस्टही करू नका म्हणून सांगितलं होते. श्रुतीच्या पोटात बाळ वाढत होतं. नऊ महिने पूर्ण झाले. आम्ही सगळेच खूप उत्सुकतेनं बाळाच्या आगमनाची वाट बघत होतो.

श्रुतीला कळा सुरू झाल्या. सगळं नॉर्मल आहे असंच वाटत होतं. मीही माझ्या मुलांना एका नातलगांकडे पोहोचवून श्रुतीजवळच थांबले होते. पण श्रुती कळा देऊन थकली तरी बाळ बाहेर येईना. पाच दिवस डॉक्टरांनी वाट बघून शेवटी सिझेरियनचा निर्णय घेतला. ऑपरेशन करून जे बाळ जन्मला आलं ते अगदी भयानक होतं. त्याला दोन  डोकी, तीन हात होते. त्यानं इतक्या मोठ्यानं टाहो फोडला की तिथल्या नर्सेस घाबरून पळून गेल्या.

डॉक्टरही चकित झाले, गांगरले…आम्ही तर सुन्न झालो होतो. सुर्दैवानं ते मूल अर्ध्या तासातच गेलं. श्रुती बेशुद्ध होती. गगनच्या आईला मी धरून बसले होते. त्या एकदम खचल्या होत्या.

गगन बाळाचा दफनविधी आटोपून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. तो इतका थकलेला, असहाय आणि दयनीय दिसत होता की त्याला बघून माझ्या डोळ्यात अश्रूच आले.

गगनची अवस्था पाहून त्याची आई एकदम सावरली. गगनला तिनं पोटाशी धरलं…धीर दिला. मला म्हणाली, ‘‘सीमा, तू गगनला घेऊन घरी जा. त्याला या क्षणी निवांतपणा अन् विश्रांती हवीय. मी इथं श्रुतीजवळ थांबते. इतका त्रास सहन केला पोरीनं पण देवानं तिला सुख दिलं नाही…’’ त्यांनी डोळ्याला पदर लावला.

मी त्यांनी थोपटून शांत केलं. तोवर गगन बाहेर व्हरांड्यात जाऊन उभा राहिला होता. मी लगेच त्याच्याकडे गेले. हॉस्पिटलच्या बाहेरच रिक्शा उभ्या होत्या. आम्ही रिक्शानं घरी पोहोचलो.

घरात गेल्यावर मी गगनच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी गगनच्या भावनांचा बांध फुटला अन् तो धो धो रडू लागला. त्याची मन:स्थिती मला समजत होती. नऊ महिने श्रुतीची काळजी घेतली. कुठेही हयगय केली नाही…किती ताण असेल मनांवर अन् ती शुद्धीवर आल्यावर आता तिला काय सांगायचं हा पण ताण…

‘‘श्रुतीला हा धक्का सहन होईल का? मी काय करू? कसा तिला सामोरा जाऊ? मीच अभागी आहे…’’ त्याचं रडणं, त्याची विकलता, त्याचं ते मोडून पडणं मलाही बघवत नव्हतं. त्याला कसं शांत करू तेच समजत नव्हतं. शब्द नव्हते बोलायला…मी त्याला जवळ घेऊन थोपटंत होते. रडण्याच्या आवेगात गगननं मला गच्च मिठी मारली. एकमेकांच्या बाहुपाषानं आम्ही झोपी गेलो. मी ही मनानं आणि शरीरानं गेल्या काही दिवसात खूप दमले होते. त्या क्षणांत अगदी नकळत पुरूष अन् प्रकृती, नर आणि मादीचं मिलन झालं. ते वासनांचं तांडव नव्हतं, तो व्यभिचार नव्हता. ती जोडीदाराची फसवणूकही नव्हती. जे घडलं ते जरी समर्थनीय नव्हतं तरी दुर्दैवाच्या रट्यानं खचलेल्या, भंगलेल्या देहमनाला आधार देताना घडलेली एक नैसर्गिक घटना होती. भानावर आल्यावर आम्ही दोघंही ओशाळलो…पण तो विषय तिथंच संपला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गगन श्रुतीला घेऊन कुठल्याशा रम्य ठिकाणी काही दिवस राहणार होता. त्याची आई तिच्या भावाकडे हवापालट म्हणून गेली होती अन् अचानक आशीष लंडनहून परत आले. त्यांना तिथं खूप छान नोकरी मिळाली होती. सरकारी नोकरीचा राजिनामा सहजच मंजूर झाला होता. मुलांच्या शाळांचाही प्रश्न सुटला होता. आता आम्हाला न्यायलाच ते आले होते. मला खरं तर परदेशात जायची इच्छा नव्हती पण आशीषला तिथलं वातावरण, मिळणारा भरपूर पैसा, श्रीमंती या सगळ्याची भुरळ पडली होती. आशीष आल्यावर इतक्या दिवसांच्या विरहाचं उट्टं त्यांनी काढलंच. खूप दिवसांनी त्यांचा सहवास मलाही सुखवंत होता अन् माझ्या लक्षात आलं…माझी मासिक पाळी चुकली आहे…

आशीषला कळलं तर तो आश्चर्यानं म्हणाला, ‘‘अगं, पण इतकी काळजी घेत होतो आपण…तरीही…?’’

त्याच्या डोळ्यात बघत मी म्हटलं, ‘‘उपासाचं उट्टं काढत होता तुम्ही…तेव्हा कदाचित…’’

त्यांनी भुवया अन् खांदे उचकले.

मला मनांतून खात्री होती हे बाळ गगनचं आहे. पण मी म्हटलं, ‘‘आता काय करायचं?’’

किंचित विचार करून आशीषनं म्हटलं, ‘‘अॅबोरशन करून घ्यावं. नव्या ठिकाणी मुलांना, स्वत:ला सेटल करताना तुला खूप अडचण येईल…आता आपल्याला बाळ तसंही नकोय…’’

मीही विचार करत होते. काही वेळानंतर मी म्हटलं, ‘‘श्रुतीला यापुढे मूल होणार नाही. ती खूप डिप्रेशनमध्ये आहे. बाळाचं आगमन तिचं डिप्रेशन दूर करेल असं मानसोपचारवाले डॉक्टर सांगातहेत. आपण हे बाळ तिला दिलं तर?’’

‘‘तुला वेड लागलंय का? आपलं मूल दुसऱ्याला कसं देता येईल?’’

‘‘काय हरकत आहे? श्रुती अन् गगन आपल्याला परके नाहीत…तसंही हे मूल आपल्याला नकोय, तुम्हीच म्हणालात अॅबॉरशन करून घे म्हणून…मग जर हे बाळ जन्माला घालून त्या दोघांच्या ओटीत घातलं तर बालहत्त्येचं पातक नको शिवाय श्रुती, गगन, त्याची आई…सगळ्यांनाच किती आनंद होईल विचार करा. मला नऊ महिने गर्भभार वहावा लागेल…प्रसुती वेदना सोसाव्या लागतील पण श्रुतीसाठी, काकींसाठी आणि गगनभाऊंसाठी मी ते करायला तयार आहे.’’

‘‘पण गगन अन् श्रुतीला ते मान्य होईल का?’’

‘‘विचारून बघू, मग निर्णय घेऊ…’’

आम्ही जेव्हा श्रुतीला व गगनला, काकींना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांचा विश्वास बसेना.

‘‘असं कसं होईल?’’ गगननं म्हटलं.

‘‘तू तुझं बाळ मला देशील?’’ श्रुतीचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

‘‘असं समज की तुझंच बाळ आहे फक्त माझ्या गर्भात वाढतयं. देवकीचा बलराम जसा रोहिणीच्या गर्भात वाढला तसा. पुराणात या विधीला संकर्षण नाव दिलंय. हे बाळ जर मुलगा झाला तर त्याचं नांव संकर्षण ठेवा. तुमच्या मायेत तो मोठा होईल. तुम्हाला आईबाबा म्हणेल…तो तुमचाच मुलगा ठरेल.’’ मी श्रुतीच्या पाठीवर हात ठेवून तिला समजावलं.

आपल्या घरात बाळ येणार या कल्पनेनंच श्रुतीचे डोळे आनंदानं चमकले.

‘‘खरंच? वहिनी. खरंच तुमचं बाळ तुम्ही मला द्याल?’’

‘‘अगदी खरं, तुम्ही आम्हाला परके आहात का? असं समज, तुझं बाळ मी फक्त माझ्या पोटात सांभाळते आहे, वाढवते आहे…जन्माला आलं की तुझं बाळ तुझ्या ओटीत टाकून मी लंडनला निघून जाईन…’’ मी श्रुतीला खात्री दिली. तिनं आनंदानं मला मिठीच मारली. ते दृष्य बघून आशीषही गहिवरले.

लहानपणापासूनची गगनची मैत्री, त्यानं, त्याच्या आईनं आशीषसाठी व त्याच्या बाबांसाठी केलेली मदत, घेतलेले कष्ट हे सगळं आशीषनाही कळंत होतं. त्यामुळे आपण जर त्याच्या उपयोगी पडू शकतोय तर हे एक महान कार्य उरकल्यानंतरच मी लडंनला यावं हे त्यानं मान्य केलं. आमच्या मुलांचंही हे शैक्षणिक वर्ष इथंच पार पडेल याचा मलाही आनंद झाला.

दिवस भराभर उलटत असतात. बघता बघता माझे गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण झाले. नॉर्मल बाळंतपण झालं. मुलगा झाला. मी हॉस्पिटलमधून घरी जाताना बाळ श्रुतीच्या ओटीत घातलं. आशीष आम्हाला घ्यायला आले होते.

इथलं घर बंद करून मुलांना घेऊन मी लंडनला गेले. हळूहळू तिथल्या वातावरणात मुलं अन् मीही रूळले. अधूनमधून फोनवर भारतात गगन श्रुतीशी बोलणं व्हायचं. बाळाचं नाव त्यांनी संकर्षण ठेवलं होतं. श्रुतीची तब्येत एकदम ठणठणीत झाली होती. बाळाच्या येण्यानं ती मानसिक व शारीरिक दृष्टीनंही एकदम छान झाली होती. सासूच्या मदतीनं बाळाचं संगोपन उत्तम रितीनं करत होती. घरात आनंदीआनंद होता.

त्यानंतर अनेकदा काही दिवसांसाठी भारतात येणं व्हायचं पण गावी जाणं होत नसे. आई वडिलांना भेटून मी पुन्हा लंडनला यायची. मनांतून भीती वाटायची त्या बाळाला बघून माझ्यातली आई, आईची माया उचंबळून येईल का? कधी कधी वाटायचं नऊ महिने पोटात सांभाळलं ते बाळ आपण का देऊन टाकलं? पुन्हा वाटायचं, बरंच झालं गगनचं मूल गगनकडे वाढतंय…माझ्या डोळ्यासमोर सतत असतं तर कदाचित अपराधीपणाची भावना मन कुरतडंत राहिली असती.

आशीषला यातलं काहीच माहित नव्हतं. ते त्या मुलाचे वडील नाहीत हे ठाऊक नसल्यामुळे, म्हणजेच ते मूल आपलं आहे तेव्हा आपण त्याला भेटूयात असं त्याला सतत वाटयचं. म्हणूनच आम्ही यावेळी आवर्जून गगनकडे भेटायला आलो होतो. संकर्षणला बघितल्यावर मला तर भीतीच वाटली होती की आशीषला काही शंका तर येणार नाही? तसं जर झालं तर श्रुतीचं काय होईल? श्रुतीचं काय होईल? श्रुतीचा संसार उद्ध्वस्त होईलच माझा ही संसार उद्ध्वस्त होईल.

पण आशीषचा माझ्यावर आणि गगनवरही अतूट विश्वास असल्यानंच तो विषय तिथेच थांबला. आजतागायत मी आशीषशी काय, कुणाशीच कधी खोटं बोलले नाही…यापुढेही बोलणार नाही. खरंच सांगते मी आणि गगन निर्दोष आहोत. आम्ही विश्वासघात केला नाही किंवा व्यभिचार केला नाही…तो बलात्कारदेखील नव्हता. उद्ध्वस्त मन अन् थकलेल्या देहाला त्याक्षणी फक्त आधार हवा होता. भावनिक, मानसिक आधार नकळंत दैहिक झाला…तेवढीच चूक…पण त्यामुळे श्रुतीला केवढा मोठा दिलासा मिळाला. तिची मातृत्त्वाची आस पूर्ण झाली. त्यांचं आयुष्य उजळून निघालं अन् आता हे रहस्य कधीच कुणाला कळणार नाहीए.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...