कथा * ऋतुजा कांबळे

बरेच दिवसांपासून अर्धवट विणून ठेवलेला स्वेटर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मी लॉनवरच्या खुर्चीत बसून होते. थंडी असल्यामुळे दुपारचं ऊन सुखदायक वाटत होतं. झाडाच्या सावलीतही ऊब सुखावत होती. त्याचवेळी माझी बालमैत्रीण राधा अवचित समोर येऊन उभी राहिली.

‘‘अरेच्चा? राधा? काय गं, आता सवड झाली होय तुला मैत्रीणीला भेटायला? लेकाचं लग्न काय केलंस, मला तर पार विसरलीसच. किती गप्पा मारतेस सुनेशी अन् किती सेवा करवून घेतेस तिच्याकडून? कधी तरी आमचीही आठवण करत जा की…!’’

‘‘अगं, कसल्या गप्पा अन् कसली सेवा घेऊन बसली आहेस? माझ्या सुनेला तिच्या नवऱ्याशीच बोलायला वेळ नाहीए, ती काय माझ्याशी गप्पा मारेल अन् कसली सेवा करेल? मी तर गेले सहा महिने एका वृद्धाश्रमात राहातेय.’’

बापरे! हे काय ऐकतेय मी? माझ्या पायाखालची जमिनच सरकली जणू. मला काही बोलणंही सुधरेना. काय बोलणार? ज्या राधानं सगळं आयुष्य मुलासाठी वेचलं, आपलं सुख, आपला आनंद फक्त मुलासाठी दिला आज तोच मुलगा आईला वृद्धाश्रमात ठेवतोय?

मधुकर राधेचा एकुलता एक मुलगा. त्याला वाढवताना तिनं आपल्या सर्व सुखांचा त्याग केला. आपल्या म्हातारपणी पैसा आपल्याजवळ असायला हवा याचा विचार न करता त्याला मसुरीच्या महागड्या शाळेत शिकायला पाठवलं. तिथून पुढल्या शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला. पैशांची फार ओढाताण व्हायची. पण उद्या मुलगा उच्चशिक्षित होऊन मोठ्या पगाराची नोकरी करेल, भरपूर पैसा मिळवेल. एवढ्याच आशेवर ती सर्व कष्ट आनंदानं सहन करत होती. भेटली की सतत मुलाच्या प्रगतीबद्दल सांगायची, ‘‘माझं पोरगं म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे,’’ म्हणायची.

राधा खूप काही सांगत होती. बरंच काही मला कळतही होतं, पण वर्मावर बोट ठेवावं असं वाटत नव्हतं. सायंकाळ होण्यापूर्वीच राधा तिच्या वृद्धाश्रमात परत गेली.

ती निघून गेली तरीही माझं मन मात्र तिच्यातच गुंतून होतं. बालपण ते तारूण्याचा काळ आम्ही दोघींनी एकत्रच घालवला होता.

आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. राधाला डॉक्टर व्हायचं होतं. ती हुषार होती. अभ्यासूही होती. दहावीला ती संपूर्ण राज्यात दहावी आली होती.

राधा सर्व भावंडात मोठी होती. त्यामुळे बारावीनंतर वडिलांनी तिचं लग्न करून टाकलं. नवऱ्याच्या घरी गेल्यावरही आपण शिक्षण पूर्ण करू असं भाबडं स्वप्नं बघत ती बोहल्यावर चढली. पण नवऱ्याला तिच्या शिक्षणात अजिबात रस नव्हता. तिथल्या एकूण सर्व वातावरणाची कल्पना येताच राधानं डॉक्टर होण्याच्या आपल्या स्वप्नाला तिलांजली दिली. नवरा, सासरचं घर अन् संसार यातच रमण्याचा ती प्रयत्न करू लागली.

तिच्या लग्नानंतर लगेचच सासरे गेले अन् तिचा मुलगा तीन वर्षांचा होतोय तोवर नवराही एका अपघातात दगावला. राधावर म्हातारी सासू अन् लहानग्या मुलाची जबाबदारी आली. वैधव्यानं ती एकदम खचली. पण तरीही तिनं धीर न सोडता नवऱ्याचा व्यवसाय कसाबसा सांभाळायला सुरूवात केली. अनुभव नव्हता, तरीही घर चालवण्याइतपत पैसे ती मिळवू शकली.

नवऱ्यालाही कुणी नातलग नव्हते. त्यामुळे सासरी मार्गदर्शन किंवा आधार देणारं कुणीच नव्हतं. पण राधानं परिस्थितीशी व्यवस्थित झुंज दिली. मुलाला उत्तम शिक्षण मिळेल याची दक्षता घेतली.

तिच्या त्या कष्टाचं फळ म्हणून मधुकर आज आयआयटीतून इंजिनियर झाला असून अहमदाबादच्या प्रसिद्ध कॉलेजमधून एम.बी.ए. पण झालाय. एका मल्टीनॅशनल कंपनीत तो खूप वरच्या पोस्टवर काम करतोय. मुलाच्या यशानं राधा हरखली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू अन् तेजच तिची यशोगाथा सांगत होतं. आम्हालाही तिचा आनंद खूप सुखावत होता. आता तिला सुखाचे दिवस आले ही खात्री वाटत असतानाच ती वृद्धाश्रमात राहते अन् तेही मुलाच्या लग्नाला जेमतेम वर्षंच होतंय, तेवढ्यात…ही गोष्ट पचनी पडत नव्हती.

माझ्या लेकीला माझी घालमेल लक्षात आली, ‘‘काय झालंय आई? राधामावशी गेल्यापासून तुझं लक्ष लागत नाहीए कशात?’’ तिनं विचारलं.

‘‘अगं माझ्या मनात येतंय की हल्ली शिक्षण इतकं विचित्र झालंय की माणूस पैसे तर खूप कमवतो पण त्याला नात्यागोत्यांची, माया ममतेची किंमत राहात नाही. मोठ्यांना, निदान आईवडिलांना तरी मान द्यावा, त्यांना समजून घ्यावं, एवढीही शिकवण त्यांना मिळत नाही. मग इतक्या डिग्यांचा उपयोग काय?’’

‘‘मम्मा, अगं तू नेहमी तुमच्या वेळचे संस्कार अन् संस्कृतीबद्दल बोलत असतेस, पण तू हे का विसरतेस की काळानुरूप प्रत्येक गोष्टच बदलत असते. तशा या गोष्टीही बदलतीलच ना? आजचं शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यापुरतंच मर्यादित झालंय, ती नोकरी मिळवण्यासाठी जर तेवढाच एक पर्याय किंवा उपाय म्हण, जर शिल्लक असेल तर माणूस मुल्य जपत बसेल की जगण्यासाठी प्रयत्न करेल? सॉरी मम्मा, तुला आवडायचं नाही माझं बोलणं, पण ही वस्तुस्थिती आहे.’’

शिक्षक तरी काय करतील? पालकांना वाटतं की शिक्षकांना भरपूर फी दिली की त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या ध्येयाकडे पोहोचवायला हवं. पालकच जर पाल्यांच्या जीवनमुल्यांविषयी असे उदासीन असतील तर शिक्षकांनाही वाटतंच, खड्ड्यात गेले ते संस्कार अन् खड्ड्यात गेली ती संस्कृती. पालक ज्यासाठी पैसे देताहेत तेवढंच करूया. आता हीच विचारसरणी इतकी फोफावली आहे की जीवनमूल्य, आदर्शवाद, देशाभिमान वगैरे गोष्टी बोलणारा किंवा आचरणात आणणारा मूर्ख आणि हास्यास्पद ठरतो. नातीगोती जपणं म्हणजे ‘विनाकारण वेळ घालवणं’ असंच त्यांना वाटतं. कारण आईवडिल तरी मुलांसाठी वेळ कुठं देतात? त्याच्यासाठी पैसा कमावायचं हेच त्यांचंही उद्दिष्ट असतं ना?

म्हणजे आईवडिलच मुलांच्या समोर पैसा कमवणं, प्रतिष्ठा मिळवणं, पॉवर मिळवणं हे आदर्श ठेवत असतात. आईवडिलांना आपला मुलगा फक्त पहिला यायला हवा असतो. त्याची मानसिक भावनिक भूक असते, त्याला प्रेम, प्रोत्साहन अन् प्रेमळ सहवास हवा असतो हे त्यांच्या लक्षातच आलेलं नसतं. तुझ्यासाठी आम्ही इतका खर्च करतोय, आम्हाला कधी असा पैसा बघायलाही मिळाला नव्हता. ऐपतीपेक्षा जास्त खर्च फक्त तुझ्या भल्यासाठी करतोय. असं सतत त्या मुलावर ठसवतात. एक प्रकारे मुलावर ते दडपणंच असतं.

कित्येकदा आईवडिलांच्या या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा मुलं पूर्ण करू शकत नाहीत अन् निराश होतात, आत्महत्त्या करतात. कधी कधी आई वडिलांचाच खून करतात. त्यांना अपयशाला सामोरं जाणं आईवडिल शिकवतच नाहीत. हल्ली तर मुलीही करिअरच्या मागे आहेत. त्यांना नवरा, संसार, मुलबाळ अशी जबाबदारीही नको वाटते. कारण त्यामुळेच त्या करियरवर लक्ष केंद्रित करू शकतात.

लहानपणापासून मुलाला आपण वेगळी ट्रीटमेंट देतो. त्याचा अहंकार जोपासून त्याला समर्थ पुरूष करण्याचा प्रयत्न करतो. त्याला लग्न झाल्यावर घर, संसार, बायको, मुलांकडे दुर्लक्ष करून करियर करायला मुभा असते. पण मुलींच्या बाबतीत आपण वेगळेच वागतो. हल्ली मुलीही मुलांच्या बरोबरीनं सगळं करायला बघतात अन् नात्यात प्रेम न राहता शत्रुत्त्व येतं. पण दोष फक्त मुलांचाच असतो का? मुळात, खरं तर, अप्रत्यक्षपणे आई वडिलच यासाठी दोषी ठरतात,’’ नेहा म्हणाली.

‘‘बोल ना, अजूनही बोल. गप्प का झालीस? ‘‘नीतिमत्तेला तिलांजली द्या अन् सुखोपभोगात लीन व्हा. पैसा, पैसा, पैसा मिळवा अन् संसार विसरा…हेच का तुला शिकवलंय मी? मधुकरनं आपल्या सुखाचा विचार करून आईला वृद्धाश्रमात पाठवलंय, तूही पुढे तशीच वागशील कारण मधुकर पूर्वी तुझा पक्का मित्र होता…’’ मी चिडून बोलले.

‘‘आई, अगं अजून माझं शिक्षण पूर्ण होतंय, तू माझ्या पुढल्या आयुष्याशी कशाला भांडते आहेस? मला कळतंय, राधामावशी वृद्धाश्रमात राहतेय ही बाब तुला खूपच खटकते आहे. तुझ्या दृष्टीनं मधुकर अपराधी आहे. पण मी मधुकरला ओळखते. राधामावशीच तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहे. मुलांच्या वागण्यात, त्यांच्या यश किंवा अपयशात आईवडिलांच्या विचारसरणीचा आणि त्यांना वाढवताना घडणाऱ्या घटनांचा प्रभाव दिसून येतो हे तुलाही मान्य आहे ना? राधामावशीला कायम वाटायचं की मधुकरनं नेहमी पहिला नंबर मिळवायला हवा. तो इतका, इतका उंच जायला हवा की इतर कुणी त्याच्या जवळपासही पोहोचता कामा नये. तिनं त्याला कायम नातेवाईकांपासून, मित्रमंडळींपासून तोडलं. दूर ठेवलं, कारण अभ्यासात व्यत्यय नको. पण तिला सर्वांकडून…म्हणजे नातलग अन् मित्रमंडळीकडूनही हेच ऐकायचं असायचं की ‘हा बघा राधाचा मुलगा…राधानं नवऱ्याच्या मागे एकटीनं वाढवलं त्याला…बघा तो किती मोठा झालाय…कुठल्या कुठं पोहोचलाय…खरंच कौतुक आहे हं राधेचं अन् तिच्या मुलाचंही.’

तुला आठवतंय ना मम्मा, जेव्हा यमुनाबाई म्हणजे राधामावशीची सासू, मधुकरची आजी शेवटच्या घटका मोजत होती, तेव्हा तिचा प्राण फक्त मधुकरच्या भेटीसाठी तळमळत होता. एकदा, फक्त एकदाच तिला तिच्या नातवाला, तिच्या मृत मुलाच्या एकुलत्या एका वारसाला बघायचं होतं. ती पुन्हा पुन्हा ‘त्याला बोलावून घे’ म्हणून राधामावशीला गळ घालत होती, पण राधामावशीनं शेवटपर्यंत त्याला आजीच्या आजारपणाची, तिच्या अंतिम समयाची बातमी लागू दिली नाही, कारण तो त्यावेळी दिल्लीला आयआटीच्या परीक्षेच्या तयारीत गुंतला होता. प्रश्न फक्त दीड दिवसाचा होता. विमानानं आला असता अन् आजीला भेटून निघून गेला असता. पण राधामावशीनं त्याला अभ्यासात डिस्टर्ब नको म्हणून काही कळवलंच नाही. खरं तर मधुकरचा आजीवर खूप जीव होता. आजीसाठी तो नक्कीच आला असता. इतका हुशार होता की तेवढ्या एकदीड दिवसाचा अभ्यास त्यानं कधीच भरून काढला असता. पण राधामावशीनं हटवादीपणा केला अन् यमुनाबाई ‘नातवाला बघताही आलं नाही,’ ही खंत घेऊनच वारल्या. त्या गेल्यानंतरही मधुकरला कळवलं नव्हतं.

आयआयटीत निवड झाल्यावर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला आजी निवर्तल्याचं समजलं…किती रडला होता तो त्यावेळी. त्यानं आईला खूप दोषही दिला पण राधामावशी आपलं चुकलं हे मान्यच करेना. मी केलं ते बरोबरंच होतं, त्यामुळेच तू आयआयटीत निवडला गेलास हेच ती घोकत होती. अभ्यास, करिअर यापुढे आजी, आजीची इच्छा किंवा प्रेम याला काहीच महत्त्व नाही, हेच तिनं मधुकरला अप्रत्यक्षपणे शिकवलं ना? आता तो आईकडे लक्ष न देता करिअरच्या मागे लागलाय तर त्याचं काय चुकलं?

लहानपणापासून मधुकरनं आईचं ऐकलं. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. तनमनानं तो अभ्यास करत होता. आईच्या इच्छेला मान देताना त्यानं आपली आवड, इच्छा बाजूला ठेवल्या होत्या. त्याची फक्त एकच इच्छा होती ज्या मुलीवर त्याचं प्रेम आहे, तिच्याशी त्याला लग्न करू द्यावं.

पण राधामावशीनं तिथंही हटवादीपणा केला. कारण तिला सून तिच्या मुलासारखीच हुशार अन् मोठ्या पगाराची नोकरी असणारी हवी होती. मधुकरचं जिच्यावर प्रेम होतं तिचं अजून शिक्षण संपल नव्हतं. स्वत:ची महत्त्वकांक्षा राधामावशीला मुलाच्या प्रेमापेक्षाही मोठी वाटली. मधुकरची इच्छा तिनं साफ धुडकावून लावली. तिचे शब्द होते, ‘माझ्या मखमलीला मला गोणपाटताचं ठिगळ नकोय.’ तिनं जीव देण्याची धमकी दिली अन् तिच्या आवडीच्या, तिनं पसंत केलेल्या मुलीशीच मधुकरला लग्न करावं लागलं.

राधामावशीच्या मते, तिनं मुलाचं भलं केलं. त्याला साजेशी बायको मिळवून दिली. आज परिस्थिती अशी आहे की सून अन् मुलगा, दोघंही कामाच्या ओझ्याखाली दबली आहेत. ऑफिसच्या कामासाठी कधी मधुकर महिना महिना परदेशी असतो तर कधी सून…कधीकधी दोघंही. आता त्यांना एकत्र राहायला वेळ नाही. एकमेकांसाठी वेळ नाही. कसला संसार, कसली मुलंबाळं. अशात ती दोघं राधामावशीकडे कधी बघणार अन् कधी तिची काळजी घेणार? दोघांनाही आपली नोकरी, आपलं करिअर, आपली प्रमोशन्स सोडवत नाहीएत. मधुकरची बायको रश्मी तशी चांगली आहे, पण ती करिअर सोडणार नाही. हे तिला तिच्या आईवडिलांनीच शिकवलंय. ते तिच्या लहानपणापासून डोक्यात भरवलं गेलंय की ती मुलापेक्षा कमी नाही. लोकांना मुलगा हवा असतो, पण मुलगीही तेवढीच कर्तबगार असते.

जग कितीही बदलू दे मम्मा, पण कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं आपसातलं अंडरस्टॅडिंग. एकमेकांना समजून घेणं. एखादी गोष्ट माझ्या नजरेतून मला बरोबर वाटत असली तरी तुझ्या नजरेतून ती तशीच असेल असं होत नाही. तुला नाही वाटत की राधामावशीनं तिची प्रत्येक इच्छा मधुकरवर लादली म्हणून? तिच्या दृष्टीनं ते योग्य असेलही, पण मधुकरच्या दृष्टीनं ते बरोबर नव्हतं, मधुकर राधामावशीच्या इच्छेप्रमाणे घडला पण आज तो तिला खरं तर दुरावलाच आहे. त्याचं प्रेम जिच्यावर होतं तिला तो अजून विसरू शकला नाहीए.’’

नेहाचं बोलणं ऐकून मी खरं तर सुन्न झाले होते. खरोखर आपण मुलांना माणूस म्हणून वागवत नाही. त्याचं फक्त मशीन करून टाकतो अन् मग माणुसकी, संस्कृती वगैरे महान गोष्टींची अपेक्षा करतो.

एकाएकी मी दचकले. मी नेहाच्या डोळ्यांत बघत विचारलं, ‘‘मधुकरचं तुझ्यावर प्रेम होतं?’’

मनातली वेदना लपवण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा बांध फुटला अन् ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली. मी पश्चात्ताप करत होते, माझ्या मुलीचं मन मला तरी कुठं कळलं होतं?

खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे. मुलांवर आपल्या अपेक्षा लादायच्या की त्यांना हवं तसं घडू द्यायचं? परदेशातला पैसा किंवा इथंच भरपूर पगार, मोठा बंगला किंवा फ्लॅट, सुखासीन आयुष्य एवढंच महत्त्वाचं आहे की जीवनमूल्यही जपता येणं गरजेचं आहे. नातेसंबंधातून येणारी प्रेमाची जबाबदारी, कर्तव्याची जाणीव, त्यातून मिळणारा आधार आणि सुरक्षितपणाची भावना हे सगळंही महत्त्वाचं असतं ना? खरोखर आमचंही चुकतंच…मी नेहाला जवळ घेत म्हटलं, ‘‘आमच्याकडून फारच मोठी चूक घडली आहे. त्यामुळे तुझं अन् मधुकरचं आयुष्य…खरं तर तुम्ही विनाकारण शिक्षा भोगता आहात. पण आता घडून गेलं ते विसरून तुला पुढं जायला हवं. तुला अजून कुणी चांगला जोडादार भेटेल. एकच सांगते यापुढे प्रत्येक क्षणी मी तुझ्याबरोबर आहे…’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...