कथा * राकेश भराडे

आयुषीनं उदासपणे आपल्या बेडरूमवरून नजर फिरवली. कपाटं, ड्रेसिंग टेबल, डबलबेड, इथं तिथं पसरलेले कपडे…सगळ्यांवरच एक उदास सावट पसरलं होतं. तिच्या मनाप्रमाणेच या निर्जीव वस्तूही दु:खानं झाकोळून रडत होत्या.

खोलीत शांतता पसरली होती. तिला या शांततेची भीती वाटली नाही, पण एक तऱ्हेची निराशा दाटून आली. जितका अधिक विचार ती करत होती, तेवढीच निराशा अधिक गडद होत होती.

केवळ बेडरूमच नाही तर संपूर्ण फ्लॅट तिनं खूप मनापासून, खपून सजवला होता. स्वत:साठी अन् प्रियकरासाठीही. त्यावेळी डोळ्यात सप्तरंगी स्वप्नं होती. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठीच तिनं हे धाडसी पाऊल उचललं होतं. लग्न न करताही ती प्रतीकबरोबर रहायला तयार झाली होती.

आज मात्र तो उत्साह पार मावळला होता. असं का झालं हे तिला कळत नव्हतं. तिनं तर पूर्ण निष्ठेनं समर्पण केलं होतं. आत्यंतिक विश्वासानं आपला देह, आपलं मन त्याला दिलं होतं. पण त्याचं प्रेम मात्र खोटं होतं. तो प्रेमाचा केवळ देखावा होता. त्याला तिचं तारूण्य हवं होतं. त्यासाठीच त्यानं तिला अगदी बेमालूमपणे आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्या देहाचा पुरेपूर उपभोग घेतलाच शिवाय तिचाच पैसा वापरून चैनही केली. आता हे तिला कळतंय, पण आता उपयोग काय?

एमबीएचा अभ्यास दोघांनी एकाच कॉलेजात केलेला. यादरम्यान त्यांच्यात ओळख, मैत्री अन् प्रेम निर्माण झालं. एक दिवस प्रतीकनं तिला विचारलं,

‘‘आयुषी, माझ्याबरोबर बाहेर येतेस?’’

‘‘कुठं?’’

‘‘तू म्हणशील तिथं…’’

‘‘तुझी स्वत:ची काहीच इच्छा नाही?’’

‘‘आहे ना. पण तुझ्या सहमतीनंच मी सगळं करणार?’’

‘‘चल तर मग…’’ ती पटकन् उठली.

त्यानंतर ती प्रतीकच्या बोलण्यावागण्यावर इतकी भाळली की त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होती.

नोकरी मिळताच एकत्र रहायचं त्यांनी ठरवलं होतं. एकमेकांवाचून जगणं त्यांना अशक्य वाटत होतं. प्रयत्न करून दोघांनी एकाच कंपनीत नोकरी मिळवली. अन् मागचा पुढचा विचार न करता ती दोघं एकत्र रहायला लागली. दोघांचेही आईवडिल त्यांच्या गावी, या शहरापासून बरेच दूर असायचे. पण आपला असा स्वतंत्र संसार थाटून ती दोघं खूपच आनंदात होती.

जेव्हा दोघं एकत्र रहायला लागली, तेव्हा प्रतीकनं सांगितलं, ‘‘हे बघ आयुषी, आपण दोघं एकत्र राहतो आहेत. पण, तू लक्षात घे, पुढे आपल्याला याचा काही त्रास व्हायला नको.’’

‘‘कसला त्रास?’’ तिनं जरा दचकून विचारलं.

‘‘हे बघ, तुला कळतंय…आपण जर एक अॅफिडेव्हिट बनवून घेतलं तर दोघांच्याही दृष्टीनं ते फायद्याचं ठरेल.’’

‘‘अॅफिडेव्हिट कसलं?’’ तिला काहीच कळेना.

‘‘म्हणजे असं की तू मला लग्न करायला बाध्य करणार नाहीए, आई व्हायची तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही.’’

आयुषीला कळेना…तिला काळजीही वाटली. लग्न एकवेळ नाही केलं तरी मूल का नको? नवराबायकोसारखे संबंध आहेत म्हटल्यावर मूल हवंय ना? केवळ देहसुखावर सगळं आयुष्य थोडीच जातं? प्रतीक पुरुष आहे, त्याला मूल नको असेल, पण आयुषी तर स्त्री आहे. तिला मूल हवंच हवं. ती मुलाशिवाय कशी जगेल?

प्रतीक तिला समजावत म्हणाला, ‘‘असं बघ आपण अजून मुलाची जबाबदारी पेलण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. अॅफिडेव्हिट करून घेण्यात आपला दोघांचाही फायदा आहे. तुझ्याही बघण्यात अशा घटना आहेत ना की एकत्र राहिल्यानंतर काही दिवसांनी मुली लग्न करण्यासाठी मुलांवर दबाव आणतात अन् जर मुलांनी ते मान्य केलं नाही तर आपल्या नातलगांकडून, आईवडिलांकडून लग्नासाठी दबाव आणतात अन् नाहीतर सरळ मुलावर बलात्काराची केस ठोकतात.’’

मनातल्या मनात काही तरी खळबळ, फुटल्यासारखं वाटलं आयुषीला. हा इतकी सावधगिरी का म्हणून बाळगतोय?

ती जरा रागावून, परखडपणे म्हणाली, ‘‘प्रतीक, प्रेम नेहमीच विश्वासाच्या पायावर उभं असतं. जर आपला दोघांचा एकमेकांवर विश्वासच नसेल तर आपण एकमेकांवर प्रेम करत नाही असाच अर्थ निघतो. अॅफिडेव्हिटनं आपल्यात प्रेम निर्माण होणार नाही, त्यामुळे दुरावाच वाढेल. मला अॅफिडेव्हिट नकोय. म्हणत असलास तर आपण हे संबंध या क्षणीच संपवूयात.’’

‘‘छे छे असं भलतंच काय बोलतेस?’’ तिला आपल्या बाहुपाशात घेत लगेच प्रतीक म्हणाला. त्याला बहुधा भीती वाटली की अशानं आयुषी हातातून निघून जाईल. हसून तो म्हणाला, ‘‘हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे तेव्हा तूही माझ्यावर विश्वास ठेव. पण बघ, नंतर काही गडबड व्हायला नको.’’

आयुषीच्या मनात एक अढी बसली, पण त्यांचं प्रेम नवं नवं होतं, तिनंही ते फारसं मनावर घेतलं नाही.

भाड्याचा फ्लॅट घेताना सिक्युरिटी डिपॉझिट अन् अॅडव्हान्स आयुषीनंच भरला होता. त्यावेळी प्रतीक म्हणाला होता, ‘‘आयुषी, मला दर महिन्याला घरी पैसे पाठवावे लागतात. सध्या माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. सध्या ही सर्व रक्कम तू भर. मी नंतर तुला देईन सगळे पैसे.’’

आयुषीला हेही थोडं खटकलंच पण प्रेमाची भरती जबरदस्त होती. विवेकाच्या विचारांना एका लाटेतच तिनं धुवून नेलं. पुढे तर त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत हेही ती विसरली.

आयुषीनं घरात स्वयंपाकाची सर्व भांडी व इतर सामान खरेदी केलं. प्रतीकचा याला विरोध होता. घरी लादी पुसणं, साफसफाई व स्वयंपाकासाठी बाई लावली होती. पण घरी स्वयंपाक क्वचितच व्हायचा. प्रतीकच्या म्हणण्यावरून हॉटेलातूनच जेवण मागवलं जाई. दोघं बाहेर फिरायला वगैरे गेली म्हणजेही हॉटेलातच जेवण व्हायचं. हा सर्व खर्च एकटी आयुषी करायची.

सप्तरंगी स्वप्नांत गुरफटलेले काही दिवस मजेत गेले. चारी बाजूला प्रेमच प्रेम होतं. जग इतकं सुंदर आहे हे आयुषीला प्रतीकच्या प्रेमात पडल्यावरच समजलं होतं. पण हळूहळू प्रेमाचे रंग फिकट व्हायला लागला. घरात खर्च करताना प्रतीक कायम हात आखडता घेत असे. घरातली अगदी साधीशी वस्तूही त्यानं स्वत:च्या पैशानं विकत घेतली नव्हती. त्याला काही हवं असलं की म्हणायचा, ‘‘डार्लिंग, चल नं, काही खरेदी करूयात.’’

‘‘मला नको सांगूस, तुझं तुला काय हवं ते आण.’’ ती म्हणायची.

‘‘पण तुला ठाऊक आहे डियर, माझ्याकडे पैसे नाहीत. मी घरी पाठवून दिलेत ना?’’ अन् मग तो तिला मिठीत घ्यायचा, त्याच्या उष्ण श्वासांनी ती रोमांचित व्हायची अन् त्याच्या मिठीत विरघळायची. मग त्याच्या छातीवर हलकेच गुद्दा मारून म्हणायची, ‘‘बरं, चल.’’

प्रतीक तिला प्रेमाच्या गोष्टी करून असा काही भुलवायचा की तिच्या विवेकाचे, विचारांचे सर्व दरवाजे बंद व्हायचे. तिला कळत नसे की प्रतीक स्वत:चे पैसे खर्च करायला नकार का देतो? तो तिच्या देहाचा तर वापर करतोच आहे शिवाय तिचाच सर्व पगारही उडवतोय. जेवण खाण, कपडा लत्ता, बाजार, वाण सामान, घरभाडं, वीजबिल सगळाच खर्च आयुषी करत असते. प्रतीकची काहीच जबाबदारी नाहीए का?

एवढ्या दिवसात प्रतीकनं घरात तर काय पण स्वत:वर किंवा आयुषीवरही एक पैसा कधी खर्च केला नव्हता. सगळं घर तिनं छान छान वस्तूंनी सजवलं होतं. पडद्यांपासून चादरीपर्यंत, डेकोरेशन पीसेसपासून घरातल्या लॅम्पशेड व बल्बपर्यंतच्या एकेक पैशाचा खर्च आयुषीनं केलेला होता.

आयुषीला कधीतरी स्वत:साठी एखादा ड्रेस घ्यावासा वाटे. ‘‘प्रतीक, हा ड्रेस छान आहे ना? घेऊयात?’’ तो म्हणायचा, ‘‘पैसे असतील तुझ्याजवळ तर घे. ड्रेस खरंच छान आहे.’’

आयुषीच्या लक्षात आलं की तिच्या बँक अकाउंटला महिन्याच्या शेवटी काहीही उरत नाही. तिला मिळणारा सर्व पगार घरातच संपतोय. ती एकटी असताना बऱ्यापैकी शिल्लक ती टाकत होती. पण प्रतीकबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना मात्र ती कंगाल झाली होती. प्रतीकनंच आग्रह करून तिला चार चाकी गाडी घ्यायला लावली होती. ते हप्तेही आयुषीच भरत होती, पण गाडी सतत प्रतीक वापरायचा. पेट्रोल आयुषी भरायची.

आता मात्र आयुषीवरचं प्रेमाचं भूत उतरायला लागलं होतं. एक दिवस जरा रागातच तिनं म्हटलं, ‘‘प्रतीक, घरातले सगळे खर्च मी एकटी करतेय. तुझा एकही पैसा खर्च करत नाहीस तू. या सगळ्या पैशांचं करतोस काय? घराची जबाबदारी तुझीही आहेच ना?’’

‘‘हे माझं तुझं कुठून काढलंस? माझे पैसे मी वाचवतोय ते आपल्याला पुढे उपयोगी पडावेत म्हणूनच ना?’’ तो ही आढ्यतेनं बोलला. मात्र बोलत असताना त्यानं तिची नजर टाळली होती.

आयुषीला हे आवडलं नाही. ‘‘प्रतीक नीट माझ्याकडे बघून उत्तर दे. तुझा पैसा उपयोगी पडेल असा दिवस कधी उगवणार आहे? तू सगळे पैसे घेऊन पळून गेल्यावर?’’

इतकं कडू सत्य? आयुषीला स्वत:लाही नवल वाटलं. इतकं ती कसं काय बोलली? कदाचित परिस्थिती तसं बोलायला भाग पाडते.

आयुषी अजूनही बोलत होती. ‘‘मला तुझी लक्षणं तर अशीच दिसताहेत. तुझ्या दृष्टीनं हा फक्त खेळ आहे. प्रेमाचं नाटक करून माझं शरीर उपभोगतोस. माझ्या पैशावर चैन करतोस. जेव्हा तुझ्या लक्षात येईल की माझे पैसैही संपले आहेत अन् देहातलं आकर्षणही संपलेय, तू एखाद्या गिधाडासारखा दुसरं भक्ष्य शोधशील अन् मी भणंग भिकाऱ्यासारखी भीक मागेन.’’

प्रतीक गप्प बसला होता. जणू आयुषीनं त्याच्या थोबाडीत मारली होती. आयुषीला काहीही म्हणायचं धाडस त्याक्षणी तरी त्याच्यात नव्हतं.

आयुषीला जाणवत होतं की प्रतीकचा तिच्यातला इंटरेस्ट संपला होता. तो तिला कधीही सोडून जाईल. मग ती अगदीच एकटी पडेल. पण ती स्वत:ला बजावून सांगायची. हे जे धाडसी पाऊल तिनं उचललं आहे ते तिनं स्वत:च्या मर्जीनं उचललं आहे. आता त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याची जबाबदारीही तिचीच असेल. त्यासाठी तिनं पूर्णपणे सक्षम असायलाच हवं. प्रतीक जर तिला सोडून गेला तरी ती रडणार, भेकणार नाही. गेला तर गेला. तिचं आयुष्य तिनं जगायचं.

अशात तिला आपल्या आईबाबांची फार फार आठवण येत असे. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांना तिच्याविषयी किती अभिमान होता. तिच्याकडून ती खूप काही करेल अशा अपेक्षाही होत्या, पण तिनं खरं तर त्यांचा विश्वासघात केला होता.

छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्याच वाद व्हायचे. आयुषी दुखावली जायची. पुन्हा तडफेनं उभी रहायची. प्रतीकच्या वागण्यात सुधारणा नव्हती. त्यानं मनात आणलं असतं तर त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत: होऊ शकले असते.

आता घरातली कोणतीही वस्तू ती आणणार नाही असं आयुषीनं ठरवलं होतं. प्रतीकचं शेविंग क्रीम संपलं होतं. डिओ खलास झाला होता. बाथरूममध्ये अंगाचा, कपडे धुण्याचा साबण नव्हता. पण आयुषीनं तिकडे साफ दुर्लक्ष केलं. घरात खाण्यापिण्याचे जिन्नस मात्र ती आणत होती.

प्रतीक एक दिवस भडकून बोलला, ‘‘हे काय घर आहे की धर्मशाळा? साबण नाही, शेविंग क्रीम संपलंय.’’

‘‘तू आण ना? तुझ्या गरजेच्या गाष्टी आहेत. तू वापरतोस. तू विकत आण. तूही कमवतो आहेस ना?’’

‘‘असं कसं बोलतेस तू?’’नरमाईनं प्रतीकनं म्हटलं.

‘‘खरं तेच बोलतेय. खरं तर लग्न केल्यावर बायकोचा खर्च नवऱ्यानं करायचा असतो. लग्न केलं नाही म्हणून इथं उलटंच चाललंय. शारीरिक, भावनिक अन् आर्थिकदृष्ट्या तू माझं शोषण करतो आहेस. एकत्र राहून पैसे मीच खर्च करतेय.’’

‘‘तू अशी का वागते आहेस?’’ प्रतीकनं नाटकीपणे उसासा टाकला.

खरंतर प्रतीक अन् आयुषीला पगार सारखाच मिळत होता. पण आयुषीचा सगळा पगार संपत होता. प्रतीकच्या पगाराचं काय व्हायचं ते तोच जाणो. ती तर त्याच्या प्रेमात अशी काही वेडीखुळी झाली होती की तो कुठला राहणारा, त्याच्या घरात कोण, वडील काय करतात काही काही तिनं विचारलं नव्हतं. उलट स्वत:बद्दल मात्र ती सगळं सगळं सांगून मोकळी झाली होती.

त्यांच्यातली भांडणं वाढलीच होती. त्या काळात एकदा आयुषीनं विचारलं, ‘‘प्रतीक, तू तुझ्या घरच्या लोकांबद्दल, तुझ्या कुटुंबातल्या माणसांबद्दल काहीच बोलला नाहीस? तुमचं गाव कोणतं? तुझे बाबा काय करतात? तुला बहीण-भाऊ किती…वगैरे.’’

विचित्र नजरेनं तिच्याकडे बघत प्रतीक म्हणाला, ‘‘का बरं? एकाएकी याची गरज का भासली?’’

‘‘अरे कमाल करतोस. आपण दोघं एकत्र राहतोय तर एकमेकांविषयी कळायला नको का?’’ आयुषी सहजपणे बोलली.

‘‘हे सगळं तू आधीच जाणून घ्यायसा हवं होतं. आता काय माझ्या घरातल्यांच्या विरूद्ध पोलिसात तक्रार द्यायचीय की माझ्या विषयीच्या कागाळ्या घरातल्या लोकांना सांगायच्या आहेत?’’ प्रतीकनं विचारलं.

आयुषीला त्या क्षणी लख्खपणे जाणवलं की प्रतीकचं प्रेम तिच्या प्रेमासारखं खरं नव्हतं. प्रेमात तर दोषही माफ असतात. तिनं त्याचे सारे दोष स्वीकारलेच होते. पण तो मात्र तिचा पैसा, तिचं सौंदर्य अन् तारूण्य यावर डोळा ठेवून होता.

ती कडवटपणे म्हणाली, ‘‘पोलिसात जायला घरचे नकोत, तूच पुरेसा आहे. मला आता तुझं खरं रूप कळलं आहे…मला आधीच हे कळायला हवं होतं.’’

‘‘आधी कळलं असतं तर काय केलं असतंस?’’ त्यानं भडकून विचारलं.

‘‘मी तर आताही काहीच करणार नाहीए. पण मला वाटतंय की तुला आता आपले संबंध पुढे चालू ठेवायचे नाहीत. विनाकारण भांडतोस, चिडतोस. मी तुला आपल्या नात्यातून मोकळा करते.’’

‘‘मला त्यासाठी तुझ्या उपकाराची किंवा परवानगीची गरज नाहीए. मला हवं ते मी करेन.’’

आयुषीच्या मनात आलं लिव्ह इन रिलेशनशिपचा जास्त फायदा पुरूषांनाच मिळतो. मुली मूर्ख असतात. प्रेमानं वेड्याखुळ्या होतात. मुलांच्या गोड गोड बोलण्यावर भाळतात. त्यांच्यावर खरं खरं प्रेम करतात. मुलांचा खोटेपणा त्यांच्या लक्षातच येत नाही अन् त्याची शिक्षा मुली पुढे आयुष्यभर भोगतात.

शिवांगी आयुषची ऑफिसमधली खास मैत्रीण होती. तिच्या लक्षात आलं आयुषीचं उदास असणं, काळजीत असणं, काहीतरी गडबड आहे हे तिनं जाणलं. एकदा लंचटाइममध्ये तिनं आयुषीला विचारलंच, ‘‘तू अशी का दिसतेस? तुझं अन् प्रतीकचं बिनसलं आहे का?’’

शिवांगीनं आधीच आयुषीला या लिव्ह इनबद्दल सावध केलं होतं. ‘शक्य तेवढ्या लवकर लग्न कर’ असाही सल्ला दिला होता. पण त्यावेळी आयुषी प्रतीकच्या प्रेमात इतकी अंतर्बाह्य रंगली होती की तिनं मैत्रीणीचा सल्ला गांभीर्यानं घेतलाच नाही.

‘‘तुझं म्हणणं बरोबर होतं शिवांगी…मीच चुकले,’’ आयुषीनं म्हटलं. तिनं हळूहळू शिवांगीला सगळं सांगितलं. शिवांगीही प्रथम स्तब्ध झाली. मग म्हणाली, ‘‘हरकत नाही. तू अजूनही सावर. प्रतीक ही कंपनी सोडतोय. मला त्याच्या एका खास मित्राकडून ही बातमी समजली आहे. तो बंगलोरला जॉब मिळवण्याच्या तयारीत आहे.’’

‘‘मला शंका होतीच. त्याच्या एकूण वागण्यावरून तो मलाही सोडणार हे मला जाणवत होतं.’’

‘‘मग आता तू काय करशील?’’

‘‘काही नाही…’’

‘‘म्हणजे? आश्चर्यानं शिवांगीनं विचारलं. ‘‘त्यानं तुला फसवलंय, तुझं शोषण केलंय, त्याला असंच सोडशील?’’

‘‘नाही शिवांगी. त्यानं मला फसवलं नाही. माझं शोषण केलं नाही. जे घडलं त्याला माझी सहमती होतीच. मुळात मीच चुकले म्हणताना आता परिणामही मीच भोगायला हवेत. मी त्यासाठी तयार आहे.’’

‘‘खरंच सांगतेस?’’ आश्चर्यानं शिवांगी म्हणाली. ‘‘खरंच सावरली आहेत तू?’’

पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्यी उत्तरली. ‘‘होय, पूर्णपणे.’’

‘‘तुला कधीही माझी गरज पडली तर मला सांग,’’ शिवांगीने तिला आश्वस्त केलं.

आयुषीचे वडिल सरकारी नोकरीत होते. खाऊनपिऊन सुखी. आयुषी त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या शिक्षणावर त्यांनी बराच खर्च केला होता. आता त्यांच्याकडे फार पैसा शिल्लक नव्हता. त्याची गरजही नव्हती. आयुषी नोकरी करतच होती.

त्याचवेळी आयुषीच्या आईचा फोन आला. त्यांच्या गॉलब्लॅण्डरमध्ये स्टोन झाले होते. ऑपरशन करावं लागणार होतं. आईनं तिला येण्याबद्दल सांगितलं. पैसे वगैरे मागितले नव्हते. आयुषीलाच वाटलं थोडे पैसे तिनं त्यांना पाठवले तर वडिलांना आधार होईल. पगाराला अजून अवकाश होता. तिच्या खात्यात पुरेसे पैसे नव्हते. तिनं प्रतीकला म्हटलं, ‘‘मला थोडे पैसे हवेतय’’

आश्चर्यानं प्रतीक आ वासला गेला, ‘‘तुला? पैसे? तुझ्याकडे नाहीत का?’’

‘‘नाहीत. म्हणूनच मागतेय ना?’’ ती असह्यपणे म्हणाली, ‘‘आईचं ऑपरेशन होणार आहे.’’

‘‘तू घरी जाणार आहेस?’’

‘‘विचार करतेय. या निमित्तानं जाऊन येईन. वर्ष दिड वर्षात गेलेच नाहीए.’’

‘‘पैसे नाहीत माझ्याजवळ. कालच मी घरी पाठवलेत पैसे.’’

तो खोटं बोलतोय हे तिला कळलं. ‘‘इतकं धादांत खोटं कसं रे बोलू शकतोस तू? कधी म्हणतोस पैसे शिलल्क ठेवतोय, कधी म्हणतोस घरी पाठवलेत. सगळेच पैसे थेडीच पाठवले असतील? घरात तर एक पैसा खर्च करत नाहीस. माझ्या पैशांवर मजा मारताना तुला लाज वाटत नाही?’’

‘‘तुला माझी गरज आहे. मला तुझी नाही.’’ निर्लज्जपणे तो म्हणाला अन् गाडीची किल्ली उचलून घराबाहेर निघून गेला.

घरी पैसे पाठवण्यासाठी पैसा उभा कसा करावा ते आयुषीला समजेना. स्वत: जाण्यापेक्षा तिनं मैत्रिणीकडून ५० हजार रुपये उसने घेऊन बाबांच्या अकाउंटला भरले.

प्रतीकचा त्याच्या घरच्या मंडळींशी सतत संपर्क होता. सहा महिन्यांनी एकदा तो घरी जाऊन येत असे. आयुषीच गेली दोन वर्षं घरी गेली नव्हती. फोनवर बोलायची. पण अजून नोकरी नवी आहे, कंपनी अमेरिकेला पाठवणार आहे वगैरे कारणं सांगून ती घरी जाणं टाळत होती. आईची इच्छा होती आयुषीनं लग्न करावं पण आयुषी तर लग्नाच्याही पुढं निघून गेली होती.

प्रतीक सुट्टी घेऊन त्याच्या घरी गेला होता. आयुषीनंही सुट्टी घेतली अन् आईबाबांना भेटायला गेली. इतक्या दिवसांनी त्यांना भेटल्यावर तिला किती सुरक्षित अन् प्रसन्न वाटलं. तिला जाणवलं, प्रतीकच्या सहवासात तिला असं सुरक्षित वाटत नव्हतं. जुन्या आठवणी काढताना आईबाबांना गहिवरून येत होतं. तिच्या येण्याचा त्यांना मनापासून आनंद झाला होता. आठ दिवस ती तिथं आनंदात राहिली. मोबाइलही तिनं बंद करून ठेवला होता.

आईबाबांच्या प्रेमळ आश्वासक सहवासात ती सुखावली. तिला प्रतीकची आठवणही आली नाही. ती मुंबईला परतली अन् तिनं प्रतीकला फोन लावला, तो बंद होता. तिला थोडी काळजी वाटली. गेले आठ-दहा दिवस त्यांच्यात संपर्कच नव्हता.

घरात फार एकटं वाटत होतं. उदास वाटत होतं. प्रतीक कसाही असला तरी तिनं त्याच्यावर खरोखर प्रेम केलं होतं. पूर्ण विश्वासानं ती त्याच्या स्वाधीन झाली होती. शेवटपर्यंत ते नातं तिला खरं तर निभवायचं होतं. पण प्रतीकच्या मनात दुसरंच काहीतरी होतं.

ती ऑफिसला पोहोचली अन् शिवांगी तिला भेटायला आली. ‘‘कशी आहेस शिवांगी?’’ तिनं विचारलं.

‘‘मी बरी आहे. तुला कळलं का? प्रतीकनं ही कंपनी सोडली. मागच्या आठवड्यातच त्यानं ईमेलवर त्याचा राजीनामा पाठवलाय.’’

‘‘हं!’’

‘‘मला ठाऊक होतं. प्रतीकसारखी भ्रमर अन् लोभी वृत्तीची मुलं लग्न, जबाबदारी वगैरेवर विश्वास ठेवत नाहीत. प्रेम म्हणजे त्यांच्या लेखी टाइमपास असतो.’’

आयुषीनं शिवांगीकडे बघितलं.

‘‘आयुषी, हे कधी ना कधी घडणारच होतं. तुला धक्का बसणं स्वाभाविक आहे. पण तरीही तुला सावरायला हवं. खरं तर आता तू स्वतंत्र आहेस. आपल्या मर्जीनं आयुष्य जगू शकतेस. चांगला नवरा निवड. सुखाचा संसार कर. गेली दोन वर्षं एक दु:स्वप्न होतं असं समज.’’

‘‘खरंय शिवांगी, तुझं म्हणणं मला पटतंय. मी पूर्वीही भीत्री अन् नेभळट नव्हते. आत्ताही नाही. मी कणखर आहे. सारी परिस्थिती धीरानं हाताळेन.’’

‘‘मी तुझ्याबरोबर रात्री सोबतीला येऊ का?’’

‘‘नाही गं! त्याची गरज नाहीए,’’ पूर्ण आत्मविश्वास तिच्या बोलण्यावागण्यात दिसत होता.

सायंकाळी घरी गेल्यावर तिनं शांतपणे घरावर नजर फिरवली. ज्या वस्तू तिनं प्रतीकबरोबर खरेदी केल्या होत्या त्या वेगळ्या काढल्या. एका मोठ्या चादरीत त्या बांधून त्याचं गाठोडं बांधलं.

रात्री तिनं ते गाठोडं गाडीत घातलं अन् शहराच्या बाहेर एक मोठा तलाव होता, त्या तलावात ते गाठोडं तिनं शांतपणे ढकलून दिलं. थोडा वेळ पाण्यात बुडबुडे अन् तरंग उठले. मग सगळं शांत झालं.

तिही अगदी आतपर्यंत शांत झाली होती. डोळ्यापुढचं धुकं विरलं होतं. विवेकाची उन्हं पसरली होती. खूप प्रसन्न अन् हलकं वाटत होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...