कथा * ऋता गुप्ते

ऑफिसात नवीन जनरल मॅनेजर येणार होते. प्रत्येकाच्या तोंडी तोच विषय. जुने जी.एम जाणार. त्यांना सेंड-ऑफ द्यायचा. नवीन जी.एम. येणार त्यांना वेलकम करायचं. ऑफिसातल्या रिकामटेकड्यांना उद्योग मिळाला. नवे साहेब कुठून येताहेत. स्वभाव कसा आहे. बायको, मुलंबाळं किती, कशी? पण त्यांना फारशी माहिती मिळत नव्हती. मात्र त्यांच्या खूपच खूप बदल्या झाल्या आहेत एवढंच कळलं होतं.

ठरलेल्या दिवशी साहेब आले. जंगी स्वागत झालं. जुने साहेबही निरोप घेताना गहिवरले. हळूहळू सगळं आपापल्या जागी ठीकठाक झालं.

आपल्या वातानुकूलित चेंबरमध्ये बसलेला शशांक म्हणजे नवा जी. एम. घामाघूम झाला होता. त्याच्या मनातला तो संशायचा किडा त्याला सुखानं जगू देत नव्हता. समोरचा माणूस आपल्याला खुनी किंवा अपराधी मानतो आहे का असं त्याच्या मनात यायचं. त्यामुळेच तो लोकांशी बोलताना धास्तावलेला असायचा. लोकांना खरं तर काहीही ठाऊक नसतं. पण आपलाच संशय आपल्याला सुखानं जगू देत नाही. अनेक लोकांना त्याच्या या वागण्याचं नवल अन् कुतुहल वाटे. तरीही हळूहळू शशांकचा विनम्र स्वभाव, त्याची हुशारी, इतरांना समजून घेण्याची अन् मदत करण्याची वृत्ती यामुळे तो ऑफिसात लोकप्रिय झाला होता.

शशांक या ऑफिसात आला, तेव्हा नीरज दीड महिन्याच्या रजेवर होता. परतून आल्यावर त्यानं जनरल मॅनेजर म्हणून शशांकला बघितलं, तेव्हा तो एकदम आनंदला. कारण पूर्वी तो आणि शशांक एकत्र काम करून चुकले होते. तो उत्साहानं शशांकला भेटायला आला. पण मनात चोर असलेल्या शशांकनं अत्यंत थंडपणानं त्याचं स्वागत केलं अन् जेमतेम काही वाक्य बोलून तो आपल्या फायलीत डोकं घालून बसला. शशांकवर कदाचित नव्या ऑफिसच्या जबाबदारीचं दडपण असेल असं समजून नीरजनंही त्याची रजा घेतली.

नीरज चेंबरबाहेर गेला, तेव्हा शशांकचे कान बाहेरच्या हालचालींकडेच होते. त्याला दरदरून घाम फुटला. आता नीरजनं बाहेर जाऊन स्टाफला काय काय सांगितलं असेल? लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील?

आता त्याचं कामांत लक्ष लागेना. फायली तशाच बाजूला सारून तो बसून राहिला. घड्याळाकडे बघितलं अजून फक्त बाराच वाजले होते. वाटलं, घरी निघून जावं. पण घरी तरी जाऊन काय करणार? घरात अरूणा नाहीए ना?

एव्हाना नीरजनं सर्वांना सांगितलं असेल…त्याला तरी खरं खोटं कितपत ठाऊक आहे? नीरजलाही वाटत असेल का की मीच अरूणाला पेटवलं…जाळून मारलं…शशांक विचार करत होता.

आठवणींचं ते बोचकं उघडू उघडू बघत होतं. शशांक त्यावर वर्तमानकाळाचं दडपण ठेवू बघत होता. पण त्या आठवणी उसळून बाहेर आल्याच…विसरू म्हणता त्या विसरून होत नव्हत्या.

नुकतंच लग्न झालं होतं शशांकचं. ‘‘अरूणा, किती सुंदर आहेत तू. माझ्या आईनं तुझी निवड केली म्हणून मी तिला धन्यवाद देत असतो.’’

अरूणा लाजली. गाल लाल लाल झाले. शशांक अधिकच वेडा झाला.

खरोखर भारलेलेच दिवस होते ते. सोन्याचे दिवस अन् चांदीच्या रात्री. शशांक अरूणाच्या सौंदर्यावर सुंदर कविता करायचा. त्याच्या डायरीत त्या कविता समाधानानं विसावल्या होत्या. त्याचं हृदय अत्यंत कोमल होतं. संवेदनाक्षम होतं. त्या उलट अरूणा अत्यंत कठोर आणि व्यवहारदक्ष होती. तिचा रूक्ष स्वभाव तिच्या सौंदर्याशी फारच विसंगत होता. मनीऑर्डरची ती बारकशी पावती की काय अन् त्यावरून तिनं घातलेला धिंगाणा काय.

‘‘शशांक, हे दोन हजार रूपये तुम्ही कुणाला पाठवले आहेत?’’ अरूणानं कठोर आवाजात प्रथमच विचारलं.

‘‘अरेच्चा? ही पावती माझ्या डायरीत होती. याचा अर्थ तू माझी डायरी बघितलीस अन् तुझ्यावर लिहिलेल्या कविताही वाचल्यास?’’ तिला प्रेमानं मिठीत घेत शशांक म्हणाला.

अरूणा गुश्शातच होती.

‘‘अगं, आईला पाठवले. मी दर महिन्याला तिला पाठवतो पैसे.’’ अगदी मोकळेपणानं शशांकनं सांगितलं अन् तो ऑफिसमध्ये घडलेली एक मजेदार घटना तिला सांगू लागला.

अरूणामध्ये झपाट्यानं होणारा बदल त्याच्या आधी लक्षात आला नाही. त्याच्या कविमनाला अरूणाचा रूक्ष व्यवहारवाद खटकला तरी ध्यानात आला नाही. अरूणा आता सतत नव्या नव्या मागण्या करायची. मागणी पूर्ण झाली नाही तर भांडण करायची.

‘‘अरूणा, या महिन्यात आपल्याला पडदे करणं जमणार नाहीए. पुढल्या महिन्यात नक्की करूयात…अन् खरं सांगू का? तुझ्या गुलाबी गालांना मॅच होणारे हे गुलाबी पडदेच मला फार आवडतात.’’

शशांकला वाटायचं, अरूणानं नीट बजेट आखावं. त्याप्रमाणे खर्च करावा. आईला तो फक्त दोन हजार पाठवायचा. उरलेले बारा हजार अरूणाच्याच हातात द्यायचा. एवढा पैसा हातात असूनही अरूणा समाधानी नव्हती.

‘‘वडील कमवतात ना तुमचे? मग आईला तुम्ही पैसे पाठवायची काय गरज आहे?’’ अरूणा फणकारली.

‘‘अगं, बाबांचा पगार कमी आहे. काही कर्ज फेडायचं आहे. मला एवढं शिकवलं, मोठा ऑफिसर झालो. आईच्या कष्टावरच ना? तिला किती इच्छा माराव्या लागल्या त्या काळात. आता थोडी निवांत जगेल…म्हणून पाठवतो तिला पैसे.’’

शशांकने समजावलं तरी अरूणा हातातले बारा हजार विसरून त्या दोन हजारांसाठी रोज भांडण उकरून काढायची. सर्व गरजा भागवून, थोडी फार चंगळ करूनही बारा हजार रूपये मोठीच रक्कम होती. पण रोजची वादावादी, तणाव यामुळे शशांक दु:खी झाला. त्याच्या गुलाबी डायरीतल्या कविता पार कोमेजल्या.

वेळ मिळाला की कविता करणारा शशांक आता अधिक पैसे कसे मिळवायचे अन् अरूणाला खुश कसं ठेवायचं यातच गुंतला. लहानगा कौशल त्या दोघांना जोडणारा दुवा होता. पण अरूणाला संतापाचा झटका आली की ती त्याच्याकडेही साफ दुर्लक्ष करायची. तिचा मूड बिघडू नये म्हणून हल्ली शशांक आपल्या आईवडिलांना पाठवलेले पैसे तिच्यापासून चोरून, लपवून ठेवायचा.

त्या दिवशी अरूणानं घराची साफसफाई करायला घेतली होती.

‘‘हे तुमच्या वडिलांचं पत्र सापडलंय मला. दोन महिन्यांपूर्वी आलेलं दिसतंय. त्यांनी तुमच्याकडे दहा हजार रुपये मागितले आहेत. तुम्ही पाठवले नाहीत ना?’’

अरूणाच्या प्रश्नानं शशांक एकदम भांबावला. त्यानं तर पैसे पाठवून दिले होते. फक्त अरूणानं चिडू नये, भांडू नये म्हणून तिला चोरून पाठवले होते. मागच्या महिन्यात त्याला प्रमोशन अन् एरियर्स मिळाले होते. ते त्यानं घराच्या डागडुजीसाठी वडिलांना पाठवले होते.

अरूणा संतापली. शशांकचा चेहरा खोटं बोलू शकला नाही.

‘‘थांबा जरा, तुम्हाला चांगला धडा शिकवते. जन्मभर लक्षात राहील.’’

खरंतर आता शशांकचा पगार भरपूर वाढला होता, पण अरूणा त्या दहा हजार रुपयांसाठी भांडत होती. रोजच ती आत्महत्त्येची धमकी द्यायची. तिच्या धमक्यांना शशांक कंटाळला होता. अरूणाच्या बडबडीकडे लक्ष न देता कौशलचा हात धरून शशांक घराबाहेर पडला. त्याला शाळेत सोडलं अन् मग तो ऑफिसला गेला. तो तिथं पोहोचतोय तोवर सहकाऱ्यानं सांगितलं, ‘‘लवकर घरी जा. तुझ्या शेजाऱ्यांचा फोन आला होता. वहिनींना खूप भाजलंय.’’

ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेली अरूणा दहा दिवस हॉस्पिटलमध्ये तडफडत होती.

‘‘मला वाचवा शशांक…मला जगायचंय. मी तर फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी पेटवून घेतलं होतं…’’ अरूणाचे ते शब्द तो विसरू शकला नव्हता. आपल्या क्रोधाग्नीत तिनं स्व:तलाच भस्म केलं होतं असं नाही तर लहानग्या कौशल अन् प्रेमळ शशांकचं आयुष्यही पार होरपळून निघालं होतं. आयुष्यातल्या सगळ्या आनंदाला करपट वास येत होता. कुणी काही म्हणायचं, कुणी काही बोलायचं. पोलीस केस झाली. पेपरला बातम्या…पण सुदेवाने अरूणानं मृत्यूपूर्वी स्वत:ची चूक कबूल केली. पण व्हायची ती मानहानी जालीच होती. त्याचे आईबाबा तर अवाक् होते. त्यांनी हाय खाल्ली. दोघंही एका मागोमाग एक मरण पावली.

उरले फक्त शशांक व कौशल. या बाप लेकांसमोर उभं आयुष्य वैराण वाळवंटासारखं पसरलं होतं. अरूणानं आई म्हणून अन् पत्नी म्हणून कर्तव्यात खरोखर कसूर केली होती. अन् शिक्षा हे बापलेक भोगत होते. कुणीही भेटलं की अरूणाचा विषय निघायचाच. स्वत:ची सफाई देता देता, स्वत:ला निर्दोष सिद्ध करता करता शशांक दमला होता. अरूणाबद्दलची घृणा मनातून जात नव्हती. तो सतत बदली करून घेत नव्या नव्या जागी पोहोचत होता.

अरूणाच्या मृत्यूमुळे शशांक बरोबरच कौशलही आत्मविश्वास घालवून बसला होता. त्यामुळे तो तोतरं बोलायचा.

एकदा घरात काम करत असताना शशांकला जाणवलं की कौशल त्याच्याकडे टक लावून बघतो आहे.

‘‘काय झालं कौशल? असा का बघतोस?’’

‘‘बा…बाबा…तू…तुम्ही आईला मा…मारलं?’’ तोतरत कौशलनं विचारलं.

‘‘कुणी सांगितलं तुला? मी नाही रे मारलं. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिनं स्वत:ला जाळून घेतलं.’’ मुलाला मिठीत घेत शशांक म्हणाला.

‘‘त…तो…रो…हि…त…म्हणत हो होता…’’

शशांकला कळेना लेकाची समजूत कशी घालावी. ‘‘रोहित म्हणत होता, तुझे बाबा आई खूप भांडायचे अन् बाबांनी आईला जाळलं…’’ हे शब्द त्या भाबड्या मुलानं कसे बसे उच्चारले. त्याच्या वाचेवर परिणाम झाला होता.

शशांकही कायम घाबलेला असायचा. कुणी काही म्हटलं नाही तरी त्याला वाटे लोक आपल्याबद्दलच बोलतात. कुणी म्हणे, हुंडा दिला नाही तिच्या वडिलांनी, कुणी म्हणे तिचं प्रेमप्रकरण होतं, कुणी काही म्हणे, कुणी काही बोले…शशांक दूर पळत होता, या गावातून त्या गावात…एका जागेवरून दुसऱ्या जागेवर…पण तो आता थकलाय. आता तो पळणार नाही…मुलाला सगळं समजावून सांगणार. स्वत:चा व त्याचा गमावेला आत्मविश्वास परत मिळवणार.

केबिनच्या भिंतीवरच्या घड्याळानं एकचा ठोका दिला. दचकून शशांक भानावर आला. एक वाजता कौशल शाळेतून यतो. त्याच्याबरोबर जेवण्यासाठी शशांक घरी जातो. आजही तो केबिनबाहेर आला. अजून लोक आपापल्या टेबलावरच होते.

‘‘चला मंडळी, लंच ब्रेक घ्या. मीही येतोच लंच आटोपून.’’ शशांकने म्हटलं. सर्वांनी हसून हो म्हटलं.

घरी पोहोचल्यावर शशांकनं स्वयंपाक्याला विचारलं, ‘‘कौशल आला का?’’

‘‘होय साहेब, कौशल बाळा कपडे बदलताहेत. तुम्ही हात धुवून घ्या. जेवण तयार आहे.’’ तो अदबीनं म्हणाला.

‘‘बाबा, आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही विसरलात, आम्ही नाही. हॅप्पी बर्थ डे.’’ कौशलनं त्याच्या गळ्यात हात टाकले.

‘‘आजचा दिवस कसा होता? इथली शाळा आवडली का तुला?’’ शशांकने विचारलं…मनातून त्याला भीती वाटत होती इथंही कौशलला कुणी टोचणारं, छळणारं भेटतंय की काय? पण कौशलच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं.

‘‘बाबा, मॅथ्स टीचर खूप छान शिकवतात. सायंस आणि इंग्रजीच्या मॅडमही मला आवडतात. इथं मला खूप मित्र मिळाले आहेत. बाबा ती सगळी ना, खूप हुशार आहेत. मलाही त्यांच्याबरोबर खूप मेहनत करावी लागेत. म्हणून तर टिचर माझं कौतुक करतात.’’

शशांक कौशलकडे बघत होता. कौशलचा तोतरेपणा जवळजवळ नाहीसा झाला होता. तो खुष होता. त्याला आत्मविश्वास वाटत होता…आता शशांकनं स्वत:च स्ट्राँग व्हायला हवं. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तो आणि त्याचा कौशल खूप छान आयुष्य जगणार आहेत. कुणालाही घाबरायचं नाही, कुणालाही बिचकायचं नाही. सगळ्यांना धिटाईनं सामोरं जायचं. चूक आपली नाही तर अपराधी तरी का वाटून घ्यायचं?

सायंकाळी शशांक घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आधी नीरज तिथं हजर होता. स्वयंपाकी, ड्रायव्हर आणि कौशलनं मिळून एक छोटीशी पार्टी ठेवली होती. त्यात नीरजचीही मदत झाली होती. कौशल खूप आनंदात होता. त्याचे नवे मित्र-मैत्रिणी अन् शशांकच्या ऑफिसचे काही निवडक लोक पार्टीला आले होते. किती तरी दिवसांनी कौशल आनंदात होता अन् घरात चैतन्य जाणवत होतं.

संध्याकाळ खूपच आनंदात गेली. जाताना नीरजनं शशांकला मिठी मारून शुभेच्छा दिल्या.

आता शशांक अन् कौशल दोघंच उरले.

‘‘बाबा, तुम्हाला आवडलं का? आता माझे मित्र नेहमी आपल्या घरी येतील. ते मलाही बोलावतात ना? मग आपणही त्यांना बोलावलं पाहिजे ना?’’ कौशल म्हणाला.

शशांकनं आवेगानं लेकाला मिठीत घेतलं. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले.

‘‘बाबा, ही डायरी, तुमची ‘बर्थ डे गिफ्ट.’ तुम्ही पुन्हा डायरी लिहा…’’ बाबांना डायरी देऊन, गुड नाईट म्हणून कौशल झोपायला गेला.

किती तरी दिवसांनी शशांकच्या मनात गाणं घुमायला लागलं…‘‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले, मुक्या भावनांना…’’

तो बाल्कनीत येऊन उभा राहिला. मघा ढगाआड गेलेला चंद्र आता आकाशात शांत हसत होता. ‘‘मी बघ, आलो ना काळ्या मेघांना दूर सारून? तू ही आता काळ्या छायेतून बाहेर आला आहेस…असाच राहा, निर्भय…  निशं:क मनानं जग…’’ चंद्र जणू त्याला सांगत होता…कळ्यांची, फुलांची, शब्दांची धुंदी त्याच्या मनावर चढत होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...