कथा * सिद्धार्थ जयवंत

समीर ऑफिसच्या गोष्टी घरात कधीच बोलत नाही, त्यामुळेच त्याच्या ऑफिसात अधूनमधून होणाऱ्या पार्ट्यांना माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. ऑफिसमधल्या ‘ऑफिसेत्तर बातम्या’ मला तिथेच समजतात.

कुणीही नवरा आपलं ‘लफडं’ किंवा ‘प्रकरण’ घरी कधीच सांगत नाही, पण इतरांचं काही असलं तर मात्र आवर्जून घरी सांगतो. मग तीच ‘मसालेदार’ झणझणीत बातमी बायको पार्टीत इतरांबरोबर शेयर करते त्यावेळी सांगणारीच्या डोळ्यांतली चमक अन् ऐकणाऱ्यांची उत्सुकता अगदी बघण्यासारखी असते.

मागच्या आठवड्यात जी पार्टी झाली त्यात सर्व बायकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मी होते. मला सर्वांसमोर अपमानित करत सगळ्यात आधी नीलमने म्हटलं, ‘‘तुझ्या समीरचं, त्या अकाउंट सेक्शनच्या बडबड्या रितूबरोबर प्रकरण सुरू आहे, खरं का.’’

त्यानंतर इंदू, नेहा, कविता, शोभा सगळ्यांनीच या बातमीला दुजोरा देत त्यांना सिनेमाला जाताना, हॉटेलात कॉफी पिताना वगैरे बघितल्याचं सांगितलं. त्यामुळे शंकेला जागा नव्हतीच… मनातून मी हादरले. दु:खीही झाले, पण वरकरणी मात्र शांत व हसतमुखच होते. बातमीचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे दाखवण्यात मी यशस्वी ठरले.

त्यांचे सल्ले अन् सहानुभूती मला नको होती म्हणून मी सरळ प्रसाधनगृहात शिरले. तिथल्या एकांतात  मला दोन गोष्टी सुचल्या. एक तर अशा वेळी नवऱ्याशी भांडण करून फायदा होत नसतो. भांडणाचा परिणाम उलटा होतो. दुसरं म्हणजे अशा वेळी रडूनभेकूनही काही उपयोग होत नाही. तेव्हा काही तरी वेगळीच युक्ती करायला हवी.

यांचं प्रकरण नेमकं किती पाण्यात आहे याचा अंदाज घेण्यासाठी मी प्रसाधनगृहातून बाहेर पडले अन् पार्टी हॉलमध्ये गेले.

हॉलच्या एका कोपऱ्यात ती दोघं मला हसतबोलत असलेली दिसली. मी चेहऱ्यावर खोटं हसू आणलं अन् बेदरकारपणे चालत त्या दोघांपाशी पोहोचले.

मला अचानक आपल्याजवळ बघून दोघंही एकदम दचकलीच! त्यांच्या मनात चोर असणार हे सांगणारा तो पुरावाच होता.

‘‘रितू, किती सुंदर दिसते आहेस? तुझा ड्रेसही फार छान आहे हं! मी तिची स्तुती केल्याने ती जरा खूष झाली.

मग मी असंच थोडं इकडचंतिकडचं बोलत राहिले. एखादा विनोद ऐकवला. तीही त्यामुळे मोकळी झाली. मोकळेपणाने हसूबोलू लागली.

समीरला माझ्या वागण्यात कोणतीच आक्षेपार्ह गोष्ट न आढळल्यामुळे तो निर्धास्त झाला अन् तेथून निघून गेला. दुसऱ्या ग्रुपमध्ये मिसळला.

मनातला राग अन् तिरस्कार लपवत मी खूपच वेळ रितूबरोबर घालवला. त्यामुळे रितू व समीर यांना एकत्र येण्याची संधी मी मिळू दिली नाही.

मी रितूला खूपदा ‘एकदा घरी ये ना.’ असं म्हणत होते. शेवटी एकदाचं तिनेही मला ‘घरी या,’ असं आमंत्रण दिलं. मला तेच हवं होतं.

मनातून मी उदास होते. समीरच्या विश्वासघाताने मी दुखावली गेले होते. पण वरकरणी तसं काहीच भासवत नव्हते. मनातून मात्र दोघांना धडा कसा शिकवायचा याचा बेत ठरवत होते.

माझं औदासीन्य सासूबाईंच्या नजरेतून सुटलं नाही. त्या तोंडाच्या फटकळ, पण मनाच्या फारच प्रेमळ आहेत. त्यांनी खोदूनखोदून विचारल्यावर मी त्यांना सगळं काही सांगून टाकलं. त्यानंतर दोन दिवस आम्ही खूप काही विचारविनियम केला. एकूणच त्यांच्यापाशी बोलल्यामुळे माझं औदासीन्य दूर झालं अन् माझ्यात नवा उत्साह संचारला.

नंतरच्या आठवड्यात समीर तीन दिवसांच्या टूरवर गेला. मी नेमका शनिवार निवडला अन् सकाळी दहाच्या सुमाराला रितूच्या घरी पोहोचले.

रितूने हसून माझं स्वागत केलं, तरी पण तिच्या डोळ्यांत काळजी अन् आश्चर्याचे भाव होतेच.

‘‘अगं, समीर टूरवर गेलाय, मला वेळ होता, तुझी आठवण झाली. म्हटलं नव्या मैत्रीला खतपाणी घालायचं तर वरचेवर भेटायला हवं. म्हणून तुझ्याकडे आले,’’ मी अगदी आपलेपणाने बोलले.

‘‘तुमचं स्वागत आहे सीमाताई, राहुलला का नाही आणलंत?’’ तिने ड्रॉइंगरूमकडे जात विचारलं.

‘‘माझी नणंद आलीए माहेरी, राहुल तिच्या दोन मुलांबरोबर खेळतोय.’’

‘‘काय घ्याल? चहा की कॉफी?’’

‘‘चहा चालेल… रितू अगं, रिक्शातून उतरताना माझ्या कमरेत उसण भरलीए… मी जरा आडवी होऊ का?’’

‘‘हो, हो….’’ तिने पटकन मला उशी दिली अन् मी तिच्या बेडवर आरामात लोळले. ती चहा करायला गेली.

चहाबरोबर तिने बरंच काही फराळाचंही आणलं होतं. आम्ही मजेत चहाफराळ आटोपला. लवकरच आम्ही अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलू लागलो.

बोलताबोलता मी तिच्या लग्नाचा विषय काढला. ती थोडी बावरली, घाबरली.

‘‘तू लव्ह मॅरेज करणार की, ठरवून लग्न करणार?’’

या प्रश्नावर ती जरा बावचळली. ‘‘बघूया कसं काय ते,’’ ती कशीबशी उत्तरली.

‘‘तुझ्यासारख्या देखण्या, स्मार्ट, मिळवत्या मुलीला तर किती तरी मित्र असतील. कुणाशी तरी नक्कीच प्रकरण चालू असणार… हो ना? सांग ना? तो भाग्यवंत कोण आहे?’’ मी तिचा पिच्छाच पुरवला.

आता ती कशी सांगणार की तिचं प्रकरण माझ्याच नवऱ्याबरोबर चाललंय म्हणून? मी अजून थोडा वेळ याच विषयावर छेडून तिला छळलं… मला त्यात खूपच मजा येत होती.

तेवढ्यात माझ्या मोबाइलवर दोन फोन आले. एक माझ्या सासूबाईंचा अन् दुसरा माझ्या भिशीतल्या मैत्रिणीचा. दोघींनाही मी आता रितूकडे आल्याचं अन् माझ्या कमरेत उसण भरल्याचं अगदी रंगवून सांगितलं.

मध्ये जेमतेम अर्धा तास गेला असेल तेवढ्यात माझ्या सासूबाई, नणंद स्नेहा, तिची दोन मुलं अन् रोहित असे सगळेच रितूच्या घरात दाखल झाले. मुलांनी सरळ टीव्हीकडे मोर्चा वळवला अन् ती कार्टून चॅनल लावून बसली. सासूबाई अन् स्नेहा सोफ्यावर बसून माझ्या कमरेतल्या उसणीबद्दल चौकशी करू लागल्या.

‘‘आई, तुम्ही माझी फारच काळजी करता,’’ मी भरल्या गळ्याने बोलले.

‘‘तू एक नंबरची बेपर्वा मुलगी आहेस. हजारदा सांगितलंय तुला की वजन कमी कर, पसारा आटोक्यात आण. एवढं वजन असल्यावर कमरेत उसण भरणारच. पण तुला ऐकायला नको…’’ सासूबाई कडाडल्या. मी ओशाळून रितूकडे बघितलं.

सासूबाईंचा कडकलक्ष्मी अवतार बघून रितू घाबरली होती. ती प्रथमच त्यांना बघत होती.

‘‘समीरदादा जेव्हा एखाद्या सुंदर फुलपाखराच्या मागे जातील तेव्हा वहिनीचे डोळे उघडतील,’’ स्नेहाने म्हटलं. त्यावर सासूबाई भडकून उठल्या.

‘‘तुझ्या दादाच्या तंगड्या तोडीन अन् त्या फुलपाखराचे पंख उपटीन. समजलीस?’’ त्यांचा आवाज तापलेला होता.

‘‘अगं, मी गंमत केली, चिडतेस काय?’’

‘‘मग असं मूर्खासारखं बोलतेस कशाला?’’

स्नेहाने तोंड वाकडं केलं अन् ती गप्प बसली. रितू उगीचच बोटं एकमेकांत गुंफत, पुन्हा मोकळी करत जमिनीकडे दृष्टी लावून उभी होती. सासूबाईंकडे बघण्याचं धाडस तिला होत नव्हतं.

सासूबाई मला अन् स्नेहाला सांगू लागल्या, ‘‘हल्लीच्या पोरींना समजूतही नाही अन् धीरही नाही. आपला संसार सांभाळण्याची अक्कलही नसते. उगाच याच्या त्याच्या नादी लागायचं… प्रेमविवाह तरी ठीक आहे, पण नुसतंच प्रेम करायचं याला काय अर्थ आहे? जी वाट आपल्या कामाची नाही, त्या वाटेवर चालायचंच कशाला? खरं ना, रितू?’’

‘‘अं?… हं… हो!’’ रितू दचकून हो म्हणाली.

‘‘तुझं लग्न झालंय?’’

‘‘नाही…’’

‘‘कधी करते आहेस लग्न?’’

‘‘लवकरच!’’

‘‘व्हेरी गुड! तुझे आईबाबा कुठेत?’’

‘‘माझे बाबा वारले… आई आहे, ती आज माझ्या मावशीला भेटायला गेली आहे.’’

‘‘कधी येईल?’’

‘‘संध्याकाळी.’’

‘‘मी येईन त्यांना भेटायला. सुने, अगं आज काय इथेच रहायचा बेत आहे का तुझं काय म्हणतंय दुखणं?’’

‘‘आई, दुखणं तर वाढलंय… फार त्रास होतोय…’’ मी कण्हत म्हणाले.

‘‘डॉक्टरांना बोलावूयात का?’’

‘‘नको, नको,’’ मी घाबरल्याचं भासवून म्हणाले, ‘‘रितू तुझ्याकडे आयडेक्स असेल का?’’

‘‘आणते. लगेच आणते,’’ म्हणत रितू पटकन आत गेली. तिच्याकडून मी आयोडेक्स लावून घेतलं.

रितूला माझ्या सासूबाई, तरुण पोरींनी कसं वागायला हवं यावर लेक्चर देत होत्या. स्नेहा मुद्दाम वाकड्यात शिरून त्यांना अधिक चिडवायला भाग पाडत होती. कुठल्याही क्षणी दोघी कडाडून भांडायला लागतील असं वातावरण होतं. त्या वातावरणात रितूचं टेन्शन वाढलं होतं.

तेवढ्यात डोअर बेल वाजली. स्नेहाने जाऊन दार उघडलं. ती परतली तेव्हा तिच्यासोबत माझ्या भिशी ग्रुपच्या तिघी मैत्रिणी अनीता, शालू व मेघा होत्या.

या तिघी खूपच बडबड्या आहेत. त्यांच्या येण्याने मायलेकींमधलं वाक्युद्ध थांबलं. पण खोलीतला कोलाहल मात्र एकदम वाढला.

‘‘आपल्या नव्या मैत्रिणीकडून सेवा करवून घेत आहेस ना, सीमा?’’ डोळे मोठे करत अनीताने म्हटलं अन् सगळेच हसले.

‘‘रितू, तुझ्याबद्दल इतकं ऐकलंय सीमाकडून… सीमा सारखी तुझ्याबद्दल बोलतेय सद्या… बघ हं, तिच्या हृदयात विराजमान होऊन आम्हाला तिथून हाकलून लावू नकोस हं! तू प्लीज, आमच्याशीही मैत्री कर,’’ शालूने रीतूच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.

‘‘आमच्या नवीन मैत्रीचा पाया भक्कम करण्यासाठी आम्ही गरमागरम समोसे, जिलबी अन् ढोकळाही आणला आहे.’’ मेघाने अशा काही आविर्भावात म्हटलं की रितूलाही हसायला आलं.

आपापली ओळख करून देऊन तिघी बेधडक स्वयंपाकघरात शिरल्या. आयोडेक्स जागेवर ठेवून हात धुऊन रितू स्वयंपाकघरात जाईपर्यंत त्यांचा चहादेखील करून झाला होता.

एक गोष्ट मात्र खरी की, रितूच्या घरात प्रत्येक गोष्ट होती अन् ती जागच्या जागी होती.

मुलांसाठी स्नेहाने फ्रीजमधून ज्यूसचा कॅन काढला. आम्ही सगळे चहा, समोसे, जिलबी खात मजेत गप्पा मारत होतो. रितूच्या फ्लॅटमध्ये इतका दंगा कधीच झाला नसेल.

माझ्या मैत्रिणींनी रितूशी लगेच मैत्री केली. तीही अगदी मोकळेपणाने त्यांच्याशी बोलत होती. जणू खूप जुनी ओळख असाव.

‘‘सीमा, रितूशी मैत्री होण्याचा एक फायदा तुला नक्कीच होईल,’’ खट्याळपणे शालूने म्हटलं.

‘‘कसला फायदा?’’ मीही उत्सुकतेने विचारलं.

‘‘अगं, समीरच्याच ऑफिसमध्ये असल्याने रितू तुला तिथली बातमी बरोबर देईल. म्हणजे जर तुझ्या समीरचं तिथे कुणाशी लफडं झालं तर ही तुला लगेच सूचना देईल की!’’

‘‘अगंबाई खरंच? रितू, तू माझे डोळे बनून समीरवर लक्ष ठेवशील?’’ मी खूपच प्रेमाने रितूला गळ घातली.

रितूचे गाल एकदम गुलाबी झाले. तिने उत्तर दिलं नाही. फक्त मान डोलावली अन् मग ती टेबलावरचं आवरायला लागली.

खोलीतला पसारा आवरून होतोय तेवढ्यात माझे सासरे तिथे पोहोचले. ते येताच वातावरण बदललं.

माझे सासरे एकदम कडक आहेत. माझ्या मैत्रिणींनी पटापट पदर दोन्ही खांद्यावरून घेतला अन् वाकून त्यांना नमस्कार केला. सगळ्या अशा गप्प झाल्या जणू त्यांना बोलायला येतंच नाही.

‘‘सूनबाई, घरी चलण्याच्या स्थितीत आहेस की अॅम्ब्युलन्स मागवू?’’ त्यांनी गंभीरपणे विचारलं.

‘‘चलेन बाबा,’’ मी नम्रपणे उत्तरले.

‘‘तू धसमुसळेपणाने चढतेस, उतरतेस, जरा सावकाशीने कामं करावीत ना?’’

‘‘होय बाबा.’’

‘‘मी डॉक्टर मेहंदळ्यांना फोन केलाय. घरी जाताजाता त्यांना दाखवून, घरी जाऊ.’’

‘‘होय बाबा’’

‘‘इथे कशाला आली होतीस?’’

‘‘या रितूला भेटायला आले होते.’’

‘‘हिला कधी बघितली नाही… नवी ओळख आहे का?’’

‘‘हो बाबा, ही ना यांच्याच ऑफिसात काम करते.’’

‘‘रितू बाळा, तू एकटीच राहातेस इथे?’’

‘‘नाही काका, आई असते माझ्याबरोबर.’’ बाबांच्या आवाजानेच रितूला कापरं भरलं होतं.

‘‘असू दे, असू दे. बाबा नाहीत तरी आम्ही आहोत ना? तुला कधीही गरज वाटली तर आम्हाला सांग,’’ बाबा बोलले मग आमच्याकडे वळून म्हणाले, ‘‘आता निघा…’’

बाबा निघाले तसे आम्हीही उठलो.

निघतानिघता सासूबाई रितूला म्हणाल्या, ‘‘रितू बेटा, आता लवकर तुझ्या लग्नाचं आमंत्रण आमच्या हातात पडू दे. उशीर झाला तर चांगली मुलं मिळत नाहीत.’’

‘‘रितू, तुला आम्ही आमच्या भिशी ग्रुपची मेंबर करून घेऊ. मी तुला नंतर फोन करते.’’ अनीताच्या या प्रस्तावाला आम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलं.

तिन्ही मुलं, ‘‘थँक्यू आंटी,’’ म्हणत बाहेर निघून गेली. सर्वात शेवटी मी रितूचा आधार घेत दाराबाहेर आले.

‘‘रितू, या सगळ्यांचं इतक्या मोकळेपणाने लोळणं, वागणं तुला खटकलं तर नाही ना?’’ मी तिला जरा काळजीने विचारलं.

‘‘नाही ताई, ही सगळी तर खूपच भली माणसं आहेत.’’ ती म्हणाली. पण मनातून ती थोडी नर्व्हस झाली होती.

‘‘तुला सांगते, रितू, ही खरोखर फार भली माणसं आहेत. आणि मुख्य म्हणजे यांचा मला आधार आहे. यांच्यामुळे मला स्वत:ला खूपच सुरक्षित वाटतं. हे माझे पाठीराखे, सतत मला मदत करतात. माझ्या संसाराकडे कुणी वाकड्या नजरेने बघायचं धाडसही करू शकत नाही. यांच्याशी भांडण करणं, यांना चॅलेंज करणं महाकठीण आहे. आपली मैत्री झाली आहे. तू माझी मैत्रीण म्हटल्यावर ही सगळी माणसं तुझ्याही पाठीशी उभी राहातील. असे पाठीराखे भाग्याने मिळतात. स्वत:ला सुरक्षित वाटणं ही फार मोठी गोष्ट असते. रितू, एरवी लोक किती भीत भीत जगत असतात.’’

रितूने मान डोलवली. ‘‘सांभाळून जा,’’ तिने म्हटलं… आम्ही प्रेमाने एकमेकींचा निरोप घेतला.

दोन्हीतिन्ही गाड्यांमध्ये सर्वांनी बसून घेतलं होतं. माझे पाठीराखे माझी  वाटच बघत होते. रितूचा आधार सोडून मी व्यवस्थित चालत त्यांच्यात जाऊन मिसळले. माझ्या कमरेत उसण भरलीच नव्हती. सगळं काही ठरवलेल्या योजनेप्रमाणेच पार पडलं होतं.

मी दोन बोटांनी व्ही फॉर व्हिक्टरीची खूण करताच सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...