कथा * दीपा पांडे

अजून लोकल ट्रेन यायला पंधरा मिनिटांचा अवकाश होता. रम्या वारंवार प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला बघत होती. राघव अजून पोहोचला नव्हता. ही लोकल चुकली तर पुढे अर्धा तास वाट बघावी लागणार होती.

तेवढ्यात रम्याला राघव येताना दिसला. तिनं हसून हात हलवला. राघवनंही हसून प्रतिसाद दिला. सकाळचे सात वाजले होते. गर्दी फारशी नव्हती. स्टेशनवर तुरळक माणसं होती. शाळेत जाणारी तीन चार मुलं, एक दोन जोडपी अन् थोड्या अंतरावर एक तरूणांचं टोळकं…बाकी कुणी नव्हतं.

रम्या बाकावरून उठून प्लॅटफॉर्मच्या मध्यावर आली. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला. ती मोबाइल ऑन करतेय तेवढ्याच कुणीतरी मागून तिच्या पाठीत सुरा खुपसला. धक्क्यानं ती कोलमडून खाली पडली. डोकं आपटल्यामुळे जखम झाली…ती बेशुद्ध पडली.

राघव तिच्याजवळ पोहोचतो हल्ला करणारा पळून गेला होता. सगळे लोक घाबरून ओरडत होते. रेल्वे पोलिसांनी ताबडतोब तिला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. रम्याच्या मोबाइलवरून तिच्या बाबांना फोन केला. ते स्टेशनच्या जवळच होते. रम्याबरोबर ते स्टेशनला आले होते. तिथं त्यांना कुणीतरी भेटणार होतं. रम्याला रोज ट्रेन बदलून महिंद्रा सिटीत आपल्या ऑफिसला जावं लागायचं.

अचानक असा फोन आलेला बघून रम्याच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांच्यासोबत असलेल्या माणसानं धीर देऊन त्यांना इस्पितळात नेलं.

रम्याला आयसीयूत नेलं होतं. घरून तिची आई, थोरली विवाहित बहीण आणि तिचा नवरा ही तिथं आली होती. आई अन् बहिणीचे अश्रू थांबत नव्हते. बहिणीचा नवरा सगळी धावपळ करत होता.

राघव कोपऱ्यातल्या एका बाकावर डोकं धरून बसला होता. रम्याच्या कुटुंबीयांना त्यानं प्रथमच बघितलं होतं. त्यांच्याशी काय अन् कसं बोलावं तेच त्याला समजत नव्हतं. रम्यानं त्याला सांगितलं होतं की तिचे आईवडिल खेड्यात राहतात. त्यांना तामिळखेरीज इतर कोणतीही भाषा येत नाही. ती स्वत: अभ्यासात हुशार होती. शहरात हॉस्टेलला राहून शिकली. इंजीनियर झाली. थोरल्या बहिणीचं लग्न तर बारावी होता होताच जवळच्या गावातल्या एका श्रीमंत शेतकरी कुटुंबात करून दिलं होतं. राघव सकाळपासून आपल्या जागेवरून उठलाही नव्हता. आत कुणालाच जाऊ देत नव्हते. त्यानं ऑफिसतल्या काही सहकाऱ्यांना फोन करून रम्याची बातमी कळवली होती. सायंकाळी ते लोक येणार होते. ती मंडळी आल्यावरच तो रम्याच्या आईवडिलांजवळ आपल्या भावना व्यक्त करू शकणार होता.

गेली दोन वर्ष राघव आणि रम्या, ऑफिसच्या एकाच बिल्डिंगमध्ये कामाला होती. रम्या एका श्रीमंत शेतकरी तामिळ कुटुंबातली, उच्च ब्राह्मण कुळातली मुलगी होती तर राघव उत्तर प्रदेशातल्या छोट्या गावातला मागासवर्गीय कुटुंबातला तरूण होता. दोघांचा म्हटलं तर कधीही संबंध नव्हता. तरी एका अदृश्य ओढीनंच ती दोघं एकत्र आली होती.

रम्याची व त्याची पहिली भेटही याच लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर झाली होती. चेंग्लप्त स्टेशनवरून त्याला परानुरूसाठी लोकल पकडायची होती. गळ्यात कंपनीचं आयडी कार्ड लटकवून उभ्या असलेल्या रम्याकडे तो बिचकतच गेला. इंग्रजीत दोघांचं संभाषण सुरू झालं. पण रम्या सेंट्रल स्कूलमध्ये शिकलेली असल्यानं हिंदीही बोलू शकत होती. तो प्रथमच लोकलनं प्रवास करतोय हे ऐकल्यावर तिनं त्याला सल्लाही दिला की जर पेइंगगेस्ट म्हणून राहायचं असेल तर परानुरूच्या महिंद्रा सिटीत जागा बघ. रोजची चेंग्लप्त-परानुरू धावपळ वाचेल.

रम्याला स्वत:लाही रोज दोन ट्रेन बदलून ऑफिसला पोहोचावं लागत होतं. कारण तिचं घर खेडेगावातच होतं. ती दोघं बोलताहेत तोवर ट्रेन आली. रम्या पटकन् चढली पण राघवच्या लक्षात येई तो ट्रेन सुरूही झाली होती. त्याला प्लॅटफॉर्मवरच उभा पाहून रम्यानं पटकन् ट्रेनमधून उडी मारली.

राघव तर पार गांगरला होता. घाबरलाही होता. कसंबसं बोलला, ‘‘तुम्ही असं करायला नको होतं.’’

‘‘अरे, तू अजून इथं नवा आहेस, काहीच माहीत नाही. उगीच चुकीच्या लोकलमध्ये बसून भलतीकडे पोहोचला तर? म्हणून मी उडी मारली.’’ निर्मळ हसून रम्यानं म्हटलं.

आता त्यानं नीट बघितलं तिच्याकडे, कुरळे केस, सावळा रंग, हसरा चेहरा, तरतरीत नाक अन् ओठांवरचं स्निग्ध, निर्मळ हास्य…त्याला वाटलं ही एक मूर्ती आहे. काळ्या मातीतून तयार केलेली. त्याचे वडील त्याला मूर्ती बनवून द्यायचे अन् त्यावर रंगकाम करायला सांगायचे. त्याची त्याला आठवण झाली. तिच्या रूंद कपाळावर छोटीशी काळी टिकली शोभून दिसत होती.

‘‘कसला विचार करतो आहेस?’’

आता तोही एकेरीवर आला, ‘‘तुला काही झालं असतं तर? मी स्वत:ला आयुष्यभर क्षमा करू शकलो नसतो. एका अनोळखी माणसासाठी एवढी जोखीम घेतलीस? असं करायला नको होतंस…’’

‘‘ब्लड…ब्लड…’’ डॉक्टर जे काही बोलत होता, त्यातले तेवढे दोनच शब्द त्याला समजले. डॉक्टर रम्याच्या वडिलांशी व मेहुण्याशी बोलत होते.

राघव चटकन् उठून त्यांच्यापाशी गेला. ‘‘डॉक्टर, माय ब्लड ग्रुप इज ओ पॉझिटिव्ह.’’

‘‘कम विथ मी.’’ डॉक्टर म्हणाले. राघव त्यांच्याबरोबर चालू लागला. डॉक्टरांनी सांगितलं, ‘‘अजून तीन-चार बाटल्या रक्ताची गरज लागू शकते.’’ राघवनं म्हटलं, ‘‘आमच्या ऑफिसचे सहकारी सायंकाळी येतील ते ही रक्त देऊ शकतात.’’

रक्तदान करून राघव इस्पितळाच्या आवारातल्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसला. त्यानं कॉफी मागवली. एक बिस्किटाचा पुडा घेतला अन् तो काफी बिस्किटं घेऊ लागला. सकाळपासून उपाशीच होता ना?

समोर लक्ष गेलं तर रम्याचे वडिलही कॉफी पिताना दिसले. पण भाषेचा मोठ्ठा अडसर असल्यामुळे तो त्यांच्याशी बोलू शकला नाही.

तेवढ्यात पोलीस तिथं आले. राघवचं स्टेटमेंट घेतलं. पोलिसांना सांगितल्याशिवाय शहर सोडायचं नाही आणि एकूणच केसमध्ये पोलिसांना सहकार्य करायचं असं बजावून ते निघून गेले.

सायंकाळी सहा वाजता त्याचे ऑफिसातले सहकारी आले, तेव्हा त्याच्या जिवात जीव आला. त्यांच्यापैकीही तिघा चौघांनी आधी रक्तदान केलं. मग ते रम्याच्या आईवडिलांना भेटले. राघवची त्यांच्याशी ओळख करून दिली.

रम्याची आई म्हणाली, ‘‘हो, सकाळपासूनच यांना इथं बसलेलं बघितलंय, पण ते रम्याचे सहकारी असतील हे ठाऊक नव्हतं. धन्यवाद तुम्हाला.’’ शेवटचे दोन शब्द राघवसाठी होते. त्याचे हात हातात घेऊन ती रडू लागली. राघवनं थोपटून तिला शांत केलं.

सहाकाऱ्यांसोबत राघव परत आला. त्यानंतर तो रोजच सायंकाळी सात ते नऊ इस्पितळाच असायचा. पंधरा दिवस रम्या आयसीयूमध्ये होती. त्यानंतर तिला प्रायव्हेट वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, तेव्हा प्रथमच राघव तिला भेटला. रम्याच्या पाठीवरची जखम भरत आली होती, पण तिच्या शरीराच्या डाव्या भागाला पक्षाघाताचा झटका आल्यामुळे ती हालचाल करू शकत नव्हती. सतत ती रडत असायची. राघव तिला धीर द्यायचा. लवकर बरी होशील म्हणून तिचा उत्साह वाढवायचा. हळूहळू सहा महिने उलटले.

रम्या खरोखर पूर्णपणे बरी झाली. ज्या दिवशी ती प्रथमच ऑफिसला जाणार होती, त्यादिवशी सकाळपासून तिला सहकाऱ्यांचे अनेक फोन येऊन गेले. ‘नक्की ये’ आज राघवची?फेयर वेल पार्टी होती. राघवची बदली चंदिगड ब्रँचला झाली होती. तो त्याच्या त्या ऑफिसमधला शेवटचा दिवस होता.

कंपनीच्या गेटापर्यंत रम्याला तिचे अप्पा सोडायला आले होते. तिच्या स्वागतासाठी तिचे सहकारी, मित्रमैत्रिणी गेटमध्येच उभे होतो. तिनं हात जोडून, हसून सर्वांना अभिवादन केलं. धन्यवाद दिले. सगळ्यात मागे राघव हातात फुलांचा गुच्छ घेऊन उभा होता.

रम्यानं स्वत: पुढे होऊन त्याच्या हातातून तो पुष्पगुच्छ घेतला, ‘‘हा तू माझ्याचसाठी आणला आहेस ना?’’

सगळ्यांना हसायला आलं. ‘‘तुझा हाच स्वभाव मला फार आवडतो,’’ मनातल्या मनात राघवनं म्हटलं.

ऑफिसात आल्यावरच रम्याला राघवच्या बदलीचं, त्याच्या फेयर वेल पार्टीचं आणि तिच्या वेलकम पार्टीचंही समजलं. काहीही न बोलता दोघं आपापल्या कामात गर्क झाले.

राघवच्या मनात आलं, तो किती आतुरतेनं रम्या बरी होऊन पुन्हा कामावर रूजू होण्याच्या दिवसाची वाट बघत होता. आज तो दिवस उगवला, पण आजच तो तिच्यापासून दूर जाणार होता.

रम्या विचार करत होती की मी इस्पितळात असताना रोज राघव यायचा. किती मला समजावायचा. आईला उगीचच शंका येत होती की यानंच मारेकरी धाडला असावा. अन् आता हिरो बनून रोज भेटायला येतोय. अप्पांना तिच्या धाकट्या मामांवर संशय होता. कारण तो नोकरी व्यवसाय करत नव्हता. त्याला संगत चांगली नव्हती, म्हणून रम्यानं त्याची लग्नाची मागणी धुडकावली होती. कदाचित त्या रागामुळे त्यानं हे कृत्य केलं असावं. आमच्याकडे मामा भाचीचं लग्न होतं हे ऐकून राघव चकित झाला होता. त्यांच्यात असं कधीच होत नाही.

यावेळी घरात किती टेन्शन होतं…सगळ्यांकडेच संशयी नजरेनं बघितलं जात होतं. इतके दिवस इस्पितळात रहावं लागलं. फिजियोथेरेपी घ्यावी लागली. आता सगळं ठीक होतंय. राघव आला की माझी कळी खुलायची, हे अप्पा अम्माला समजलं होतं.

आईच्या माहेरानं रागावून संबंध तोडले होते. दोन महिन्यांपूर्वी एकदाचा तो गुन्हेगार पकडला गेला. नाहीतर राघवलाही पोलिसांनी बाहेर जाण्याची परवानगी दिली नव्हती. कारण शेवटचा कॉल त्यालाच केला होता. ‘‘मी स्टेशनवर आलेय, तू कुठं आहेस?’’ त्यानंतरच्या कॉलकडे बघत असतानाच सुरा मारला गेला.

राघवनं सांगितलं की तो उत्तरप्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यातला असून कुंभार कुटुंबातला आहे. लहानपणी वडील मूर्ती घडवायचे व राघव रंगकाम करून मूर्ती नटवायचा. त्यानं क्लेपासून एक सुंदर मुर्ती बनवून रम्याला दिली होती.

मधल्या काळात रम्याही एखाद्या निर्जीव मूर्तीसारखी झाली होती. तिला हालचाल करता येत नव्हती. बोलता येत नव्हतं. पण राघव तिच्याशी बोलायचा. त्याला आठवायचं, त्याचे बाबा मूर्ती तयार झाल्यावर त्याला रंगवायला द्यायचे, तेव्हा तो त्या मूर्तींशी बोलत बोलत रंगवायचं काम करायचा. त्याच्या रंगकामानं ती निर्जीव मूर्ती झळाळून उठायची. तिही जणू त्याच्याशी बोलायची.

हळूहळू रम्याही बोलू लागली. दोघांच्या अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. आयुष्यात हळूहळू रंग भरू लागला होता. पण राघवला हेच कळत नव्हतं की कोण कुणाच्या आयुष्यात रंग भरतंय. आता रम्याचं आयुष्य इंद्रधनुषी झालंय. आईबाबांच्या सावलीत ती सुखात राहतेय. आता तिला राघवची गरज नाहीए. तो आता इथून जातो आहे. व्हॉट्सएप, फेसबुकवर जेवढा संबंध राहील तेवढाच.

‘‘चला, चला…, आज सगळे एकत्र लंच घेणार आहोत, लक्षात आहे ना? लंच टाइम झालाय.’’ रमणनं सर्वांना हाक दिली.

सगळे एकत्र डायनिंग एरियात जमले, तेव्हा रम्या म्हणाली, ‘‘मला सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, तुम्ही माझा प्राण वाचवला…’’

‘‘सॉरी, मी तुला मधेच अडवतोय, पण सगळ्यात आधी तू राघवचे आभार मान, त्यानं सर्वात आधी रक्त दिलं, आम्हाला तुझ्या स्थितीची कल्पना दिली, रक्तही द्यावं लागेल हे सांगितलं.’’ रमण म्हणाला.

‘‘ठीक आहे, मी त्याला वेगळ्यानं धन्यवाद देईन.’’ हसत रम्यानं म्हटलं. राघवनं तिच्याकडे बघितलं अन् त्याच्या लक्षात आलं आज तिनं काळ्या टिकलीऐवजी लाल रंगाची टिकली लावली आहे अन् नेहमीपेक्षा किंचित मोठीशी आहे.

‘‘अगं, पण तो तुझा मारेकरी भयंकरच होता ना? तुम्हाला कधी त्याच्याविषयी संशय नाही आला?’’ शुभ्रानं विचारलं.

‘‘नाही आला…तो आमच्या शेजारीच राहायचा. माझ्याहून वयानं दोन तीन वर्ष लहानही आहे. अभ्यासाचे काही तरी प्राब्लेम घेऊन यायचा माझ्याकडे. पण तो माझ्यावर एकतर्फी प्रेम करतोय हे आम्हा कुणालाच कळलं नाही.’’ रम्या म्हणाली.

‘‘पण, पकडला गेला हे बरं झालं.’’ मुरली मोहननं म्हटलं.

सगळ्यांचं जेवण आटोपलं. जो तो आपापल्या वर्क टेबलकडे वळला. राघव आपल्या कॉफीच्या कपाकडे टक लावून बघत होता.

‘‘राघव, तुला काय वाटतं त्या मुलाविषयी?’’ रम्यानं राघवच्या जवळ बसत विचारलं.

‘‘माझ्या मते प्रेम म्हणजे दुसऱ्याला काही देणं…आनंद, अभिमान, सुख…घेणं हे कधी प्रेमाचं लक्षण असू शकत नाही. प्रतिदान मागतो तो स्वार्थ असतो…आसक्ती असते…प्रेमही फारच मौल्यवान आणि खूपच वरच्या पातळीवरची भावना असते.’’

‘‘हं? आणखी काही सांगायचं आहे? काही महत्त्वाचं?’’ खटयाळपणे रम्यानं विचारलं.

‘‘हो…अशीच नेहमी हसत राहा, आनंदी राहा. तुझ्या मित्रांच्या यादीत माझंही नाव राहू देत. आता फक्त तेच एक माध्यम असेल आपल्या संपर्काचं.’’

‘‘ठिक आहे…पण तू मला नाही विचारलंस काही?’’ ‘‘काय?’’

पुन्हा तेच हसू रम्याच्या चेहऱ्यावर होतं. ‘‘हेच, की मला काही सांगायचं आहे की नाही?’’

राघव विचारात पडला.

‘‘मनातल्या मनात कसला विचार करतो आहेस राघव? आता माझं ऐक. पुढल्या महिन्यात माझे अप्पा बाराबंकीला तुझ्या घरी येतील आपल्या लग्नाबद्दल बोलायला.’’

‘‘त्यांना माझी जात माहीत आहे का?’’ राघव दचकला.

‘‘राघव, अरे, तू दिलेलं, तुझं रक्त आज माझ्या देहात आहे. आयुष्याचा धडा माणसाला खूप काही शिकवून जातो. अप्पाही तो शिकले आहेत. माणूसकीचं दर्शन झालंय त्यांना. आता त्यांना कशाचीच तमा नाहीए.’’ रम्यानं आपल्या हातात त्याचा हात घेत म्हटलं, ‘‘आता अप्पाही तुझं माझं रक्त वेगळं काढू शकणार नाही.’’

राघव तिच्याकडे बघत होता. एकदम म्हणाला, ‘‘आज तू लाल टिकली लावली आहेस?’’

‘‘तुझ्या लक्षात आलं ना? हा तूच दिलेला लाल रंग आहे. आजा माझ्या टिकलीत दिसतोय…अन् लवकरच कुंकू बनून माझं अस्तित्वात झळकेल. समजलं?’’

राघवनं हसून मान डोलावली. एकमेकांचा हात धरून दोघं आयुष्याच्या कॅनव्हासवर नवे रंग भरण्यासाठी निघाले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...