कथा * मिनू शहाणे

मला वाटत होतं की नीरज समोरच्या खिडकीतल्या त्याच्या त्या ठराविक जागी उभा आहे. आता तो हात हलवून माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेईल. तेवढ्यात मागून माझ्या खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श झाला तशी मी दचकले.

‘‘वन्स, तुम्ही इथं काय करताय? सगळे लोक ब्रेकफास्टसाठी तुमची वाट बघताहेत…आणि जावईबापूंची नजर तर तुम्हालाच शोधते आहे,’’ वहिनीनं माझी चेष्टा करत म्हटलं.

सगळेच आनंदात हसत बोलत ब्रेकफास्ट घेत होते. पण मला मात्र काहीच आवडत नव्हतं. मी उगीच काही तरी चिवडत बसले होते.

‘‘मेघा, अगं तू काहीच खात नाहीएस? सूनबाई अगं, मेघाला गरम पुरी वाढ बरं?’’ आईनं वहिनीला हुकूमच दिला.

‘‘नको, मला काहीच नकोय. झालंय माझं.’’ मी ताडकन् उठले.

प्रदीप दादा माझ्याकडे रोखून बघत होता. मलाही त्याचा खूप राग आला होता. माझा आनंद हिरावून घेण्याचा त्याला काय अधिकार होता? पण यावेळी गप्प बसणंच श्रेयस्कर होतं. आईबाबांनाही बहुधा माझ्या मन:स्थितीची कल्पना आली होती. माझं नीरजवर खूप खूप प्रेम होतं. त्याच्याशी लग्न करून संसार थाटायची स्वप्नं मी बघत होते. पण या सगळ्यांशी मिळून माझं लग्न अशा माणसाशी लावून दिलं, ज्याला मी कधी पूर्वी बघितलंही नव्हतं अन् ओळखतही नव्हते.

‘‘आई, मी माझ्या खोलीत पडतेय थोडा वेळ.’’ मी आईला म्हटलं अन् जाण्यासाठी वळले, तेवढ्यात आई म्हणाली, ‘‘मेघा, ज्यूस घेतेस का? काहीच खाल्लं नाहीएस तू…’’

‘‘नको, मला भूक नाहीए…’’ मी रागानं म्हणाले.

‘‘मेघा, सासरची माणसं कशी आहेत? तुला आवडतंय ना तिथं? आणि सार्थक, आमचे जावई? प्रेम करतात ना तुझ्यावर?’’

‘‘सगळं ठीकच आहे…’’ मी कोरडेपणाने उत्तरले. मनात तर इतका राग होता की म्हणावसं वाटलं, ‘तुमच्यापेक्षा खूपच चांगली माणसं आहेत ती.’

पुन्हा आईनं म्हटलं, ‘‘पोरी आता हेच तुझं घर आहे. सगळ्यांची मनं जिंकून घे, मिळून मिसळून रहा.’’

‘‘मायलेकींचं काय गूज चाललंय?’’ अचानक सार्थकनं तिथं येऊन विचारलं.

‘‘काही नाही. मी हिला सांगत होते की आता हेच तुझं घर आहे. सगळ्यांना समजून घे. प्रेमानं राहा.’’

‘‘आई, तुमची मुलगी खूप गुणी आहे. इतक्या थोडक्या काळातच तिनं सर्वांना जिंकून घेतलंय.’’ सार्थक माझ्याकडे बघत आईला म्हणाले.

माझ्या लग्नाला अजून तीन महिनेच होताहेत. लग्नानंतर प्रथमच मी आईकडे माहेरी आले होते. आम्ही दोघंही आल्यामुळे घरात सर्वांना खूप आनंद झाला होता. पण माझी दृष्टी मात्र माझं प्रेम शोधण्यातच गुंतली.

रात्री खोलीत आम्ही दोघंच असताना सार्थकनं म्हटलं, ‘‘मेघा, काय झालंय? खूप बेचैन वाटते आहेस? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. इथं आल्यापासून अगदी उदास आणि गप्प का आहेस?’’

‘‘नाही, तसं काहीच नाहीए.’’ मी कोरडेपणानं म्हटलं. सार्थक मला अजिबात आवडत नाहीत. माझ्यासाठी हे अगदी लादलेलं नातं आहे. अगदी नाइलाजानं मला स्वीकारावं लागलेलं. मला ते तोडता येत नाही म्हणूनच ते टिकवावं लागलंय.

‘‘बरं, तर मग प्रॉब्लेम नाहीए असं समजू?’’ सार्थक सौम्य स्वरात अन् प्रेमानं बोलतात.

‘‘डोकं दुखतंय माझं, मी झोपते,’’ मी कूस वळवून डोळ्यांवर हात आडवा घेतला.

मला झोप लागली अन् रात्री तीनच्या सुमारास अवचित जागी झाले. मग मात्र झोप येईना. जुन्या आठवणी मात्र उफाळून आल्या…

आमच्या घरात मी अन् माझे बाबाच सर्वात आधी उठायचो. बाबांना सकाळी सहालाच घर सोडावं लागायचं. मीच त्यांचा चहा, टिफिन अन् नाश्ता बनवत असे. बाकी मंडळी उशीरा उठायची.

बाबा रेल्वेत असल्यामुळे आम्हाला रेल्वेचं क्वार्टर होतं. घरं लहान पण चांगली असायची. मागेपुढे प्रशस्त अंगण असायचं. आम्ही बाहेर छानसं लॉन अन् थोडी बागही केली होती. सायंकाळी खुर्च्या टाकून तिथं बसायला फार छान वाटायचं.

समोरच माझ्या मैत्रिणीचं, नम्रताचं घर होतं. तिचेही वडिल रेल्वेतच होते, पण माझ्या बाबांसारखी त्यांची पोस्ट मोठी नव्हती. मी अन् नम्रता चांगल्या मैत्रिणी होतो. एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत होतो. एकमेकींच्या घरी बिनदिक्कत जात येत होतो. एकदा बाहेर उभ्या राहून आम्ही दोघी बोलत असताना माझी नजर सहज तिच्या घराच्या खिडकीकडे गेली. तिथं नम्रताचा मोठा भाऊ नीरज उभा होता अन् अगदी टक लावून माझ्याकडेच बघत होता. मला खूपच विचित्र वाटलं. नीरजही गडबडला. मी आपल्या घरात आले पण पुन्हा:पुन्हा मला एकच प्रश्न छळत होता की नीरज माझ्याकडे असा का बघत होता.

नंतर माझ्या लक्षात आलं की तो नेहमीच माझ्याकडे बघत असतो. त्याला बघितलं की माझ्या छातीत धडधड वाढायची. बहुधा तो माझ्या प्रेमात पडला होता…आणि मी ही त्याच्या…आम्ही एकमेकांकडे बघायचो. आमचे डोळे सांगायचे आम्ही प्रेमात पडलोय. आता नकळत मी त्या खिडकीशी जाऊन उभी रहायचे. नीरजचा गोरा रंग अन् घारे डोळे मला फार आवडायचे. आता आम्ही चोरून भेटायलाही लागलो होतो.

सकाळी पुन्हा मी त्याच खिडकीशी जाऊन बसले होते. खांद्यावर कुणीतरी हात ठेवला अन् मी दचकले. वळून बघितलं तर आई होती.

‘‘मेघा, इथं कधीपासून बसली आहेस? चल, चहा करूयात.’’ आईनं म्हटलं.

‘‘मी इथंच बसते गं, तू जा…मी येते थोड्या वेळानं,’’ मी म्हणाले.

आईनं माझ्याकडे रोखून बघितलं. ‘‘तू अजूनही त्या लफंग्याला विसरली नाहीएस? अगं एक दु:स्वप्न म्हणून विसरून जा ना? त्यातच सगळ्यांचं भलं आहे. अगं, आता लग्न झालंय तुझं. आपला संसार सांभाळ, नवऱ्यावर प्रेम कर, इतकं चांगलं सासर अन् असा छान नवरा मिळायलाही भाग्य लागतं. सर्वच मुलींना ते मिळत नाही.’’ आई अगदी रागानं पण कळकळून बोलत होती.

मला रडायलाच आलं. माझी चूक काय होती तर मी प्रेम केलं होतं. प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीए आणि ज्या माणसावर माझं प्रेम नाहीए तो माणूस फक्त माझा नवरा झाला म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं? कसं शक्य आहे?

‘‘आता आणि रडतेस कशाला? तुझ्या प्रेमप्रकरणाबद्दल जावई बापूंना समजलं तर केवढा अनर्थ होईल, कळतंय का? मूर्ख मुलगी, का आपलं आयुष्य असं नासवायला निघाली आहेस?’’ आईला आता संताप अनावर झाला होता.

‘‘कोण काय नासवतंय आई?’’ सार्थकनं अचानक आत येऊन विचारलं. आमचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं की काय कुणास ठाऊक.

आई एकदम दचकली…गडबडलीच! ‘‘काही नाही हो, मी मेघाला समजावते आहे की लग्नानंतर नव्या संसारात जास्त रमावं. जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी काढून रडत बसते…ते बरोबर नाही ना?’’ आईनं सारवासारव केली.

‘‘पण आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना विसरायची गरजच नाहीए. मलाही माझ्या कॉलेजातले मित्र अजून आठवतात. कधी तरी भेटतोही आम्ही.’’ सार्थक अगदी सहज बोलत होते. ‘‘मेघा, अगं जग हल्ली खूप जवळ आलंय. इंटरनेटच्या माध्यमातून तू कुणालाही भेटू शकशील.’’

आईच्या घरी आम्ही तीनचार दिवस राहून परत आपल्या घरी रांचीला निघालो. पटना ते रांची सुमार एक दिवसाचा प्रवास आहे. रात्रीची गाडी होती. सार्थकला झोप लागली होती. मी मात्र झोपू शकत नव्हते. माझ्या कुंटुबीयांनी आमचं प्रेम कसं चिरडून टाकलं तेच मला आठवत होतं…पुन्हा पुन्हा…

प्रदीपदादानंच आमच्या प्रेमात बिब्बा घातला होता. माझ्या समोरच त्यानं नीरजला केवढं मारलं होतं. नीरजची आई धावत आली. तिनं हात जोडले, प्रदीपदादाच्या पाया पडून विनवलं. म्हणून त्यांनी नीरजला सोडलं. नाहीतर त्या दिवशी त्यानं नीरजचा जीवच घेतला असता. त्या दिवसानंतर मी व नीरज कधी भेटलोही नाही.

प्रदीपदादानं तर त्याच्या घरच्यांना ताकीद दिली होती की पुन्हा हा इथं दिसला तर मारून अशा ठिकाणी फेकेन की प्रेतही सापडणार नाही. छोट्या पोस्टवर नोकरी करणारे त्याचे वडिल घाबरले. ते कुटुंब आमचं गाव सोडून कुठं तरी निघून गेले. मला काही कळलंच नाही.

नम्रताला आमच्या प्रेमाची कल्पना होती. मी अभ्यासाच्या निमित्तानं रोजच तिच्या घरी जायचे. रोजच नीरजलाही भेटत होते.

एकदा मी त्यांच्या घरी गेलेली असताना नीरज एकटाच घरी होता. नम्रता आणि आई कुठंतरी बाहेर गेलेल्या होत्या. मी परतणार तेवढ्यात नीरजनं माझा हात धरला…मला जवळ ओढलं.

‘‘नीरज, सोड मला…कुणी बघेल…’’ मी घाबरून म्हणाले.

‘‘कोणी बघणार नाही, घरात कुणीच नाहीए.’’ तो म्हणाला. माझ्या छातीत खूप धडधडू लागलं. त्यानं मला जवळ खेचलं. मी सुटायचा प्रयत्न करत होते. पण मला त्याचा स्पर्श आवडत होता…मी डोळे मिटून घेतले…अन् नीरजनं माद्ब्रया ओठांवर ओठ टेकवले.

‘‘अरे हे काय केलंस? हे बरोबर नाही,’’ मी घाबरले होते.

‘‘काय चूक आहे? आपण प्रेम करतोय ना एकमेकांवर?’’ त्यानं माझ्या दोन्ही गालांचं चुंबन घेतलं.

आमचं प्रेम कुणालाच ठाऊक नव्हतं. फक्त नम्रताला ठाऊक होतं. सोनेरी स्वप्नासारखे दिवस होते ते. अशी तीन वर्षं गेली. नीरजला नोकरी लागली. मी ग्रॅज्युएट झाले. आता आम्ही लग्नाची स्वप्नं बघत होतो.

एक दिवस मी नीरजला म्हटलं, ‘‘मला भीती वाटते, माझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत.’’

‘‘तर मग आपण पळून जाऊन लग्न करूयात. तेही नाही जमलं तर एकत्र जीव देऊ. देशील ना मला साथ?’’

‘‘होय नीरज, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही.’’ त्याच्या खांद्यांवर डोकं टेकवून मी म्हणाले.

प्रदीपदादानं आम्हाला एकत्र कधी बघितलं ते आम्हाला समजलंच नाही.

आमच्या प्रेमप्रकरण्यामुळे घरात वादळच उठलं. दादानं मलाही बडवलं. आईबाबा मला वाचवायला ही आले नाहीत. वहिनीमध्ये पडली नसती तर दादानं माझा जीवच घेतला असता.

घाईघाईनं माझं लग्न ठरवलं. घाईनंच उरकून घेतलंय. या लोकांमुळे माझं प्रेम अपूर्ण राहिलं, कधी क्षमा करणार नाही मी या लोकांना.

‘‘ओ मॅडम…जरा जागा द्या आम्हाला बसायचंय.’’ कुणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालं.

मी दचकून भानावर आले. ‘‘ही रिझर्व्हड बर्थ आहे.’’ त्याचा हात झटकत मी म्हणाले. तेवढ्यात अजून दोन तरूण आले अन् आचरटपणा करायला लागले. मी जोरानं ओरडले, ‘‘सार्थक…’’

झोपलेले सार्थक दचकून उठले. तीन तरूण मला त्रास देताहेत बघून ते त्यांच्यावर धावून गेले. रात्रीची वेळ…प्रवासी झोपलेले होते, पण मी मोठमोठ्यानं रडू लागले. त्यानं जवळचे प्रवासी जागे झाले. ते सार्थकच्या मदतीला धावले. कुणी तरी रेल्वे पोलीसांना बोलावून घेतलं. सगळा डबा एव्हाना जागा झाला होता.

मी खूपच घाबरले होते…‘‘मेघा, बरी आहेस ना? कुठं लागलंय का तुला?’’ सार्थक प्रेमानं अन् काळजीनं विचारत होते. त्यांनी मला जवळ घेतलं. मिठीत घेऊन ते मला शांत करू पाहत होते. त्यांच्या मिठीत मला एकदम सुरक्षित वाटलं. एकदम शांत वाटलं. खरं तर त्यांच्या हाताला लागलं होतं. रक्त येत होतं, पण ते माझीच काळजी करत होते.

तेवढ्यात कुणी प्रवासी म्हणाला, ‘‘सर, त्या बऱ्या आहेत. फक्त घाबरल्या आहेत..तुमच्या हातातून रक्त येतंय, ते बघा आधी…’’

तेवढ्यात कुणी तरी त्यांच्या हाताची जखम पुसून पट्टीही बांधून दिली. सगळे आपापल्या जागी गेले. मला चूक लक्षात आली. सार्थकसारख्या सज्जन, प्रेमळ माणसाशी मी तुसडेपणानं वागत होते. किती स्वार्थी होते मी.

सार्थकच माझे पती आहेत. माझं सर्वस्व, माझे जीवनसाथी आहेत. यापुढे माझा प्रत्येक क्षण त्यांच्या सुखासाठी असेल…

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...