कथा * राजलक्ष्मी भोसले

‘‘अहो, आज ऑफिसातून येताना जरा भाजी आणाल का?’’ घराला कुलूप घालता घालता संगीतानं म्हटलं.

राहुलनं रागानं तिच्याकडे बघितलं, ‘‘का? तुला काय झालंय? रोज तूच आणतेस ना?’’

‘‘हो…पण आज मला घरी यायला बऱ्यापैकी उशीर होईल. आईकडे जायचंय. तिची तब्येत बरी नाहीए.’’

हे ऐकताच राहुलचं डोकं तापलं, ‘‘तुला तर रोजच माहेरी जायला काहीतरी निमित्त हवं असतं. कधी आईची तब्येत बरी नाही, कधी बाबांचा मूड ठीक नाही,’’ चिडक्या आवाजात राहुल बडबडला.

राहुलचं बोलणं ऐकून संगीता रडवेली झाली. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लग्न ठरवतानाच तिनं राहुलला व सासूसासऱ्यांना सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही आईबाबांची काळजी तिला घ्यावी लागेल. त्यावेळी तर राहुलनं अगदी आनंदानं संमती दिली होती. पण आता जेव्हा ती आईकडे जायचं म्हणते राहुल असाच रिएक्ट होतो. एरवी ती शांतपणे ऐकून घेते. समंजसपणे दुर्लक्षही करते, पण आज मात्र ती खूपच दुखावली गेली. थोडी चिडूनच म्हणाली, ‘‘ठीक आहे. मीही आता परत येणार नाही. तिथंच राहीन.’’

राहुलनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. तिला तिच्या बसस्टॉपवर सोडून तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.

संगीताचा मूड आज एकदमच वाईट होता. बस आल्यावर ती त्याच मन:स्थितीत बसमध्ये चढली. ऑफिसमध्ये गेली. कशाबशा काही फायली तिनं हातावेगळ्या केल्या. पण मन कामात लागेना. गडबडीत लंच बॉक्सही घरीच विसरली होती. ती ऑफिसातून निघाली अन् थेट तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली.

दारात संगीताला बघताच आनंदानं रितूनं तिला मिठीच मारली. नंतर तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघत तिनं विचारलं, ‘‘काय झालं गं?’’ राहुलशी भांडलीस का?

‘‘छे छे, तसं काही नाहीए,’’ संगीता म्हणाली.

‘‘अस्स? म्हणजे आता तुला माझ्याशी खोटं बोलावं लागतंय तर?’’ रितूनं नाराज होत म्हटलं.

‘‘नाही गं! तुझ्यापासून काय लपवायचं? तुला तर सगळं ठाऊकच आहे,’’ संगीता म्हणाली.

‘‘बरं तू बस, मी आले,’’ रितूनं तिला सोफ्यावर बसवलं अन् प्यायला पाणी दिलं. मग पटकन् आत जाऊन तिनं जेवणाची दोन ताटं तयार केली अन् संगीताला   स्वत:बरोबर जेवायला लावलं.

पोटात अन्न गेल्यावर संगीतालाही जरा बरं वाटलं. ‘‘आता सांग, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर काळजीचे ढग का आले आहेत,’’ रितूनं म्हटलं.

‘‘अगं काय सांगू? रोजच्या कटकटींनी जीव वैतागलाय. कधीही माहेरी जायचं नाव काढलं की राहुल भडकतोच! तुला माहीत आहे की मी आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांना माझी गरज भासते. त्यांना माझ्याखेरीज कुणीही नाही. लग्नापूर्वीच हे मी त्याला सांगितलं होतं की मला आईबाबांची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा तर अगदी उदारपणे ‘हो’ म्हटलं अन् आता आपल्या शब्दाला जागत नाहीए.’’

‘‘म्हणजे पुन्हा तुझ्या माहेरी जाण्यावरुन तुमचं वाजलं अन् तुझा मूड गेलाय,’’ रितूनं म्हटलं, ‘‘पण काळजी नको करूस. आपण यावर उपाय शोधूयात.’’

‘‘कसला बोडक्याचा उपाय? मला तर काही सुचेनासं झालंय…एकीकडे आईबाबा अन् दुसरीकडे राहुल. दोघंही माझेच…अतीव प्रेमाचे…पण दोघांच्या प्रेमात माझं मात्र पार सॅण्डविच झालंय. कधी कधी तर वाटतं की सगळं सोडून कुठंतरी दूर निघून जावं,’’ संगीता म्हणाली.

‘‘खरंय तुझं. कुठंतरी जायला हवं. म्हणजेच राहुलला कळेल की बायको घरात नसली तर घर कसं खायला उठतं.’’ रितूनं म्हटलं.

‘‘म्हणजे तुला माझं म्हणणं पटतंय तर…’’

‘‘पटतंय ना? उगीच थोडी म्हणतेय मी?’’

‘‘पण जायचं कुठं? हीच तर समस्या आहे.’’

‘‘कुठंही जायची गरज नाही. इथं माझ्याकडेच राहा. वरूण एक महिन्यासाठी अमेरिकेला गेलाय. घरी मी एकटीच आहे. आपण दोघी मजेत राहू.’’

‘‘हे तर फारच छान झालं. मी चार दिवस इथंच थांबते. उद्याच ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देते,’’ संगीता समाधानानं म्हणाली.

‘‘राहुलला काहीच कळू द्यायचं नाही. जरा होऊ दे त्याचीही फजिती. आज तू घरी गेली नाहीस तर कळेलच त्याला तुझी किंमत,’’ रितूनं बजावलं.

संगीताला आता खूपच मोकळं वाटत होतं. रितूलाही संगीताच्या समस्येवर तोडगा निघाल्याचं समाधान वाटत होतं. इथूनच उद्या त्या दोघी मिळून संगीताच्या माहेरी जातील अन् आईबाबांना भेटून येतील असंही त्यांचं ठरलं होतं.

इकडे ऑफिसात गेल्यावर राहुल संगीताशी झालेलं भांडण विसरून आपल्या कामात बिझी झाला. घड्याळानं आठ वाजल्याचं सांगितलं, तेव्हा भानावर आला. घरी पोहोचल्यावर घराला कुलूप बघितलं, तेव्हा त्याला सकाळच्या वादाची आठवण झाली. चिडून तो बडबडत कुलूप उघडू लागला. ‘‘इतक्या वेळा सांगितलं तरी बाईसाहेब आपल्या मनाचंच करणार. नवऱ्याशी भांडण झालं तरी चालेल पण माहेरी जाणारच!’’

रात्री दहा वाजले अन् संगीता घरी आली नाही, तेव्हा राहुलचा राग अधिकच वाढला. आता संगीता घरी आली की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा असं त्यानं ठरवलं. पण बारा वाजले, संगीताचा पत्ता नव्हता तेव्हा त्याला सकाळचे तिचे शब्द आठवले, तो म्हणाला होता, ‘‘मग तिथेच का राहात नाही.’’ त्यावर तिनं म्हटलं होतं, ‘‘आता मी तिथंच राहीन.’’ आता मात्र त्याला संगीताचा नाही, स्वत:चाच राग आला. स्वत:वर एवढाही संयम ठेवता येत नाही म्हणजे काय? तिला आईकडे जायला आपण अडवायला नको. तो संगीताला फोन करायचा विचार करत होता एवढ्यात फोनची घंटी वाजली. त्यानं धडधडत्या हृदयाने फोन उचलला. फोनवर संगीताचे वडील होते. ‘‘काय झालं बाबा? इतक्या रात्री फोन का केला?’’ त्याने अंमल वैतागूनच विचारलं.

‘‘जरा संगीताशी बोलायचं होतं. ती आज इकडे येणार होती, पण आली नाही, म्हणून काळजी वाटली. तिची तब्येत बरी आहे ना?’’ बाबांनी विचारलं.

हे ऐकून राहुल गडबडलाच. त्यानं घाबरून विचारलं, ‘‘म्हणजे? संगीता तुमच्याकडे नाही आलेली? ती निघाली होती तुमच्याकडे…पण ती घरीही नाहीए.’’

‘‘काय सांगतोस? मग माझी पोरगी आहे कुठे?’’ उत्तर न देता राहुलनं फोन बंद केला.

आता मात्र राहुल घाबरला. तो संगीताच्या मोबाइलवर फोन करत होता. पण प्रत्येक वेळी तिचा मोबाइल स्विच ऑफ येत होता.

सकाळी सगळ्यात आधी राहुल संगीताच्या माहेरी गेला. कदाचित ती तिथंच असेल अन् त्याला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम तिनं हा डाव रचला असेल. पण खरोखर संगीता तिथं नव्हती. अन् काळजीनं आईबाबा काळवंडले होते. त्यानंतर तो तिच्या ऑफिसात गेला. तिथं कळलं की काल ती लंच टाइममध्ये ऑफिसातून गेली ती आलीच नव्हती. अजूनही नाही आलेली. हताश झालेला राहुल सरळ घरी परतला. सगळा दिवस त्याला संगीताचे सगळे चांगले गुण आठवून रडायला येत होतं. आज कदाचित ती घरी परत येईल या आशेवर सगळा दिवस तो घरात तिची वाट बघत होता. पण रात्र झाली तरी संगीताचा पत्ता नव्हता.

इकडे रात्री खूप उशीरापर्यंत रितू अन् संगू गप्पा मारत होत्या. केव्हा तरी उशिरा झोपल्या. सकाळी दारावरच्या घंटीमुळे संगीताची झोप उघडली. रितू अजून गाढ झोपेत होती. कदाचित दूध आलं असेल, आपण ते घेऊ. तेवढयासाठी रितूची झोपमोड कशाला करायला हवी असा विचार करून संगीतानं बाहेरच्या हॉलमध्ये येऊन दार उघडलं.

दारात चार धटिंगण उभे होते. त्यांचे चेहरे बघताच घाबरून संगीता दार लावून घेणार तेवढ्यात त्यातील दोघांनी संगीताला उचललं. एकानं तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. दुसऱ्यानं तोंडात बोळा कोंबला अन् एकाने गाडीत टाकलं. काही वेळासाठी संगीताची शुद्धच हरपली. ती शुद्धीवर आली तेव्हा तो मोकळी होती, पण एका झोपडीवजा घरात होती. ती घाबरून रडायला लागली.

काय करावं, आपण कुठं आहोत. आपल्याला इथं का आणलंय, काहीच तिला समजत नव्हतं. सकाळपासून ती पाण्याच्या घोटाविना तिथं रडंत बसली होती. चारच्या सुमाराला कुणी दोघंजण आले अन् संगीताला तिच्या नवऱ्याबद्दल विचारायला लागले. तिनं राहुलबद्दल सगळी माहिती त्यांना दिली. तर ते म्हणाले, ‘‘आम्हाला वरुणबद्दल माहिती हवीय. राहुलची नकोय.’’

‘‘माझा नवरा राहुलच आहे. वरूण माझ्या मैत्रिणीचा रितूचा नवरा आहे. तो सध्या अमेरिकेला गेलाय. पण तुम्हाला वरूण कशाला हवाय? अन् तुम्ही मला इथं कशाला आणून ठेवलंय?’’

ती दोघं थोडी चकित होऊन, थोडी भांबावून एकमेकांकडे बघत होती. तेवढ्यात तिनं त्यांना पाणी पिण्यासाठी मिळेल का विचारलं. एकानं तिला बाहेरून कुठूनतरी एक तांब्याभर पाणी अन् खायला काहीतरी आणून दिलं अन् जाता जाता दुसरा डाफरला, ‘‘जास्त स्मार्टपणा करू नकोस. तुझ्या नवऱ्यानं आमच्या बॉसकडून कर्ज घेतलंय अन् आता पैसे द्यायला नाही म्हणतोय. जोपर्यंत आमचे पैसे तो देणार नाही तोवर तुला सोडणार नाही. पैसा नाही मिळाला तर तुला विकून पैसे मिळवू.’’

हे ऐकून संगीता भीतिनं पांढरी पडली. बाप रे! कोणत्या संकटात सापडले आहे. इथून कोण सोडवेल? राहुलला निदान फोन करता आला असता तर?

दुसऱ्यादिवशीही संगीता आली नाही, तेव्हा मात्र राहुल पार उन्मळून पडला. तिच्याबद्दल काहीच बातमी नाहीए. याचा अर्थ काहीतरी वाईट घडलं असावं…या विचारानंच तो हवालदिल झाला त्याला रडू यायला लागलं.

तिसऱ्यादिवशी डोअर बेल वाजली. संगीता आली बहुतेक अशा विचारात तो आनंदानं दार उघडायला धावला. दारात त्याचे आईबाबा उभे होते. त्यांना बघून त्याचा संयम संपला. तो वडिलांना मिठी मारून रडू लागला.

त्याला असा घाबरून रडताना बघून ती दोघंही बावरली. ‘‘काय झालंय? सगळं ठीकठाक आहे ना?’’ वडिलांनी विचारलं.

‘‘नाही बाबा, काहीही ठीक नाहीए. संगीता तीन दिवसांपूर्वी घर सोडून गेलीय. अजून परतली नाहीए.’’ राहुल कसाबसा बोलला.

‘‘काय? सूनबाई घर सोडून गेलीय? पण का?’’ आश्चर्यानं आईनं विचारलं, ‘‘नक्कीच तू तिच्याशी भांडला असशील. तिला टाकून बोलला असशील.एरवी माझी सून सोशिक अन् समंजस आहे.’’ आई म्हणाली.

‘‘होय आई, मीच तिला लागट बोललो. नेहमीच मी तिला वाईट बोलतो…म्हणूनच ती रागावून निघून गेली,’’ असं म्हणत राहुलने घडलेली सगळी हकीगत त्या दोघांना सांगितली.

‘‘हे तर फार वाईट द्ब्राझालं. अन् तुद्ब्रांझं फारच चुकलंय. तिनं लग्नापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की तिच्या आईबाबांना तिच्याशिवाय कुणीही नाहीए तर मग तू तिच्या माहेरी जाण्यावरून का आक्षेप घेतोस? तिनं तुला कधी आमच्यासाठी खर्च करण्याबद्दल हटकलंय? कधी आमच्या सेवेत तिच्याकडून कमी झालीय? सगळं ती नीट करतेय तर तू तिला मदत करायची, सपोर्ट करायचास…’’ राहुलचे बाबा त्याला समजावत म्हणाले.

‘‘खरंय बाबा, माझंच चुकलं. मी तिला समजून घ्यायला कमी पडलो. एकदा ती परत आली की मी तिची क्षमा मागेन, कधीही भांडणार नाही…तिच्या आईबाबांनाही तुमच्याप्रमाणेच समजेन.’’

राहुलचे बाबा व आई येऊनही अजून एक दिवस गेला, अजून संगीताचा पत्ता नव्हता…आता तेही घाबरले. संगीता फोन का करत नाही? खरोखर काही दगाफटका तर झाला नाहीए ना?

इकडे संगीता अचानक नाहीशी झाल्यामुळे रितूही काळजीत पडली. दार उघडं टाकून अचानक कुठं गेली असेल संगीता? बरं, मोबाइलही नेला नव्हता. कदाचित अचानक राहुलचा फोन आल्यामुळे घाईनं निघून गेली असेल… तीही फक्त अंदाज बांधत होती. संगीता, किमान राहुल, कुणाचा तरी फोन येईल म्हणूनही ती वाट बघत होती. शेवटी ती राहुलच्या ऑफिसात पोहोचली अन् तिनं संगीतानं जे काय ठरवलं होतं ते राहुलला सांगितलं अन् ती न सांगताच निघून गेल्यामुळे किती काळजी वाटली तेही सांगितलं. आता मात्र राहुलच्या हातापायातली शक्तीच गेली.

‘‘असे हातपाय गाळून चालणार नाही राहुल. नक्कीच संगीता संकटात आहे. आपण पोलिसात रिपोर्ट करूया,’’ रितूनं त्याला धीर दिला.

मग दोघं पोलीस स्टेशनला गेली अन् संगीता बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट केला.

पोलिसांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्यादिवशी राहुलला पोलीस ठाण्यातून फोन आला. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार शेजारच्या गावात गुंडांनी काही स्त्रियांना व मुलींना एका घरात कैद करून ठेवलंय. आम्ही तिथं धाड घालतो आहोत. तुमच्या पत्नीचाही तपास लागू शकतो. तुम्हीही आमच्या सोबत चला.’’

संगीताच्या आईबाबांना घेऊन रितुही आली. राहुलचे आईबाबा व ही सगळी माणसं गाडीतून तिथं गेली. पोलीस पार्टीनं आधीच जाऊन गुंडांना ताब्यात घेतलं होतं. घरातून बायका मुलींना बाहेर काढण्यात येत होतं…पण त्यात संगीता नव्हती. राहुलनं निराशेनं मान हलवली. तेवढ्यात एका बंद खोलीकडे एका पोलिसाचं लक्ष गेलं. ती खोली उघडण्यात आली. गुडघ्यात मान खाली घालून संगीता तिथं रडत बसली होती. ती पार सुकून गेली होती.

‘‘थँक्यू इन्स्पेक्टर…ही पाहा माझी बायको,’’ राहुल अत्यानंदानं ओरडला. संगीतानं वर मान केली. राहुलला बघताच ती उठली अन् तिनं राहुलला मिठी मारली.

‘‘मला क्षमा कर संगीता…माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला…मी वचन देतो यापुढे तुला मी माहेरी जाण्याबद्दल कधी ही बोलणार नाही…कधीच अडवणार नाही…चल, घरी जाऊ या,’’ राहुललाही रडू येत होतं.

‘‘सूनबाई, चल घरी…तुझा नवरा आता शहाणा झालाय, सुधारलाय.’’ सासूसासरे एकदमच बोलले, तशी रडता रडता संगीता खुदकन हसली. ती आईबाबांच्या पाया पडली. आपल्या आईला व बाबांना तिनं मिठी मारली. रितूलाही हे सगळं बघून भरून आलं. तिनं हलकेच आपले डोळे टिपले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...