कथा * सुमन बारटक्के

साऱ्या घरात तो वास, खरं तर दुर्गंध भरून होता. घरात वाळवी लागली होती. ती संपवण्यासाठी अॅण्टीटर्माइट औषधांची फवारणी सुरू होती. त्या वासाने तिचा जीव गुदमरू लागला होता. वाळवी, म्हटलं तर इवलासा जीव, पण माणसाचं जिणं दुरापास्त करून टाकते.

सगळं घर अस्ताव्यस्त पसरलं होतं. स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल, बाल्कनी, एकही जागा अशी नव्हती जिथे वाळवीने बस्तान बसवलं नव्हतं. त्यामुळे सगळं सामान बाहेर काढून औषधफवारणी करावी लागत होती.

दर दोन महिन्यांनी ही सगळी सर्कस करावी लागायची. दिल्लीहून फरीदाबादला आल्यावर इतका त्रास होईल असं तिला वाटलंच नव्हतं, स्वत:चा बंगला बांधून घेणं जसं जिकिरीचं, कष्टाचं काम आहे, तसंच तयार बंगला घेणंही एकूणात त्रासाचंच काम आहे. राहायला लागल्यावर त्यातल्या उणिवा, दोष वगैरे लक्षात यायला लागतात. पण सध्याच्या काळात दिल्लीला बंगला घेणं ही फारच अवघड बाब होती. त्यांच्या बजेटमध्ये दिल्लीला बंगला बसत नव्हता. शेवटी फरीदाबादलाच बंगला घ्यायचं ठरलं. तसं म्हटलं तर फरीदाबादहून दिल्लीचं अंतर होतंच किती? दिल्ली सोडण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण नवरा दीपंकरच्या हट्टामुळे ती फरीदाबादला आली होती. त्यांच्या स्टेट्सला साजेसाच होता हा बंगला. अन् काय कमी होतं दीपंकरला? पैसा, प्रतिष्ठा, स्टेट्स, दाराशी शोफर, ड्रायव्हरसहित दोनतीन गाड्या. अशावेळी दिल्ली दूर वाटण्याचं काही कारण नव्हतं. अन् दीपंकरला वाद घालायचा नव्हताच! निर्णय झालाच होता.

‘‘मॅडम, आमचं स्प्रे मारण्याचं काम आत्तापुरतं संपलंय. पण दोन महिन्यांतच पुन्हा फवारणी व्हायला हवी. आत्ताच वाळवीला कंट्रोल केलं नाही तर फार नुकसान होईल. अन् वाळवीची मजा अशी असते की बाहेरून आपल्याला कल्पनाच येत नाही अन् आतल्या आत वाळवी सगळं पोखरून टाकते. मी तर तुम्हाला असं सुचवतो की तुम्ही आमच्या कंपनीबरोबर वर्षभराचं कॉण्टॅ्रक्ट करा. आमची माणसं ठराविक दिवशी येतील अन् काम करून जातील. तुम्ही फोन करण्याचीही गरज नाहीए.’’ स्मार्ट एक्झिक्युटिव्ह, आपल्या कंपनीचा बिझनेस वाढवू बघत होता.

इथे आल्यावरच तिला कळलं होतं की फरीदाबादमध्ये मेंदीची शेती होते. मेंदीचं फार मोठं मार्केट आहे फरीदाबाद. पण त्यामुळेच इथे वाळवीही खूप आहे. मेंदीचा वास तिला खूप आवडतो. पण आताचा हा स्प्रेचा वास मात्र तापदायक आहे. मळमळतंय, उल्टी होईल की काय असं वाटतंय.? खरं तर मेंदी अन् वाळवीचा नेमका संबंध तिच्या लक्षात येत नव्हता. पण एक बारका जीव सगळं घर पोखरून पोकळ करू शकतो याचं नवल वाटत होतं. पण संसारातल्या, नातेसंबंधांतल्या अगदी लहानसहान गोष्टींनी जसे नात्यांच्या भक्कम भिंतीना तडे जातात अन् शेवटी भिंती कोसळून संबंध तुटतात, तसंच हेदेखील!

‘‘ठीक आहे. तुम्ही पेपर्स तयार करून आणा, मी सही करते, आता मी बाहेर निघालेय,’’ तिने म्हटलं.

तिला सायंकाळी अविनाशला भेटायला जायचं होतं. त्या पसाऱ्यातून तिने आपल्या गरजेचं सामान शोधलं. मेडवर घराची जबाबदारी सोपवून ती नटूनथटून घराबाहेर पडली. ड्रायव्हर घेण्यापेक्षा स्वत:च ड्राइव्ह करणं सोपं होतं. जेव्हापासून अविनाश तिच्या आयुष्यात आला होता, तेव्हापासून तिचं आयुष्य इंद्रधनुषी झालं होतं. लग्नाला दोन वर्षं झालीत. पण दीपंकरशी ती अजून मोकळेपणाने बोलत नाही. त्याचा स्वभाव गंभीर आहे. रोमांस त्याला जमत नाही अन् नम्रता तर सुरूवातीपासूनच बिनधास्त होती. पार्ट्या, डिंक्स, शॉपिंग, हॉटेलिंग असं तिला आवडायचं. दीपंकरला त्याच्या बिझनेसमुळे फारसा वेळ मिळत नसे. बिझनेसच्या कामात तो गर्क असायचा. नम्रतावर त्याचं जिवापाड प्रेम होतं. पण व्यक्त करणं जमत नव्हतं.

इकडे अविनाश स्मार्ट, सुंदर अन् तिच्यासारखाच खुशालचेंडू वृत्तीचा होता. सतत हसायचा, हसवायचा. नम्रताच्या बारीकबारीक गोष्टी लक्षात ठेवायचा. कुठले इयररिंग घातले होते. कोणता ड्रेस सुंदर दिसत होता. कोणती लिपस्टिक तिला खूलून दिसते, कोणत्या हेअरस्टाइलमध्ये ती ब्यूटीफुल दिसते. अगदी तिच्या आवडीचा सेंटही त्याला माहीत होता. दीपंकर तिला भरपूर पैसे देत होता पण तिच्या आवडीचा सेंट त्याला माहीत नव्हता. ती कोणत्या ड्रेसमध्ये ब्यूटीफुल दिसते हे त्याने तिला कधीही सांगितलं नव्हतं.

‘‘हॅलो डार्लिंग, कसली खतरा दिसते आहेस? अन् केवढा उशीर केलास? बघ तुझी वाट बघता बघता कसला वाळलोय मी…’’ अविनाशची ही स्टाइल तिला त्याच्याकडे ओढून नेते.

‘‘आता आलेय ना? बोल, काय प्रोग्रॅम आहे?’’

‘‘संध्याकाळ सरत आलीय, तूच सांग, काय असावा कार्यक्रम?’’ डोळा मारत अविनाश बोलला अन् ती लाजली.

अविनाश एकटाच होता. लग्न केलं नव्हतं. मित्राबरोबर रूम शेयर करून राहात होता. दोघा मित्रांमध्ये ठरलेलं होतं की जेव्हा नम्रता येणार असेल तेव्हा तो मित्र बाहेर निघून जाईल. अविनाशच्या मिठीतून जेव्हा ती मोकळी झाली तेव्हा फारच आनंदात होती अन् अविनाश तर तिला सतत मिठीत घ्यायला आतुरलेलाच असायचा.

‘‘तू तर मला पार वेडा करून सोडला आहेस गं राणी!’’ अविनाशने तिला खूष करण्यासाठी म्हटलं, ‘‘बरं, अगं सध्या फार छान सेल लागले आहेत. तुला काही खरेदी करायची आहे का? मला घ्यायचंय काही सामान, मीं सेलची वाटच बघत असतो.’’

‘‘मी असताना तू काळजी का करतोस? उद्या भेटूयात.’’ नम्रता घाईने निघून गेली अन् तिने दिलेला स्प्रे अंगावर मारत अविनाश गर्वाने हसला.

परफ्यूमच्या सुगंधाने दरवळणाऱ्या खोलीत प्रवेश करत अविनाशच्या मित्राने म्हटलं, ‘‘छान पोरगी पटवली आहेस. खूपच चंगळ चाललीए तुझी.’’

‘‘तू का जळतो आहेस? माझ्या वस्तू तूही वापरतोस ना? तुझाही फायदा आहेच की!’’ निर्लज्ज हसत अविनाशने म्हटलं.

दुसऱ्या दिवशी नम्रताने अविनाशसाठी किती तरी गोष्टी खरेदी केल्या. तरीही अजून काही गोष्टी हव्या आहेत म्हणत त्याने तिचं क्रेडिट कार्ड मागून घेतलं. नम्रता नवऱ्यात तेवढीशी गुंतलेली नाहीए हे त्याने बरोबर हेरलं होतं. तिच्या भावनांचा तो गैरफायदा घेत होता.

नवऱ्याला समजून घ्यायला नम्रता कमी पडत होती. बडबड्या, खूषमस्कऱ्या अविनाश तिला आवडला होता. तो सटाफटिंग होता. स्त्रीला रिझवण्याचं कसब त्याच्याजवळ होतं. नम्रताला वाटायचं, त्याने लग्न केलं तर ती एकटी पडेल. तिला त्याची कंपनी हवीहवीशी वाटायची.

तिसऱ्या महिन्यात अॅण्टीटर्माइट फवारणीवाले पुन्हा आले. वाळवी ओल्या जागेत, दमट जागेत जोमाने फोफावते. लाकूड ओलं राहाता कामा नये. ओलं लाकूड वाळवीला पोखरायला अधिक सोपं असतं. वगैरे उपदेश करून सर्वत्र स्प्रे मारून ती माणसं निघून गेली. हे सर्व नम्रताने ऐकून, समजून घेतलं पण तिच्या आयुष्याला अविनाशरूपी वाळवी लागली आहे हे तिच्या लक्षात आलं नाही.

‘‘तुझ्या नवऱ्याच्या खूप ओळखी आहेत. त्याला सांगून माझ्या बॉसचं काम करून दे ना.’’ तिच्या गालाचं चुंबन घेत अविनाश म्हणाला, ‘‘तू बोललास म्हणजे काम झालं असं समज. दीपंकर माझं कोणतंही म्हणणं टाळत नाहीत,’’ नम्रताने म्हटलं, ‘‘चल तर मग, आज लंच एखाद्या आलीशान हॉटेलात करूयात,’’ अविनाशने म्हटलं.

नम्रताला वाटत होतं, तिच्या आयुष्यात अविनाशमुळेच आनंद निर्माण झाला आहे. ती फुलपाखराप्रमाणे त्याच्या अवतीभवती बागडायची. त्याच्या तोंडून स्वत:ची स्तुती ऐकून तिला ढगातून फिरतोए असं वाटायचं. दुसरीकडे अविनाशची मजाच मजा होती. नम्रताचा पैसा, नम्रताचं तरुण शरीर फुकट वापरायला मिळत होतं. तिच्या पैशावर तो ऐश्वर्य भोगत होता. एकदा नम्रताने म्हटलं की दीपंकर धंद्याच्या कामाने आठवडाभर सिंगापूरला जातोय. लगेच अविनाशने जवळच्याच एखाद्या हिलस्टेशनला जायचा बेत ठरवला. नम्रताला विचार करायलाही वेळ न देता त्याने विमानाची तिकिटं काढली. पंचतारांकित हॉटेलात रूम बुक केली. अर्थातच हे सर्व नम्रताच्या पैशाने. तिथे गेल्यावरही तो भरमसाठ पैसे खर्च करत होता. यावेळी प्रथमच नम्रताला त्याचं पैसे उधळणं खूप खूपच खटकलं.

तिच्या आणि दीपंकरच्या नात्यात ही अविनाशची वाळवी उपटली होती. वाळवी लाकूड पोखरतंच नाही, तर चक्क लाकूड खाऊन टाकते. कुठे स्वत:चा मागमूसही ठेवत नाही. त्यामुळेच वाळवीपासून सुटका करून घेणं सोपं नसतं. काही वेळा तर अॅण्टीटर्माइट स्प्रेलाही ती पुरून उरते. मग अधिक जहाल औषधांची मदत घ्यावी लागते.

गेले काही दिवस नम्रताला जाणवत होतं की अविनाशच्या मागण्या सतत वाढताहेत. केव्हाही तो तिचं क्रेडिट कार्ड मागून घ्यायचा. असा उधळेपणा तिला खटकत होता. दीपंकरने कधीही तिला खर्चाबद्दल अवाक्षराने विचारलं नव्हतं. तिच्यासाठी तो कितीही पैसे देत होता. पण त्याच्या परिश्रमाने मिळवलेल्या पैशावर अविनाश स्वत: काहीही न करता डल्ला मारत होता. दीपंकरचा तिच्यावरचा विश्वास अन् त्याची सौम्य वागणूक यामुळे तिला अपराधी वाटू लागलं होतं. अविनाश खूप रोमॅण्टिक आहे पण दीपंकरने कधीही तिला ती त्याला आवडत नाही असं तिला जाणवू दिलं नव्हतं. त्याने तिची काळजी घेणं, तिला हवं ते, हवं तेव्हा करण्याचं स्वातंत्र्य देणं म्हणजे प्रेमच नव्हतं का?

दुसरीकडे अविनाश सतत तिच्या शरीराचा उपभोग घेत होता अन् पैसे मागत होता. याला प्रेम म्हणतात का? छे: ही तर चक्क फसवणूक आहे. तो तिला लुटतोय. तिने अॅण्टीटर्माइट कंपनीतून आलेल्या बुकलेटमध्ये वाचलं होतं की दमट जमिनीत किंवा हिरवळीवर वाळवी वारुळ उभारते. दुरून ते फार छान दिसतं, पण चुकून हात लागला तरी हाताला झिणझिण्या येतात. जवळ जाऊन बघितलं तर आत असंख्य वाळवी वळवळत असतात. ते बघून फार ओंगळ वाटतं. मनात एक घाणेरडी भावना दाटून येते.

तिला आता कळत नव्हतं तिच्या मनावर अन् देहावर कब्जा करणाऱ्या अविनाशरूपी वाळवीवर कोणता स्प्रे मारावा. दीपंकरसारख्या सज्जन माणसाचा विश्वासघात केल्यामुळे मन पोखरलेल्या लाकडासारखं पोकळ झालं होतं. मनाची कवाडं कशी अन् किती काळ बंद राहातील? उघडी झाली तर तिचे अन् दीपंकरचे संबंध चांगले राहातील की सर्वच काही कोसळून पडेल? त्यातून हे नातं रेशीमबंधाचं, पतिपत्नीचं.

नम्रताला तिची चूक उमगली होती. तिने मोकळ्या मनाने दीपंकरचा स्वीकार केला नव्हता. त्याला समजून न घेता, त्याला दोष दिला होता. त्याचा फायदा घेत अविनाशने तिला जाळ्यात ओढलं होतं. तिची स्तुती करून तो तिला जाळ्यात घट्ट आवळत होता. ती वेडी त्याच्या स्वार्थाला प्रेम समजत होती.

त्याक्षणी तिला साक्षात्कार झाला की वाळवी तिच्या घरात नाही, तिच्या आयुष्याला लागली आहे. हळूहळू ती पसरते आहे. बाहेरून सगळं काही छान छान आहे. आतून मात्र पोकळ होतंय. याला आवर घातलाच पाहिजे. आयुष्याचा संपूर्ण नाश होण्याआधीच जालीम उपाय केला पाहिजे.

‘‘वाळवी पसरतेय. माणसं पाठवा. फवारणी करावी लागेल,’’ तिने कंपनीला फोन केला.

‘‘मॅडम, अजून अवकाश आहे. माणसं बरोबर त्यांच्या वेळेलाच येतील.निश्चिंत असा.’’ पलीकडून फोन बंद झाला.

‘‘आता मलाच पुढाकार घ्यायला हवा. या वाळवीचा नायनाट करायलाच हवा,’’ स्वत:शीच पुटपुटत नम्रता मनातल्या मनात योजना आखू लागली.

तिचा मोबाइल वाजला. अविनाशचा फोन होता. तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. फोन वाजतच राहिला. तिने शांतपणे फोन स्विच ऑफ केला अन् कपाटातून कपडे काढायला लागली. अविनाशबरोबर खरेदी केलेलं सर्व सामान वाळवीने खराब झालं होतं. मागच्या अंगणात नेऊन तिने त्यावर रॉकेल ओतलं अन् काडी लावली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...