कथा * रेणू श्रीवास्तव

न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरताच आकाशने आईवडिलांना मिठी मारली. किती तरी दिवसांनी मुलाला प्रत्यक्ष भेटल्यामुळे राधाचे डोळे भरून आले. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एक अत्यंत देखणी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. आकाशने आईबाबांचं सामान गाडीच्या डिक्कीत ठेवलं. त्यांना गाडीत मागच्या सीटवर बसवून स्वत: पुढल्या सीटवर बसला. त्या तरुणीने मागे बघत डोळ्यांनीच राधा व अविनाशला ‘वेलकम स्माइल’ दिलं. राधाला वाटलं स्वर्गातली अप्सराच समोर बसली आहे.

मुलाची निवड उत्तम असल्याचं राधाला जाणवलं. दीड दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी एका अपार्टमेंटसमोर थांबली. गाडीतून उतरून जुई दोघांच्या पाया पडली. राधाने तिला प्रेमाने जवळ घेतलं. जुई व आकाशने सामान घरात घेतलं. आकाशचं ते छोटंसं घर सुरेख मांडलेलं होतं. राधा व अविनाश फ्रेश होताहेत तोवर जुईने चहा करून आणला.

दुपारचं जेवण करून राधा व अविनाश झोपली अन् त्यांना गाढ झोप लागली.

‘‘आई, ऊठ ना, तुमच्या जागं होण्याची वाट बघून बघून शेवटी जुई निघून गेली.’’ आकाशने तिला बळेच उठवलं.

अजून झोपायची इच्छा होती तरीही राधा उठून बसली. ‘‘काही हरकत नाही. अमेरिकेतही तू आपल्या जातीची अशी सुंदर गुणी मुलगी निवडलीस हेच खूप आहे. आम्हाला जुई पसंत आहे. फक्त आमची तिच्या घरच्या लोकांशी भेट घडवून आण. लग्न इथेच करायचं आहे तर मग उशीर कशाला?’’

राधाच्या बोलण्याने आकाशचा उत्साह वाढला. म्हणाला, ‘‘तिच्या घरी तिची आजी अन् वडील आहेत. तिच्या लहानपणीच तिची आई वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही. जुई तिच्या आजोळीच वाढली. आजीची इच्छा होती मी घरजावई व्हावं पण मी स्पष्ट शब्दांत नाही म्हणून सांगितलं. उद्या आपण त्यांच्या घरी जाऊयात.’’

राधा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. पोरगा अमेरिकेत राहूनही साधाच राहिला होता. अजिबात बदलला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशारच होता. शाळेपासून इंजिनीयर होईपर्यंत त्याने नेहमीच टॉप केलं होतं. पुढल्या शिक्षणासाठी अमेरिकेला आला. शिक्षण संपवून छानपैकी नोकरीही मिळवली अन् जुईसारखी छोकरीही. लोकांना आमचं हे सगळं सुख पाहून किती हेवा वाटेल या कल्पनेने राधाला हसू फुटलं.

‘‘आई का हसतेस?’’ आकाशने विचारलं.

‘‘काही नाही रे, सियाटलला पण आपण जायचंय ना? आनंद अन् नीताशीही जुईची भेट व्हायला हवी. लग्नाची सर्व तयारी करूनच आली आहे मी.’’ राधाने म्हटलं.

आकाशाने जुईला रात्रीच फोन करून सांगितलं की आईबाबांना ती आवडली आहे.

दुसऱ्यादिवशी जुई सकाळीच भेटायला आली. येताना तिने राधा व अविनाशसाठी आजीने केलेले काही भारतीय पदार्थ आणले होते.

‘‘मी तुम्हा दोघांना आकाशप्रमाणेच आईबाबा म्हटलं तर चालेला ना?’’ जुईने विचारलं.

‘‘चालेल ना? तू आकाशहून वेगळी नाहीए अन् आता आमचीच होणार आहेस.’’

थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर जुईने विचारलं, ‘‘तुम्ही माझ्या आजीला व वडिलांना भेटायला कधी येताय? त्यांना फार उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची.’’

‘‘बघूयात. जरा विचार करून दिवस ठरवूयात,’’ राधाने म्हटलं.

‘‘नाही हं! असं नाही चालणार. मी उद्याच सकाळी गाडी घेऊन येते. तुम्ही तयार राहा.’’ जुईने प्रॉमिस घेतल्यावरच राधाला खोलीत जाऊ दिलं.

दुसऱ्यादिवशी सकाळपासूनच राधा खूप उत्साही होती. बोलत होती. हसत होती. अविनाशने तिला त्यावरून चिडवूनही घेतलं. तेवढ्यात जुई गाडी घेऊन आली.

राधा अन् अविनाश तयार होऊन खोलीतून बाहेर पडली तेव्हा जुईच्या मनात आलं, आकाश देखणा आहेच, पण त्याचे आईबाबाही या वयात किती छान दिसतात.

त्या तासाभराच्या प्रवासात सुंदर रस्ते, स्वच्छ वातावरण अन् झाडाझुडपांच्या दर्शनाने राधाच्या चित्तवृत्ती अधिकच बहरून आल्या.

गाडी जुईच्या घरासमोर थांबली. एका कुलीन वयस्कर स्त्रीने पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. ती जुईच्या आईची आई होती. ती त्यांना ड्राँइंगरूममध्ये घेऊन गेली. जुईचे वडील येऊन अविनाशच्या जवळ बसले. त्यांनी एकमेकांची ओळख करून देत अभिवादन केलं. मग जुईचे वडील राधाकडे वळले. दोघांची नजरानजर होताच दोघांचेही चेहरे बदलले. नमस्कारासाठी उचललेले हात नकळत खाली वळले. इतर कुणाच्या लक्षात आलं नाही पण अविनाशला ते सगळं जाणवलं, लक्षात आलं. राधा एकदम स्तब्ध झाली. मघाचा आनंद, उत्साह पार ओसरला. मनाची बैचेनी शरीराच्या माध्यमातून, देहबोलीतून डोकावू लागली.

जुईची आजी एकटीच बोलत होती. वातावरणात ताण जाणवत होता. अविनाश तो दूर करण्याचा प्रयत्न करत होता.

जुईने अन् आजीने जेवण्यासाठी विविध चविष्ट पदार्थ केले होते. पण राधाचा मूड जो बिघडला तो काही सुधरेना. आकाश अन् जुईलाही या अचानक परिवर्तनाचं मोठं नवल वाटलं होतं.

शेवटी जुईच्या आजीने विचारलंच, ‘‘राधा, काय झालंय? मी किंवा आशीष म्हणजे जुईचे बाबा तुम्हाला पसंत पडलो नाहीए का? एकाएकी का अशा गप्प झालात? ते जाऊ देत, आमची जुई तर पसंत आहे ना तुम्हाला?’’

हे ऐकताच राधा संकोचली, तरीही कोरडेपणाने म्हणाली, ‘‘नाही, तसं काही नाही. माझं डोकं अचानक दुखायला लागलंय.’’

‘‘तुम्ही काही म्हणा, पण अमेरिकेत जन्माला आलेल्या जुईचं संगोपन तुम्ही फार छान केलंय, तिच्यावर केलेले संस्कार, तिला मिळालेलं उच्च शिक्षण व त्यासोबतचं घरगुती वळण, या सर्वच गोष्टींचं श्रेय तुम्हा दोघांना आहे. जुई आम्हाला खूपच आवडली आहे. आम्हाला भारतातही अशी सर्वगुणसंपन्न मुलगी शोधून मिळाली नसती. राधा, खरंय ना मी म्हणतो ते?’’ अविनाश म्हणाला.

राधाने त्यांचं बोलणं कानाआड केलं. पण अविनाशच्या बोलण्याने सुखावलेले, थोडे रिलॅक्स झालेले जुईचे वडील तत्परतेने म्हणाले, ‘‘तर मग आता पुढला कार्यक्रम कसा काय ठरवायचा आहे? म्हणजे एंगेजमेण्ट…अन् लग्न?’’

अविनाशला बोलण्याची संधी न देता राधानेच उत्तर दिलं, ‘‘आम्ही नंतर कळवतो तुम्हाला…आम्हाला आता निघायला हवं…आकाश चल, टॅक्सी बोलाव. आपण मॅनहॅटनला जाऊन मग घरी जाऊ. निशा तिथे आमची वाट बघत असेल. मामामामी येणार म्हणून खूप तयारी करून ठेवली असेल. जुईला तिथे आपल्याला कशाला पोहोचवायला सांगतोस? जाऊ की आपण.’’

राधाच्या बोलण्याने सगळेच दचकले.

‘‘यात त्रास होण्यासारखं काही नाहीए. उलट तुमच्या सहवासात जुई खूप खूश असते.’’ आशीषने, जुईच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘सर, अविनाश, तुमची परवानगी असेल तर मला दोन मिनिटं राधा मॅडमशी एकांतात बोलायचं. जुई सहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. त्यानंतर स्वत:लाच एका चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही. जुईच्या आजीनेही फार आग्रह केला. पण मी एकट्यानेच जुईच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली. जोपर्यंत राधा मॅडमकडून लग्नाच्या तयारीसाठी पूणपणे ‘हो’ असा सिग्नल मिळत नाही तोवर माझा जीव शांत होणार नाही.’’

अविनाशने मोकळेपणाने हसून सहमती दर्शवली अन् आशीष व राधाला तिथेच सोडून इतर मंडळी बाहेरच्या लॉनवर आली.

आशीष राधाच्या समोर येऊन उभा राहिला. हात जोडून दाटून आलेल्या कंठाने बोलला, ‘‘राधा, तुझा विश्वासघात करणारा, तुला फार फार मनस्ताप देणारा, मी तुझ्यापुढे उभा आहे. काय द्यायची ती दूषणं दे. हवी ती शिक्षा दे. पण माझ्या पोरीचा यात काही दोष नाहीए. तिच्यावर अन्याय करू नकोस. तुला विनंती करतो, तुझ्याकडे भीक मागतो, जुई अन् आकाशला एकमेकांपासून वेगळं करू नकोस. माझी जुई फार हळवी आहे गं, आकाशशी लग्नं झालं नाही तर ती जीव देईल…प्लीज राधा, मला भीक घाल एवढी.’’

आकाशने भरून आलेले डोळे पुसले, घसा खाकरून स्वच्छ केला अन् तो बाहेर लॉनवर आला. ‘‘जुई बाळा, यांना मॅनहॅटनला घेऊन जा. तिथून घरी सोड अन् त्यांची सर्वतोपरी काळजी घे हं!’’ वडिलांचे हे शब्द ऐकताच जुई व आकाशचे चेहरे उजळले.

राधाने गाडी सरळ घरीच घ्यायला लावली. संपूर्ण प्रवासात ती गप्प बसून होती. घरी पोहोचताच कपडेही न बदलता ती बेडवर जाऊन पडली.

अविनाश टीव्ही बघत बसला.

राधाच्या डोळ्यांपुढे ३२ वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमासारखा उभा राहिला.

आशीष व राधाचा साखरपुडा खूप थाटात पार पडला होता. कुठल्या तरी समारंभात आधी त्यांची भेट झाली अन् मग आशीषच्या घरच्यांनी राधाला मागणी घातली. त्यावेळी मोबाइल नव्हते. रात्री सगळे झोपले की राधा हळूच टेलीफोन उचलून स्वत:च्या खोलीत न्यायची अन् मग तासन्तास राधा व आशीषच्या गप्पा चालायच्या. चार महिन्यांनंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. तेवढ्यात ऑफिसकडूनच त्याला एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं.

त्यामुळे लग्न लांबवण्यात आलं. राधाला फार वाईट वाटलं. पण आशीषच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी एवढा त्याग करणं तिचं कर्तव्य होतं. तिने आपलं लक्ष एमएससीच्या परीक्षेवर केंद्रित केलं. पण सहा महिन्यांसाठी अमेरिकेला गेलेला आशीष पुन्हा परतून आलाच नाही. तिथे तो एका गुजराती कुटुंबात पेइंगगेस्ट म्हणून राहू लागला. अमेरिकन आयुष्याची अशी मोहिनी पडली की त्याने तिथेच राहाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात सोपा उपाय होता की अमेरिकन नागरिकत्त्व असलेल्या मुलीशी लग्न करायचं अन् तिथेच नोकरी शोधायची. आशीषने कंपनीची नोकरीही सोडली अन् भारतात येण्याचा मार्गही बंद केला. राहात होता त्या घरातल्या मुलीशी त्याने लग्न केलं. पुढे अमेरिकन नागरिकत्त्वही घेतलं. या विश्वासघातामुळे राधा पार मोडून पडली. पण आईवडिलांनी समजावलं, आधार दिला. पुढे अविनाशशी लग्नं झालं. अविनाश खूप प्रेमळ अन् समजूतदार होता. त्याच्या सहवासात राधा दु:ख विसरली. संसारात रमली. दोन मुलं झाली. त्यांना डोळसपणे वाढवलं. मुलंही सद्गुणी होती. हुशार होती. रूपाने देखणी होती. मुलीने बी.टेक. केलं. तिला छानसा जोडीदार भेटला. लग्न करून ती इथे सियाटललाच सुखाचं आयुष्य जगते आहे. जावई मुलगी मल्टीनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी आहेत.

आकाश सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. टेनिस उत्तम खेळतो. टेनिस टूर्नामेंट्समध्येच जुईशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत अन् पुढे प्रेमात झालं. फेसबुकवर जुईची भेट राधाशी आकाशने करून दिली. जुई त्यांना आवडली. त्यांनी लग्नाला होकार दिला. फार खोलात जाऊन चौकशी केली नाही, तिथेच चुकलं. मुलीच्या वडिलांविषयी अधिक माहिती मिळवायला हवी होती. सगळं खरं तर छान छान चाललेलं अन् असा या वळणावर आशीष पुन्हा आयुष्यात आला. कपाटात बंद असलेल्या स्मृती पुन्हा बाहेर आल्या. राधाला काय करावं कळत नव्हतं. मुलाला कसं सांगावं की या पोरीचा बाप धोकेबाज आहे. जुईशी लग्न करू नकोस यासाठी त्याला काय कारण सांगावं? मनावरचा ताण असह्य होऊन राधा हमसूनहमसून रडायला लागली.

अचानक खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. अविनाश जवळ येऊ बसला होता. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, ‘‘राधा, मनातून तू इतकी कच्ची असशील मला कल्पनाच नव्हती. अगं किती क्षुल्लक गोष्टींसाठी स्वत:ला त्रास करून घेते आहेस? काही कानावर होतं…काही अंदाजाने जाणलं…अगं, आशीषने जे तुझ्याबाबतीत केलं, ते खूप लोक करतात. हा देश त्यांच्या स्वप्नातलं ध्येय होतं. जुईकडे बघूनच कळतंय की तिची आई किती सुंदर असेल. व्हिसा, नागरिकत्त्व, राहायला घर, सर्व सुखसोयी, सुंदर बायको त्याला सहज मिळाली तर त्याने केवळ साखरपुडा झालाय म्हणून भारतात येणं म्हणजे वेडेपणाच होता. तुझं अन् त्यांचं तेच विधिलिखित होतं. माझा मात्र फायदा झाला. त्यामुळेच तू माझ्या आयुष्यात आली. अन् तुझी माझी गाठ परमेश्वराने मारली होती तर तू आशीषला मिळणारच नव्हतीस…मला मान्य आहे, मी तुला खूप संपन्न सुखसोयींनी परिपूर्ण आयुष्य नाही देऊ शकलो. पण मनापासून प्रेम केलं तुद्ब्रझ्यावर, हे तर खरं ना? मघापासून आकाश विचारतोय, आईला एकाएकी काय झालंय? मी काय उत्तर देऊ त्याला.’’

अविनाशच्या बोलण्याने राधा थोडी सावरली. डोळे पुसून म्हणाली, ‘‘माझ्या मनात एकच गोष्ट सतत घुमतेय की वडिलांचेच जीन्स जुईत असतील तर? तर ती आमच्या मुलाला आमच्यापासून तोडेल…आशीष किती क्रूरपणे वागला. आईवडिलांनाही भेटायला आला नाही. घरजावई होऊन बसला इथे. त्याच्या मुलीने माझ्या साध्यासरळ पोराला घरजावई व्हायला बाध्य केलं तर? मुलाला बघायला आपण तडफडत राहाणार का?’’

राधाच्या बोलण्यावर अविनाश अगदी खळखळून हसला. तेवढ्यात आकाश आत आला. रडणारी आई, हसणारे बाबा बघून गोंधळला. शेवटी अविनाशने त्याला सर्व सांगितलं. राधाला वाटणारी भीतीही सांगितली.

आकाशही हसायला लागला. आईला मिठी मारून म्हणाला, ‘‘हेच ओळखलंस का गं आपल्या मुलाला? अगं मी कधीच घरजावई होणार नाही अन् मुख्य म्हणजे जुईही मला घरजावई होऊ देणार नाही. उलट आता तुम्ही इथे आमच्याजवळ राहा. मी मोठं नवं घर घेतलंय. उद्या आपण ते बघायला जातोए. इथे राहिलात तर नीताताई अन् भावजींनाही खूप आनंद होईल.’’

राधाची आता काहीच तक्रार नव्हती. महिन्याच्या आतच आकाश व जुईचं थाटात लग्न झालं. नवपरीणित वरवधू हनीमूनसाठी स्वित्झर्लण्डला गेली. लेक अन् जावई नात, नातवासह आपल्या गावी परत गेले.

अविनाशने राधाला म्हटलं, ‘‘आता या भल्यामोठ्या सुंदर, सुखसोयींनी सुसज्ज घरात आपण दोघंच उरलो. तुला आठवतंय, आपलं लग्न झालं तेव्हा घरात ढीगभर पाहुणे होते. एकमेकांची नजरभेटही दुर्मीळ होती आपल्याला. बाहेरगावी जाण्यासाठी माझ्यापाशी रजाही नव्हती. पैसेही नव्हते. पण आता मुलाने संधी दिलीय, तर आपणही आपला हनीमून आटोपून घेऊयात. आपणही अजून म्हातारे नाही आहोत. खरं ना?’’

राधाने हसून मान डोलावली अन् प्रेमाने अविनाशला मिठी मारली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...