कथा * पौर्णिमा आरस

डिसेंबर महिन्याची किटी पार्टी रियाच्या घरी होती. हाउसी म्हणजे तंबोलाचा खेळ रंगात आला होता. शेवटचा नंबर अनाउन्स झाला अन् मालिनीची बॉटम लाइन पूर्ण झाली. पंचावन्न वर्षांची मालिनी त्या किटीतली सर्वात वयस्कर सदस्य होती. एरवी मालिनी किती उत्साहात असायची, पण आज बॉटम लाइन पूर्ण होऊनही ती विमनस्क बसून होती. सगळ्यांनी आपापसांत डोळ्यांनीच ‘काय झालंय?’ असं विचारलं अन् कुणालाच काही माहिती नसल्याने नकारार्थी माना हलवत त्यांनी ‘काही ठाऊक नाही,’ असंही सांगितलं.

किटीतली सर्वात लहान सभासद होती रिया. तिनेच शेवटी विचारलं, ‘‘मावशी, आज काय झालंय तुम्हाला? इतके नंबर कापले जाताहेत तरी तुम्ही अबोल, उदास का?’’

‘‘काही नाही गं!’’ उदास होऊन मालिनीने म्हटलं. अंजलीने आग्रहाने म्हटलं, ‘‘मावशी, काही तरी घडलंय नक्की. सांगा ना आम्हाला…’’

अनीता मालिनीची खास मैत्रीण होती. तिने विचारलं, ‘‘पवन बरा आहे ना?’’

‘‘बरा आहे की!’’ मालिनीने उत्तर दिलं, ‘‘चला, हा राउंड पूर्ण करूयात.’’

‘‘बरं तर, हा राउंड होऊन जाऊ दे,’’ इतरांनीही संमती दिली.

हाउसीचा पहिला राउंड संपला तेव्हा रियाने विचारलं, ‘‘न्यू ईयरचा काय कार्यक्रम ठरवलाय तुम्ही?’’

सुमन म्हणाली, ‘‘अजून काहीच ठरलेलं नाहीए. बघूयात, सोसायटीत काही कार्यक्रम असेल तर…’’

नीताचा नवरा विनोद सोसायटीच्या कमेटीचा सभासद होता. तिने म्हटलं, ‘‘विनोद सांगत होते यंदा आपली सोसायटी न्यू ईयरचा कोणताही कार्यक्रम करणार नाहीए. कारण कमिटी मेंबर्समध्ये काही मुद्दयांवर मतभेद आहेत?’’

सारिका वैतागून म्हणाली, ‘‘खरं तर आपल्या सोसायटीत किती छान कार्यक्रम व्हायचा. बाहेर जाण्याची गरजच वाटत नसे. बाहेर एक तर सर्व हॉटेल्समधून गर्दी भयंकर. तासन्तास ताटकळत उभं राहावं लागतं. शिवाय ते जेवण महाग किती पडतं? जा, खा अन् परत या. यात कसली आलीय मजा? सोसायटीचा कार्यक्रम खरंच छान असतो.’’

रियाने पुन्हा विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय बेत आहे? पवनकडे जाणार आहात का?’’

‘‘सांगणं अवघड आहे. अजून तरी काहीच ठरलेलं नाहीए.’’

हाउसीचा एक आणखी राउंड, थोड्या गप्पाटप्पा, खाणंपिणं झालं अन् किटी पार्टी संपली. मंडळी घरोघर निघून गेली.

मालिनीही घरी आली. कपडे बदलून ती पलंगावर आडवी झाली. समोरच शेखरचा, तिच्या नवऱ्याचा फोटो होता. त्याकडे नजर जाताच तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

शेखरला जाऊन आता सात वर्षं झाली होती. मॅसिव्ह हार्टअॅटक आला अन् काहीही करायची उसंत न देता शेखर गेला. एकुलता एक मुलगा पवन अन् ती मुलुंडच्या टू बेडरूम फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत राहात होती. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. बरे आनंदात दिवस जात होते. पण नीतूला, म्हणजे सुनेला वेगळं घर हवं होतं. पवनचाही तिला पाठिंबा होता. खरं तर मुलगी नसल्याने मालिनीने नीतूला मुलीसारखंच प्रेम दिलं होतं. तिचे सगळे दोष पोटात घातले होते. सर्व लाड पुरवले होते.

पवनचं ऑफिस अंधेरीला होतं. पवनने म्हटलं, ‘‘आई, येण्याजाण्यात वेळही फार जातो शिवाय दमायलाही होतं. मी विचार करतोय अंधेरीतच एक फ्लॅट घ्यावा…’’

‘‘तुला जे योग्य वाटेल ते कर. हे घर भाड्याने द्यावं लागेल ना? इथलं सर्वच सामान शिफ्ट करायचं का?’’ मालिनीने विचारलं.

‘‘भाड्याने? हे घर भाड्याने का द्यायचं? तुला राहायला हे घर लागेलच ना?’’

मालिनीला धक्काच बसला. ‘‘मी इथे? एकटीच? एकटी कशी राहीन मी?’’

‘‘त्यात काय झालं? अगं, तिथे मी वन-बेडरूमचं घर घेणार आहे. तिथे तुला अडचण होईल ना? इथे बरी मोकळीढाकळी राहाशील. तुझ्या भरपूर ओळखी आहेत इथे. नव्या ठिकाणी या वयात अॅडजेस्ट व्हायला त्रासच होतो गं! शिवाय अधूनमधून आम्ही येऊ इथे. तूही येत जा तिथे.’’

यावर सगळे अश्रू डोळ्यांतून मागे परतून लावून मालिनीने परिस्थिती स्वीकारली होती. दुसरा पर्यायही नव्हता. उत्साहाने दोघं नव्या घरात निघून गेली. आर्थिकदृष्ट्या मालिनीला काही प्रॉब्लेम नव्हता. शेखरने छान नियोजन करून ठेवल्यामुळे मालिनीच्या हातात भरपूर पैसा होता. शिवाय ती विचारी, समंजस अन् धीराची होती. गेली वीस वर्षं ती या सोसायटीत राहात होती. सर्वांशी तिचे संबंध सलोख्याचे होते. मदतीला धावून जाण्याचा स्वभाव, सर्वांशी जमवून घ्यायची वृत्ती यामुळे सोसायटीतल्या लहानथोर सर्वांनाच तिच्याबद्दल आपुलकी अन् आदर वाटत असे. एम.ए.बी.एड असल्याने ती लहान मुलांच्या ट्यूशन्स घेत होती. तो एक छान विरंगुळा होता.

नीतूला दिवस गेल्यावर पवन अधूनमधून मालिनीला आपल्या घरी नेत होता. सासू सुनेचे सर्व डोहाळे पुरवत होती. बाळंतपणाच्या महिनाभर आधीच मालिनी पवनच्या घरी जाऊन राहिली. नीतूला मुलगा झाला. नीतूचे आईवडील परदेशातच राहात असल्यामुळे ते इथे येऊन राहाणं शक्यच नव्हतं. लहानग्या यशची तीन महिने छान काळजी घेतली मालिनीने. बाळंतिणीलाही भरपूर विश्रांती, तेलमालिश, सकस, सात्त्विक आहार, सगळंच यथासांग केलं. यश तीन महिन्यांचा झाला अन् पवनने आईला परत तिच्या घरी आणून सोडलं. लहानग्या यशला सोडून येताना मालिनीला रडू अनावर झालं होतं. पण काय करणार?

सणावाराला, काही समारंभ असला म्हणजे पवन त्यांना घ्यायला यायचा. त्याही आनंदाने जायच्या. पण तिथं पोहोचल्याबरोबर घरातली सगळी कामं त्यांच्या अंगावर टाकून दोघं नवराबायको खरेदीसाठी, भटकण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी निघून जायची. यशलाही त्यांच्यावरच सोपवून जायची. जाताना अमूक खायला कर, तमुक खायला कर हेही बजावून जायची. यशला सांभाळून सगळं करताना त्याची धांदल व्हायची. जीव दमून जायचा. काम झालं की लगेच पवन त्यांना घरी सोडून यायचा. इथे घरी त्यांची खूप जुनी मोलकरीण होती. तिचा मालिनीवर जीव होता. ती मनोभावे तिची सेवा करत असे. मालिनीची कुतरओढ तिला समजत होती.

यंदाच्या दिवाळीला पवनने मालिनीला घरी नेलं. ढीगभर फराळाचे जिन्नस तिच्याकडून करवून घेतले. चार दिवस सतत काम केल्याने मालिनीची कंबर दुखायला लागली. ते नीतूच्या लक्षात येताच तिने पवनला म्हटलं, ‘‘आजच आईला घरी सोडून ये. सगळं काम तर झालंच आहे. आता आरामच करायचाय तर त्यांनी त्यांच्या घरी करावा.’’

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पवनने आईला तिच्या घरी नेऊन सोडलं. मालिनीला त्या क्षणी लक्षात आलं, मुलगा किंवा सून तिची नाहीत. यापुढे ती कधीही त्यांच्या घरी जाणार नाही. दिवसभर राबून दमलेल्या जिवाला दोन प्रेमाचे शब्द हवे होते. पण तिथे तर कोरडा व्यवहार होता. समोरच्या फ्लॅटमधल्या सारिकाने त्यांचं घर उघडं बघितलं तर ती चकित झाली.

‘‘मावशी, आज तुम्ही इथे? पवन…पवन अन् नीतूही आली आहेत का?’’

‘‘नाही आली,’’ भरल्या कंठाने मालिनीने म्हटलं. त्यांची विद्ध नजर सगळं सांगून गेली. सारिकाला काही विचारण्याची गरजच भासली नाही. तिनेच पटकन् घराचा केर काढला. पुसून घेतलं. दारापुढे रांगोळी घालून चार पणत्याही लावल्या. एका ताटात फराळाचे पदार्थ रूमालाखाली झाकून आणून टेबलावर ठेवले. रात्री जेवायचं ताटही घेऊन आली अन् बळजबरी मालिनीला चार घास खायला दिले.

त्या दिवसाच्या आठवणीने आत्ताही मालिनीचे डोळे पाणावले. आज रियाकडे जाण्यासाठी मालिनी आवरत असतानाच पवनचा फोन आला, ‘‘आई न्यू ईयरला तुला घ्यायला येतो. माझे बॉस अन् कलिग्ज डिनरसाठी येणार आहेत.’’

एरवी फोन केला तर पवन, ‘मी बिझी आहे, नंतर फोन करतो,’ म्हणून फोन कट करायचा. आजचा फोन दिवाळीनंतर प्रथमच आला होता. नीतूही केव्हातरी अगदी औपचारिक फोन करते.

फोनच्या आवाजाने मालिनी पुन्हा वर्तमानकाळात आली. फोन नीतूचाच होता.

‘‘आई, नमस्कार, कशा आहात?’’

‘‘बरी आहे मी. तुम्ही तिथे कसे आहात?’’

‘‘आम्ही ठीकठाक आहोत आई, पवनने तुम्हाला सांगितलंच असेल. न्यू ईयरची पार्टी आहे. वीस एक लोक असतील. तुम्ही दोन दिवस आधीच या. मला तर स्वयंपाक येत नाही. तुमच्या हातचं जेवण सर्वांना आवडतंही! तर, तुम्ही तयारीत राहा. मी नंतर पुन्हा फोन करते,’’ फोन बंद झाला.

‘किती चतुर अन् लबाड, स्वार्थी अन् कोरडी आहेत ही माणसं’?मालिनीच्या मनात आलं. पोटचा पोरगाच असा आहे तर सुनेला काय दोष द्यायचा? जाऊ दे. आता आपण फक्त आपला विचार करायचा. त्यांच्या हातातली कठपुतली नाही व्हायचं. दिवाळीत काम करून कंबर दुखून आली होती. आठ दिवस लागले बरं व्हायला. आता पुन्हा तिथे जायचं नाही. कशाला त्रास करून घ्यायचा स्वत:ला?

डिसेंबरची किटीपार्टी रेखाच्या घरी होती.

न्यू इयर सेलिब्रेशनचा विषय निघाला, ‘‘खरं तर जागा लहान पडते, नाही तर काही कार्यक्रम ठरवायला हरकत नाही.’’ अंजलीने म्हटलं.

रेखाने विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय कार्यक्रम आहे? पवनकडे जाणार का?’’

‘‘अजून ठरवलं नाहीए,’’ मालिनीने म्हटलं. ती काही तरी विचारात गढली होती.

‘‘मावशी, कसला विचार करताय?’’

सर्वांच्याकडे बघत मालिनी म्हणाली, ‘‘विचार असा करतेय की तुम्ही न्यू इयरची पार्टी माझ्या घरी करू शकता. भरपूर मोकळी जागा आहे, माझं रिकामं घर तुम्हा सर्वांच्या येण्याने आनंदाने भरून जाईल.’’

‘‘काय म्हणता? तुमच्या घरी?’’ आश्चर्याने सर्वांनी म्हटलं.

‘‘त्याला काय झालं? आपण दणक्यात करू पार्टी,’’ मोकळेपणाने हसत मालिनीने म्हटलं.

‘‘काय मस्त कल्पना आहे…पण मावशी. तुम्ही पवनच्या घरी…’’ रिया म्हणाली.

‘‘यावेळी सगळं वेगळंच करायचं आहे. नव्या वर्षांची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची. झकास सेलिब्रेशन करून. डिनर बाहेरून ऑर्डर करू. गेम्स खेळू,  मुलं कार्यक्रम देतील. डिनर करू…मजा येईल. खरं तर आपला हा ग्रूप जिथे जमतो ना, तिथे मजाच मजा असते.’’

रियाने तर आनंदाने मालिनीला मिठीच मारली. ‘‘व्वा! मावशी, किती मज्जा. जागेचा प्रॉब्लेम सुटला अन् इतका छान कार्यक्रमही ठरला. व्वा!’’

‘‘आणि बरं का मावशी, कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळ्याजणी मिळून सांभाळू सगळं. अन् खर्च सगळे मिळून वाटून घेऊयात,’’ सारिकाने सांगितलं.

‘‘अगं, तुम्हा सगळ्यांनाच सांगते,’’ मालिनीने म्हटलं, ‘‘फक्त न्यू ईयरच नाही, तुम्हाला एरवीही कधी काही समारंभाची पार्टी करायची असेल तर माझं घर मोकळंच असतं अन् माझ्या घरात तुम्ही सगळे आलात तर मलाही आनंदच वाटतो ना? एकाकी आयुष्यात तेवढंच चैतन्य अन् आनंद.’’

‘‘पण मावशी, पवन…घ्यायला आला तर?’’

‘‘नाही, मी जाणार नाही, इथेच राहाणार आहे.’’

त्यानंतर काही दिवसांनी सगळ्या मालिनीच्या घरी जमल्या. पार्टीला कोण कोण येणार? एकूण किती माणसं, मोठी किती, मुलं किती, मेन्यू काय, कुठून काय आणायचं, कोणावर कसली जबाबदारी असेल, म्युझिक, माइक, लायटिंग, तंबोला, मुलांचे कार्यक्रम सर्व गोष्टी अगदी तपशीलवार ठरल्या. लिहून काढल्यामुळे गडबडघोटाळ्याला वाव नव्हता. न्यू ईयर सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झाली.

तीस डिसेंबरला सकाळी पवनचा फोन आला. ‘‘आई, तुला घ्यायला येतोय, आवरून तयार राहा.’’

‘‘नाही रे बाळा, यावेळी मी येऊ शकणार नाही.’’

‘‘का?’’

‘‘माझाच काही कार्यक्रम ठरला आहे.’’

पवन वैतागून म्हणाला, ‘‘तुझा कसला कार्यक्रम? एकटीच तर आहेस तिथे…’’

‘‘नाही रे, एकटी नाहीए मी. खूप लोक आहेत इथे सोबतीला. न्यू ईयरची पार्टी ठेवलीय घरी.’’

‘‘आई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? या वयात पार्टी करते आहेस? अन् इथे माझ्याकडे कोण करेल सगळं?’’

‘‘वयाचा विचार तर मी केला नाही…पण यावेळी मला जमणार नाही.’’

आता पवनने सूर बदलला, ‘‘आई, यावेळी तू एकटी नको राहूस. मुलाच्या घरी तुला अधिक चांगलं वाटेल ना?’’

‘‘एकटी तर मी गेली कित्येक वर्षं राहतेच आहे रे, त्याची मला सवय झालीए.’’

पवनने संतापून म्हटलं, ‘‘जशी तुझी इच्छा…’’ त्याने रागानं फोन आपटला.

त्याचा रागाने लाल झालेला चेहरा बघून नीतूने विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘आई येत नाहीए.’’

‘‘का?’’

‘‘तिच्या घरी पार्टी ठेवलीए तिने.’’

‘‘का? अन् कशाला? आता इथल्या पार्टीचं कसं व्हायचं? मला तर इतक्या लोकांचा स्वयंपाक जमणारच नाही.’’

‘‘पण आता तर तुलाच करावं लागेल.’’

‘‘छे: छे:, मला नाही जमणार.’’

‘‘पण मी सगळ्यांना बोलावून ठेवलंय.’’

‘‘तर मग हॉटेलमधून मागवून घे.’’

‘‘छे: छे:, फारच महाग पडतं ते.’’

‘‘मग बघ काय करायचं ते.’’

दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. शेवटी पवनने सर्वांना फोन करून आई आजारी असल्याने पार्टी कॅन्सल केल्याचं सांगितलं. दोघंही आईवर अन् एकमेकांवरही संतापलेली होती.

‘‘तू आईशी चांगली वागली असतीस तर आज असं खोटं बोलावं लागलं नसतं,’’

पवन म्हणाला, ‘‘आईने कामाशिवाय इथे राहिलेलं तुला खपत नव्हतं ना सतत, लगेच तिला पोहोचवाचा लकडा लावायचीस?’’

‘‘मला काय म्हणतोस? झी आई आहे, तूच तिला समजून घ्यायला कमी पडलास, मी तर सून आहे…मी काय करणार?’’

दोघं एकमेकांना दोष देत राहिली. भांडणं संपेना. दोघांची तोंडं फुगलेली.

हाउसी, लायटिंग, माइक, म्युझिक, गेम्स, मुलांची नाटकं, डान्स, चविष्ट जेवण या सगळ्याबरोबर ‘हॅप्पी न्यू ईयर’चा घोष. असं सगळं सगळं झालं. पण ते पवनकडे नाही, मालिनीच्या घरी. नववर्षांच्या शुभेच्छांच्या वर्षांवात मालिनी न्हाऊन निघाली. यापुढची सगळीच वर्षं अशी आनंदात जाणार होती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...