* जगदीश पवार

हिंदूंचा सण, मुसलमानांचा सण, ख्रिस्तींचा सण आणि शिखांचा सण. हे सण धर्मात विभागले गेलेत. प्रत्येक धर्माचा सण वेगळा आहे. एका धर्माला मानणारे दुसऱ्याच्या सणाला महत्व देत नाहीत. धर्मांची तर गोष्टच वेगळी. एकाच धर्मात एवढे विभाजन आहे की एका धर्माचे असूनही ते सर्व उत्सव एकत्र साजरे करत नाहीत. एकाच धर्मात विविध धर्म आणि जातीचे छोटे-मोठे उत्सवही विभागले गेले आहेत.

हिंदूंचे सण मुसलमान, ख्रिस्तीय नव्हे तर खालच्या जातीचे समजले जाणारे हिंदूही साजरे करणे टाळतात. मुसलमानांमध्ये शिया वेगळे, सुन्नी वेगळे. ख्रिस्तींमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोघांचे संगीत वेगळे. प्रत्येक धर्मात भेदभाव, उच्चनीचता आहे. श्रेष्ठता आणि लहान-मोठयांची भावना आहे. हेच आपल्या सणांच्या विभाजनाचे वास्तव आहे. अर्थात सणांवर धर्माने पूर्णत: ताबा मिळवला आहे.

होळी-दिवाळीसारख्या सणांवर धर्माने असा काही ताबा मिळवलाय की सणांचे मूळ स्वरूपच बदलले आहे. सणांवर धर्मातील ढोंगी कर्मकांडे, दिखाऊपणा, तिरस्कार, भेदभाव आणि हिंसेचा प्रभाव पाहायला मिळतोय. धर्माने उत्सवांमध्ये कडवटपणा आणला आहे. वेगवेगळया समुदायात विभागलेल्या समाजात कटकारस्थाने करण्याची स्पर्धा सुरू झालीय. सणांचा गोडवा धर्माच्या वर्चस्वामुळे आंबट झालाय.

सणांवरील धर्माच्या ताब्यामुळे सामाजिक सलोखा, ऐक्य आणि सुसंवादाची दरी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली आहे. ऐक्य, समन्वय आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या सणांमध्ये माणसाची विभागणी झाली आहे. या विभागणीमुळेच आता सण हे सामाजिक एकजुटीचे पर्व म्हणून सिद्ध होऊ शकत नाहीत. सणांचे शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय महत्व विसरून सर्वतोपरी धार्मिक, सांस्कृतिक बाबींचाच विचार केला जातो.

धार्मिक पात्रांना सणांशी जोडून कथा तयार केल्या आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला पांडवांचा जुगार खेळणे आणि राम लंका जिंकून आल्यावर आनंद साजरा करण्याच्या नावावरही कथा प्रचलित आहेत. अशाच प्रकारे होळीचा सण प्रल्हाद आणि होलिकेशी जोडला आहे.

धनत्रयोदशी, गोवर्धन पूजा, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुगार्पूजा, छटपूजा हे सर्व धर्माशी जोडले आहेत. रक्षाबंधनाचा कोणत्याही देवी-देवतांशी संबंध नाही, तरीही पुजाऱ्यांनी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सांगण्याचा सर्वाधिकार आपल्याकडे सुरक्षित ठेवला, कारण लोक त्यांच्याकडे पवित्र मुहूर्त विचारायला यायला हवेत आणि सोबतच फळे, फुलं, मिठाई, वस्त्र आणि दानदक्षिणेची रोकड आणायला त्यांनी विसरू नये. दिवाळीत जुगार खेळणे ही प्रथा झालीय. धर्मग्रंथांचा दाखला देत सांगण्यात आले आहे की दिवाळीच्या रात्री कौरव, पांडव जुगार खेळले होते.

सण आता धर्माच्या व्यापाऱ्यांची अस्त्रे बनले आहेत. साहजिकच सणांच्या माध्यमातून द्वेष, भेदभाव अधिक दृढ केला जात आहे.

धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्यांनी सणांवर कर्मकांडांची अशी काही पट्टी बांधली आहे की शुभ वेळ, मुहूर्त, विधी जाणून घेतल्याशिवाय लोक उत्सव साजरे करत  नाहीत. सणात पूजा, होमहवन करायलाच हवे असे मनावर ठसवण्यात आले, जेणेकरून पुजाऱ्यांची गरज भासेल आणि दानदक्षिणेच्या नावावर त्यांची दुकानदारी सुरू राहील.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या नावाखाली पुजाऱ्यांची मजा असते. लक्ष्मी अर्थात धनसंपत्तीच्या आगमनासाठी ते पूजा, मंत्रजाप करायला लावतात. मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे, पूजेचा मुहूर्त, विधी करणे अनिवार्य आहे. यासाठी लोकांना पुजाऱ्याकडे जावेच लागते.

दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटण्याचा, एकतेचा प्रमुख सण. हा सामुहिक उत्सव   आहे. तो वैयक्तिक नव्हे तर सामुहिक रुपात साजरा केला जातो. प्रत्येक सणाच्या आनंदात अंधविश्वासाचा अंधार पेरण्यात आला आहे. सणांमध्ये जुगार खेळणे, नशा करणे, ध्वनी व वायू प्रदूषणआणि धार्मिक, जातीय तेढ  निर्माण होणे हे धर्माच्या घुसखोरीमुळे  होते. धर्मच या सर्वांना प्रोत्साहन देतो.

धनाचे आगमन आणि समृद्धीच्या आशेने साजरा करण्यात येणाऱ्या दिवाळीच्या उत्सवाचे महत्व धनाशी संबंधित नाही, तर समाजातील एकता, प्रेम, सामंजस्य, ऐक्याशी याचा संबंध आहे.

समाजाला विभागणारा धर्म

धर्माच्या उत्सवांवरील ताब्यामुळे समाज विभागला गेला आहे. दिवाळी वैश्य, विजयादशमी क्षत्रिय, रक्षाबंधन ब्राह्मण आणि होळी शूद्रांमध्ये विभागण्यात आली आहे.

सणांना संकुचित धार्मिक श्रद्धेच्या मयार्दांमध्ये गुंडाळून संपूर्ण समाजाच्या एकतेत धर्म, जात, वर्ग यांचे अडथळे तयार करण्यात आले आहेत. यामुळे एकाच धर्माचे सर्व लोक तो सण साजरा करतील हे गरजेचे नाही. प्रेम, बंधुभाव कमी होत असून याचा दुष्परिणाम सणांच्या सोहळयावर झाला आहे.

सणांमागील प्रथेवर सर्वच जण विश्वास ठेवतील हे गरजेचे नाही. एखाद्याचा या प्रथा, परंपरेवर विश्वास नसेल तर निश्चितच मतभेद होतात. लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम अयोध्येत परतल्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते तर कुठे रावणाचे पूजकही आहेत, जे रामाला आपला आदर्श मानत नाहीत.

सणांमागील प्रथा-परंपरा धर्माशी जोडल्या गेल्याने समाजाच्या सर्व वर्गातील लोकांना एकत्र, एकमेकांशी जोडले गेल्यासारखे वाटत नाही. धर्माला प्रेम, शांतता, करुणेचे प्रतिक मानले असले तरी  प्रत्यक्षात धर्माने सामाजिक भेदभाव, शत्रूत्व, तिरस्कार, हिंसा वाढीस लावली.

सण जीवनात सुखद परिवर्तन घेऊन येतात. हर्षोल्हास व नाविन्याशी मेळ साधतात. म्हणूनच दिवाळीत कुटुंबासह स्वादिष्ट पक्वान्न आणि प्रकाशाच्या आनंदासह मित्र, नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांना अधिक ऊर्जादायी बनवा.

उत्सव सामूहिक हवेत. धर्म समाजाला विभागतो. त्यामुळेच उत्सवांवर धर्माने ताबा घेताच सामूहिक एकता लोप पावते. सर्व वर्गातील लोकांसह मिळून सण साजरे केल्याने सामाजिक एकता वृद्धिंगत होते.

सर्वांनी मिळून आनंद साजरा करावा, हीच सण साजरे करण्यामागची भावना आहे. मित्र, आप्त, शुभचिंतकांना भेटून प्रेम, आपुलकीच्या आनंदाचा अनुभव घेत उत्साही होण्याची उत्सव ही संधी आहे. तो चिंता, तणाव विसरायला लावून मनाला चैतन्य, आनंद, नव्या ऊर्जेची अनुभूती देतो.

जीवनात बदल करून आनंदी होण्याचे, शारीरिक आणि मानसिक आनंद मिळवण्यासाठी आपुलकीने आप्तांसोबत काही क्षण घालवण्याचे सण हे माध्यम आहे. सणांमुळे जीवनात येणारा उत्साह माणसाच्या जीवनात कायम राहतो. जीवनाला गती मिळते. जगण्यात सकारात्मकता येते. सणांचा हा सुगंध आयुष्यभर दरवळत राहतो.

उत्सव, पर्वांना माणुसकीतील ऐक्याचे प्रतीक मानले जाते. धर्माच्या संकुचित बंधनात बांधून भेदभावाची भिंत उभारण्याचे ते माध्यम नाही. सणांचा जन्म आपापसातील प्रेम, सुसंवाद, एकता, ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठीच झाला होता. मात्र, धर्माच्या घुसखोरांनी सणांमधील सामुहिक एकता तोडण्याचे काम केले. सामाजिक, कौटुंबिक विभाजन का होत आहे, धर्मात द्वेष का पसरत आहे, सण सुसंवाद वाढीस लावण्यासाठी मदत का करत नाहीत, याचा आपण विचार करायला नको का?

अंध:कार दूर करणे हाच सणांचा उद्देश हवा. घर, कुटुंब, समाजात प्रेम, सद्भावना नसेल तर तो कसला उत्सव?

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...