* वीरेंद्र ज्योति

हल्लीच्या धावपळीच्या युगात रांगोळी काढण्याच्या पद्धतीमध्येही झपाट्याने बदल होत आहे. रांगोळी जमिनीवर किंवा कपड्यावर काढली जाते. पण आजकाल कागद, प्लायवूड, हार्ड बोर्ड, सनमायका, कॅनव्हासवर पण रांगोळी काढली जाते. पूर्वी सणांच्या आधीच स्त्रिया रांगोळी काढण्याची तयारी करत असत. पण आता तर सणावाराला कागद, प्लॉस्टिक पेपर व प्रिंटेड रांगोळ्यांची ही सपाटून विक्री होते. ज्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही ते रांगोळीचे स्टिकर चिकटवून वातावरण निर्मिती करतात.

अद्भूत कला

पाटण्यातील रांगोळी स्टिकरचे घाऊक व्यापारी विनीता सेल्सचे उपेंद्र सिंह सांगतात की दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने जवळपास ३ करोड रुपयांचे रांगोळीचे स्टिकर बिहारझारखंड, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश इ. राज्यांमध्ये विकले जातात. किरकोळ बाजारात एक स्टिकर साइजनुसार २० ते २५० रुपयांपर्यंत विकतात.

साधारणत: रांगोळी काढण्यासाठी फूल, रंग, अबीर, तांदूळ, गोंद इ. वापर केला जातो. दिसायला कुठलाच डामडौल नसणाऱ्या या कलेचे स्वत:चे असे एक आकर्षण, सौंदर्य व ओळख आहे. यात भारतीय कलेची मूलभूत विचारशैली अंतर्भूत आहे.

नवा रंग नवी उमेद

पाटण्यातील गुरूदेव पेंटिंग क्लासेसच्या कलाकार अनुपम सांगतात की आपल्या देशात कुठलीही कला फक्त कला नसते. त्या कलेमागे काहीतरी विचार, उद्दिष्ट असतेच. प्रत्येक सणात कलेचा खुबीने वापर करून वातावरण रंगीत व उत्साही बनवले जाते.

रांगोळी काढण्यासाठी बहुतांशी कमळ, सूर्यफूल, शंख, दिवे, सूर्य, पक्षी, मासा इ. चित्र काढली जातात. रांगोळी गोल आकारात काढली जाते. हाताची बोटे, बांबूची काडी, कपडा यांच्या सहाय्यानेही रांगोळी काढली जाते. रांगोळी काढताना पांढऱ्या रंगाचा जास्त वापर केला जातो. कारण पांढऱ्या रंगाला शांततेचं प्रतिक मानलं जातं आणि जिथे शांतता असेल तिथेच प्रगती होते. भारतातील प्राचिन कला परंपरांमध्ये रांगोळीचा समावेश होतो आणि भारतीय कलेमध्ये रांगोळीला ६४वी कला मानले जाते.

रांगोळीचे वैशिष्ट्य

दक्षिण भारतात रांगोळीची पंरपरा फार जुनी आहे. रांगोळीचे सौंदर्य आणि तिचा मोह आजच्या धावपळीच्या जीवनातही आहे. लोक एखादवेळी रांगोळी काढू शकत नसतील पण बाजारात मिळणारे रांगोळीचे स्टिकर चिकटवून आपल्या कलेशी बांधिलकी मात्र जपतात.

ओरिसातील प्रसिद्ध कलाकार अनिल कुमार बल म्हणतात की बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये तऱ्हेतऱ्हेचे नमूने प्रसिद्ध आहेत. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात ‘धुली चित्रा’ नावाची रांगोळी तांदळाच्या द्रावणाने काढली जाते. मध्य प्रदेशात पावसाळा संपल्यानंतर घरांच्या दरवाज्यावर फूलापानांनी रांगोळी काढली जाते. राजस्थानातील रांगोळीचे महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे तिथे भडक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

वेगवेगळी नावे व रूपे

केरळमध्ये ओणम सणाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या रांगोळीत फुलांचा वापर केला जातो. जमिनीवर रांगोळी काढून रेखाटून रिकाम्या जागांमध्ये गुलाब, झेंडू, सूर्यफूल, चमेली इ. फुलांच्या पाकळ्या कौशल्याने भरल्या जातात. प्रत्येक राज्यात रांगोळीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. बिहारमध्ये अरिपन, उत्तर प्रदेशात चौक पूरना असं म्हटलं जातं. राजस्थानात मांडना नावाने रांगोळी ओळखली जाते. बंगालमध्ये अल्पना नावाने ओळखली जाते. कर्नाटकात रंगवल्ली तर तामिळनाडूत कोल्लम नावानेही रांगोळी ओळखली जाते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...