– सुधा जुगरान

जर काही कारणास्तव तरूण मंडळी आपला भावी जोडीदार स्वत: शोधू शकले नाहीत किंवा ते शोधू इच्छित नसतील आणि आपल्या आईवडिलांच्या मदतीनेच विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला असेल तर आजच्या काळात पालकांसाठी आपल्या मुलाचे लग्न लावून देणे अवघड होत चालले आहे.

स्थळासंबंधी कोणत्याही एका मुद्यावर पालक आणि मुलांचे एकमत होणे सोपे नाही. तिथेही जनरेशन गॅप स्पष्टपणे दिसू लागला आहे आणि बहुतांश तरुण लव्ह मॅरेज करू लागल्याने अरेंज्ड मॅरेजसाठी विवाहयोग्य मुलामुलींचा जणू दुष्काळ पडू लागला आहे. शिवाय मुले दुसऱ्या शहरात किंवा परदेशात राहात असतील तर लग्नाच्या स्थळाबाबत त्यांच्याशी बोलणे कठीण नव्हे तर अशक्य होते.

उच्च शिक्षित गृहिणी असलेल्या सुधा थपलियाल सांगतात की मुलीसाठी स्थळे येतात, पण फोनवर तिच्याशी याबाबत चर्चा करायची इच्छा असते तेव्हा सकाळी ती घाईत असते, संध्याकाळी दमलेली असते आणि सुटीच्या दिवशी विश्रांतीच्या मूडमध्ये असते. लग्नाबाबत चर्चा करू तर ती कोणाशी करू.

सावी शर्मा यादेखील एक उच्चशिक्षित गृहिणी आहेत. त्यांनी सांगितले की मी मुलाचे अरेंज्ड मॅरेज केले, पण मला फारसा त्रास झाला नाही, कारण मुलाने सर्व माझ्यावर सोपविले होते. त्यामुळे जी स्थळे मला योग्य वाटली त्याच मुलींशी त्याची भेट घडवून आणली आणि त्यातीलच एका ठिकाणी लग्न ठरले.

पालकांचा त्रास मुलांनी समजून घ्यावा

आजकाल अरेंज्ड मॅरेज ठरवताना पालकांसमोरील सर्वात मोठा पेच हा आहे की मुलांच्या अवास्तव अपेक्षांना जमिनीवर आणणे, जे अशक्य आहे. सोबतच कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी पाहता योग्य ताळमेळ जुळेल अशी स्थळे शोधणे, कारण ती शोधताना मुले कमी सहकार्य करतात.

अनेक तरुण विचार तर खूप करतात, पण लग्नाचं सर्व खापर पालकांच्या माथी फोडतात, जसे की पालकांनी सुरुवातीलाच त्यांच्या अवास्तव अपेक्षांची जाणीव करून द्यायला हवी होती, त्यांनी ते केले नाही ही त्यांची चूक आहे. पण तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की अवास्तव अपेक्षा पूर्ण होत नाहीत.

बोलण्याच्या ओघात आलेल्या स्थळांच्या चांगल्या, वाईट बाजूंवर विचार करता येतो. लव्ह मॅरेजमध्ये जिथे मागचे पुढचे न पाहता, काहीही विचार न करता प्रेम होते, अर्थात प्रेमाची भावनाच सर्वकाही असते. पण अरेंज्ड मॅरेजमध्ये तुमचे गुणदोष, नोकरी, पैसा, पगार, सौंदर्य, सामाजिक परिस्थिती, घर, कुटुंब, शिक्षण इत्यादी पाहूनच स्थळे येतात.

म्हणूनच जर तरुण स्वत:साठी योग्य जोडीदार शोधू शकत नसतील आणि त्यासाठी पालकांवर अवलंबून असतील तर योग्य जोडीदार निवडण्यासाठी त्यांनी पालकांना सहकार्य करायला हवे.

मुलांच्या अडचणी पालकांनी समजून घ्याव्या

पालकांनीही याकडे लक्ष द्यायला हवे की अरेंज्ड मॅरेजमध्ये लव्ह मॅरेजसारखी लवचिकता येण्यासाठी त्यांनी उदारमतवादी व्हायला हवे. जुनाट प्रथांना चिकटून राहू नये. जात, जन्मपत्रिका, प्रथापरंपरा, गोत्र, धर्म, रीतिनाती आदींच्या चाळणीतून गाळून जे स्थळ योग्य ठरते, ते शिक्षण आणि विचारांच्या चौकटीत तुमचा मुलगा किंवा मुलीसोबत किती फिट बसते हे पाहण्याचे किंवा याचा विचार करण्याचेही कष्ट घ्यावेत.

म्हणूनच अरेंज्ड मॅरेजमध्येही ठरलेल्या चौकटीतून बाहेर पडून थोडे उदारमतवादी व्हा, स्वत:च्या बुरसटलेल्या विचारांना बाजूला सारून, मुलांसाठी योग्य ठरेल अशाच स्थळांचा विचार करा. आजच्या काळात मुलींसाठीही सर्व प्रकारच्या तडजोडी करणे सोपे नाही. म्हणूनच त्यांच्यासाठीही अरेंज्ड मॅरेज करणे सोपी गोष्ट नाही.

अरेंज्ड मॅरेजमधील अडचणी

अरेंज्ड मॅरेजमध्ये मध्यस्थ, आईवडील किंवा नातेवाईक एखाद्या स्थळाला होकार देण्यासाठी भावनात्मक दबाव टाकतात. हे योग्य नाही. याव्यतिरिक्त मुलामुलीला एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. या अडचणी अधिकच वाढतात जर ते वेगवेगळया शहरात किंवा त्यांच्यापैकी एक विदेशात राहात असेल.

लव्ह मॅरेजमध्ये प्रदीर्घ काळ एकमेकांना समजून घेतल्यानंतरच दोघे लग्नाचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचा या निर्णयावर पूर्ण विश्वास असतो. पण अरेंज्ड मॅरेजमध्ये दोघेही निर्णय घ्यायला घाबरतात. आजकाल तरुणाई वय आणि मानसिकदृष्टया परिपक्व असल्यामुळे कुणाशीही सहजपणे समजुतीचे संबंध प्रस्थापित करू शकत नाही.

लव्ह मॅरेजमध्ये जिथे गुणदोष सोबत घेऊनच प्रेम पुढे जाते, तिथे अरेंज्ड मॅरेजमध्ये सर्व काही परिस्थितीवर अवलंबून असते. लव्ह मॅरेजमध्ये दोघेही आधीच एकमेकांच्या संमतीने भविष्यातील योजना आखतात तर अरेंज्ड मॅरेजमध्ये बरेचदा भविष्यातील हे सर्व निर्णय घेताना कौटुंबिक दबाव येतो आणि मुलगा किंवा मुलगी आपल्या जोडीदाराचा हेतू नीटपणे समजून घेऊ शकत नाही.

जोडीदाराला भेटा काही अशा प्रकारे

पालक जोडीदार निवडणार असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या निर्णयाशी आपली आवड जुळवून पाहा आणि भावी जोडीदारास अशाप्रकारे भेटा :

* भेटायला गेल्यावर समोरच्याला मनमोकळे बोलण्याची संधी द्या. तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. दोघांपैकी कोणीही एकाने सहजपणे बोलणे सुरू करून दुसऱ्याला कम्फर्टेबल करा. तुम्हाला त्याच्याबद्दल जे काही वाटले ते कुटुंबातील सदस्यांना स्पष्टपणे सांगा.

* चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा उशिराने निर्णय घेणे किंवा निर्णयच न घेणे चांगले. परंतु पालकांसोबत लग्नाबाबत चर्चा करताना त्यात सहज संवाद किंवा सकारात्मकता हवी, जेणेकरून ते तुमच्यासाठी योग्य जोडीदार निवडू शकतील.

* एकमेकांचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका, परंतु भविष्यातील योजना, आवडीनिवडी, स्वभाव वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपली नोकरी, कामाचे तास, फिरण्याची आवड, व्यस्तता, पगार इत्यादी बाबत स्पष्टपणे माहिती द्या, जेणेकरून नंतर वाद होणार नाहीत. याव्यतिरिक्त एकमेकांच्या पुरुष आणि महिला मित्रांच्या बाबतीत असलेली वागण्यातील सहजता आणि हद्द जाणून घेणे योग्य ठरेल.

* खर्चाची बाबही स्पष्ट व्हायला हवी, कारण बहुतांश मुलींना असे वाटते की पतिचे पैसे सर्वांचे असतात, पण त्यांचे पैसे हे केवळ त्यांचेच असतात. याशिवाय आजच्या नोकरदार मुली अशा मुलांना पसंत करतात, जे कुटुंब, मुले ही फक्त मुलींचीच जबाबदारी नसते, असा विश्वास त्यांना देतात.

अरेंज मॅरेजमध्येही जागवा लव्ह मॅरेजसारख्या भावना

आता जेव्हा लग्न ठरलेच आहे आणि तुम्ही स्वत:ला त्यासाठी तयार केले आहे, तर मग शहर असो किंवा विदेश, परस्परांसोबत चांगला वेळ घालवा.

कामाच्या ओझ्याखाली दबला असाल, मनात अनेक संशय असतील आणि जोडीदाराबाबत फारसे आकर्षण वाटत नसेल तरीही एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण करा. असा विचार करा की निसर्गाने त्याला फक्त तुमच्यासाठीच बनवले आहे. फ्लट्रिंग, हसणे-हसवणे, लहान लहान सरप्राईज द्या आणि तुमचे प्रेम नुकतेच सुरू झाले असून ते जिंकून सुखाचा किनारा गाठायचा आहे, अशा प्रेमळ भावना मनात जागवा.

भलेही तुमच्यासाठी तुम्ही स्वत: जोडीदार निवडला नसेल, परंतु पसंती तर तुमचीच आहे ना, म्हणूनच त्याच्याबाबत त्याच भावना जागवा, ज्या लव्ह मॅरेजमध्ये असतात. वाटल्यास लपूनछपून भेटा किंवा थेट बोलून प्रेम व्यक्त करा. मग बघा, अरेंज्ड मॅरेजमध्येही कशी लव्ह मॅरेजची मजा अनुभवता येते ती.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...