– गरिमा पंकज

अनेकदा एकटेपणा किंवा कंटाळा घालवण्यासाठी आपण सोशल मिडियाचा आधार घेतो आणि हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. कालांतराने ही सवय कधी आपणास व्यसनाच्या जाळयात अडकवते हे कळतदेखील नाही. त्यावेळी मनात असूनही आपण यापासून दूर राहू शकत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणे सोशल मिडियाचे व्यसनही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक स्तरावरही नकारात्मक प्रभाव पाडते.

अमेरिकन पत्रिका ‘प्रिव्हेंटिव मेडिसिन’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधानानुसार जर आपण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, ट्विटर, गुगल, लिंक्डइन, यूट्यूब, इंस्ट्राग्राम आदींवर एकटेपणा घालवण्यासाठी जास्त वेळ घालवत असाल तर परिणाम उलट होऊ शकतो.

संशोधनाच्या निष्कर्षानुसार, तरुण जितका जास्त वेळ सोशल मिडियावर घालवतात आणि सक्रिय राहतात, त्यांना तितकेच जास्त समाजापासून अल्प्ति राहावेसे वाटेल. यासंदर्भात संशोधनकर्त्यांनी सोशल मिडियावरील सर्वात लोकप्रिय ११ वेबसाईट्सच्या वापराबाबत १९ ते ३२ वर्षे वयापर्यंतच्या १,५०० अमेरिकी तरुणांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याचे विश्लेषण केले.

अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाचे प्रमुख लेखक ब्रायन प्रिमैक यांच्या मतानुसार, ‘‘आपण सामाजिक प्राणी आहोत, पण आधुनिक जीवनशैली आपल्याला एकत्र आणायचे सोडून आपल्यातील अंतर वाढवत आहे. मात्र आपल्याला असे वाटते की सोशल मिडिया सामाजिक अंतर संपवण्याची संधी देत आहे.’’

सोशल मिडिया आणि इंटरनेटचे काल्पनिक जग तरुणांना एकटेपणाचे शिकार बनवत आहे. अमेरिकेची संघटना ‘कॉमन सैस मिडिया’च्या एका सर्वेक्षणानुसार किशोरवयीन मुलांनाही जवळच्या मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मिडिया आणि व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधायला जास्त आवडते. १३ ते १७  वर्षे वयोगटांतील १,१४१ किशोरवयीन मुलांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. ३५ टक्के किशोरवयीन मुलांना व्हिडिओ मेसेजद्वारे मित्रांशी संपर्क साधायला जास्त आवडते. सोशल मिडियामुळे मित्रांना भेटताच येत नाही, हे ४० टक्के मुलांनी मान्य केले. तर फोन किंवा व्हिडिओ कॉलशिवाय राहूच शकत नाही, असे ३२ टक्के मुलांनी सांगितले.

इंटरनेटच्या सवयीमुळे किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक विकासावर अर्थात सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सातत्याने काल्पनिक जगात रमणारे किशोरवयीन खऱ्या जगापासून अलिप्त होतात. यामुळे ते निराशा, हताशपणा, उदासिनतेची बळी ठरू शकतात.

सोशल मिडियाचे जाळे हळूहळू मोहजालात अडकवून आपले किती नुकसान करत आहे, हे लक्षात घ्या. आजकाल घरात जास्त कुणी नसल्याने आईवडीलच मुलांचे मन रमावे यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. त्यानंतर एकटेपणामुळे कंटाळलेली मुले स्वत:च स्मार्टफोनमध्ये आपले जग शोधू लागतात. सुरुवातीला सोशल मिडियावर नवेनवे मित्र जोडणे त्यांना खूपच आवडते, पण हळूहळू या काल्पनिक जगाचे वास्तव समजू लागते. याची जाणीव होते की जग जसे एका क्लिकवर आपल्यासमोर येते, तसेच एका क्लिकवर गायबही होते आणि आपण राहतो एकटे, एकाकी, खचून गेलेले. त्याचप्रमाणे जी मैलो न् मैल दूर राहूनही आपल्या मनासह विचारांवर ताबा मिळवतात अशी खोटी नाती काय उपयोगाची?

एकदा का कोणाला सोशल मिडियाची सवय लागली की तो सतत आपला स्मार्टफोन विनाकारण चेक करत राहतो. यामुळे त्याचा वेळ फुकट जातोच, शिवाय काहीतरी चांगले करण्याची क्षमताही तो गमावून बसतो.

माणूस सामाजिक प्राणी आहे. समोरासमोर बोलून जे समाधान, आपलेपणा आणि कुणीतरी सोबत असल्याची सुखद जाणीव होते, ती सोशल मिडियावर तयार होणाऱ्या नात्यांमधून कधीच होत नाही. शिवाय सोशल मिडियावर असता तेव्हा तुम्हाला वेळेचे भान राहत नाही. सातत्याने खूप काळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्याही निर्माण होतात.

आरोग्यावर होतो परिणाम

सतत स्मार्टफोनचा वापर केल्याने झोप कमी येते. दृष्टी कमजोर होऊ लागते. शारीरिक हालचाल कमी होत असल्याने अनेक प्रकारचे आजार जडतात. स्मरणशक्तीही कमी होते.

आजकाल लोकांना प्रत्येक समस्येचे तात्काळ उत्तर हवे असते. त्यांना इंटरनेटवर प्रत्येक प्रश्नाचे लगेच उत्तर मिळते. यामुळे ती सारासार विचार करण्याची क्षमता गमावू लागतात. बुद्धीचा वापर कमी होत जातो. हे एखाद्या नशेप्रमाणे आहे. लोक तासन्तास अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग करत राहतात, पण साध्य काहीच होत नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...