कथा • शालिनी गुप्ते

देह मनाची सारी मरगळ दूर करणाऱ्या पहिल्या पावसासारखंच पहिलं प्रेमही असतं. त्या सरीत भिजणाऱ्यालाच त्याचं सुख कळतं.

रवीवर मी प्रेम केलं ते मनापासून, ते माझं पहिलं प्रेम होतं. त्यामुळेच माझ्या प्रेमावरचा विश्वास अधिक दृढ होता. मी घरी सांगून टाकलं, ‘‘लग्न करेन तर फक्त रवीशी. नाहीतर लग्नच करणार नाही.’’

‘‘त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही. पण त्यानं एकदा घरी येऊन सर्वांना भेटायला तर हवं ना? त्यालासुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे हे त्याच्या तोंडून कळायला हवं,’’ दादा म्हणाला. त्याच्या बोलण्यातला खोचकपणा अन् रवीविषयीची नाराजी मला खटकली.

‘‘हो, हो. मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. त्याला हीरो व्हायचंय. तेवढ्यासाठीच तो दिवसरात्र स्टुडियोच्या चक्करा मारतोय. बस्स, एक ब्रेक मिळू देत, त्याचं इतकं नाव होईल की लोक डोळे विस्फारून बघत राहतील. तेवढयासाठीच तो मुंबईला गेलाय.’’

‘‘त्याला ब्रेक मिळणार कधी अन् तो हीरो होणार कधी?’’ दादानं हसत हसत टोमणा दिला अन् तो बाहेर निघून गेला.

‘‘आई, बघ ना, दादा रवीबद्दल कसं बोलतोय ते? पण बघाल तुम्ही एक दिवस तो खूप मोठा कलाकार म्हणून नाव काढेल,’’ बोलता बोलता मला रडू फुटलं.

‘‘रडू नकोस बाळा. तो हिरो बनेलही पण आत्ता या क्षणी तो काय करतोय?’’ बाबांनी चहा घेताना विचारलं.

या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. कारण तो मुंबईत नक्की कुठं आहे अन् काय करतोय हे मला तरी कुठं त्यानं सांगितलं होतं?

‘‘तुझ्या हिरोबद्दल तुलाच ठाऊक नाही अन् तू त्याच्याशी लग्न करायला निघाली आहेस? अगं, आम्ही जो मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तो एकदा बघ. रूप, गुण, संस्कार, स्वत:चा व्यापार, उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी सगळंच तुला अन् आम्हाला साजेसं आहे.’’

आईबाबांनी परोपरीनं समजावलं अन् मी समीरशी लग्न करून संसाराला लागले. त्या आधी मी एकदा मुंबईला जाऊन रवीचा शोध घेण्याचाही विचार केला होता. पण मुंबईत मी त्याला कुठं अन् कशी शोधणार होते? फार असह्य वाटलं मला. मनात रवी होता. शरीर फक्त समीरच्या मालकीचं होतं.

समीरशी लग्न झालं. त्यांच्या घरात, कुटुंबात अन् समीरच्या आयुष्यात मला मानाचं स्थान होतं. घराची स्वामिनी म्हणून पत्नी म्हणून जे जे माझ्या हक्काचं होतं, ते सगळं सगळं मला समीरनं दिलं. पती म्हणून तो कुठं कमी पडला नाही. पण मी मात्र मनात रवी असल्यानं समीरला न्याय देऊ शकले नाही.

हनीमूनसाठी आम्ही मसूरीला गेलो होतो. मालरोडवर भटकत असताना अवचित पाऊस पडायला लागला. समीरला पावसात भिजायला फार आवडतं हे मला तेव्हा कळलं. तो पावसात भिजत होता. मी मात्र आडोसा बघून स्वत:ला पावसापासून वाचवत होते.

‘‘नेहा, येना, बघ पावसात भिजायला किती मजा येतेय…’’ समीर म्हणाला.

‘‘नको गं बाई, उगीच गारवा बाधायचा. तूच ये इथं.’’ मी म्हणाले.

‘‘डार्लिंग, गारठ्याचं काय घेऊन बसलीस? अगं तुला मिठीत घेऊन इतकी ऊब देईन की तू अक्षरश: वितळशील…ये…ये…पटकन्,’’ समीरनं मला ओढून पावसात उभं केलं. त्याचं बोलणं ऐकून जवळपास उभी असलेली टूरिस्ट मंडळी हसायला लागली. मी लाजून चूर झाले.

आम्ही पावसात मनसोक्त भिजलो. मला तर थंडी बाधली नाही पण समीरला मात्र त्रास झाला. तो गोळ्या घेऊन, स्वेटर घालून पांघरूणात गुडूप झोपला. मी मात्र रवीच्या आठवणीनं तळमळत होते. सतत मनात येत होतं, जर आज समीरच्या जागी नवरा म्हणून रवी असता तर या हनीमूनची मजाच वेगळी असती.

मला एक जुना प्रसंग आठवला. मी व रवी मोटरसायकलनं येत होतो. एकाएकी जोरात पाऊस पडायला लागला. रवीनं गाडी बाजूला उभी केली अन् मला ओढत तो मोकळ्या मैदानात घेऊन गेला. दोन्ही हात पसरून तो पावसाचा आनंद उपभोगत होता. मलाही त्यानं तसंच करायला लावलं. प्रथम मी संकोचन मग मुक्त मनानं हात पसरून पावसाचं स्वागत करत मनसोक्त भिजले. पाऊस कमी झाला तेव्हा प्रथम आम्ही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन गरमागरम चहा घेतला. कपडे पिळून वाळवले अन् मग घरी गेलो. पावसात भिजण्याचा आनंद त्यानंतर मी रवीसोबत खूपदा घेतला. चिंब ओल्या देहावर त्याच्या हाताचा स्पर्श मला किती रोमांचित करायचा…

रवीची आठवण सतत मनात असल्यामुळे मी समीरशी कधी मोकळेपणानं वागू शकले नाही.

आमच्या दोघांमध्ये सतत रवी आहे असं मला वाटायचं. तो त्याचा हक्क मागतोय असा मला भास व्हायचा. शरीर समीरचं झालं होतं, मन मात्र रवीजवळच होतं.

सासरच्या घरी पैसा, सत्ता, सन्मान अन् स्वातंत्र्य असूनही मी अजून अस्वस्थ होते. बेचैन होते. काही तरी खटकतंय हे समीरच्या लक्षात आलं. तो म्हणाला, ‘‘तू अशी उदास का असतेस? माझ्या व्यवसायामुळे मी तुला खूप वेळ देऊ शकत नाही, पण तू एकटी का राहतेस? घराबाहेर पड, मित्र मैत्रिणी मिळव. ग्रुप तयार कर. तुलाच उत्साह वाटेल. नवं काही बघायला, शिकायला मिळेल.’’

ती कल्पना मला आवडली. मी आमच्या सोसायटीच्या भिशी ग्रुपची मेंबर झाले. एक दोन अजून ग्रूप जॉइन केले.

नव्या वातावरणात, नव्या ओळखीमुळे मी खरंच बदलले. मनातली निराशा कमी होऊ लागली. हा बदल मला मानवला. एव्हाना आमच्या लग्नाला सहा वर्षं झाली होती. माझा मुलगा बंटी चार वर्षांचा होता. आयुष्य एखाद्या शांत नदीप्रमाणे वाहत होतं.

पण ही शांतता फार काळ टिकली नाही. रवी पुन्हा माझ्या आयुष्यात आला.

समीर अन् मी सिनेमाला जाणार होतो. पण अचानक समीरला काही काम आलं अन् मी एकटीच सिनेमाला गेले.

तिकिटं काढलेली होती. मी गाडीतून टॉकीजपाशी उतरले अन् समोरच रवी दिसला.

दोघंही स्तब्ध होऊन एकमेकांकडे किती तरी वेळ बघत होतो.

‘‘मी स्वप्न बघतेय का?’’ मी मलाच चिमटा घेत प्रश्न केला.

‘‘स्वप्नंच असावं,’’ रवीचा कंठ दाटून आल्यासारखं वाटलं मला.

आम्ही दोघं गर्दीपासून जरा लांब जाऊन उभे राहिलो. ‘‘होतास कुठं? फोन नाही, पत्र नाही. मी वेड्यासारखी वाट बघत होते,’’ मला रडूच यायला लागलं.

रवीही दाटल्या कंठानं म्हणाला, ‘‘नेहा, एक क्षण तुझ्या आठवणींवाचून गेला नाही. माझं शरीर फक्त माझ्याजवळ होतं. मन तर तुझ्याचपाशी होतं.’’

काही क्षणांतच आम्ही स्वत:ला सावरलं. रवी म्हणाला, ‘‘चल आत जाऊयात, आजच्या सिनेमात माझा व्हिलनचा रोल आहे. पण खूप जबरदस्त रोल आहे.’’

आम्ही आत जाऊन बसलो. रवीचा रोल खूपच छान होता. त्याची मेहनत त्याच्या कामात दिसत होती. मला सिनेमा आवडला. सिनेमा संपला अन् लोकांनी रवीला ओळखलं. गराडा घातला. अभिनंदनाचा त्याच्यावर वर्षाव होत होता. मी सरळ घरी निघून आले.

आता मला फक्त रवी अन् रवीच हवा होता. त्याच्या एक दोन पिक्चरची शूटिंग सुरू होती. मी तिथंही त्याच्याबरोबर जाऊन आले. त्याचा रिकामा वेळ माझ्याबरोबरच तो घालवत होता.

माझी इच्छा होती त्यानं एकदा तरी समीरला भेटावं. पण त्याची अजिबात इच्छा नव्हती, ‘‘माझ्या शत्रूचं नाव माझ्यासमोर काढू नकोस. माझी जखम पुन्हा भळभळा वाहू लागते. तुझ्याशी लग्न नाही करू शकलो हा माझा पराजय वाटतो मला. पण एक दिवस मी या पराभवाला माझ्या विजयात बदलेन…’’

त्याच्या या शब्दांनी मला खूप बरं वाटायचं. रवीला मिठी मारावी असं वाटायचं. पण मनांवर ताबा ठेवून वागत होते.

अनेकदा मनात यायचं त्याला विचारावं की मधल्या काळात होतास कुठे? माझं लग्न झालं त्या आधी भेटला का नाहीस? पण मी नाही विचारलं. त्याला दु:खी करावं असं मला वाटत नव्हतं.

एका सायंकाळी पाच वाजता मला रवीचा फोन आला.

‘‘काय करते आहेस?’’

‘‘विशेष काहीच नाही.’’

‘‘ताबडतोब ये. अमुक अमुक हॉटेलात मी वाट बघतोय,’’ त्यानं एका पंचतारांकित हॉटेलचं नाव घेतलं.

‘‘का? अचानक काय झालंय?’’

‘‘प्रश्न विचारू नकोस. एक सरप्राइज आहे,’’ रवीच्या मी इतकी आहारी गेले होते की क्षणाचाही विचार न करता मी जायचं ठरवलं. समीर तेव्हा बिझनेस टूरवर होता. मी बंटीची तयारी करून त्याला मैत्रीणीकडे सोडला. बऱ्याचदा तो तिच्याकडे रहायचा, कारण मैत्रिणीचा मुलगा त्याच्याच शाळेत होता. स्वत:चं आवरून मी त्या हॉटेलात पोहोचले.

रवी माझी वाटत बघत होता. ‘‘आजच मला एक फार चांगला रोल मिळाला आहे. हा सिनेमा चांगला चालला तर मी रातोरात स्टार बनेन बघ,’’ त्यानं मला जवळ ओढून घेत म्हटलं.

‘‘नको रवी, हे बरोबर नाही,’’ मी स्वत:ला त्याच्यापासून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘प्रेमात सगळं बरोबर असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेमात समर्पण गरजेचं असतं. तुझं माझं प्रेम तर किती जुनं आहे. खरं प्रेम आहे आपलं. कधीपासून आपण एकमेकांसाठी तळमळतो आहोत.’’

त्यानं मला एक सुंदर कागदी पिशवी दिली. मी ती उघडून बघितली. आत एक सुंदर गुलाबी रंगाची नाइटी होती.

खोलीतल्या बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत त्यानं मला कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवलं.

नाइटीला येणारा गुलाबाच्या अत्तराचा सुगंध, अंथरूणावरच्या गुलाबपाकळ्यांचा गंध, खोलीतला स्वर्गीय निळसर प्रकाश अन् मंद धुंदावणारं संगीत…मी जणू स्वत:चं भान विसरले.

अन् मग तेच घडलं…जे फार पूर्वी घडलं असतं.

शरीर तृप्त होतं. मन तृप्त होतं. प्रथमच मी इतकं सुख, अशी तृप्ती अनुभवत होते. समीरबरोबर मी अशी खुललेच नव्हते.

‘‘रवी, खरंच मी खूप तृप्त आहे.’’ मी त्याला बिलगत म्हणाले.

‘‘अजून काय झालंय? तुला मी इतकं सुख देणार आहे जे आजपर्यंत कुणा स्त्रीला मिळालं नसेल,’’ माझं चुंबन घेत रवी म्हणाला, ‘‘मला समीरचा हेवा वाटतो. माझी दौलत त्याच्या वाटयाला आली.’’

‘‘आत्ता त्याचं नाव नको ना घेऊस…’’ मला त्या क्षणी फक्त रवी हवा होता.

सगळी रात्र मी रवीबरोबरच होते. सकाळी लवकर उठले. पटकन् आवरून रवीला बाय करून हॉटलातून निघाले. येताना बंटीला बरोबर घेतलं. तो शाळेसाठी तयारच होता. त्याला अन् मैत्रिणीच्या मुलाला शाळेत सोडून मी माझ्या घरी पोहोचले.

रवीबरोबर त्या रात्री शरीरसुखाचा अनुभव घेतल्यापासून माझ्या चित्तवृत्ती उल्हसित असायच्या एकूणच मी खूप आनंदात होते.

एकदा मी कुठलं तरी गाणं गुणगुणत होते. समीर म्हणाला, ‘‘इतकं आनंदात तुला कधीच बघितलं नव्हतं.’’

मी मनोमन दचकले. सावरून घेत हसत म्हटलं, ‘‘हल्ली चांगला ग्रुप मिळाला आहे. छान काम करतोय आम्ही…त्यामुळेच…’’

‘‘तू अशी आनंदात असलीस ना की मला ही खूप छान वाटतं,’’ समीर अगदी मनापासून म्हणाला अन् त्यानं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं.

त्याक्षणी मला रवीचीच आठवण झाली. केवळ रवीमुळे माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला होता. आज दुसऱ्यांदा रवीनं मला त्याच हॉटेलात बोलावलं होतं. त्याच्या प्रेमाच्या ओढीनं मी ही जायला तयार होते.

प्रश्न बंटीचा होता. तो शाळेतून अजून आला नव्हता. मला काळजीत बघून त्याच दिवशी माझ्याकडे रहायला आलेल्या सासूबाईंनी म्हटलं, ‘‘अगं, मी आहे ना इथं. मी सांभाळीन त्याला. तू तुझा कार्यक्रम रहित करू नकोस.’’

त्यांचे मनापासून आभार मानत मी पटकन् आवरून बाहेर पडले. रिक्षा करून सरळ हॉटेलला पोहोचले. भराभर चालत, लॉबी ओलांडून रवीच्या खोलीशी आले.

खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. दार ढकलून आत जाणार तेवढ्यात रवीच्या तोंडून माझं नाव ऐकलं. आत अजून कुणीतरी होतं. रवी अन् त्याचं बोलणं चालू होतं. मी पटकन् दाराआड झाले. हळूच बघितलं. रवी कुणासोबत बसून दारू पित होता. खोलीत सिगारेटचा धूर कोंदला होता.

‘‘तुझी ती कबुतरी येणार तरी केव्हा रे? मला तर फारच तहान लागलीय तिची,’’ दारू ढोसत तो माणूस म्हणाला. त्यानं रिकामा केलेला ग्लास पुन्हा दारूनं भरत अत्यंत नम्रपणे रवी म्हणाला, ‘‘सर, अगदी कुठल्याही क्षणी येईल ती.’’

‘‘अरे, पण ती तुझी गर्लफ्रेंड आहे. माझ्याबरोबर ती…’’

‘‘सर, त्याची काळजी करू नका. ती माझ्या प्रेमात इतकी खुळावली आहे की माझ्या म्हणण्यासाठी काय वाट्टेल ते करेल,’’ रवी हसत हसत म्हणाला.

‘‘सर, आज तुम्ही माझा अभिनय बघाल. आज तिला मी अशी खुलवीन की माझ्याबरोबर तुम्हालाही ती पूर्ण सुख देईल. भयंकर हॉट आहे साली,’’ सिगरेट ओढत रवी बोलला.

‘‘बरं तर मी निघतो. तू मला फोन कर. मी माझ्या खोलीत वाट बघतो.’’ तो माणूस बोलला.

‘‘सर, माझा हिरोचा रोल तर पक्का आहे ना?’’ दीनपणे रवीनं विचारलं.

‘‘पक्का म्हणजे पूर्णपणे पक्का…ती पोरगी गेली की तुझं कॉन्ट्रॅक्ट साइन करायचं.’’

हे सगळं ऐकलं अन् पृथ्वी आपल्या भोवती फिरतेय असं वाटलं मला. संताप असा आला होता की आत जाऊन दोघांची थोबाडं फोडावीत. पण ते बरोबर नव्हतं. मी उलट्या पावली माघारी वळले. घाईघाईनं बाहेर पडून रिक्षा केली.

मनात संताप मावत नव्हता. रवीचं ते किळसवाणं रूप बघून माझ्या अंगावर शहारे आले. रिक्षात असताना रवीचा फोन पुन्हा येत होता. मी फोन बंद करून टाकला. घरी कधी पोहोचते असं झालं होतं.

घरी पोहोचले तर समीर अन् बंटी बागेत फुटबॉल खेळत होते.

‘‘तू कधी आलास?’’ मी समीरला विचारलं.

‘‘मुद्दाम घरी लवकर आलो. बंटीशी खेळायचं होतं अन् आजची संध्याकाळ खास तुझ्यासाठी. सिनेमा बघायचाय अन् जेवण बाहेरच करू.’’

समीरशी डोळे भिडवून बोलायची मला भीती वाटली. स्वच्छ निर्मळ चरित्र्याचा प्रेमळ नवरा माझा अन् मी अशी…त्याचा विश्वासघात करणारी…

‘‘आज? नको…नको…उद्या सकाळी बंटीची शाळा आहे…’’ मी समीरला टाळायला बघत होते.

सासूबाई पुन्हा मदतीला आल्या, ‘‘बंटीला मी बघेन गं? जा तुम्ही दोघं…’’

माझा बिघडलेला मूड समीरच्या सान्निध्यात पूर्वपदावर आला. सिनेमा बघून जेवण आटोपून आम्ही बाहेर आलो तेवढ्यात पावसाला सुरूवात झाली. गाडीचं दार उघडून आत बसणाऱ्या समीरला मी ओढून बाहेर काढलं.

‘‘चल, पावसात भिजूयात,’’ मी म्हटलं, तेव्हा त्यानं आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं.

आम्ही दोघं मनसोक्त पावसात भिजलो. आता माझं मन आणि माझा देह एकदम स्वच्छ होता. मनातला संताप आता निवळला होता. विषाद दूर झाला होता. आता फक्त प्रेमच प्रेम होतं मनात समीरविषयी.

मी अंतबार्ह्य बदलले होते. जणू पुनर्जन्म झाला होता. समीरनं मला मिठीत घेत माझ्या ओठांचं चुंबन घेतलं अन् मला जाणवलं त्याचाच अधिकार आहे माझ्या मनावरही. आता रवी माझ्या आयुष्यातून हद्दपार झाला होता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...