* रेणू गुप्ता
‘‘शेफाली, आजकाल तू खूप शांत आणि उदास दिसत आहेस. काही समस्या आहे का?’’ शेफालीची जवळची मैत्रीण, मनदीप, जिचे नुकतेच लग्न झाले होते, तिने शेफालीला विचारले.
‘‘नाही, नाही, काहीच नाही.’’
‘‘मला खरं वाटत नाही, काहीतरी आहे जे तुला त्रास देत आहे. तू आता पूर्वीसारखी बडबड करत नाहीस. नेहमीच कुठेतरी हरवल्यासारखी आणि उदास राहातेस. तू आता माझी ती पूर्वीची सतत बोलणारी आणि मोठ्याने हसणारी मैत्रीण राहिली नाहीस. मला सांग काय झालं? अगं, मी तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. कुणाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना?’’
मनदीपने शेफालीला थोडेसे चिडवत विचारले. तेव्हा ती मोठ्याने म्हणाली, ‘‘अगं, हेच तर दु:ख आहे, की मी असे काहीही केले नाही. हे माझे पीएचडीचे पहिले वर्ष आहे आणि माझी आजी माझे लग्न लावण्यासाठी माझ्या वडिलांच्या मागे लागली आहे, पण सध्या मी लग्नासाठी अजिबात तयार नाही.’’
‘‘म्हणून मी माझ्या वडिलांना आणि आजीला स्पष्टपणे सांगितले की, आधी मी माझी पीएचडी पूर्ण करेन, नंतर चांगली नोकरी मिळवेन. त्यानंतरच मी लग्न करेन. लग्नापूर्वी मला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे आणि हेच कारण आहे की माझे वडील आणि आजी घरात नेहमीच वाद घालतात.’’
‘‘तुझे बरोबर आहे, लग्नानंतर मुलींवर इतक्या जबाबदाऱ्या येतात की, त्या स्वत:साठी काहीही विचार करू शकत नाहीत. माझ्याकडे बघ, पदवीनंतर मी इंटिरियर डिझायनिंगचा अभ्यास करावा आणि इंटिरियर डिझायनर व्हावे, स्वतंत्र व्हावे, माझी स्वत:ची ओळख असावी अशी माझी खूप इच्छा होती, पण माझे वडील हृदयरोगी असल्याने, मला वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी लग्न करावे लागले.
‘‘आता आयुष्य घरकाम आणि स्वयंपाकापुरते मर्यादित आहे. माझा पती महिन्यातून २० दिवस कामानिमित्त घराबाहेर असतो, त्यामुळे मला कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. माझे वृद्ध सासरेही आमच्यासोबत राहातात. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी तुला इतक्या लवकर लग्नाच्या जाळ्यात अडकण्याचा सल्ला कधीच देणार नाही. स्वावलंबी असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्य फक्त एकदाच मिळते.
‘‘लग्नाचे वय झाले, म्हणून लग्न करू नकोस. मी माझ्या अनुभवातून शिकले की जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल तेव्हाच लग्न करावे.’’
शेफालीच्या घरी बसून त्या दोघी मैत्रिणी गप्पा मारत होत्या, तेवढ्यात अचानक त्यांची आणखी एक मैत्रीण, यंग इंडिया सायकॉलॉजिकल सोल्युशन्सची संस्थापक आणि संचालिका डॉ. सीमा शर्मा तिथे आली आणि त्यांची चर्चा सुरूच राहिली. डॉक्टर सीमा यांनी दोन्ही मैत्रिणींना काही प्रश्न विचारले आणि त्यांना सांगितले की जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुम्ही लग्नासाठी तयार आहात, असे निश्चितपणे समजू शकता.
तर आता आम्ही तुम्हाला डॉ. सीमा यांनी त्यांना कोणते प्रश्न विचारले ते सांगतो :
तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहात का?
लग्नापूर्वी प्रत्येक मुलीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असले पाहिजे. तुम्ही आनंदी जीवन तेव्हाच जगू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा तसेच आरामदायी आणि सुंदर जीवनासाठी आवश्यक असलेल्या गरजा स्वत: पूर्ण करू शकाल. आजच्या सामाजिक रचनेत, लोक दिवसेंदिवस अधिकाधिक स्वार्थी होत चालले आहेत. प्रत्येकाला स्वत:साठी आणि स्वत:च्या आनंदासाठी जगायचे असते. म्हणूनच, मुलींना आनंदी आणि समाधानी जीवन जगावे, यासाठी आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पतीवर अवलंबून राहू नये.
डॉ. सीमा म्हणाल्या की, आजही पुरुषी अराजकता आणि स्वार्थी मानसिकतेमुळे अनेक पतीना त्यांच्या मालमत्तेवर आणि पैशांवर एकाधिकारशाही हवी असते आणि त्यामुळेच ते त्यांच्या पत्नीलाही त्यापासून दूरच ठेवतात.
म्हणूनच प्रत्येक मुलीने तिच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार शिक्षण घेऊन यशस्वी करिअर घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, जेणेकरून ती कधीही कोणावर अवलंबून राहाणार नाही आणि स्वत:च्या बळावर आनंदी जीवन जगू शकेल.
घराच्या आत आणि बाहेर तुमच्या बहुआयामी जबाबदाऱ्या पार पाडण्यास तुम्ही तयार आहात का?
लग्नानंतर तरुणींवर अनेक जबाबदाऱ्या येतात. आजही, तथाकथित लिंग समानतेच्या या युगात, घर सुरळीत चालवण्याची जबाबदारी घरातील महिलेची मानली जाते. याशिवाय मुलांचे संगोपन, त्यांना शिक्षण देणे, सामाजिक बांधिलकी पूर्ण करणे इत्यादी जबाबदारी पत्नीवर असते. म्हणून, जेव्हा तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहात, तेव्हाच लग्नाला होकार द्या.
तुमचे आणि तुमच्या जोडीदाराची मूल्यं आणि स्वप्नं सारखी आहेत का?
लक्षात ठेवा, लग्न म्हणजे फक्त प्रेमसंबंध, मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण नाही. प्रत्यक्षात, लग्न ही अशी भागीदारी आहे ज्यामध्ये तुम्ही लग्नानंतर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे आर्थिक व्यवहार, ध्येये, मुलांचे संगोपन करण्याची पद्धत, जीवनाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टिकोन, जीवनमूल्ये समजून घेता. म्हणूनच, जेव्हा तुम्ही तुमच्या भावी जोडीदारासोबत हे सर्व चांगल्या प्रकारे समजून घेता तेव्हाच लग्न करा. या सर्व मुद्द्यांवर तुमचे तुमच्या जोडीदाराशी एकसारखे मत असणे गरजेचे नाही, परंतु तुमच्या स्वप्नांचा आधार एकच असणे महत्त्वाचे आहे.
जोडीदारासोबत सकारात्मक जवळीक साधण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
यशस्वी लग्नाची पहिली अट म्हणजे परस्पर मोकळेपणा आणि नातेसंबंधातील जवळीकता. जवळीकता म्हणजे केवळ निरोगी लैंगिक संबंध नसून, पती-पत्नीमधील खोल भावनिक जवळीक होय.
परस्पर भावनिक जवळीक हा यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया आहे. म्हणून लग्न करण्यापूर्वी, तुमच्या जोडीदारासोबत निरोगी सकारात्मक जवळीक साधण्यासाठी तुम्ही तयार आहात, याची खात्री करा.
तुमच्या आणि तुमच्या भावी जोडीदारामध्ये चांगली समज आहे का? तुम्ही तुमच्या जोडीदाराची जीवनमूल्ये, तत्त्वज्ञान, स्वभाव, चांगल्या प्रकारे समजून घेता आणि ओळखता का?
तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत घालवावे लागते. अनेक आव्हानात्मक परिस्थितींना एकत्र तोंड द्यावे लागते. म्हणूनच, जर परस्पर समजूतदारपणा असेल तर जीवनातील कठीण आव्हानांना तोंड देणे तुमच्यासाठी तुलनेने सोपं होईल.
तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील कमतरतांबद्दल सहज चर्चा करू शकता का?
जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही लग्नासाठी तयार आहात, कारण अशा परिस्थितीत तुमच्या दोघांमध्ये एक बंध निर्माण होतो. समन्वय साधण्यात अडचण येण्याची शक्यता कमी असते.
तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला आरामदायी वाटते का?
तुमच्या भावी जोडीदारासोबत तुमच्या आरामदायकतेचे महत्त्व ओळखा. त्याच्यासमोर तुम्ही आरामदायी आहात की अस्वस्थ आहात? जर तुम्हाला त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटत असेल, त्याच्यासमोर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना येत असेल, तुम्हाला चिंता किंवा अस्वस्थ वाटत असेल तर हे धोक्याचे लक्षण आहे. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही आणखी थोडा वेळ घ्यावा.
तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आवडते का?
जर उत्तर हो असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता त्याच्याशी लग्न केले पाहिजे, पण जर उत्तर नाही असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या नात्याला जास्त वेळ दिला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा कंटाळा आला असेल, मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत असेल किंवा चिडचिड होत असेल तर ते चांगले नाही. जर तुम्हाला या नात्यात कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होत असेल तर ते धोक्याचे लक्षण आहे. अशावेळी तुम्ही लग्न करण्याच्या तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा.
लग्नाकडून तुमच्या अपेक्षा वास्तववादी आहेत का?
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, तुमच्या भावी जोडीदारासोबतचा तुमचा वैवाहिक प्रवास नेहमीच आनंदी राहाणार नाही. या प्रवासादरम्यान, तुम्हाला काही कटू, अनुभव येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनाची चव काहीशी कडू होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात फक्त आनंदाचे क्षणच येणार नाहीत. कधीकधी, काही परिस्थितीत, तुमच्या जोडीदाराची वागणूक तुम्हाला निराश करू शकते.
अशावेळी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या आव्हानात्मक परिस्थितींना हसून आणि कोणतीही चिंता न करता तोंड देऊ शकता तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता लग्नासाठी पूर्णपणे तयार आहात.
तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मूल हवे आहे का?
जर तुम्ही आणि तुमचा होणारा पती सहमत असाल की, तुमच्या आयुष्यात योग्यवेळी एक मूल येईल, सोबतच जर लग्नानंतर तुमच्या दोघांनाही मुलाच्या संगोपनाची जबाबदारी वाटून घेण्यास काही हरकत नसेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता लग्न करू शकता. जर तुम्हाला मूल हवे असेल पण तुमच्या जोडीदाराला ते नको असेल तर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करावा लागेल.
लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात मोठा बदल होईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे का?
जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर ते चांगले लक्षण नाही. तुम्हाला तुमच्या भावी पतीला त्याच्या आहे त्या स्वभावासह स्वीकारावे लागेल, पण जर तुम्हाला वाटत असेल की, हे तुमच्यासाठी शक्य नाही तर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल. लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाचा मूळ स्वभाव, चारित्र्य आणि व्यक्तिमत्व बदलता येत नाही, पण जर तुमच्यामध्ये तुमच्या जोडीदाराला त्याच्या उणिवा, कमतरता आणि कमकुवतपणासह स्वीकारण्याची क्षमता असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता.





