* शशी पुरवार
जेव्हा एखादे तरुण जोडपे एकटे राहाते आणि त्यांना मुलं नसतात, तेव्हा ते दवाखान्याच्या फेऱ्या मारत राहातात आणि तेव्हा सासूचे टोमणे ऐकावे लागत नसतानाही आयुष्यात तणाव निर्माण होतो. आज जीवन जगण्याचा अर्थच बदलला आहे. तरुण जोडप्यांना त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे जीवन जगायला आवडते. मौजमजा आणि स्वत:ची वेगळी जीवनशैली, सोबतच कोणतेही कौटुंबिक बंधन नाही, कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत आणि कोणाचाही हस्तक्षेप नाही. नोकरदार जोडपी त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे राहाते, त्यांच्या स्वत:च्या मर्जीनुसार, स्वत:चे जग तयार करते.
आजकाल, लवकर मुलं होण्याचा ट्रेंड संपला आहे. लग्नानंतर, त्यांना काही वर्षे जबाबदाऱ्या स्वीकारायला आवडत नाहीत. ते त्यांच्या करिअर आणि मौजमजेत इतके मग्न होतात की, कधीकधी परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरते, कारण करिअरमुळे वय वाढल्यानंतर लग्न होणे आणि मुलं न होणे, ही आजच्या काळात एक खूप गंभीर समस्या बनली आहे. एकटे राहाणाऱ्या आणि मुलं नसणाऱ्या तरुण जोडप्यांमध्ये तणाव वाढू लागतो. त्यांच्यासाठी या तणावातून जाणे खूप आव्हानात्मक असते. याचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर होतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे नवे अनुभव आणि समन्वयाचा अभाव यामुळे पती-पत्नीमधील नात्यात कटुता निर्माण होत आहे. लग्नानंतर संगीता आणि प्रवीण त्यांचे आयुष्य मोकळेपणाने जगत होते. मौजमजा, खाणे, रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे, हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता. काही काळानंतर, जेव्हा त्यांच्या मित्रांना मुलं झाली तेव्हा त्यांनी त्यांना भेटणे बंद केले.
जेव्हा मित्र त्यांच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त झाले, तेव्हा दोघांनीही स्वत:चे कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यशस्वी होऊ शकले नाहीत. जसे ते सांगतात की, वेळ कोणासाठीही थांबत नाही. दोघांनाही समजले की खूप उशीर झाला असावा, त्यामुळे परस्पर सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि संपूर्ण तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना औषधांसोबत महिन्याभरासाठी सूचना आणि पथ्य दिले, त्यामुळे त्यांच्या आशा जागवल्या. दोघांनीही सकारात्मक उर्जेने प्रयत्न करायला सुरुवात केली, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
दिवस महिन्यांत आणि महिने वर्षांत बदलत राहिले. दवाखान्याच्या फेऱ्या सुरूच होत्या. दरम्यान त्यांना शहरातील सर्वोत्तम डॉक्टर भेटले. त्यांनी दुसऱ्या शहरात आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पाहिला पण यश मिळाले नाही.
दोघांनाही नियमित सेक्सचा कंटाळा येऊ लागला. मूल नसल्याचा मानसिक ताण वाढू लागला, ज्यामुळे दोघेही एकमेकांवर आरोप करू लागले आणि एकमेकांना दोष देऊ लागले. ते कितीही थकलेले असले तरी त्यांच्यातील चर्चा अखेर मुलावर येऊन थांबायची.
मूल नसल्यामुळे, तणाव वाढू लागला जो एकमेकांना टोमणे मारणे, तसेच इतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येऊ लागला. दोघांचीही चिडचिड होत होती. निरोगी वातावरणाऐवजी घरातील वातावरण तणावाचे झाले. साधे बोलणेही मुलाच्या विषयावर येऊन थांबायचे. लोक काय बोलतील, समाज आपल्याला वांझवटे समजेल. संगीताचे आई न होण्याचे दु:ख इतके वाढले की, ती प्रवीणला दोष देऊ लागली. मनात नकारात्मकता वाढू लागली. तिने युट्यूब आणि गुगलवर मूल कसे होईल, याचे मार्ग शोधायला सुरुवात केली. प्रवीणला कशातच रस नसल्यासारखे वाटू लागले.
शेवटी, प्रवीण थकला आणि संगीताला म्हणाला की, आता बस झाले, मी या रोजच्या त्रासाला कंटाळलो आहे. तू मला किती टोमणे मारतेस? खूप पैसाही खर्च होत आहे. मीही तुझ्यासोबत कितीतरी दु:ख सहन करत आहे. तुला कुटुंबातील सदस्यही दोष देत नाहीत तरीही तू इतका त्रास का करून घेत आहेस?
मित्र आणि नातेवाईकांकडून दबाव
सामाजिक दबाव ही एक मोठी समस्या आहे, कारण प्रत्येक वर्तुळात मुलं असणे हे अजूनही गरजेचे मानले जाते. कुटुंब आणि मित्र देखील या विषयावर तुमचा तणाव वाढवू शकतात. सामाजिक भीती किंवा चुकीच्या बोलण्यातून नात्यात तणाव निर्माण करणे योग्य नाही.
राहुल आणि नेहा त्यांच्या कुटुंबापासून दूर दुसऱ्या शहरात, दिल्लीत राहातात. लग्नाच्या ६ वर्षांनंतरही त्यांना कोणतीही समस्या नव्हती. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि मित्र त्यांना मूल नसल्याबद्दल विचारू लागले आणि कुटुंब वाढवण्यास सांगू लागले. शेजारीही भेटल्यावर हसत तोच सल्ला देऊ लागले. नेहा हसून विषय टाळू लागली. एकदा तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले की, ‘‘जसे वय वाढेल तसे मूल होण्यात समस्या वाढू लागेल.’’
तेव्हा तिने सांगितले की, राहुलला मुलं आवडत नाहीत, त्यामुळे मी शेजारच्या मुलांसोबत खेळून वेळ घालवते.
आता तर घरातील सदस्यांनीही बोलणे बंद केले होते, त्यांचा दैनंदिन दिनक्रम नीरस होऊ लागला. मनात मुलाची इच्छा जागृत होऊ लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते बाळासाठी डॉक्टरांकडे गेले, पण काही उपयोग झाला नाही. आयुष्यात तणाव वाढू लागला आणि आरोग्यही बिघडू लागले.
मूल हवं असल्याच्या वाढत्या मानसिक ताणामुळे नेहाच्या चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तिला काही विशिष्ट दिवशी गर्भधारणेचा प्रयत्न करावा लागत होता, पण राहुल थकू लागला. रोज त्याच त्याच गप्पा आणि त्याच कामामुळे नेहाही थकली, तिला कंटाळा येऊ लागला. आरोप-प्रत्यारोप आणि टोमणेबाजी सुरू झाली, दोघांनाही शारीरिक दोष असल्याच्या न्यूनगंडाने ग्रासले. त्यांच्या आयुष्यात ढोंगी पुजारी आणि अंधश्रद्धेचा एक नवीन अध्याय सुरू झाला. खरंतर आई होणे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. हे एक सुंदर नाते आहे.
लोकांच्या बोलण्यापासून वाचण्यासाठी दोघांनीही सामाजिक जीवन जगणे बंद केले. सर्वांपासून दूर जाऊन, ते त्यांच्या ताणतणावाशी आणि निराशेशी लढू लागले. सुखी आयुष्य हातातून निसटू लागले. चांगले कपडे घालणे तर दूरच, त्यांच्या चेहऱ्यावरील खोल चिंतेचे भाव त्यांना समाधानाने जगूही देत नव्हते.
आर्थिक तसेच नातेसंबंधांचा दबाव
मुलांचे संगोपन करताना आर्थिक ताणही येतो. शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी पैशांचा अभाव तणावाचे कारण ठरू शकते.
अनु आणि मयंक दोघेही मुंबईत राहातात. दोघेही एका खासगी कंपनीत काम करतात. दोघांचाही पगार चांगला आहे, पण महानगरांमध्ये खर्चही कमी नाही. अशा परिस्थितीत, मूल झाल्याने त्यांच्या आर्थिक समस्या वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यही एकत्र राहात नाहीत, पूर्वी ते मूल होण्यासाठी प्रयत्न करत नव्हते आणि जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा खूप उशीर झाला होता.
मूल नसल्यामुळेही नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि ही समस्या पती-पत्नीमध्ये कटुता निर्माण करू शकते. त्यांनी त्याच्या मित्र- मैत्रिणींना भेटणे बंद केले. मनाची शांती नाहीशी झाली आणि नैराश्य येऊ लागले.
आज ५० टक्के तरुण जोडप्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. उशिरा होणारे लग्न आणि असंतुलित जीवनशैली, हे यामागचे कारण आहे. आजची जीवनशैली वंध्यत्वाचे सर्वात मोठे कारण आहे.
डॉ. हर्षा सांगतात की, हा ताण जीवनातील प्रत्येक समस्येचे मूळ आहे. जर तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असाल तर आनंदी हार्मोन्स बाहेर पडतील, जे गुणसूत्रांच्या मिलनात उपयुक्त ठरतात. तणावामुळे प्रजनन क्षमता कमी होते. यामुळे महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस होऊ शकतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते.
शरीराच्या इतर अवयवांवरही ताणतणावाचा परिणाम होतो. पुरेशी झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. झोपेचा अभाव शरीरात थकवा निर्माण करतो. त्याचवेळी, पुरुषांमध्ये झोपेचा अभावदेखील शुक्राणूंची संख्या कमी करतो. तीव्र ताणामुळे हार्मोन्समध्ये व्यत्यय येतो. ताणतणावामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसॉल वाढते, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
या ताणाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. तरुण जोडप्यांनी याची विशेष काळजी घ्यायला हवी. मूल न होण्याचे मुख्य कारण तणाव असू शकते.
प्रत्येक जोडप्याला मूल असणे आवश्यक नाही. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनाही या समस्येचा सामना करावा लागला आहे, परंतु तरीही त्यांनी त्यांचे जीवन सकारात्मक पद्धतीने जगले आहे.
कलाकार आणि यशस्वी जोडपी ज्यांना मुलं नाहीत किंवा काही कारणास्तव ती झाली नाहीत, ते सांगतात, हे खरं आहे की, लग्नानंतर मुलं झाली नाहीत तर नात्यात दुरावा निर्माण होतो, परंतु बॉलिवूडमध्ये अशी अनेक सेलिब्रिटी जोडपी आहेत ज्यांना मुलं नाहीत किंवा त्यांना ती नकोच होती. मूल नसले तरी त्यांचे आयुष्य प्रेमाने, एकमेकांबद्दलच्या आदराने आणि कायमचे एकत्र राहाण्याच्या इच्छांनी भरलेले आहे.
दिलीप कुमार आणि सायरा बानू, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात या परिस्थितीचा एकत्रितपणे सामना केला. जावेद अख्तर आणि शबाना आझामी यांनाही स्वत:ची मुलं नाहीत, पण तरीही त्यांच्या आयुष्यात शून्यता नाही. जावेद अख्तर यांना त्यांची पहिली पत्नी हिना इराणीपासून दोन मुलं आहेत, अनुपम खेर आणि किरण खेर हे त्यांच्या पहिल्या अयशस्वी लग्नानंतर जन्माला आले, पण त्यानंतर त्यांना मूल झाले नाही. मीना कुमारी आणि कमल अमरोही, साधना – आरके नय्यर, मधुबाला-किशोर कुमार, आशा भोसले आणि आरडी बर्मन ही काही प्रसिद्ध नावे आहेत ज्यांना एकतर मुलं नको होती किंवा काही कारणास्तव ती होऊ शकली नाहीत. सांगायचे तात्पर्य असे की, मुलांशिवायही त्यांच्या आयुष्यात शून्यता नव्हती, उलट ते त्यांचे जीवन समर्पणाने जगले. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मुलाला दत्तक घेतले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली.
तणावाचा सामना कसा करावा?
समजून घ्या आणि बोला : सर्वप्रथम, पती-पत्नीची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांच्या भावना लक्षात ठेवून मोकळेपणाने बोला. बोलताना, लक्षात ठेवा की, चर्चा फक्त मूल या एकाच विषयावर मर्यादित नसावी. एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवा, बाहेर जा, लोकांना भेटा, अशा गोष्टी करा, ज्या तुम्हाला आनंद देतील. हसत राहा आणि हसवत राहा, त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. हसणे आणि हसवणे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते.
आरोग्याकडे लक्ष द्या : जर तुम्ही तणावातून मुक्त होऊ शकत नसाल तर मानसिक आरोग्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. आहार आणि वेळेची विशेष काळजी घ्या. पौष्टिक आहार आणि चांगले विचार तुम्हाला तणावातून बाहेर काढतील.
परस्पर पाठिंबा आणि मदत : कुटुंबाकडून आणि मित्रांकडून पाठिंबा मिळवणे देखील उपयुक्त ठरू शकते. कुटुंबातील ज्येष्ठांचा अनुभव तणावातून मुक्त होण्यास मदत करू शकतो. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा तुमच्यात सकारात्मकता आणू शकतो. न्यूनगंडाने ग्रस्त होऊ नका. जर तुम्ही तुमच्या शहरापासून खूप दूर राहात असाल तर तुमच्या कुटुंबातील मुलांशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करा; त्यांचा सहवास तुम्हाला तणावातून मुक्त करेल.
आपापसातील प्रेम वाढवा : मुलांशिवायही तुम्ही आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकता. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवा, बाहेर फिरायला जा, चांगली पुस्तके वाचा, ज्यामुळे मन सकारात्मक होईल. मूल नसल्यामुळे नाते बिघडू देऊ नका, उलट यामुळे पती-पत्नीला एकमेकांसोबत घालवण्यासाठी जास्त वेळ मिळेल.
आरोग्याची काळजी : आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. ध्यानधारणा केल्याने आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवल्याने, तणावाची भावना कमी होते आणि मनात निरर्थक विचार येणे थांबते. यामुळे रक्तदाबही नीट राहातो. योग आणि ध्यान करा. तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या. मद्यपानाचे विष तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. तणाव टाळण्यासाठी औषधांचा आधार घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्याशी संबंधित सूचनांचे पालन करा. ज्यांना मुलं नाहीत त्यांच्याशी अधिक संवाद साधा. जर तुमच्या आजूबाजूला मुलं असतील किंवा असा कोणताही क्लब असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, कारण मुलांसोबत राहिल्याने ताण कमी होतो. तुमच्या जवळच्या मित्रांशी किंवा शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा, सामाजिकता वाढवा.





