कथा * कृष्णकुमार
हात-तोंड धुऊन झाल्यावर राजीव कल्पनासोबत जेवायला बसला, तेवढयात मोलकरीण बीना आत आली आणि म्हणाली, ‘‘साहेब, बाहेर एक गृहस्थ उभे आहेत, ते स्वत:ला बाईसाहेबांच्या ओळखीचे असल्याचे सांगतात.’’
‘‘तू त्याला सन्मानपूर्वक आता घेऊन का नाही आलीस? ही काय विचारायची गोष्ट होती का?’’ राजीवने ताटात भाजी घेत विचारले आणि कल्पनाकडे पाहिले.
कल्पनाला आश्चर्य वाटले. अंग थरथरल्यासारखे तिला वाटले. न कळवता अचानक कोण आले, असा प्रश्न तिला पडला.
‘‘नमस्कार,’’ पाहुण्याने असे म्हणताच कल्पना गोंधळली. ही व्यक्ती कधी आपल्या समोर येऊन उभी राहील, अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
मंद स्मित करत राजीव कल्पनाच्या चेहऱ्यावरचे विविध भाव काळजीपूर्वक न्याहाळत होता. घरी आलेला पाहुणा कल्पनाच्या परिचयातला आहे, एवढेच त्याच्यासाठी पुरेसे होते. तो सोफ्यावरून उठत उत्साहाने पुढे गेला, त्याने पाहुण्याशी हस्तांदोलन केले आणि त्याला सोफ्यावर आपल्या जवळच बसायला सांगत म्हणाला, ‘‘ये, तुझे स्वागत आहे.’’
‘‘धन्यवाद,’’ पाहुणा बसत म्हणाला.
कल्पना अजूनही त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहात होती.
तो उत्साही स्वरात म्हणाला, ‘‘कल्पना, हे काय ओळख करून देण्याऐवजी, मी भूत असल्यासारखे तू माझ्याकडे पाहात आहेस.’’
कल्पनाने ताबडतोब स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि हसण्याचा प्रयत्न करत ती राजीवला म्हणाली, ‘‘राजीव, हा माझा बालपणीचा मित्र आणि महाविद्यालयातील सोबती कमल आहे.’’
‘‘तुला भेटून आनंद झाला,’’ राजीव हसत कमलला म्हणाला.
‘‘आणि हा माझा वकील पती राजीव आहे,’’ कल्पना कमलला म्हणाली.
‘‘ओळखतो मी,’’ कमल हसत म्हणाला.
‘‘तू याला ओळखतोस, पण कसं?’’ कल्पनाच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले, तिचा चेहरा फिका पडला.
‘‘अरे, म्हणजे काय? हे काय विचारतेस?’’ कमल हसत म्हणाला, ‘‘विसरलीस का? तू मला पाठवलेल्या तुझ्या लग्न पत्रिकेवर तुमची नावं होती.’’
‘‘अरे, मी विसरले,’’ कल्पनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
‘‘विसरणे ही तुझी जुनी सवय आहे, हे मला चांगलं माहीत आहे,’’ कमल म्हणाला आणि कल्पनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तो हसत पुढे म्हणाला, ‘‘चहामध्ये साखर किंवा भाजीत मीठ आणि मिरपूड घालायला विसरल्याबद्दल काकूंकडून तुला शिव्या पडायच्या. मित्रांसोबत गप्पा मारताना वर्गात शिकवलेले तू विसरायचीस आणि नंतर घरी आल्यावर माझे डोकं खायचीस.’’
कल्पनाला कमलचा हा विनोद अजिबात आवडला नाही. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिच्यावर खोलवर परिणाम होत होता, पण प्रत्यक्षात ती राजीवसमोर तिच्या चेहरऱ्यावरचे हावभाव नियंत्रित करण्याचा अपयशी प्रयत्न करत होती. आपल्याला आयुष्यात एवढी मोठी परीक्षा द्यावी लागेल, याची कल्पनाही तिने कधी केली नव्हती.
‘‘कल्पना, असे वाटतेय की, कमलला तुझ्या सवयी चांगल्याच माहीत आहेत. म्हणूनच तू त्याला जेवणाचे आमंत्रण द्यायला विसरली होतीस का?’’ राजीवने हसत विचारले.
‘‘तू हिच्या बालपणीचा मित्र आहेस, त्यामुळे तू इथेच राहा, तुझी बॅग कुठे आहे?’’
कमल म्हणाला, ‘‘बॅग बाहेर टॅक्सीमध्येच आहे. मी टॅक्सीचे भाडे देऊन बॅग घेऊन येतो.’’
दोघे न जाणो का, पण कमलला चिडवायची संधी शोधत होते.
कल्पनाला तिने केलेल्या त्या चुकीची खूप लाज वाटत होती. सोबतच आपल्या जीवावर बेतले जात असताना राजीव त्याला घरी राहण्यास सांगत असल्यामुळे तिला राजीवचा राग आला. ते दोघे आपल्याला चिडवण्याची संधी शोधत आहेत. मनातील चिडचिड, भीती आणि लाजेची संमिश्र भावना दूर व्हावी म्हणून ती तिथून गुपचूप उठली आणि कमलसाठी खायला आणायला स्वयंपाकघरात गेली.
‘‘कंपनीच्या कामानिमित्त मी दिल्लीला आलो होतो. अचानक मला आठवलं की कल्पनाही दिल्लीत राहाते. त्यामुळेच मी इथे आलो,’’ कमल जरा जोरात म्हणाला आणि टॅक्सीचे पैसे द्यायला गेला.
खाण्याचे पदार्थ टेबलावर ठेवताना कमलने राजीवला सांगितलेले हे शब्द ऐकताच कल्पना अचानक थांबली आणि तिचे घाबरलेले हृदय आणखी वेगाने धडधडू लागले.
ती खूप अस्वस्थ झाली. कमलला येथे येण्याची काय गरज होती? त्याला दिल्लीत राहायला कितीतरी सुंदर जागा मिळू शकल्या असत्या. मी कमलचे काय बिघडवले होते की, तो माझ्या शांत जीवनात वादळ बनून आला आहे. अनेक प्रयत्नांनंतर मी ती गोष्ट विसरण्यात यशस्वी झाले होते. आता मला पुन्हा त्याच वेदनादायक परिस्थितीतून जावे लागेल. कमलमुळे राजीवला कधीही माझ्या पूर्वयुष्याची माहिती मिळू शकते. मग त्याच्या हृदयात आज जशी मला जागा आहे तशीच जागा मिळू शकेल का? माझे सुखी वैवाहिक आयुष्य विषारी भूतकाळापासून सुरक्षित राहील का?
तेवढयात कल्पनाला राजीवचा आवाज आला, कमल आला होता. राजीव म्हणत होता, ‘‘तू खूप छान केलेस. या निमित्ताने तुला भेटण्याची संधी मिळाली, नाहीतर आपण कधी भेटलो असतो की नाही कोणास ठाऊक, पण तू आमच्या लग्नाला का आला नाहीस?’’
‘‘तुमचं लग्न जूनमध्ये झालं होतं आणि त्या दिवसांत महाविद्यालय बंद असल्यामुळे मी माझ्या घरी बाजपूरला गेलो होतो. कल्पनाने मला लग्नाचे आमंत्रण पाठवले होते, पण माझ्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्यामुळे मी लग्नाला येऊ शकलो नाही,’’ कमलने उत्तरादाखल सांगितले.
‘‘माफ कर, हा विषय काढून मी उगाचच तुझे मन दुखावले,’’ राजीव खेदाच्या स्वरात म्हणाला.
‘‘काही हरकत नाही, माझ्या मते, निधन झालेल्याच्या आठवणीत अश्रू ढाळणे म्हणजे भावूकतेशिवाय दुसरे काही नाही,’’ कमल पूर्वीप्रमाणेच सहजतेने म्हणाला.
‘‘चला जेवायला, जेवण थंड होईल,’’ असे सांगत कल्पनाने त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणला.
कल्पनाला पाहाताच राजीवच्या ओठांवर पुन्हा खोडकर हसू उमटले.
‘‘अरे वा, स्वयंपाकात पारंगत झालेली दिसतेस. ही सर्व राजीवची कृपा दिसते,’’ कमलने मटर पुलावचा पहिला घास खात म्हटलं,
‘‘नाही भावा, मी वकील आहे, आचारी नाही,’’ राजीव हसत म्हणाला.
हे ऐकून कमल तर हसलाच, पण घाबरलेली आणि अपराधी भावनेने घेरलेली कल्पनाही क्षणभर सगळं विसरून हसली, पण पुढच्याच क्षणी ती पुन्हा गंभीर झाली, जणू हसून तिने गुन्हा केला होता.
जेवणातील प्रत्येक पदार्थाचा पहिला घास घेताच कमल त्या पदार्थाच्या चवीचे कौतुक करायला विसरला नाही. कल्पनाला आजही आठवतं होतं की, जेव्हा कधी त्याला चविष्ट खायला मिळायचं तेव्हा तो स्तुती करायचाच. विचारात हरवलेल्या कल्पनाला कमलला धन्यवाद म्हणायचेही सुचले नाही. जेवण झाल्यावर राजीव आणि कमल बाहेर बाल्कनीत ठेवलेल्या खुर्च्यांवर बसले. बिनाला कमलच्या गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिल्यावर कल्पनाही बाहेर आली. तिघांनी तिथेच कॉफी घेतली. दिवाणखान्यात रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरू होत्या. राजीव कल्पनाला सतत चिडवत होता. संधी मिळाल्यावर कमलही मागे राहिला नाही. कल्पनाला समजू शकले नाही की, ते दोघे तिला असा त्रास का देत आहेत?
औपचारिकता आणि सभ्यतेच्या दडपणाखाली तिला त्या दोघांबरोबर बसून राहण्यास भाग पाडले. कमलला त्याच्या खोलीत सोडल्यानंतर, राजीवसोबत पायऱ्या उतरताना, कल्पनाला तिच्या मनावरचे ओझे काही काळ हलके झाल्यासारखे वाटले, पण थोडया वेळाने त्याचे विचार तिला पुन्हा सतावू लागले.
ती ज्या खोलीत झोपली होती, त्याच्या वरच्या खोलीत एक पुरुष आहे, जो तिचे सुखी, शांत आणि हसतमुख वैवाहिक आयुष्य कधीही उद्धवस्त करू शकतो. या भावनेखाली दबलेली कल्पना राजीवजवळ झोपण्याच्या अयशस्वी प्रयत्नात पडून राहिली. वास्तविक, राजीवसोबत लग्न करण्यापूर्वी कल्पनाचा कमलसोबत लग्न करण्याचा विचार होता. दोघेही शेजारी असल्यामुळे सतत भेटत असले तरी त्यांच्यात कधी प्रेमाच्या गोष्टी झाल्या नव्हत्या. कमलने कधी तिचा हातही धरला नव्हता. पण, तिची मस्करी करणे, वेणी ओढणे, असे सुरू असायचे. तरीही त्यांच्यात मैत्री होती, प्रेम नाही. तो तिच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या ‘आय लव्ह यू’ मेसेजला ‘तू ग्रेट आहेस, सुंदर आहेस, तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस,’ अशी उडवाउडवीची उत्तरे देत असे.
कल्पनाच्या मैत्रिणी तिला अनेकदा सांगायच्या की, त्याला धरून ठेव नाहीतर तो उडून जाईल किंवा कोणीतरी त्याला उडवून नेईल. कल्पनालाही त्याच्या सारख्या देखण्या मुलाला कोण सोडेल, असा प्रश्न पडला होता, त्यामुळेच तिने एक दिवस एक धाडसी गोष्ट करण्याचा बेत आखला.
कमलचे घर जवळच होते, त्याचे पालक घरी कधी असतात आणि कधी नाही, हे तिला माहीत होते. एके दिवशी ते बाहेर गेले होते. तो घरी एकटाच होता. त्यावेळी कल्पनाने मागचा दरवाजा गुपचूप उघडून ठेवला. रात्री सगळे झोपलेले असताना ती उठली. तिने खूप सेक्सी अंडरवियर घातले होते आणि स्वत:ला शालने झाकले होते. रात्री १२ वाजता ती तिच्या घरातून निघाली आणि गुपचूप त्याच्या घराच्या मागच्या दाराने त्याच्या घरात शिरली. कमलच्या पलंगाकडे जाऊन तिने अंगावरची शाल काढली. कमल काळया पायजम्यात बनियन न घालता झोपला होता. तिने त्याला स्वत:च्या मिठीत ओढले. कमलला काय चालले आहे, ते समजण्याआधीच तिने त्याच्या मोबाईल मधून ४-५ फोटो काढले. त्यानंतर एक व्हिडीओही सुरू केला. तिला कमलवरचे आपले प्रेम व्यक्त करायचे होते, त्याला आपले सर्वस्व द्यायचे होते.
कमलने स्वत:ला सावरत लॅम्प लावला आणि कल्पनाला त्या अवस्थेत पाहून ओरडला. ‘‘शुद्धीवर ये, कल्पना… हे काय करतेस?’’
‘‘शुद्धीत तर तू नाहीस लाडक्या, मी इतके दिवस याच संधीच्या शोधात होते. तू तर मला थोडेही महत्त्व देत नाहीस. त्यामुळे माझ्यापुढे हा एकच मार्ग उरला होता, कमल,’’ कल्पना बेधुंद होत म्हणाली.
तिच्या कानाखाली मारून तिला धक्का देत कमल म्हणाला, ‘‘हा तुझा वेडेपणा आहे कल्पना. आपण चांगले मित्र असू शकतो, पण प्रेमी नाही. आपले लग्न होऊ शकत नाही, कारण तुझे आई-वडील माझ्यासारख्या कमी जातीच्या मुलाशी तुला लग्न करू देणार नाहीत. मी आपल्या मैत्रीवर तुझ्या या वेडेपणाची सावलीसुद्धा पडू देणार नाही. तू माझा जिवलग मैत्रीण आहेस आणि कायम राहशील, पण आता घरी जा, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर कल्पना. आपण बालपणीचे मित्र आहोत, आयुष्यभर तसेच राहू.’’
तितक्यात राजीव, न जाणो कोणता विचार करून हसला? कल्पनामध्ये अचानक झालेला बदल त्याच्यापासून लपला नव्हता. कमल आल्यापासून कल्पना काहीशी दबलेली, चिडलेली आणि घाबरलेली दिसत होती, असे त्याला वाटत होते, जणू काही तिला कमलचे येणे आवडले नव्हते किंवा त्याच्याकडून काही विशेष धोका होण्याची शक्यता होती.
त्याने आश्चर्य वाटल्यासारखे दाखवत कल्पनाला विचारले, ‘‘अगं, तू अजून झोपली नाहीस?’’
‘‘मला झोप का येत नाही, ते कळत नाही,’’ कल्पना त्याच्याकडे वळून म्हणाली, ‘‘लाइट बंद कर.’’
राजीवने हात पुढे केला आणि लाईट बंद करून नाईट बल्ब लावला. काही वेळ शांत राहिल्यावर तो पुन्हा म्हणाला, ‘‘कल्पना, कमल आल्यापासून तू जरा उदास, शांत आणि घाबरलेली दिसतेस. तुझा खेळकरपणा कुठे तरी नाहीसा झालाय. तुला त्याचे येणे आवडले नाही का?’’
‘‘नाही, तुला हे कोणी सांगितलं?’’ स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाही कल्पनाला धक्का बसला.
‘‘कमलला पाहताच तुझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग, डोळयातले आश्चर्य आणि पापण्या न लवता एकटक पाहाणे, ही सर्व लक्षणे याचेच द्योतक नाहीत का?’’ राजीवने विचारले.
‘‘कोणताही जुना ओळखीचा किंवा एखादा मित्र अचानक समोर आल्यावर असेच वाटणार ना?’’
‘‘बरं, जाऊ दे, मी काही बोलू का?’’ राजीव सहज म्हणाला, खरं तर कल्पनाला असा मुद्दा मांडताना पाहून त्याच्यातील खोडसाळपणा पुन्हा जागा झाला होता.
‘‘सांग,’’ कल्पना म्हणाली.
‘‘कमल माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे, शिवाय तुझं बालपण आणि महाविद्यालयीन जीवनही त्याच्यासोबत गेलं आहे.’’
कल्पनाला त्याच्या बोलण्यामागचा अर्थ समजला नाही. त्यामुळे ती गप्प राहिली.
‘‘माझ्यापेक्षा तुला आणि कमलचा जोडा जास्त शोभला असता.’’
कल्पना स्तब्ध झाली. आश्चर्य आणि भीतीमुळे हृदयाची धडधड वाढलेली कल्पना डोळे विस्फारून राजीवकडे बघतच राहिली. नाईट बल्ब राजीवच्या मागे असल्याने, अंधारात लपलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू न शकल्यामुळे तिला योग्य अंदाज लावता येत नव्हता. याला पतीचा खेळकरपणा समजायचे की स्पष्टवक्तेपणा? की मग आपल्या आणि कमलच्या भूतकाळातील नातेसंबंधांवरचा राजीवचा टोमणा, हेच तिला समजत नव्हते. पुन्हा एकदा ती भीती, संशय आणि अपराधीपणाच्या विचित्र अवस्थेत अडकली होती. राजीवला तिचे आणि कमलचे पूर्वीचे संबंध समजले असतील तर पुढे काय होईल, या नुसत्या विचारानेही तिच्या अंगावर काटा आला. तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले.
‘‘नाराज झालीस का?’’ राजीवने हसत विचारले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या बल्बच्या अंधुक प्रकाशात तिच्या डोळयात पाहाण्याचा तो प्रयत्न करू लागला.
‘‘नाही,’’ कल्पना स्वत:ची नजर चोरत बळजबरीने हसत म्हणाली.
‘‘ठीक आहे, झोप आता. रात्र बरीच झाली आहे.’’
‘‘हो,’’ असं म्हणत राजीवने पापण्या मिटल्या.
तो कधी गाढ झोपी गेला ते कल्पनाला समजलं नाही. थकलेल्या कल्पनालाही झोपावेसे वाटत होते, पण झोप तिच्या डोळयांपासून कोसो दूर होती. झोपेऐवजी भूतकाळातील आठवणी बंद पापण्यांमधून डोकावत होत्या.
कल्पना ही मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. वडील कृष्णगोपाल यांचे खेळण्यांचे दुकान होते. त्यांचे शेजारी घनश्यामलाल हे कमलचे सख्खे मामा होते. घनश्यामलाल यांच्या शहरात दुधाच्या अनेक डेअरी होत्या. त्यांच्याकडे खूप चांगले काम होते. ते खूप शिकलेले होते.
कल्पना कमलला लहानपणापासूनच ओळखत होती. दरवर्षी उन्हाळयाची सुट्टी नैनीतालला घालवण्याच्या निमित्ताने कमलचे कुटुंब घनश्यामलालकडे येऊन राहायचे. दोन्ही घरांना एकच अंगण होते. ती, कमल आणि इतर दोन भाऊ-बहिणी एकत्र लपाछपी खेळत. ती त्यांच्यासोबतच खेळायला बसायची. दिवस-रात्र कधीही त्यांच्या मोठया खाटेवर जाऊन बसायची, जिथे कमल आणि तिचे लहान भाऊ-बहीण झोपायचे. ती न लाजता त्यांच्यासोबत जाऊन झोपायची.
काही दिवसांनंतर कमलने कल्पनासोबतच महाविद्यालयीन जीवनात पदार्पण केले. कमलच्या मामा-मामीला मुलं नसल्यामुळे त्यांनी कमलला हॉस्टेलमध्ये न राहता आपल्या जवळच राहण्यासाठी तयार केले. दोघे एकत्र महाविद्यालयात जायचे. एकत्र घरी यायचे. त्याचे वडील आणि कामलच्या मामांचे घरोब्याचे संबंध असल्यामुळे महाविद्यालय किंवा घरी कमल आणि कल्पना एकमेकांना बिनधास्त भेटू शकत होते.
अनेकदा कल्पनाची आई तिच्या वडिलांना दबक्या स्वरात म्हणायची, ‘‘बघा, दोघांची जोडी किती छान दिसते, पण…’’
कल्पना त्यावेळी जाणती झाली होती. आईच्या या विधानाने तिच्या मनातील कमलबद्दलचा आपलेपणा आणखीनच दृढ होत गेला, कमल आपलाच जीवनसाथी बनेल यावर तिला पूर्ण विश्वास होता, पण तिला आईच्या ‘पण’ असे बोलण्यामागचा अर्थ समजू शकला नव्हता.
बी.ए.ची परीक्षा संपताच, कमल मामा-मामीचा निरोप घेऊन आई-वडिलांच्या घरी गेला. निघताना त्याने तिला वचन दिले की, तो लवकरच आपल्या कुटुंबासह परत येईल. कमल गेल्यानंतर पहिल्यांदाच कमलशिवाय नैनीलालच्या प्रत्येक गोष्टीचं आणि ठिकाणाचं आकर्षण मावळल्यासारखं तिला वाटू लागलं. ती स्वत:ला अस्तित्वहीन समजू लागली होती.
तिसऱ्या दिवशी तिला कमलचे पत्र मिळाले. पत्र वाचताना तिच्या चेहऱ्यावरचे दु:ख वाढत गेले. कमलने लिहिले होते की, आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याचे कुटुंब यावर्षी नैनितालला येऊ शकणार नाही. दिलेले आश्वासन पूर्ण करू न शकल्याची खंतही त्याने व्यक्त केली होती.
ती रडतच घरी आली. दुसऱ्याच दिवशी कमलच्या आजीचे निधन झाल्यामुळे कमल आणि त्याचे आई-वडील बाजपूरला गेल्याचे तिला समजले. कमल पुन्हा परतला नाही, त्याचे मेसेज पूर्वीसारखेच येत राहिले, कल्पनाला माहीत होते की, तिचे साहस कमलच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहे, त्यामुळेच ती शांत होती.
काही दिवसांनी जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे कल्पनासाठी राजीवचे स्थळ आले तेव्हा त्यांनी लगेच लग्नाला होकार दिला आणि कमलला आमंत्रणही पाठवले. कमलने मेसेजही केला की, तो येईन आणि भेट म्हणून तिला तो मोबाईल देईल, पण तो लग्नाला आला नाही. त्यामुळे कमल आपले ते धाडसी कृत्य सर्वांसमोर आणेल, अशी भीती कल्पनाला सतत वाटत होती. त्याचं अचानक येणं आणि इतकं बिनधास्तपणे तिला भेटणं तिच्यासाठी भीतीदायक होतं.
राजीवने कायद्याची पदवी उत्तीर्ण केल्यानंतर प्रॅक्टिस सुरू केली. दोन्ही घरचे आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले आणि लग्नादरम्यान ती शांततेची दगडी मूर्ती बनून राहिली. तिने कोणताही आक्षेप घेतला नाही, उलट कमलला हेवा वाटावा म्हणून तिने तिची लग्नपत्रिकाही त्याला पाठवली होती, पण कमल गेलाच नाही. त्याचे पत्र आले होते. त्याने लिहिले होते:
‘‘कल्पना’’
‘‘तुझ्या लग्नाला येऊन मला खूप आनंद झाला असता, पण हृदयविकाराने त्रस्त असलेल्या माझ्या आईच्या आकस्मिक निधनामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. माझी असहायता समजून घेऊन मी न येण्याबद्दल तू मला माफ कर. माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत असतील.
‘‘कमल’’
पत्रात आधीच्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही, हे पाहून तिने अचानक थंड मनाने विचार केला की, प्रत्यक्षात ती कमलबद्दलच्या गैरसमजाची शिकार झाली आहे का? कमल त्याच्या जागी बरोबर असण्याची शक्यता आहे. त्याने तिला मैत्रिणीपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही. तिच्या मनात जागृत झालेल्या या विचारांनी त्यावेळी कमलबद्दलचा सर्व द्वेष तिने मनातून काढून टाकला होता. आता कमलविरुद्ध तिची कोणतीही तक्रार नव्हती. औपचारिकता म्हणून तिने कमललां माफी मागणारे पत्रही लिहिले होते.
राजीवच्या सान्निध्यात एक वर्ष कसे निघून गेले ते तिला कळले देखील नाही, पण आज अचानक खूप दिवसांनी कमल तिच्या समोर आला आणि तिच्या मनाच्या शांत तळयात पुन्हा एकदा खळबळ उडाली. तिच्या विचारांच्या लहरींनी वादळी रूप धारण केले होते. तिच्या मनात भीती आणि अपराधीपणाने घर केले होते, जर राजीवला समजले की, तिच्या महाविद्यालयीन दिवसात तिने कमलसोबत एकमेकांचे जीवनसाथी होण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याने मात्र तिचे प्रेम नाकारले होते. त्यामुळे तिला त्याच्या नजरेतून उतरल्यासारखे झाले होते. कदाचित तो व्हिडीओ त्याच्याकडे असेल आणि त्याच्या मोबदल्यात तो पैशांची मागणी करेल. अशा परिस्थितीत तिचे सुखी आणि शांत वैवाहिक जीवन उद्धवस्त होईल आणि ती ते सहन करू शकेल का?
‘‘नाही, असं कधीच घडणार नाही,’’ थरथरत्या ओठांनी ती स्वत:शीच पुटपुटली.
‘‘अगं, तू अजून झोपली नाहीस?’’ अचानक राजीवला जाग आली.
‘‘मला सांग, कमलचे येणे मला आवडले नाही हे तुला कसं समजलं?’’
‘‘जाऊ दे, तुला वाईट वाटेल.’’
‘‘नाही वाईट वाटणार, तू सांग.’’
‘‘कमल माझ्यासाठी अनोळखी नाही. आम्ही दोघे जुने मित्र आहोत.’’
‘‘मग तुला सगळं माहीत आहे का?’’
‘‘हो कल्पना, मला सगळं माहीत आहे. खरं सांगायचं तर आपलं लग्न कमलच्या मध्यस्तीमुळेच झालं आहे,’’ राजीवने आणखी एक खुलासा केला.
‘‘काय?’’ कल्पनाचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले.
‘‘हो, ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा तुझे स्थळ मला आले होते. कमल बाजपूरला होता. आईच्या आजारपणमुळे तो नैनितालला जाऊ शकला नाही. काही दिवसांपूर्वी मी त्याला एक पत्र पाठवले होते, त्यात लिहिले होते, ‘‘मित्रा, तू नैनितालमध्ये शिकतोस. या मुलीबद्दल महिती देशील का? उत्तरादाखल त्याने लिहिले की, ही मुलगी माझ्यासोबतच शिकते. मी तिला खूप चांगले ओळखतो.’’
‘‘तुला फक्त स्तुती ऐकून न पाहताही मला तू आवडली होतीस. त्याने माझ्यापासून काहीही लपवले नाही. तुमच्या बालपणीच्या गोष्टी, तारुण्यातला सहवास, तुझा त्याच्याबद्दलचा गैरसमज, त्याने मला सर्व सविस्तर सांगितले होते,’’ असं म्हणत राजीव कल्पनाला न्याहाळू लागला.
‘‘पण तू आजपर्यंत हे सगळं माझ्यापासून का लपवून ठेवलंस?’’ कल्पनाने विचारले.
‘‘तुला लाजल्यासरखे वाटू नये म्हणून.’’
‘‘आणि आज संध्याकाळी जे नाटक केलंस त्याची काय गरज होती?’’
‘‘अगं,’’ राजीव हसला आणि खूप वेळ हसत राहिला. मग म्हणाला, ‘‘कमल आज दुपारी अचानक माझ्या कार्यालयात आला होता. मग मला वाटलं, थोडी गंमत करावी. मी त्याला गळ घातली की, अचानक त्याने तुझ्या समोर यावं आणि आम्ही दोघे पहिल्यांदाच भेटतोय, असं भासवावं.’’
‘‘तुला असं वाटलं नाही की, तुझी ही मस्करी एखाद्याचा जीव धोक्यात घालेल?’’ चेहऱ्यावर कृत्रिम राग आणत कल्पना म्हणाली.
‘‘प्रिये, मस्करी? ती कुठे रोज केली जाते?’’ राजीव हसत म्हणाला आणि मग त्याने कल्पनाला ओढून घेत मिठी मारली.
कल्पनाच्या डोळयांतून आनंदाश्रूंच्या रूपात भीती आणि अपराधीपणाची भावना वाहू लागली आणि राजीवचा शर्ट भिजवू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव आपल्या अशिलासोबत बसला होता तेव्हा कमलने कल्पनाला एक पाकीट दिले आणि म्हणाला, ‘‘ही तुझी वस्तू मी तुला परत करतोय. ती नष्ट कर. तुझ्या मनात कधीही शंका येऊ नये म्हणून मी ही सांभाळून ठेवली होती. आपण मित्र आहोत आणि कायम राहू आणि ही घे माझ्या लग्नाची पत्रिका. मी आमंत्रण द्यायलाच आलो होतो. तुम्ही दोघे मुंबईत माझ्या लग्नाला या. या व्हिडीओला सोडून शीतलला आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे. राजीवने लग्नाला यायला आधीच होकार दिला आहे, पण माझा तुझ्यावर जास्त हक्क आहे, म्हणून ही पत्रिका आणि मिठाई घे,’’ असे म्हणत त्याने कल्पनाच्या कपाळाचे चुंबन घेतले.
कल्पनाला हा क्षण अप्रतिम वाटला, त्या दिवसापासून तिच्या मनावरचे त्या वेडेपणाचे ओझे दूर झाले.