कथा * पूनम अहमद

हाईड पार्क सोसायटी ही ठाण्यातील उच्चभ्रू परिसरात वसलेली आहे. तेथील लोक स्वत:ला सुसंस्कृत, सभ्य, आधुनिक आणि श्रीमंत समजतात, पण अपवाद सर्वत्र असतात आणि इथेही वरकरणी राहणीमान पाहून कधीकधी असे वाटते की कुटुंब खूप चांगली, सुसंस्कृत आहेत, पण जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होते. अशाच प्रकारे जेव्हा दोन कुटुंबांचे विक्षिप्त रूप समोर आले तेव्हा येथील रहिवाशांना त्यांचे काय करायचे, हसायचे की त्यांना रोखायचे? हेच समजेनासे झाले. रोहित, त्याची पत्नी सुधा हे मुली सोनिका आणि मोनिकासह इमारत क्रमांक ९ मधील ८०४ नंबरच्या फ्लॅटमध्ये राहात होते.

त्यांच्या समोरच्या ८०५ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आलोक, त्याची पत्नी मीरा आणि मुलगा शिवीन राहात होते. एकेकाळी दोन्ही कुटुंबात चांगली मैत्री होती. दोघांची मुले एकाच शाळा-महाविद्यालयात शिकत होती.

दोन्ही जोडपी खूपच हट्टी, गर्विष्ठ आणि रागिष्ट होती. या कुटुंबांमध्ये जी काही मैत्री होती ती केवळ त्यांच्या लाडक्या, हुशार मुलांमुळे होती. वर्षभरापूर्वी शिवीन आणि सोनिका दोघेही पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. मोनिका मुंबईतच फॅशन डिझायनिंग करू लागली. सर्व काही ठीक चालले होते की, सोसायटीतील काही लोकांनी त्यांच्या समोरचे रिकामी फ्लॅट विकत घेतले. त्यामुळे त्यांचे घर अधिकच आलिशान झाले. या दोन्ही जोडप्यांनाही वाटले की, त्यांनाही समोरचा फ्लॅट मिळाला तर त्यांचे घरही खूप मोठे होईल.

एके दिवशी सोसायटीची मीटिंग सुरू असताना रोहितने आलोकला विचारले, ‘‘तुम्हाला तुमचा फ्लॅट विकायचा आहे का?’’

‘‘नाही भाऊ, मी का विकू…’’

‘‘तुम्हाला विकायचा असेल तर सांगा, आम्ही खरेदी करू.’’

‘‘तुम्हालाही कधी तुमचा फ्लॅट विकायचाच असेल तर आम्हाला सांगा, आम्ही खरेदी करू.’’

‘‘आम्ही कुठेही जाणार नाही, इथेच राहू.’’

‘‘तरीही, जाणार असाल तर आम्हालाच सांगा. आजकाल आजूबाजूला चांगल्या सोसायटया उभारल्या जात आहेत. तुम्ही तिथे मोठा फ्लॅट घेऊ शकता.

‘‘तुम्हाला तिथला मोठा फ्लॅट स्वत:साठी का दिसत नाही?’’

‘‘आम्हाला हीच सोसायटी आवडते.’’

त्या दोघांचे बोलणे एवढयावरच थांबले नाही. ऐकणाऱ्या लोकांना त्या दोघांच्या बोलण्यातला कडवटपणा जाणवला. घरी गेल्यावर रोहित सुधाला म्हणाला, ‘‘मी या आलोकला इथून हाकलून लावणारच, तो स्वत:ला काय समजतो?’’

दुसरीकडे आलोकही रागावत पत्नीला म्हणाला, ‘‘मीरा, तो मला पुरता ओळखत नाही. बघ मी त्याला इथून कसा बाहेर काढतो.’’

दुसऱ्या दिवशी दोघेही लिफ्टमध्ये भेटले, दोघांनी नुसतेच एकमेकांकडे पाहिले, नेहमीप्रमाणे बोलणे झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मोनिका सायकल चालवायला निघाली तेव्हा सायकलच्या नळया कापलेल्या पाहिल्यावर ती सुरक्षारक्षकाला ओरडू लागली, ‘‘हे कोणी केलेय?’’

‘‘ताई, बाहेरून कोणी आलेले नाही,’’ त्याने सांगितले.

‘‘मग माझ्या सायकलची ही अवस्था कोणी केली?’’

सुरक्षारक्षक ओरडा खात राहिला. तो पूर्ण वेळ तिथेच होता. सायकलचे जाणूनबुजून नुकसान केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. मोनिका घरी जाऊन कटकट करत राहिली, हे कोणी केले समजले नाही. दुसरीकडे, आलोक स्वत:वरच खुश होता की, रोहित बाबू, मी तुम्हा सर्वांचे काय हाल करतो ते बघाच.

जेव्हा २ धूर्त लोक समोरासमोर राहातात तेव्हा कुठलीही कृती एकमेकांपासून लपवता येत नाही, दोघेही एकमेकांची चलाखी लगेच पकडतात. येथेही रोहितला समजले की, बाहेरच्या कोणीही येऊन मोनिकाच्या सायकलचे नुकसान केले नाही, ती व्यक्ती त्याच इमारतीतील रहिवासी आहे. पूर्ण संशय आलोकवर होता आणि तो खराही होता. ते विचार करू लागले की, तो आता आपल्याला असाच त्रास देणार. मी त्याला बरोबरच करतो. रोहित सकाळी लवकर उठला आणि त्याने आलोकच्या फ्लॅटबाहेर कचऱ्याचा डबा अशा प्रकारे ठेवला की, दार उघडताच डबा उपडी होऊन कचरा सर्वत्र पसरेल.

आलोक आणि मीरा सकाळी फेरफटका मारायला जायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात होता. सकाळी आलोकने दरवाजा उघडला तेव्हा कचरा पसरला होता. ते कोणाचे काम आहे हे त्याला समजले. लगेचच त्याने रोहितच्या दारावरची घंटा एकदा नाही तर अनेकदा वाजवली. रोहितने रात्रीच दारावरची घंटा बंद करून ठेवली होती. रोहित रागाने ओरडत आलोकला पाहात होता. त्या मजल्यावरील आणखी दोन फ्लॅटमध्ये अविवाहित मुले राहायची. त्यांनी दरवाजा उघडला आणि आलोकला विचारले, ‘‘काय झाले काका?’’

हे बघा, किती बिनधास्त आहेत. कचऱ्याचा डबा कसा ठेवलाय?

त्या मुलांना या गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता, त्यांनी फक्त मान हलवली आणि ‘‘काका, तुम्हीच बघून घ्या, आम्ही भाडेकरू आहोत,’’ असे म्हणत दरवाजा बंद केला.

शिविन आणि सोनिका लंडनमधील साऊथ हॉलमध्ये हात हातात घालून बिनधास्त चालत होते. सोनिकाला महाविद्यालयात पारंपारिक दिवस साजरा करायचा होता आणि त्यासाठी सूट सलवार घालायचा होता. या भागात आल्यावर ट्रेनमधून उतरताच पंजाबमध्ये आल्यासारखे वाटायचे, कारण संपूर्ण परिसर पंजाबी होता. भारतीय वस्तूंची दुकाने वगैरे सर्व काही इथे होते.

सोनिका म्हणाली, ‘‘शिवू, आधी रोड कॅफेत बसून छोलेभटुरे खाऊया, मग कपडे घेऊ.’’

‘‘हो, नक्कीच, हा रोड कॅफे आपल्या प्रेमाची साक्ष आहे, येथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना?’’

सोनिका हसून म्हणाली, ‘‘हो, खरंच.’’

दोघांनीही ऑर्डर दिली आणि एक कोपरा शोधून बसले. शिवीन म्हणाला, ‘‘फक्त चांगल्या ठिकाणी नोकरी लागली की मग लग्न करू.’’

‘‘हो तुझे बरोबर आहे, पण घरातल्यांचे काय? मला नाही वाटत की, तुझे घरचे परजातीच्या मुलीला स्वीकारतील.’’

‘‘नको, स्वीकारू दे. आपले लग्न होणारच. तू माझे बालपणीचे प्रेम आहेस, त्यांना माहीत नाही की, आपण इथे लिव्ह इन मध्ये राहतोय, वेळ आल्यावर मी त्यांच्याशी बोलेन.’’

शिवीन आणि सोनिकाचे एकमेकांवर खूप प्रेम होते तर दुसरीकडे लंडनमध्ये काय चालले आहे याची भारतात कोणालाच कल्पना नव्हती. सुरुवातीला दोघेही काही दिवस इतर मित्रांसोबत खोली भाडयाने घेऊन राहात होते. त्यानंतर एके दिवशी दोघे इथल्या रोड कॅफेमध्ये अचानक भेटले आणि तेव्हापासून एकत्र राहू लागले.

भारतात जे दोघेही एकमेकांना बोलू शकले नव्हते, ते त्यांनी इथे येऊन सांगितले की, दोघेही एकमेकांना नेहमीच पसंत करत होते. आता दोघेही या नात्यात खूप पुढे निघून गेले होते. दोघांच्याही आईवडिलांनी अभ्यासात व्यत्यय येऊ म्हणून आपापसातील भांडणाबद्दल परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलांना काहीही सांगितले नव्हते. तिकडे मुले त्यांच्यापेक्षा हुशार निघाली.

रोहित आणि आलोक दोघेही याच प्रयत्नात होते की, कंटाळून का होईना, समोरचे फ्लॅट सोडून जातील, पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होते. रोज नवनवीन योजना आखल्या जात होत्या. कधी दारावर टांगलेल्या दुधाच्या दोन पिशव्यांमधील एक पिशवी गायब व्हायची तर कधी दुधाच्या पाकिटाला छिद्र पाडून सर्व दूध वाया घालवले जायचे. पसरलेल्या दुधामधून वाट काढत पायऱ्या उतरून येणारे लोक दोन्ही कुटुंबांच्या नावाने तोंडातल्या तोंडात पुटपुटत निघून जायचे. काय चालले आहे, ते सगळयांना कळून चुकले होते.

दोघेही रोज समितीच्या कार्यालयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत. दोघेही इतक्या सफाईने कुरापती करत की, कोणी काय केले, याचा पुरावा कोणालाच मिळत नव्हता.

रोज काहीतरी नवीन योजना आखली जायची. दोघेही अतिशय खालच्या पातळीवर उतरले होते. मीराला झुरळांची खूप भीती वाटते हे सुधाला माहीत होते, म्हणून सुधाने घराबाहेर फिरणाऱ्या झुरळाला कागदात पकडून मीराच्या दाराच्या आत सोडले. मीराचे दार उघडे होते, मोलकरीण काम करत होती, तिने ते पाहिले. यावेळी पुरावा समोर होता.

आलोकने थेट पोलीस ठाण्यात जाऊन सुधाची तक्रार केली. सोबत मोलकरणीला नेले. मोलकरीण घाबरली होती, पण मीराने विनवणी केल्यामुळे ती तिच्यासोबत गेली. थोडीफार कायदेशीर कारवाई झाली आणि रोहित तसेच सुधाला इशारा देऊन सोडून देण्यात आले.

सोसायटीत राहणारे लोक त्रासून आश्चर्याने सर्व पाहात होते. फ्लॅट मोठा करण्यासाठी दोघे एकमेकांना त्रास देत होते. दोन्ही कुटुंब इतकी हट्टाला पेटली होते की, ती बातमी लंडनपर्यंत पोहोचली. सोनिका आणि शिवीनने डोक्याला हात लावला. दोघेही फोनवरून आईवडिलांना समजावत होते, पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता.

सोनिका म्हणाली, ‘‘अरे, आता आपले काय होणार?’’

‘‘काळजी करू नकोस, आपले आईवडील खूप चुकीचे वागत आहेत, पण आपण त्यांच्यामध्ये पडायचे नाही. ते हा मूर्खपणा का करत आहेत तेच समजेनासे झाले आहे. आतापर्यंत स्वत:ची तब्येत आणि एकाकीपणाचे ते रडगाणे गायचे आणि आता अचानक वाद घालायला एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये कुठून आली?’’

मुंबईतल्या दोन्ही घरातले वातावरण तापले होते. दोन्ही कुटुंब आपापल्या परीने एकमेकांचे नुकसान करत होते. आता ते सोनिका आणि शिवीनला रात्री व्हिडिओ कॉलवर सर्व काही सांगू लागले. शिवीन एकुलता एक मुलगा होता. आलोक आणि मीरा त्याला सर्व सांगून मन हलके करत असत. सोनिका आणि शिवीन उदास झाले होते. खूप वाईट घडत होते. भविष्यात दोन्ही कुटुंब एकमेकांचा आधार बनतील.

शिवीन अतिशय गंभीर चेहरा करत म्हणाला, ‘‘सोनू, तिथे दोघांनी एकमेकांचे मोठे काही नुकसान करण्याआधी त्यांना थांबवायला हवे. मी विचार करतोय की, आपण त्यांना आपले नाते सांगू, कदाचित त्याचा त्यांच्यावर काहीतरी परिणाम होईल.’’

‘‘ठीक आहे, प्रयत्न करून बघूया, आता आपल्याबद्दल सांगूनच टाकूयात.’’

त्याच दिवशी दोघेही आपापल्या घरच्यांसोबत व्हिडीओ कॉल करत असताना दोघांनीही स्पष्टपणे सांगितले की, ‘‘तुम्ही तुमच्यातील भांडण इथेच थांबवा, कारण नोकरी मिळताच आम्ही लग्न करणार आहोत आणि आम्ही आताही एकत्रच राहात आहोत. खूप विचार करून आम्ही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केली आहे. आमचा निर्णय बदलणार नाही. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा. आमच्यात प्रेम आहे, ते कायम राहील.’’

दोन्ही कुटुंबात अचानक शांतता पसरली. सर्व गप्प बसून होते. कोणी कोणाशीही बोलत नव्हते. बरेच दिवस दोन्ही बाजूंनी शांतता होती. कोणी कोणाला त्रास दिला नाही. सोनिका आणि शिवीनने घरच्यांशी बोलणे बंद केले होते. आईवडिलांना त्यांनी विचार करायला पूर्ण वेळ दिला. मोनिका सतत सोनिकाच्या संपर्कात होती, दोन्ही कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती.

तीन दिवसांनी सोनिकाचे कुटुंबीय सोनिकाशी बोलत होते. रोहित म्हणाला, ‘‘माणूस स्वत:च्या मुलांपुढे हार पत्करतो, आम्ही आणखी काय करू शकतो? तू ती तिला पाहिजे तसे वागू शकते.’’

मोनिका हसली, ‘‘बाबा, यात कुठलाही जयपराजय नाही, हे प्रेम आहे.’’

दुसरीकडे मीरा हसत शिवीनला म्हणाली, ‘‘ठीक आहे जर प्रेम असेल तर आम्ही करूच काय शकतो? सर्व बोलणेच संपले.’’

फोन ठेवल्यानंतर शिवीन आणि सोनिका गप्पा मारत एकमेकांच्या मिठीत हरवून गेले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...