* मदन कोथुनियां

लग्नात प्रामाणिकपणा हा पाया आहे, पण आपण तो ढासळल्यानंतरही लग्न टिकवण्यावर विश्वास ठेवतो. आपल्या न्यायसंस्था, समाज सर्वच लग्न वाचवण्यावर विश्वास ठेवतात, कारण सर्व मतभेदांनंतरही सकाळी भांडणारे पती-पत्नी संध्याकाळी एक होतात. कितीतरी जोडपी घटस्फोटाच्या सीमारेषेला स्पर्श केल्यानंतरही असे एक होतात की त्यांनी कधी वेगळे होण्याचा विचार केला होता हे जाणवतही नाही.

महिमाचे आईवडील तिच्यासाठी मुलगा बघत होते. पण तिला मुलगी बघण्याचा पारंपरिक कार्यक्रम मान्य नव्हता. मात्र लग्न म्हटले की दोन कुटुंबांचे, दोन जीवांचे मिलन असते हे तिला माहीत होते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती एका नातेवाईकाच्या लग्नात भेटायचे ठरले. पुढे या भेटी हॉटेल्स आणि घरातही झाल्या. दोघांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतल्यानंतर रीतिरिवाजानुसार त्यांचे लग्न झाले.

आता जोडीदाराची निवड समान मानसिकता आणि विचारधारेनुसार होऊ लागली आहे. तरुणाई आपली आवड, विचार यांसह दोन्ही कुटुंबांच्या आवडीचाही विचार  करू लागली आहे. आता परिस्थिती अगदी बिकट असेल तरच पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला जातो.

जयपूरमध्ये मॅट्रिमोनियल एजन्सी चालवणाऱ्या श्वेता विश्नोई सांगतात, ‘‘आवडीचाच जोडीदार हवा यावर ठाम राहायला तरुणाई शिकली आहे. आता लग्नाची व्याख्याही आपोआप बदलत आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांचे सखा, मित्र, प्रेमी आहेत. अशा बदलांमुळे विवाह संस्थेचे अस्तित्व टिकून राहील शिवाय अन्य संबंध त्यांना कधीच वेगळे करू शकणार नाही.’’

लग्नानंतर आठ वर्षांनी एका अपघातात राजेशच्या पत्नीच्या जवळपास सर्वच शरीराला लकवा मारला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले लहान होती. त्यांना आईची खूप गरज होती. राजेशने आपली जबाबदारी ओळखत उपचार आणि सेवा करून पत्नीला इतके बरे केले की ती मुलांशी बोलू शकेल. त्यांच्या लहानसहान गोष्टींवर लक्ष ठेवू शकेल. भलेही येथे राजेशची शारीरिक गरज दुय्यम होऊन गेली, पण यातून हे सिद्ध होते की पत्नी आणि मुलांप्रतीच्या या जबाबदारीची भावना लग्न संस्थेत प्रवेश करताच निर्माण होऊ लागते.

विवाहामुळे पती-पत्नीच्या शारीरिक आणि मानसिक गरजांची पूर्तता होते. जी समाजात कायदा सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी गरजेची आहे. याच्या नसण्याने समाज मुक्त यौन संबंधांच्या चिखलात अडकला असता. लग्न पती-पत्नीच्या रूपात स्त्री आणि पुरुषाला यौन, आर्थिक आणि अन्य अधिकारांची सामाजिक व कायदेशीर मान्यता देते. वैवाहिक संबंधातून जन्मलेले मूल वैध आणि कायदेशीर मान्यता मिळालेले असते. यातून त्याचे अधिकार आणि कर्तव्य ठरते.

लग्न संस्थेचा दुसरा पैलू

घटस्फोटाचे अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत आणि पोलीस ठाणी हुंडयाच्या सामानाने भरली आहेत. हेच कारण आहे की लग्नासोबतच पती-पत्नीला आपली संपत्ती स्पष्ट करावी लागेल. हे दस्तावेजच लग्नानंतर होणाऱ्या वादातून वाचवतील. एकनिष्ठ राहण्याच्या भावनेला कीड लागली आहे का की मग कुटुंबाचा अनावश्यक हस्तक्षेप नाते टिकू देत नाही?

रीना आणि महेशच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. महेशने व्यवसायात जम बसवल्यावर रीनाने नोकरी सोडली. अचानक महेशला व्यवसायात नुकसान झाले आणि रीना पुन्हा नोकरी शोधू लागली, पण तिला ती मिळाली नाही. आर्थिक चणचण निर्माण झाल्याने दोघांमध्ये तणाव वाढला. कटकट रोजचीच झाली. तीन वर्षे सोबत राहूनही ते एकमेकांसाठीची जबाबदारी ओळखू शकत नव्हते. रीनाला वाटत होते की तिचे खूपच शोषण झाले तर याउलट रीनाने आपला भरपूर फायदा घेत मौजमजा केली, असे महेशला वाटत होते. अखेर एक दिवस दोघांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

खरंतर किती वर्षे सोबत होतो यापेक्षा ती सोबत किती सुंदर आणि गोड होती हे समजून घेणे जास्त गरजेचे आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करणे, सामाजिक समारंभात ग्रुप फोटोत हसताना दिसणे, फेसबुकवर प्रेम व्यक्त करणारा फोटो ठेवणे वेगळी गोष्ट आहे आणि एक आनंदी, विश्वास आणि सन्मानाने परिपूर्ण असलेले एकमेकांना समजून घेणारे नाते जगणे वेगळी गोष्ट आहे.

लग्न कसे ही होऊ देत सुरुवातीच्या दिवसांत फुललेले, बहरलेले असते, दोन शरीर, भिन्न लिंगाचे आकर्षण, खूप सारे स्वातंत्र्य यामुळे जणू पंखच मिळतात. पण हळूहळू कापराप्रमाणे प्रेम उडून जाते. आरोप-प्रत्यारोप, तक्रारी, नाराजी, बेचैनी, जे केले आणि जे केले नाही त्याचा हिशोब आणि शेवटी सुकलेल्या फांद्या असलेल्या वृक्षासारखे नाते, ज्याच्या फांद्यांवर टांगलेल्या रीतीभाती, जबाबदाऱ्या, चीडचिडेपणा त्याला कुरूप बनवतात. प्रेम विवाहातही असेच घडते.

नात्यात समानाधिकार हवा, नात्याचा सुगंध कापरासारखा न उडता कायम दरवळत राहावा, असा विचार जो करतो तो लग्नाच्या नावाने घाबरतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी. कदाचित अशीच भीती, प्रश्नांमधून लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग निघाला असेल. अर्थ स्पष्ट आहे. सोबत राहण्यात अडचण नाही, पण ती लग्न करण्यात आहे. काय आहे लग्न जे गरजेचे आहे आणि निश्चिंतपणाही नाही? का लग्नानंतर दोन व्यक्ती एकमेकांवर आगपाखड करतात, स्वत:चे अस्तित्व पणाला लावतात आणि दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्यासाठी आतूर होतात?

राजस्थान विद्यापिठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापक रजनी कुंतल यांनी सांगतात, ‘‘हे नाते समाज आणि रीतीरिवाजाचे बळी ठरले नसते, दोन व्यक्तींमधील एक समर्पण आणि दुसरा अधिकाराची अपेक्षा ठेवत पुढे गेला नसता आणि दोन व्यक्तींच्या नात्यात त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दरवेळी कुणी ना कुणी नाक खुपसले नसते तर कदाचित लग्न संस्थेचे स्वरूप काही वेगळेच असते. सन्मान आणि समानतेच्या भावनिक पायावर उभे राहिलेले हे नाते आयुष्यभर दरवळत राहिले असते. समाजाने लग्न संस्थेची दोरी आपल्या हातात ठेवली आहे. तो दोन व्यक्तींच्या अतिशय खासगी क्षणातील खासगी भावनांवरही नियंत्रण ठेवतो. ही दोरी लग्न संस्था तर वाचवते, पण यातून निर्माण होणाऱ्या प्रेमाचा गळा घोटते.’’

टिकवले तरच टिकते लग्न

लग्नानंतर स्त्री-पुरुष दोघांचेही आयुष्य बदलते. पण तरीही आपल्या समाजात सर्व समज मुलींनाच देण्यात येते. मुलांना क्वचितच काही सांगितले जाते किंवा मानसिकरित्या तयार केले जाते. काही दशकांपूर्वी यामुळे काहीच फरक पडत नव्हता, कारण तेव्हा मुलीलाच नवरीच्या रूपात नवे घर, कुटुंब, नात्यांनुसार स्वत:मध्ये आमूलाग्र बदल करावे लागत होते. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांच्या जगण्याच्या पद्धतीत काहीच फरक पडत नव्हता. पण जग बदलले तसे कुटुंबाचे स्वरूप आणि नात्याचे समीकरणही बदलले. पालनपोषण, महिलांची मानसिकता आणि त्यांच्या दृष्टिकोनातही बदल झाला. या परिवर्तनात हे गरजेचे झाले की पुरुषांनीही काही गोष्टी समजून या नव्या प्रकाशात नाते टिकवायला शिकायला हवे. यावरच लग्न संस्थेचे यश अवलंबून आहे.

प्राध्यापक रजनी कुंतल सांगतात, ‘‘पती-पत्नीचे नाते प्राथमिक असते. इतर नाती यातूनच तयार होतात. त्यामुळे स्वाभाविकपणे पत्नी आपल्या जोडीदाराकडूनच सहकार्य आणि आधाराची सर्वात जास्त अपेक्षा करते. म्हणून पतीसाठी गरजेचे आहे की तिचे ऐकून घ्यावे, तिच्या भावना समजून घ्याव्यात.’’

‘‘मुलाच्या लग्नानंतर कुटुंबाची रचना बदलते. सर्व व्यवस्था नव्याने तयार होते. यामुळे खासकरून काही महिला सदस्यांमध्ये ओढाताण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांनी काही तक्रार केल्यास पुरुष सदस्यांनी नि:पक्ष राहणे शिकायला हवे. जर पुरुषांनी समजावण्याचा प्रयत्न केला किंवा एकीचे म्हणणे दुसरीपर्यंत पोहोचवले तर परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडेल. अनेकदा असे प्रश्न महिलाच आपापसात समजून घेतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...