* नसीम अंसारी कोचर
रिद्धिमा वरचेवर आजारी पडू लागली होती. मनोजसोबत तिचे लग्न होऊन ५ वर्षे झाली होती, पण सुरुवातीचे एक वर्ष सासरी व्यवस्थित राहिल्यानंतर तिचे हाल होऊ लागले. लग्नापूर्वी रिद्धिमा अनेक कलागुण असलेली एक सुंदर, आनंदी आणि निरोगी मुलगी होती, पण लग्नानंतर ती मनोजच्या कुटुंबात आल्यावर काही दिवसांतच तिला तिथे गुलामीत राहात असल्यासारखे वाटू लागले. तिची सासू खूपच फटकळ आणि रागीट स्वभावाची होती.
तिच्या प्रत्येक कामात सासू चूक दाखवत असे. शब्दशब्दावरून तिला रोखत असे. ती तिला घरातील सर्व कामे करायला लावायची आणि प्रत्येक कामात टोमणे मारायची, जसे तुझ्या आईने तुला हे शिकवले नाही, तुझ्या आईने तुला ते शिकवले नाही, तुझ्या घरात असे घडत असेल, इथे असे चालणार नाही, असे कडवट टोमणे मारून सासू तिचे मन दुखावत असे.
रिद्धिमा खूप स्वादिष्ट जेवण बनवायची, पण सासू आणि नणंदेला ते कधीच आवडले नाही. कधी जास्त मीठ झाले तर कधी जास्त तिखट झाले, असे बोलून सासू तिच्या जेवणात उणिवा शोधत असे. सुरुवातीला सासऱ्यांनी सुनेच्या कामाचे कौतुक केले, पण ते ऐकून पत्नीच्या भुवया उंचावल्यानंतर ते देखील रिद्धिमाच्या कामात चुका शोधू लागले.
आपल्या पत्नीवर अत्याचार होत असल्याचे रिद्धिमाचा पती मनोजला दिसत होते, पण आई-वडील आणि बहिणीसमोर तो गप्प बसत असे. रिद्धिमा स्वत:ला मनोजच्या घरातील बिनपगारी मोलकरणीशिवाय दुसरे काहीच समजत नव्हती. या घरात ती स्वत:च्या इच्छेने काहीही करू शकत नव्हती.
अशी विचारसरणी कशासाठी?
रिद्धिमाने तिची खोली तिच्या आवडीनुसार सजवायला घेतल्यास सासू रागाने सांगायची की, हे घर मी माझ्या कष्टाच्या पैशांतून बांधले आहे. त्यामुळे चुकूनही ते बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जे काही सजवले आहे ते तसेच राहील.
रिद्धिमाच्या सासूने तिच्या वागण्यातून दाखवून दिले की, घर तिचे आहे आणि तिच्या इच्छेनुसार चालेल. इथे रिद्धिमा किंवा मनोजची आवड महत्त्वाची नाही. ५ वर्षांपासून सतत राग, तणाव आणि नैराश्याने ग्रासलेली रिद्धिमा अखेर रक्तदाबाची रुग्ण बनली. या शहरात तिचे माहेर नाही किंवा मैत्रिणीही नाहीत की, ज्यांच्या मदतीने ती तिच्या तणावातून काहीशी बाहेर पडू शकेल. तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या डोक्यावरचे केस गळायला लागले आहेत. चेहऱ्यावर पुरळ आला आहे.
साजशृंगाराची हौस तर कधीच संपली आहे आणि आता तर ती अनेकदा एकच कपडे घालते. ती खरोखरंच मोलकरीण दिसायला लागली आहे. काम आणि तणावामुळे तिचा ३ वेळा गर्भपात झाला. त्यातच सासूच्या तोंडचे मूल होत नसल्याचे टोमणेही तिला सहन करावे लागतात. आता तर मनोजलाही तिच्याबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. जेव्हा त्याची आई घरात तणाव निर्माण करते तेव्हा त्याचा राग तो रिद्धिमावर काढतो.
परंपरेच्या नावाखाली शोषण
रिद्धिमाची मोठी बहीण कामिनी, जी लग्नानंतर तिच्या पतीसोबत दुसऱ्या शहरात राहाते. सासू, सासरे, नणंद आणि भावजय यांच्यापासून ती दूर असते. ती खूपच सुखी, समृद्ध आणि आनंदी आहे. ती प्रत्येक गोष्टीवर अगदी मनमोकळेपणाने हसते. कामिनी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. ती स्वत:च्या घराची आणि स्वत:च्या इच्छेची मालक आहे.
तिच्या कामात कोणी ढवळाढवळ करत नाही. ती तिच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार घर सजवते. पतीही तिची आवड आणि कलात्मकता पाहून खूश आहे. ती तिच्या इच्छेनुसार मुलांचे संगोपनही करत आहे. या स्वातंत्र्याचाच परिणाम आहे की, वयाने मोठी असूनही कामिनी रिद्धिमापेक्षा तरुण आणि उत्साही दिसते.
खरं तर महिलांचे आरोग्य, सौंदर्य, कला आणि गुणांच्या विकासासाठी लग्नानंतर पतीसोबत वेगळ्या घरात राहणे चांगले. सासू, सासरे, नणंद, भावजय, दीर, यांनी भरलेल्या कुटुंबात स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. डोक्यावर सतत एक अदृश्य काठी असते. त्यांच्यावर घरकामाचे मोठे ओझे असते. कामाच्या ओझ्यासोबतच त्यांच्यावर नेहमीच पहारा असतो.
मुलांवर वाईट परिणाम
घरात अनेक सदस्य असल्यास वाढत्या वयाच्या मुलांना अधिक सल्ले दिले जातात. प्रत्येक व्यक्ती त्यांना आपापल्या परीने त्यांना योग्य-अयोग्य सांगत असतो. त्यामुळे मुलं संभ्रमात राहातात. त्यांना त्यांच्या विचारसरणीनुसार योग्य-अयोग्य ठरवता येत नाही. एकल कुटुंबात, फक्त आई-वडीलच असतात. ते मुलावर प्रेम करतात आणि त्यांना समजून घेतात, त्यामुळे मूल निर्णय घेताना गोंधळून जात नाही. योग्य आणि अयोग्य यातील निर्णय घेण्यास मूल सक्षम होते.
पण, जिथे सासू आणि सुनेचे एकमेकांशी नीट पटत नाही तिथे त्या दोघीही मुलांना एकमेकींविरुद्ध भडकावत राहतात. त्या त्यांच्या भांडणात लहान मुलांचा शस्त्र म्हणून वापर करतात.
याचा मुलांच्या कोमल मनावर, त्यांच्या विकासावर वाईट परिणाम होतो. असे दिसून आले आहे की, अशा घरातील मुले अतिशय संकुचित स्वभावाची, चिडचिडी, आक्रमक आणि हट्टी बनतात. त्यांच्यात समजूतदारपणा, बंधुता, प्रेम आणि सौहार्द यांसारख्या चांगल्या मानवी गुणांचा अभाव असतो. ती त्यांच्या वर्गमित्रांशीही नीट वागत नाहीत.
स्वत:चे घर म्हणजे खर्च कमी
पती-पत्नी स्वतंत्रपणे स्वत:च्या घरात राहात असल्यास, खर्च कमी झाल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होते. मनोजचेच उदाहरण घ्या, त्याला कधी मिठाई खावीशी वाटली तर त्याला केवळ स्वत:साठी आणि पत्नीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी मिठाई खरेदी करावी लागते.
जर पत्नीसाठी साडी खरेदी करायची असेल तर आई आणि बहिणीसाठीदेखील खरेदी करावी लागते. पती कधीच पत्नीसोबत एकटा उपहारगृहात जेवायला किंवा चित्रपट बघायला जाऊ शकत नाही, कारण त्याला संपूर्ण कुटुंब सोबत घ्यावे लागते. याउलट कामिनी पती आणि दोन मुलांसोबत अनेकदा बाहेरगावी जाते. ते उपहारगृहात जाऊन हवे ते खातात, चित्रपट पाहातात आणि खरेदीसाठीही जातात.
अशी अनेक घरं आहेत जिथे २ किंवा ३ भावांचे कुटुंब एकत्र राहाते. तिथे रोजच भांडणं होतात. घरी खायला आणायचे असल्यास ते केवळ स्वत:च्या मुलांसाठीच नाही तर भावाच्या मुलांसाठीही आणावे लागते. सर्वांना विचारात घेऊनच खर्च करावा लागतो. कुटुंबातील एकाची परिस्थिती बिकट असेल तर त्याला वाईट वाटू नये म्हणून दुसरा स्वत:वर जास्त खर्च करत नाही.
मनोरंजनाचा अभाव
साधारणपणे सासरी सुनेसाठी मनोरंजनाचे कोणतेही साधन नसते. त्या स्वयंपाकघर आणि शयनकक्षापुरत्याच मर्यादित असतात. घराचा टीव्ही दिवाणखान्यात ठेवला तरी त्या जागेवर सासू-सासरे आणि मुलांचा ताबा असतो. सुनेला तिच्या आवडीचा एखादा कार्यक्रम पाहायचा असेल तर ती पाहू शकत नाही.
पती-पत्नीला कधी एकटे कुठे जायचे असेल तर प्रत्येकाच्या डोळ्यात प्रश्न असतो की कुठे जात आहात? का जात आहात? कधी येणार? त्यामुळे बाहेर जाण्याचा उत्साह मावळतो.
सासरी सून आपल्या मैत्रिणींना घरी बोलावू शकत नाही किंवा त्यांच्यासोबत पार्टी करू शकत नाहीत. याउलट पती-पत्नी वेगळ्या घरात राहात असतील तर दोघेही आपल्या मित्र-मैत्रीणीना घरी बोलावू शकतात, पार्टी देऊ शकतात आणि मनमोकळेपणे त्याचा आनंद घेऊ शकतात.
जागेचा अभाव
विभक्त कुटुंबांमध्ये जागेची कमतरता नसते. एका बेडरूमच्या फ्लॅटमध्येही पुरेशी जागा उपलब्ध असते. कोणतेही बंधन नसते. मोकळ्या वेळेत ती दिवाणखाना किंवा बाल्कनी कुठेही निवांत बसू शकते; याउलट सासू- सासरे असल्यास सून तिच्याच घरात बंदिस्त असते. मुलांनाही त्यांच्या आजी-आजोबांमुळे अडकल्यासारखे वाटते, कारण ती खेळू लागल्यास किंवा त्यांनी मोठ्याने आवाज केल्यास त्यांना ओरडा खावा लागतो.
स्वातंत्र्य आनंद देते
जर पती-पत्नी एकत्र स्वतंत्र घरात राहात असतील तर प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कामासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळते. कोणावरही बंधने नसतात. वाटेल तिकडे फिरा. वाटेल ते बनवा आणि खा. स्वयंपाक करायचा कंटाळा आल्यास बाहेरून मागवा. हवे ते कपडे घाला.
सासू-सासरे सोबत राहात असल्यास नोकरदार महिलांना त्यांचा मान राखून फक्त साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा लागतो. याउलट वेगळ्या राहाणाऱ्या महिला त्यांची आवड, सोय आणि फॅशननुसार जीन्स, टॉप, स्कर्ट, मिडी घालू शकतात. जर तुम्ही पतीसोबत घरी एकट्या असाल तर तुम्ही नाईट सूट किंवा सेक्सी नाईटीही घालू शकता.





