* नसीम अंसारी कोचर
रिद्धिमा वरचेवर आजारी पडू लागली होती. मनोजसोबत तिचे लग्न होऊन ५ वर्षे झाली होती, पण सुरुवातीचे एक वर्ष सासरी व्यवस्थित राहिल्यानंतर तिचे हाल होऊ लागले. लग्नापूर्वी रिद्धिमा अनेक कलागुण असलेली एक सुंदर, आनंदी आणि निरोगी मुलगी होती, पण लग्नानंतर ती मनोजच्या कुटुंबात आल्यावर काही दिवसांतच तिला तिथे गुलामीत राहात असल्यासारखे वाटू लागले. तिची सासू खूपच फटकळ आणि रागीट स्वभावाची होती.
तिच्या प्रत्येक कामात सासू चूक दाखवत असे. शब्दशब्दावरून तिला रोखत असे. ती तिला घरातील सर्व कामे करायला लावायची आणि प्रत्येक कामात टोमणे मारायची, जसे तुझ्या आईने तुला हे शिकवले नाही, तुझ्या आईने तुला ते शिकवले नाही, तुझ्या घरात असे घडत असेल, इथे असे चालणार नाही, असे कडवट टोमणे मारून सासू तिचे मन दुखावत असे.
रिद्धिमा खूप स्वादिष्ट जेवण बनवायची, पण सासू आणि नणंदेला ते कधीच आवडले नाही. कधी जास्त मीठ झाले तर कधी जास्त तिखट झाले, असे बोलून सासू तिच्या जेवणात उणिवा शोधत असे. सुरुवातीला सासऱ्यांनी सुनेच्या कामाचे कौतुक केले, पण ते ऐकून पत्नीच्या भुवया उंचावल्यानंतर ते देखील रिद्धिमाच्या कामात चुका शोधू लागले.
आपल्या पत्नीवर अत्याचार होत असल्याचे रिद्धिमाचा पती मनोजला दिसत होते, पण आई-वडील आणि बहिणीसमोर तो गप्प बसत असे. रिद्धिमा स्वत:ला मनोजच्या घरातील बिनपगारी मोलकरणीशिवाय दुसरे काहीच समजत नव्हती. या घरात ती स्वत:च्या इच्छेने काहीही करू शकत नव्हती.
अशी विचारसरणी कशासाठी?
रिद्धिमाने तिची खोली तिच्या आवडीनुसार सजवायला घेतल्यास सासू रागाने सांगायची की, हे घर मी माझ्या कष्टाच्या पैशांतून बांधले आहे. त्यामुळे चुकूनही ते बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जे काही सजवले आहे ते तसेच राहील.
रिद्धिमाच्या सासूने तिच्या वागण्यातून दाखवून दिले की, घर तिचे आहे आणि तिच्या इच्छेनुसार चालेल. इथे रिद्धिमा किंवा मनोजची आवड महत्त्वाची नाही. ५ वर्षांपासून सतत राग, तणाव आणि नैराश्याने ग्रासलेली रिद्धिमा अखेर रक्तदाबाची रुग्ण बनली. या शहरात तिचे माहेर नाही किंवा मैत्रिणीही नाहीत की, ज्यांच्या मदतीने ती तिच्या तणावातून काहीशी बाहेर पडू शकेल. तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या डोक्यावरचे केस गळायला लागले आहेत. चेहऱ्यावर पुरळ आला आहे.





