सण-उत्सव कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे करायला आवडतात – रूचिरा जाधव

* सोमा घोष

उच्चशिक्षित कुटुंबातील मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव ही छोटया पडद्यावरील मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मुळे मराठी इंडस्ट्रीजमध्ये चर्चेत आली. यानंतर तिने टीव्हीवरील बरेच कार्यक्रम आणि चित्रपटांतही भूमिका साकारल्या. तिच्या या प्रवासात तिच्या पालकांनी तिला खूपच सहकार्य केले. म्हणूनच ती या क्षेत्रात पुढे जाऊ शकली. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या रुचिराने अथक परिश्रमाने आपल्या अस्तित्वाचा ठसा मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत उमटवला आहे. नुकतेच तिचे एक मराठी चित्रपट आणि हिंदी वेब शोचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. त्याच्या प्रदर्शनासाठी रुचिरा उत्सुक आहे. तिने फोनवरून या क्षेत्रातील आपल्या प्रवासाबाबत सांगितले, जो खूपच मनोरंजक आहे. सादर आहे यातीलच काही खास भाग :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबात माझ्याव्यतिरिक्त इतर कुठलाही सदस्य अभिनय क्षेत्रात नाही. या कुटुंबातील मी पहिली अभिनेत्री आहे. महाविद्यालयात असताना नाटकात काम करायला मला आवडायचे. याव्यतिरिक्त महाविद्यालयात असताना मी एका नाटकाची संहिताही लिहिली होती आणि अभिनयही केला होता. त्या नाटकासाठी मला राज्यस्तरावर सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार आणि त्या नाटकाच्या लेखनासाठीही द्वितीय पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘इंडियन नॅशनल थिएटर’ स्पर्धेतही सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अशा सर्व गोष्टी एकाच वेळी जुळून आल्यामुळे मी याच क्षेत्रात कारकीर्द घडवायचे ठरविले. त्यानंतर मला नाटक, चित्रपट, टीव्ही आणि वेब सर्वांकडूनच कॉल येऊ लागले आणि अभिनय हाच माझा पेशा झाला.

अभिनय क्षेत्रात काम करणार असल्याचे पहिल्यांदाच घरी सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

सुरुवातीला खूपच अवघड होते, कारण पूर्वी जेव्हा मी नाटकात काम करायचे तेव्हा मला महाविद्यालयातून घरी यायला उशीर व्हायचा. त्यामुळे घरून ओरड खावी लागायची. माझ्या पालकांना इंडस्ट्री आणि त्याच्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती. जेव्हा मला पुरस्कार मिळू लागले आणि माझे नाव वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा त्यांना वाटले की, मी काहीतरी चांगले काम करीत आहे. त्यामुळे ते मला सर्वतोपरी सहकार्य करू लागले. हे खरे आहे की, इंडस्ट्रीत कधीच कायमस्वरूपी काम मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो आणि मी अजूनही तो करीत आहे. पण मला स्वत:वर विश्वास आहे. महिनाभर जरी काम मिळाले नाही तरी तणाव वाढतो.

गॉडफादरशिवाय इंडस्ट्रीत काम करणे किती अवघड असते?

सुरुवातीला संघर्षाकडे मी तणाव म्हणून पाहायचे. आता मात्र हसून त्याला सामोरी जाते. सध्याच्या कोरोना काळात घरातून ऑडिशन द्यावे लागते, पण माझे घर लहान आहे. माझ्यामुळे घरातल्यांना मी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. माझ्याकडे स्वत:ची कार नाही. त्यामुळे शूटिंग म्हणजे चित्रिकरणासाठी मला ठाणे येथून खासगी टॅक्सी करून जावे लागते. चित्रिकरण १२ ते १३ तास चालते. मात्र मुंबईत वाहतूक कोंडीमुळे आणखी काही तास वाया जातात. त्यामुळे झोपण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळेच प्रसन्न चेहऱ्याने चित्रिकरण करणे हे मोठे आव्हान असते. मी जास्त करून कॅबने प्रवास करते. बाहेरून सर्वांना वाटते की, इंडस्ट्रीत केवळ ग्लॅमर आहे, पण त्याआड जी प्रचंड मेहनत करावी लागते ती कोणालाही दिसत नाही. मी काम मनापासून एन्जॉय करीत असल्यामुळे कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव मला होत नाही. अनेकदा जेव्हा एक किंवा दोन महिने झाले तरी काम मिळत नाही तेव्हा मात्र मी खूपच तणावाखाली येते. म्हणूनच काम कितीही दूर आणि प्रचंड मेहनतीचे असले तरी मी नकार देत नाही.

या इंडस्ट्रीजशी संबंधित नसल्यामुळे चांगले काम मिळविण्यासाठी तुला अडचणी आल्या का?

या ६ वर्षांत बराच संघर्ष केला आहे. इंडस्ट्रीला नवशिके नव्हे तर थेट प्रतिभावान कलाकार हवे असतात. मात्र ही प्रतिभा अभिनयातून आणि त्यातून मिळत जाणाऱ्या अनुभवातून गवसते. अभिनयाव्यतिरिक्त तुमची पोहोच आणि या क्षेत्रातील प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळविणे फारच गरजेचे असते. पण मी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, कारण यामुळे परफॉर्मन्स खराब होतो.

तुझे राहणीमान, बोलण्याच्या पद्धतीमुळे कधी काही सहन करावे लागले आहे का?

मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. फॅशन डिझायनर बनण्याची माझी इच्छा होती. पण घरातल्यांचा विरोध होता. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. अभ्यासासोबतच मी नाटकात काम करू लागले. माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. ही समज माझ्यात खूप आधीपासूनच आहे. त्यामुळे कधी कोणाकडून त्यासाठी ऐकून घ्यावे लागले नाही. याशिवाय नाहक बडबड करण्यापेक्षा मी नेहमीच शांत राहते. कॅमेरा, दिग्दर्शक आणि संवाद या तीन गोष्टींवर नेहमीच लक्ष केंद्रित करते.

कोणत्या मालिकेमुळे तुझ्या जीवनाला कलाटणी मिळाली?

मी बरेच ऑडिशन दिले. काम मिळत राहिले. पण हो, मिळेल त्या कामाला मी होकार देत नाही. जे काम करायचे मी ठरवले आहे तशी भूमिका असेल तरच ती स्वीकारते. तेच काम करण्याची माझी इच्छा असते. स्क्रिप्ट, दिग्दर्शक आणि बॅनर पाहूनच मी चित्रपटाची निवड करते. मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. यात मी ‘माया’ ही व्यक्तिरेखा साकारली. माझ्या आईचे नावही माया आहे. माझ्यासाठी आईच्या नावासोबत काम करणे ही मोठी गोष्ट होती. या भूमिकेने मला ओळख मिळवून दिली. सर्वांना मी माहीत झाले. अनेकदा मराठी मालिकांमध्ये ग्लॅमर फार कमी असते, पण या मालिकेत माझ्या भूमिकेतील अभिनयातच ग्लॅमर होते. यामुळे मला कामाव्यतिरिक्त खूप काही शिकण्याची संधी मिळाली. मला विविध भाषेत वेगवेगळया धाटणीच्या भूमिका साकारायला आवडतात.

तुझे स्वप्न काय आहे?

बायोपिकवर आधारित भूमिकेपेक्षा महिला केंद्रित विषयांवर काम करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे आव्हान स्वीकारायला मला निश्चितच आवडेल. ऐतिहासिक पात्रांमध्ये मला द्र्रौपदीची भूमिका साकारायला आवडेल, कारण यात प्रत्येक चरित्राशी द्रोपदीचे कुठल्या ना कुठल्या रूपातील नाते जोडले गेलेले आहे.

तू सण-उत्सव कसे साजरे करतेस?

मला प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करायला आवडतो. सण-उत्सवांमुळेच आपण आपले कुटुंब, मित्रांशी जोडलेले राहतो. दिवाळीत कंदिल, रांगोळी, पणत्या, चांगले कपडे घालणे, असे सर्व एकत्रच जुळून येते. याशिवाय आई अनेक पारंपरिक पदार्थ बनवते. ते मला सर्वात जास्त आवडतात. दिवाळीत फटाके फोडणे मला आवडत नाही. यामुळे प्रदूषण होते, शिवाय फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरून लपून राहण्याइतकी जागाही जीवजंतूंसाठी शिल्लक राहिलेली नाही.

आवडता रंग – गुलाबी, निळा, काळा, पांढरा.

आवडता पोशाख – भारतीय.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

वेळ मिळाल्यास – मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा करणे.

आवडता परफ्युम – नॅचरल इसेन्स.

आवडता पदार्थ – आईच्या हातचे जेवण.

आवडते पर्यटन स्थळ – देशात काश्मीर, विदेशात मालद्वीप.

जीवनातील आदर्श – ज्या गोष्टीमुळे कोणी दुखावले जाईल ती न करणे किंवा असे काहीच न बोलणे.

आवडते काम – अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात प्रत्यक्ष जाऊन काम करणे. आर्थिक मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – बाहुबलीसारखा असण्याची गरज आहे.

सोनी मराठीवरील ‘इंडियन आयडल मराठी’

* सोमा घोष

२२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘Singing Star’ या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे. अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. Ajay-Atulहे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून Sony Marathi वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी  सुरांची पर्वणी असणार आहे.

‘कशा असतात बायका’ या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

* सोमा घोष

मुंबई – भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रिची सर्व पातळ्यांवर लढण्याची आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट म्हणजे ‘कशा असतात ह्या बायका’. नुकताच हा लघुपट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. या लघुपटास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: महिलावर्गाची लघुपटास पसंती मिळत आहे.

भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणाऱ्या या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरेनेसुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण केले आहे. या तिघांच्या अभिनयाची सध्या चर्चा सुरु आहे.

या लघुपटामध्ये एक महत्वाची बाब आहे,  ती अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी भाऊबीज ह्या थीमवर हा लघुपट असला तरी ही कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.

http://

पुरुषांचा ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ’कॉटन किंग’ यांनी स्त्रियांच्या सन्मानार्थ या लघुपटाची निर्मिती केली आहे. महिलांचं भावविश्व खूप वेगळं असतं. माया, ममता, त्याग, विश्वास, नि:स्वार्थ प्रेम, समर्पित भावना हे सारे गुण स्त्रियांच्या ठायी दिसतात. आपल्या परिवारावर या गुणांची त्या मनसोक्त उधळण करतात. स्त्रियांच्या या भावविश्वाचे हळूवार पदर सदर लघुपटाद्वारे उलगड्ण्य़ात आले आहे.

‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वर पाहायला मिळेल. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट दिग्दर्शित केला आहे वैभव पंडित यांनी आणि लिहिला आहे मोनिका धारणकर यांनी.

दिग्दर्शक वैभव पंडित म्हणतात, ”भाऊबीजेच्या निमित्ताने शॉर्ट्फिल्म बनवण्य़ासाठी कॉटनकिंगकडून असा ब्रिफ मिळणे विलक्षण होते. उत्तम चर्चा, विचारमंथन आणि अनेकवेळा लिखाण केल्यानंतर आम्ही कथेची योग्य नस पकडू शकलो. कॉटनकिंगने आम्हाला जी मोकळीक दिली, जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’’

”आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणॆ बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे,” असे लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे संचालक कौशिक मराठे यांनी सांगितले.

चला, थोडे आणखी समजून घेऊया ’कशा असतात ह्या बायका’!

लघुपट पाहण्यासाठी लिंक – https://www.youtube.com/watch?v=2zW1z081xgQ&t=199s

स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’!

* सोमा घोष

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा टिझर गेले काही आठवडे चर्चेचा विषय ठरला असून या मालिकेतली मध्यवर्ती भूमिका कोण साकारणार ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यासंदर्भात सोशल मिडियावर विविध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अश्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या, स्वरदा ठिगळे ह्या अभिनयसंपन्न अभिनेत्रीची निवड ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी करण्यात आली.

मराठी मनोरंजनक्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणारी स्वरदा, अभिनयाबरोबरच घोडेस्वारी आणि तलवारबाजीमध्ये निपुण असून या ऐतिहासिक मालिकेच्या निमित्ताने तिने पुन्हा एकदा कसून सरावाला सुरुवात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून हा इतिहास सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे

शिवानी बावकर दिसणार नव्या भूमिकेत – ‘कुसुम’

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिका, कुसुम.

आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते.

२००१ साली हिंदीमध्ये ‘कुसुम’ नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.

बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून ‘कुसुम’ या मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत.

सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिने यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते.

‘कुसुम’ ही मालिका ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ekta Kapoor quote –

२१ वर्षानंतर ‘कुसुम’  प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर ‘कुसुम’ आणण्याची संधी मला मिळाली. ‘कुसुम’ ही  मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली. पाहायला विसरू नका ‘कुसुम’, ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विनोदवीरांना मिळाली महानायकाची कौतुकाची थाप

* सोमा घोष

लाडकी आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करताहात. ते सतत असंच करत राहा’, असं ते म्हणाले आणि ते स्वतःही हास्यजत्रा पाहत असल्याचं आणि आपल्या कुटुंबालाही हास्यजत्रेबद्दल सांगत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

सर्वांची आवडती हास्यजत्रा ही रविवारी केल्यावर अनेक प्रेक्षकांनी ती पुन्हा चार दिवस व्हावी आणि त्यांचा हास्याचा डोस आठवड्यातून चार दिवस मिळावा, अशी मागणी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीचा मान राखून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे.

आता हसण्याचे वार होणार आठवड्यातून चार, पाहायला विसरू नका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  आजपासून सोमवार ते गुरुवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी!

* सोमा घोष

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही  रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी राहते आणि आपल्या कुटुंबाची  जबाबदारी संभाळतेय.  वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे.

साहिल अंध आहे, पण त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही.  वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे त्याच देवळात साहिल येत असतो.

वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे, असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी  उत्सुकतेचं असणार आहे.

साहिल ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दली आणि त्यांच्याकडून  बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत  पाहायला मिळेल. मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी  प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

पाहा, ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, सोम. -शनि.,  संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

‘जिंदगानी’ या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉंच!

*प्रतिनिधी

कोरोनाच्या जागतिक आपत्तीवर मात करत आता अखेरीस अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या उदास मनांना उभारी आणण्यासाठी आता बंद पडलेलं करमणुकीच क्षेत्र नव्याने कामाला लागले आहे. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे आपल्यासाठी उघडणार असून नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

‘जिंदगानी’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले आहे. अभिनेते शशांक शेंडे व विनायक साळवे खेडेगावातील कठीण परिश्रम आणि संयमाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या ‘प्रभाकर’ आणि ‘सदा’ या आदिवासी व्यक्तींच्या भूमिका साकारत असून या चित्रपटात त्यांच्यासमवेत अभिनेत्री सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती आढळून येणार आहेत.

जिंदगानी चित्रपटाद्वारे वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केलेले असून विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टिचं भविष्य उज्ज्वल आहे – वीणा जामकर

– सोमा घोष

मराठी नाटय आणि चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री वीणा जामकरचा जन्म मुंबईजवळच्या पनवेल आणि पालनपोषण रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात झालं. तिचं कौटुंबिक वातावरण कला आणि संस्कृतीचं राहिलंय, या कारणामुळेच तिने शाळा आणि महाविद्यालयातून नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अविष्कार नाटयसंस्थेत प्रवेश घेतला आणि मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला लागली, तिला नाटकांबरोबरच चित्रपट करण्याचीदेखील संधी मिळाली. हसमुख आणि विनम्र स्वभावाच्या वीणाचा प्रवास आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलणं झालं, सादर आहेत त्याचे काही खास अंश :

अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा माझी आई अलका जामकरकडून मिळाली. शाळेत शिक्षक असली तरी तिलादेखील नाटकांची आवड होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात कलेचं वातावरण आहे, त्यामुळे अनेक कुटुंब कला आणि संस्कृतिशी संबंधित असतात. मला आठवतंय की लहानपणी मी आईला उरणमध्ये छोटयाछोटया नाटकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मला अभिनयाची आवड आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने मला काही संवाद बोलायला सांगितले, जे मी अनाहुतपणे करून दाखवलं. बाबा सरकारी कर्मचारी होते, परंतु त्यांना पेंटिंग, कॅलिग्राफीची आवड होती. त्यांनी ९० च्या दशकात आम्हा दोघींना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, कारण त्याकाळी गावात काम करण्यासाठी माझी आई संकोचायची. माझ्या बाबांचे विचार खूप सुधारक होते. माझा भाऊ केमिकल इंजिनिअर आहे.

तुझ्या प्रवासात कुटुंबाने किती सहकार्य केलं?

मी वयाच्या १५व्या वर्षीच सांगून टाकलं होतं की मला अभिनयाची आवड आहे आणि मी शाळेच्या नाटकात सहभागी व्हायची. त्यावेळी माझा भाऊ मुंबईत शिकत होता आणि मलादेखील तिथे जाऊन शिकायचं होतं. अभिनय करण्यासाठी मुंबईत येऊन सर्वांना भेटता येणार होतं. मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर मी नाटकातदेखील व्यस्त राहिली. मानसिक आधारदेखील खूप मिळाला, ज्यामुळे मला काम करताना मजा आली.

पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?

मुंबईची जुनी आणि प्रचलित नाटयसंस्था अविष्कार संस्थेत मी गेली आणि तिथे दिग्दर्शक राजेंद्र बडे त्यांचा पहिला चित्रपट बनवत होते. त्यावेळी मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांची रुची वाढत चाललेली. त्यादरम्यान मला दिग्दर्शकांनी कास्ट केलं आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची पद्धत, कॅमेरा फेस करणं इत्यादी समजलं. थिएटरमध्ये काम करणं आणि चित्रपटात काम करणं खूप वेगळं आहे. दुसरा चित्रपट वळू होता, जो खूप चालला आणि आजदेखील तो चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना कसं वाटलं?

अजिबात आवडलं नव्हतं. नाटकात कोणी ना कोणी मागून बोलत असतं, वेळ ठरलेली असते, त्यामुळे मला अभिनय करताना आनंद मिळतो. एक लिंक बनते. चित्रपटात काम करताना वारंवार कट बोलणं, इमोशनचं मागेपुढे होणं छान नाही वाटतं. त्यामुळे मी बाबांनादेखील सांगून टाकलं की मी फक्त नाटकामध्ये कामे करेन. त्यांनी मला फोर्स न करता माझ्यावर सोडून दिलं. मी २०११ साली मी चित्रपट आणि नाटक दोन्हीमध्ये काम करत होती. त्यामुळे मला एकत्रित पैसे मिळत होते त्यामुळे मला मुंबईत राहण्याची वा खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. माझं पॅशन नाटक होतं, परंतु नंतर मला चित्रपट आवडू लागले.

कोणत्या चित्रपटामुळे घरोघरी ओळख मिळाली?

कामाला सुरुवात ‘वळू’  चित्रपटाने झाली, परंतु २०१०साली मी महेश मांजरेकरचा ‘लालबाग परळ’ चित्रपट २०१० साली केला होता, जो मुंबईच्या मिल कामगारांवर बनविला गेला होता, त्यामध्ये माझी मंजुची भूमिका सर्वांना आवडली होती. त्यानंतर ‘कुटुंब’ चित्रपट आला आणि घरोघरी ओळख मिळाली.

मराठी चित्रपटसृष्टित काम करताना कसं वाटतं?

मराठी चित्रपटसृष्टित साहित्य, कलाकृती, कथा आणि कलाकार खूप छान आहेत, एवढी विविधता कुठे पहायला मिळत नाही. या इंड्रस्ट्रीत काम करून छान वाटतं. याव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टित स्टार सिस्टीम नाही, कारण हा व्यवसाय नाहीए. त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटामधून कायम चढाओढ लागते. त्याचं बजेट आणि इन्फ्रास्ट्रॅक्चर पुढे मराठी सिनेमा काहीच नाहीए. कधीकधी ‘सैराट’ सारखे सिनेमा येतात, जे सुपरहिट होतात. मराठी चित्रपटसृष्टित पैसा टाकण्यापूर्वी निर्माता एकवार विचार करतोच. मराठीत खूप एक्सप्रेमेंटल आणि लो बजेटचे सिनेमे बनतात, परंतु आता चांगले चित्रपट येत आहेत, पुढे जाऊन भविष्य उज्ज्वल आहे.

तुला इथे पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष अजूनही आहे. चित्रपट एक व्यवसाय आहे, त्यामध्ये खूप पैसा लागलेला असतो. चित्रपट न चालल्यास तुमचं मानधन कधी नाही वाढत. चांगलं काम करुनदेखील सिनेमा चालला नाही तर मानधन खूप कमी मिळतं आणि निर्मातेदेखील अधिक पैसा गुंतवायला घाबरतात. आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे आजदेखील दुसरा मार्ग स्वीकारावा लागतो. टॉलीवूडमध्ये साधारण कलाकाराला ५० कोटी एका सिनेमासाठी मिळतात. तसंच इथे चांगले नाटय आणि चित्रपटगृह नाहीत. त्यामुळे लोकांना चांगली कलाकृती पाहता येत नाही. टीव्ही कलाकार अधिक प्रसिद्ध होतात, कारण टीव्ही प्रत्येक घरात  असतो. याशिवाय अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावत.

मराठी चित्रपटसृष्टीत नेपोटीज्मचा सामना करावा लागला होता का?

इथे नेपोटीज्म नाहीए, मी गेल्या १५ वर्षापासून या इंडस्ट्रित काम करतेय, इथले मोठे कलाकारदेखील बाहेरून येणाऱ्या कलाकारांचं कौतुक करतात आणि कधीही स्वत:च्या मुलांना इंडस्ट्रित आणण्यासाठी कोणावर जोर देत नाहीत. इथे सगळे एकमेकांच काम पाहतात आणि प्रंशसा करतात. इथे असं कोणतंही असं कुटुंब नाहीए जे परंपरेने इंडस्ट्रित आहे, जे हिंदीत पहायला मिळतं. इथे मोकळं वातावरण आहे. कथा खूप वेगळया पद्धतीने लिहिल्यामुळे सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार काम करण्याची संधी मिळते. इथे खूप हँडसम दिसणारा कलाकार हिरो बनतो आणि साधारण दिसणारादेखील हिरो बनू शकतो. इथे  सिनेमाची कथा स्टार असते. क्रिएटीव्हीटीमध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे पावर सेंट्रलाईज्ड होत नाही.

किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

फॅशन मला फार आवडत नाही, परंतु खूप फुडी आहे आणि प्रत्येक प्रकारचं महाराष्ट्रीयन जेवण बनविते.

हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का?

मी काही खूप ग्लॅमरस अभिनेत्री नाहीए. आता हिंदीत खूपच प्रयोग केले जात आहेत आणि मला काम करायचं देखील आहे.

आवडता रंग – पिवळा.

आवडता पेहराव – भारतीय, खासकरून साडी.

आवडतं पुस्तक – पाडस, लेखक – राम पटवर्धन.

आवडतं पर्यटन स्थळ – देशात मनाली, परदेशात पॅरिस.

वेळ मिळतो तेव्हा – सोलो ट्रिप आणि खाणं बनविणं.

आयुष्यातील आदर्श – सहानुभूती, प्रेम आणि काळजी.

सामाजिक कार्य – मुलं आणि त्यांची मानसिकता.

स्वप्नातील राजपूत्र – फ्रेंडली.

स्वातंत्र्यदिन विशेष, कोण होणार करोडपती

स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेषमध्ये येणार आहेत.

कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी  खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. सह्याद्री देवराईसामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे याभागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत.

सयाजी शिंदे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटक सृष्टी यातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर आपल्या समाजसेवेसाठीसुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. मनोज बाजपेयी यांनी आपल्या दर्जेदार  अभियनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. अनेक उत्तमोत्तम  कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत, अजूनही देत आहेत.

मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी शूल या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला

मनोज बाजपेयी हे हरिवंश राय बच्चन यांचे चाहते आहेत. मनोज बाजपेयींनी  हरिवंश राय बच्चन यांची कविता मंचावर म्हणून दाखवली. मनोज बाजपेयी  यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावेपाहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही  सांगितलं आहे.

पाहा, ‘कोण होणार करोडपती’

कर्मवीर विशेष, १४ ऑगस्ट, रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें