– सुरेशचंद्र रोहरा
अनेकदा लोभामुळे आपण आपला मौल्यवान पैसा गमावतो आणि सर्वात दु:खाची बाब म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटना पाहूनही आपण सुधारत नाही आणि पुन्हा एकदा फसवणुकीचे बळी ठरतो. छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या पोलिसांनी मुंबईतील दोन ठगांना अटक केली, जे गुन्हे करण्यासाठी विमानाने रायपूरला येत आणि गुन्हा केल्यानंतर पुन्हा मुंबईला पळत असत. रायपूरच्या वेगवेगळ्या दागिन्यांच्या दुकानात बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्यांनी लाखो रुपये उकळले. ही बाब दुकान मालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
महेशकुमार थवैत यांनी याप्रकरणी विधानसभा पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल केली. दोंदेकला येथे त्यांचे दागिन्यांचे दुकान असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. विशालकुमार सोनी नावाच्या व्यक्तीने १९ मार्च रोजी गहाण ठेवण्यासाठी सोन्याचे ब्रेसलेट आणले. त्याने त्याचे आधारकार्ड आणि सोन्याच्या ब्रेसलेटचे बिलही दिले होते.
फसवणूकीच्या पद्धती
दुकानदार महेश यांनी सोने गहाण ठेवण्याचे कारण विचारले असता, फसवणूक करणाऱ्याने जमीन खरेदीचे कारण पुढे केले. त्याला तातडीने पैशांची गरज असल्याचेही सांगितले. ब्रेसलेटवर हॉलमार्कही होता. त्यामुळे महेश यांनी ६१ ग्रॅम सोने गहाण ठेवण्याच्या बदल्यात त्याला २ लाख ५० हजार रुपये दिले.
याच धर्तीवर आरोपींनी आरंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी ज्वेलर्समध्ये बनावट सोन्याचे ब्रेसलेट गहाण ठेवून २ लाख १० हजार रुपये घेतले, तर पुराणी बस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दागिन्यांच्या दुकानातून बनावट सोन्याच्या बदल्यात पैसे उकळले.
या तिन्ही दुकानांच्या मालकांनी ब्रेसलेट बारकाईने तपासले असता ते बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर विधानसभा पोलीस ठाणे, आरंग आणि पुराणी बस्ती पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या दिवशी तक्रारी दाखल झाल्या. फसवणुकीच्या या मालिकेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
कायद्याचे हात लांब आहेत
ही घटना उघडकीस आल्यानंतर रायपूरचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या, त्यानंतर विधानसभा पोलीस ठाण्यासह गुन्हे अन्वेषण विभागानेही आरोपींचा शोध सुरू केला.
जरा जपून
या आरोपींना पोलिसांनी रायपूरमधूनच अटक केली. साहेब बॅनर्जी आणि अक्षय सोनी अशी महाराष्ट्रातील या आरोपींची नावे आहेत. पुन्हा एकदा फसवणूक करण्यासाठी आपण रायपूरला पोहोचल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंडमध्येही त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केले होते. त्यांनी प्रवासासाठी विमानाचा वापर केला. आरोपींकडून पोलिसांना ५० हजारांची रोकडही सापडली.
या संपूर्ण घटनेचा बारकाईने विचार केला तर लक्षात येते की, फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबून लोकांची फसवणूक केली जात आहे आणि थोड्याशा लोभामुळे किंवा निष्काळजीपणामुळे लोक फसवणुकीचे बळीही ठरत आहेत





