क्रंदन

कथा * प्राची भारद्वाज

पीयूषनं दोन्ही बॅगा विमानांत चेक इन करून स्वत: आपल्या नवविवाहित पत्नीला हात धरून आणून सीटवर बसवलं. हनीमूनवर सगळंच कसं छान छान असतं ना? नवरा आपल्या बायकोची पर्सही स्वत:च सांभाळतो. ती दमली तर तिला उचलूनही घेतो. ती उदास आहे हे जाणवलं तर खंडीभर जोक सांगून तिला हसवायला बघतो.

पीयूष आणि कोकिळाचं लग्न ठरवून झालेलं होतं. नव्या लग्नाची नव्हाळी होती. एकमेकांकडे चोरून बघणं, हळूच हसणं, हात हातात घेणं हे सगळं त्यात आलंच. हनीमूनही खूप छान झाला. एकमेकांवर प्रेमाच वर्षाव केला. एकमेकांच्या इच्छा अपेक्षा समजून घेतल्या. मतं जाणून घेऊन मान दिला. कुटुंबियांची माहिती घेतली अन् छान संसार करण्याची वचनंही दिली घेतली.

पीयूषनं हनीमून ट्रीप सर्वार्थानं यशस्वी व्हावी म्हणून खूप श्रम घेतले होते. आपला आयुष्याचा जोडीदार उत्तम आहे याबद्दल कोकिळेच्या मनांत कुठलाही संशय नव्हता. पीयूष स्वत:चं काम मनापासून करत होता. भरपूर कष्ट करायचे आणि भरपूर पैसा मिळवायचा. काम प्रामाणिकपणे करायचं अन् खोटा पैसा घ्यायचा नाही. हेच वय कष्ट करण्याचं आहे, दमलो, थकलो म्हणायचं नाही, चिडचिड करायची नाही.

कोकिळानंही त्याची कमाई प्रेमानं, अभिमानानं हातात घेतली. गरजेवर आधी खर्च करायचा. काही रक्कम शिल्लक टाकायची. उगीच मोठेपणाचा आव आणायचा नाही हे तिनं ठरवलं होतं.

एक दिवस तिची मोलकरीण उशीरा आली.

‘‘कां गं उशीर केलास?’’ तिनं विचारलं.

आपल्या अंगावरचे वळ व सुजलेला चेहरा दाखवत मोलकरीण म्हणाली, ‘‘काय करू ताई? काल नवरा पुन्हा दारू पिऊन आला अन् तमाशा केला. स्वत: कमवत नाही, मला पैसे साठवू देत नाही. माझ्या पैशानं दारू पितो, आम्हालाच मारतो.’’

‘‘पण तू सहन का करतेस? म्हणून म्हणतात थोडं शिकावं. राबराब राबून पैसा मिळवायचा अन् वर मार ही खायचा…आता नवरा छळतोय, मोठा झाला की मुलगा तेच करणार.’’ कोकिळेला मोलकरणीसाठी वाईट वाटंत होतं. त्यावर उपाय शोधायला हवा हे तिनं ठरवलं होतं.

सायंकाळी पीयूष घरी आल्यावर तिनं पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिनं त्याचा उजवा हात आपल्या पोटावर ठेवला.

‘‘खरंच कोकी?’’ आनंदून पीयूषनं विचारलं.

‘‘तू तर माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग भरलेस गं! आपल्या दोघांच्या संसारात तिसरा जीव येतोय याचा मला कित्ती आनंद वाटतोय…तुला काय हवंय ते माग…मी देईन.’’ तो आनंदून म्हणाला.

‘‘मला जे हवंय ते सगळं तुम्ही मला दिलंय. आता मला काहीच नकोय.’’ कोकिळाही खूप आनंदात होती.

‘‘मला कुणी नातलग नाहीत. तुझी आता काळजी घ्यायला हवी. आपण तुझ्या आईची मदत घ्यायची का?’’ पीयूषनं विचारलं. ती दोघं कोकिळाच्या माहेरी आली. माहेर तिचं गावातच होतं.

आनंदाच्या बातमीनं कोकिळाच्या माहेरीही आईवडिल प्रसन्न झाले. आईनं तर तऱ्हेची पक्नान्नं तयार करून लेकीला जावयला जेवायला बसवलं. तेवढ्यात कोकिळाचे वडील दोन हातात दारूचे ग्लासेस घेऊन आले.

‘‘बाबा, हे काय करताय?’’ कोकिळेला राग आला. आश्चर्यही वाटलं, बाबांचं वागणं तिला आवडलं नाही.

पीयूषनं म्हटलं, ‘‘असू दे गं! त्यांनासुद्धा आजोबा होणार असल्याचा खूप आनंद द्ब्रालाय. तेच सेलिब्रेट करताहेत ते. तू शांत रहा. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.’’

पण त्यानंतर तर ही पद्धतच रूढ झाली, केव्हाही कोकिळाच्या माहेरी गेलं की सासरे जावई दारी प्यायचे. त्यामुळे कोकिळाला माहेरीही जावसं वाटेना. पण या अशा अवघडलेल्या अवस्थेत तिला माहेरची मदतही गरजेची होती.

बघता बघता कोकिळाचे दिवस भरले आणि तिनं जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा, एक मुलगी. त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. दोन्ही बाळांचं दोघं मिळून करायची. सुरूवातीला अवघड होतं पण हळूहळू सगळं सवयीचं झालं. दिवसा माझी बाळं मोठी होत होती. बाळांच्या बाळलीला दोघांना तृप्त करत होत्या. कामावरून परतल्यावर दोन्ही बाळांना खेळवणं हा पीयूषच्या आयुष्यातील आनंदाचा भाग होता. कोकिळादेखील न दमता घरकाम व बाळांचं संगोपन उत्तम करत होती.

एका सायंकाळी पीयूष बाहेरून आला तेव्हा कोकिळाला दारूचा वास आला. ती दचकली. तिनं धसकून विचारलं, ‘‘तुम्ही पिऊन आला आहात?’’

‘‘अगं, तो मोहित आहे ना. त्याचं प्रमोशन झालंय. त्यानं पार्टी दिली. सगळेच मित्र पित होते. त्यांच्या अती आग्रहामुळे…’’ पीयूष पटकन् तिथून उठला अन् आपल्या खोलीत गेला.

अन् नंतर तर रोजच पीयूष पिऊन घरी येऊ लागला. रोज नवं कारण असायचं.

कोकिळा त्रस्त झाली. मनांत अनामिक भीतीनं घर केलं. ‘‘असं कसं चालेल पीयूष? तुम्ही रोज पिऊन घरी येता. रोज कुठलं तरी कारण असतंच तुमच्यापाशी. मित्रांचं ठीक आहे हो, पण तुम्ही व्यसनी झाला आहात. सवय लागलीय तुम्हाला…इतक्या कष्टानं उभारलेला धंदा, आपला संसार सगळ्यावर त्याचा परिणाम होतोय. दारू फार वाईट असते.’’ कोकिळेला रडू फुटलं.

‘‘नाव कोकिळा, पण बोलतेस कावळ्यासारखी कर्कश्श.’’ चिडून पीयूष बोलला.

कोकिळाही चिडली. ‘‘रोजच पिऊन आल्यावर तुमचं कौतुक करायचं का?’’

रात्री दोघंही बोलले नाहीत पण सकाळी लवकर उठून पीयूषनं चहा केला. कोकिळेला उठवलं. हात जोडून तिची क्षमा मागितली, ‘‘मला क्षमा कर कोकी, तुला आवडंत नाही ना, मी आजपासून दारू सोडली. नाही पिणार यापुढे.’’

आणि खरोखर तो प्रयत्न करू लागला. त्यानं पिणाऱ्या मित्रांमध्ये मिसळणं बंद केलं. तो पार्ट्यांना जाईना. सायंकाळ तर घरातच बाळांसोबत घालवू लागला. कोकिळाला खूप आनंद झाला. आता सगळं नीट होणार हे समाधान तिला लाभलं.

एखादा आठवडाच जेमतेम झाला असेल, अमेरिकेहून पीयूषचे काका, कधी नव्हे ते आले. येताना महागाची दारूची बाटली आणली होती. कसाबसा पीयूषनं दारूवर ताबा मिळवला होता. घरात नेमकी दारूच समोर आली. त्यानं कांकाना टाळण्याचा खूप प्रयत्न केला.

‘‘काका, मी हल्ली दारू सोडली आहे. मला जरा त्रास व्हायला लागला होता,’’ पीयूषनं काकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पणा काकाही आडमुठे अन् अमेरिकेत राहिल्यामुळे स्वत:ला जरा ‘मोठे’ समजणारे. त्यांनी उलट पीयूषलाच दटावलं. ‘‘कुठली तरी स्वस्त दारू पीत असशील म्हणून झाला त्रास. ही अमेरिकन महागडी दारू पिऊन बघ, मग सांग मला. आम्ही अमेरिकेत रोज दारू पितो अन् काहीही होत नाही.’’

आपला मोठेपणा मिरवण्याच्या नादात काकांना, दारू सोडणाऱ्याला माणसाला दारूचा आग्रह करू नये, एवढा पोचही नव्हता. दारू शेवटी दारूच असते. देशी काय अन् विलायती काय.

झालं! पीयूषला तेवढंच निमित्त पुरलं. काका होते तोवर रोजच दारू होती. कोकिळाचा जीव कासाविस व्हायचा. ती त्याला विनवायची, धमकी द्यायची, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट एक दिवस तो तिच्यावरच चिडला.

‘‘तुला म्हणायचंय काय? कधी नव्हे ते काका आलेत, त्यांना सांगू, तुम्ही एकटेच घ्या. मी तुम्हाला कंपनी देऊ शकत नाही? तू थोडं समजून घेता, मी फक्त कंपनी देतोय. ज्या दिवशी काका जातील मी दारूकडे बघणारही नाही. तू काळजी करू नकोस. मी वचन देतो…’’

काकांचा मुक्काम एकदाचा हलला पण पीयूषची सवय गेली नाही. तो रोज पिऊनच घरी यायचा. एकदा कोकिळानं रात्री दार उघडलं नाही, ‘‘तुम्ही आपलं वचन विसरताय पण मी नाही विसरत, यापुढे पिऊन आलात तर घराबाहेरच रहा. मी दार उघडणार नाही.’’

‘‘ऐक कोकिळा, आज घरात घे मला. यापुढे मी बाहेरून पिऊन येणार नाही. घरीच घेत जाईन…मग तर चालेल ना?’’

‘‘पियूष, मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करा.’’

‘‘बरं तर, मी बाहेरच्या गॅरेजमध्ये बसून पीत जाईन.’’

कोकिळा काय बोलणार? दारूड्याला स्थळ, काळ, नाती कशाचंही भान नसतं. त्याला फक्त दारू हवी असते. नाराजीनं का होईना पण कोकिळानं त्याला गॅरेजमध्ये बसून पिण्याची परवानगी दिल्यावर तो रोज सायंकाळी गॅरेजचा दरवाजा आतून बंद करून दारू प्यायचा व जेवायला, झोपायला घरात यायचा.

त्या रात्री तो दोनदा धडपडला, त्याला तोल सावरता येत नव्हता. ‘‘पीयूष, काल रात्री तुम्ही अख्खी बाटली संपवलीत? कसं सुटणार हे व्यसन? तुम्ही पक्के दारूडे झाला आहात.’’ चिडून कोकिळानं म्हटलं.

‘‘मला माफ कर कोकिळा, आता बघ, फक्त दोन पेग…यापुढे तूच बघ…फक्त दोन पेग,’’ तो गयावया करत होता.

सकाळी उठला की पीयूष क्षमा मागायचा. रात्र झाली की दारू त्याच्यावर अंमळ गाजवायची.

त्या रात्री पुन्हा एकदा प्रंचड पिऊन घरात आला तेव्हा कोकिळाचा पारा खूपच चढला होता. तिनं त्याला खोलीत येऊ दिलं नाही. ती चिडून म्हणाली, ‘‘माझ्या अन् माझ्या मोलकरणीच्या नवऱ्यात एवढाच फरक आहे की तो तिच्या पैशानं दारू पिऊन तिलाच झोडपतो अन् माझा नवरा स्वत:च्या पैशानं दारू पिऊन गुपचुप झोपून टाकतो. पण शरीराची नासाडी दोघांच्याही होतेच अन् आमच्या संसाराचाही सत्यानाश होतोच. पीयूष, यापुढे माझ्या खोलीत यायचं नाही.’’

यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. पीयूष दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. हळूहळू दोघांमधली दरी वाढू लागली. कोकिळा पीयूषवर खूपच नाराज होती. आता तर तिनं त्याला काही म्हणणंही सोडून दिलं होतं.

हल्ली पीयूषची तब्येत सतत बिघडत होती. तो खूप अशक्त झाला होता. डॉक्टरकडे गेला तेव्हा फार उशीर झाला होता. त्याचं लिव्हर पार कामातून गेलं होतं. डॉक्टरांनी त्याला किती तरी टेस्ट करायला लावल्या. रात्रंदिवस डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कोकिळा थकून गेली होती. पीयूषला सांभाळताना तिचं मुलांकडे दुर्लक्ष होत होतं. तिच्या मैत्रिणी तिला मदत करत होत्या.

सगळ्या तपासण्या अन् उपचाराचं बिल अठरा लाख रूपये झालं. दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका पैसा कसा उभा करणार? जमीन, सेव्हींग, सोनंनाणं सगळं विकावं लागणार.

शेयर्स व इन्शुरन्सची कागदपत्र घेऊन कोकिळा व पीयूष वकीलाकडून परतून येताना कोकिळाला रडून अनावर झालं. ‘‘पीयूष, हे काय होऊन बसलं आपल्या सुंदर संसाराचं? कुठं होतो आपण अन् आज कुठं आहोत..तुम्ही खूप आधीच सावध व्हायला हवं होतं.’’

कोकिळेची स्थिती बघून पीयूषचेही डोळे भरून आले. खरंच, किती सांगत होती कोकिळा. त्यानं तिचं ऐकायला हवं होतं. संसार, मुलं सर्वांकडे दुर्लक्ष झालं. आता काय होणार? डबडबलेल्या डोळ्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. गाडी ट्रकवर आदळली. पीयूष व कोकिळा जागच्या जागी ठार झाली.

त्यांची जुळी मुलं या जगात एकटी पडली. कोण त्यांना सांभाळणार? नावाडी जर नांव बुडवायला निघाला तर नावेत बसणाऱ्यांच्या जिवाची काळजी कोण घेणार?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें