ते उमळून येणं

कथा * पूनम अत्रे

गौरी हसते ना तेव्हा माझ्यया अवतीभवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. या वयातही तिचं हसणं किती निर्मळ अन् निरागस आहे…तिच्या स्वच्छ, निष्कपट मनांचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसतं.’’ अनिरूद्ध सांगत होता अन् शेखर ऐकत होता. गौरी शेखरची बायको होती अन् तिचा प्रियकर अनिरूद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार अन् संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरूद्धला मारून मारून अर्धमेला केला असता. पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कातल्या बाकावर बसून अनिरूद्धची बडबड ऐकून घेत होता.

‘‘चला निघूया…माझं काय? सध्या मी एकटा जीव सदाशिव…पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुंलंबाळं असतील ना? ती वाट बघतील…’’

‘‘का हो? आज गौरी भेटायला नाही येणार?’’

‘‘आज शनिवार. आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते अन् तिचा नवरा अन् मुलं यातच तिचा प्राण वसलेला आहे.’’

‘‘तरीही ती तुम्हाला भेटते? का?’’

‘‘तुम्हाला नाही समजणार.’’

‘‘सांगून तर बघा…’’

‘‘नंतर कधी तरी…बाय…’’ बोलून अनिरूद्ध गेलासुद्धा. पण संतापानं ठणकणारी आपली कानशिलं दाबत शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्याव्या का? तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघडं करावं? नाही, शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही. गौरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करते. त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं अन् कशासाठी चाललंय? हा अनिरूद्ध मध्येच कुठून टपकला?

गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडी त्यानं आठवून बघितल्या. तो बघत होता गौरी हल्ली खूप उत्साही अन् आनंदात दिसते. स्वत:विषयी बरीच जागरूक झालीय. सकाळी फिरायला जाते. ब्यूटीपार्लरला जाते. फेशिअल, हेअर स्टाइल काय अन् काय…पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घालते. सुंदर तर ती होतीच, आता तर खूपच स्मार्टही दिसते. नवरा, मुलं, घरकाम, मुलांचे अभ्यास, वेळच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. अजूनही करते पण हल्ली स्वत:वरही लक्ष देतेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते.

शेखरवर तिचं प्रेम होतंच. अजूनही ती त्याची कोणतीच मागणी अमान्य करत नाही, पण तरीही काहीतरी बदललंय. काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतंय. आजतागायत गौरीनं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नव्हती. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं चारित्र्य…कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती. त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं. पण गौरीतला हा बदल कशामुळे का? हे कळायला हवं. तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची. काय करावं? त्यानं मनात अनेक योजना तयार केल्या.

शेखरला गौरीचा मोबाइल चेक करायचा होता. पण त्याचं धाडस होत नव्हतं. त्याच्या घरातला हा अलिखित नियम होता, कोणी कुणाच्या फोनला हात लावत नसे. मुलांना दिलेले फोनही त्यांनी कधीच चेक केले नव्हते. पण काहीतरी करायला हवंय.

एकदा गौरी अंघोळ करायला गेली असताना शेखरनं तिचा मोबाइल चेक केला. कुणा अनिरूद्धचे बरेच मेसेजेस होते. त्यातल्या बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गौरीनं आपल्या नवऱ्याची अन् मुलांची खूप स्तुती केली होती. अनिरूद्धला भेटायचे प्रोग्राम होते. अनिरूद्ध? कोण आहे हा अनिरूद्ध? शेखरनं आठवून बघितलं अन् त्याला आठवलं.

गौरी एक दिवस म्हणाली होती, ‘‘शेखर, आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटला. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं. तो इथंच आहे. बनारसला.’’

‘‘असं?’’

‘‘हो ना? मी कधी तरी तुमच्याशी त्याची भेट घालून देईन. कधी तरी घरी बोलावू का त्याला?’’

‘‘त्याची फॅमिली आहे इथं?’’

‘‘नाही. फॅमिली लखनौला आहे. त्याची बायको नोकरी करते. दोन्ही मुलंही तिथंच शिकताहेत. सध्या बदलीमुळे इथं एकटाच राहतोय. अधूनमधून जात येत असतो लखनौला.’’

‘‘ठीक आहे, बघूया बोलवण्याचं कधीतरी…’’ कोरडेपणाने शेखरने म्हटलं होतं. त्यानंतर गौरीनं कधी हा विषय काढला नाही. पण गौरीत होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होतं. आज, अगदी याक्षणीही ती मुलांची समर्पित आई, शेखरची त्याला समर्पित पत्नी अन् घराला समर्पित गृहिणी होती. तरीही शेखरला काहीतरी खटकत होतं.

फोन चेक केल्यानंतर शेखरनं ही बाब जरा गंभीरपणे घेतली. सामान्य बुद्धिच्या, असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं, शिव्या देणं, अपशब्द वापरणं या गोष्टी त्याच्या सुसंस्कृतपणात बसत नव्हत्या. या विषयावर इतर कुणाशी बोलून गौरीबद्दल वाईट मत बनवणं त्याला मान्य नव्हतं. ती त्याची पत्नी होती अन् दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं.

एक दिवस गौरी म्हणाली, ‘‘शेखर, आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. मोबाइलवरून आपण संपर्कात राहूच.’’

शेखर एकदम सावध झाला. ‘‘कुठं जायचं आहे?’’

‘‘एका फ्रेंडला भेटायला?’’

‘‘कोण? फ्रेंड?’’

‘‘रचना.’’

शेखरनं पुढे काहीच विचारलं नाही. पण दुपारी तो ऑफिसातून निघाला अन् घराच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला. मुलं शाळेतून आली. शेखरनं अंदाज बांधला की ती मुलांचं खाणंपिणं वगैरे आटोपून आता बाहेर पडेल. तसंच झालं. गौरी नटूनथटून घराबाहेर पडली. मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला. आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला. पण एकदम अनिरूद्धचा विचार मनात येताच मनांत संताप दाटून आला.

गौरी पायीच निघाली. थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती. तिथल्या एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एका पुरुषानं हात हलवला. आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कोण बरं? अरेच्चा हा तर रोज बागेत सायंकाळी फिरायला येतो. शेखरच्या मनात आलं… आत्ताच्या आत्ता गौरीला हात धरून ओढत आणावं अन् तिच्या पापाचं माप तिच्या पदरानं घालावं. पण त्यानं तसं काही केलं नाही. तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला. ऑफिसला गेलाच नाही. मुलं त्याला बघून चकित झाली. तो गुपचूप बेडरूममध्ये जाऊन अंथरूणावर पडून राहिला. खूप थकलेला, दुखावलेला, त्रस्त, आतून बाहेरून भाजून निघत…हे घर, सगळं हौशीनं घेतलेलं सामान, किती कष्टानं उभा केलेला संसार, मुलं, त्यांच्या भवितव्याची स्वप्नं…आज सगळंच विस्कटल्यासारखं झालं.

नालायक, निर्लज्ज, विश्वासघातकी, मनातल्या मनात तो गौरीला काय काय दूषणं देत होता.

शेखर त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईवडिल गावी रहायचे. गौरीचेही आईवडिल आता हयात नव्हते. ती ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. अशा बदफैली बायकोसोबत राहायला नको वाटत होतं. पण असं काय घडलंय? त्यांचे संबंध आजही चांगलेच आहेत. तर मग गौरीला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता भासली ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकृष्ट द्ब्राली? समजा त्याच्याकडून असं घडलं असतं तर? तो एखादीच्या नादी लागला असता तर? गौरीनं काय प्रतिक्रिया दिली असती? त्यानं एकूण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वत:चं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं अन् संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं.

तो जर असा बहकला असता तर गौरीनं निश्चितपणे प्रेमानं, संयमानं सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता. इतक्या वर्षांची तपश्चर्या करून थाटलेलं घर, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं असं क्षणात विस्कटू दिलं नसतं. त्यानंही गौरीला समजून घ्यायला हवं. नेमकं काय आहे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं.

दोन तासातच गौरी आली. तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं. शेखरला पलंगावर झोपलेला बघून ती दचकली. प्रेमानं त्याच्याजवळ बसत, त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली, ‘‘मला फोन का केला नाहीत? मी लगेच आले असते ना?’’

‘‘रचनाला सोडून?’’

‘‘तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाहीए माझ्या आयुष्यात.’’ गौरीनं त्याच्या गालावर ओठ टेकवले.

शेखरनं तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, ‘‘खूप सुंदर दिसते आहेस…’’

‘‘खरं?’’

‘‘तुझी फ्रेंड कशी आहे?’’

‘‘बरी आहे.’’ एवढं बोलून गौरी उठली अन् म्हणाली, ‘‘चहा करून आणते. तुम्हाला खायला काही करू का?’’

‘‘नको…चहाच कर…’’

गाणं गुणगुणत गौरी चहा करायला गेली. शेखर स्तब्ध होता. इतकी फ्रेश, इतकी आनंदात का? काय घडलंय? बस्स, याच्यापुढे शेखरला काही कल्पना करावीशी वाटली नाही. त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती.

शेखर आता रोज नियमितपणे बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला. तो मनमिळाऊ अन् स्मार्ट होता. त्यानं बघता बघता अनिरूद्धशी ओळख करून घेतली…जाणूनबुजून मैत्री वाढवली. स्वत:चं नाव त्यानं विनय सांगितलं.

अनिरूद्धशी मैत्री वाढवून त्याच्याकडून शेखर त्याच्या अन् गौरीच्या नात्याविषयी जाणून घेणार होता. दोघांची मैत्री वाढली होती. गौरीचं नाव न घेता शेखर अनिरूद्धला आपल्या संसाराविषयी, ऑफिसविषयी सांगायचा.

अनिरूद्धनंही सांगितलं, ‘‘सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करतेय. दोन मुलांची शाळाही छान आहे. तिथून काही दिवसांसाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही. कारण तिथं त्यांचं उत्तम चाललं आहे. त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतंय.’’

शेखर दचकला. म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही? याचाच अर्थ हे नातं ही अस्थिरच आहे. पुढे त्याचं काय होईल? शेखर वाट बघत होता की अनिरूद्ध त्याच्या अन् गौरीच्या संबंधांबद्दल त्याच्याशी केव्हातरी बोलेल. तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी दुपारी एखाद्या लंचहोमला न्यायचा. ‘‘आजही माझी बायको माहेरी गेली आहे. चल, आपण एकत्र जेऊयात.’’

अनिरूद्धशी जवळीक वाढवत होता तो अन् एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं. शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं. ‘‘इथं माझी एक मैत्रीण राहते. गौरी नाव आहे तिचं.’’

शेखरच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. हाताचे तळवे घामेजले. कुणा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं.

‘‘गौरी खूप चांगली आहे. आम्ही एकत्र शिकत होतो. अचानक फेसबुकवर भेटली.’’ अनिरूद्ध सांगत होता.

‘‘असं? लग्न झालंय तिचं?’’

‘‘हो…लग्न झालंय, नवरा, दोन मुलं…त्या तिघांमध्येच तिचा प्राण वसतोय. ती कुठंही असू देत तिचा जीव नवरा अन् मुलांमध्येच गुंतलेला असतो.’’

‘‘मग ती तुमच्याबरोबर?’’

‘‘मैत्री आहे आमची.’’ अनिरूद्धनं विषय टाळला.

शेखरनंही त्याला फार छेडलं नाही. पण त्यानंतर अनिरूद्ध अधूनमधून गौरीचा विषय काढायचा. त्यानं बोलताना हे ही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकांची मित्र होती…त्यांचं नातं प्रियकर प्रेयसीचं कधीच नव्हतं अन् आजही नाही.

अनिरूद्ध निघून गेला तरीही बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करंत होता. मग उठून खिन्न मनानं घरी परत आला.

शनिवार होता. सुट्टी होती. गौरीनं पाठीमागून त्याला मिठी मारत विचारलं, ‘‘कसल्या विचारात आहात? फिरून आलात अन् असे खिन्न का दिसताय?’’

शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली. तिला दूर सारत तो म्हणाला, ‘‘काही नाही, कामाचं टेन्शन आहे.’’

‘‘गारगार सरबत देऊ? की गरम चहा आवडेल?’’ गौरीनं विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली अन् तो खोलीत गेला. गौरी स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

हल्ली शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. गौरीसमोर तो काही बोलू शकत नव्हता पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा. तिला चांगली बदडून काढावी असं वाटायचं, अनिरूद्धला समोर आणून उभं करावं अन् जाब विचारावा असं वाटायचं.

पण इतकी वर्षं निष्ठेनं संसार करणारी गौरी आठवायची. तिचं समर्पण, तिचं निर्मल मन, कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं…मग अनिरूद्ध तिच्या आयुष्यात का आहे? आज अनिरूद्धकडून सगळंच जाणून घ्यायचं या विचारानं त्यानं अनिरूद्धला फोन लावला.

‘‘काय करतो आहेस? आज लंच एकत्र घेऊयात?’’

‘‘अरे, आज रविवार…तुझी फॅमिली…’’

‘‘आज त्यांना एका ठिकाणी लंचला बोलावलंय. मी तिथं बोअर होईन म्हणून आधीच त्यांची क्षमा मागून आपला कार्यक्रम ठरवलाय.’’

‘‘बरंय, येतो मी.’’

ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले. शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर शेखरनं विचारलं, ‘‘तुझ्या फ्रेंडचं कसं चाललंय? कुठवर आलंय प्रकरण? फक्त मैत्रीच आहे की अजून…?’’

‘‘हे असं सगळं सांगायचं नसतं, मित्रा.’’ हसून अनिरूद्ध बोलला.

‘‘म्हणजे? तुमच्या मैत्रीत शारीरिक/लैंगिक संबंधंही…’’

त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत अनिरूद्ध म्हणाला, ‘‘चल, आज तुला सांगतोच सगळं…गौरी खरोखर अतिशय चांगली आहे. पूर्वीपासूनच ती मर्यादशील, शीलवान होती. आजही ती तशीच आहे. ती आदर्श गृहिणी, प्रेमळ समर्पित पत्नी अन् उत्तम आई आहे. आमच्यात पूर्वी होती तशीच निखळ मैत्री अजूनदेखील आहे. पूर्वी आम्ही भेटत असू तेव्हा जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो. मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो. ती नि:संकोचपणे मला भेटायला येते. एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना मी प्रथमच तिचा हात धरला. हात हातात घेतला अन् मला वाटलं…खरंच किती मृदु अन् उबदार आहे हा स्पर्श…सगळं जगच असं असतं तर? मी आवेगानं तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं. तिनं प्रथम विरोध केला, पण नंतर जे घडायला नको ते घडून गेलं. खरं सांगतो त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती. फक्त आपलेपणाची ऊब अन् जाणीव होती. मला स्वत:लाही वाटलं की मी असा उमलून आलोय आत्ता, तसा पत्नीबरोबर प्रणय करताना उमलून येत नव्हतो. गौरीनंही मान्य केलं, जे घडलं त्या क्षणांची, त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. तिच्या पतीबरोबरच्या प्रणयात ती अशी उमलून येत नाही. ती असोशी, ती ऊब, तो आपलेपणा अन् समर्पण पती बरोबरच्या सहवासात तिला मिळत नाही. तिचा नवरा खूप चांगला आहे पण अशा एकांतात, भावनोत्कट क्षणांतही तो एखाद्या मशीनसारखा वागतो. त्याच्या स्पर्शातली जादूच जणू नाहीशी झाली आहे.

आमच्यात घडलेल्या…अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणांनी आम्हा दोघांना भरभरून सुख दिलं. नुसतंच सुख नाही, समाधान अन् ऊर्जाही दिली. गौरीला प्रत्येक गोष्टीची हौस आहे, आवड आहे. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडतो. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंदोत्सव म्हणून जगायचा असतो. सर्वांगानं उमलून येऊन, मनाच्या गाभाऱ्यातही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमँटिक समर्पण करायचं असतं. तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम आहे. ती त्याचा विश्वासघात करणार नाही. पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यातली एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे. कधी कधी काही क्षणांत माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्याक्षणी गौरीला असंच वाटलं.’’ अनिरूद्ध बोलत होता. जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता.

शेखर श्वास रोखून अनिरूद्धचं बोलणं ऐकत होता. अनिरूद्ध अजूनही बोलतच होता. ‘‘गौरी म्हणजे प्रेमासाठी आसूसलेलं वाळवंट आहे अन् मला वाटतं, तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढंगाप्रमाणे धोधो बरसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं, झोपणं, जेवणं, कार्यक्रमाला जाणं, नातेवाईंकांकडे जाणं, त्यांना घरी बोलावणं वगैरे सगळं सगळं आहे पण प्रणयातली ऊब, ऊष्मा नाहीशी झाली आहे. तिचा नवरा प्रेमळ आहे, त्याला तिचा अभिमान वाटतो. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही. विसाव्याचं एकमेव स्थान म्हणजे तिचा नवराच आहे, पण…हा पणच एक मध्ये येतो. तिच्या प्राणांहून प्रिय असलेल्या त्याला गौरीला प्रेम हवंय हे कळत नाही.’’

शेखर आत्तापर्यंत स्वत:ला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता. याक्षणी मात्र त्याचा स्वत:विषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता.

‘‘मित्रा, आज मी माझं मन तुझ्याजवळ मोकळं केलंय. पण माझ्या मनावर एक ओझं, एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केलाय का? पण काय        करू? ती तिच्या करियरमध्ये मग्न आहे. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून पण तिला माझं नसणं जाणवत नाही. अन् इथं गौरी आपल्यानवऱ्याबरोबर राहतानाही प्रेमाचे उत्कृट क्षण शोधते आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना? माझे ट्रान्सफरसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

शेखरनं दचकून विचारलं, ‘‘ट्रान्सफर? तुझी ट्रान्सफर?’’

‘‘हो ना, सीमा इथं यायची नाही. मुलांना बाबा त्यांच्या जवळ हवे आहेत अन् घर सांभाळणं ही एकट्या सीमाचीच जबाबदारी नाहीए ना? संसार दोघांचा असतो…’’

समोर बसलेला अनिरूद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला. त्याच्यापेक्षा समजूतदार अन् मोठ्या मनाचा. बिल अनिरूद्धनंच दिलं. मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले.

शेखर घरी पोहोचला तोवर दुपार उलटून गेली होती. मुलं दिसली नाहीत. ‘‘मुलं कुठायेत?’’ त्यानं विचारलं.

‘‘मित्राकडे बर्थ डे पार्टीला गेलीत.’’

‘‘याचा अर्थ घरात फक्त आपण दोघंच आहोत?’’

‘‘हं!’’

खरं तर मघापासून त्याच्या मनांत गौरीबद्दल खूप राग होता. पण तिला बघताच    त्याचा राग निवळला. त्यानं गौरीला एकदम उचलून घेतलं. गौरी चकित झाली अन् मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं आपण कसं काय करतोय याचं स्वत: शेखरलाही आश्चर्य वाटत होतं. त्यानं गौरीवर प्रेमाचा पाऊस पाडला. चकित झालेली गौरी तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली. शेखरला स्वत:लाच जाणवलं की गौरीबरोबर असा वेळ घालवल्याला किती तरी वर्षं उलटून गेली होती. गेली कित्येत वर्षं तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवतो आहे. गौरीच्या चेहऱ्यावरची तृप्ती अन् आनंद शेखरला किती काही समजावून गेला.

किती तरी वेळ शेखरनं गौरीला मिठीतून मोकळी केली नाही. तेव्हा हसून गौरी म्हणाली, ‘‘आज काय झालंय तुम्हाला?’’

‘‘का? तुला आवडत नाहीए?’’

‘‘मी तर अशा क्षणांची वाटच बघत आहे…खरं तर असे क्षण शोधत असते…मला का नाही आवडणार?’’ शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतली. दोघं किती तरी वेळ खूप काहीबाही बोलत होती. किती तरी वर्षांनी दोघांनी असा वेळ एकमेकांसोबत घालवला होता.

थोड्या वेळानं मुलं घरी आली. मग दोघांनी काही वेळ मुलांबरोबर गप्पा करण्यात, त्यांच्या पार्टीची गम्मतजम्मत ऐकण्यात घालवला.

पुढले दोन दिवस शेखर खूप गडबडीत होता. बागेत फिरायलाही नाही गेला, त्यामुळे अनिरूद्धही भेटला नाही. तिसऱ्या दिवशी बागेत अनिरूद्धची भेट झाली.

‘‘माझी बदली झाली आहे. मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय.’’

शेखर दचकला, ‘‘अन् तुझी मैत्रीण? तिला माहीत आहे हे?’’

‘‘अजून नाही. आता फोन करून सांगेन.’’

‘‘का? तुमची भेट नाही झाली?’’

‘‘नाही, तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत. ती कुणालाही हा महत्त्वाचा वेळ देऊ शकत नाही.’’

‘‘याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही?’’

‘‘असंच दिसतंय.’’

दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गौरीकडे बघितलं. तिला अनिरूद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का? त्याच्या जाण्यानं ती दु:खी, उदास झाली आहे का? पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही. गौरी मुलांचा अभ्यास घेत होती. शेखर फ्रेश होऊन आला तशी तिनं मुलांना म्हटलं, ‘‘मी  पप्पांसाठी चहा करते. तुम्ही तुमचा अभ्यास करा.’’

ड्राइंगरूममध्ये चहा घेताना शेखरनं प्रथम आपल्या ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या. मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली. मग सहजच विचारलं, ‘‘तुझ्या त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालं? नाव काय त्याचं तू सांगितलं होतंस?’’

‘‘तो अनिरूद्ध…चांगलाय. तो परत जातोय लखनौला. त्याची ट्रान्सफर झाली आहे.’’

‘‘अरेच्चा? ट्रान्सफर झालीय?’’

‘‘चांगलं झालं ना, त्यांचं घर आहे तिथं, बायको, मुलं इथंच बिचारा एकटा होता. बरं, आता तुम्ही टीव्ही बघा, आराम करा. मी स्वयंपाकांचं बघते अन् मग पुन्हा मुलांचा अभ्यास घेते,’’ गौरीनं म्हटलं.

अनिरूद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गौरीला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्यानं गौरीला जवळ ओढून मिठीत घेतलं.

वैभवातलं दु:ख

कथा * रवी चांदेकर

ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. साक्षी आपलं सामान आवरत होती. तिनं स्वत:चे केस व्यवस्थित केले. चेहरा स्वच्छ पुसला. नवऱ्यालाही आवरून घ्यायला सांगितलं. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या शर्टकडे गेलं. ‘‘हे काय? कसला डाग पडलाय शर्टवर?’’ तिनं विचारलं.

‘‘अगं, काल रात्री जेवताना सांडलंय काहीतरी,’’ तो खजील होऊन म्हणाला.

साक्षी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. सावळी पण अत्यंत आकर्षक. नवरा सौरभ सरकारी नोकरीत साधा क्लार्क होता. लग्नाला पंधरा वर्षं झाली होती. एक मुलगा होता तेरा वर्षांचा.

साक्षीच्या गावात एकच सरकारी कॉलेज होतं. गावातील अन् आसपासच्या कसब्यातील गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय अशा सर्वच थरातील मुली तिथंच शिकायच्या. गावातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी कामिनीही साक्षीच्याच वर्गात होती. खरंतर आर्थिक दृष्टीनं कामिनी मोठ्या शहरातल्या कॉलेजात शिकू शकली असती. पण घरातून तिला बाहेर गावी पाठवण्याची परवानगी नसल्यानं तिनं इथंच शिकायचं ठरवलं.

एकाच वर्गात, एकाच कॉलेजात असल्यानं साक्षी व कामिनीची खूपच छान मैत्री होती. कॉलेजव्यतिरिक्त वेळ मिळेल तेव्हा दोघी एकत्र असायच्या. त्यांच्या मैत्रीचं घरच्यांना अन् गावातील लोकांनाही कौतुक होतं.

ग्रॅज्यूएट झाल्या झाल्या कामिनीला एक चांगलं स्थळ सांगून आलं अन् ती लग्न करून सासरी दिल्लीला निघून गेली.

साक्षीचं लग्न ठरण्यात सर्वात मोठी अडचण त्यांची आर्थिक परिस्थिती होती. सोनं, हुंडा, मानपान त्यांना गरीबीमुळे शक्य नव्हतं अन् पैशाशिवाय चांगलं स्थळ मिळत नव्हतं. शेवटी एकदाचं साक्षीचंही लग्न ठरलं. गावातलंच सासर मिळालं. लग्नानंतर दोघां मैत्रिणींची ताटातूट झाली. कामिनी दिल्लीला असेल एवढंच साक्षीला माहीत होतं. पण पत्ता वगैरे काहीच ठाऊक नव्हता. कामिनीच्या वडिलांनीही इथला व्यापार व्यवसाय आवरून दिल्लीलाच मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता. आता माहेरच या गावात नाही म्हटल्यावर कामिनी तरी मुद्दाम वाकडी वाट करून इकडे कशाला येणार? त्यामुळेच दुरावा जास्त जाणवत होता.

साक्षीचा नवरा सरकारी नोकरीत होता, पण साधा कारकून होता. बेताच्या उत्पन्नात ती कसाबसा संसार रेटत होती. सकाळ व्हायची, दुपार व्हायची, रात्र व्हायची, दिवसामागून दिवस असेच कंटाळवाणे जात होते. साक्षीला या नीरस आयुष्याचा कंटाळा आला होता. काहीतरी बदल, कुठला तरी प्रवास असं तिला हवं होतं. अशावेळी तर तिला कामिनीची खूपच आठवण यायची. मनात यायचं, कामिनी श्रीमंतीत, दिल्लीसारख्या ठिकाणी किती मजेत राहत असेल. लग्नाला चौदा वर्षं झाली. एवढ्या अवधीत साक्षीला कामिनीची काहीही माहिती मिळाली नव्हती. कॉलेजमधल्या सोबत शिकणाऱ्या मुलींपैकी कधी कुणी गावी माहेरी आल्या तर भेटायच्या.

याच सुमारास दिल्लीहून कुठल्यातरी कामासाठी कामिनीचे वडील आपल्या जुन्या गावी आले होते. ते आवर्जून साक्षीला भेटले. त्यांनी साक्षीला कामिनीचा पत्ता व फोन नंबर दिला. साक्षीला खूप आनंद झाला. आता दोघी मैत्रीणी फोनवर बोलायच्या. दोघींजवळ सांगायला इतक्या वर्षांतल्या कितीतरी घडामोडी होत्या.

कामिनी तिला म्हणायची, ‘‘दिल्लीला ये. तुला दिल्ली दाखवेन.’’ साक्षीला ठाऊक होतं, आपला नवरा तयार होणार नाही. त्याला आपलं काम बरं, आपण बरे असं वाटायचं. त्यामुळे साक्षी तिच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत नव्हती.

शेवटी एकदा साक्षीचा नवरा दिल्लीला यायला राजी झाला. साक्षीला खूप आनंद झाला. तिनं कामिनीला ती नवऱ्यासह येत असल्याचं कळवलं. कामिनीनंही ती स्वत: रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करायला येईल हे कळवलं. कितीतरी दिवसांनी साक्षी प्रवासाला निघाली होती. त्यातून दिल्लीला, लाडक्या मैत्रीणीकडे…साक्षी खूपच आनंदात होती. तिनं ऐकलं होतं साक्षीच्या सासरी खूप वैभव आहे. गाडी, बंगला, नोकरचाकर, नवराही दिसायला चांगला अन् वागायला समजूतदार आहे. कामिनीचा संसार बघायची, तिला कडकडून भेटायची साक्षीला घाई झाली होती.

गाडी स्टेशनवर आली. सामानासह साक्षी उतरली. कामिनी तिला घ्यायला आली होती. दोघींनी एकमेकांना बघितलं अन् त्यांचे चेहरे आनंदानं फुलले. कामिनी तर आता अधिकच सुंदर दिसत होती. तिचं वय जणू तिथंच थांबलं होतं. जीन्स आणि टॉपमध्ये ती अजूनच स्मार्ट दिसत होती. कॉलेजला जाणारी मुलगीच वाटत होती.

कामिनी स्वत:च कार ड्राइव्ह करत होती. दिल्लीच्या रूंद गुळगुळीत डांबरी रस्त्यांवरून तिची गाडी चालली होती. साक्षी तिच्या शेजारी बसली होती. सौरभ मागे बसला होता.

‘‘तू एकटीच का आलीस? भावोजी का नाही आले?’’ साक्षीनं बाळबोध प्रश्न विचारला.

‘‘अगं बाई, ही दिल्ली आहे. इथे, जो तो आपापल्या वाट्याचं आयुष्य जगत असतो,’’ कामिनीनं तिला महानगरातल्या आयुष्याची कल्पना दिली.

‘‘तुझ्या भावजींशी पटत नाही का?’’ साक्षीनं पुन्हा भाबडेपणानं विचारलं.

‘‘तसं नाही गं! म्हणजे काय आहे, वैभव रात्री उशीरा घरी येतात, आल्यावरही बराच वेळ कॉम्प्युटरवरच काम करत असतात, त्यामुळे सकाळी लवकर उठणं त्यांना जमत नाही,’’ कामिनीनं खुलासा केला.

‘‘अस्सं होय! पण हे तर अवघडंच आहे गं बाई!’’

‘‘अवघड कसलं आलंय? आता तर हेच रूटीन आयुष्य झालंय,’’ कामिनी म्हणाली.

बोलताबोलता कितीतरी अंतर कापून कार घरी पोहोचलीसुद्धा. कामिनीचं घर म्हणजे राजमहालच होता. कितीतरी लक्झरी कार्स उभ्या होत्या. घरासमोर गार्ड होता. बागेत दोन तीन माळी काम करत होते. गार्डनं अत्यंत शोभिवंत अन् भक्कम असा लोखंडी दरवाजा म्हणजे कंपाउंड गेट उघडलं. कामिनीनं गाडी सरळ आत घेतली. लगेच दोन नोकर धावत आले. हे सगळं बघून साक्षीला कामिनीचा हेवा वाटला…काय थाट आहे हिचा…व्वा!

‘‘गाडीतलं सामान काढा आणि गेस्ट हाउसमध्ये ठेवा,’’ कामिनीनं मालकिणीच्या रूबाबत म्हटलं.

मग साक्षी अन् सौरभकडे बघून तिनं प्रेमानं म्हटलं, ‘‘ये साक्षी, भाओजी, या ना…प्लीज.’’

साक्षी अन् सौरभ चकित होऊन बघत होते. सगळीकडे श्रीमंती अन् उत्तम व्यवस्था जाणवत होती. सौरभनं कोपरानं साक्षीला डिवचून खुणेनंच म्हटलं, ‘‘काय मस्त आहे ना?’’ त्यांनी तर फक्त सिनेमात असे महाल बघितले होते. एखाद्या फिल्मच्या सेटवरच आलोय असं त्यांना वाटलं.

त्यांना दिलेल्या गेस्टरूमच्या किंगसाईज बेडवर पडून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. मग त्यांच्या स्वत:च्या घरातल्या हॉलएवढ्या मोठ्या बाथरूममध्ये स्नान उरकून घेतलं. स्वच्छ, शुभ्र संगमरवरी बाथरूममध्ये उत्तम प्रतीच्या पोर्सेलिनची सॅनिटरी वेयर्स होती. गरम थंड पाण्याच्या स्टीलच्या चकचकीत तोट्या, उंची साबण व शांपू, पावडर, सेंट शॉवर खाली अंघोळ केल्यावर खूपच प्रसन्न वाटलं. एवढ्यात नोकरानं दारावर टकटक करून सांगितलं की बाईसाहेब नाश्त्यासाठी वाट बघताहेत.

सकाळचे अकरा वाजत आलेले. ब्रेकफास्ट टेबलाशी कामिनी व वैभव बसले होते. साक्षी व सौरभ तिथं पोहोचले. साक्षीनं टेबलकडे एक नजर टाकली…अनेक पदार्थ तिथं मांडलेले होते.

‘‘ये साक्षी, या भाओजी, हे वैभव, माझे पती.’’ कामिनीनं ओळख करून दिली. वैभवनं साक्षीकडे बघितलं तर तिच्या आकर्षक चेहऱ्यावर त्याची दृष्टीच खिळून राहिली. देखण्या कामिनीपेक्षाही साक्षीचं रूप त्याला अधिक आकर्षक वाटलं. सौरभच्या लक्षात आलं, वैभव टक लावून साक्षीकडे बघतोय. त्यानं पटकन् पुढे होत हॅलो म्हणत वैभवशी शेकहॅन्ड केला, ‘‘मी सौरभ,’’ त्यानं म्हटलं.

‘‘हो, ही माझी मैत्रीण साक्षी आणि हे माझे भाओजी आपण जिजू म्हणतो ना? तेच हे,’’ कामिनी म्हणाली.

नाश्ता करताना कामिनीला वैभवनं विचारलं, ‘‘आज तुमचा काय कार्यक्रम असेल?’’

‘‘माझा सगळाच वेळ आता साक्षी अन् जिजूबरोबर असणार आहे. जोपर्यंत हे दिल्लीत आहेत, तोवर मी ह्यांच्याच बरोबर राहीन,’’ साक्षीच्या हातावर आपला हात ठेवत कामिनी म्हणाली.

‘‘ठीक आहे. यांची नीट काळजी घे. त्यांना भरपूर फिरवून आण. सगळी दिल्ली दाखव. मला आता निघायचं आहे. रात्री माझी वाट बघू नकोस. मी कदाचित घरी येईन, कदाचित बाहेरच रात्री राहावं लागेल,’’ वैभव म्हणाला.

‘‘प्लीज वैभव, निदान एक दोन दिवस तरी…’’ पुढे कामिनीला बोलायचं होतं,

पण जरा कडक आवाजातच. वैभव म्हणाला, ‘‘जरा समजून घेत जा. माझी महत्त्वाची डील्स एवढ्यातच व्हायची आहेत…मी सध्या बिझीच असेन.’’

‘‘ओ. के.’’ कामिनीनं म्हटलं. ज्या पद्धतीनं वैभव तिला बोलला होता ते नक्कीच अपमानास्पद होतं. तिनं डोळ्यांतलं पाणी लपवत साक्षीची नजर टाळली.

साक्षीला जाणवलं की कामिनी आणि वैभवचे संबंध चांगले म्हणजे निकोप नाहीत. ती काहीच बोलली नाही, पण वैभव सतत तिच्याकडे बघतोय याची जाणीव झाल्यामुळे थोडी कावरीबावरी झाली होती.

कामिनीनं संपूर्ण दुपार साक्षी व सौरभला खूप फिरवलं. इंडिया गेट, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसदभवन, लोधी गार्डन… किती तरी गोष्टी दाखवल्या. त्यांना खूप खायला प्यायला घातलं. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. दिवसभर तिघं गप्पा मारत होते. सायंकाळी घरी परतले.

रात्रीची जेवणं आटोपल्यावर कामिनीनं साक्षीला म्हटलं, ‘‘आजच्या रात्री तू भाओजींना सोड अन् माझ्याजवळ झोप. खूप वेळ आपल्याला गप्पा मारता येतील.’’

‘‘तू रोज माझ्याजवळ राहशील तर तुझ्या भाओजींना मी नेहमीकरता सोडू शकते,’’ गमतीनं हसत साक्षी म्हणाली.

‘‘नको गं, इतका अन्याय होऊ देणार नाही. फक्त इथं तुम्ही आहात, तेवढे दिवस तू माझ्याजवळ झोप,’’ कामिनीनं म्हटलं.

कामिनीनं साक्षीला तिच्या संसाराबद्दल विचारलं. ‘‘भाओजींबरोबर तू सुखात आहेस ना? संसार कसा चाललाय? मुलगा तुझ्याबरोबर आला असता तर छान झालं असतं. तो त्याच्या काकांकडे किती दिवस राहणार आहे? झी दिनचर्या काय असते? तुला काही प्रॉब्लेम तर नाहीए ना?’’

कामिनीचे प्रश्न संपत नव्हते. साक्षी म्हणाली, ‘‘आमचं काय घेऊन बसलीस गं? आमचं जगच मुळात छोटंसं आहे. आम्ही मध्यमवर्गीय माणसं. नवरा सकाळी नऊला ऑफिसात जातो. संध्याकाळी सहाला घरी परत येतो. तसं ऑफिस घरापासून फार लांब नाहीए. त्यामुळे कधी कधी जेवायला घरीच येतात. रात्री आठला जेवतात अन् दहापर्यंत झोपतोही आम्ही. सकाळी लवकर उठून आम्ही दोघं वॉकला जातो…बस्स! एवढंच आमचं आयुष्य…हीच आमची दिनचर्या.’’ साक्षी म्हणाली.

‘‘तुला काही त्रास तर नाहीए ना साक्षी? भाओजी नीट वागतात ना?’’

‘‘छेछे, तसा त्रास काहीच नाही. नवरा मला मान देतो. माझी काळजी घेतो, कामात मला मदतही करतो. तसा त्यांचा स्वभाव शांत आहे. एकूणात सगळं बरं चाललंय…पण तुझ्यासारखं  वैभव, तुझ्यासारखी श्रीमंती नाहीए ना माझ्याजवळ…’’ साक्षी खिन्नपणे म्हणाली.

‘‘नाहीए तेच चांगलं आहे गं! जे तुझ्याजवळ आहे ते सगळंच माझ्यापेक्षा चांगलं आहे. तू सुखी आहेस साक्षी…’’

‘‘काय’’ चेष्टा करतेस गं कामिनी? कुठं तू, कुठं मी? या वयातही तू स्वत:ला किती छान मेंटेन केलं आहेस अन् नाहीतर मी, तुझ्याजवळ खूप काही आहे गं कामिनी…’’ साक्षीनं म्हटलं.

कामिनीचे डोळे भरून आले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

साक्षी हतप्रभ झाली, ‘‘काय झालं कामिनी? का गं रडतेस?’’ तिनं प्रेमानं विचारलं.

‘‘काही नाही गं! आपले ते गावातले जुने दिवस आठवले.’’ कामिनी दाटून आलेल्या कंठानं म्हणाली.

‘‘कामिनी, खरं सांग, काय झालं? तू इतकी इमोशनल का झालीस?’’ तिचे अश्रू पुसत साक्षीनं विचारलं.

अन् मग कामिनी बोलायला लागली…

‘‘साक्षी, तू हा जो सगळा थाटमाट, वैभव, पैसा बघते आहेस ना, हे काही खरं नाही. दिसायला दिसंतय ते पण त्यात मनाला सुख नाही, समाधान नाही. हे आयुष्य जगताना किती देखावा, किती खोटेपणा करावा लागतो ते तुला ठाऊक नाहीए. फक्त पैसा असला म्हणजेच सुख असतं असं नाही. हा फक्त वरवरचा झगमगाट आहे. यात सुख नाही, मानसिक शांतता नाही. नवरा रात्री उशीरा घरी कधी येतो, मला कळत नाही. आल्यावर माझ्याजवळ येऊन कधी झोपतो तेही मला कळत नाही. कित्येक दिवस आमच्यात संवादही घडत नाही. म्हणायला मी मॉडर्न आहे. अजूनही तरूण दिसते, पण हे सगळं कुणासाठी? माझ्या रात्री मी एकटीच तळमळत काढते अन् दिवस जातो मैत्रीणींच्या किटी पार्टीत. खरं सांगते, माझं स्वत:चं असं काहीच नाहीए. माझ्या मर्जीनं मला जगता येत नाही. मी काय खावं, काय घ्यावं, काय घालावं हे दुसरंच कुणी ठरवतं. मला तर असं वाटतं साक्षी की स्त्री कितीही शिकली, कितीही उच्च पदावर असली, स्वत:चा व्यवसाय करत असली तरी एकदा तिनं घरात पाऊल टाकलं की ती नवऱ्याच्या ताब्यात असते.. स्त्रीला अपूर्ण अन्न पुरतं, साधे कपडे चालतात, शारीरिक व्यंग असलेला नवराही चालून घेते. पण मानसिकदृष्ट्या अपंग असलेला, अजिबात समजूतदारपणा नसलेला काहीसा विकृत किंवा कामांध नवरा कसा खपवून घ्यायचा? कसं त्याला सांभाळायचं?’’

कामिनी बोलत होती. मनातलं सगळं सांगत होती आणि साक्षी चकित होऊन ऐकत होती. तिची व्यथा, वेदना, पीडा साक्षीला नवी होती.

‘‘साक्षी, मला सांग, ज्या पुरुषाची स्वत:चीच काही ओळख नाही, स्वत:चीच काही आयडेंटिटी नाही, त्याच्या पत्नीला काय महत्त्व असणार गं? वैभव तीन भावात सर्वात मोठे आहेत, पण आमचा सगळा व्यवसाय, सगळा पैसा धाकट्या दोघांच्या हातात आहे. त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी दिलेला आदेश वैभवला ऐकून घ्यावा लागतो. त्यामुळेच मी किंवा माझी मुलंही आश्रिताचं जीणं जगतोय. धाकटे भाऊ जे काम सांगतात, तेच वैभव करतो, ते जिथं पाठवतात, तिथं जातो. आपल्या भावांना तो काही म्हणूच शकत नाही. भावांनी त्यांना चांगलं म्हणावं म्हणून ते त्यांच्याशी लाळघोटेपणा करतात अन् माझ्याकडे, मुलांकडे साफ दुर्लक्ष करतात. मला शंभर रुपये जरी हवे असले तरी धाकट्या दिरांकडे हात पसरावा लागतो,’’ कामिनी म्हणाली.

‘‘पण कामिनी, एकत्र कुटुंबात असं…’’ तिला मध्येच थांबवत कामिनीनं म्हटलं,

‘‘होय साक्षी, एकत्र कुटुंबात तडजोड करावीच लागते. पण कुणाच्या दडपणाखाली दुसऱ्याचा ‘स्व’च चिरडला जात असेल तर? पत्नीला स्वत:च्या नवऱ्याबरोबर जगण्याचा हक्क आहे ना? तो तिला मिळू नये? आपल्या बायकोचा बळी एवढ्यासाठी द्यायचा की भावांनी आपल्याला वाईट म्हणू नये. मला तर नवऱ्याला काही म्हणायचाही हक्क नाही. तू खरोखर सुखी आहेस साक्षी. तुला माहीत आहे तुझा नवरा कधी घरी येईल…आल्यावर तुम्ही दोघं एकत्र जेवाल…गप्पा माराल, एकत्र  झोपाल. तुला, त्यांना किती पगार मिळतो ते माहीत आहे. मला तर वैभवबद्दल काहीच माहीत नसतं. कधी तो येईल, कधी तो येणार नाही, बरोबर जेवेल, रात्री झोपेल काहीच नाही,’’ कामिनी म्हणाली.

कामिनीनं स्वत:चं आयुष्यच उलगडून ठेवलं साक्षीसमोर. ‘‘चल, कामिनी आता झोपूयात, रात्रीचा एक वाजून गेला आहे,’’ साक्षीनं म्हटलं.

‘‘खरंच गं! झोपायला हवं. तुलाही प्रवास करून आल्यावर विश्रांती मिळाली नाहीए,’’ कामिनी म्हणाली.

‘‘मी जरा सौरभला बघून येते. तो झोपला नसेल तर मी तिथंच झोपते, नाहीतर तुझ्याकडे येते.’’

‘‘ठीक आहे. बघून ये,’’ कामिनी बेडवर आडवी होत म्हणाली.

साक्षीच्या मनात खळबळ माजली होती. वैभव कामिनीशी असा का वागतो? इतकी सुंदर, तारूण्यानं रसरसलेली, हुषार, प्रेमळ बायको असताना तो तिच्याकडे दुर्लक्ष कसा करू शकतो? अन् आज सकाळी ब्रेकफास्टच्यावेळी तो ज्या पद्धतीने साक्षीकडे बघत होता ती नजर कामुक होती. त्या नजरेत एक आकर्षण होतं आणि आमंत्रणही.

विचारांच्या नादात ती आपल्या गेस्टरूमकडे जात असताना तिला एका खोलीत उजेड दिसला. यावेळी कोण असेल या खोलीत? तिच्या मनात उत्सुकता दाटली. तिनं सहज खोलीत डोकावून बघितलं तर वैभव नाइट सूट घालून एका खुर्चीवर बसलेला दिसला. समोर टेबल होतं अन् शेजारीच एका काचेच्या कपाटात विलायती दारूच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या होत्या. टेबलावरही दोन तीन बाटल्या अन् एक अर्धवट भरलेला ग्लास होता.

‘‘भाओजी तुम्ही? कधी आलात तुम्ही?’’ आश्चर्यानं साक्षीनं विचारलं अन् ती सरळ खोलीत शिरली.

‘‘अरे? साली साहेबा. या, आत या,’’ तिला येताना बघून वैभवनं म्हटलं.

‘‘तुम्ही आलात कधी? आल्याचं सांगितलं का नाही? मी अन् कामिनी खोलीत बोलत बसलो होतो,’’ साक्षी उत्साहानं बोलत होती.

‘‘मी थोड्या वेळापूर्वीच आलो, तुम्ही दोघी गप्पा मारत होतात, मग म्हटलं तुमच्या गप्पांमध्ये डिस्टर्ब नको,’’ वैभवनं म्हटलं. तो अधूनमधून दारूचे घोट घेत होता. डोळ्यात दारूची धुंदी स्पष्ट दिसत होती. तरीही सक्षीला त्याच्याशी बोलायची इच्छा होती. तिनं विचारलं ‘‘जिजू, तुम्ही दारू का पीता?’’

‘‘दारू कुणी आनंदानं पित नाही, सालीसाहेबा, माणसाच्या मनात खोलवर रूतून बसलेलं दु:ख असतं. ते विसरण्यासाठी माणूस दारू पितो,’’ त्याचे डोळे भरून आले होते. तो भावनाविवश झाला होता.

त्याचं नाटक भाबड्या मनाच्या साक्षीच्या लक्षात आलं नाही. ती ही भावनाविवश झाली. त्याच्याजवळ येत त्याचे अश्रू पुसत म्हणाली, ‘‘प्लीज जिजू तुम्ही रडू नका…मला सांगा, तुम्हाला काय दु:ख आहे ते.’’

तिला जवळ आलेली बघून वैभवनं तिच्या कंबरेला मिठी मारली. तो खुर्चीवर बसून होता.

इकडे कामिनी साक्षीची वाट बघत होती, ती येते आहे की नाही हे तिला कळेना. म्हणाली होती सौरभ झोपला असेल तर परत येते. तिची वाट बघत असल्यामुळे तिला झोप  येत नव्हती. बघून येऊ साक्षीच्या खोलीपर्यंत जाऊन असा विचार करून ती साक्षीच्या खोलीकडे निघाली. वैभवच्या खोलीत दिवा जळत होता        आणि बोलण्याचा आवाजही येत होता. ती एकदम सावध झाली अन् झटकन् खोलीत शिरली.

समोरचं दृश्य बघून ती हादरलीच. वैभवनं खुर्चीवर बसूनच उभ्या असलेल्या साक्षीच्या कमरेला मिठी मारली होती. वैभवला कामिनी खोलीत आलेली दिसताच त्यानं साक्षी भोवतीचे हात काढून घेतले.

‘‘वैभव काय करतो आहेस? अरे निदान माझ्या मैत्रीणीला तरी वासनेपासून लांब राहू दे, लाज नाही वाटली तुला?’’ कामिनी आरेडलीच.

साक्षी पाठमोरी असल्यानं तिला कामिनी दिसलीच नव्हती. साक्षी त्या आवाजानं एकदम दचकली.

‘‘ओरडतेस कशाला? काय केलंय मी?’’ वैभवही ओरडला.

‘‘बघ साक्षी…हे या वैभवचं मायावी रूप आहे. रडून भेकून सहानुभूती मिळवायची. रोज नवी स्त्री लागते यांना…मी कसं सहन करायचं हे?’’ साक्षीला गदागदा हलवत कामिनीनं म्हटलं.

‘‘मला क्षमा कर कामिनी…अजाणता…,’’ कामिनीनं साक्षीला पुरतं बोलूच दिलं नाही. ती म्हणाली, ‘‘तू ही त्यातलीच एक व्हायची होतीस…थोडक्यात बचावलीस…’’

हा आरडाओरडा रात्रीच्या वेळी शांत वातावरणात सौरभच्याही गेस्टरूमपर्यंत पोहोचला. काय प्रकार आहे बघायला तो खोलीच्या दिव्याच्या अन् आवाजाच्या अनुरोधानं निघाला.

चतुर अन् सावध कामिनीनं सौरभला येताना बघितलं…क्षणभर ती घाबरली…जर सौरभला वैभवच्या या कृत्याबद्दल कळलं तर? छेछे, अनर्थ होईल. तिने पटकन निर्णय घेतला.

‘‘काय झालं कामिनी? काय झालंय साक्षी?’’ खोलीत येत सौरभनं विचारलं.

अगदी शांतपणे, सौम्य हसत कामिनीनं म्हटलं, ‘‘काहीच नाही, भाओजी, वैभव आत्ताच आलेत अन् न जेवता झोपायचं म्हणताहेत तर मी त्यांना रागावत होते.’’

एवढा वेळ दगडासारखी निश्चल झालेली साक्षी आता भानावर आली.

‘‘एवढंच ना? मला काही तरी वेगळंच वाटलं. आरडा ओरडा ऐकण्यासारखं वाटलं…भास झाला असेल,’’ सौरभनं म्हटलं.

कामिनीनं वेळ मारून नेली. प्रसंग सांभाळून घेतला हे बघून साक्षीच्या जिवात जीव आला. तिनं केवढी मोठी चूक केली होती? रात्रीच्या वेळी, दारू पीत असलेल्या अनोळखी पुरूषाच्या खोलीत जायची गरजच काय होती? काही भलतंच घडलं असतं म्हणजे? का तिनं वैभवला आपल्याजवळ येऊ दिलं?

‘‘साक्षी, तुम्ही दोघं तुमच्या रूममध्ये जाऊन शांतपणे झोपा. रात्र खूपच झाली आहे,’’ कामिनीनं म्हटलं. साक्षीनं कृतज्ञतेनं  कामिनीकडे बघितलं अन् काही न        बोलता ती सौरभबरोबर आपल्या खोलीकडे निघाली.

वैभवला तिथंच सोडून कामिनीही आपल्या खोलीत आली. खोलीत येताच तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिनं आपलं दु:ख विसरण्यासाठी मैत्रीणीला आपल्याकडे बोलावलं होतं. पण तिचा नालायक नवरा मैत्रीणीच्याच अब्रूवर उठला होता.

दुसऱ्यादिवशी कामिनीनं परतीच्या प्रवासाची दोन तिकिटं साक्षी व सौरभला दिली. तिला व वैभवला अचानक कुणा नातलगाच्या मृत्यूमुळे अहमदाबादला जावं लागणार होतं. तिनं सौरभची पुन्ह:पुन्हा क्षमा मागितली. सौरभला रात्रीच्या प्रसंगाची कल्पना नव्हती  अन् घरची मालकमालकीणच घरात नसतील तर त्या घरी राहण्यात अर्थ काय होता? साक्षीला मात्र आपल्या मैत्रीणीचं दु:ख कळलं होतं. स्वत:चा साधा संसार अन् नवऱ्याकडून मिळत असलेला मान याची किंमत कळली होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें