कोडं

कथा * रश्मि शर्मा

शनिवारी सायंकाळीच मी ऑफिसातून थेट माझ्या माहेरच्या घरी एका रात्रीच्या मुक्कामासाठी आले. सीमाताई अन् भावजी पण दोन दिवसांसाठी आले होते. म्हटलं चला, तेवढीच आई आणि ताईसोबत गप्पा गोष्टी करण्यातली मजा अनुभवता येईल. पण मी पोहोचतेय तिथं, तोवरच रवीचा, माझ्या नवऱ्याचा फोन आला.

मी त्यावेळी वॉशरूममध्ये होते म्हणून फोन आईनंच घेतला.

मी आरामात सोफ्यावर येऊन बसले. चहाचे कप सखूबाईंनी सर्वांच्या हातात दिले अन् मग आई जरा रागानं म्हणाली, ‘‘रवीचा फोन होता. तुझ्या सासूला ताप आलाय म्हणून सांगत होता.’’

मी एकदम तडकलेच. ‘‘इथं येऊन अजून तासभरही झाला नाहीए अन् लगेच बोलावून घेताएत. सासूबाईंना तर माझं एक दिवसाचं स्वातंत्र्यही बघवंत नाही. तापच चढतो त्यांना.’’

‘‘कुणास ठाऊक, खरंच ताप आलाय की उगीचच तुला बोलावून घेण्यासाठी नाटक करताहेत.’’ ताईनं शंका बोलून दाखवली.

‘‘आज सकाळी जेव्हा मी त्यांच्याकडे एक रात्र इथं राहण्याची परवानगी मागितली, तेव्हाच त्यांचा चेहरा बदलला होता, फुगल्याच होत्या…ताई, तुझी मजा आहे बाई! एकटी राहतेस, सासूसासऱ्यांचा काच नाहीए तुला.’’ माझा मूड फारच बिघडला होता.

‘‘तुला या काचातून सुटायचं असेल तर तू तुझ्या सासूला तुझ्या थोरल्या जावेकडे राहायला पाठव ना? हटूनच बैस. सत्याग्रह कर.’’ ताईनं मला सल्ला दिला. माझ्या लग्नानंतर एक महिन्यानंतर आम्ही भेटलो तेव्हा ही तिनं मला हेच सांगितलं होतं.

‘‘माझी मोठी जाऊ महा कजाग अन् जहांबाज आहे. तिच्याकडे जायला सासूबाई राजी नाहीत अन् तिकडं त्यांना पाठवायला त्यांचा धाकटा लेक तयार नाही. तुला ठाऊक आहे का, मागच्या महिन्यात मी सासूबाईंना जावेकडे पाठवण्याचा हट्ट धरला तर यांनी मला चक्क घटस्फोटाची धमकी दिली. ताई, अगं, यांना आईपुढे माझी काहीही व्हॅल्यू नाहीए.’’

‘‘तू त्याच्या घटस्फोटाच्या धमकीला घाबरू नकोस. कारण रवीचं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे तर आम्हाला सर्वांनाच कळंतय, दिसतंय, जाणवतंय. तुझी व्हॅल्यू तर आहेच!’

‘‘सीमा, खरं बोलतेय शिखा, तू फक्त प्रेमानं त्याला वळव. तुझ्या सासूला दोन्ही सुनांकडेल बरोबरीनंच राहायला हवं. अगदी एका सुनेकडेच सारखं राहायचं म्हणजे काय?’’ आईनं ताईच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

मी एक नि:श्वास सोडला. चहाचा कप टीपॉटवर ठेवत मी म्हटलं, ‘‘आई, आता तर मला निघायलाच हवंय!’’

‘‘वेड्यासारखं नको करूस,’’ आई भडकलीच! ‘‘अगं, इतक्या दिवसांनी येते आहेस, रात्रभर राहून जा. तेवढीच विश्रांती!’’

‘‘आई, माझ्या नशिबात विश्रांती नाही. मला परत गेलंच पाहिजे.’’ मी आपली पर्स उचलली.

‘‘शिखा, अगं तू इतकी का घाबरतेस? रवीनं आईला एकदाही, शिखाला परत पाठवा, असं म्हटलं नव्हतं,’’ ताई मला अडवंत, मला समजावंत म्हणाली.

‘‘नको ताई, मी गेले नाही तर यांचा मूड फारच बिघडेल. तुला माहीत आहे ना, किती संतापी आहेत ते?’’

बाबाही बिचारे मला थांब म्हणंत होते. पण कुणाच्या समजावण्याचा काहीही उपयोग नव्हता. तासाभरातच भावजींनी गाडी काढली अन् ताई व ते मला सोडायला घरापर्यंत आले. पण त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी ते घरात आले नाहीत.

मला अचानक आलेली बघून रवी दचकले, ‘‘अगं? तू परत का आलीस? मी तुला बोलावण्यासाठी फोन केला नव्हता…’’ ते म्हणाले पण त्यांच्या डोळ्यातली आनंदाची चमक लपवता आली नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तक्रारीच्या सुरात म्हटलं, ‘‘एक रात्रही आईबाबांकड राहू दिलं नाहीत तुम्ही…एक रात्र तुम्ही तुमच्या आईला सांभाळू शकत नव्हता का?’’

‘‘परत बोलवायचं नव्हतं, तर मग फोन केलातंच का?’’

‘‘स्वीटहार्ट, फोन फक्त तुला सूचना देण्यासाठी केला होता.’’

‘‘ही सूचना उद्या सकाळी दिली असती तरी चाललं असतं ना?’’ मी चिडूनच विचारलं. त्यावर त्यांना काही उत्तर देता आलं नाही.

त्यांना तिथंच सोडून मी माझा मोर्चा सासूबाईंच्या खोलीकडे वळवला.

त्यांच्या खोलीत शिरताच मी एका श्वासात, वरच्या सुरात त्यांना ढीगभर प्रश्न विचारले, ‘‘आई, तुम्हाला एवढा तेवढा ताप आला तर इतकं घाबरून का जाता तुम्ही? समजा आला ताप तर एक रात्र तुमचा लाडका लेक सेवा करू शकत नाही का? मला फोन करून बोलावून घ्यायची काय गरज होती? एक रात्र मी माझ्या माहेरी राहू शकत नाही का?’’

‘‘हे बघ, मी चक्कार शब्दांनं रवीला तुला बोलावून घे असं म्हटलं नव्हतं. या बाबतीत माझ्यावर ओरडायचं नाही. समजलं ना?’’ सासूबाईही आघाडी सांभाळून होत्या.

‘‘यांच्यासाठी आईनं डबा दिलाय. तुम्ही काय खाल?  सकाळी मी मुगाचं वरण…’’

‘‘मला काही वरण फिरण खायची इच्छा नाहीए.’’ त्या रागातच होत्या.

‘‘मग हॉटेलातून छोले भटूरे किंवा वडापाव मागवून देऊ?’’

‘‘सूनबाई, तू उगीच माझं डोकं फिरवू नकोस.’’

‘‘हो ना, डोकं माझंच फिरलंय…तुमच्या आजारपणाबद्दल ऐकून तशीच धावत आले…ज्या बाईपाशी इतक्या जोरानं बोलायची आणि भांडायची एनर्जी आहे, ती आजारी कशी असेल?’’

बोलता बोलता मी त्यांच्या कपाळावर माझा तळवा टेकवला अन् मी दचकले. त्यांना सणसणूनताप भरला होता.

‘‘तू अजून माझा संताप वाढवायला आली आहेस का? सांगून ठेवते, माझ्यावर उपकार केल्याचा आव आणू नकोस.’’

त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी, मघाशीच खोलीत आलेल्या रवींना म्हटलं, ‘‘तुम्ही उभ्या उभ्या बघताय काय? आईंच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवता येत नाहीत का? केवढा ताप आहे त्यांच्या अंगात…’’

रवी एकदम गडबडले, ‘‘ठेवतो…ठेवतो गार पाण्याच्या घड्या…’’ म्हणत ते स्वयंपाक घराकडे धावले.

‘‘मी तुमच्यासाठी छानशी मुगाची खिचडी करते. चव येईल तोंडाला.’’

‘‘मी काहीही खाणार नाही. माझ्यासाठी एवढे कष्ट घेण्याची गरजही नाहीए.’’ त्या अजून रागातच होत्या.

‘‘सूनबाई, कान उघडून नीट ऐकून घे. हे घर माझं आहे…आणि मी इथंच राहणार. तुझ्यानं होत नसतील माझी कामं तर नको करूस…’’ सासूबाई ठसक्यात म्हणाल्या.

‘‘उगीच नको ते बडबडण्यापेक्षा चहा घ्याल का ते सांगा. उगीच माझं डोकं उठवू नका.’’ मी कपाळावर हात मारून बोलले.

‘‘तू माझ्याशी नीट का बोलत नाहीस सूनबाई?’’ आता त्यांनी अगदी शांतपणे विचारलं.

‘‘काय चुकीचं बोलले मी?’’

‘‘तू चहाचं विचारतेस की काठीनं हाणते आहेस?’’

मला हसायला आलं. ‘‘तुम्ही ना जन्मभर माझ्या तक्रारीच करत राहणार,’’ मी हसून स्वयंपाक घराकडे वळले.

स्वयंपाक घरात मी एकीकडे चहाचं आधण ठेवलं. दुसरीकडे मुगाची डाळ, तांदूळ धुवून ठेवले. तेवढ्यात रवीनं पटकन् मला मिठीत घेतलं. भावनाविवश होऊन म्हणाले, ‘‘बरं झालं तू लगेच आलीस. आईचा ताप बघून मी खूप घाबरलो होतो. खरं तर एक रात्रही तुला माहेरी राहू दिलं नाही याबद्दल खूप खूप सॉरी…’’

‘‘मोठे आलात सॉरी म्हणणारे…माझी काळजी कधी करता तुम्ही?’’ मी पटकन् त्यांच्या ओठांवर माझे ओठ ठेवून त्यांचं तोंड बंद केलं.

माझं चुंबन घेत ते म्हणाले ‘‘तू मनाची खूप स्वच्छ आणि प्रेमळ आहेस. तोंडानं मात्र जहर कडू बोलतेस.’’

‘‘सगळं कळतंय मला. तुमच्या आजारी आईची मी सेवा करावी म्हणून माझी खोटी प्रशंसा करताय? काही गरज नाहीए त्याची.’’

‘‘नाही गं! खरंच तू मनाची फार चांगली आहेस.’’

‘‘खरंच?’’

‘‘तर मग प्रयत्न तरी का करताय? जा, आपल्या आईजवळ जाऊन बसा.’’ मी हसत हसत त्यांना स्वयंपाक घराच्या बाहेर ढकळलं.

ते खरं म्हणाले. महिन्याभरापासून माझ्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे मी म्हणजे सासूबाई अन् नवरा दोघांसाठीही एक कोडंच ठरले होते.

सासूबाईंबरोबर आजही मी बोलते तिखटंच. पण त्यांची सर्व कामं मी मनापासून अन् त्यांच्या सोयीनुसार करते. त्यामुळे त्यांची खूप सोय होते अन् समाधानही होतं.

गंमत म्हणजे मी बदलल्यामुळे माझ्या सासूबाईदेखील बदलल्या आहेत. आता त्या त्यांची सुखदु:खं मोकळेपणाने माझ्याशी बोलतात. पूर्वी आमच्यात एक वरवरची आणि खोटी शांतता असायची. पण आता आम्ही एकमेकींशी कडकडून भांडलो तरी मनातून एकमेकींवर प्रेम करतो, एकमेकींची काळजी घेतो अन् खरोखरंच आनंदात असतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमच्या भांडणांमुळे रवींना टेन्शन येत नाही. त्यांचं बी.पी एकदम नॉर्मल असतं. खरं सांगायचं तर नवऱ्याची तब्येत उत्तम राहावी अन् संसार सुखानं चालावा यासाठी मी स्वत:ला बदललं आहे.

‘‘माझ्या आणि सासूबाईंच्या भांडणात मध्ये पडलात तर बघा.’’ मी यांना महिन्यापूर्वीच धमकी दिली होती. आता आमची भांडणं बघत ते स्वत:शीच हसंत असतात.

‘‘बाइलवेडा आहेस, बायकोचा गुलाम, कधी तरी आईची कड घेऊन बोलत जा,’’ सासूबाई मुद्दाम यांना चिडवतात तेव्हा ते अगदी मोकळेपणांनं हसतात.

सासूसासऱ्यांपासून दूर दूर राहणाऱ्या सीमा ताईच्या आयुष्याशी माझ्या आयुष्याशी तुलना करताना पुन्हा माझ्या मनांत थोडे निगेटिव्ह विचार येताहेत. पण सासूबाई बऱ्या झाल्या की मी त्यांच्याशी एकदा कडकडून भांडून घेईन म्हणजे माझं मन मोकळं होईल. त्यांनाही बरं वाटेल. टेन्शन संपलं की आनंदी आनंद.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें