अक्कल दाढ

 * लीना खत्री

मी लहानपणापासून हे ऐकून कंटाळले होते की, मला जराही अक्कल नाही. एके दिवशी जेव्हा मी हे ऐकून चिडून रडू लागले तेव्हा माझ्या आत्येने मला प्रेमाने समजावले की, ‘‘बाळा, अजून तू लहान आहेस, पण जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुला अक्कल दाढ येईल आणि तेव्हा कोणीही असे म्हणणार नाही की, तुला अक्कल नाही.’’

आत्येचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलले आणि मी रडणे बंद करून खेळायला गेले. माझी अशी पक्की खात्री झाली होती की, कधीतरी मलाही नक्कीच अक्कल येईल. हळूहळू मी मोठी होऊ लागले आणि याची वाट पाहू लागले की, आता लवकरच मलाही अक्कल देणारी दाढ येईल. या दरम्यान माझे लग्न झाले.

आता सासरीही मला हेच टोमणे ऐकायला मिळू लागले की, तुला तर जराही अक्कल नाही. आईने तुला काहीच शिकवले नाही. हे सर्व टोमणे सहन करत वेळ पुढे निघून चालली होती, पण अक्कल दाढ काही केल्या यायला तयार नव्हती. आता जेव्हा मी वयाची चाळीशी ओलांडली तेव्हा मला अक्कल दाढ येईल, ही आशाच सोडून दिली. एके दिवशी अचानक माझी चावून खायची दाढ प्रचंड दुखू लागली. वेदना असह्य झाल्यामुळे गालावर हात ठेवून मी ओरडत घरात फिरू लागले.

माझी दाढ दुखतेय हे ज्या कोणाला समजले त्या प्रत्येकाने मला हेच सांगितले की, ‘‘अगं, तुला अक्कल दाढ येत असेल. म्हणूच तुला इतकं दुखतंय.’’

मला अत्यानंद झाला. वाटले, उशिराने का होईना, पण आता मला अक्कल येईल. मात्र जेव्हा प्रचंड वेदनेने मी कळवळू लागले तेव्हा वाटले की, यापेक्षा मला अक्कल नव्हती तेच बरे होते. दातांच्या डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की, तुमची कोपऱ्यातली दाढ कीड लागून सडली आहे. ती काढून टाकावी लागेल.

तेव्हा मी कुतूहलाने विचारले, ‘‘ही माझी अक्कल दाढ होती का?’’

माझ्या या प्रश्नावर दातांचे डॉक्टर हसत म्हणाले, ‘‘होय, ही तुमची अक्कल दाढच होती.’’

आता सांगा? मी तरी काय बोलणार होते? एक तर आधीच उशिरा आली आणि कधी सडून गेली ते मला समजलेदेखील नाही. असह्य वेदना सहन करण्यापेक्षा ती काढून टाकणेच मला जास्त योग्य वाटले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी ३ दिवसांनंतर दाढ काढायला गेले. तिथे दातदुखीमुळे त्रासलेली आणखीही काही माणसे बसली होती. त्यांच्यामध्ये एक छोटीशी ५ वर्षांची मुलगीही होती. तिच्या समोरच्या दुधाच्या दाताला कीड लागली होती. तो दात काढायला ती आली होती. मी तिला तिचे नाव विचारले, मात्र तिने उत्तर दिले नाही. ती रागाने गाल फुगवून बसली होती.

तिच्या आईने सांगितले की, ३ दिवसांपासून ती दातदुखीमुळे त्रासून गेली आहे. सुरुवातीला दात काढून घ्यायला तयार नव्हती, पण आता सहन होत नसल्यामुळे दात काढायला तयार झाली आहे.

माझा नंबर त्या मुलीच्या नंतर होता. तिला डॉक्टरांनी बोलावले आणि गाल सुन्न होण्यासाठी इंजेक्शन दिले. त्यामुळे तिचा गाल सुजला. आता माझा नंबर आला. तशी तर मी दिसायला सुदृढ आहे, पण माझे मन भित्र्या सशासारखे आहे. काय करणार? इंजेक्शन घ्यावेच लागले. त्यांनतर १० मिनिटांनी डॉक्टर माझी दाढ काढणार होते. मी गाल पकडून तिथेच सोफ्यावर बसले.

घाबरून बसलेल्या मला १० मिनिटांनी आत बोलावण्यात आले आणि माझी अक्कल देणारी दाढ काढून टाकण्यात आली. दाढ काढताना मला विशेष दुखले नाही, पण त्यानंतर त्या जागेवर डॉक्टरांनी औषधाचा कापूस लावला आणि त्या औषधाच्या घाणेरडया वासाने मला तिथेच उलटी झाली. तेव्हा नर्सने माझ्याकडे खाऊ की गिळू, अशाच काहीशा नजरेने बघितले. ते पाहून मी चटकन गाल पकडून बाहेर आले. माझा छोटा मुलगा माझ्यासोबत होता. एक तासभर कापूस काढायचा नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याने मला डॉक्टरांचा निरोप दिला. तो एक तास कसाबसा गेला आणि मला आइस्क्रीम खायला मिळाले.

सुजलेले तोंड घेऊन आईस्क्रीम खाताना मी विचित्र दिसत होते. माझे वेडेवाकडे होणारे तोंड पाहून मुलांना हसू येत होते. मला दाढदुखीमुळे आणि ती काढताना जो त्रास झाला तो झाला, पण हे माझ्यासोबत चुकीचे घडले होते की, ज्या अक्कलदाढेची मी कित्येक वर्षे वाट पाहिली ती अशा प्रकारे आली आणि निघूनही गेली. शेवटी मी मात्र तशीच राहिले. हो, आधी होते तशीच…बेअक्कल.

सौभाग्यवतीचा अविश्वास प्रस्ताव

* सुशील यादव

‘‘अहो, काय झालेय? तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात,’’ एका वाक्यात सौभाग्यवतीने प्रस्ताव मांडला.

सरकार कोसळणार, अशी अपेक्षा आम्ही करू लागलो.

‘‘वेडे, अगं ४० वर्षांनंतर तुला असे वाटलेच कसे?’’

‘‘मी विकासाची कितीतरी कामं केली. तू मात्र सर्व चुलीत टाकलीस ना?’’

‘‘काय कमी आहे तुझ्या सरकारात?’’

‘‘त्यानंतर आम्ही आमच्या सरकारची म्हणजे आमची बाजू मांडू. मग समजून जा की, धावणाऱ्या गाडीचे चाक अचानक थांबेल.’’

आम्ही असा सूचक इशारा देऊनही ती अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करते. यावेळीही तिने तसेच केले असते, पण आम्ही जरा भावनांमध्ये वाहून थोडे जास्तच बोललो होतो. त्यामुळे या प्रकरणात आम्ही दाम्पत्य जीवनातील शांतता भंग केली होती.

आम्हाला माहीत होते की, आमचे हृदय पाझरले तर सौभाग्यवतीचा राग पेटून उठेल.

तिला शांत करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘सेवानिवृत्तीपूर्वी आम्ही कमवायचो. बैलासारखे कामावरून थेट घरी यायचो. येताना आमच्यासोबत कितीतरी समस्या कामावरून घरी येऊन आदळण्याच्या प्रयत्नात असायच्या त्यांना आम्ही कसेबसे रोखून धरायचो. आताही आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही. मग तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात, असे तू कसे म्हणू शकतेस?’’

‘‘चल, निदान आधीचे चांगले गुण तरी सांग. अवगुण नंतर ऐकून ठरवू की, नेमके काय बदलले आहे? आज लग्नाच्या ४० वर्षांनंतर तू विरोधी पक्षासारखे खूप मोठे तोंड उघडलेस.’’

‘‘जेव्हा हनिमूनला गेलो होतो तेव्हा तुम्ही माझ्या मागे-पुढे करून सर्व कामं स्वत:च करत होता. बॅगा घेणे, हॉटेलमध्ये काही मागवण्यापूर्वी माझी आवड विचारणे, शॉपिंग मॉलमधून मी केलेल्या खरेदीचे भरभरून कौतुक करणे, वेणू, तुझी पसंत खूपच सुंदर आहे, असे कौतुकाने बोलणे… मी भारावून जायचे. तुम्ही असेही म्हणायचात की, तुझी निवड उत्तम आहे.’’

‘‘म्हणूनच तर आमची निवड केलीत ना?’’

‘‘सगळे पुरुष लग्न झाल्यावर सुरुवातीला असेच वागतात का?’’

आम्ही म्हटले, ‘‘वेणू, काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते, जेव्हा नवरा नवी गाडी घेतो तेव्हा त्या गाडीत पत्नीला बसवताना स्वत: दरवाजा उघडतो. ते पाहून लोक २ निष्कर्ष काढतात. एकतर गाडी नवीन असेल किंवा बायको नवी नवरी असेल.’’

आमच्या या विनोदाची छाप सौभाग्यवतीवर पडू शकली नाही. तिने लगेचच दुसरा प्रहार केला. ‘‘अहो, लग्नानंतर सुरुवातीला तुमची परिस्थिती आपल्या राज्यासारखी होती. चांगले कपडे घालायची तुम्हाला माहिती नव्हती. साधी खाण्याची चव कळत नव्हती. मी फक्त खाण्याची चव म्हणाले, पिण्याची चव तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुरुवातीपासूनच चाखत होता. मी तुमच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नसते तर भोपळयासारखे फुगला असता.’’

‘‘आम्हाला असे टोमणे मारण्याचा, आमची अवहेलना करण्याचा हा अर्धवार्षिक कार्यक्रम मागील काही दिवसांपासून तिमाहीच्या स्तरावर सेन्सेक्सप्रमाणे घसरत चालला आहे. आम्हाला आमची टीआरपी सुधारण्याचा उपाय तेव्हा सूचतो जेव्हा आम्ही काहीतरी जबरदस्त लिहून ते अंकात छापून आणतो. उत्तरादाखल तेच सौभाग्यवतीला दाखवून आम्ही म्हणतो, ‘‘बघ आम्ही लिहिलेले छापून आलेय.’’ त्यावर ती लगेच आर्थिक बाजूवर बोट ठेवून विचारते, ‘‘हे छापून आलेय त्याला किती पैसे मिळणार?’’

‘‘हे लोक आजकाल काही देत नाहीत. ई मेलवर पाठवले तर नखरे करतात. आम्ही मेलवर पाठवलेले घेत नाही, असे थेट सांगतात. त्यांना लिखाणाची मूळ प्रत हवी असते. ती स्पीड पोस्टने पाठवायची म्हणजे एखाद्या गरीब लेखकाचे काय हाल होत असतील हे त्यालाच माहीत.’’

‘‘मी बघत आलेय, जेव्हा कधी मी रागाला वाट मोकळी करून देते तेव्हा तुम्ही तुमच्या साहित्यिक प्रवासाला निघून जाता किंवा याच साहित्याची ढाल बनवून लढण्यासाठी उभे राहता. साहित्यिक शब्दात बोलायला मलाही येते, पण रांधा-वाढा, उष्टी काढण्याच्या कामात ते शब्द चपतीसारखे गोल होऊन फुगतात. तर… मी सांगत होते.’’

‘‘आजकाल तुम्ही बदलला आहात.’’ ती पुन्हा मूळ मुद्दयावर अली. ‘‘वयाची ६० म्हणजे स्वत:मध्ये बदल करण्याची वेळ. सेवानिवृत्तीनंतरच्या फक्त ६ महिन्यांमध्ये अशी अवस्था. घरात आळशासारखे बसून फुकटची बडबड, आता देवच जाणे पुढे काय होणार, अरे देवा, धाव रे आता…’’

‘‘हे पाहा, दिवसभर घरात कोट-टाय घालून भारतातील कुठलाच पुरुष राहू शकत नाही. देशी लुंगी, बनियान किंवा पायजमा घातला की मस्त वाटते. काही पुरुष तर चट्टेपट्टे आलेल्या रंगीत चड्डया घालूनच घरात फिरतात. तू जर याला बदल म्हणत असशील तर हो, आम्ही बदललोय.’’

सौभाग्यवतीला वायफळ गप्पा ऐकून कानांना त्रास करून घ्यायचा नव्हता. त्यामुळे तिने शेवटचे हत्यार म्हणजे जणू ब्रम्हास्त्र बाहेर काढले. रागाने विचारले, ‘‘आजची तारीख किती?’’

मी अगदी सहजपणे सांगितले, ‘‘६ ऑगस्ट, कालच तर बँकेत जाऊन घर खर्चासाठी लागणारे पैसे काढून तुला दिले होते ना? बुद्धीला चालना देत मी आठवून सांगितले.’’

ती दातओठ चावत रागाने म्हणाली, ‘‘नुसतीच ६ ऑगस्ट… मग काल किती होती?‘‘

मी निरागसपणे म्हटले, ‘‘एक दिवस आधी म्हणजे 5 ऑगस्ट असेल ना…?’’

५ ऑगस्ट आठवतच माझे शब्द अडखळले, ‘‘प्रिये, क्षमा कर, आम्हाला अगदी परवापर्यंत तुझा वाढदिवस व्यवस्थित लक्षात होता. आम्ही आराधना ज्वेलर्सकडे १ तारखेलाच जाऊन तुझ्यासाठी नवीन डिझाईनचा हार बनवायला दिलाय. हा तोच हार आहे जो आम्ही सेवानिवृत्त व्हायच्या आधी तू सतत त्या ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर उभी राहून काचेतून बघायचीस. त्याचवेळी आम्ही स्वत:शीच निर्धार केला होता की, सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या तुझ्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही तुला तोच हार भेट देऊ.’’

सौभाग्यवतीच्या निराश चेहऱ्यावर थोडासा आत्मविश्वास झळकला. ती आमच्या पाया पडण्यासाठी वाकली. आम्ही तिचा हात धरून तिला छानसे आलिंगन दिले. प्रेमाने विचारले, ‘‘दर वाढदिवसाला आमच्या पाया पडतेस, मग काल काय झाले होते…?’’

‘‘जर पाया पडली असतीस तर आमच्या चटकन लक्षात आले असते…’’

‘‘मला हे बघायचे होते की, माझे विसरभोळे राम काय, काय विसरू शकतात…? त्यामुळेच मी मौन बाळगले होते. तुम्हाला आठवण व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले, पण तुम्ही तुमच्याच विश्वात हरवलेले असता.’’

‘‘चला, ज्वेलर्सकडे जाऊया, नाहीतर…’’ मी निघायची तयारी करत म्हटले.

‘‘मुलांनी शुभेच्छा दिल्या?’’

सौभाग्यवतीचा आनंदाने फुललेला चेहरा अचानक कोमेजला. ती निराशपणे म्हणाली,

‘‘आजकाल सर्व स्वत:च्याच जगात मग्न असतात… माहीत नाही, त्यांच्या लक्षात असेल का?’’

आम्ही म्हटले, ‘‘काही हरकत नाही. आमच्याप्रमाणे तीही विसरली असतील….

आज तू तुला जे काही आवडते ते सर्व खरेदी कर… आम्ही सोबत एटीएम कार्ड घेतले आहे…. बाहेरूनच जेवून येऊया.’’

सौभाग्यवती शांतपणे आमच्या सोबत निघाल्या.

आम्हाला असे वाटले की, जणू आम्ही जिंकलो. अविश्वास प्रस्तावाने अखेरचा श्वास घेतला.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें