– पूनम पांडे

चहाडया किंवा चुगल्यांची सुरुवातच एखाद्या मसालेदार किंवा खमंग बातमीने होते. बाल मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, मुलांना अशा गोष्टी ऐकायला मजा येते. तुमची मुले जर आजूबाजूच्या गोष्टी मीठमसाला लावून तुम्हाला सांगत असतील तर सावध व्हा, कारण ही सवय तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्त्व बिघडवू  शकते. ती तुमच्या मुलाला कल्पनेतील अशा जगात घेऊन जाते जे खूपच निराशाजनक असते. तिथे वास्तव १ टक्काही नसते आणि मसालेदार गोष्टी, असत्य १०० टक्के असते. यामुळे मुलाचा दृष्टिकोन बिघडू लागेल. तो सत्याकडे पाठ फिरवायला शिकेल. चुगल्या, आधारहीन गोष्टी सांगू लागेल. हा खूपच धोकादायक स्वभाव आहे. असा स्वभाव मुलांमध्ये तेव्हा विकसित होतो जेव्हा आईवडील मुलाच्या गोष्टी चवीने ऐकू लागतात, कारण मुले ज्या गोष्टी सांगतात त्या मनोरंजक, कुतूहल जगवणाऱ्या असतात. भलेही त्या किती खऱ्या आहेत हे प्रत्यक्ष मुलालाही माहीत नसते. त्यामुळे अशा गोष्टींना महत्त्व देऊ नका अन्यथा मुलांची विचारसरणी चुकीची आणि भविष्य अंधकारमय होईल.

बाल्यावस्थेत बरेच कुतूहल असते. आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्या गोष्टी कान लावून ऐकायची मुलांना सवय लागू शकते. अशावेळी प्रयत्न करा की, तुम्ही जेव्हा कधी अशा गोष्टी कराल तेव्हा सर्वसाधारण बोलता तसेच बोला, जेणेकरून मुलांमध्ये कान लावून ऐकण्याची सवय विकसित होणार नाही.

ही घटना सर्वांसाठीच एक चांगला धडा आहे. मिताचा भावनांवर कधीच ताबा नसायचा. त्यामुळेच ती कुठलाही विचार न करता शेजारीपाजारी, नातेवाईक सर्वांच्या गोष्टी मुलांसमोर बिनदिक्तपणे सांगायची. मिताच्या गोष्टी ऐकून तिच्या मुलांच्या मनात संबंधित व्यक्तीबाबत चुकीचे मत तयार होऊ लागले आणि एके दिवशी यामुळेच एका कौटुंबिक कार्यक्रमात मिताच्या मुलांनी त्या व्यक्तीचा चहाडया बिनधास्त सर्वांसमोर केल्या.

मिता आणि तिथल्या सर्वांनाच आश्चर्य वाटले की, मुलांच्या तोंडी अशा गोष्टी आल्याच कशा? त्यानंतर सर्वांनीच यासाठी फक्त मितालाच दोष दिला. तिथले वातावरण उत्साहाचे होते, पण रंगाचा बेरंग झाला होता.

मिताला खूपच लाजल्यासारखे झाले. शेवटी चूक तिचीच होती. तिने मुलांमध्ये तिरस्काराचे बीज पेरले होते.

मितासारखी चूक अनेक आईंकडून होते. कोणावर तरी नाराज होऊन एखाद्याकडे आपले मन मोकळे करताना त्या हा विचार करत नाहीत की, मुले निरागस आहेत. त्यांच्यावर याचा चुकीचा परिणाम होईल. मनात जेव्हा रागाचे विष भरलेले असते तेव्हा काय बोलावे आणि काय बोलू नये, हे समजत नसते. तरीही हे आपल्याच हातात असते की, कुठल्याही प्रकारची चहाडी आदींपासून मुलांना दूरच ठेवावे, कारण ती आपले भविष्य आहेत.

निंदा बिघडवते संबंध

कोणीतरी बरोबरच सांगितले आहे की, निंदा करण्यात खूप मजा येते. पण हाच निंदारस तुमच्या जीवनात नकारात्मकता ठासून भरतो. त्यामुळे अनेकदा इतरांसमोर तुमची प्रतिमा खराब करतो. असे म्हणतात की, भिंतींनाही कान असतात. त्यामुळे आज तुम्ही इतरांबद्दल जे काही बोलता ते भविष्यात कधीतरी त्या व्यक्तीच्या कानावर पडतेच. अशावेळी तुमचे संबंध बिघडायला वेळ लागत नाही.

आपण आपले जीवन अगदी सहज, सुंदर जगले पाहिजे. प्रत्येक माणसात काहीतरी कमतरता असतेच. त्याकडे लक्ष दिले तर सतत चहाडी किंवा चुगली करत रहावेसे वाटेल. नकळतपणे तुम्ही ती गोष्ट तुमच्या मुलांसमोर बोलाल. हा तोच क्षण असेल जिथून तुमच्या मुलालाही चहाडी करण्याची सवय लागेल. जेव्हा तुम्ही एखाद्यावर नाराज असाल तेव्हा त्याचवेळी तुमच्यातील २-४ चुकीच्या सवयी आठवा. यामुळे तुम्हाला संतुलन साधता येईल. निदान यामुळे तरी तुमच्या तोंडून चुकीची गोष्ट बाहेर पडून ती मुलांच्या कानांपर्यंत पोहोचणार नाही.

वाईट सवयींची जननी म्हणजे चहाडी

चहाडी करणाऱ्या व्यक्तीच्या मनात चहाडी किंवा चुगली करण्यासोबतच खोटे बोलणे, एखाद्याबद्दल वाईट सांगणे, भांडणे लावून देणे, निंदा करणे इत्यादी अनेक वाईट सवयी जन्माला येतात. त्यामुळे हळूहळू ती व्यक्ती आपले अस्तित्व गमावून बसते. विश्वास ठेवायच्या किंवा मानसन्मान देण्याच्या लायकीचा उरत नाही.

प्रत्येकाचे जीवन एकसारखे नसते. त्यामुळेच कुठे कोणाच्या जीवनात काही चुकीचे घडत असते तेव्हा त्या गोष्टीला मीठमसाला लावून ती सर्वत्र पसरवणे आणि त्या व्यक्तीची परिस्थिती आणखी बिकट व्हावी या उद्देशाने असे वागणे म्हणजे तुमच्यातील वाईट वृत्तीचा कडेलोट आहे.

सर्वसाधारणपणे असे पाहायला मिळते की, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातील चुगलखोर सवयीमुळेच मुलांना हळूहळू चुगली करायची सवय लागते. ही सवय मुलांना समाज आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वापासून संपूर्णपणे अलिप्त करते.

एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींची मजा घेत चुगल्या लावायची गरजच काय? कुठे गेली तुमच्यातली माणुसकी? खरंतर ही सवय खूपच घाणेरडी आहे. यापासून लांब राहणेच तुमच्यासाठी योग्य ठरते. तोंडातून बाहेर पडलेली गोष्ट खूप मोठा प्रवास करत फिरते. बुद्धीचा वापर चांगल्या कामासाठी करायला हवा. नकारात्मक विचारांमुळे  मेंदूवरचा ताण वाढतो. म्हणूनच मुलांची  प्रगती व्हावी असे वाटत असेल तर त्यांच्या समोर कोणाच्याच चुगल्या करू नका. गप्पा ऊर्जा जागवणाऱ्या, प्रेरणादायी असायला  हव्यात.

निसर्गत:च मुले संवेदनशील, हळव्या मनाची असतात. तुमच्या तोंडून सतत निघणाऱ्या चहाड्या, इतरांची निंदा यामुळे मुलांवर अनावश्यक ताण येऊ शकतो. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो. म्हणून उगाचच तुमचे तोंड खराब करून घेऊ नका. आत्मविश्वास हेच बुद्धी आणि मेंदूच्या विकासासाठी उत्तम औषध आहे. चहाड्या नव्हे तर एकमेकांना मदत करणे, समजूतदारपणा, सर्वांसोबत हसूनखेळून राहणे यामुळेच आपल्या आणि मुलांच्या जीवनातही समाधानाचा सुगंध दरवळतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...