* नसीम अन्सारी

बरेचदा कुठल्या न कुठल्या महिलेला असे बोलतांना पाहिले जाते की लग्नाआधी ती सडपातळ, चपळ होती, पण लग्नानंतर ती लठ्ठ झाली. हे खरं आहे की बहुतेक स्त्रिया विवाहानंतर लठ्ठ होतात. एवढेच नाही तर एखाद्याशी नजरानजर झाली आणि प्रेमाचा रोग लागला तरीही वजन वाढू लागते. अशाप्रकारे एखाद्याच्या प्रेमात पडणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु जर प्रेम केल्याने वजन वाढण्यास सुरूवात झाली तर ते त्या मुलींसाठी चिंतेचे कारण बनते, ज्या त्यांच्या फिगरविषयी खूप सावधगिरी घेतात.

ऑस्ट्रेलियाच्या ‘सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी’च्या एका अभ्यासानुसार, जेव्हा लोक एखाद्यासोबत नात्यामध्ये असतात किंवा एखाद्याच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांचे वजन वाढू लागते. संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात १५ हजाराहून अधिक लोकांना समाविष्ट केले. यामध्ये त्यांनी वेगवेगळया जीवनशैलीचे एकेरी आणि जोडपी दोन्ही प्रकारचे लोक सामील केले आणि त्यानंतर पुरुष आणि स्त्रियांच्या बॉडी मास इंडेक्सची तुलना करुन निकाल जाहीर केला.

संशोधनादरम्यान असे दिसून आले की जेव्हा लोक नात्यामध्ये गुंततात तेव्हा त्यांचा लठ्ठपणा वाढू लागतो कारण त्यांच्यामध्ये जोडीदाराला प्रभावित करण्याची भावना जवळजवळ संपुष्टात येते आणि शरीराचा बांधा राखण्याकडे ते अधिक लक्ष देत नाहीत.

संशोधनात सामील झालेल्या बऱ्याच लोकांनी हे कबूल केले की लग्नानंतर किंवा नात्यात गुंतल्यानंतर ते व्यायाम करणे, जॉगिंग करणे किंवा इतर शारीरिक हालचालींवर कमी लक्ष देऊ लागले होते. त्यांचे अधिकतर लक्ष जोडीदारासह फिरणे, मौज-मजा करणे आणि वेगवेगळया प्रकारच्या पदार्थांचा आनंद लुटणे यात व्यतीत झाले, ज्यामुळे त्यांचे वजन वाढत गेले. वैवाहिक जीवनातून आनंदी, समाधानी आणि सुरक्षित वाटणाऱ्या जोडप्यांचे वजन वाढण्याची अधिक शक्यता असते, कारण त्यांच्या मनावर इतर कुणाला आकर्षित करण्याचा दबाव नसतो.

वजन वाढवण्यामागील मुख्य कारण म्हणजे प्रेमसंबंधात असलेले लोक व्यायामासाठी जिममध्ये जाण्यापेक्षा आपल्या जोडीदारासमवेत घरी जास्त वेळ घालवणे पसंत करतात. ही बदललेली जीवनशैलीदेखील वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

याशिवाय जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा ते खूप आनंदी असतात आणि जर संबंध नवीन असेल तर हा आनंद दुप्पट होतो. आपणास सांगू इच्छिते, जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन ऑक्सीटोसिन आणि डोपामाइन निघतात, हे हॅपी हार्मोन चॉकलेटस, वाइन आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढवतात, जे वजन वाढवण्याचे कार्य करतात.

झोपेचा अभाव

लग्नानंतर मुलींचे झोपेचे स्वरूप बदलते. बऱ्याच वेळा त्यांना पुरेशी झोप मिळत नाही, जे वजन वाढण्याचे एक कारण बनते. लग्नानंतर आपले घर सोडल्यावर इतर कोणत्याही ठिकाणी जुळवून घेणे सर्वात कठीण काम आहे. नवीन घराशी जुळवून घेण्यात काहीसा तणाव तर असतोच, ज्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे वजनावर होतो.

आश्चर्यकारक डिश

लग्नानंतर भारतीय महिला पाककलेत खूप प्रयत्न करतात जेणेकरून त्यांचे जोडीदार आणि कुटुंबातील इतर सदस्य खूष होतील आणि तिची प्रशंसा करतील. जेव्हा दररोज विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि खाल्ले जातात तेव्हा वजन वाढणे स्वाभाविक आहे. हॅपी मॅरेजपासूनच वजन वाढते असे नाही, कधीकधी जरी वैवाहिक जीवन सुखी नसेल तरी दोन्ही पती-पत्नीचे वजन वाढू लागते आणि त्याचे कारण स्वयंपाकघरात बनणारे विविध उच्च कॅलरीयुक्त पदार्थ आहेत.

हार्मोन्समध्ये बदल

जेव्हा मुलगी वैवाहिक जीवनात प्रवेश करते तेव्हा तिच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. लैंगिक जीवनात सक्रिय राहणे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. जोडीदाराशी शारीरिक निकटता, शरीरात आनंदी हार्मोन्स म्हणजेच ऑक्सिटोसिन आणि डोपामाइनचा स्त्राव वाढवते, ज्यामुळे शरीराच्या रचनेत थोडा-फार बदल होतो.

महिला ज्याच्याशी प्रेम करतात त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्यांची कंबर आणि नितंबाची रुंदी वाढते. सहसा असे दिसून येते की सेक्सनंतर भूकदेखील वाढते. या व्यतिरिक्त आपण गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळयादेखील वापरण्यास सुरवात करता. जे आपल्या लठ्ठपणाचे कारण बनते. पतीबरोबरच्या शारीरिक संबंधामुळे हार्मोन्समध्ये आलेल्या बदलांचा परिणाम अवयवांवर स्पष्टपणे दिसून येतो. विशेषत: स्तनावर, कंबरेवर आणि नितंबांवर.

लग्नानंतर मुलींचे नितंब त्यांच्या सामान्य आकारापासून वाढत जाऊन किंचित मोठे होतात. हे नैसर्गिकपणे होणेदेखील आवश्यक आहे, कारण शारीरिक संबंधानंतर गर्भधारणेची प्रक्रिया होते. स्वाभाविकच मोठे नितंब असलेल्या स्त्रियांना प्रसुतिदरम्यान जास्त वेदना होत नाहीत आणि त्या आरामात बाळाला जन्म देतात, तर लहान नितंब असलेल्या सडपातळ स्त्रियांना असह्य वेदनेला सामोरे जावे लागते.

कमी खावे, दु:ख पचवावे

सडपातळ राहण्यासाठी एक म्हण प्रसिद्ध आहे की कमी खावे, दु:ख पचवावे. वास्तविक, शरीराला सडपातळ ठेवण्यासाठी नेहमी भुकेपेक्षा थोडे कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. दुसरे चिंतेचे वर्णन चितेसमान यासाठी केले गेले आहे कारण त्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

चिंताग्रस्त व्यक्तीला कमी भूक लागते, ज्यामुळे तो लठ्ठ बनत नाही. जेव्हा आपण एकटे, अविवाहित असतो, दु:खी राहतो, आपला कोणी प्रियकर किंवा जोडीदार नसतो तेव्हा आपण एकाकीपणाच्या भावनेने संघर्ष करत असतो. हाच विचार करत असतो की असं कोणीतरी असतं, ज्याला आपण आपलं माणूस म्हटलो असतो. या दु:खाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून एकटा माणूस बऱ्याचदा सडपातळ असतो.

प्रेमात पडल्यानंतर आपण ना केवळ आनंदी असतो, हिंडत-फिरत असतो तर आपल्याजोडीदाराबरोबर पिझ्झा, बर्गर, नॉन-वेज, आईस्क्रीम, चॉकलेट यासारख्या गोष्टी देखील खात-पित असतो. लग्नानंतर मुली पतीसमवेत राहून बाहेर जेवण घेणे पसंत करतात. हनिमूनच्या वेळीही बाहेरचे भोजन खातात. जे उच्च कॅलरीचे असते. हे सर्व प्रेमाचे दुष्परिणाम आहेत, जे आपला शारीरिक बांधा खराब करतात. म्हणून प्रेम करा, भरभरून करा, परंतु आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि व्यायाम करण्यासदेखील विसरू नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...