पद्मा अग्रवाल

‘श्यामली बुटिक’ लखनऊ शहरात या बुटिकची कोणी ओळख करून देण्याची गरज नाही. गरज असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण उत्कृष्ट काम हेच श्यामलीजींच्या जीवनातील ध्येय होते. हेच ध्येय नजरेसमोर ठेवून काम केल्यामुळे काही वर्षांतच त्यांचे बुटिक शहरातील सर्वोत्तम बुटिक ठरले.

श्यामलीजींचा गोड, मधुर आवाज आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य तसेच ग्राहकांची आवड समजून घेऊन वेळेत काम पूर्ण करून देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ग्राहक खुश होत असत.

आता तर त्यांची मुलगी राशीही फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून आली आहे आणि तीही त्यांना कामात मदत करीत आहे. मुलगा शुभ अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आणि पुढे तेथेच स्थायिक झाला.

सोम त्यांच्या बुटिकचे व्यवस्थापक आहेत. पिकलेले केस, डोळयांना लागलेला चष्मा आणि थकलेले शरीर त्यांना जणू कामातून निवृत्त होण्याचा इशारा देत असल्याचा भास होतो.

रात्रीचे ८ वाजत आले होते. श्यामलीजी बुटिक बंद करण्याच्या विचारात होत्या. तितक्यात धावपळ करीत आणि धापा टाकत वन्या तेथे आली. तिने विचारले, ‘‘माझा लेहंगा तयार झाला आहे का?’’

‘हो, हो… तू एकदा घालून बघ, म्हणजे मी लगेच तुला देते.’

वन्या ट्रायल रूममध्ये गेली. तेथून लेहंगा घालून आलेल्या वन्याने श्यामलीजींना आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘तुमचे खूप खूप आभार. तुमच्या हातात जादू आहे.’’

वन्यासोबत आलेल्या तिच्या आई प्रज्ञाने पर्समधून लग्नाची पत्रिका काढून दिली आणि म्हणाल्या, ‘‘ताई, तुम्हाला लग्नाला नक्की यायचे आहे.’’

श्यामलीजींनी पत्रिका उघडली आणि म्हणाल्या, ‘‘पत्रिका खूपच सुंदर आहे.’’

‘‘७ डिसेंबर… फारच छान, नक्की येईन.’’

७ डिसेंबर ही तारीख पाहताच श्यामलीजींना आपला भूतकाळ आठवला. जुन्या आठवणी डोळयासमोर उभ्या राहिल्या…

लखनऊजवळ सुलतानपूर नावाचे छोटेसे शहर आहे. त्या तेथील निवासी होत्या. ३ बहिणी आणि २ भावांमध्ये त्या सर्वात मोठया होत्या. अभ्यासापेक्षा जास्त त्यांना शिवणकामाची आवड होती. लहानपणी त्या आईची ओढणी किंवा साडी वापरून आपल्या बाहुलीसाठी विविध प्रकारचे कपडे स्वत:च तयार करीत असत.

हे सर्व पाहून आईने सांगितले होते की, तुला फॅशन डिझायनिंगचे शिक्षण देईन. बीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनिंगचे धडे गिरवले.

वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी सतावत होती. हुंडा देण्याइतके भरपूर पैसे त्यांच्याकडे नव्हते. ते सतत नेटवरील लग्नाच्या साईट्सवर मुलांचा शोध घेत होते.

श्यामलीजींचा चेहरा गोल तर रंग गव्हाळ होता. रेखीव चेहऱ्याची ती नाजूक, आकर्षक मुलगी होती. त्यांचा कमनीय बांधा आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य कुणालाही आकर्षित करेल असेच होते. त्या जेवण खूपच चविष्ट बनवायच्या. म्हणूनच वडिलांसाठी त्या अन्नपूर्णा होत्या.

वडिलांना सोम यांची माहिती आवडली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीची माहिती आणि फोटो त्यांच्या वडिलांना पाठवला. सोमच्या वडिलांचे लखनऊमधील अमिनाबाद येथे चांगले चालणारे औषधांचे दुकान होते. सुखवस्तू कुटुंब आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे श्यामलीजींचे वडील खुश होते.

सोम यांचे वडील केशवजींचा फोन आला आणि घरात लगबग सुरू झाली. त्यांनी श्यामली यांचा मेल आयडी मागितला. तेव्हापासून सोम आणि श्यामलीजींचे मेलवर चॅटिंग सुरू झाले. सोम यांच्या गोड, प्रेमळ बोलण्याने जणू श्यामलीजींच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या.

लवकरच लग्न झाले. मनात भविष्याची सुखद स्वप्ने रंगवत सोम यांचा हात धरून त्यांनी त्यांच्या आलिशान घरात प्रवेश केला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

सोम यांच्या मिठीतील श्यामलीजींचा यावर विश्वासच बसत नव्हता की, जीवन इतके सुंदर असू शकते.

त्या सोम यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. मात्र नवऱ्याचा स्वभाव त्यांना नीटसा समजू शकला नव्हता. १-२ महिन्यांनंतर त्यांच्या लक्षात आले की सोम दुकानात केवळ पैसे घेण्यासाठी जात. मित्रांसोबत सिगारेट ओढणे, दारू पिणे, मुलींसोबत मजा मारणे, हाच त्यांचा दिनक्रम होता.

हळूहळू शुल्लक कारणावरूनही सोम त्यांना ओरडू लागले. त्यामुळे त्यांना नवऱ्याची भीती वाटू लागली होती.

एका संध्याकाळी सोम यांनी त्यांना तयार होऊन क्लबला येण्यास सांगितले. त्या त्यांच्या खोलीत तयारी करू लागल्या. दरम्यान सोम व त्यांच्या वडिलांचे जोरजोरात सुरू असलेले बोलणे त्यांच्या कानावर पडले.

त्यानंतर खोलीत आलेल्या सोम यांच्या चेहऱ्यावरील तणाव पाहून त्यांनी काळजीने विचारले की, वडील एवढे का चिडलेत? त्यावर तू गरज नसलेल्या गोष्टीत नाक खुपसू नकोस, असे उद्धट उत्तर त्यांना मिळाले.

त्या दिवशी श्यामलीजी खूपच छान तयार झाल्या होत्या. काळया साडीत अतिशय सुंदर दिसत होत्या.

वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे क्लबला पोहोचायला त्यांना उशीर झाला. तिथे कॉकटेल पार्टी सुरू होती. सेक्सी कपडे घातलेल्या महिलांच्या हातात दारूचे ग्लास होते. श्यामलीजी घाबरून सोम यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांच्यासाठी ते वातावरण खूपच नवीन आणि विचित्र होते.

सोम यांचे मित्र अतुलने श्यामलीजींना दारूने भरलेला ग्लास दिला.

श्यामलीजींनी घाबरून सांगितले, ‘‘मी ड्रिंक करीत नाही.’’

सोम यांनी जबरदस्तीने तो ग्लास श्यामलीजींच्या ओठाला लावला. ‘‘असे गावठी वागणे आता सोडून दे. श्रीमंतासारखी वाग आणि त्यांच्यासारखी मजा मार.’’

श्यामलीजींच्या डोळयांतून अश्रू ओघळू लागले. त्या कोपऱ्यात जाऊन बसल्या. मांसाहारी जेवण पाहून त्या जेवल्यादेखील नाहीत.

त्या दिवशी त्यांच्या अशा वागण्यामुळे आपली लाज गेली, असे सोम यांना वाटू लागले. तेथून परत येताना रस्ताभर ते श्यामलीजींना ओरडत होते. शिव्यांची लाखोली वाहत होते.

इतक्या शिव्या दिल्यानंतरही श्यामलीजींकडून जबरदस्तीने त्यांनी शरीरसुख घेतलेच.

त्या रात्रभर रडत होत्या. अशा परिस्थितीत काय करावे, हेच त्यांना सुचेनासे झाले होते.

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, मात्र अघटित घडले होते. त्यांचे जीवनच बदलून गेले होते.

रात्री सोम यांचे वडील झोपी गेले ते सकाळी उठलेच नाहीत.

सर्व काही बदलले होते. सोम यांची आई श्यामलीजींना अपशकुनी असे म्हणून जोरजोरात रडत होती. त्यांच्या लग्नाला केवळ २ महिनेच झाले होते.

नातेवाईक भेटायला आले. सर्वांसमोर सोम यांच्या आईचे एकच रडगाणे सुरू होते. हुंडा न घेता सुनेला घरात आणले, पण ती आली आणि तिने माझे सौभाग्य हिरावून घेतले. आम्हाला पुरते उद्धवस्त केले.

सोम दु:खात होते, पण ते आईला गप्प बसायला सांगू शकत होते. मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही. ते श्यामलीजींपासून अंतर ठेवून वागू लागले. असे असले तरी रात्री मात्र श्यामलीजींच्या शरीरावर अधिकार गाजवायचे. त्यांची इच्छा काय आहे, हे जाणून न घेताच शरीरसुखाची आपली भूक भागवल्यानंतर सोम त्यांच्याकडे पाठ फिरवून झोपत.

दरम्यान त्यांना नवीन पाहुण्याची चाहूल लागली. आनंदाने हसावे की ढसाढसा रडावे, हेच त्यांना समजेनासे झाले होते. विरोध करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि तेवढी हिंमतही नव्हती. त्यांना आपले लग्न मोडायचे नव्हते. नात्यांना निभावून नेणे गरजेचे असते, यावर त्यांचा विश्वास होता. दोन्ही घरची लाज समाजाच्या वेशीवर टांगली जावी, हे त्यांना मान्य नव्हते. सोम आता औषधाच्या दुकानात व्यस्त झाले होते. श्यामलीजींचेही काहीतरी स्वप्न असेल, इच्छा असतील, याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. घरातल्यांचे प्रेम आणि आदर मिळावा एवढीच त्यांची अपेक्षा होती, पण त्या केवळ एक चालती-बोलती मशीन बनून राहिल्या होत्या, जिचे काम होते सासू आणि सोम यांना कुठल्याही परिस्थितीत आनंदात ठेवणे. कोणी घरी आले तर त्यांचा पाहुणचार करणे.

त्यांनी संपूर्ण दिवस स्वत:ला घरकामत व्यस्त करून घेतले होते. तरीही त्यांनी बनवलेले जेवण सोम यांना कधीच आवडत नव्हते. हे काय बनवलेस? मला मटार-पनीरची भाजी हवी आहे. हे ऐकून त्या बिचाऱ्या थकून भागून रात्री ११ वाजता पुन्हा भाजी बनवायच्या तयारीला लागत.

जेव्हा कधी त्यांचे आईवडील त्यांना भेटायला येत किंवा माहेरी पाठविण्याची विनंती करीत तेव्हा सासू अतिशय प्रेमाने वागून माहेरी पाठवण्यास नकार देत असे. ते पाहून आपल्या मुलीला खूपच चांगले, सुखवस्तू कुटुंब मिळाले, जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला, आपण धन्य झालो, असेच श्यामलीजींच्या आईवडिलांना वाटत असे.

आपल्या आईच्या खांद्यावर डोके ठेवून तिला सर्व सांगावे, असे श्यामलीजींना वाटत असे, पण मनातले सांगण्यासाठी सासू आणि सोम एक क्षणही त्यांना एकटे सोडत नव्हते.

राशीचा जन्म झाल्यानंतर वर्षभरातच शुभ झाला. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिकच वाढली. संसार आणि मुलांमध्ये त्या अडकल्या.

जेव्हा सोम त्यांना ओरडत, त्यांचा अपमान करीत तेव्हा त्यांना स्वत:चाच राग येत असे. आपणच हे सर्व का सहन करीत आहोत? मुले फक्त माझीच आहेत का? सोमही त्यांचे वडील आहेत, असे त्यांना वाटे.

सोम यांच्यासाठी त्या केवळ शरीराची भूक भागविण्यापुरत्या राहिल्या होत्या.

सोम यांनी दुकानाचा पसारा वाढवला होता. त्यामुळे ते कामात जास्तच व्यस्त झाले होते.

दुकानात कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी एक मुलगी होती. तिचे नाव नईमा होते. ती खूपच सुंदर आणि फॅशनेबल होती. सोम तिच्या प्रेमात पडले. ते तिला आपल्यासोबत क्लबला घेऊन जात. तिथे पॉप संगीताच्या तालावर नृत्य आणि दारूचे ग्लास रिचवले जात होते. तिथे ती सोम यांच्या मनाप्रमाणे वागत असे. त्यामुळे काही दिवसांतच ती सोम यांची गरज आणि त्यांचे संपूर्ण विश्व झाली.

एके दिवशी दुकानाचे व्यवस्थापक महेशजी यांनी आपले नाव समजू देऊ नका, अशी अट घालत सोमच्या आईला सांगितले की, सोम वाईट मार्गाला लागले आहेत. बनावट औषधे विकत आहेत. अनेकदा मुदत संपलेली औषधेही सर्रास विकतात. त्यांनी अमली पदार्थ विकण्याचे कामही सुरू केले आहे, त्यामुळे ते कधीही संकटात सापडू शकतात.

हे ऐकल्यानंतर सासूला श्यामलीजींची आठवण आली. वेळीच त्याला लगाम घाल, नाहीतर तो स्वत:सोबत आपल्या सर्वांच्या आयुष्याचीही वाट लावेल, असे त्यांनी शयामलीजींना सांगितले.

सोम यांच्यासोबतचे नाते केवळ औपचारिकतेपुरते उरले होते. दुसरीकडे हातात हरामाचा पैसा खेळू लागला होता. त्यामुळे सोम मुलांसाठी महागडी खेळणी आणत. श्यामलीजी आणि स्वत:च्या आईसाठी महागडया भेटवस्तू आणत.

ते नेहमीच रात्री उशिरा घरी येत. त्यांच्या तोंडून दारूची दुर्गंधी येत असे, पण भांडण नको, असा विचार करून श्यामलीजी सर्व निमूटपणे सहन करीत होत्या.

त्यांना महागडया भेटवस्तू, भरजरी साडया नको होत्या. त्या केवळ पतीच्या निर्मळ प्रेमाच्या भुकेल्या होत्या. त्यांच्या मिठीत शिरून प्रेमाने गप्पा माराव्यात, एवढीच त्यांची अपेक्षा होती.

नियतीने स्त्रीला इतकी दुबळी बनवले आहे की, आपला संसार मोडू नये यासाठी ती आपले अस्तित्वच पणाला लावते.

आता तर सोम यांनी आणलेल्या भेटवस्तू त्या उघडूनही पाहत नसत.

एके दिवशी सोम चिडून म्हणाले, एवढया महागडया साडया आणून देतो, पण तुझा उदास आणि निराश चेहरा पाहिला की, मला तुझ्याकडे बघावेसेही वाटत नाही.

श्यामलीजींनी हिंमत करून त्यांना मुलांची शपथ घालून दारू पिऊ नका, क्लबला जाऊ नका, असे सांगितले. मात्र कुठलीच लाज न बाळगता सोम म्हणाले की, मी दारू पिऊ नको तर काय करू? तुझ्यासोबत राहून मी मानसिक आणि शारीरिकदृष्टयाही समाधानी नाही. माझी आणि तुझी मानसिकता खूपच वेगळी आहे. त्यामुळे आपले कधीच एकमत होऊ शकत नाही.

मी तुला सर्व खर्च करीत आहे. तुझ्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे. तुला महागडया भेटवस्तू, साडया, दागिने आणून देतो. आपल्याकडे गाडी आहे, ड्रायव्हर आहे. तू एवढया मोठया आलिशान घरात राहतेस. तुला आणखी काय हवे?

बायको आहेस. बायको बनूनच रहा. जर येथे रहायचे नसेल तर तुझ्या गावी निघून जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी मुले येथेच राहतील.

इतके बोलल्यानंतर सोम क्लब किंवा दुसरीकडे कुठेतरी निघून गेले. त्या घाबरून गप्प बसल्या. मुले त्यांचा जीव की प्राण होती. तीच त्यांच्या जीवनाचा आधार होती. त्यांच्यासाठीच तर त्या जगत होत्या. त्यांचे गप्प बसणे आणि निमूटपणे सहन करण्याच्या स्वभावामुळेच सोम यांची हिंमत वाढत चालली होती. त्यामुळेच नईमासोबत ते बिनधास्तपणे फिरत होते. बऱ्याचदा ते तिला घरी घेऊन येत असत. अनेकदा स्वत: घरी येत नसत.

श्यामलीजी शांतपणे सर्व सहन करीत होत्या. त्यांचे दु:ख अश्रूंच्या रूपात त्यांच्या डोळयातून वाहत असे. एकांतपणा हा त्यांच्या प्रत्येक दु:खातील सोबती होता. बंड पुकारणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. जास्त काही बोलल्यास आपला संसार मोडेल, मुले अनाथ होतील, याची त्यांना जाणीव होती. आपल्या अशा असहाय्यतेमुळे अनेकदा त्या स्वत:वरच रागवत. तरीही संसार मोडेल या भीतीने त्या हिंमत करूनही बोलू शकत नव्हत्या. छोटीशी राशी जेव्हा त्यांचे अश्रू पुसून रडू नकोस असे सांगत असे तेव्हा त्यांच्यासाठी अश्रू रोखणे अधिकच अवघड होत असे.

दुकानातील वयस्कर व्यवस्थापकांनी २-३ वेळा त्यांनाही फोन करून सांगितले होते की, सोम यांचा बनावट औषधांचा तसेच अमली पदार्थ विक्रीचा अवैध व्यवसाय वाढतच चालला आहे.

हे असेच चालू राहिले तर लवकरच ते एखाद्या प्रकरणात अडकतील. हे ऐकून श्यामलीजी काळजीत पडल्या. त्यांचे स्वत:चे आणि त्यांच्या लाडक्या मुलांचे भविष्यही पणाला लागले होते. दुकानातील इतर काही मुलांकडेही त्यांनी विचारपूस केली, तेव्हा त्यांना समजले की, खरोखरच सोम वाईट मार्गावर भरकटत खूप पुढे निघून गेले आहेत.

अखेर एके दिवशी एक वाईट घटना घडलीच. त्यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या नकली औषधांमुळे एका मुलाचा मृत्यू झाला. प्रकरण चांगलेच पेटले. ती माणसे काठया घेऊन आली. त्यांनी दुकानाची तोडफोड केली. सोम यांनाही चांगलाच चोप दिला. पोलीस आले. त्यांना कसेबसे पैसे देऊन सोम यांनी प्रकरण मिटवले, पण याच दरम्यान त्या मृत मुलाच्या वडिलांनी ‘ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट’ला तक्रारीचा मेल केला. त्यांच्या पथकाने अचानक येऊन दुकानावर छापा टाकला.

प्रकरण गंभीर होते. लोकांच्या जीवाशी खेळ केल्याच्या आरोपाखाली सोम यांना अटक झाली आणि औषधांचे दुकानही सील करण्यात आले. त्यांनी चांगला वकील शोधण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला.

जामीन मिळण्यासाठी सुमारे ३ महिने लागले. घरखर्च भागविणे अवघड झाले. एकेक करून घरातील सर्व नोकरांना काढून टाकावे लागले. मुलांसाठी दूध विकत घेणेही अशक्य झाले. घरातले काही सामान विकून कसेबसे काही पैसे मिळत होते.

सोम जामिनावर सुटून घरी आले तेव्हा त्यांना ओळखणे अवघड झाले होते. रंग काळा पडला होता आणि शरीर कृश झाले होते. त्यांना कोणाच्याही समोर यायचे नव्हते. इतकेच नव्हे तर मुलांसोबत बोलणेही ते टाळत होते. शांतपणे आपल्या खोलीत झोपून छताकडे एकटक पाहत रहायचे.

नवीन मार्ग शोधण्याऐवजी सोम निराशेच्या गर्तेत खोलवर अडकत गेले. सांत्वनाच्या नावाखाली नातेवाईक आणि ओळखीच्या माणसांनी मारलेले टोमणे, त्यांनी रोखलेल्या नजरांनी ताज्या जखमांवर जणू मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे घरातील सर्वांचेच जीवन अवघड झाले.

श्यामलीजींसाठी ही परीक्षेची वेळ होती. आता स्वत:हून पुढाकार घेऊन घरची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करणे त्यांच्यासाठी गरजेचे होते.

एकीकडे निराशेने ग्रासलेले सोम तर दुसरीकडे १२ वर्षांची राशी आणि ११ वर्षांचा शुभ होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी घराचा मोर्चा सांभाळला. सोम यांना     निराशेतून बाहेर काढण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या. मुलांकडेही त्यांचे व्यवस्थित लक्ष होते.

मित्र-मैत्रिणींच्या ओळखीतून एका मोठया बुटिकमध्ये त्यांना फॅशन डिझायनरची नोकरी मिळाली. लवकरच श्यामलीजी किती हुशार आहेत, हे बुटिकच्या मालक असलेल्या कल्पनाजींनी अचूक हेरले. त्यांनी डिझाईन केलेले कपडे ग्राहकांना आवडू लागले. वर्षभरातच त्या बुटिकचा व्यवसाय मोठया प्रमाणावर वाढला. सोबतच श्यामलीजींचा पगारही वाढला.

जीवनाची गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली होती. नोकरीला लागून त्यांना जवळपास २ वर्षे झाली होती. आता स्वत:चे बुटिक सुरू करावे असे त्यांना वाटू लागले. मात्र त्यासाठी पैशांची गरज होती.

त्यांनी महिला गृहउद्योग योजनेअंतर्गत बँकेत कर्जासाठी अर्ज दिला आणि  त्यानंतर घरातील एका खोलीत आपले बुटिक सुरू केले. ४ शिलाई मशीन आणि काही कारागीर मुलींना सोबत घेऊन त्यांचा हा व्यवसाय सुरू झाला. कष्ट करण्याची प्रचंड तयारी आणि कल्पक संकल्पनांमुळे अल्पावधीतच त्यांचा व्यवसाय नावारूपाला आला.

शहरात त्यांच्या बुटिकच्या आणखी २ शाखा सुरू झाल्या. सुमारे ४० लोकांना त्यांच्यामुळे रोजगार मिळाला.

राशीने आवाज दिल्यामुळे त्या भूतकाळातील या आठवणीतून बाहेर पडल्या. ‘‘आई, कसला विचार करतेस? घरी जायचे नाही का?’’

त्या वर्तमानात परत आल्याच होत्या की, तेवढयातच त्यांच्या मोबाइलची रिंग वाजली. ‘‘श्यामली मॅडम का?’’

‘‘हो.’’

‘‘अवघड परिस्थितीवर मात करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल महिला दिनानिमित्त ‘विजय नगरम हॉल’मध्ये तुमचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. उद्या आम्ही आमंत्रणपत्रिका घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहोत.’’

‘‘धन्यवाद,’’ असे म्हणताना श्यामलीजी भावूक झाल्या होत्या. मोबाईल स्पीकरवर असल्यामुळे तेथे असलेल्या सर्वांनाच ही आनंदाची बातमी समजली होती.

सोमही भावूक झाले होते. त्यांनी प्रेमाने श्यामलीजींना आलिंगन दिले. ‘‘श्यामली, मी तुला ते प्रेम आणि सन्मान देऊ शकलो नाही ज्याच्यावर तुझा अधिकार होता. म्हणूनच आता संपूर्ण लखनऊ शहरच तुझा सन्मान करणार आहे.’’

इतक्या वर्षांनंतर सोम यांच्या त्या प्रेमळ आलिंगनामुळे श्यामलीजींना भरून आले होते. त्यांनीही प्रेमाने सोम यांना आपल्या मिठीत कैद केले.

मुलगी राशिकडे लक्ष जाताच त्या लाजल्या.

सोमने फोन करून या सत्कार सोहळयासाठी श्यामलीजींच्या आईवडिलांना आमंत्रण देऊ लागले, जणू आज त्यांचे सर्व दु:ख दूर झाले होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...