कथा * इंजी आशा शर्मा

‘‘कशी आहेस पुन्नू?’’ मोबाईलवर आलेला एसएमएस वाचून पूर्णिमाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या.

‘मला अशा नावाने हाक मारणारा कोण असेल? अजय तर नसेल ना? पण, त्याच्याकडे माझा हा नंबर कसा असेल? शिवाय त्याला १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मला आठवण्याची अशी कोणती गरज पडली असेल? आमच्यामध्ये जे होते ते सर्व कधीच संपले आहे,’ मनात आलेल्या विचारांना थांबवत पूर्णिमाने तो नंबर ट्रुकॉलरवर टाकला आणि तिचा संशय खरा ठरला. तो अजयच होता. पूर्णिमाने त्या एसएमएसला काहीच उत्तर न देता तो डिलीट केला.

अजय तिचा भूतकाळ होता… महाविद्यालयीन दिवसांत त्यांच्या प्रेमाला बहर आला होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अजयचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण त्याच्या प्रेमात एकाधिकारशाही अधिक होती. अजयचे तिच्यावरील प्रेम पाहून सुरुवातील पूर्णिमाला स्वत:चा खूपच अभिमान वाटायचा. इतके प्रेम करणारा प्रियकर मिळल्यामुळे तिला आभाळही ठेंगणे वाटू लागले होते. पण हळूहळू अजयच्या प्रेमाचे हे बंधन तिला बेडयांप्रमाणे वाटू लागले. त्याच्या प्रेमाच्या पाशात अडकलेल्या पूर्णिमाचा श्वास कोंडू लागला.

अजयला कुठलीही व्यक्ती पूर्णिमाच्या जवळ साधी उभी जरी राहिली तरी आवडत नसे. पूर्णिमा एखाद्याशी हसून बोलली तरी सहन होत नसे. त्यानंतर त्याच्या रुसण्याचा आणि पूर्णिमाने त्याची समजूत काढण्याचा क्रम नित्याचाच होत असे. कित्येक दिवस अजय रुसून बसायचा.

पूर्णिमा त्याच्या मागे-पुढे फिरायची. समजूत काढायची. त्याने बोलावे यासाठी मनधरणी करायची… मी तुझीच आहे असे शपथ घेऊन सांगायची… स्वत:ची काहीही चूक नसताना माफी मागायची. तेव्हा कुठे अजय राग विसरून शांत व्हायचा आणि पूर्णिमा सुटकेचा नि:श्वास टाकायची. मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो रागाने रुसून बसायचा.

महाविद्यालयात अनेक मित्र होते, बरेच कार्यक्रम व्हायचे. अशा वेळी एकमेकांशी बोलावेच लागायचे. पण असे घडताच तो पूर्णिमाशी बोलणे बंद करायचा. मग काय, ती पुन्हा एकदा त्याची मनधरणी करण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करायची.

हळूहळू पूर्णिमाच्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे भीतीने घर केले. इतर कुणाशीही बोलताना ती घाबरून जायची. तिचे सर्व लक्ष याकडेच असायचे की, अजय आपल्याला असे बोलताना पाहात तर नाही ना… जर अजयने बघितलेच तर मी काय उत्तर देऊ… त्याची समजूत कशी काढू… त्याला काहीही कारण सांगितले तरी त्याचे समाधान होणार नाही… माझ्या मनात इतर कुणाबद्दल काहीच नाही, याचा मी त्याला काय पुरावा देणार इत्यादी.

अखेर महाविद्यालयातील शेवटचे वर्ष संपायला आले असताना तिने अजयसोबतचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. तिला हे चांगल्या प्रकारे माहिती होते की, तिच्या या निर्णयामुळे अजय खूपच दु:खी होईल. पण हेही नाकारता येत नव्हते की, जर यावेळी ती भावनांमध्ये गुरफटली तर भविष्यात तिच्या प्रेमाची नाव अजयच्या संशयी स्वभावाच्या वादळात अडकून बुडून जाईल. हे कोणाच्याच भल्याचे नसेल, अजयच्याही नाही आणि स्वत: पूर्णिमाच्याही नाही.

पूर्णिमाने काळजावर दगड ठेवून तिच्या वडिलांच्या पसंतीचा मुलगा रवीशी लग्न केले. आता या जुन्या शहराशी तिचे नाते केवळ सुट्टीच्या दिवसांत माहेरी येण्यापुरतेच राहिले होते. अजयही नोकरीसाठी शहर सोडून गेला आहे, हे तिला तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींकडून समजले होते. मागील १० वर्षांत आयुष्य बदलून गेले. पूर्णिमा २ मुलांची आई झाली. खासगी महाविद्यालयात शिकवत होती. वेळ पंख लावून कधी उडून गेली हे, रवी, मुले आणि संसारात मग्न झालेल्या पूर्णिमाला समजलेदेखील नाही. पण आज अचानक अजयच्या आलेल्या या एसएमएसमुळे ती घाबरून गेली. काळाची जी तप्त राख आता थंड झाली आहे असे तिला वाटत होते त्यात अजूनही एखादी ठिणगी जळत होती. तिचा थोडासा बेजबाबदारपणाही या ठिणगीचा भडका उडवेल आणि आगीच्या या भडक्यात न जाणो कितीतरी जणांच्या आशा-अपेक्षा जळून खाक होतील, याची जाणीव पूर्णिमाला झाली.

पुढील ३-४ दिवस अजयकडून कुठलाच एसएमएस आला नाही. तरीही पूर्णिमा अजयकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. तिला त्याचा सनकी स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता, त्यामुळेच त्याच्या डोक्यात कटकारस्थान शिजत असल्याचे ती समजून गेली होती. अजय शांत बसणाऱ्यांपैकी मुळीच नव्हता.

आज नेमके तेच घडले ज्याची पूर्णिमाला भीती होती. तासिका संपवून ती कॉमन रूममध्ये बसली होती आणि तेवढयातच तिचा मोबाईल वाजला. फोन अजयचा होता. तिने घाबरतच तो उचलला.

‘‘कशी आहेस पुन्ना?’’ अजयचा आवाज थरथरत होता.

‘‘माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही,’’ पूर्णिमाने अनोळखी असल्याप्रमाणे उत्तर दिले.

‘‘मी तर तुला एक क्षणही विसरू शकलो नाही… तू मला कशी विसरू शकतेस पुन्नू?’’ अजयने भावूक होत विचारले.

पूर्णिमा काहीच बोलली नाही.

‘‘मी अजय बोलत आहे… १० वर्षे लोटली… पण एकही दिवस असा गेला नाही जेव्हा तूझी आठवण आली नसेल… आणि तू मला विसरलीस? पण हो, एक गोष्ट नक्की… तू अजूनही तशीच दिसतेस… अगदी महाविद्यालयीन तरुणी… काय करणार? फेसबूकवर तुला बघून कशीबशी मनाची समजूत काढतो…’’

अजय मनाला वाटेल तसे बोलत होता, दुसरीकडे पूर्णिमाला काय करावे तेच सूचत नव्हते. आपल्या सुखी भविष्यावर संकटाचे ढग आल्याचे तिला स्पष्ट दिसत होते.

अजयचे फोन कॉल्स आणि एसएमएसची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अधूनमधून व्हॉट्सअपवरही मेसेज येऊ लागले. पूर्णिमा त्याला ब्लॉक करू शकत होती, पण तिला माहीत होते की, प्रेमभंग झाल्यामुळे जखमी झालेला प्रियकर सापासारखा असतो… त्यामुळेच ती कठोरपणे वागली तरी रागाच्या भरात अजय न जाणो कोणते पाऊल उचलेल जे तिच्यासाठी धोकादायक ठरेल, याची तिला भीती होती. पण हो, ती त्याच्या कुठल्याच मेसेजला उत्तर देत नव्हती. स्वत:हून त्याला फोनही करत नव्हती. पण अजयचा फोन उचलत होती, जेणेकरून त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जाणार नाही.

अजयच्या बोलण्याकडे ती विशेष लक्ष देत नव्हती. फक्त हा, हू म्हणत फोन कट करायची. अजयनेच बोलण्याच्या ओघात तिला सांगितले होते की, ज्या दिवशी पूर्णिमाचे लग्न झाले त्याच दिवशी त्याने झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २ वर्षे तो प्रचंड नैराश्यात होता. त्यानंतर कसेबसे त्याने स्वत:ला सावरले. आईवडिलांच्या आग्रहामुळे विभाशी लग्न केले, पण पूर्णिमाला तो एक क्षणही विसरू शकला नव्हता. विभा त्याची खूप काळजी घेत असे. आता तोही २ मुलांचा बाबा झाला होता, काही दिवसांपूर्वीच त्याची बदली या शहरात झाली इत्यादी…

अजयचे या शहरात असणे पूर्णिमासाठी त्रासदायक ठरत होते. ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघायची तेव्हा अनेकदा एखाद्या रस्त्यावर आतूर प्रियकर बनून अजय उभा असल्याचे पाहायची. १-२ वेळा तिचा पाठलाग करत तो महाविद्यालयापर्यंत आला होता. ती सतत याच काळजीत होती की, अजयने काहीही चुकीचे वागू नये, ज्यामुळे तिला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल.

‘‘पुन्नू तुला २० एप्रिल आठवतोय?’’ आपली पहिली भेट… अजयने उत्साहाने पूर्णिमाला फोनवर विचारले.

‘‘आठवत तर नव्हता, पण आता तूच आठवण करून दिलीस,’’ पूर्णिमाने शांतपणे सांगितले.

‘‘ऐक २० एप्रिल जवळ येत आहे… मला तुला एकटीला भेटायचे आहे… कृपा करून नाही म्हणू नकोस… अजयने विनंतीच्या स्वरात सांगितले.

‘‘अजय, मला शक्य होणार नाही… हे शहर छोटे आहे… आपल्याला कोणी एकत्र पाहिले तर मोठी समस्या निर्माण होईल,’’ पूर्णिमाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

‘‘इथे नाही तर कुठेतरी दुसरीकडे चल, पण नक्की भेट पुन्नू. तुझ्या मनात आले तर काहीच अशक्य नाही… जर तू आली नाहीस तर मी दिवसभर तुझ्या महाविद्यालयासमोर उभा राहीन,’’ अजय हट्ट सोडायला तयार नव्हता.

‘‘अजय, अजून २० एप्रिल यायला बराच वेळ आहे… मी आताच कुठलेही आश्वासन देऊ शकत नाही… शक्य झाल्यास बघू,’’ असे सांगून तिने विषय टाळला.

पण अजय सहज सांगून ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. तो दर दोन दिवसांनी कधी मेसेज तर कधी फोन करून २० एप्रिलला भेटण्यासाठी पूर्णिमावर मानसिक दबाव आणत होता.

१५ एप्रिलला अचानक पूर्णिमाला महाविद्यालयीन प्रशासनाकडून सूचना सांगण्यात आले की, तिला एनसीसी कॅडेट्सला घेऊन प्रशिक्षण शिबिरासाठी जायचे आहे. १९ ते २५ एप्रिलपर्यंत दिल्लीत होणाऱ्या या शिबिरासाठी महाविद्यालयातील मुलींना घेऊन तिला १८ एप्रिलला दिल्लीला जायचे होते. अजयला भेटण्यापासून वाचविल्याबद्दल पूर्णिमाने नियतीचे मनोमन आभार मानले आणि नंतर गाणे गुणगुणत दिल्लीला जायची तयारी करू लागली.

‘‘आपण भेटणार आहोत ना २० एप्रिलला?’’ अजयने १७ तारखेला तिला व्हॉट्सअप मेसेज केला.

‘‘मी २० तारखेला शहराबाहेर आहे,’’ पूर्णिमाने पहिल्यांदाच अजयच्या मेसेजला उत्तर दिले.

‘‘कृपा करून माझ्यासोबत इतक्या कठोरपणे वागू नकोस… काहीही करून तुझे जाणे रद्द कर… फक्त एकदा शेवटचे माझे म्हणणे ऐक… त्यानंतर मी असा हट्ट कधीच धरणार नाही,’’ अजयने रडक्या इमोजीसह मेसेज पाठवला.

यावेळी मात्र पूर्णिमाने कुठलेच उत्तर दिले नाही.

‘‘कुठे जाणार आहेस, एवढे तर सांगू शकतेस ना?’’ अजयने पुन्हा मेसेज केला.

‘‘दिल्ली.’’

‘‘मीही येऊ?’’ अजयने मेसेज करून विचारले.

‘‘तुझी मर्जी… या देशाच्या प्रत्येक नागरिकाला कुठेही येण्या-जाण्याचा अधिकार आहे,’’ असे टाईप करून त्याच्यासह दोन स्मायली टाकून तिने मेसेज केला.

‘‘तर मग २० एप्रिलला मीही दिल्लीला येत आहे,’’ अजयने लिहिले.

पूर्णिमाला असे वाटले की, एकतर तो दिल्लीला येणार नाही आणि आला तरी चांगलेच होईल… कदाचित तिथे एकांतात त्याला सत्याचा आरसा दाखवून वर्तमानकाळात आणता येईल… वेडा, अजूनही १० वर्षांपूर्वीच्या काळात अडकला आहे.

पूर्णिमा आपल्या ग्रुपसह १९ एप्रिलला सकाळी दिल्लीत पोहोचली. शिबिरात मुलींच्या राहण्याची व्यवस्था इतर ग्रुपच्या मुलींसोबत तर ग्रुपसोबत आलेल्या लीडर्सची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली होती. चहा-नाश्ता आणि जेवणासाठी एकच हॉल होता, जिथे नियोजित वेळेनुसार सर्वांना हजर राहायचे होते.

नाश्ता झाल्यावर मुली शिबिरात रमल्या तर पूर्णिमा आपल्या खोलीत येऊन खाटेवर पहुडली. बऱ्याच वर्षांनंतर तिला असा निवांतपणा मिळाला होता. तिला झोप आली. ती उठली तेव्हा संध्याकाळ झाली होती. चहा पिण्यासाठी ती हॉलच्या दिशेने निघाली.

तितक्यात तिचा फोन वाजला, ‘‘मी इकडे आलो आहे… तू दिल्लीत कुठे थांबली आहेस?’’

‘‘अजय, तुझे इकडे येणे शक्य नाही… तू उगाचच त्रास करून घेत आहेस,’’ पूर्णिमाने पुन्हा एकदा त्याला टाळण्याचा प्रयत्न केला.

‘‘मला तुझ्याकडे येणे शक्य नसेल, पण तू तर माझ्याकडे येऊ शकतेस ना… मी माझा पत्ता पाठवतोय… उद्या तुझी वाट पाहीन,’’ असे सांगून अजयने फोन कट केला. त्यानंतर थोडयाच वेळात पूर्णिमाच्या फोनवर अजयच्या हॉटेलचा पत्ता आला.

२० तारखेच्या सकाळी जेव्हा मुली शिबिरात सराव करीत होत्या तेव्हा पूर्णिमा कॅब करून अजयने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचली. रिसेप्शनला अजयच्या रूमबद्दल विचारले व त्याला मेसेज पाठवला. अजयने तिला रूमवरच बोलावले.

दरवाजा उघडाच होता, पण आत खूपच अंधार होता. पूर्णिमाने आत पाऊल टाकताच सर्व लाईट एकदम सुरू झाल्या. अजय तिच्यासमोर लाल गुलाबांचा गुलदस्ता घेऊन उभा होता.

‘‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी,’’ असे म्हणत त्याने तिला फुले दिली.

ती घ्यावीत की नाहीत, हेच पूर्णिमाला समजत नव्हते. तरीही शिष्टाचार म्हणून तिने ती घेतली व बाजूच्या टेबलवर ठेवून ती सोफ्यावर बसली. काही वेळ तेथे शांतता होती.

‘‘असे म्हणतात की, एखाद्यावर मनापासून प्रेम असेल तर संपूर्ण सृष्टीच तुमची आणि त्या व्यक्तीची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू लागते,’’

चित्रपटातील या संवादाची आठवण करून देत अजयने शांततेचा भंग केला.

‘‘अजय, तुला काय हवे आहे? स्थिरावलेल्या पाण्यात दगड मारण्याचा प्रयत्न का करीत आहेस? जर वादळ उठले तर खूप काही नेस्तनाबूत होऊन जाईल,’’ पूर्णिमाने पुन्हा एकदा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

‘‘कृपा कर, आज कुठलाही उपदेश नको… कितीतरी प्रयत्नांनंतर तुला असे जवळून पाहता, बोलता येत आहे… मला याचा आनंद घेऊ दे,’’ अजय तिच्या खूपच जवळ गेला होता.

त्याच्या अधीर झालेल्या श्वासांची जाणीव पूर्णिमाच्या गालांना झाली. त्यामुळे ती गोंधळून त्याच्यापासून थोडी दूर गेली.

अजयच्या हे लक्षात आले. त्यामुळे तो दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला. मग जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू झाले…

अनेक जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या… कितीतरी जुने क्षण स्मृतीच्या पटलावर आले आणि निघून गेले… कधी दोघे मनमोकळेपणाने हसले तर कधी त्यांचे डोळे पाणावले… थोडयाच वेळात दोघेही भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आले.

२ वेळा कॉफी घेतल्यानंतर पूर्णिमा म्हणाली, ‘‘भूक लागली आहे… जेवणाची सोय करणार नाहीस का?’’

‘‘येथेच रूममध्ये जेवणार की बाहेर जाऊया?’’ अजयने विचारले. त्यानंतर पूर्णिमाच्या इच्छेनुसार त्याने रूममध्येच जेवण मागविले. जेवणानंतर पुन्हा गप्पा… गप्पा… आणि खूप साऱ्या गप्पा…

‘‘बरं अजय, आता मी निघते… तुला भेटून खूप छान वाटले. अशी आशा करते की, यापुढे तू माझ्यासाठी स्वत:ला त्रास करून घेणार नाहीस,’’ पूर्णिमाने घडयाळ बघितले. संध्याकाळ होत आली होती.

‘‘एकदा गळाभेट नाही घेणार?’’ अजयने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले. न जाणो काय होते त्याच्या डोळयात ज्यामुळे पूर्णिमा मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे त्याच्या मिठीत सामावली.

अजयने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. त्यानंतर अलगद आपल्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाखाली मानेवर केला. नंतर तिचे तोंड स्वत:कडे करून आतुरतेने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. त्याच्या प्रेमात पूर्णिमा विरघळत चालली होती. अजयने तिला उचलून बिछान्यावर आणले..

तेवढयात तिचा मोबाईल वाजला आणि पूर्णिमा जणू झोपेतून जागी झाली. अजयने पुन्हा तिला स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न केला. पण आता पूर्णिमा भानावर आली होती. तिने फोन उचलला. तो रवीचा होता. पूर्णिमा आपल्या आतूर श्वासांवर नियंत्रण मिळवत रवीशी बोलली आणि ती येथे सुखरूप असल्याचे त्याला सांगितले.

‘‘अजय, मी तुझा हट्ट पूर्ण केला. आता कृपा करून यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस, माझे म्हणणे ऐकशील ना?’’ पूर्णिमाने अजयचा हात स्वत:च्या हातात घेत त्याच्याकडून वचन घेतले आणि त्यानंतर ती कॅबच्या दिशेने निघाली.

जवळपास २ महिने झाले… अजयने एकही फोन, मेसेज न केल्याने पूर्णिमा निश्चिंत झाली होती. पण तिचा हा आंनद जास्त दिवस टिकू शकला नाही. अजय पुन्हा पूर्वीसारखे वागू लागला. कधी पूर्णिमाच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर उभा राहायचा तर कधी महाविद्यालयाच्या गेटवर… कधी एसएमएस करायचा तर कधी व्हॉटट्सअप मेसेज… आता पूर्णिमा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती. पण हो, या काळात त्याने तिला एकदाही फोन केला नाही. तरीही ती मनातल्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे घाबरून गेली होती, कारण घरी गेल्यानंतर अनेकदा मुले गेम खेळण्यासाठी तिचा मोबाईल घेत असत. अशा वेळी कोणी अजयचा मेसेज वाचला तर काय होईल, याची तिला भीती होती.

काहीतरी करावेच लागेल… पण काय? रवीला सर्व सत्य सांगू का? नाही नाही, पतीचे पत्नीवर कितीही प्रेम असले तरी इतर कुणी तिच्यावर प्रेम करीत आहे, हे त्याला कसे सहन होणार… तर मग काय करू? अजयच्या पत्नीला भेटून तिच्याकडे मदत मागू का? नको, असे केल्यास विभाच्या नजरेत अजयची किंमत राहणार नाही… तर मग नेमके करू तरी काय? पूर्णिमा जितका विचार करायची तितकीच गोंधळून जायची.

पुढच्या महिन्यात पूर्णिमाचा वाढदिवस होता. अजय पुन्हा एकदा शेवटचे भेटण्याचा हट्ट करू लागला. पूर्णिमा त्याच्या मेसेजेसना प्रतिसाद देत नव्हती. मात्र अजयवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचे प्रयत्न सुरूच होते. कधीकधी त्याच्या मेसेजमध्ये अधिकारवाणीने दिलेली धमकी असायची की, पूर्णिमाच्या मनात असो किंवा नसो… तो तिच्या जन्मदिनी तिला भेटणार आणि तिचा वाढदिवस साजरा करणारच.

ठरलेल्या वेळी ती अजयला भेटायला गेली. ते अजयच्या एका सहकर्मचाऱ्याचे घर होते, जे तो भाडयाने द्यायचा. मात्र भाडेकरू न मिळाल्यामुळे सध्या घर रिकामेच होते. अजयने त्याच्या ओळखीच्या माणसाला घर भाडयाने घेण्यासाठी दाखवतो असे सांगून चावी घेतली होती.

जसे पूर्णिमाला वाटत होते त्याचप्रमाणे अजयने केक, फूल आणि चॉकलेटची व्यवस्था केली होती. टेबलावर सुंदर पद्धतीने पॅकिंग केलेली भेटवस्तू ठेवली होती. पूर्णिमाने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

आज ती पूर्णपणे सावध होती. भावनात्मक रुपात तिच्यावर वर्चस्व गाजविण्याचा अजयचा एकही प्रयत्न तिने यशस्वी होऊ दिला नाही. काहीवेळ औपचारिक गप्पा झाल्यानंतर पूर्णिमाने केक कापण्याची औपचारिकताही पूर्ण केली आणि केकचा एक तुकडा अजयला भरवला. त्यानंतर लगेचच अजयने तिला आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाने मात्र प्रतिसाद दिला नाही.

थोडया वेळानंतर तिने अजयकडे त्याच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. ‘‘विभा तुझ्यावर खूप प्रेम करते ना अजय?’’

‘‘हो, करते,’’ अजयच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले.

‘‘कधी तू तिला विचारले आहेस का की, लग्नापूर्वी तिचे कोणा दुसऱ्यावर प्रेम होते का ते?’’ पूर्णिमाने विचारले.

‘‘नाही… नाही विचारले आणि मला ते माहिती करून घ्यायचे नाही, कारण तेव्हा मी तिच्या जीवनाचा भाग नव्हतो,’’ अजयने अगदी शांत स्वरात उत्तर दिले.

‘‘जर विभाने अजूनही तिच्या भूतकाळाशी असलेले नाते जोडून ठेवले असेल तर?’’ पूर्णिमाने रागाची ठिणगी उडवणारा प्रश्न विचारला.

‘‘नाही, विभा चरित्रहीन असूच शकत नाही… ती माझ्याशी कधीच बेईमानी करू शकत नाही,’’ अजय रागाने लालबुंद झाला होता.

‘‘अरे वा अजय, जर विभाने तिचा भूतकाळ लक्षात ठेवला तर ती चरित्रहीन आणि तू माझ्याशी नाते जोडलेस तर ते प्रेम… कशी दुहेरी मानसिकता आहे ना… मानली तुझी विचारसरणी,’’ पूर्णिमा उपहासाने म्हणाली.

अजयला काय उत्तर द्यावे तेच सुचले नाही. तो विचारात पडला.

‘‘अजय, जसा विचार तू करतोस जवळपास तसाच प्रत्येक भारतीय पती आपल्या पत्नीबाबत करीत असतो… कदाचित रवीही… त्याने मला चरित्रहीन समजावे असे तुला वाटतेय का?’’ पूर्णिमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

‘‘नाही, कधीच नाही. मला माफ कर पुन्नू… तुला गमाविणे हे मला माझे अपयश वाटत होते आणि ते यशात बदलण्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होतो. मी फक्त माझ्याच बाजूने विचार करीत होतो… हे विसरून गेलो होतो की, माझ्या अशा वागण्याचा परिणाम अन्य तिघांच्या आयुष्यावर होणार आहे,’’ अजयच्या बोलण्यातून पश्चाताप डोकावत होता.

‘‘हो ना, जर तू कधी माझ्यावर मनापासून प्रेम केले असशील तर तुला त्या प्रेमाची शपथ… यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस… या नात्याला आता येथेच पूर्णविराम दे,’’ पूर्णिमाने वचन घेण्यासाठी आपला हात अजयच्या समोर ठेवला. अजयने तो घट्ट पकडला.

पूर्णिमाने शेवटचे अजयला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्यानंतर आपल्या या प्रेमाला पूर्णविराम देऊन आत्मविश्वासाने मुख्य दरवाजाच्या दिशेने पुढे गेली.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...