* नितीन शर्मा सबरंगी

दुपारच्या वेळी फ्लॅटच्या दाराची घंटी वाजली, तेव्हा रश्मी घरात एकटीच होती. तिचे पती ऑफिसला आणि मुलगा शाळेला गेला होता. ती दरवाज्यात पोहोचली, तेव्हा समोर एक युवती हातात बॅग घेऊन उभी होती. मुलगी होती, म्हणून विचार न करता रश्मीने दरवाजा बेधडक उघडला.

दरवाजा उघडताच तरुणी म्हणाली, ‘‘हॅलो मॅम, मी कॉस्मॅटिक प्रॉडक्ट विकण्याऱ्या कंपनीकडून आले आहे. आमचे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत. एकदम डिफरंट.’’

‘‘सॉरी मला नकोत,’’ रश्मीने तिची उपेक्षा करत तिला टाळायचा प्रयत्न केला.

पण तरुणी उत्साहात होती. बोलली, ‘‘माझे म्हणणे तर ऐकून घ्या. आमच्या कंपनीची ऑफर अशी आहे की आपण खूष झाल्याशिवाय राहणार नाहीत. मी आमच्या प्रॉडक्टने तुम्हाला फ्रीमध्ये मसाज आणि मेकअप करेन आणि जर आपण प्रॉडक्ट घेतले तर एकावर एक मोफत मिळेल.’’

तरुणी काही सेकंद थांबून पुन्हा म्हणाली, ‘‘एवढेच नाही मॅम, आपण आमच्या कस्टमर बनलात तर, आम्ही वर्षाला १२ फेशियलची फ्री ऑफरही देणार आणि ते पण घरी येऊन.’’

तरुणीचा प्रस्ताव चांगला वाटल्याने तिने तरुणीला आत फ्लॅटमध्ये येऊ दिले. तरुणीने बॅगेतून मेकअपचे बरेच प्रॉडक्ट काढून तिला दाखवले, तेव्हा ती खूष होऊन तिला आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तरुणीने तिला ड्रेसिंगटेबलच्या समोर बसवले. तिने अगोदर क्रीमने तिच्या चेहऱ्यावर मसाज केला आणि मग चेहऱ्यावर चमक आणण्याची गोष्ट करून एक लेप लावला.

रश्मी यामुळे अधिक खुषीत होती की सर्व काही फ्रीमध्ये होत आहे. तरुणीने तिला डोळे बंद करून त्याच अवस्थेत खुर्चीत बसून राहायला सांगितले. रश्मीला ठाऊक नव्हते की तिच्याबरोबर काय होणार आहे. या दरम्यान तरुणीने कोणाचा तरी नंबर आपल्या मोबाईलने डायल केला आणि काही मिनिटांनी हळूच जाऊन बाहेरचा दरवाजा उघडला. एक तरुण घरात आला. लेपच्या वासाने रश्मी बेशुद्ध झाली होती.

जवळ-जवळ अर्ध्या तासाने रश्मीचे डोळे उघडले, परंतू बेडरूमची अवस्था बघून ती भानावर आली. कपाटातून रोख रक्कम आणि दागिने गायब झाले होते. सगळे सामान अस्त-व्यस्त पडले होते. रश्मीला कळून चुकलं होतं की ती लुटारूंची शिकार झाली आहे. तिने पोलिसांत तक्रार केली. तरुणीचा चेहरा-मोहरा व सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी त्या तरुण-तरुणीला काही दिवसांनी अटक केली.

एकट्या महिलांना केले जातेय लक्ष्य

छोटया-मोठया शहरात अशा बऱ्याच गँग सक्रिय आहेत, ज्यांची माणसे कुठल्यातरी निमित्ताने कॉलनीत, सोसायटीत येतात. ते त्या घरांची ओळख करतात, ज्यांत महिला एका विशिष्ट वेळी एकटया असतात. बदमाशांसाठी महिलांना नियंत्रणात करणे सोपे असते. म्हणूनच ते त्यांना आपले सॉफ्ट टारगेट बनवतात.

नोएडामधील सेक्टर ५०च्या पॉश परिसरात राहणाऱ्या अरुणा जैन यांचे पती तेज बहादूर रिटायर्ड एक्झिक्यूटिव्ह इंजीनियर होते. हे पती-पत्नी एकटे राहत असत. म्हणून त्यांनी आपल्या घराचा एक भाग भाडयाने देण्याचा विचार केला आणि याविषयी एका ब्रोकरला सांगितले. ब्रोकरच्या माध्यमातून एके दिवशी दोन लोक घर बघण्यासाठी आले, त्यांनी सांगितले की घर त्यांना पसंद आले आहे. लवकरच एडव्हान्स देऊन शिफ्ट होऊन जाऊ.

दोन दिवसानंतर संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तेज बहादूर काही कामासाठी बाहेर गेले होते, त्याचवेळेस घंटी वाजल्याने अरुणाने दरवाजात जाऊन बघितले तर ३ लोक उभे होते. त्यातील एक व्यक्ती अगोदर घर बघण्यासाठी आला होता. अरुणाने विचार केला की हे एडव्हान्स देण्यासाठी आले असतील. म्हणून तिने दरवाजा उघडला. पण त्यानंतर जे काही झाले त्याची त्यांनी कधी कल्पना पण केली नसेल. बंदुकीच्या जोरावर घाबरवून-धमकावून त्यांनी घरातील रोख रक्कम, दागिने आणि कार लुटून पोबारा केला. चौकशीत कळाले की त्यांना घर दाखविणारा ब्रोकर ओळखतही नव्हता.

खूप दिवसानंतर पोलिसांनी त्या लुटणाऱ्या लुटारूंना अटक केली. तेव्हा त्यांनी सांगितले की ते अशाच एकटया महिलांना आपले लक्ष्य बनवतात.

चोरीनंतर हत्याही

उत्तराखंडच्या हरिद्वार शहरातील हरीलोक कॉलनीत राहणारी प्रकाशवती आपल्याबरोबर घडलेल्या घटनेला कधीही विसरू शकणार नाही. ती लुटीची शिकार तर बनली शिवाय जीवावर बेतले. झाले असे की एके दिवशी दुपारी २ लोक देणगी मागण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडताच दोघे आत आले आणि शस्त्राच्या जोरावर त्यांना घाबरवून-धमकावून लुटालूट करू लागले.

यादरम्यान प्रकाशवतीचे पती केदार सिंह येऊन पोहोचले, तेव्हा त्यांच्या डोक्यावर बॅटने आघात करून त्यांना जखमी केले. प्रकाशवतीशीही मारहाण केली गेली. आरडा-ओरड ऐकून शेजारची महिला स्वाती त्यांच्या घरी पोहोचली, तेव्हा बदमाशांनी तिलाही आपली शिकार बनवले. तिच्याही अंगठया लुटून घेतल्या. सर्व लुबाडून बदमाश पळून गेले. सौभाग्याने प्रकाशवतीचे प्राण वाचले.

परंतु गाजियाबादच्या इंदिरापुरममधील एका महाग सोसायटीत राहणाऱ्या मधु अग्रवालला आपले प्राण गमवावे लागले. वास्तविक तिच्या मुलाचा आपला व्यवसाय होता. तो सकाळ होताच ऑफिसला निघून जाई. मधू घरात एकटीच राहत असे. एका रात्री जेव्हा मुलगा घरी परतला तेव्हा त्याने फ्लॅटचा दरवाजा उघडा बघितला. घरामध्ये मधू मृत पडली होती आणि घराचे सगळे सामान अस्त-व्यस्त पडले होते. घरात ठेवलेली रोख रक्कम व दागिने गायब होते.

पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून दीपक नावाच्या तरुणास अटक केली. वास्तविक दीपक त्याच सोसायटीत राहत होता आणि लोकांची लहानमोठी कामे करायचा.

मधुला त्याने आपले लक्ष्य यासाठी बनवले कारण की ती नेहमी एकटी राहत असे. घटनेच्या दिवशी तो वायरिंग चेक करण्याच्या निमित्ताने त्यांच्या फ्लॅटमध्ये आला होता. मधुने त्याला सोसायटीत इतर लोकांकडे काम करतांना बघितले होते. म्हणून त्याच्यावर शंका घेतली नाही. ती आपल्या कामाला लागली. तेव्हा दीपकने कपाटात ठेवलेले दागिने चोरायला सुरूवात केली. मधुने बघितल्यावर त्याला ओरडू लागली. तेव्हा दीपकने चाकू काढून तिच्यावर वार केले. मधुने बचावासाठी खूप संघर्ष केला, परंतु दीपकने तिची हत्या केली.

विश्वास कोणावर

लुबाडणूक करणारे प्रतिक्षेत असतात की महिला घरात एकटया असाव्यात. उत्तर प्रदेशातील बिजनौर शहराचे प्रकरण काहीसे असेच आहे. दुपारच्या वेळी शिरोमणी आपल्या घरी एकटीच होती. तिची बहिण शैलजा टीचर होती आणि मुलगाही नोकरी करायचा. दुपारच्या वेळी रोज शिरोमणी एकटीच असे.

एके दिवशी बाइकवरून २ तरुण मीटर रिडींग चेक करण्याच्या निमित्ताने तिच्या घरी आले आणि शस्राच्या जोरावर घाबरवून-धमकावून शिरोमणीला कैद केले. त्यानंतर बदमाशांनी रोख रक्कम आणि दागिने लुटून पोबारा केला.

हरियाणातील करनाल शहराच्या एका घटनेने तर लोकांचा थरकाप उडाला. त्यांना हा विचार करण्यास विवश केले की शेवटी विश्वास कोणावर करावा.

वास्तविक सेक्टर १३ तील एक्सटेंशनमध्ये एक कापड व्यावसायिक रवींद्रची पत्नी ५५ वर्षीय पूजाची निर्घृणपणे हत्या केली गेली. हत्या करणारे घरातील जरुरी सामानही लुटून घेऊन गेले होते.

काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी जेव्हा घटनेचा खुलासा केला, तेव्हा प्रत्येक जण चकित झाला. कारण की त्यांच्याच घरी ३० वर्षांपासून नोकर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मुलगा मोहितने आपल्या मित्रांच्या मदतीने घटनेला पूर्णत्वास नेले होते. मोहितला माहीत होते की पूजा दुपारच्या वेळी अगदी एकटी असते.

पोलीस अधिकारी रुचिता चौधरी सांगतात की सावध राहूनच अशा घटनांपासून वाचले जाऊ शकते. कुठल्याही अपरिचित व्यक्तीसाठी घराचा दरवाजा उघडू नये. घराच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेराही अपराध करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण करतो. बदलत्या काळात लुबाडणूकीसाठी नवनवीन पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणून महिलांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. विशेष करून तेव्हा, जेव्हा त्या घरी एकटयाच असतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...