कथा * मोनिका अत्रे

‘‘कुठं होतीस तू? केव्हापासून फोन करतोय मी. माहेरी गेली की वेडीच होतेस तू…’’ खूप वेळानं मोनीनं फोन उचलला तेव्हा सुमीत रागावून म्हणाला.

‘‘अहो…तो मोबाइल कुठं तरी असतो अन् मी दुसरीकडेच असते, त्यामुळे मला रिंग ऐकायला आली नाही. अन् सकाळीच तर आपण बोललो होतो, त्यामुळे मला…बरं, ते जाऊ देत. फोन कशासाठी केला होता? काही विशेष बातमी? काय विशेष?’’ मोनीनं त्याच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत विचारलं.

‘‘म्हणजे आता तुझ्याशी बोलायचं झालं तर माझ्याकडे काही विशेष बातमीच असायला हवी. एरवी मी बोलू शकत नाही? तुझी अन् मुलांची चौकशी नाही करू शकत? तेवढाही हक्क नाहीए मला? बरोबर आहे आता त्यांच्यावर आजीआजोबा, मामामामींचा हक्क आहे ना?’’ मोनीवर भडकलाच सुमीत. त्याला वाटलं होतं की मोनी त्याच्या रागावण्यावर सॉरी म्हणेल, प्रेमानं बोलेल…

इकडे मोनीचाही संयम संपला. माहेरी आल्यावर खरं तर तिला पूर्ण स्वांतत्र्य हवं असायचं. ‘‘तुम्ही भांडायला फोन केला आहे का? तसं असेल तर मला बोलायचंच नाहीए. एक तर इथं इतकी माणसं आहेत. काय काय चाललंय, त्यातच मनीषाला जरा…’’ बोलता बोलता तिनं जीभ चावली.

‘‘काय झालंय मनीषाला? तुला मुलं सांभाळायला होत नाही तर तू त्यांना नेतेस कशाला? आपल्या बहीणभावंडात रमली असशील…तिला बरं नाहीए तर तुमचं परतीचं तिकिट बुक करतोय मी. ताबडतोब निघून ये. माहेरी गेलीस की फारच चेकाळतेस तू. माझ्या पोरीला बरं नाहीए अन् तू इकडे तिकडे भटकतेस? बेजबाबदारपणाचा कळस आहेस. इतकं दुर्लक्ष?’’ साधी चौकशी करण्यासाठी केलेला फोन आता महायुद्धात बदलत होता. सुमीतनंही रूद्रावतार धारण केला.

‘‘अहो, थोडं अंग तापलंय तिचं…पण आता ती बरी आहे अन् हे बघा, मला धमकी देऊ नका. दहा दिवसांसाठी आलेय, तर पूर्ण दहा दिवस राहूनच येईन. मला माहीत आहे, माझं माहेरी येणं फार खटकतं तुम्हाला. जेव्हा तुमच्या गावी जातो, तेव्हा तिथं बारा-बारा तास वीज नसते. तिथं मुलांना ताप येतो, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. वर्षभर तुमच्या तैनातीत असते, तुमच्या तालावर नाचते तेव्हा नाही काही वाटत. पण दहा दिवस माहेरी आले तर लगेत तमाशे सुरू करता….’’ मोनीही भडकली. खरं तर बोलता बोलता तिला रडायला येऊ लागलं होतं. पण तिनं प्रयासानं रडू आवरलं होतं.

‘‘अस्सं? मी तमाशे करतो.? पारच जोर चढतो तुला तिथं गेल्यावर. आता तिथंच राहा, इथं परत यायची गरज नाहीए. दहा दिवस काय आता वर्षभर राहा. खबरदार इथं परत आलीस तर…’’ संतापून ओरडत तिला पुढे बोलू न देता त्यानं फोन कट केला.

मोनीनंही मोबाइल आदळला अन् सोफ्यावर बसून ती रडायला लागली. तिची आई तिथंच बसली होती. सगळं ऐकलं होतं. तिनं म्हटलं, ‘‘अगं बाळी, तो कसं काय चाललंय हे विचारायला फोन करत होता, उशीरा फोन उचलल्यामुळे रागावला होता, तर तू अशावेळी सबुरीनं घ्यायचंस…सॉरी म्हणायचं मग तो ही निवळला असता…जाऊ दे. आता रडूं नकोस. उद्यापर्यंत त्याचाही राग जाईल…’’

मोनीला आणखीनच रडायला आलं. ‘‘आई, अगं फक्त दहा दिवसांसाठी माहेरी पाठवतात. इथं मी आनंदात असते. ते बघवत नाही त्यांना, नवरे असे का गं असतात? खंरतर त्यांना आमची खूप आठवण येतेय, मी नसल्यानं त्यांना त्रासही होतोय. पण अशावेळी प्रेमानं बोलायचं मोकळ्या मनानं कबूल करायचं, तर ते राहिलं बाजूला, आमच्यावरच संतापायचं, ओरडायचं…माझ्याशी संबंधित सगळ्यांशी वैर धरायचं, त्यांना नावं ठेवायची… ही काय पद्धत झाली?’’

‘‘अगं पोरी, नवरे असेच असतात. बायकोवर प्रेम तर असतं पण आपला हक्क त्यांना अधिक मोलाचा वाटत असतो. बायको माहेरी आली की त्यांना वाटतं आपला तिच्यावरचा हक्क कमी झालाय. त्यामुळे मनातल्या मनात संतापतात, कुढतात अन् बायकोनं जरा काही शब्द वावगा उच्चारला तर त्याचा अहंकार लगेच फणा काढतो अन् मग उगीचच भांडण होतं. तुझे बाबापण असंच करायचे.’’ मोनीला जवळ घेऊन थोपटत आईनं म्हटलं.

‘‘पण आई, स्त्रीला असं दोन भागात का वाटतात हे पुरूष? मी सासरची आहे अन् माहेरचीही आहे. माहेरी आले तर लगेच सासरची, तिथल्या माणसांची उपेक्षा केली असं थोडंच असतं? ही दोन्हीकडची असण्याची ओझं आम्हालाच का सहन करावी लागतात?’’ मोनी हा प्रश्न फक्त आईलाच नाही तर संपूर्ण समाजालाच विचारत होती जणू.

आईनं तिला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ‘‘अगं, पुरूषाचा अहंकार अन् त्याचं सासर म्हणजे बायकोचं माहेर यात छत्तीसचा आकडा असतो. मोनी, बाळे, पुरूष असेच असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. काही जन्मजात काही पुरूषी समाजानं जोपासलेला. स्त्रीला दोन भागात वाटायचं हेच काम असतं. एक भाग माहेराचा, एक भाग सासरचा. जसे दोन अर्धगोल एकत्र आल्यावर एक पूर्ण गोल होतो तसेच हे दोन अर्धगोल एकत्र आले की स्त्रीही पूर्ण होते.’’

‘‘दोन अर्धगोल…एक पूर्ण गोल…पूर्णत्त्व…’’ मोनी गप्प बसून सर्व ऐकत होती. काही तिला कळत होतं. काही तिला कळून घ्यायचं नव्हतं. फक्त आहे हे सत्य आहे, हेच तिला जाणवलं होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...