कथा * पौर्णिमा अत्रे

कवितानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. सहा वाजत आलेले बघून ती दचकली. कपिलची ऑफिसातून परतायची वेळ झाली होती. खरं तर त्यांची भिशी पार्टी आटोपली होती, पण अजून गप्पा संपत नव्हत्या. कुणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.

आपली पर्स उचलून कविता म्हणाली, ‘‘मी निघते, सहा वाजून गेलेत.’’

डोळे वटारून नीलानं म्हटलं, ‘‘तुला कसली एवढी घाई झालीये? नवराबायको दोघंच तर आहात. घरी सासू, नणंद वगैरे कुणीही नाही…माझ्या घरी बघ, मी घरी पोहोचेन तेव्हा सासू संतापानं लाल झालेली दिसेल…अन् मग बंबार्डिंग सुरू करेल. पण त्यासाठी मी माझा आत्ताचा आनंद थोडीच घालवणार आहे.’’

‘‘नाही तर काय? कविता तू इतकी घाई नको करूस. आपण रोज रोज थोडीच भेटतो?’’ अंजलीनं म्हटलं.

‘‘खरंय गं! पण कपिल येतच असतील.’’

‘‘तर काय झालं? नवरा आहे, सासू थोडीच आहे? जाऊयात ना थोड्या वेळानं.’’

कविता बसली खरी, पण सगळं लक्ष कपिलच्या येण्याकडेच लागलेलं. आज     दुपारी नेमकी ती टीव्हीवर येत असलेला एक जुना मराठी सिनेमा बघत बसली. सगळी कामं तशीच राहिली आहेत अन् मग ही भिशी पार्टी…हॉल पसरलेला, बेडरूममध्येही पसारा…

भिशीच्या पार्टीत मजा तर येतेच. खूप दिवसांनी सगळ्या समवयस्क मैत्रिणी भेटतात. छान छान गप्पा, छान छान खाणंपिणं…पण हे सगळे आपलं घर अगदी व्यवस्थित आवरून घराबाहेर पडलं तरच एन्जॉय करता येतं. या क्षणी तिला फक्त घरातला पसारा दिसत होता.

तिला आता तिथं बसवेना. ताडकन् उठली. ‘‘मी निघतेच, मला घरी कामं आहेत,’’ ती म्हणाली.

‘‘अगं, घरी गेल्यावर कर ना? इतकी काय घाई करते आहेस? घरी काय सासू, आजे सासू हातात काठी घेऊन उभ्या आहेत का?’’ वैतागून सीमानं म्हटलं, ‘‘अशी घाबरते आहे, जशी घरी सासवांची फौज आहे.’’

कवितानं फक्त हसून मान डोलावली अन् ती सर्वांना बाय करून तिथून निघाली. घर फार काही लांब नव्हतं. पायीच जाऊयात, सकाळी फिरणंही झालं नाहीए असा विचार करून ती भरभरा चालायला लागली. मैत्रिणींचं बोलणं आठवून तिला हसू येत होतं. सगळ्या म्हणत होत्या, ‘‘घरात सासू, आजेसासू, चुलतसासू, आत्तेसासू, मामेसासू अशा अनेक सासवा असतात कुणाकुणाला, पण नवरे सासू ऐकलीये कधी कुणी? तिला पुन्हा हसायला आलं. तिच्या घरात नवरेसासू आहे. तिचं लग्न झालं, तेव्हा सगळ्या मैत्रिणींना केवढी असूया वाटली होती.’’

‘‘कविता, भाग्यवान आहेस बाई, काय छान छान नवरा पटकावला आहेस,      एकटाच आहे, सासू नाही, सासरे नाहीत, दीर नाही, नणंदा नाहीत, मजेत जगशील सगळं आयुष्य.’’

स्वत: कवितालाही तसंच वाटलं होतं. खूपच आनंदात तिनं कपिलशी लग्न झाल्यावर मुंबईला संसार थाटला होता. कपिल एकटा होता. तिनं ठरवलं होतं की ती त्याच्यावर इतकं प्रेम करेल, इतकं प्रेम करेल की त्याचं सगळं एकटेपण तो विसरेल. ती आणि कपिल… किती सुंदर आयुष्य असेल.

कपिल जेव्हा तीन वर्षांचा होता, तेव्हाच त्याचे आईवडिल वारले होते. तो दिल्लीला मामामामींकडेच वाढला होता. शिक्षण संपलं, नोकरी लागली अन् तो मुंबईत आला. सप्तरंगी स्वप्नं घेऊन कवितानं संसाराला सुरूवात केली अन् तिच्या लक्षात आलं की कपिलला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू जागच्या जागी लागते. स्वच्छ अन् व्यवस्थित लागते. स्वत:च सगळी कामं करणाऱ्या कपिलला गलथानपणा, गचाळपणा, अव्यवस्थितपणा अजिबात खपत नाही. तो लगेच चिडतो.

कवितावर तो खूप प्रेम करायचा. पण सतत तिला सूचनाही द्यायचा. सासूसासरे नसले तरी कपिल तिला सासूसारखाच धारेवर धरायचा. त्यामुळेच तिनं मनातल्या मनात त्याचं नाव ठेवलं होतं नवरे सासू.

कपिलला अधूनमधून ऑफिसच्या टूरवर जावं लागायचं. त्यावेळी तिला एकटेपणा तर वाटायचा. पण मनातून थोडा सुटकेचा आनंदही असायचा…चला, आता तीन चार दिवस तरी तिला कुणी काही म्हणणार नाही. सततच्या सूचनांचा भडिमार असणार नाही. तिच्या मैत्रिणींच्या सासुबाई कुठं गावाला वगैरे गेल्या की त्यांनाही असंच मोकळं वाटत असेल असं तिच्या मनात यायचं. मग ती अगदी मजेत कोणतीही वस्तू कुठंही ठेवायची. कोणंतही काम केव्हाही करायची. म्हणजे ती खूपच गलथान किंवा अव्यवस्थित अथवा आळशी होती असं नाही, पण शेवटी घर आहे. म्यूझियम किंवा हॉटेल नाही. माणसाला तिथं आराम, दिलासा अन् निवांतपणा मिळायला हवा. अगदी प्रत्येक गोष्ट जिवाचा आटापिटा करून जागच्या जागी ठेवायची म्हणजे जरा अतिच नाही का होत? सायंकाळी नीट बघून घेईन की प्रत्येक गोष्ट जागच्या जागी, स्वच्छ आहे ना? तरीही कपिलला कुठं तरी धूळ दिसायची, कुठं तरी डाग दिसायचा, अन् मग तो त्यावरून बोलायचा. गप्प बसणं त्याला ठाऊकच नव्हतं.

तो स्वयंपाकघरात आला की कविताला वाटे साक्षात् सासूबाईच आल्या आहेत. ‘‘हा डबा इथं का ठेवला आहे? फ्रिज इतका गच्च भरलेला का आहे? पाण्याच्या बाटल्या रिकाम्या का? गॅसची शेगडी नीट स्वच्छ केलेली नाही, ओट्याच्या भिंतीवरच्या टाइल्स किती अस्वच्छ दिसताहेत. मोलकरणीला नीट स्वच्छ करायला सांग.’’ असं त्याचं सतत चालायचं.

कधीकधी कविता कपिलला चिडवायला म्हणायची, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ना, ‘टू इन वन’ आहात म्हणून?’’

‘‘म्हणजे?’’ तो विचारायचा.

‘‘तुम्ही स्वत: आहातच, तुमच्यात माझी सासूही वास करून आहे, ती फक्त मलाच दिसते.’’

यावर कपिल थोडासा ओशाळायचा अन् मग मोकळेपणानं हसून कविताला मिठीत घ्यायचा. तिही मग पुढे काय बोलणार? तिनं लग्नानंतर लगेच ठरवलं होतं की नवरे सासूला कधीही उलटून बोलणार नाही. शब्दांत शब्द वाढवयाचा नाही. भांडणं, वाद घालणं हा तिचा स्वभाव नव्हता. ठीक आहे. तो बोलतो, तर बोलू देत. ऐकून घ्यावं, जमेल तशी स्वत:त सुधारण करावी. नाही जमलं तर ‘सॉरी’ म्हणावं. आत तर लग्नाला २० वर्षं झालीत. एक मुलगी आहे. सुरभी तिचं नाव. मायलेकी मिळून बापाची फिरकी घेत असतात. दोनच पर्याय आहेत. एक तर या नवरे सासूबाई सोबत भांडण करायचं किंवा त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं. ती भांडत नाही. थोडं फार दुर्लक्ष करते, कधी स्वत:च पटकन् त्यानं दाखवलेली त्रुटी दुरूस्त करते किंवा सॉरी म्हणून हसून प्रसंग निभावून नेते.’’

विचारांच्या नादात ती आपल्या घरापर्यंत पोहोचली. त्याचवेळी कपिलही कारमधून उतरला. दोघं एकमेकांकडे बघून हसली. कवितानं मनातच आता पुढे काय संभाषण होईल याचा अंदाज घेतला. ‘‘हा इतका पसारा का झालाय? सारा दिवस काय करतेस तू? सुरभीचा हा चार्जर अजून इथंच लोळतोय…वेळेवर तो जागच्या जागी का गेला नाही?’’ वगैरे वगैरे वगैरे.

ती अन् कपिल लिफ्टनं सोबतच वर आली. ती लॅचला किल्ली लावत होती, तेवढ्यात कपिलनं म्हटलं, ‘‘कविता, उद्या काम करणाऱ्या बाईकडून दरवाजा नीट पुसून घे बरं. केवढी धूळ साठलीय बघ.’’

‘‘बरं,’’ कवितानं हसून मान्य केलं. मनातल्या मनात ती स्वत:ला सावध करत म्हणाली, ‘‘कविता, तुझी नवरे सासू आली हं! सांभाळून राहा.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...