कथा * माधव गवाणकर

बकाल वस्तीतला मी एक कंगाल कवी होतो. शे पन्नास रुपये मिळाले तरी त्यासाठी रेडिओ केंद्रापर्यंत रेकॉर्डिंगसाठी जायचो. स्वत:चा दिवाळी अंक काढून पुरता फसलो होतो. कर्जात बुडालो होतो. मनात ‘नकारात्मक’ विचार खूपदा यायचे. समुद्र त्यादृष्टीने जवळ होता. मला पोहता येत नव्हतंच. पूर्णवेळ लेखनाच्या उचापती अंगाशी आल्या होत्या. बेरोजगारी घामोळ्यासारखी टोचतदाह करत होती.

विजेची दोन महिन्यांची बिलं भरायची बाकी होती. गॅस बाकबुक करत होता. त्याचा जीव कधीही गेला असता. माझं जेवण मीच करायचो, पण गॅस तर पाहिजे. तरी बरं संसाराचं ओझं नव्हतं. मरून गेलो तरी माझा मीच होतो. मी आरशात स्वत:ला पाहिले. अगदी लाचार, ओशाळवापणा फिकट वाटत होतो मी. कुणालाही माझा उपयोग नाही आणि या पैशाच्या तालावर नाचणाऱ्या महानगरात जगण्याची आपली पात्रता नाही याची खात्री पटू लागली होती.

क्लासमेट हेमू माझ्या गरिबीचा वास काढत नेमका येऊन थडकला. मऊ स्वरात त्याने चौकशी केली. त्याचे शब्द धीर देऊ लागले. खानदानी, वडिलोपार्जित संपत्तीचं काय करायचं चैन तरी करून किती करणार? असा हेमूसमोर सवाल असायचा. मी रोज रेडिओवर कार्यक्रम केला असता, तरी हेमूच्या गळ्यात जी सोन्याची जाडजूड जड चेन होती, तशी मला घेता आली नसती. हेमू समलैंगिक आहे आणि महिलांऐवजी पुरुषांकडे अधिक आकर्षित होत असल्याने मला त्याची थोडी भीतिच वाटायची. पण मी बेकारीमुळे अगदी फाटकातुटका झालोय हे हेरून तो माझ्या त्या पावसात गळणाऱ्या रुमवर येऊ लागला होता. त्याची कार माझ्या रंग जाऊन भंग झालेल्या घरापाशी अजिबात शोभत नसे.

‘‘असा का दिसतो आहेस तू? आजारी वाटतोयस…. चणचण आहे का पैशाची?’’ हेमूने अचूक ठिकाणी बोट ठेवलं.

‘आहे खरी, पण…’’

‘‘असे कितीसे लागतील?’’ या प्रश्नात त्याला असं सुचवायचं असावं की एक कवी मागून किती मागणार? मोठी रक्कम मागण्याचं तुला धैर्यच होणार नाही.’’

‘‘सध्या हजार रुपये पुरतील. नोकरी लागल्यावर शे दोनशे करत फेडेन मी सगळे…’’ मी इमानदारीत बोललो. बांगड्या किणकिणतात तसा तो हसला.

मधाच्या पोळ्याकडे अस्वलाने बघावं तशी गढूळ नजर लावत मग त्याने इरादा सांगितला. ‘‘परत कसले करतोस! हे घे, राहू दे तुलाच. आता फक्त एक गोष्ट माझ्यासाठी करायची… थोडा वेळ… से, हाफ अॅन अवर… मलाच तुझी बायको समजायचं.’ तू तरुण पुरुष आहेस आणि तेवढं मला पुरेसं आहे…’’ माझ्या छातीची धडधड वाढली. पैसे ही माझी तातडीची निकड होती, पण ‘कृत्य’ करायला मन धजावत नव्हतं. कच खात होतं. तशी सवय नव्हती.

तेवढ्यात हेमूने किंचित कडक स्वरात म्हटलं, ‘‘तुम्ही मिडलक्लासवाले नुसताच विचार करत बसता. सोडून दे ही वृत्ती. ये, असा जवळ…’’ नंतर मला काही बोलू न देता, त्याने जवळीक साधली. त्या प्रसंगाचं वर्णन कशाला करायचं. ते काही प्रेम नव्हतं! ती मजबुरी होती. हेमूला जे साधायचं होतं, ते त्याने साधलं.

पैसे तर त्याने रोख दिलेच होते. तो निघूनही गेला.

नंतर मात्र मला रडू कोसळलं. आईवडिलांचा मृत्यू आधीच झालेला होता. माझं सख्ख असं कोणी शिल्लक नव्हतं. आपण जणू फुटपाथवर झोपतो आणि कुणीही आपल्याला वापरू शकतं असा फील मला आला. परिस्थितीचा भोवरा माणसाला काय करायला भाग पाडतो ते माझं मलाच कळून चुकलं. हा ‘व्हर्लपूल’ फार भयानक असतो. स्नान केल्यावरही मला स्वच्छ वाटेना. नंतर मला अर्धवेळ का होईना, नोकरी मिळाली. तंगी कमी झाली, पण आपल्या विषमतेने पोखरलेल्या या देशात धनदांडगी माणसं सहजपणे आमचं पौरुषत्व लुटू शकतात आणि आमच्यावर केवळ पोट जाळण्यासाठी तेही करणं भाग पडतं असाच शिक्का यातून बसतो. कुणी म्हणेल शिक्का, कुणी म्हणेल डाग. मात्र कलंक असं म्हणताना, गरीब माणसाची हतबलताही लक्षात घेतली पाहिजे… घेतलीच पाहिजे!

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...