कथा * प्रियंवदा

वाईट चालींची, चरित्रहीन, रखेल अशी विशेषणं तिच्यासाठ वापरली जात होती. ते ऐकून अर्पिता अवाक् झाली. ही धरती दुभंगावी अन् आपण त्यात लुप्त व्हावं, अशा जागी लपावं जिथं कुणी तिला बघू शकणार नाही, नातलग तर कुजबुजतंच होते पण शलभच्या पत्नीनंही तिच्यासाठी असे अपशब्द वापरावेत? ती तर अर्पिताची खास मैत्रीण होती…तरीही तिनं असं म्हणावं?

अर्पिताचं नांव शलभच्या नांवाशी जोडलं गेलं होतं. त्यांचे संबंध अनैतिक आहेत हे बोललं जात होतं भरल्या कंठानं तिनं शलभला विचारलं, ‘‘आपलं नातं अनैतिक आहे असं म्हणतात, खरंय का ते? कारण तुमचं लग्न झालंय. विवाहित आहात तुम्ही. त्यामुळे मला तुमच्याबरोबर राहण्याचा हक्क नाहीए. पण इथून मला इतरांनी तुमची रखेल म्हणावं?’’

शलभला काट्यासारखा टोचला होता हा प्रश्न, अर्पिताचे अश्रू अखंड वाहत होते. रडता रडताच म्हणाली, ‘‘इतकी बेअब्रू झाल्यावर आता माझ्याशी कोण लग्न करेल?’’

तिला दिलासा देत शलभनं म्हटलं, ‘‘मी शोधेन तुझ्यासाठी मुलगा. तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी.’’

‘‘माझ्याशिवाय तुम्ही राहू शकाल?’’

अर्पिताच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी शलभनं तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून तिला थोपटायला सुरूवात केली. थोड्याच वेळात अर्पिताला गाढ झोप लागली. तिच्या निरागस चेहऱ्याकडे शलभ बघत होता. अजूनह गालावरचे अश्रू सुकले नव्हते. अर्पिताच्या अनेक आठवणी त्याच्या मनांत जाग्या झाल्या. समुद्राच्या लाटांसारख्या असताता आठवणी. उंचबळून येतात अन् परत जाताना, भरून न येणारं एकाकीपण, विचित्र रिकामपण मागे ठेवून जातात.

अर्पिता नात्यानं शलभची कझिन होती, वयानंही त्याच्याहून बरीच लहान होती. ते अंतर त्यांच्या आवडी-निवडी, बोलणं, वागणं यातूनही जाणवायचं. शलभला लहानपणी बघितलेली अर्पिता आठवत होती. अर्पिताला शलभ अजिबातच आठवंत नव्हता.

अर्पिताच्या आयुष्यात चढउतार खूप होते. आई वारल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं. अर्पिता आजोळी राहू लागली. आयुष्य खडतर होतं. त्यातूनच ती शहाणी होत गेली. पण स्वभावात त्या कडवट आठवणींचा ठसा उमटलाच.

किती तरी वर्षांनी अर्पिता शलभला भेटली. तो तिला अजिबात परका वाटला नाही, उलट इतर कुणाबद्धल वाटला नव्हता तो आपलेपणा, जिव्हाला त्याच्याबद्धला वाटला.

काही दिवसातच तिला तो इतका जवळचा वाटू लागला की तिनं लहानपणापासून ज्या मुलांवर प्रेम करत होती, ते प्रेमप्रकरणही शलभला सांगितलं. दोघांना लग्न करायचंय पण घरातले तयार नाहीत हेदेखील तिनं शलभला सांगितलं.

‘‘तो मुलगा मुस्लिम आहे. त्याचं नाव आसिफ आहे. तो दिल्लीला नोकरी करतो. मीही नोकरी करेन, पेइंगगेस्ट म्हणून दिल्लीत राहणं सोपं आहे. कोर्टात रजिस्टर लग्न करूनच मग घरी सांगू.’’ एका दमात तिनं शलभला सांगितलं. ‘‘तुम्ही मला दिल्लीला घेऊन चला,’’ तिनं शलभला म्हटलं.

शलभनं तिला खूप समजावलं पण अल्लड वय अन् प्रेमात वेडं झालेलं मन…तिची समजूत पटेना.

त्यावेळी शलभला दिल्लीलाच पोस्टिंग मिळालं होतं. चांगली कंपनी, चांगली नोकरी, सुखी कौटुंबिक आयुष्य…अर्पिताच्या घरात शलभच्या नोकरीचा, वडिलकीचा दबदबा होता. तिच्या आईवडिलांना त्यानं समजावून सांगितलं. तिच्या भविष्याचा विचार करून त्यांनी परवानगीही दिली.

अर्पिता आनंदानं खुलून आली. आसिफला भेटायला ती शलभबरोबर दिल्लीला आली. अर्पिताची सगळी जबाबदारी तिच्या वडिलांनी शलभवर टाकली होती. त्यानंही ती आनंदानं स्वीकारली होती.

दिल्लीला पोहोचल्यावर शलभनं तिला पी.जी. म्हणून जागा मिळवून दिली. जवळच्याच एका स्टोअरमध्ये नोकरीही मिळाली. लवकरच अर्पिता दिल्लीच्या अतिशय धावपळीच्या आयुष्यात रूळली. तिला ते आयुष्य आवडायला लागलं. रविवारी आसिफ यायचा. मग दोघं बाहेर फिरायची, कधी सिनेमा, कधी जेवण, कधी भटकंती नंतर आइस्क्रीम.भराभर दिवस जात होते.

मार्च महिना आला. पळसाच्या झाडांवर लाललाल फुलांनी रंगोत्सव मांडला. लहानपणापासून अर्पिताला ही फुलं फार आवडायची. लाल रंग तिचा आवडता होता. गावी तिच्या घरासमोर पळसाची झाडं होती. दिल्लीत कुठंही पळस फुललेला दिसला की तिला घरीच असल्यासारखं वाटायचं.

होळीचा सण काही दिवसांवर आला. होळी झाली की ती आसिफबरोबर रजिस्टर लग्न करणार होती. तसा फॉर्मही त्यांनी भरला होता. पण घडलं वेगळंच. होळीच्या दोन दिवस आधी अर्पिता आजारी असल्याचा निरोप शलभला मिळाला. शलभ तिच्या निवासस्थानी गेला तेव्हा अर्पिता तापानं फणफणली होती.

अर्पिताच्या दोघी रुममेट्सनी शलभला सांगितलं की आसिफनं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये फॉर्म भरल्यानंतर अर्पितावर धर्म बदलण्यासाठी खूपच दबाव आणला. धर्म बदलणार नाही म्हटल्यावर त्यानं हे लग्न होऊच शकत नाही असं सांगून अर्पिताशी संबंध तोडले अन् तो दिल्ली सोडून कुठंतरी निघून गेलाय. जे स्वप्न डोळ्यात घेऊन अर्पिता दिल्लीला आली होती, ते स्वप्न उधळलं गेलं होतं. कल्पनेच्या भराऱ्या घेताना पंखच मोंडले होते. रक्तबंबाळ झाले होते.

पी.जी.च्या मालकांची परवानगी घेऊन शलभ रात्रभर तिथेच थांबला. त्यानं तिच्या वडिलांशी संपर्क केला. तिला परत घरी पोहोचवू का म्हणून विचारलं पण त्यांनी, ‘‘आता काय ते तुम्हीच बघा,’’ म्हणून हात झटकले. सकाळी शलभनं अर्पिताला आपल्या फ्लॅटवर आणलं. इथं तो एकटाच राहत होता. त्यानं अर्पिताच्या सेवेसाठी एक नर्स ठेवली. त्याच्या ऑफिसच्या वेळ व्यतिरिक्त तो अर्पिताची काळजी घ्यायचा. अर्पिताला मानसिक धक्का फारच जबर बसला होता. इतक्या वर्षांचं प्रेम केवळ धर्मावरून संपू शकतं? आसिफ असा विश्वासघात करू शकतो हेच तिच्या गळी उतरत नव्हतं. जात किंवा धर्म प्रेमाच्या आड का यावा, हे तिच्या बुद्धीला उमजंत नव्हतं.

शलभनं तिची परोपरीनं समजूत घातली. मानसिक धक्क्यातून सावरायला त्यानं खूपच मदत केली. शारीरिक अन् मानसिक आजारातून पूर्ण बरी झाल्यावर शलभनं त्याच्याच ऑफिसात नोकरीही लावून दिली. अर्पितानं आता शलभच्या घराची जबाबदारी स्वत:वर घेतली. सकाळी उठून चहा, ब्रेकफास्ट तयार करणं, दोघांचे डबे तयार करणं, ऑफितून आल्यावर रात्रीचा स्वयंपाक अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये तिनं स्वत:ला गुंतवून घेतलं.

बरेचदा शलभला ऑफिसात उशीरापर्यंत थांबावं लागे. घरी यायला उशीर होई. अर्पिता तो घरी येईपर्यंत जागी राहून त्याचं जेवण गरम करून वाढायची. रात्री कधी कधी भयानक स्वप्नं पडून तिला जाग यायची. घाबरून ती आपल्या खोलीतून शलभच्या अंथरूणात येऊन झोपायची. शलभ तिला थोपटून शांत करायचा.

अर्पिताच्या आयुष्यातला तो अवघड काळ शलभच्या आधारावरच पार पडला. अशा काळातच काही नवी नाती तयार होतात तर काही जुन्या नात्यांना तडे जातात. तीन चार महिनेच झाले होते. पण त्यांना वाटायला लागलं जणू जन्मोजन्मीची ओळख आहे. एकमेकांचे चेहरे बघूनच त्यांना एकमेकांच्या मन:स्थितीची कल्पना यायची. शलभनं हल्ली आपल्या गावी जाणं खूपच कमी झालं होतं. कधी गेलाच तर परतीचं रिझर्वेशन अर्पिता आगाऊ करवून घेत होती.

अर्पिता आणि शलभची जवळीक वाढत होती अन् बायकोबरोबरचं शलभचं नातं खूपच बिघडलं होतं. शलभची वागणूक, त्याचं अर्पिताबरोबर असणं, बायकोला सहन होत नव्हतं. ती प्रचंड चिडचिड करायची. तिला घटस्फोट देऊन अर्पिताशी लग्न करावं असंही शलभच्या मनांत आलं होतं. पण मुलाचा लोभस, निरागस चेहरा डोळ्यापुढे यायचा. त्याचं वडिलांवर जिवापाड प्रेम होतं.

दोन्ही घरात, नातलगांमध्ये कुजबुज सुरू झाली. कुजबुज हळूहळू वाढली अन् शलभवर आरोप व्हायला लागले. शलभचं शांत सुखी आयुष्य ढवळून निघालं. नात्यांच्या अग्नीपथावरून चालताना पाय भाजून फोड येणं स्वाभाविकच होतं. पण ते फोड इतक्या यातना देतात हे दोघांना आता जाणवायला लागलं.

शलभ विचारातून भानावर आला. अर्पिताचं डोकं मांडीवरून खाली उशीवर ठेवलं. पाय मोकळे करायला बाल्कनीत येऊन उभा राहिला. आकाशात प्रभात समयीची लाली दिसत होती. जणू पळसाची फुलं कुसकरून उधळली असावीत. समोरचं पळसाचं झाड निष्पर्ण होतं. पण फुलांनी डवरलं होतं. जणू जुनी नाती तोडून नवी नाती निर्माण झाली होती.

आता शलभवर अर्पिताच्या लग्नाची आणखी एक जबाबदारी येऊन पडली होती. त्यानं मनापासून प्रयत्न केले अन् ओळखीतलाच एक मुलगा तिच्यासाठी निवडला. ऑफिसातल्या सहकाऱ्याचा घाकटा भाऊच होता. मुलाला अन् घरच्यांना अर्पिता पसंत पडली अन् लग्न ठरलं.

शलभची बायको चिडलेली होती. शलभला एकट्यालाच सर्व खर्च व तयारी करायची होती. तो आपल्या परीनं सगळं करत होता. सावत्र आई व वडीलही अर्पिताच्या लग्नाला येणार नव्हते. खर्चही करणार नव्हते. वनमॅन आर्मी बनून शलभ सगळ्या आघाड्या लढवंत होता.

आता नवं नातं जपायचं म्हणून अर्पिताही शलभपासून दूर राहत होती. अर्पितासाठी, अर्पितामुळे शलभनं घरच्या मंडळींशी, बायकोशी संबंध तोडले होते अन् तीच अर्पिता आता त्याला दुरावली होती. आता ती रात्री त्याच्यासाठी जागत नव्हती. सकाळीही मुकाट्यानं चहाच कप त्याच्यासमोर ठेवत होती.

पुन्हा नवा ऋतू येऊ घातला होता. वातावरणांत बदल जाणवंत होता. शलभला खूपच एकाकी वाटत होतं. अर्पिताचा नवा संसार, नवं आयुष्य सुरू होतंय म्हणून समाधान अन् आनंद होता. पण इतर नाती तुटल्याचं दु:खही होतं. शेवटी लग्नाचा दिवसही. विवाहाचे सर्व विधी पूर्ण झाले. अर्पिताच्या डोळ्यात अश्रू होते. तिला रडूं अनावर झालं. शलभचं घर तिनं मनापासून सजवलं होतं. भिंतींचा रंग, दाराखिडक्यांचे पडदे, सर्व तिच्या पसंतीचं होतं. बाल्कनीतल्या छोट्याशा बागेत तिनंच लावलेली फुलझाडं डोलंत होती. अश्रूभरल्या डोळ्यांनी अर्पितानं सगळं मनांत साठवून घेतलं. आता या घरातून तिची पाठवणी झाल्यावर पुन्हा ती इथं येणार नव्हती.

घराच्या फाटकाशी तिचा आवडता पळस उभा होता. शलभही मनांतून हेलावला होता. अर्पिता जाताना त्याच्या आयुष्यातला आनंद आणि रंगही घेऊन जातेय. हे त्याला समजंत होतं. पण त्यानं आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली होती. सन्मानाचं आयुष्य अन् चांगला जोडीदार त्यानं तिला मिळवून दिला होता. त्याच्या मनांवरचं ओझं उतरलं होतं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...