कथा * सुशीला दानवे

दुपारपासूनच पाऊस लागला होता. थांबायचं नाव घेत नव्हता. घरात शांतता होती. खोलीत तर विशेषच नमिताला कधी कधी अशी शांतता हवीशी वाटायची. रेडिओ, टीव्ही, डेक सगळं बंद करून आपल्याच विचारात मग्न राहायला तिला आवडायचं.

आपल्यातच मग्न असताना तिला वाटलं शेजारच्या खोलीत काही आवाज झाला. लक्षपूर्वक पुन्हा ऐकलं. नंतर काहीच आवाज आला नाही. आपल्याला एकटेपणाचं भय वाटलं की काय असं तिच्या मनात आलं. पावसामुळे बाहेरही अंधारून आलं होतं?

नमितानं खिडकीतून बाहेर बघितलं, त्याचवेळी पुन्हा तिला काहीतरी आवाज ऐकू आला. अंधारातच तिनं सर्वत्र नजर फिरवली. तिनं दार बंद करताना व्यवस्थित बंद केल्याचं तिला आठवत होतं. चुकून कडी घालायची राहिली का?

घराबाहेर पडताना आईनं बजावलं होतं, ‘‘घराच्या खिडक्या, दारं नीट बंद कर हं.’’

तिनं हसून आईला ऐकवलं होतं, ‘‘अगं मी आता काही लहानशी मुलगी नाहीए. वकील झालेय. पीएचडी करतेय. ज्युडो-कराटे शिकलेय. एखाद्या गुंडाला सहज लोळवीन.’’

तरीही आईनं बजावलं होतं, ‘‘तू एक मुलगी आहेस, स्त्री आहेस, मुलीला अब्रू जपावी लागते. समाजाला भिऊन राहावं लागतं.’’

‘‘आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी स्वत:ची नीट काळजी घेईन,’’ तिनं आईला आश्वस्त केलं.

आज तर ती घराबाहेरच गेली नव्हती. आईबाबा घराबाहेर पडले त्याला काही तासच झाले होते. ती असा विचार करते आहे तोवर तिला पुन्हा घरात कुणीतरी वावरतंय असा भास झाला. तिनं दिवा लावला. पण वीज गेली होती. तिला एकदम भीती वाटली.

ती मेणबत्ती घ्यायला उठली, तेवढ्यात वीज आली. पाऊस अजूनच जोरात कोसळू लागला. कदाचित पावसाच्याच आवाजानं तिला भास झाला असावा. अंधारामुळेही भीती वाढतेच. आत्ता फक्त सायंकाळचे सात वाजले होते.

तहान लागली होती, म्हणून नमिता उठली. स्वयंपाक घरात जाऊन तिनं तिथला दिवा लावला अन् फ्रीजकडे वळली अन् नकळत किंचाळली. ‘‘कोण आहेस तू?’’ कशीबशी ती बोलली.

काळ्या फडक्यात चेहरा झाकलेला तो कोणी पुरूष होता. त्यानं नमिताच्या तोंडावर हाताचा तळवा दाबून धरत धमकी दिली, ‘‘ओरडू नकोस. परिणाम वाईट होईल.’’ त्याचा हात ढकलत नमितानं म्हटलं, ‘‘काय हवंय तुला? कोण आहेत तू?’’

‘‘मूर्ख मुली…एखाद्या तरूण पुरूषाला तरूण मुलीकडून काय हवं असतं? बरेच दिवस तुला बघत होतो. आज संधी मिळाली.’’

त्याच्या हातातून स्वत:ला सोडवून घेत नमितानं त्याला म्हटलं, ‘‘बडबड बंद कर. मी तुला घाबरत नाही. ताबडतोब इथून चालता हो. मी पोलिसांना बोलावतेच.’’ पण ती फोनपाशी पोहोचण्याआधीच त्यानं तिला धरलं अन् उचलून पलंगावर टाकलं. तो तिचे कपडे फाडायचा प्रयत्न करत असतानाच नमिता त्याला चावत, बोचकारत होती. तिनं आपल्या दोन्ही पायांनी त्याच्या मांड्यांच्या मधोमध एक जबरदस्त प्रहार केला. तो एकदम कळवळला. दूर जाऊन पडला. विजेच्या वेगानं उठून नमिता खोलीबाहेर धावली. तिनं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. नमितानं ड्राँइंगहॉलमधून पोलिसांना फोन केला. पोलिसही लगेच आले. पण खोलीचं दार उघडलं, तेव्हा खोलीत कोणीत नव्हतं. खिडकीचे गज वाकवून तो धटिंगण पसार झाला होता. खोलीतल्या एकंदर अवस्थेवरून नमितानं किती जोरदार प्रतिकार केला होता हे सहज कळत होतं.

आईबाबांना कळवताच तेही टॅक्सीनं ताबडतोब आले. आईच्या गळ्यात पडताच नमिताला रडू फुटलं.

तिच्या चेहऱ्यावर हातापायावर ओरखडे होते. मुक्कामाराचे निळे डाग होते.

नमितानं आईवडिलांना, पोलिसांना पूर्ण हकीगत सांगितली. ‘‘आई, माझं ज्युडोकराटेचं ट्रेनिंग माझ्या कामी आलं. मीही त्याला सणसणीत लाथ घातली. चावले, बोचकारलं…स्वत:ला सही सलामत वाचवू शकले.’’ नमिता आता सावरली होती.

पण प्रेसला कशी, कोणी विकृत बातमी दिली, कुणास ठाऊक. वणवा पसरावा तशी बातमी पसरली. मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी. आईवडिल हादरले…खरंच बलात्कार झाला का? नमितानं तर तसं सांगितलं नाही.

नमितानं आईवडिलांना सांगितलं, ‘‘माझ्यावर विश्वास ठेवा. बातमी कुणी, कशी दिली मला ठाऊक नाही, पण तसं काहीच घडलं नाहीए. मीच त्याला धडा शिकवलाय. माझ्यावर विश्वास नाही का?’’

आईबाबा अजूनही घाबरलेले, चिंताक्रांत होते. ‘‘ही बातमी घरोघरी वाचली जात असेल…आमच्या मुलीबद्दल लोक काय काय बोलतील…मला फार भीती वाटतेय,’’ आई बाबांना म्हणत होती.

तेवढ्यात फोनची घंटी वाजली. लोक सहानुभूती दाखवत होते. दु:खात सहभागी असल्याचं सांगत होते.

‘‘आम्हाला आमच्या मुलीच्या कतृत्त्वाचा अभिमान वाटतोय. तिनं त्या धटिंगणाला धडा शिकवला. पेपरनं चुकीची बातमी दिली आहे,’’ आई बाबा प्रत्येकालाच सांगत होते.

सायंकाळ होता होता योगेशचा फोन आला. त्याच्या मुलाशी नमिताचं लग्न ठरलं होतं. डिंसेंबरमध्ये लग्न व्हायचं होतं.

‘‘पेपरला बातमी वाचली. वाईट वाटलं. मी नंतर फोन करतो.’’

त्यांच्या बोलण्याच्या एकूण पद्धतीवरून बाबा घाबरले, विचलित झाले. आईला म्हणाले, ‘‘पेपरच्या या बातमीनं आपला सत्यानाश केलाय. योगेशजींचा फोन होता. त्यांच्या बोलण्याची पद्धत विचित्र वाटली. ते म्हणाले, ‘‘तुम्ही आता वाईट मन:स्थितीत असाल, मी तुमचा त्रास वाढवत नाही…नंतर बोलतो.’’

पोलीस आणि मिडियावाले घरी येतच होते, ‘‘आम्ही नमिताचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो.’’

‘‘इतकं गलिच्छ खोटं नाटं छापूनही समाधान झालं नाही का? मुलीनं स्वत:ला वाचवलं, त्या दुष्टाला हाणलं ते पुरेसं नाही का?’’

मिडियावाले मुकाट झाले. पण पोलीस म्हणाले, ‘‘तसं नाही सर, आम्हाला गुन्हेगार पकडायचा आहे. नमिता मॅडमनं त्याला ओळखायला आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे.’’

‘‘पोलिसांना बोलावून तू फार मोठी चूक केली आहेस पोरी, किती त्रास होतोय,’’ वैतागून बाबा म्हणाले.

‘‘पण बाबा, अन्यायाला वाचा फोडायला हवी असं तुम्हीच म्हणता ना?’’ नमितानं त्यांना शांत करत म्हटलं. ‘‘खरं काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना?’’

‘‘नाही गं पोरी, नाही. केस फाइल करून तू घोळ केला आहेस. त्याचे परिणाम बघते आहेस ना? सगळीकडे बातमी पसरली आहे. अशा घटनांची वाच्यताच करायची नसते.’’

बाबांचं बोलणं ऐकून नमिताला गरगरायला लागलं. ‘‘हे काय बोलताय बाबा? सत्यवीर कर्मवीर असलेल्या माझ्या बाबांच्या मनात असले विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. तुम्ही मला अन्याय, अत्याचार लपवायला सांगताय? बाबा, तुम्हीच म्हणायचा ना, की मी माझ्या मुलींना हुंड्यात देणार आहे उच्च शिक्षण, उच्च विचार, निर्भयता अन् अन्यायाविरूद्ध बोलायची, लढायची ताकद अन् आज मी पूर्ण क्षमतेनं शरीरबळ, आत्मबळ वापरून स्वत:ला सिद्ध केलंय तर माझं कौतुक करण्याऐवजी, मला आधार देण्याऐवजी माझा धिक्कार करताय? लोकांच्या बोलण्याला घाबरता? स्वत:च्या मुलीवरच अविश्वास दाखवताय? ’’

ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेजात शिकणारी नमिताची धाकटी बहिण रीतिका घरी आली होती. तिनं मिठी मारून ताईचं कौतुक केलं. तिच्या येण्यानं, तिच्या धीरानं थोडं बरं वाटलं.

आईबाबांना वाटणारी भीती शेवटी खरी ठरली. फोनवरच योगेशजींनी अत्यंत नम्रपणे पण ठामपणे नमिता आणि प्रांजलचं लग्न मोडल्याची बातमी सांगितली. त्यांच्यावर जणू वजाघात झाला. आई नमितावरच ओरडली, ‘‘स्वत:च्या शौर्याची अशी दवंडी पिटवून काय मिळालं तुला? सुरक्षित राहिलीस, तेवढं पुरेसं नव्हतं? विनाकारण ठरलेलं लग्न मोडलं…’’

‘‘बरं झालं ना आई, त्यांची संकुचित विचारसरणी आधीच कळली ते. लग्नानंतर असं काही घडलं असतं तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का? पण त्यांना तरी कशाला दोष द्यायचा? माझीच माणसं जिथं मला परकी झालीत, तिथं इतरांचं काय?’’ बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला.

नमिताला कळत नव्हतं की तिचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे. अविश्वासाचं मळभ दाटून आलेलं. तिच्या बोटात अजूनही साखरपुड्याची अंगठी होती. ती अंगठी प्रांजलनं तिच्या बोटात घातली, तेव्हा त्याचा झालेला स्पर्श, त्यातील प्रेम, आपुलकी, त्यामुळे देहावर उठलेलं रोमांच…सगळं सगळं खोटं होतं का? किती स्वप्न बघितली होती तिनं. अजूनही ती हिऱ्याची अंगठी तिच्या अनमिकेत होती. पण या क्षणी तिला त्या हिऱ्याची बोच असह्य वाटली. नाती इतकी तकलादू असतात का? न घडलेल्या घटनेमुळे ती तुटतात?

या एका घटनेनं विश्वासाची भावना पार धुळीला मिळाली. प्रांजलच्या आईवडिलांचं जाऊ दे. त्यानंतरही निदान एकदा भेटायचं, बोलायचं, सत्य जाणून घ्यायचं? तोही इतक्या क्षुद्र मनोवृत्तीचा निघावा?

आज आठ दिवसांनी नमिता घराबाहेर पडत होती. युनिव्हर्सिटीत जाऊन बघायचं होतं. मित्रमैत्रिणी, शिक्षक, सहकारी कशी काय प्रतिक्रिया देतात.

तिला आवरून घराबाहेर पडताना बघितलं अन् आई बोललीच, ‘‘अगं, इतक्यात अशी तयार होऊन बाहेर पडू नकोस. घटना जरा जुनी झाली की लोकांना विसर पडतो.’’

नमिता संतापलीच, ‘‘कोणती घटना? काय झालंय? तू विनाकारण का माझ्या मागे असतेस आई? अगं असं वागून तू मला किती दुखावते आहेस, हे कळतंय का तुला? तुझं सगळं प्रेम, माया, ममता कुठं गेली गं?’’ अन् मग शांत होऊन ती म्हणाली, ‘‘आई, जे होईल ते सोसायला मी समर्थ आहे. तू उगीच माझी काळजी करू नकोस.’’

युनिव्हर्सिटीत सगळ्यांनीच तिच्या धाडसाचं कौतुक केलं. कुणालाही तिच्यावर अविश्वास दाखवावा असं वाटलं नाही. नमिता सुखावली. तिनं पीएचडीचा प्रबंध पूर्ण केलाच होता. लवकरच तिला डॉक्टरेट मिळणार होती. आता तिनं प्रशासनिक सेवेच्या परीक्षेसाठी कंबर कसली. समाजात स्वत:ला सिद्ध करायला पॉवरही हवीच.

जे ठरवलं ते मिळवायचं हा तिचा स्वभाव होता. तिनं कठोर परिश्रम केले अन् पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी छापून आली. ‘भारतीय प्रशासनिक परीक्षेत डॉ. नमिता साठे यांना प्रथम क्रमांक मिळाला.’

आता तिचे प्रचंड कौतुक सुरू झाले. आईबाबाही आनंदले. पण तिला जवळ घेऊन कौतुक करू शकले नाही. त्यांच्यात पडलेली दरी साधली जात नव्हती. ज्या क्षणी तिला आधाराची अत्यंत गरज होती, तेव्हाच त्यांनी तिला दूर लोटली होती हे शल्य नमिताही विसरू शकली नव्हती.

उत्तम अधिकारी म्हणून ती नावाजली जात होती, पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकत होतं. काय ते तिला समजत नव्हतं. तिला लक्षात आलं, त्या काळात तिनंही स्वप्नं बघितलं होतं, उत्तम पत्नी, उत्तम गृहिणी, उत्तम सून, उत्तम आई होण्याचं. आपलं प्रेम, आपल्यातली माया, ममता तिला आपल्या कुटुंबावर उधळायची होती. पण ते झालंच नाही. कधीमधी रात्रीच्या अंधाऱ्या एकांतात ती रडून घ्यायची. आपल्या भावनांना वाट करून द्यायची. पण आता तिला नाती गोती नको होती. तिचा विश्वासच उडाला होता.

पण तिला खूप स्थळं सांगून येत होती. आईवडिल लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होते. स्थळ नाकारू नये म्हणून विनवत होते. पण तिने स्पष्टच सांगितलं, ‘‘या विषयावर पुन्हा बोलायचं नाही. मला संसार करायला वेळ तरी कुठं आहे? मी अशीच सुखात आहे.’’

पण कधी कधी कथा कांदबरी किंवा सिनेमात शोभावेत असे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. कामाच्या निमित्तानं नमिताला खूप प्रवास करायला लागायचा. एकदा अशीच ती दिल्लीला निघाली होती. सामान व्यवस्थित लावून तिनं वाचायला सुरूवात केली.

गाडी सुटायला काही क्षणांचा अवधी असतानाच कुणी प्रवासी डब्यात चढले अन् सामान नीट लावू लागले. सहजच नमिताचं लक्ष गेलं. ती दचकलीच! तो प्रांजल होता. क्षणांत तिनं निर्णय घेतला, आपली जागा बदलायला हवी.

त्याच क्षणी प्रांजलचंही तिच्याकडे लक्ष गेलं. त्याचा चेहरा आनंदानं उजळला. कुठलीही प्रस्तावना न करता तो एकदम म्हणाला, ‘‘मला याच चमत्काराची प्रतीक्षा होती नमिता…मी वाट बघत होतो आपल्या भेटीची.’’

नमितानं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. पण प्रांजल मात्र आपली बाजू मांडण्यासाठी उतावीळ आणि आग्रही होता.

नमिताला बोलायची संधी न देता तो बोलू लागला, ‘‘तू यू.पी.एस.सीत पहिली आलीस त्या दिवशीच खरं तर तुझं अभिनंदन करायचं होतं. पण माझं धाडस झालं नाही. मी तुझा अपराधी आहे. मी भ्याड, भित्रा होतो गं…पण मीही तुझ्यासारखीच मेहनत घेतली अन् प्रशासनिक अधिकारी झालो. मनात होतं, आपली नक्की भेट होईल. तसे आज भेटलो, मला क्षमा कर. तू धाडसी आहेस. मी मात्र कमी पडलो…’’ त्याच्या देहबोलीत, चेहऱ्यावर, बोलण्यात पश्चात्ताप अन् क्षमायाचना होती.

‘‘माझ्या आईनं बाबांना सांगितलं की तिला अशी धाडसी सून नकोय. सरळसाधी संसार करणारी सून हवीय. शेवटी बाबांना फोन करावा लागला. मी तुला भेटायला येणार होतो, पण आईनं ‘जीव देईन’ अशी धमकी दिली. शेवटी मी ही सांगितलं ठिक आहे. मी आत्ता भेटत नाही, पण मी कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही. मनात ठरवलंच होतं की तुझ्याशिवाय माझी पत्नी इतर कुणी असूच शकत नाही. माझ्या प्रतिज्ञेमुळे आईही गोंधळली आहे. तिला आता आपली चूक उमगली आहे. पण तरीही मी तुला भेटायचं धाडस करू शकलो नाही.’’

नमिता दगडी मूर्तीसारखी निश्चल बसली होती. खरं तर तिला प्रांजलला सांगायचं होतं की तिचं हृदय आता कोरडं वाळवंट आहे. प्रेमाचे झरे पार आटले आहेत. स्त्रीसुलभ प्रेमळपणा, सौम्यपणा, साधेपणा सगळं आता ती विसरली आहे. प्रांजलनं यापुढे तिच्याशी संपर्क करू नये. पण ती काहीच बोलली नाही.

प्रांजलच्या बोटात आजही साखरपुड्याची अंगठी होती. प्रांजलने खरोखर आपलं हृदय तिच्यापुढे उघडं केलं होतं. पुढला प्रवास नि:शब्दपणेच झाला.

त्यानंतरच्या आठवड्यात नमिता ऑफिसातून घरी आली, तेव्हा प्रांजलचे आईवडिल ड्रॉइंगरूममध्ये बसलेले तिला दिसले. किती तरी वर्षांत आईनं उत्साहानं, प्रेमानं उच्चारलेले शब्द तिच्या कानावर आले, ‘‘नमिता, अगं, बघ तरी कोण आलंय…’’

‘‘या दोघांनीच ही किमया केलीय बहुतेक. तरीच आईच्या मनातलं किल्मिष नाहीसं झालंय.’’ मनांतल्या मनात म्हणत नमिता त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. आयुष्यातत त्यांची तोंडं बघणार नाही असं तिनं ठरवलं होतं, त्याच माणसांना तिला सामोरं जावं लागलं.

प्रांजलची आई पटकन् उठली. नमिताचे हात आपल्या हातात घेऊन तिनं नमिताला शेजारी बसवलं. तसेच तिचे हात धरून ती म्हणाली, ‘‘मला क्षमा कर मुली. तुझ्यासारखी हिरकणी आमच्या नशिबानं लाभली होती, पण आम्हालाच पारख करता आली नाही. आमचं चुकलं माझ्या मुलाचं दु:ख, त्याचा संताप मला बघवत नाहीए. माझं अज्ञान, माझा अहंकार, माझी चूक या सगळ्याचं प्रायश्चित्त माझ्या मुलाला भोगावं लागतंय. मी तुझी अपराधी आहे, माझा मुलगा नाही. मला एक संधी दे…मी क्षमा मागते तुझी,’’ बोलता बोलता त्या खूपच भावनाविवश झाल्या. प्रांजलच्या वडिलांच्याही चेहऱ्यावर तेच भाव होते. नमिताला कठोर होता आलं नाही. काही न बोलता ती उठून आतल्या खोलीत निघून गेली.

त्या रात्री तिला झोप येईना. ट्रेनमध्ये क्षमा मागणारा, स्वत:ची चूक कबूल करणारा प्रांजल पुन्हापुन्हा डोळ्यांपुढे येत होता. मधल्या काळात तो भेटून गेला नाही याचा राग आता उरला नव्हता. कारण आपण भ्याडपणे वागलो हे त्यानं प्रांजळपणे कबूल केलंच होतं. आता त्याचे आईवडिलही क्षमा मागून गेले होते. ती तरी त्यांच्यासमोर कुठं रौद्ररूप दाखवू शकली होती? नमिताला रडू यायला लागलं. बराच वेळ रडून झाल्यावर तिला मोकळं वाटलं. मग झोपही लागली.

आठ दिवसांनी आई तिच्याजवळ येऊन बसली. ‘‘इतके दिवस तुला विचार करायला वेळ दिला. आता एकदा काय तो निर्णय घेऊन टाक गं! योगेश पुन्हापुन्हा फोन करताहेत…आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं?’’ आई आशेनं तिच्याकडे बघत होती.

तिनं आईकडे बघितलं अन् उठून उभी राहत ती सहजपणे म्हणाली, ‘‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी तयार आहे.’’

आई आनंदानं, समाधानानं उठून जाण्याऱ्या लेकीकडे बघत राहिली. घरात पुन्हा एकदा आनंद दाटला. दुसऱ्याच दिवशी आईबाबा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी इंदौरला निघून गेले.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...